Monday 30 June 2014

वसंतराव देशपांडे - एक झपाटलेले गाणे!!

माझ्या आयुष्यातली पहिली मैफिल, मी ऐकली ती या गायकाची आणि तेंव्हा जो या गायकीचा संस्कार माझ्यावर झाला, तो आजतगायत  कायम आहे. १९७२ साल  असावे. आईबरोबर, मी दादरच्या छबिलदास शाळेच्या सभागृहात वसंतरावांचे गाणे ऐकायला गेलो होतो. त्यादिवशी त्यांनी काय गायले, या स्मृती आता धुसर झाल्या आहेत पण, "हे गाणे काही वेगळेच आहे" इतके मात्र जाणवले. त्याआधी, मी तसे फारसे रागदारी संगीत  आणि या मैफिलीला देखील आईचा आग्रह, माझ्या आवडीपेक्षा अधिक होता!! आज या गोष्टीचे थोडे नवल वाटते. एकतर, तोपर्यंत, मी फारसा शास्त्रोक्त संगीताच्या वाटेला गेलो नव्हतो पण संगीताची आवड बहुदा आईच्या लक्षात आली होती आणि त्यामुळेच बहुदा आईने मला या मैफिलीला नेले असावे. 
त्यानंतरची आठवण मात्र,  अविस्मरणीय आहे. साल बहुदा, १९७३/७४ असावे. चर्चगेट इथल्या "इंडियन मर्चंट्स चेंबर"च्या सभागृहात, वसंतरावांची मैफिल होती - रविवार संध्याकाळी होती. साथीला आपले पु.ल. देशपांडे होते आणि हे आकर्षण वेगळेच होते. सभागृहात गर्दी खचाखच भरली होती आणि त्यावेळी या गायकाने, जसा राग मारवा गायला, तसा मारवा, अजूनपर्यंत मी प्रत्यक्ष मैफिलीत ऐकला नाही!! वास्तविक, पुढे रेकोर्डवर ऐकलेला उस्ताद अमीर खानसाहेबांचा हाच मारवा, केवळ अतुलनीय असक़ ऐकायला मिळाला आणि त्याला तर आजही तोड नाही पण, तरीही प्रत्यक्षातील स्वरांची अनुभूती काही वेगळीच अननभूत असते. त्या मिफिलीला, प्रत्यक्ष किशोरी आमोणकर आल्या होत्या. बाई, अगदी समोरच बसल्या होत्या आणि मी थोडा तिरप्या दिशेत बसला असल्याने, बाईंची "दाद" मला सहज दिसत होती. त्यावेळी देखील, किशोरी आमोणकर या "किशोरी आमोणकर"च होत्या!! 
पहिल्यांदा वसंतरावांनी कुठला राग गायला, ते आता स्मरत नाही पण, नंतर त्यांनी, मारवा गायला घेतला. जवळपास ५० मिनिटे हा राग गायला पण  ,द्रुत रचना केवळ ५,७ मिनिटांचीच!! आलापीच मुळी अर्धा तास सुरु होती. अगदी सुरवातीला त्यांनी, जो काही असामान्य "निषाद" लावला, तो आतला मृदू आणि हळुवार होता की त्याला कुठल्याही शब्दांची दाद द्यायची हिंमत झाली नाही!! किशोरी आमोणकरांच्या चेहऱ्यावर त्या स्वराची अलौकिक धुंदी पसरली होती. सहज डोळे मिटून, त्यांनी आपला उजवा हात थोडा वर घेतला आणि त्या हालचालीत, त्या "निषादाचे" सर्वस्व ओतले!! मैफिल तिथेच सिद्ध झाली. मला तर नेहमी असे वाटते, "भैरवी", "जोगिया' "मारवा" या रागातील चीजा गाताना, शक्यतो द्रुत लयीतील चीजा म्हणूच नयेत. ही राग आलापी मध्येच खरे खुलतात आणि त्याची धुंदी अवर्णनीय असते. 
अर्थात, असे काही असले तरी, तरी या गायकाची शैली ही नेहमीच अत्यंत आक्रमक अशीच राहिली. त्यांच्याबाबतीत एक आरोप नेहमी केला गेला - त्यांच्या गायकीवर दिनानाथ मंगेशकरांचा प्रभाव आहे!! पुढे, पुढे तर ते, दिनानाथरावांचीच गायकी सादर करतात, इथपर्यंत मजल गेली!! आपल्याकडे विचार किती चुकीच्या पद्धतीने  जातो, याचे हे एक उदाहरण!! जरा बारकाईने विचार केला तर असेच आढळेल, या दोन्ही गायकांचा "मिजाज" सारखा पण पुढे गायकी मात्र खूपच वेगळी आहे. या दोन्ही गायकांनी, पंजाबी शैली महाराष्ट्रात आणली आणि रुजवली पण, दिनानाथरावांची गायकी नाट्यगीतापुरती(च) बव्हंशी मर्यादित राहिली तर वसंतरावांनी ती गायकी रागदारी संगीतात आणून रुजवली!! 
एक मात्र नक्की म्हणावेसे वाटते, वसंतराव द्रुत लयीत फार रमायचे आणि तिथे त्यांच्या बुद्धीची कुशाग्रता दिसून यायची. वर मी ज्या मारवा रागातील आलापीचे उदाहरण दिले, तशी गायकी, मला देखील नंतरच्या काळात फारच कमीवेळा ऐकायला मिळाली. एकूणच गायकीचा सगळा आविर्भाव हा, " स्वर कसे माझ्या ताब्यात आहेत आणि माझ्या मर्जीनुसार ते माझ्या गळ्यातून बाहेर पडतात" अशा थाटाचा असायचा.पंजाबी शैलीचा हा वेगळा प्रभाव. अर्थात, गाण्यामध्ये बुद्धीगम्यता नेहमी दिसायची. संगीताचा अफाट व्यासंग आणि व्यासंगाचे गाण्यातून प्रत्यंतर देण्याची तितकीच अलौकिक कुवत, असे वर्णन करता येईल. गळा, पाच सप्तकात सहज फिरणारा आणि लयीचे विलक्षण बंध, स्वरांतून आविष्कृत करणारी गायकी. लयीचे तर या गायकाला "वरदान" होते, असे म्हणता येईल. गाताना, कधी कुठल्या स्वरावर "ठेहराव" घेतील आणि कधीकधी नसलेल्या स्वराचे देखील अस्तित्व दाखवून देतील, याचा नेम नसायचा. 
वास्तविक, मारवा रागात, "षडज" स्वराचे अस्तित्व जितके नाममात्र असेल तितके ठेवायचे आणि असे असून देखील, एका मैफिलीत, त्यांनी याच स्वरावर अचानक सम गाठून, याच रागाचे नवीन स्वरूप दाखवून दिल्याची अफलातून आठवण आहे. वास्तविक हा विचार त्यांना अचानक सुचला असणार पण तरीही सुचलेला विचार, चालू असलेल्या लयीत बसवून, तिथे रागाचेच वेगळे स्वरूप दाखवण्याची करामत, ते सहज करू शकत होते आणि हे केवळ याच रागापुरते नसायचे.तसे पाहिले तर आवाजाची जात "पांढरी तीन" किंवा तशाच पट्टीतील, तरीही अतिशय सहजपणे, "काळी तीन" किंवा "काळी चार" मध्ये देखील ते सहज गात असत. 
महाराष्ट्रात त्यांची गायक म्हणून प्रसिद्धी झाली ती नाट्यगीतांच्यामुळे. "कट्यार काळजात घुसली" हे त्यामानाने नंतरचे नाटक. त्याआधी, त्यांनी, "रवी मी","शत जन्म शोधिताना" ही आणि अशी गीते विलक्षण ताकदीने गाउन, आपली कारकीर्द स्थिर केली. अर्थात, आवाजाची जात, अत्यंत धारदार, विलक्षण द्रुत गतीच्या ताना घेण्याची क्षमता आणि गाताना, लयीचे बुद्धीगामी बंध निर्माण करण्याइतकी बुद्धीमत्ता, यामुळे त्यांचे गायन, रसिक लोकांच्यात लोकप्रिय होणे क्रमप्राप्तच होते. तिथेही मराठी रंगभूमीचा समग्र अभ्यास करून, त्यांनी आपली मते ठरवली होतो. पुढे त्यांनी दूरदर्शनवर "शाकुंतल ते मानापमान" असा असामान्य कार्यक्रम सादर करून, आपण काय ताकदीचा व्यासंग करू शकतो, याचे यथार्थ दर्शन घडवले. तिथेही, कार्यक्रम सादर करताना, कधीही "बाबा वाक्यं प्रमाणम" असला विचार न करता, त्याबाबत शोधक वृत्तीने अभ्यास करून, प्रत्येक नाट्यगीताची मुलस्थाने, त्यामागे, त्या संगीतकारांनी केलेला विचार , याबाबत संशोधन करून, तो कार्यक्रम सादर केला. त्यावेळी, त्यांनी मांडलेल्या ,मतांवरून बराच गदारोळ निर्माण झाला होता पण त्याने, ते अजिबात विचलित झाले नाहीत कारण, त्यामागे त्यांचे बौद्धिक अधिष्ठान होते. 
ठुमरी, कजरी, चैती, होरी या उत्तर भारतातील लोकसंगीतातून जन्मलेल्या उपशास्त्रीय संगीतातील नेमका फरक, काव्याच्या दृष्टीने, स्वररचनेच्या दृष्टीने तसेच गायकीच्या संदर्भात फरक, त्यांनी नेमक जाणला होता आणि तो फरक आपल्या गायकीतून सोदाहरण दाखवण्याची विलक्षण कुवत होती. 
अर्थात, इतका असामान्य गायक असला तरी त्यांच्या गायकीला काही मर्यादा या होत्याच. आयुष्यभर रागदारी संगीताची "कास" धरल्याने, आवाजाला थोडे "जडत्व" प्राप्त झाले होते आणि त्यामुळे, सुगम संगीत किंवा चित्रपट संगीत गाताना, या मर्यादा उघड्या पडल्या होत्या. आपल्याकडे, एक विचात्र सवय आहे, एखादी व्यक्ती एखाद्या कलेत पारंगत झाली किंवा लोकप्रिय झाली की मग, त्याचे सगळे कलात्मक आविष्कार हे असामान्य(च) असतात, असे धरून चालतात. काही उदाहरणे देतो. वसंतरावांचे "बगळ्यांची माळफुले" हे विलक्षण प्रसिद्ध झालेले गाणे. खळे साहेबांची "गायकी" अंगाची चाल आणि त्याला लाभलेला वसंतरावांचा तालेवार स्वर!! एक भावगीत म्हणून, हे गाणे डागाळलेले आहे!! हे गाणे जरा बारकाईने ऐकले तर असेच आढळेल, या गाण्यात, या गायकाची - स्वर ताब्यात ठेऊन, त्यावर स्वार होऊन गायची सवय स्पष्टपणे दिसते आणि ती भावगीताला मारक आहे. भावगीत, हे काही रागदारी संगीत किंवा उपशास्त्रीय संगीत नव्हे, की जिथे "गायकी" दाखवणे जरुरीचे असते. 
वास्तविक गाण्याची चाल अप्रतिम आहे, कविता देखील गेयतापूर्ण आहे पण सादरीकरण दोषपूर्ण आहे. गायन सुरीले आहे पण अनावश्यक ताना आणि सुरांची जातकुळी भावगीताला अजिबात शोभणारी नाही. पण, तसे बघितले तर हा दोष सगळ्या शास्त्रोक्त गायकांच्या बाबतीत अवश्यमेव दिसतो. कुमार गंधर्व (आज अचानक गाठ पदे), किशोरी आमोणकर (जाईन विचारीत रानफुला), जितेंद्र अभिषेकी (सर्वात्मका सर्वेश्वरा) रामदास कामात (सखी सांज) ही सगळी गाणी, भावगीत या संदर्भात ऐकावी. कुमार गंधर्वाचे सदोष उच्चार तसेच कुठलेही गाणे, रागदारी चीज म्हणायचा थाट. जितेंद्र अभिषेकीबुवांना शब्दांवर अकारण जोर देण्याची खोड होती, किशोरी आमोणकरांच्या गळ्यात उपजत धारदार स्वर आणि बंदिश गायची सवय तर रामदास कामतांना भावगीत, नाट्यगीताच्या अंगाने गायची सवय, असे काही ठळक दोष आढळतात. पण, पाल्याकडे काय होते, हे सगळे गायक अत्यंत लोकप्रिय, प्रथितयश असल्याने, त्यांनी काहीही गायले तरी त्यांच्या दोषांवर पांघरून टाकून, अनावश्यक कौतुक करायचे!! कुमार गंधर्वांनी सादर केलेले, "तांबे गीते,","गीत वर्षा", "मला उमजलेले बालगंधर्व" हे सगळे फसलेले प्रयोग आहेत पण आपण ते मान्य करायला तयार नसतो. 
नाट्यगीताच्या बाबतीत देखील असाच प्रकार दिसतो. एक उदाहरण देतो. "घेई छंद मकरंद" हे वसंतरावांचे अतिशय प्रसिध्द गाणे आहे आणि गायकीच्या दृष्टीने अप्रतिम आहे. मूळ चाल "धानी" रागात असून (ठाय लयीतील गाणे), आपले काहीतरी वैशिष्ट्य असावे म्हणून, या गायकाने "साळगवराळी" रागात, द्रुत लयीत हेच गाणे सादर केले. आता जरा विचार केला तर "धानी" आणि "साळगवराळी" या रागात सत्कृतदर्शनी फारसा फरक नाही, स्वर लावण्याच्या पद्धतीत फरक आहे परंतु वसंतरावांनी, आपल्या लोकप्रिय झालेल्या शैलीत गाणे गौण, अपरिमित लोकप्रियता प्राप्त केली. खरी गंमत पुढे आहे. याच नाटकातील "ललत पंचम" या रागातील, "तेजोनिधी लोहगोल" हे गाणे सर्वार्थाने असामान्य आहे. लयीला अति अवघड चाल, तालाला कठीण तरीही, वास्तव्क वसंतरावांनी फार अप्रतिम गायले आहे पण, "घेई छंद" च्या मानाने, या गाण्याला प्रसिद्धी कमी लाभली!! 
अर्थात, एक गवई म्हणून, हा गायक खरच असामान्य होता . कुशाग्र बुद्धीमत्ता, मनातील सांगीतिक विचार तात्काळ गळ्यातून काढण्याची विलक्षण हातोटी, अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आणि नेहमीप्रमाणे, व्यक्ती गेल्यावर आपल्याला त्याची "किंमत" अधिक कळते, या उक्तीनुसार, या गायकाला मृत्युनंतर अतोनात प्रसिद्धी मिळाली!! आज, या गायकाचा स्मृतिदिन म्हणून, इतके लिहायचा प्रपंच मांडला. 

No comments:

Post a Comment