Saturday 26 December 2015

विरही भैरवी



प्रत्येक झाडाचे 
प्रत्येक पक्षी कसले तरी 
कसले तरी गाणें गातो 
प्रत्येक सूर 
पानाइतकाच झाडांनाही 
आपला आपला वाटतो 

गाणें गातात 
देणें देतात 
झडून जातात 
उडून जातात 

झाडे नुस्ती नुस्ती 
नुस्ती रहातात 

आरतीप्रभूंची ही अजरामर कविता. छंदात्मक रचनेपासून वेगळे अस्तित्व दाखवणारी आणि तरीही आशयाचा अप्रतिम नमुना दाखवणारी. केवळ शब्दांच्या उलटापालटी मधून, वेगवेगळे आशय व्यक्त करणारी. या कवितेत, 
गाणें गातात 
देणें देतात 
झडून जातात 
उडून जातात 
या ओळी मला भैरवी रागाचे अस्तित्व दर्शवतात, असे मला वाटते. भैरवी रागिणीचा सगळा प्रवास हा असाच चालू असतो. स्वर येतात आणि येताना काहीतरी संपल्याची जाणीव देत, मनाला हुरहूर लावतात. ही रागिणी अशीच आहे, साफल्याचे समाधान देत असताना, अस्तित्वाचा अंत दर्शवत असते. कधीकधी तर दु:खाच्या आवर्तात गुंतवून ठेवतात आणि तसे ठेवत असताना, या भावनेच्या अनंत "परी" दिसतात. इथे, अंत संपून जीवनाची नव्याने सुरवात झाली, असले काही नसते. जे आहे ते आता विरायला लागले आहे, हेच खरे.  
या रागात, एक, नाही दोन नाही चक्क चार स्वर कोमल आहेत. "रिषभ,गंधार,धैवत, निषाद" हे स्वर कोमल आणि त्यामुळेच, या रागाची ठेवण अंतर्मुख आहे. वादीसंवादी स्वर आहेत - मध्यम/षडज. भारतीय संगीतातील, "षडज/पंचम" भावानंतर "षडज/मध्यम"  भावाला अनन्वित महत्व आहे.  तसे बघितले तर संस्कृत ग्रंथानुसार रागिणीचा समय, दिवसाचा पहिला प्रहर किंवा पहाटेची वेळ दर्शवली आहे. पण, भैरवी ही रागिणी, कधीही सादर केली तरी तितकीच गहिरी, आर्त आणि अवीट गोडीची आहे. रागाच्या प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "रे ग रे ग सा रे सा","प ध नि ध म","सा ग रे ग म". या स्वरांना अतिशय महत्व आहे.
"मेवाती" घराण्याचे प्रथितयश गायक, पंडित जसराज यांनी सादर केलेली भैरवी आपण ऐकायला घेऊया. मुळात, पंडित जसराज यांचा अत्यंत मुलायम आवाज पण विसविशीत नसलेला. प्रसंगी अति खर्जात जाउन देखील आवाजाचा निराळाच पोत दाखवण्याचे त्यांचे कौशल्य असामान्य आहे. गायनात केवळ मेवाती घराण्याचेच सौंदर्य न दाखवता, बरेचवेळा आग्रा घराण्याची छाया देखील पडलेली आढळते. रागदारी गायन, सुगम संगीताच्या जवळपास आणता येते, हा विचार त्यांच्या गायनातून वारंवार दिसतो, याचा परिणाम असा झाला, अगदी सामान्य रसिक देखील, त्यांच्या गायकीकडे आकृष्ट झाला. तीनही सप्तकात विहार सहजतेने करण्याची अचाट क्षमता, "मुर्घ्नी" स्वराचे अस्तित्व दाखवण्याची करामत, आणि "मूर्च्छना" या अतिशय अवघड अलंकाराचे दर्शन घडविणे इत्यादी सौंदर्यस्थळे सहज मांडता येतात. 


प्रस्तुत रचनेत, आलापीतून रागाचे सौंदर्य अतिशय विलोभनीय पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळते. स्वरांवर आरूढ होण्यापेक्षा त्या स्वरांशी "मैत्री" साधून, रागाचा आविष्कार कसा करता येऊ शकतो, याचे ही रचना हे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.साधारणपणे, भैरवी म्हटले की - आता सगळे संपत आले, ही भावना दृग्गोचर होते. हे संपणे, साफल्याचे असू शकते, अपयशाचे देखील असू शकते परंतु आता पुढे काही नाही, हीच भावना या रागातून जी प्रकर्षाने आढळते, तिचा आढळ या रचेनेतून पुरेपूर घेता येतो.  अर्थात, या रागाचे जो "स्वभाव" आहे, त्या स्वभावाला साजेसे असे गायन म्हणजे परिपूर्तीचा अप्रतिम अविष्कार आहे. 

संगीतकार जयदेव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नवोदित गायकांना, गायनाची संधी दिली आणि त्यांना प्रकाशात आणले, जसे हरिहरन, सुरेश वाडकर किंवा छाया गांगुली. छाया गांगुली तर, हे गाणे प्रकाशात येण्याआधी फारशी कुणाला माहितीच नव्हती. "गमन' सारखा नवी वाट चोखाळणारा चित्रपट, अशा चित्रपटातील "आप की याद आती रही" हे गाणे भैरवी रागातील, एक अनुपमेय रचना म्हणून गणली जाते. निखळ रचना म्हणून जरी या गाण्याची विचार केला तरी हे गाणे फार वेगळ्या ढंगाचे आहे. एकतर रचना, ठराविक साच्यात बसणारी नाही. सुरवात फक्त आलापीमध्ये गायन तर मधेच वाद्यमेळ फार वेगळ्या अंगाने वाजलेला. आता भैरवीचाच विचार करायचा झाल्यास, "आप की याद" या ओळींच्या सुरांतून नेमके सूचन होते. गाण्यात, मध्येच अतिशय गुंतागुंतीच्या रचना आहेत तसेच गायन देखील त्याच अंगाने गेलेले आहे. गाण्यातील ताल देखील तसा खास "उठावदार" नसून, गायकीला पूरक इतपतच तालाचे अस्तित्व आहे. ययाचा परिणाम असा झाला, गाण्यात गायनाला अपरिमित महत्व मिळाले. खरतर जयदेव यांच्या बहुतेक सगळ्या गाण्यांत, वाद्यांचा नेहमीच नाममात्र वापर असतो. थोडे बारकाईने ऐकले तर आपल्याला समजून घेत येईल, मोजक्याच वाद्यातून चालीची अर्थपूर्णता आणि शब्दांचा आशय अधिक अंतर्मुखतेने सादर केलेला आढळून येतो. या गाण्यात, जेंव्हा सुरवातीला ताल विरहित गायन चालू असताना, या कौशल्याची प्रचीती आपल्याला नेमकेपणाने घेता येते. 

गीतास रागाधार असावा पण गीत रागात नसावे, या पंथाचे, जयदेव हे संगीतकार आहेत. प्रस्तुत गाण्यात, याच वाक्याचा प्रत्यय आपल्याला घेता येतो. भैरवी रागाचे सूर ऐकायला येतात, जाणवतात पण गाणे भैरवीपासून वेगळे होते आणि मुख्य म्हणजे "गाणे" म्हणून सादर होते. बरेचवेळा इष्ट ते चमकदार वा भरून टाकणारे सुरावटींचे परिणाम देखील जयदेवांनी वेचक वाद्यांच्या सहाय्याने साधले आहे. इथे आपल्याला बासरी वाद्याने साधलेला इष्ट परिणाम ऐकायला मिळतो. गीताचा लयबंध यामुळे पुढे सरकत असला तरी  तो गीतास बळजबरीने पुढे ढकलतो आहे, असे अजिबात दिसत नाही आणि, संगीतकार म्हणून जयदेव इथे फार वेगळे होतात. आणखी खास वैशिष्ट्य लिहायचे झाल्यास, साधे, मधुए आणि तसे पहाता परिचयाचे, बारकाव्यांनी भरलेले व विस्तारशक्यता असलेले संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत असत. बरेच रचनाकार नेहमी म्हणतात, मुखडा सुचण्यातच खरी प्रतिभा लागते. नंतर सगळे बांधकामच असते आणि हे जर मान्य केले तर जयदेव फार मोठे कारागीर ठरतात.  
आताचे गाणे आपण ऐकणार आहोत, हे देखील सरळ सरळ भैरवी रागावर आधारित अजिबात नाही पण, आपण चित्रपट गीत बांधत आहोत, याची नेमकी जाणीव ठेऊन, रचना केल्याचे स्पष्टपणे दिसते. "हमे तुमसे प्यार कितना" हे "कुदरत" चित्रपटातील, संगीतकार राहुल देव बर्मन यांनी सादर केलेली रचना आहे. किशोरकुमारने गायली आहे. गाण्यात, केरवा ताल वापरले आहे. या संगीतकाराची खासियत अशी आहे, गाण्यातील ताल हा कधीही पारंपारिक पद्धतीने आपल्या समोर येत नाही, पण जर का मात्रांचा हिशेब लावायला बसलो तर मात्र, भारतीय पद्धतीचा ताल आढळतो. अर्थात, गाणे भारतीय बनावटीचे असल्याने, हा संगीतकार, परंपरेपासून जरी फटकून वागत असला तरी त्याची अखेर मात्र परंपरेशी नाळ जोडून असते. इथे गंमतीचा भाग म्हणजे चालीतून रागाचे सूचन होण्यापेक्षा, गाण्यात जो वाद्यमेळ वापरला आहे, त्यातून भैरवी रागाचे सूर आपल्याला मिळतात याचेच वेगळा अर्थ, तत्काल म्हणजे महत्वाचे वा अर्थपूर्ण सांगीत विधान करण्याआधीच परिणाम साधणे, हे या संगीतकाराचे आद्य उद्दिष्ट होते. म्हणूनच त्याने बहुदा तारतेच्या ध्वनीपरिणामावर लक्ष केंद्रित करून संगीत रचना मार्ग थोडा सहज करून घेतला. हे ध्वनीपरिणाम सर्वांत सहज आणि सर्वांच्या कानात लवकर शिरते, त्याचा बोध होतो. 


मघाशी मी, तालाच्या बाबतीत जे मांडले आहे, त्या बाबत आणखी लिहायचे झाल्यास, ध्वनीपरिणाम, भारतीय केरवा तालाशी वरकरणी साम्य नसणारा मात्रांचा एक लायाबंध, तसे बघत सुटेपणाने केलेले गायन, सहज प्रतीत न होणारी सुरावट आणि घसीट तसेच मींड  या स्वर लगावांचा मुबलक वापर करताना, लयखंडाचे भान काळजीपूर्वक ठेऊन, सादर केलेले गायन!!  या संगीतकाराच्या शैलीचा आणखी एक बारकावा म्हणजे अनेक वेळा रचनेचा लयबंध लयवाद्यांतून प्रतीत न होता गीताच्या गतीतून प्रत्ययाला येतात. गीतांत लय प्रतीतीला येते ती शब्दांच्या घनतेमुळे, चरणाला आणि छंदाला मिळणारी गती अबाधित राहिल्यामुळे. या गाण्याच्या बाबतीत आपल्याला असे म्हणता येईल, भैरवी रागचौकटीपासून दूर सरकूनही रागाचे एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता या संगीतकाराकडे होती. भोवतालच्या निसर्गाचे निमित्त करून काहीसे अंतर्मुख होण्यासाठी हे गीत अवतरले आहे आणि या परिणामासाठी, या संगीतकाराने इथे संयमित भावनावेग आविष्कृत शास्त्रोक्त बाज - किंचित पातळ करून - एक अप्रतिम चित्रपट गीत निर्माण करण्यासाठी कामी लावला आहे, असे ठामपणे म्हणता येते. 
आता, या रागावरील आणखी काही रचना खालील लिंक्समधून ऐकता येतील. 
मेरी तन्हाइयो तुम हि लगा लो - जगजीत सिंग 

अजी सोनियाचा दिनु - लता मंगेशकर - हृदयनाथ मंगेशकर 

गा बाळांनो श्रीरामायण - सुधीर फडके 

Saturday 19 December 2015

बहारदार बहार



"सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती;
मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती." 
कविश्रेष्ठ मर्ढेकरांच्या या ओळींतून निसर्गवर्णन नेमक्या रीतीने आपल्याला वाचायला मिळते. विशेषत:  "मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती" ही ओळ तर खास "बहार" रागाचीच आठवण करून देते. 
बहार रागाची जाती "औडव/षाडव" आहे, म्हणजे आरोहात ५ स्वर तर अवरोहात ६ स्वर येतात. आरोही सप्तकात "रिषभ, पंचम" स्वर वर्ज्य असतात तर अवरोही सप्तकात "धैवत" स्वराला अजिबात जागा नसते. रागाचे वादी-संवादी स्वर आहेत, मध्यम, षडज. प्राचीन ग्रंथानुसार, रात्रीच दुसरा प्रहर किंवा वसंत ऋतूमध्ये कधीही सादर केला तरी चालतो. त्या दृष्टीने, ऋतूप्रधान राग आहे. रागात, कोमल गंधार आणि दोन्ही निषाद स्वरांचे स्थान खास मानले गेले आहे. किंबहुना रागातील कोमल गंधार स्वराचे स्थान अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. मुख्य स्वरसंहती बघायला गेल्यास,  "ग म ध नि सा","रे ग रे ग सा रे नि सा","नि सा रे रे स नि सा" या स्वरिक वाक्यांशांना अधिक महत्व असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. 
प्रत्येक वाद्याबरोबर एकेक कलाकाराचे नाव कायमचे जोडले गेल्याचे आपल्याला आढळून येते. शहनाई वाद्याबाबत, "एकमेवाद्वितीयम" म्हणावे असे "उस्ताद बिस्मिल्ला खान" यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे. इतिहासात जरा डोकावले तर असे आढळते, शहनाई वाद्य हे प्रामुख्याने, मंगल प्रसंगी किंवा काही समारंभ, इतपतच मर्यादित असायचं परंतु उस्तादांनी, आपल्या प्रतिभेने, शहनाई वादनात कमालीची सुधारणा घडवून आणली आणि सादरीकरणाचा असामान्य आदिनमुना सादर केला. केवळ, रागदारी संगीत(च) नव्हे तर लोकसंगीताला देखील, त्यांनी प्रमाणभूत दर्जा मिळवून दिला. विशेषत: उत्तर भारतीय लोकसंगीतातील, "होरी","चैती","कजरी" इत्यादी प्रकारांना, त्यांनी मैफिलीत स्थान मिळवून दिले. 

प्रस्तुत रचना, आलापीपासून सुरु होते, अगदी ठाय लयीत,  संथपणे,प्रत्येक सूर "न्याहाळता" यावा, इतक्या लडिवाळपणे वादन केले आहे, याचा परिणाम, आपल्या मनावर रागाची आकृती स्पष्टपणे ठसते. तसे काटेकोरपणे ऐकले तर, शहनाई वाद्याच्या काही अंगभूत मर्यादा आहेत, विशेषत: श्रुती मांडणी आणि स्थिरावणे, इथे काही वेळा हे वाद्य कमतरता दर्शविते. इथे एक बाब स्पष्टपणे मांडतो, भारतीय संगीत शास्त्रानुसार, श्रुती व्यवस्था बघितली तर कुठलेच वाद्य परिपूर्ण नाही. तेंव्हा शहनाई वाद्याबद्दलचे जे मत वर उद्धृत केले आहे, ते इतर वाद्यांबाबत देखील लागू होते. 
वादनात, रागदारी संगीतातील जे खास सांगीतिक अलंकार असतात, त्याचे व्यवस्थित दर्शन होते, जसे, हरकती, दीर्घ ताना, गुंतागुंतीच्या ताना, मिंड, गमक हे सगळे इथे ऐकायला मिळते आणि त्यामुळे वादन समृद्ध होते. एका समृद्ध वादनाचा आनंद आपल्याला इथे नक्की घेता येतो. 
आता आपण, हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे ऐकायला घेऊ. "छाया" चित्रपटातील, "छम छम नाचत आई बहार" हे गाणे प्रथितयश आणि प्रयोगशील संगीतकार, सलिल चौधरी यांनी बांधलेले आहे. गाण्यात स्पष्टपणे "त्रिताल" आणि "केरवा" हे ताल वापरले आहेत. या रागाचे लक्षणगीत म्हणून, या गाण्याची ओळख करून देता येईल. गाण्याच्या सुरवातीला, "जलतरंग","सरोद" आणि "सतार" या वाद्यांचे सूर एकत्रित केले आहेत, ते जर का बारकाईने ऐकले तर, वर निर्देशित केलेल्या स्वरसंहतीचा पडताळा घेता येतो. विशेषत:, जलतरंग वाद्याचा खास उल्लेख करावाच लागेल इतके उठावदारपणे हे वाद्य या गाण्यात वापरले आहे. जलद लयीत जेंव्हा वाद्यांची गत जाते, तिथे दोन्ही निषाद, मध्यम आणि षडज, या सुरांचा खास आढळ दिसतो. त्याच लयीत पुढे तबल्याचा अप्रतिम चक्रधार सादर होतो आणि गाण्याला एक "वजन" प्राप्त होते. त्रितालातील ते सादरीकरण आहे आणि, जिथे त्रितालातील "धा" अक्षर येते, तिथे लताबाईंचा अप्रतिम स्वर ऐकायला मिळतो आणि तिथे राग सिद्ध होतो. संगीतकार म्हणून, सलिल चौधरींनी, ज्या प्रकारे भारतीय वाद्यांचा समर्पक उपयोग करून घेतला आहे आणि त्यामुळे गाण्याची बांधणी आणि वीण घट्ट होते, तिथे आपल्याला दाद द्यावीच लागते. गाण्यात, पहिला अंतरा जिथे सुरु होतो, तिथे "फुल फुल  जोबन आया" या ओळीवर, लताबाई ज्याप्रकारे, हलका स्वर घेऊन, उतरल्या आहेत, तो स्वरिक वाक्यांश तर केवळ अतुलनीय म्हणावा लागेल, कारण तोपर्यंत, गाण्याची लय जलद झालेली आहे पण, तिथेच लयीने वेगळे "वळण" घेतले आहे. लताबाईंच्या गळ्यावरील स्वामित्वाचे सुंदर उदाहरण.   

सलिल चौधरींच्या संगीताचे मुल्यमापन करायचे झाल्यास, आपल्याला ४ टप्पे ध्यानात घ्यावेच लागतील. १] युथ क्वायर (युवासमूह गायन),२] त्यांनी दिलेले हिंदी चित्रपट संगीत, जे संपूर्णपणे मुंबईत फळाला आले, ३] "बंगाली गीते" आणि इथे त्यांची कामगिरी फारच वेधक आहे, ४] बालगीते. हे चार टप्पे अशासाठी विचारात घ्यायचे, कारण त्यांच्या एकूण सांगीतिक कारकीर्दीचा विचार करायचा झाल्यास, त्यात कुठे ना कुठे तरी याच टप्प्यांचा समावेश झालेला आढळतो. आणखी एक अनन्यसाधारण विशेष मांडायचा झाल्यास, त्यांनी समूह्गायनाचा, पार्श्वसंगीतासाठी वाद्यांसारखा केलेला वापर. इथे त्यांच्या पिंडावर, पाश्चात्य सिंफनी संगीताचा प्रभाव जबरदस्त आढळतो. 
सलिल चौधरींची गीतसर्जनशक्ती वारंवार आपले सौंदर्यपूर्ण सांगीत वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्याने भारलेली होती. काम जर अधिक केंद्रीभूत झाले असते तर सुगमसंगीताच्या गतिमान कोटींत चपखल बसणारे संगीत, ते आपल्याला देऊ शकले असते. त्यांची गाणी ऐकताना, अनेकवेळा हिंदी चित्रपट संगीतात जे संगीत होते, त्यापेक्षा अधिक टिकाऊ आणि सार्थ संगीतसंगम साधण्याची त्यांना इच्छा होती, असे फार जाणवते आणि तशी त्यांची क्षमता देखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारे नव्हते!!  

आपल्याकडे अभंग, भजन यांचा  ठराविक  साचा आहे. सर्वसाधारण रचना या बहुतांशी पारंपारिक रचनेत बांधल्या जातात. याला, अपवाद म्हणून काही रचना मराठीत सिद्ध करणाऱ्या झाल्या आहेत. यात, हृदयनाथ मंगेशकरांची "गणराज रंगी नाचतो" ही रचना अवश्य सामावली जाते. बहार रागावर आधारित हे गाणे आहे.  कवियत्री शांताबाई शेळक्यांची ही अनुपमेय, गेयतापूर्ण रचना आहे. सुंदर गाण्याच्या बाबतीत एक बाब नेहमीच बघण्यासारखी असते. गाण्यातील शब्द असे असावेत की वाचतानाच त्यातील अंतर्गत लय, जाणवायला लागावी आणि त्यातूनच चालीचा "जन्म" होत जावा. बहुतेक रचनाकारांचा हाच अनुभव आहे. स्वरिक रचना बघताना, जिथे स्वर संपतात, तिथेच शब्द देखील संपत राहणे, हे संगीतकाराचा हुरूप वाढवणारे असते. प्रस्तुत रचना, या अपेक्षा बहुतांशी पूर्ण करते. 


गाण्यात पारंपारिक तबला किंवा ढोलक न वापरता, पखवाजावर ताल घेतल्यामुळे, गाण्याला अंगभूत अशी गंभीरता प्राप्त होते आणि वजन मिळते. अर्थात, रचनेचा बाज जरी आनंदी, खेळकर असा असला तरी देखील, बांधणी ही नेहमीच गंभीरतेने करणे आवश्यक असते. गाण्याच्या पहिल्या सुरापासून, आपल्याला "बहार" रागाची ओळख पटते. अर्थात, कुठल्याही सुगम संगीताच्या रचनेत, विशुद्ध स्वरूपात राग आढळणे कठीण असते, तरीही इथे बऱ्याच प्रमाणात रागाचे शुद्धत्व राखले आहे. विशेषत: अंतऱ्यामधील स्वर रचनेत, जे सतारीचे सूर आहेत, तिथे तर ओळख स्पष्ट होते. नेहमीप्रमाणे, या रचनेत देखील, खास "मंगेशकरी" ठसा उमटलेला आहे. विशेषत: गाण्यातील ओळ संपवताना, अवघड तान किंवा हरकत घ्यायची आणि लय थोडी लांबवायची किंवा असाच प्रकार, कवितेची ओळ किंचित खंडित करून घेताना, अशीच अवघड हरकत घ्यायची. याचा परिणाम एकच होतो आणि तो म्हणजे  रचना गळ्याची परीक्षा घेते.  हृदयनाथ मंगेशकरांवर एक आक्षेप नेहमी घेतला जातो - त्यांना, चाल बांधण्यासाठी, रागदारीची चीज लागते. वेगळ्या शब्दात त्यांची सर्जनशीलता ही बहुतांशी रागदारीतील चीजेवर आधारित असते आणि त्यामुळे, त्यात त्यांची,स्वत:ची  "सर्जनशीलता" कुठे आढळते? काही गाण्यांच्या बाबतीत हा आक्षेप जरी मान्य केला तरी, चालीसाठी चीज आधाराला घेतली तरी, त्यानिमित्ताने सामान्य रसिकाला रागदारी संगीताची आवड आणि जाणकारी निर्माण होते, हे देखील नक्की. 

सकल बरज गगन - ममता - रोशन - लता 

मन की बीन मतवारी - शबाब - नौशाद - लता/रफी - त्रिताल 

सुरत पिया की छिन - वसंतराव - अभिषेकी 

Saturday 12 December 2015

लयबद्ध लयपश्चिमा

आशुतोष जावडेकरांच्या "लय पश्चिमा" पुस्तकावरील माझे परीक्षण - आजच्या "मी मराठी - सप्तमी" या पुरवणीत आले आहे. 

कुठलेही संगीत ऐकताना आपण, आधी कानाने ऐकतो, पुढे मेंदूनेऐकतो आणि आपल्या आस्वादाची दिशा ठरवतो. अर्थात, आस्वाद घेताना, आपल्यावर झालेले संस्कार, बरेचवेळा आपली आवड घडवीत असतात आणि त्यानुसार आपली आवड ठरवली/ठरली जाते. त्यामुळे, विशेषत: आपले भारतीय मन हे अनाहूतपणे भारतीय संगीताकडे ओढ घेत असते. परंतु आपल्या संगीताच्या पलीकडे देखील संगीताचे विशाल विश्व पसरलेले आहे आणि ते संगीत देखील तितकेच अप्रतिम, आणि विलोभनीय असते. फक्त आपल्याला याची जाणीव नसते आणि जाणीव नसल्याने आपण आस्वादाचा दिशा बंद केलेल्या असतात. यात वस्तुत: काहीही चूक नाही. जर का वैश्विक संगीताकडे कान वळवला(च) नाही तर मग त्या सुरांची ओळख आणि पुढे मैत्री होणार तरी कशी? त्यातून, हल्लीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने जागतिक संगीत आपल्या घरात आले आहे पण, जर का त्या दृष्टीने आपण पाऊल टाकले नाही तर  बहुदा आपणच आपल्याला अलौकिक आनंदापासून वंचित करत आहोत. नेमका हाच विचार, अधिक विस्ताराने, श्री. आशुतोष जावडेकरांनी आपल्या "लय पश्चिमा" या ग्रंथात मांडला आहे. 
अजूनही आपल्याकडे पाश्चात्य संगीत म्हटले की आपण,"पॉप","जाझ", "रॉक" आणि "सिंफनी" या चतुष्टयावर आधारतो. मुळात, या संगीताकडे आपण किती जाणीवपूर्वक बघतो? जवळपास अजिबात नाही आणि ऐकतो ते देखील, रचनेच्या तालाच्या आधाराने. गाण्यातील ताल, आपले मन खेचून घेतले जाते. अर्थात अत्यंत प्राथमिक स्तरावर, ही आस्वादाची पहिली पायरी नक्कीच आहे. आपण, जर का आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे प्रश्न विचारला तर, पाश्चात्य रचना ऐकताना, आपण त्यातील काव्याचा किती विचार करतो? माझी खात्री आहे, आपल्यापैकी बहुतेक सगळेच नकारार्थी उत्तर देतील. एकतर, आपण सरसकटपणे, अशा रचनेतील काव्य जाणून घेण्याचा प्रयत्न(च) करत नाही आणि तशी आपल्याला इच्छा देखील होत नाही. 
जावडेकरांनी, आपल्या ग्रंथात, "रॉक","पॉप","कंट्री","रेगी","जाझ" अशा प्रकारांचा स्वतंत्रपणे आस्वाद घेतला आहे आणि त्याबाबत त्यांनी, कुठेही "अभिनिवेश" आणला नाही. त्यामुळे ग्रंथ  वाचताना,आपण त्यात मांडलेल्या माहितीबरोबर गुंगत जातो. लेखक म्हणून, हे यश फार महत्वाचे म्हणायला लागेल. विषय तसा नवी आहे पण, केवळ नाविन्य, हाच धागा न मांडता, यातील प्रत्येक आविष्काराचा इतिहास , त्याची पाळेमुळे आणि त्याचा आजच्या जगाशी जोडलेला सबंध अतिशय सविस्तरपणे मांडलेला आहे आणि त्याची, विशेषत: मराठी वाचकांना जरुरी होती. 
"रॉक' संगीत हे "पॉप" पासून किती वेगळे आहे, हे सांगताना, केवळ सांगीतिक फरक दाखवला नसून, भाषेतील फरक आणि सादरीकरणातील फरक देखील सुरेख सांगितला आहे आणि हे सांगताना, भाषा कुठेही जडजम्बाल होत नाही. अर्थात, त्यांना ग्रंथात कुठेही संगीताचे शास्त्र मांडायचे नसल्याने, भाषा देखील, मैत्रीनात्याप्रमाणे हसत खेळत, आपल्याला समजावीत जाते. 
तसे बघितले तर, या सगळ्या संगीताचा उद्भव हा "सिम्फनी" आणि "ऑपेरा" संगीतातून झाला आहे. अर्थात, तसे बघितले तर भारतीय संगीतात तरी काय वेगळे मन्वंतर झाले आहे!! ग्रंथात, त्यांनी "अमेरिका" हा देश मध्यवर्ती ठेवला आहे आणि अमेरिकेत, जागतिक संगीताचे वेगवेगळे प्रवाह कसे येत राहिले आणि त्यातून, आणखी किती तरी वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले, हे मुळातून वाचण्यासारखे आहे. एकतर, अमेरिका देश आजही, "इमिग्रंट्स" लोकांचा आहे आणि याचा परिणाम असा होतो, या देशात, प्रत्येक देशाची सांगीतिक संस्कृती येते, त्या संस्कृतीला अमेरिका आपलीशी करते पण करताना, तिथे आधीच अस्तित्वात असलेली संस्कृती हाताशी धरून, नवीन संस्कृतीचे, नव्याने "रुपांतर" करते. आधीच अमेरिकन लोकांना नाविन्याचा अति सोस असतो आणि त्यातून जर का तिथे संगीताचा कुठला नवीन ओहोळ आला, तर त्याचे स्वागत करण्याची तितकीच स्वागतशील वृत्ती असल्याने, तिथे युरोपियन, आफ्रिकन, भारतीय, अरेबिक, वेस्ट इंडियन संगीताचे ओहोळ येतात, अमेरिका त्यांचे दोन्ही हाताने स्वागत करते आणि तिथे रुजवून घेतात, त्यात तिथल्या संस्कृतीनुसार परिवर्तन करून, संगीताचा नवा आविष्कार जगाला घडवते. त्यातूनच, "रॉक","पॉप" इत्यादी  वैविध्यपूर्ण रचना अस्तित्वात आल्या आणि जागतिक संगीताचा पट व्यापक झाला. 
अर्थात, हे सगळे सांगताना, संगीतात, किती अनिष्ट प्रथा सुरु झाल्या, याचे देखील दर्शन आपल्या घडते. कितीही झाले तरी अमेरिकेला "विक्री" या शब्दाचे अतोनात आकर्षण आहे आणि त्या शब्दाला जागून, तिथे प्रत्येक आविष्कार होत असतो आणि बरेचवेळा त्यातून अनेक सुंदर तर अनेक अनिष्ट प्रथा निर्माण होतात. या विसंगतीवर लेखकाने,विशेषत: "पॉप" संगीतावर लिहिताना नेमके बोट ठेवले आहे. 
ग्रंथ वाचताना, आपल्याला अनेक कलाकारांचे दर्शन घडते. त्यातले बरेचसे कलाकार आपण कधी ना कधीतरी ऐकलेले असते, काही सूर कानात गुंजत असतात. त्या सगळ्या गाण्यांच्या आठवणी देखील मनोरंजक पद्धतीने लिहिल्या आहेत. मला, स्वत:ला त्यातील, "सागरा प्राण तळमळला" हे प्रकरण फारच आवडले. एकतर त्यातील बहुसंख्य कलाकार, मी देखील आज बरीच वर्षे ऐकत आहे पण, आता हे प्रकरण वाचताना, त्या कलाकारांनी भोगलेल्या दैन्याचे, मानसिक त्रासाचे, क्वचित वैफल्याचे सगळे दाखले वाचायला मिळतात. यशस्वी कलाकाराची आपल्याला नेहमीच झगमगती बाजू दिसत असते, आवडत असते पण गालीच्याखाली किती लाकडे जळत आहेत, हे फक्त त्या कलाकारालाच ठाऊक असते. 
"रॉक" संगीताचा इतिहास फारच वेधक प्रकारे मांडला आहे. "एल्विस प्रिस्ले" पासून आजच्या "मेटल" संगीताचा धावता आढावा घेतला आहे पण घेताना, "रॉक' संगीतातील बहुसंख्य महत्वाच्या कलाकारांच्या योगदानाचे स्मरण ठेवले, अर्थात यात "बीटल्स" आलेच. तोच प्रकार, "कंट्री","पॉप","रेगी" संगीताबाबत आखला आहे. प्रत्येक आविष्कारात, गाण्याची भाषा कशी बदलेली आहे, याचे वेचक दाखले वाचायला मिळतात, प्रसंगी पातळी कशी घसरली, याची देखील उदाहरणे वाचायला मिळतात. त्यामुळे लेख एकांगी होत नाहीत. 
आणखी वेधक भाग म्हणजे, यातील प्रत्येक रचनेत, वाद्ये कशी वाजतात, तसेच नव्याने कुठली वाद्ये घेतल्याने, सादरीकरणात कसे बदल होत गेले, याबद्दलचे विवेचन देखील खास वाचण्यासारखे आहे. आपल्याला "गिटार" म्हटल्यावर साधारणपणे, "इलेक्ट्रिक गिटार" आणि त्याचे खणखणीत, उद्दीपित करणारे सूर, इतकाच परिचय असतो पण, पुस्तक वाचल्यावर अशा, प्रसंगी "कंठाळी" वाटणाऱ्या वाड्यातून देखील, किती आश्वासक, निरलस सुरांचा प्रत्यय मिळू शकतो, हे समजून घेत येते. खरेतर कुठलेही वाद्य, हे कधीक "एकांगी" नसते, रचनेनुसार, त्या वाद्याची "जातकुळी" बदलते, बदलवता येते आणि त्यातून अतिशय समर्थ सांगीतिक वाक्यांशाचे रमणीय प्रत्यंतर घडवता येते. प्रश्न असतो, कलाकाराच्या वकुबाचा. या ग्रंथात अशा अनेक वकुबांचे असामान्य दाखले वाचायला मिळतात आणि आपण वाचताना स्तिमित होऊन जातो.   
संगीत हे कधीच एकसाची राहू शकत, परिवर्तनशिलता हा कुठल्याही संगीताचा अंगभूत गुण असतो आणो त्याचे प्रतिबिंब, संगीताच्या प्रत्येक शाखेत, वारंवार सापडते. या बदलाचे ठराविक टप्पे असतात, आणि एकूणच इतिहासाचा मागोवा घेतला तर हे बदल आणि बदल घडवणारे कलाकार, यांची स्मृती निरंतर राहणारी असते. असे अनेक संदर्भ आणि त्या संदर्भाबरोबर होणारे बदल,वाचताना आपण त्या काळात जातो आणि ते सगळा इतिहास आपल्याला गुंगवून टाकतो. 
ग्रंथात एके ठिकाणी "चटणी" संगीताचा उल्लेख आहे. मी परदेशी रहात असताना, १९९४ मध्ये, संगीताच्या संदर्भात हा शब्द प्रथम ऐकला होता. पुस्तक वाचताना, हा शब्दाचा उगम समजला. अर्थात, असे अनेक समज/गैरसमज, हे पुस्तक वाचताना आपल्याला दूर करता येतील. मुळात, "रॉक" काय किंवा "पॉप" काय, हे केवळ कंठाळी किंवा आक्रस्ताळी संगीत नाही. इथे व्हिटने हौस्टन किंवा सेलिन डियॉन सारख्या असामान्य गायिका, आपल्या प्रतिभेचे एंग दाखवून चकित करतात. गरज आहे ती मनमोकळ्या नजरेची आणि कान "उघडे" ठेऊन ऐकण्याची. कुठलेही संगीत हे मुलत: विशुद्ध स्वरूपातच असते, पुढे प्रगतीच्या नावाने त्यात अनेकांगाने भर टाकली जाते. त्यामुळे, त्यात चांगले - वाईट असे सगळे नाद अंतर्भूत होतात. ग्रंथ वाचताना, पाश्चात्य संगीताबाबत आपल्या मनात जी काही किल्मिषे असतात, त्यांना दूर झटकले जाते. पुस्तकाचे हे फार मोठे यश मानावे लागेल. 
या विषयाच्या अनुरोधाने, या पुस्तकात मला वाटते, काही कलाकार अनावधानाने उल्लेखायचे राहून गेले असावेत. जसे "Eric Clapton" किंवा "George Benson". अर्थात ही काही ठळक नावे झाली. तसेच आणखी एक सुचवावेसे वाटते, युरोपमध्ये लोकसंगीताची फार मोठी परंपरा आहे आणि आजही ती अव्याहतपणे चालू आहे, जसे हंगेरियन लोकसंगीत किंवा स्कॉटलंड मधील "Bagpiper" वाद्याचे संगीत, तसेच रुमानियन, पोलंड, जर्मन देशाचे लोकसंगीत. या संगीताबाबत बाबत, अशीच विचक्षण दृष्टी ठेऊन, मराठीत एकूणच सुगम संगीताच्या लेखनात "बौद्धिक" लेखनाची जी उणीव आहे,ती दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. 

जोग रागाचे विलोभनीय जग



"अनोळख्याने ओळख कैशी 
गतजन्मींची द्यावी सांग;
      कोमल ओल्या आठवणींची 
      एथल्याच जर बुजली रांग!!"
मर्ढेकरांच्या या अजरामर ओळींतून जोग रागाची पुसटशी ओळख मिळते. खरतर शब्द आणि सूर यांची नेमकी सांगड घालणे ते फार अवघड असते. त्यातून कविता हे माध्यम एका बाजूने शब्दमाध्यमातील सर्वाधिक लवचिक माध्यम आणि सूर तर नेहमीच अर्धुकलेली भावना दर्शविणारे. त्यामुळे कवितेसारख्या अत्यंत सक्षम आविष्कारातून देखील सुरांची नेमकी ओळख पटविणे तसे नेहमीच अवघड असते. जोग रागाचे सूर ऐकताना, नेहमीच, काहीसे अनोळखी सूर वाटत असतानाच एकदम, नव्याने ओळख झाल्यासारखे होते. एकतर हा राग फारसा मैफिलीत गायला जात नाही पण वादकांनी मात्र या रागावर प्रेम केले आहे, त्यामुळे या रागाचे सूर तसे अपरिचित वाटतात. 
"रिषभ,धैवत" हे दोन्ही सूर वर्ज्य असलेल्या या रागात, "कोमल निषाद" आणि "कोमल + शुद्ध गंधार" या सुरांचे प्रमुख अस्तित्व दिसते. यातील "शुद्ध गंधार" हा आरोही स्वरांमध्ये तर "कोमल गंधार" हा अवरोही स्वरांमध्ये स्थान मिळवून आहे. दोन सूर वर्ज्य असल्याने, रागाची जाती - औडव/औडव असणे क्रमप्राप्तच ठरते. 
मुख्य स्वरसंहती बघायला गेल्यास, "सा ग म प","नि प म ग","ग म ग  सा","ग म प नि सा" या स्वरसमुहांचे विशेष प्राबल्य आढळून येते. उत्तरांग प्रधान राग असून, कधीकधी अवरोहात "तार षडज" वापरला जातो आणि विशेषत: मिंडकामासाठी या स्वराचा उपयोग केला जातो. प्राचीन ग्रंथांत या रागच समय रात्रीचा दुसरा प्रहर दिलेला आहे, त्यामुळे असेल पण, रागाची ठेवण बरीचशी नाजुकपणाकडे झुकलेली आहे. ताना, बोलताना यात फारशी वक्रता आढळत नाही. 
सतार वादनात, पंडित रविशंकर हे नाव फार मोठ्या आदराने घेतले जाते आणि ते योग्यच आहे. सतार वादनाची नवीन "भाषा" तयार करणारे आणि रूढ करणारे, असा हा अद्वितीय  कलाकार. सतार हे तंतुवाद्य, तेंव्हा वाद्याला अनुकूल असे वादनाचे "तंतकारी" तंत्र या कलाकाराने विकसित केले आणि त्याला जगभर मान्यता मिळवून दिली. इथे आता आपण जोग राग ऐकताना, याचीच प्रचीती येईल. प्रस्तुत वादनात, आलापीमध्ये, वर निर्देशिलेल्या स्वरसंहतीचे प्रत्यंतर घेता येते. सुरवातीलाच, "सा ग म प" आणि " ग म ग  सा" ऐकायला मिळतो आणि "कोमल गंधार" स्वरावर घेतलेला ठेहराव, आपल्याला जोग राग दाखवून देतो. आणखी एक वैशिष्ट्य ऐकायला मिळते, स्वरांच्या तुटक आघातातून, घेतलेली मिंड. हा प्रकार तर फारच विलोभनीय आहे. रचना कशी हळूहळू विस्तार करत, "बढत" घ्यायची, हा भाग देखील तितकाच अप्रतिम आहे. "आलाप","जोड" आणि पुढे "झाला" असे सगळे अलंकार व्यवस्थित सादर करून मग, वादनातील "गत" सादर केली आहे.  


" दिल से रे" ही "दिल से" चित्रपटातील अप्रतिम रचना आपण ऐकायला घेऊया. संगीतकार रेहमान, ही कधीच, रागाचा संपूर्ण असा आधार घेत नाही. रागातील एखादीच हरकत, सुरावट, त्याला चाल बांधण्यासाठी प्रवृत्त ठरू शकते. या गाण्याच्या बाबतील, जेंव्हा "जोग" रागाशी आपण "जोड" लावायला जातो तेंव्हा, आपल्याला गाण्याकडे सरळ दृष्टीने बघून, चालणारे नाही कारण रागाचे वळण आणि या गाण्याच्या चालीचे वळण, यात बरीच तफावत आढळते. पहिली ओळ तार स्वरात आहे पण, तीच ओळ परत घेताना, जेंव्हा काहीश्या ढाल्या किंवा खर्जातील स्वरांत गाणे येते, तिथे जोग रागाची ओळख मिळते. परंतु, अशा रीतीने रागाची ओळख करून दिली तर तो रेहमान कसला? एकतर त्याला, कर्नाटकी ढंगात, पाश्चात्य सुरावटींचा प्रयोग नेहमी करावासा वाटतो. त्यामुळे, गाण्यात, पारंपारिक ठसा तसा सहज आढळत नाही. आता या गाण्यात केरवा तालाचा उपयोग आहे पण, जर का तालाच्या मात्रा हातावर मोजायला घेतल्या तरच, तालाची खूण पटते अन्यथा  कुठला ताल आहे, याचा पत्ता लागत नाही. या गाण्यात, रेहमान, गायक म्हणून आपल्या समोर येतो. तसे बघितले तर गायक म्हणून त्याच्या आवाजाला मर्यादा आहेत आणि त्याच्या एकूणच सांगीतिक प्रवृत्तीवर, कर्नाटकी संगीताचा जाड ठसा बघायला मिळतो. त्यामुळे, काहीवेळा शब्दांचे उच्चार खटकतात पण, इथे एक बाब ध्यानात घ्यायला हवी, रेहमान हा काही "गायक" नव्हे. प्रासंगिक तत्वावर  गायन,हेच खरे. 


आता, रेहमान, एक संगीतकार म्हणून थोडे मुल्यमापन करायला घेऊया. चित्रपट संगीताच्या रूढ आणि मान्य शैलीपासून अनेक बाबतींत दूर सरकणारी अर्थपूर्ण रचनापद्धती रेहमानने वापरली आहे. अधिक महत्वाची बाब म्हणजे, भारतीय तालाच्या वर्तुळात्मकते ऐवजी तो अखंड कालविभाजनाने लयावतार घडविण्याचा अवलंब करतो. त्यामुळे त्याचे लयबंध आधुनिक वाटतात. रेहमानने आणखी एक रचनापद्धत योजली आहे आणि ती अशी, की तसे पाहता स्वतंत्र म्हणजे एकल गायनाच्या मार्गाने जाणाऱ्या संगीतात, त्याने अनपेक्षित जागी आणि वेगळ्या प्रकारे समुहगायन किंवा आवजी सादरीकरण आणले आहे. काहीवेळा हे सामुहिक आविष्कार पार्श्वसंगीताची जागा घेतात, तर काही वेळा आपतत: स्वनरंग पुरवणाऱ्या रचनातत्वांचा अंतर्भाव करतात. तसेच रेहमान आपल्या संगीतात ध्वनी आणि संगीतकाराची चल गती यांनाही समोर ठेवतो. अनेकदा त्याचे संगीत आकर्षक पण भंग पावलेले आणि गीतत्वापर्यंत न पोहोचू शकणारे सुरावटींचे आकृतिबंध निर्माण करते. याचाच वेगळा अर्थ, अजूनही त्याच्यावर जाहिरात किंवा जिंगल्स संगीताचा प्रभाव आहे. आणखी एक मत मांडायचे झाल्यास, रेहमानच्या कामाची पुर्वावृत्ती राहुल देव बर्मनच्या संगीतात होती, असे जाणवते. भारतीय कलासंगीतापासून दोघेही दूर जातात, पण पुन्हा पुन्हा त्या परंपरेकडे वळूनही पाहतात. 

"त्या सावळ्या तरूचे" हे  गाणे मात्र, "जोग" रागाशी फार जवळचे नाते दर्शवते. माणिक वर्मांच्या आवाजातील ह्या गाण्याने एके काळी, महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. वास्तविक, मुळातील रागदारी संगीतातील गायिका परंतु सुगम संगीतात, स्वत:चे ठाम स्थान निर्माण केले. एका दृष्टीने विचार केल्यास, ही फारच दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. या गाण्यात, "जोग" रागाच्या खुणा अनेक ठिकाणी दिसतात. विशेषत:, गाण्याच्या हरकतींतून तर लगेच ओळख पटते. दशरथ पुजारींच्या सरळ, साध्य, अनलंकृत चालीतून, रागाचे स्वरूप उभे राहते. दशरथ पुजारी हे तसे फार लोकप्रिय संगीतकार नव्हते, शंभर एक  भावगीते - इतकीच त्यांची बव्हंशी सांगीतिक कारकीर्द होती पण तरीही, अनेक अजरामर गाण्यांचा जन्म त्यांच्या हातून झाला, असे नक्कीच म्हणावे लागेल. या गाण्याची चाल, काहीशी गायकी ढंगाची आहे पण, तरीही गाण्यातील हरकती बघत, त्यात फार काही "वक्र" गतीच्या ताना आहेत, असे आढळत नाही.  


माणिक बाईंचे गायन आणि सुगम संगीतातील योगदान, हा खरे तर दीर्घ निबंधाचा विषय आहे. ज्या हिशेबात, रागदारी गायनात, सहजता आणि संयम, या गुणांचा आढळ होता, त्याचेच नेमके प्रत्यंतर सुगम संगीतात येत असे. तसे थोडे बारकाईने बघितले तर, सुरवातीच्या गाण्यांत ताजेपणा अधिक होता, त्यात पुढे सफाईदारपणा आला. त्यांची भावगीते ऐकताना, विस्ताराच्या शक्यता भरपूर आढळतात. तालाशिवाय घेतलेली आलापी, किंवा तालासाहित घेतलेले आलाप किंवा हरकती ऐकताना, गायकी अंग अधिक स्पष्ट होते. तसे बघितले तर मराठी भावगीतात, त्याने उत्तरेचा ढंग मिसळला. पंजाब अंगाची फिरत पण त्यात मादकपणाचा अंश नाही, नखरा देखील लखनवी ढंगाचा नाही. त्या दृष्टीने बनारसी ढंग जवळचा वाटतो. मुखडा खालच्या अंगाने येणारा असला तरी, पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार आणि अनेकदा पंजाबी वक्र  वळणे घेत खाली येणार. संदिग्ध गोडवा हा स्थायीभाव, हेच खरे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 
आता आपण या रागावरील आणखी काही गाण्यांच्या लिंक्स ऐकुया. 

प्रेम हे वंचिता - श्रीनिवास खळे - पाणिग्रहण 
उनपे कुछ इस तरहा प्यार - गुलाम अली - 

Sunday 6 December 2015

लोकसंगीताचा अर्क - मांड



डिसेंबर मधील राजस्थानातील गारठवणारी रात्र. अवकाशात फक्त चांदण्यांचा प्रकाश, दूर कुठेतरी, कुणीतरी शेकोटी पेटवलेली दिसते परंतु आसमंत सगळाच काळा/निळा. कुठेच कसल्याच हालचालीची जाणीव नाही की आवाज देखील नाही. वाऱ्याने देखील आपले अस्तित्व लपवून ठेवलेले!! एखाद्या निर्वात पोकळीत फक्त स्वत:चेच अस्तित्व असावे, तरीही आजूबाजूला पसरलेल्या मूक वाळूची तितकीच मूक साथ. अशा वेळी वाळवंट देखील आपल्याशी संवाद साधू पहात असते, तसाच मूक संवाद!!  
"अजून नाही जागी राधा,
     अजून नाही जागें गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर 
     आज घुमे कां पावा मंजुळ. 
मावळतीवर चंद्र केशरी;
     पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती 
     तिथेच टाकून अपुले तनमन. 
मराठीतील "कुब्जा" कविता म्हणजे अप्रतिम लेणे आहे. पुराणातील व्यक्तिरेखा घेऊन, त्यांची संपूर्ण ओळख नव्याने करून देण्याची असामान्य ताकद या कैतेने दाखवून दिली. भावकवितेचे सगळे निकष पूर्ण करणारी ही कविता. ही कविता वाचताना, मला "मांड" रागाची आठवण येते. विशेषत: " मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भणभण;" या ओळीवर तर सारखे थबकायला लावणारी ही कविता आणि तो केशरी चंद्र आणि पहाटवारा, सगळे कसे आपल्याला पुन्हा, पुन्हा वाळवंटाची आठवण करून देणारी. 
"मांड" रागाची मांडणी बघताना, रागात सगळे स्वर शुद्ध लागतात आणि रागाची जाती, ही "संपूर्ण/संपूर्ण" अशी आहे. वेगळ्या शब्दात, या रागात कुठलेच स्वर वर्ज्य नाहीत आणि सगळे स्वर शुद्ध स्वरुपात लागतात. "बिलावल" थाटातील या रागात, वादी/संवादी स्वर - षडज/पंचम आहेत. आपल्या भारतीय संगीतात, "षडज - पंचम" भावाला निरतिशय महत्व आहे. रागाचे समय हा ग्रंथांनुसार रात्रीचा दुसरा प्रहर आहे. परत, परत मला वरील कवितेतील त्याच ओळी इथे आठवतात." मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भणभण." रागातील प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "ग म प ध सा","म प म म ग","सा रे ग सा रे सा". 

प्रथम शास्त्रीय रागदारी गायन आणि नंतर बांसुरी वादन असा अफलातून प्रवास घडला, तो पंडित रोणू मजुमदार, या असामान्य कलाकाराचा. पंडित लक्ष्मण प्रसाद जयपुरवाले यांच्या कडे रागदारी गायनाची दीक्षा आणि नंतर पंडित विजय राघव राव, यांच्याकडे शागिर्दी, याचच  परिणाम,वादनातील विचक्षण दृष्टी आणि सतत अनोखे प्रयोग करण्याची उर्मी. पंडित रोणू मजुमदार यांची कारकीर्द जवळून बघताना, वादनात केवळ पारंपारिक आविष्कार न दिसता, संगीतातील अनेक आविष्कारांचा प्रवास दिसतो. त्यामुळे, त्यांचे वादन अधिक विविधरंगी आणि आकर्षक होते. अर्थात, ही दृष्टी त्यांना, त्यांचेच गुरु, पंडित विजय राघव राव, यांच्याकडून मिळाली, असे म्हणायला वाव आहे.   


प्रस्तुत वादनात, आपल्याला वरील विवेचनाची प्रचीती यायला हरकत नाही. एका बाजूला "गायकी" अंग तर दुसऱ्या बाजूने, प्रयोगशीलता, असे दोन बंध ऐकायला मिळतील. याचा अर्थ असा नव्हे, "गायकी" अंगात प्रयोगशीलता नसते पण, इथे पारंपारिक गायकी अंग ऐकायला मिळते. वादन थोडे "धून" या सदरात घेता येईल. सगळे सूर अगदी स्वच्छ ऐकायला येतात. खरतर, राजस्थानी लोकसंगीतातील धून आहे पण तिला रागदारी स्वरूप दिले आहे. आपल्याकडे, अशा अनेक रागांची "निर्मिती" किंवा त्यांचे "मूळ" हे लोकसंगीतात सापडते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणून या वादनाचा निर्देश करता येईल. 

वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर वाजणारे संतूर वाद्याचे सुरवातीचे सूर, आपल्याला सांगतात, हा "मांड" राग आहे. वास्तविक आपण वरती या रागाची स्वरावली बघितली तर या रागात सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात पण, इथे गाण्याच्या सुरवातीलाच "तीव्र मध्यम" आणि "कोमल गंधार" लागलेला दिसतो. याचा वेगळा अर्थ इतकाच घेता येतो, राग तोच आहे पण, त्याला राजस्थानी लोकसंगीताची जोड दिली आहे. राजस्थानी लोकसंगीत जर का थोडे बारकाईने ऐकले तर लगेच ध्यानात येईल, या लोकसंगीतात, सारंगी वाद्याचा उपयोग प्रामुख्याने केलेला असतो. वास्तविक गाण्याच्या चित्रीकरणात वाळवंट आहे पण, रात्रीचा समय, प्रियकराला भेटण्याची अनिवार ओढ, या भावनेचा परिपोष करण्यासाठी, जयदेव यांनी संतूर वाद्याचा फारच परिणामकारक उपयोग केलेला आहे आणि ते करताना, त्या सुरांच्या लयीत, सारंगी देखील किती अप्रतिमरीत्या मिसळली आहे. गाण्याचा ताल, साधा, सरळ असा दादरा आहे पण, गाण्यात घेतलेली प्रत्येक मात्रा आणि त्या मात्रेशी जोडलेली वाद्ये आणि अर्थात लताबाईंचा असामान्य आवाज, या त्रयींनी, ही गाणे अजरामर झाले आहे.  वास्तविक कुठलेही गीत हे १००% परिपूर्णतेच्या कसोटीवर उतरणे, अत्यंत अवघड किंवा जवळपास नाही, असेच म्हणावे लागते. विधान जरा धाडसी आहे पण पूर्ण विचारांती केले आहे. त्याच्या जवळपास, हे गाणे नक्की जाते. गाण्यात, जरा नीट बघितले तर काही "टप्पे" आहेत आणि त्यानुसार गाण्यातली लय बदलते. संगीतकार किती कुशाग्र बुद्धिमत्तेचा असू शकतो, हे समजून घेण्यासाठी, हे गाणे ऐकावे आणि गाण्याची लय जरी बदलली असली तरी समेच्या मात्रेवर येताना,तोच "मूळ" स्वर घेतला जातो. गाणे बुद्धीगामी होते, ते असे. 


गाण्याची चाल, रसिकांच्या मनाची "नाळ" जोडणारी हवी, असा एक मतप्रवाह अनेक वर्षे प्रचलित आहे, विशेषत: गाण्याचा "मुखडा" जितका आकर्षक असेल तितके ते गाणे, रसिकांच्या पसंतीला उतरते. गाण्याचा "मुखडा" आकर्षक असणे, आवश्यक आहे पण त्याच बरोबर त्याच्या नंतरची "बांधणी" देखील तितकीच आकर्षक असणे, अत्यावश्यक असते अन्यथा, सुरवातीला मनावर घडलेला असर, हळूहळू पिछाडीला पडतो आणि गाणे निरस होण्याची शक्यता बळावते. जयदेव यांच्या बहुतेक सगळ्या रचना अनुभवताना, याचे प्रत्यंतर नेहमी येते. प्रस्तुत गाण्यात देखील, सुरवातीला संतूर वाद्याच्या सुरावटीच्या नादात, आपण गुंगून जातो आणि त्या लयीत गुंतलेले असताना, एक क्षण सगळेच थांबते आणि लताबाईंचा तार सप्तकातला आवाज कानावर येतो. इथे बघा, संतूर वाद्याचे स्वर आणि त्यानंतर येणारा, मानवी गळा. थोडी तुलना केली म्हणजे माझे म्हणणे ध्यानात येईल.  
"केसरिया बालमा" ही रचना देखील तशी पारंपारिक रचना आणि असे देखील मांडता येइल. ही रचना म्हणजे राजस्थानी लोकसंगीताचे अर्क किंवा व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. एकतर, राजस्थानी संस्कृतीत. "केसरिया" आणि त्याच्या जोडीने येणारा "कुसुंबी" रंग, याचे अनन्यसाधारण महत्व आहे. "लेकिन" चित्रपटात, हीच रचना, अधिक पातळ करून घेतली आहे, अर्थात रचनाकार हृदयनाथ मंगेशकर असल्याने, त्यात देखील बऱ्याच ठिकाणी, खास मंगेशकरी "छटा" दिसतात आणि तसे "दिसणे" अत्यावश्यक असते. अन्यथा रचनाकार म्हणून, तुमची सिद्धता, कशी सिद्ध होणार? दादरा तालात, ही रचना आहे. या रचनेबाबत असे देखील म्हणता येईल, "मांड" रागाची ओळख करून घ्यायची झाल्यास, ही रचना अभ्यासायला हरकत, इतकी ही रचना, या रागाशी जुळलेली आहे.   


अशा सारखी रचना गायला, केवळ लताबाईंचाच गळा हवा. गाण्याची सुरवातच, अगदी टिपेच्या सुराने होते. सर्वसाधारणपणे, असे दिसते, कुठलेही गाणे गायचे असेल तर, मंद्र किंवा शुद्ध स्वरी सप्तकातून सुरवात होते आणि आणि हळूहळू स्वर उंचावला जातो. मानवी गळ्याची तशी ठेवण आहे पण गाण्याच्या सुरवातीलाच, तार स्वर लावणे, ही एक प्रकारची सिद्धता आहे आणि ती सगळ्या गायकांना जमतेच असे नाही. गाण्यातील शब्द आणि एकूणच गाण्यातील लय, या दृष्टीने हे गाणे लक्षणीय आहे. 

आता आपण या रागावरील आणखी काही गाणी ऐकुया. 

अब तो है तुम से हर ख़ुशी - अभिमान - एस.डी. बर्मन - लता 

जो मै जानती बिसरत है सैय्या - शबाब - नौशाद - लता 

Saturday 28 November 2015

अलौकिक अडाणा



असेच काही द्यावे….  घ्यावे…. 
         दिला एकदा ताजा मरवा;
देता घेता त्यात मिसळला 
         गंध मनातील त्याहून हिरवा. 
कवियत्री इंदिरा संत यांच्या "मरवा" कवितेतील या ओळी, "अडाणा" राग ऐकताना, बरेचवेळा माझ्या मनात येतात. वास्तविक पाहता, दरबारी रागाच्या कुटुंबातील, हा महत्वाचा सदस्य पण जातकुळी मात्र फार वेगळी आहे. एकाच कुटुंबातील भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्वे असावीत आणि तरीही रक्ताचे नाते असावे, त्यातला हा प्रकार आहे. दरबारी गंभीरतेकडे झुकणारा तर अडाणा थोडा अवखळता दर्शविणारा!! राग अडाणा शक्यतो मध्य आणि तार सप्तकात रमत असल्याने, रागातील भावना देखील काहीशा तीव्र असतात. 
रागाच्या तांत्रिक भागाकडे वळल्यास, आरोही सप्तकात "गंधार" स्वराला प्रवेश नाही तर अवरोही सप्तक, सगळ्या सुरांना सामावून घेते. त्यामुळे रागाची जाती ही "षाडव/संपूर्ण" अशी होते. त्यापुढे बघायचे झाल्यास, "गंधार","धैवत"आणि "रिषभ" स्वर कोमल आहेत आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध. असे असले तरी "कोमल निषाद" स्वर या रागात फार महत्वाची भूमिका बजावतो. अर्थात, नेहमीप्रमाणे, "षडज-पंचम" वादी - संवादी असल्याने, कोमल निषाद स्वराचे नाते, या स्वरांबरोबर जुळून येते. रागच समय, रात्रीचा दुसरा प्रहर दिला असल्याने, आपसूक कोमल स्वरांना प्राधान्य मिळणे क्रमप्राप्त होते.   

आता आपण, या रागाची बंदिश ऐकायला घेऊ. "माता कालिका" ही अत्यंत सुप्रसिद्ध चीज म्हणजे, पंडित जसराज यांच्या गायनाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे, इतक्या जवळची आहे. ही बंदिश ऐकताना, आपल्याला रागदारी गायन, लालित्यपूर्ण पद्धतीने कसे मांडता येऊ शकते, याचा अप्रतिम अंदाज घेत येतो.  किंचित अनुनासिक स्वर, तिन्ही सप्तकात सहज विहार, तारता पल्ला अतिशय विस्तृत असल्याने, ताना, बोल ताना तसेच मुर्घ्नी स्वर, इत्यादी अलंकार सहजपणे गळ्यातून दृष्टीस पडतात. वास्तविक, नेमका मुर्घ्नी स्वर, ही फार कौशल्याची बाब मानली जाते पण, पंडितजी, अतिशय सहजपणे, हा अलंकार गळ्यातून साकार करतात. 


 प्रस्तुत रचनेत, या सगळ्या गुणांचा आढळ तर दिसतोच पण, त्यापेक्षा वेगळी बाब म्हणजे शब्दोच्चार. बंदिशीत स्पष्टपणे, काली मातेची पूजा आहे तेंव्हा स्वरांत समर्पण वृत्ती आढळणे, सहज शक्य आहे. भावनेच्या अंगाने सादरीकरण,हे पंडित जसराज यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. 

"ऐ दिल मुझे ऐसी जगह" हे "आरझू" चित्रपटातील,अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केलेले गाणे, म्हटले तर "अडाणा" रागावर आहे. याचे मुख्य कारण, गाण्याची सुरवात, "दरबारी" रागाच्या काठाने होते पण, अस्ताईच्या दुसऱ्या ओळीत आपल्याला "अडाणा" रागाची खूण सापडते. मी वरती म्हटल्याप्रमाणे, दरबारी आणि अडाणा, हे दोन राग एकाच कुटुंबातले पण, वेगळ्या स्वभावाचे. त्यामुळे एखादा सूर जरा वेगळ्या प्रकारे लागला की लगेच रागाची अदलाबदल होते आणि हेच भारतीय रागदारी संगीताचे फार मोठे वैशिष्ट्य मानावेच लागेल. केरवा तालात, ही रचना बांधली आहे. अनिल दा, आपली रचना कधी "आक्रोशी", "अनघड" स्वरुपाची करीत नाहीत परंतु रचना गाताना, त्यातील गायकी अंग आपल्याला दिसून येते. खरतर असे म्हणता येईल, "अनिल दा" म्हणजे हिंदी चित्रपट गीतातील एक असामान्य "स्कूल" होते आणि त्यांच्या रचनेचा प्रभाव, अगदी राहुल देव बर्मन पर्यंत अव्याहतपणे पडलेला होता. शास्त्रीय संगीताचा सांगोपांग व्यासंग आणि चित्रपटासाठी गाणे कसे बांधायचे, याची नेमकी जाण असलेला हा संगीतकार. तलत मेहमूद आणि मुकेश, या गायकांना प्रकाशात आणणारा संगीतकार, म्हणून या रचनाकाराची ओळख दीर्घकाळ स्मरणात राहील. 

लखनौ सारख्या संगीताने प्रभावित असलेल्या शहरात वावरल्याने, आवाजात खास "लखनवी तहजीब" बाळगून असलेला गायक म्हणजे तलत मेहमूद. तसे बघितले तर तलतच्या आवाजाला काही प्रमाणात मर्यादा होत्या, चित्रपटात अनेक प्रसंग असतात आणि त्यानुरूप गायन करणे, ही गायकाची गरज असते. तलतने आपल्या गळ्याची "जात" ओळखली होती आणि त्यानुरूप गाणी स्वीकारली. परिणाम असा झाला, संख्येच्या दृष्टीने, तलतची गाणी फारच तुरळक झाली.वरील गाणे जे आपण ऐकले, तोच या गायकाचा खरा पिंड!! लखनौच्या संपन्न, शिष्ट,सुसंस्कृत आणि संयमित वातावरणाचा हा अपरिहार्य परिणाम म्हणावा लागेल. थोडक्यात, बेगम अख्तर यांनी गझल गायनात जो आदर्श निर्माण केला, त्याच्या जवळपास फक्त तलत जाऊ शकतात. १९६० नंतर या गायकाची पीछेहाट झाली कारण, नंतरच्या संगीत शैलीत, सुरावट, संथ गती व नाजूक प्रक्षेपणास जागा नव्हती. आपण कुठली गीते गायची त्यांच्या संहितेबाबत ते चोखंदळ होते. अर्थात लखनौचा वारसा म्हटल्यावर, उर्दूचे स्वच्छ, शुद्ध उच्चारण आणि कोणत्या रचनेस गाण्याच्या योग्यतेचे काव्य समजायचे याबाबतची उच्च अभिरुची!! शक्यतो, मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात, गायनाची पातळी ठेवायची. गाताना, शायरीचे नितांत महत्व जाणून, गायकी दाखवायची तसेच ताना घेताना देखील कधीही आशयाच्या अभिव्यक्तीला धक्का पोहोचणार नाही, हीच वृत्ती ठेवायची. परिणाम असा झाला, गायनात, कधीही संपूर्ण सप्तक आवाक्यात घेतले आहे, असे ऐकायला मिळत नाही. अर्थात, हा मुद्दा सुगम संगीताच्या बाबतीत गैरलागू आहे.    

"मन मोहन मन मे हो तुम्ही" हे "कैसे कहू" चित्रपटातील असेच एक अतिशय सुश्राव्य चालीचे गाणे, या रागाच्या सावलीत वाढते. संगीतकार  एस.डी.बर्मन,याच्या चतुरस्त्र प्रतिभेचे आणखी अप्रतिम उदाहरण, म्हणून या गाण्याचा निर्देश करता येईल. गाण्याच्या सुरवातीच्या आलापीपासून, आपल्याला "अडाणा" रागाची ओळख करून घेता येते पण, हा संगीतकार, नेहमीप्रमाणे, रागाच्या आधार स्वरांना हाताशी घेतो आणि पुढील वाटचाल, स्वतंत्र करतो, जणू या संगीतकाराचा हा स्वभाव असावा, असेच वाटते. त्रिताल वापरलेला आहे आणि तो देखील सरळ, स्पष्ट वापरला आहे. रफी/सुमन कल्याणपूर/एस.डी. बातीश, या त्रयींनी हे गाणे गायले आहे. गाणे जरा बारकाईने ऐकले तर आपल्याला सहज समजून घेता येईल, या रागाचे जे वादी/संवादी स्वर आहेत, (षडज/पंचम) ते ज्या वजनाने, या रागात वावरतात, त्याच वजनाने, या रचनेत वावरत आहेत. "मन मोहन मन मे" ही ओळ ऐकताना(च) आपल्याला या रागाची ओळख होते. असे असून देखील, आपण, पुढील अंतरा ऐकला तर, रागाच्या सावलीतून ही रचना बाहेर पडते आणि आपले "स्वतंत्र" अस्तित्व प्रगट करते. अशा खेळात, हा संगीतकार फार वाकबगार होता.  


आवाजाचा पल्ला, भरीवपणा, समान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा, सुरेल आणि लहान स्वरांशांचे सफाईदार द्रुतगती गायन, हे गुण, रफी यांच्या बाबतीत मांडता येतील. सुरवातीच्या काळात, ढाल्या स्वरात आणि नंतर अवतरलेल्या नाटकी प्रत्ययाशिवाय गायलेली आढळतात. आवाज आणि गायनशैली या बाबतीतल्या, नव्या युगाच्या मागण्या त्यांनी विनासायास पूर्ण केल्या. आपल्या आवाजात "गोलाई" आहे, याची त्यांना यथार्थ जाणीव होती आणि प्रसंगी त्या विशेषाचा त्यांनी वापर केल्याचे आढळून येते. अर्थात इथे एक प्रश्न उपस्थित होतो. प्रचलित म्युझिक व्हिडियोसाठी गायन करणे, त्यांना कितपत भावले असते? खरतर चित्रपटीय आविष्कारांच्या गतीमानतेस लवचिक प्रतिसाद देण्याचे रफी यांचे कौशल्य अतुलनीय होते पण, कलाविचारांत अशा "जर-तर" या बाबींना तसा फारच कमी वाव असतो. 
सुमन कल्याणपूर हे असेच काहीसे दुर्लक्षित गेलेले नाव. सुरेल आवाज, हलका पल्लेदार आणि पारदर्शक आवाज, भडक नसलेले स्वनरंग आणि त्यांच्या छत विपुलतेने ऐकायला मिळतात. परिणाम असा, त्यांच्या गायनातून विस्तीर्ण भावपट धुंडाळता येतो. गायीकेस रागदारी संगीत अवगत होते का नव्हते, याची प्रचीती देणाऱ्या रचना फारशा मिळाल्या नाहीत पण, जिथे शक्यता होती, तिथे त्या रचनेनुरुप पडताळा घेता येतो. लताबाईंनी आवाज आणि लगाव, याबाबत जे कौशल्य ज्या प्रकारे आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दाखवले त्याच्या जवळपास, केवळ हीच गायिका पोहोचू शकली असती, असे ठामपणे मांडता येते. तितकी या गायिकेच्या गळ्याची क्षमता आणि ताकद नक्कीच होती. अर्थात, त्यांना जर का संधी लीलाल्या असत्या, अधिक टिकाऊ चित्रपट मिळाले असते तर लताबाईंच्या कर्तृत्वास पर्यायी केंद्र म्हणून उभी राहण्याची क्षमता, त्यांच्या गायकीत निश्चित आढळत होती पण दुर्दैवाने तसे घडले नाही!!    
आता आपण, या रागावरील आणखी आधारित काही गाणी ऐकुया आणि रागाची ओळख पूर्णपणे घेऊया. 
आपकी नजरो ने समझा प्यार के काबील मुझे - मदन - अनपढ - लता मंगेशकर

झनक झनक पायल बाजे - वसंत देसाई -झनक झनक पायल बाजे -उस्ताद अमीर खान

Sunday 22 November 2015

झुळझुळणारा छायानट

"ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे 
कोणती पुण्ये अशी येती फळाला 
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे"
ना. धों. महानोरांच्या प्रसिद्ध कवितेतील या ओळी राग "छायानट" रागाशी काहीसे साद्धर्म्य दाखवतात. रात्रीच्या पूर्वांगात गायला जाणारा हा राग, "षाडव/संपूर्ण" अशा जातीच्या या रागात, आरोही स्वरसप्तकात "निषाद" स्वराला स्थान नाही. "पंचम/रिषभ" हे या रागाचे वादी/संवादी स्वर असून, "षडज" आणि "मध्यम" स्वरांना या रागात भावदर्शनासाठी महत्वाचे स्थान आहे. "जोंधळ्याला चांदणे लखडून जावे" अशी असामान्य ओळ वाचताना, नजरेसमोर रात्रीच्या शांत समयी, शेतातील डुलणारी जोंधळ्याची रोपे येतात आणि या रागाच्या समयाला भाविक स्वरूप देतात. 

खालील रचना, ही छायानट रागातील अप्रतिम बंदिश आहे. पंडित ओंकारनाथ ठाकुरांच्या असामान्य गायकीने नटलेला, छायानट. पंडितजींच्या गायनाची सगळी वैशिष्ट्ये यथार्थपणे दाखवणारी, ही रचना आहे. सुरवातीची मंद्र सप्तकातील घुमारेदार गायकी आणि त्या आलापीतून, पुढे विस्तारीत होणारी ही रचना म्हणजे या रागाचा "अर्क" आहे. 


ओंकारनाथ ठाकुरांच्या आवाजाची काही वैशिष्ट्ये बघायला गेल्यास, आवाजाचा केलेला आवाहक उपयोग. तसे बघितले तर ग्वाल्हेर घराण्यातील गायकांच्या आवाजात एक प्रकारे एकाच स्वन डोकावत राहतो. मग, स्वरमर्यादा, गायनप्रकार, विस्तारासाठी कुठलाही राग निवडलेला असो. कारणे अनेक देता येतील पण आवाजात स्वनभेद फार क्वचित अनुभवायला मिळतो. ओंकारनाथ ठाकूर इथे स्वत:चे वेगळेपण ठसठशीतपणे जाणवून देतात. मग, तो कधीतरी हळुवार, आर्त असेल किंवा काहीवेळा विलक्षण बोचरा वाटणारा पण प्रचंड ताकदवान आवाज जोरदार तानांनी भारून टाकतो. आपण नेमके काय करीत आहोत, याची यथार्थ जाणीव गायनातून आढळते. आपल्या मांडणीत विविधता यावी म्हणून त्यांनी किराणा सारख्या वेगळ्या घराण्याच्या गायकीचा अवलंब आपल्या गायनात केल्याचे आढळते. तसेच शब्दांच्या उच्चारांवर अधिक भर दिसतो. वास्तविक, रागदारी गायनात, शब्दोच्चाराला फारसे महत्व दिले जात नाही, ओंकारनाथ अपवाद. गायनातील कारागिरी, हा भाग फार महत्वाचा आहे. सुरवातीला, गायनात, क्षमता तसेच कौशल्य, याचा आढळ दिसतो पण पुढे त्याला मात्र दुर्दैवाने, त्याला प्रदर्शनाचे स्वरूप आले. विशेषत: द्रुत लयीत, गुंतागुंतीच्या ताना घेणे तसेच तार ते खालचे स्वर व उलट अशी झेप घेणे, अवाक करणारे होते. गायनात, "नाट्यात्म" आणणे आणि रसिकांना भारून टाकणे, हा विशेष खास म्हणावा लागेल.   
हिंदी चित्रपट गीतांत, शास्त्रीय नृत्य आणि त्यावर आधारित गीते, याना अपरिमित लोकप्रियता मिळाली आहे. एकात नृत्यावर आधारित गाणे म्हणजे रचना बहुतांशी द्रुत लयीत आणि अधिक आवाहक असल्याने, रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम, ही गाणी यथास्थित पार पाडतात. वास्तविक, शास्त्रीय नृत्यावर आधारित अशी गाणी असतात, त्यामुळे नृत्यातील जरी संपूर्ण शास्त्र जरी मांडता येत नसले तरी नृत्याबद्दल रुची निर्माण होण्यास नि:संशय मदत होते, हे निश्चित. "तलाश" चित्रपटातील "तेरे नैना तलाश कर जिसे" हे गाणे या पठडीतले आहे. या गाण्यात, "छायानट" राग जरी अस्पष्ट दिसत असला तरी जेंव्हा रचना त्या रागातील स्वरांवर "ठेहराव" घेते, ती जागा विलक्षणरीत्या झगमगून उठते. मन्नाडे यांचे गायन, अतिशय वेधक आहे. सतारीच्या द्रुत लयीतील गत आहेत आणि त्या लयीशी, गायन अप्रतिमरीत्या जुळून आलेले आहे. 

मन्नाडे  यांचा आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्याचा पल्ला चांगला, अतिशय विस्तृत आहे. याचा परिणाम असा होतो, गाण्यात सर्वत्र, खुलेपणा आणि ताकद राखणे, त्यांना जमू शकत होते. त्यांचा आवाज हलका (सुगम संगीताला अतिशय पूरक) असल्याने, सर्व प्रकारच्या ताना, सहजतेने घेता येतात. भारतीय शास्त्रीय गायनात स्वच्छ "आ"करणे गायन करण्यावर भर असतो आणि हे देखील मन्नाडे, सहज करू शकतात. (खरे सांगायचे तर अनेकदा व्यावसायिक शास्त्रीय गायकांना देखील हे जमत नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक) आकाराने शक्य होणारा विशेष गुण म्हणजे सहकंपन वा गुंजन हा परिणामत: त्यांच्या गायनात ओतप्रोत भरला आहे. दुसरा भाग असा, प्रत्येक रचनेनुरूप जी एक भावस्थिती ढोबळमानाने निश्चित झालेली असते, ती दाखवणारा आवाजाचा लगाव, ते देऊ शकतात. वास्तविक चित्रपट गीतास, सांगीत कल्पनांची बढत करायची नसून, एक संबंधित मूड निर्माण करून, बाकीची कार्ये साधायची असतात. म्हणून, सुरेलपणा, भरीवपणा आणि यथायोग्य उच्चार या बाबी अत्यावश्यक ठरतात आणि हे करताना, आवाजातून, चित्रपटीय व्यक्तिमत्व मिळावे लागते. मुख्य बाब, म्हणजे हे सगळे करताना, त्यांचा आवाज कुठेही नाटकी होत नाही भावनिक संतुलन करून, चित्रपट संगीत अधिक परिणाम करते, हे वैशिष्ट्य, त्यांनी सतत कायम राखले. 

आता आपण, लताबाईंच्या सुरवातीच्या काळातील एक अतिशय सुश्राव्य गाणे ऐकुया. गाण्याची चाल खरोखरच अतिशय गोड, ओघवती आहे. प्रसंगी रचना द्रुत लयीत जाते परंतु शब्दकळेच्या आस्वादाला कुठेही बाधा पोहोचत नाही. गाण्याच्या सुरवातीपासून, रागाची ओळख होते, म्हणजे  बघा,"चंदा रे जा रे" ही ओळ गाताना, स्वरांच्या हेलाकाव्यातून, आपल्याला छायानट भेटतो आणि पुढे, अंतरा आणि मधले संगीत ऐकताना, याच रागाचे सूर ऐकायला मिळतात पण तरीही, हे गाणे म्हणजे या रागाचे लक्षणगीत नव्हे!! या गाण्यात, बहुतेक हिंदी गाण्यात सहजपणे वावरणारा केरवा ताल आहे. प्रेमाची कबुली देणारे गाणे आहे पण, तेंव्हाच्या संस्कृती नुसार गाण्याची हाताळणी अतिशय संयत रीतीने झाली आहे.  आता, गाण्यात कुठे छायानट बाजूला पडतो? हे बघायला गेल्यास, गाण्याचा पहिल्या अंतरा सुरु होताना, स्वरांची जी "उठावण" आहे, ती बारकाईने ऐकायला हवी. तिथे, रचनेने, हलक्या हाताने, रागाला बाजूला सारले आहे. अर्थात, ही कारागिरी, संगीतकार म्हणून नि:संशय, खेमचंद प्रकाश यांची. 


एकूण कारकीर्द ध्यानात घेत, या संगीतकाराला, "पियानो","सेक्साफोन" ,"क्लेरीनेट " इत्यादी पाश्चात्य वाद्यांची आवड लक्षात येते. एक तांत्रिक विशेष इथे मांडणे जरुरीचे ठरते. तसे बघितले तर ही तिन्ही वाद्ये एका वेधक सीमारेषेवर उभी आहेत. एक तर अखंड व सलग ध्वनी पुरवायचा किंवा सुटेसुटे, तुटक पण ठोस ध्वनी पुरवायचे, या दोन टोकांच्या दरम्यानची जागा या वाद्यांनी व्यापली आहे. "सतार","जलतरंग" इत्यादी वाद्ये वापरली नाहीत, असे नाही (वरील गाणे या संदर्भात ऐकावे) पण त्यांची वाद्ययोजना आधी उल्लेखलेल्या अभारतीय वाद्यांनी निर्माण केलेल्या ध्वनीप्रतिमांशी अंतरंग नाते जोडून आहे. आणखी एक बाब बघता येते. खेमचंद प्रकाश, यांना नाट्यात्म क्षण उभा करण्यासाठी ताल व ठेका आणि वाद्ये न वापरण्याचे तंत्र मनपसंत आहे, असे ठामपणे म्हणावे लागते. अशा वेळेस, गाता आवाज जेंव्हा सुरावट रेखायला लागतो, तेंव्हा ही वाद्ये, त्या सुरावटीला पाठींबा देतात, पण ध्यानात येईल इतक्या नरमाईने. गाणारा आवाज तार स्वरांत जाईल किंवा खालच्या पट्टीवर पोहोचेल पण, त्याचे परिणामकारक कार्य अतिशय नियंत्रित गतीने होत राहील. वरील गाण्याचाच आधार घ्यायचा झाल्यास, सुरवातीचे शब्द किंवा "मुखडा" कानावर पडेपर्यंत सुरावट खालच्या स्वरांवर रुंजी घालत असते आणि जेंव्हा ठाशीव किंवा वरच्या स्वरावर झेप घेणारा मुखडा येतो, तेंव्हा गीताचा रोख(च) बदलतो. आणि हे सगळे करताना, गाण्याची लय देखील, मंद्र सप्तकात वावरत असते. 

आता आपण या रागावरील आणखी काही गाणी ऐकायला घेऊ आणि या रागाची ओळख, आपल्या मनात कायमची ठसवून घेऊ. 

मुझ से नाराज हो तो - पापा कहते है - राजेश रोशन - सोनू निगम 

बाद ए मुद्दत ये घडी - जहांआरा - मदन मोहन - रफी/सुमन 

Attachments area

तू चंदा मै चांदनी



हिंदी चित्रपट गीतांत फारच कमी गाणी अशी सापडतात, जी खऱ्या अर्थी असामान्य असतात परंतु त्यांना लोकाश्रय लाभत नाही आणि हळूहळू विस्मरणात जातात. तसे बघितले तर ज्या गाण्यांना, लोकसंगीताचा आधार लाभला आहे, ती गीते देखील वर्षानुवर्षे लोकांच्या स्मरणात रहातात. थोडक्यात, असे अनुमान आपल्याला सहज काढता येईल, कुठल्याही गाण्याची "कुंडली" मांडणे, जवळपास अशक्य कोटीतली बाब आहे.
गाण्याची चाल, रसिकांच्या मनाची "नाळ" जोडणारी हवी, असा एक मतप्रवाह अनेक वर्षे प्रचलित आहे, विशेषत: गाण्याचा "मुखडा" जितका आकर्षक असेल तितके ते गाणे, रसिकांच्या पसंतीला उतरते. गाण्याचा "मुखडा" आकर्षक असणे, आवश्यक आहे पण त्याच बरोबर त्याच्या नंतरची "बांधणी" देखील तितकीच आकर्षक असणे, अत्यावश्यक असते अन्यथा, सुरवातीला मनावर घडलेला असर, हळूहळू पिछाडीला पडतो आणि गाणे निरस होण्याची शक्यता बळावते. 
काही गाण्यांच्या बाबतीत असे घडते, गाण्याची चाल पहिल्या प्रयत्नात, लक्षात(च) येत नाही आणि ते गाणे आवडीच्या बाबतीत, मागे पडते. गाण्याची चाल "अनवट" असणे, हा विचार देखील बरेचवेळा पुढे येतो. "अनवट" म्हणजे काय? चाल अवघड असणे, म्हणजे अनवट, असा एक मतप्रवाह आढळतो, त्यात थोडेफार तथ्य आहे पण पूर्णांशाने सत्य नाही. या सगळ्या मतांतून, आपल्याला एक गोष्ट ठरवावीच लागेल. गाण्याची चाल कशी असावी, याबाबत कुठेही ठाम अशी "थियरी" नाही आणि गाण्याचे आयुष्य किती आहे, याचा अंदाज करणे तर केवळ अशक्यप्राय. प्रत्येक संगीतकार, आपापल्या कुवतीनुसार उत्तरे शोधीत असतो पण काही काळाने, त्या उत्तरातील वैय्यर्थ्य जाणवायला लागते. 
"तू चंदा मै चांदनी" या गाण्याबाबत काही ठाम विषाने करताना, माझी थोड्याफार प्रमाणात द्विधावस्था होते. गाण्याची चाल सुंदर आहे, त्यात अनेक लयीचे बंध आहेत, इत्यादी सौंदर्यस्थळे शोधता येतात पण, या गाण्यात असे काय आहे, ज्यामुळे हे गाणे, माझ्या मनात ठाण मांडून आहे? या प्रश्नाचाच शोध, या निमित्ताने घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. 
आपण, या गाण्याचा आस्वाद घेताना, कवितेचा आस्वाद घेणे देखील, मला अत्यावश्यक वाटते कारण, गाण्यात शब्द आहेत म्हणून ते "गाणे" आहे!! तेंव्हा, गाण्याचा आस्वादाला सुरवात करण्याआधी, आपण, हे गाणे, "कविता" म्हणून काय दर्जाचे आहे? या प्रश्नाचा पडताळा घेऊया. 
कवी बालकवी बैरागी यांची शब्दरचना आहे. इथे हे ध्यानात ठेवावे लागेल, हा कवी, कधीही चित्रपटासाठी गाणी लिहिणारा कवी नव्हता आणि ही रचना देखील, कविता म्हणून प्रसिद्ध झाली होती. 
" तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे,
तू बादल मै बिजुरी, तू पंछी मै पात रे. 

ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
चंद्रकिरण तो छोड कर, जाये कहा चकोर, 
जाग उठी है सांवरे, मेरी कुंवारी प्यास रे,
अंगारे भी लगने लगे पिया अंगारे भी लगने लगे,
आज मुझे मधुमास रे 

तुझे आंचल मे रखुंगी ओ सावरे 
काळी अलको से बांधुंगी ये पांव रे
गल बैय्या वो डालू की छुटे नही 
मेरा सपना सजन अब टुटे नही 
मेहंदी रची हथेलिया, मेरे काजलवारे नैन रे,
पल पल तुझे पुकारते पिया पल पल तुझे पुकारते
हो हो कर बेचैन रे 

ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,
अंग लगाकर सायबा अंग लगाकर सायबा,
कर दे मुझे निहाल रे" 

ही कविता म्हणून वाचताना आपल्या सहज ध्यानात येऊ शकते, राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवरील प्रणयकथा आहे.  "बिजुरी","बावडी","केसरिया" हे खास राजस्थानच्या संस्कृतीतले शब्द. खरे तर या कवितेचा घाट बघितला तर, चित्रपट गीताच्या पारंपारिक रचनेत अजिबात बसणारा नाही. किंबहुना, गाण्याचा "मीटर" ठरवण्याच्या प्रक्रियेत तर ही शब्दकळा फार अवघड आहे. असे असून देखील संगीतकार जयदेव, यांनी गाणे करताना, ज्या कुशलतेने, रचनेला वेगवेगळी वळणे दिली आहेत, तोच खरा अभ्यासाचा भाग आहे.   
 मी सुरवातीला जे म्हटले त्याप्रमाणे विचार करता, गाण्याचा "मुखडा" हा काही इतका आकर्षक नाही. किंबहुना, गाण्याच्या आधी, जवळपास, १ मिनिट फक्त वाद्यमेळ आहे. संतूरच्या सुरांनी या गाण्याची पार्श्वभूमी तयार होते आणि ते सूर जिथे थांबतात, तिथे लताबाईंचा टिपेचा सूर लागतो - तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे!! गाण्याच्या सुरवातीला तार स्वर लावणे आणि त्याच सुरांत गाण्याचा विस्तार करायला घेणे, हीच खरे म्हणजे गळ्याची असामान्य परीक्षा आहे. गाण्याची चाल "मांड" रागावर आहे पण हा "मांड" राग, तसाच्या तसा वापरलेला नसून, त्यात, राजस्थानी लोकसंगीताची फोडणी दिलेली आहे. वास्तविक पहाता पारंपारिक मांड रागात, सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात पण, तसे इथे घडत नाही. इथे "कोमल गंधार" आणि "कोमल धैवत" तसेच "तीव्र मध्यम" स्वरांचा उपयोग केलेला आहे आणि हे लोकसंगीताचे contribution!! अर्थात, असे म्हटले जाते, मांड रागाची उपपत्ती ही राजस्थानी लोकसंगीतातून झालेली आहे आणि एकूणच सगळी स्वरावली बघता, या म्हणण्यात बरेच तथ्य आढळते. 
पुढे "तू बादल मै बिजुरी" हे शब्द कसे घेतले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे. "बिजुरी" शब्दावरील जी हरकत आहे, ती इतके अवघड आहे की, केवळ लताबाई(च) अशी हरकत घेऊ शकतात!! जयदेव, गाण्याच्या पार्श्वभागी जो वाद्यमेळ वापरतात, तिथे अत्यंत मिजाकी वाद्ये पण प्रत्येक वाद्याचा "कस" लागेल, अशी योजना करतात. मग,  वापरताना,५ ६ वाद्येच असली तरी, त्यांचे काम भागते, किंबहुना त्यामुळे इतर वाद्यांची गरजच भासत नाही. इथे बघा, संतूर, स्वरमंडळ, बासुरी, सारंगी, तार सनई अशीच मोजकी वाद्ये संपूर्ण गाण्यात आहेत पण, प्रत्येक वाद्याचे "जिवंत" अस्तित्व आहे. राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर, ज्याप्रकारे सारंगी वाजली आहे, ती फार बारकाईने ऐकायला हवी. सगळे वाळवंट आपल्या समोर उभे रहाते. संगीतकार म्हणून जयदेव, इथे इतरांपेक्षा वेगळा ठरतो. गाणे ऐकताना, पार्श्वसंगीत आणि गाण्यातील शब्द, याचे बांधलेले नाते देखील वेगळेपणी ऐकावे लागेल. 
ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
या ओळी ऐकताना, आपल्याला "गायकी"चा आनंद तर मिळतोच पण त्याच बरोबर शब्दातून उभे केलेले वातावरण देखील अनुभवता येते. ओळीची सुरवात, मंद्र सप्तकात होते पण क्षणात वरच्या सुरांत चाल जाते आणि लय अवघड होते. हा सांगीत वाक्यांश अति गुंतागुंतीचा तर नक्कीच आहे पण त्याच बरोबर, कवितेच्या आशयाचा आनंद देखील, घेणे जरुरीचे भासते. 
लताबाईंच्या गायनातील आणखी वैशिष्ट्य इथे आपल्याला जाणवते आणि ते म्हणजे, गाण्याची चाल, राजस्थानी मांड रागावर आहे तेंव्हा शब्दोच्चार देखील त्याच धर्तीवर केले आहेत. हा आणखी कठीण भाग. गाण्यात हरकत घेताना, शब्दातील दडलेला आशय तर स्वरांनी अधिक अंतर्मुख करायचा पण, कुठेही शब्दांना दुखवायचे नाही!! ही कसरत, संगीतकार म्हणून जयदेव आणि गायिका म्हणून लताबाई ज्या प्रकारे करता, ते केवळ अतुलनीय आहे. गाण्यात, हिंदी चित्रपट गाण्यात वारंवार वापरलेला "दादरा" ताल आहे पण, तालाच्या प्रत्येक मात्रेचे "वजन" ध्यानात घेऊन, तिथे केवळ शब्द(च) नव्हे तर अक्षराचा शेवट करण्याइतकी तल्लख बुद्धीमत्ता, जयदेव यांनी, या गाण्यात दाखवली आहे. आपण, एका सक्षम कवितेला चाल लावत आहोत, याचे भान, जयदेव यांनी, या रचनेत कायम राखले आहे. 
गाण्यात तीन अंतरे आहेत आणि प्रत्येक अंतरा सुरु करताना, पार्श्वसंगीत जवळपास अजिबात नाही, म्हणजे संपूर्ण स्तब्धता राखून, केवळ लताबाईंच्या सुरात अंतरा सुरु करायचा आणि मग त्या सुरांचा मागोवा घेत, वाद्यांनी आपली मार्गक्रमणा करायची, अशी या गाण्याची बांधणी आहे. 
ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,

या ओळी गाताना, "चार पहर की चांदनी" इथे "चार" शब्द उच्चारताना, स्वरांत जो काही "हेलकावा" दिला आहे, त्यातून वाळवंटातील रात्रीच्या थंडीचा "शहारा" जणू व्यक्त केला आहे!! अशी सांगीतिक सौंदर्यस्थळे, या गाण्यात भरपूर आढळतात. तसेच पुढे "केसरिया" म्हणताना, "टिपिकल" राजस्थानी ढंग, स्वरांत आणला आहे. जयदेव काय ताकदीचे संगीतकार होते, याचे हे उत्तम उदाहरण ठरेल. 
गाणी सगळेच संगीतकार बांधत असतात पण, अशा प्रकारे लोकसंगीताची डूब देऊन, गाण्यात अनेक लयींना अवघड पद्धतीने खेळवत गाण्याची रचना  बांधायची,हे तल्लख आणि व्यासंगी बुद्धीमत्तेचे(च) काम आहे. जवळपास ९ मिनिटांची रचना आहे पण गाण्यातील प्रत्येक सेकंद, हा अतिशय अर्थपूर्ण रीतीने भरून काढला आहे. 
जयदेव, यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक असामान्य गाणी दिली आहेत तरी, या गाण्यासारखी रचना, खुद्द त्यांना देखील अपवादानेच करता आली. This is the creation of par excellence. 

डर्बन भाग २

डर्बन शहर तसे समुद्र किनारी वसलेले असले तरी उपनगरे मात्र डोंगराळ भागात आहेत. याचा परिणाम असा होतो, मुख्य शहरात डिसेंबर/जानेवारी मध्ये कडाक्याचे उन असले तरी उपनगरी भागात तितका कडाका जाणवत नाही. इथे आणखी एक गन्मात वारंवार बघायला मिळते. उन्हाळ्याच्या महिन्यात समजा सलग ३ दिवस उन्हाची काहिली (मुंबईच्या तुलनेत) झाली तरी ४ थ्या दिवशी हमखास पावसाची सर येते किंवा जोरदार पाउस पडतो आणि वातावरण पुन्हा सुस्नात होते. हवामान कोरडे असल्याने, पावसाची साधी सर देखील, इथले वातावरण थंड करते. 
जोहान्सबर्गच्या मानाने, इथली जीवनशैली शांत आहे. अर्थात इथे देखील मॉल संस्कृती रुजली आहे. इथले मॉल्स मात्र अतिशय प्रशस्त आहेत. Pavilion, Gateway सारखे मॉल्स म्हणजे प्रचंड संस्थाने आहेत. एकाच ठिकाणी, जगातील कुठलीही वस्तू इथे प्राप्य असते, भौतिक सुखाच्या परिसीमा इथे गाठलेल्या आहेत. जवळपास ३,४ मजली इमारतीमधून नुसते चालत हिंडणे, हाच पायांना व्यायाम आणि सुखाचे आनंदनिधान असते. डर्बन नॉर्थ भागात तर Pick n Pay Hypermarket म्हणून अवाढव्य मार्केट आहे. जगातील अति महागडे कपडे इथे बघायला मिळतात. इथल्या वस्तू महाग असतात, हे तर खरेच पण, थोडी माहिती काढली की इथे तशी स्वस्त किमतीची दुकाने देखील आहेत. अर्थात दर्जाच्या बाबतीत कुठेही तडजोड नसते आणि किराणा माल, खाण्याच्या वस्तूबाबत हेच बघायला मिळते. पहिल्यांदा मला नवल वाटायचे, इथे मॉल्समध्ये असंख्य हॉटेल्स असतात पण तिथे कोण खायला/जेवायला येत असेल? नंतर समजले, शिनिवार सकाळ, रविवार सकाळ इथल्या हॉटेल्समध्ये येउन नाश्ता करायची पद्धत आहे. अगदी सकाळ, सकाळी ८ वाजता देखील, शनिवार/रविवारी हॉटेल्स तुडुंब भरलेली असतात. केवळ, तरुण/तरुणी नसून, कुटुंबाचा सगळा जथ्था इथे हॉटेलमध्ये हजर असतो!! 
मला तर नेहमी असेच वाटते, इथला सगळा समाज, हा हॉटेल्स मध्ये खाणे आणि सदैव काहीना काही तरी शॉपिंग करणे, यातच गुंग असतो. त्यातून, इथली खरेदी म्हणजे सदैव क्रेडीट कार्डचा वापर. नगदी चलनाचा वापर फारसा इथे आढळत नाही. तुमच्या पाकिटात, किती क्रेडीट कार्डस आहेत, यावर तुमची पत ठरत असते. सुरवातीला मला देखील नवल वाटायचे पण नंतर मी देखील याच मार्गाने जायला सुरवात केली!! बरे यांचे हॉटेल्स मधील खाणे म्हणजे एक सोहळा असतो. प्रथम ड्रिंक्स ऑर्डर करायचे, नंतर "स्टार्टर्स" मागवायचे. यात जवळपास, एक, दोन तास निघून जातात. त्यानंतर मग, "मेन मेन्यु" ठरवायचा!! यात, ड्रिंक्सचे आचमन चालूच. इथे मी कितीतरी गोरे लोकं सज्जड पिणारे बघितले आणि त्यांना पिताना बघून, "अजून यांची शरीर यष्टी कशी काय सडपातळ राहू शकते?" याचे नवल वाटायचे!! काळ्यांच्या बाबतीत तर पिण्याबाबत तोड नाही. मी तर कधीच पासंगादेखील पुरू शकलो नाही, शकणारच नाही. 
पुढे, या समाजात जसा रुळायला लागलो तशी ध्यानात आले, इथले लोकं - यात स्त्रिया/मुली देखील आल्या, रोज पहाटे व्यायामशाळेत तरी जातात किंवा मैलो न मैल, धावण्याचा जबरदस्त व्यायाम करतात. आदल्या दिवशीचे सगळे खाणे, दुसऱ्या दिवसाच्या व्यायामात रिचवून टाकतात!! इथे सायकलिंग करणे, हा देखील आनंदाचा खेळ असतो. वातावरणात कितीही गारवा असला तरी, विशेषत: डोंगराळ भागात राहणारे, कितीतरी गोरे युवक/युवती, आपल्या सायकल घेऊन, रपेट करीत असताना, नित्याच्या दिसत असतात. अर्थात, यांच्या सायकली देखील देखण्या तर असतातच पण अतिशय दणकट असतात. एकूणच इथल्या समाजात, स्वच्छता, व्यायाम, कायदे पाळणे या बाबतीत जागरूकता आहे आणि मला वाटते, ती लहानपणापासून मनावर बिंबवली जाते. 
अर्थात, "गाव तिथे महारवाडा" या उक्तीप्रमाणे उकिरडा प्रत्येक ठिकाणी आढळतो. आपण, साउथ आफ्रिका टीव्हीवर बघतो, त्यामुळे या देशाची चांगली(च) बाजू नेहमी प्रकाशात येते. इथे काही वर्षे काढली म्हणजे अस्तरामागील ठिगळे दिसायला लागतात!! डर्बन इथे देखील गुन्हेगारीचे प्रमाण जरी भयानक नसले तरी नगण्य अजिबात नाही. १९९७/९८ साली, मी रात्री, बेरात्री रस्त्यावरून हिंडत असे, मध्यरात्री समुद्राकाठी जाउन बसत असे पण, जेंव्हा २००९ मध्ये परत इथे राहायला आलो आणि बदलत्या परिस्थितीचे वास्तव भान आले. हळूहळू, इथले जीवन देखील काहीसे बकाल व्हायच्या मार्गावर लागले आहे. भ्रष्टाचार अगदी आचारसंहिता झाली नसली तरी बऱ्याच प्रमाणात वाढ होत आहे. त्यातून, इथल्या चलनाचे आंतरराष्ट्रीय पतमापन घसरायला लागले आहे आणि महागाईचे चटके बसायला लागले आहेत. आर्थिक विषयी बोलायचे झाल्यास, या देशात प्रचंड प्रमाणात आयात केली जाते आणि चलन विनिमयाच्या दरातील घसरण, प्रामुख्याने महागाईला कारणीभूत ठरत आहे. अजूनही, इथे गोऱ्या लोकांचा प्रभाव असेल किंवा कायद्याविषयी आदर असेल म्हणा, भारताच्या मानाने, इथे निश्चितपणे, सुस्थित जीवन जगण्याच्या विपुल संधी आहेत. आजही, Tax Evasion संस्कृती भारताइतकी बोकाळलेली नाही. अर्थात, इथे Tax चे प्रमाण बरेच आहे पण त्याचबरोबर ज्या प्रकारच्या सुविधा मिळतात, त्याची तुलना केली तर, युरप किंवा अमेरिकेपेक्षा इथे जीवनमान स्वस्त आहे. 
एक अनुभव सांगण्यासारखा आहे. N3 या राष्ट्रीय महामार्गावर, मी गाडी चालवत होतो, महामार्गावर गाडी चालवणे म्हणजे गाडीचा वेग, कमीत कमी ८० कि.मी.!! अशा भरघाव वेगात गाडी धावत असताना, समजा अपघात झाला तर मृत्यूचे प्रमाण हमखास. बराच वेळ गाडी चालवत असताना, माझ्या मागून, एक मर्सिडीज गाडी पुढे गेली. त्यावेळी मी १०० कि.मी. वेगाने गाडी चालवत होतो, तेंव्हा मर्सिडीजचा वेग माझ्यापेक्षा अधिक, हे ओघाने आलेच. त्यापाठोपाठ दुसरी मर्सिडीज, माझ्या गाडीला pass on करून गेली आणि काही क्षणात, माझ्या समोर दोन्ही गाड्या, एकमेकांवर आदळल्या!! सुदैवाने, माझ्या गाडीपासून, अपघाताचे अंतर तसे सुरक्षित असल्याने, मी गाडीचा वेग कमी केला . एकात गौर वर्णीय तर दुसऱ्यात कृष्ण वर्णीय लोक होते, माझ्या डोळ्यासमोर गाड्यांच्या पुढील भागाचा चकणाचूर होत होता. सुदैवाने, गाडीतील लोकं सुरक्षित होते. त्यातील एकाने, Help नंबर लावला आणि अक्षरश: दहाव्या मिनिटाला, तिथे ३ Ambulance, ४ पोलिस गाड्या आणि वरून helicopter (टेहळणीसाठी) हजर!! लगेच पुढील कारवाईला सुरवात झाली आणि अर्ध्या तासात, तिथे अपघाताची साधी निशाणी देखील उरली नव्हती!! आपण, इथे infrastructure म्हणून धोशा लावतो आणि तसे बघितले त्याची आवश्यकता आहे, कारण आता आपल्याकडे देखील अशाच प्रकारचे प्रचंड महामार्ग अस्तित्वात येत आहेत. पण, त्याचबरोबर अशा सुविधा मिळणे देखील अत्यंत गरजेचे आहे. असे अपघात जरी झाले, तरी रस्ता कमीत कमी वेळात मोकळा करणे, अत्यावश्यक असते. 
इथे लोकांच्या गरजेची किती काळजी घेतली जाते, याचे दुसरे उदाहरण देतो. एकतर इथे "वीज" जाणे, असे प्रकार जवळपास नाहीच!! डर्बन इथे राहताना, एकदा, इथे काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता भासली. अर्थात, इथे वीज नाही म्हणजे आयुष्य ठप्प!! अशा वेळी, डर्बन महापालिकेने, आमच्या भागातील प्रत्येक घरात, एक छापील पत्र पाठवले होते. त्या पत्रात, कुठल्या दिवशी वीज पुरवठा खंडित होणार आहे आणि किती वेळ खंडित होणार आहे, याची सगळी माहिती दिली होती. प्रत्यक्षात काम सुरु होणार होते, ते २ आठवड्यांनी!! तरी देखील कुणालाही गैरसोय होऊ नये, याची इथे नित्यनेमाने काळजी घेतली जाते आणि पत्रात दिलेली वेळ, अत्यंत कसोशीने पाळली जाते. प्रकार, रस्ता दुरुस्तीबाबत चालतो. हे केवळ महामार्गाबाबत घडते असे नसून, शहरातील आडमार्ग जरी दुरुस्तीला काढायचा असेल तरी हीच पद्धत पाळली जाते.
डर्बन शहर माझ्या डोळ्यादेखत विस्तारले पण, प्रत्येक ठिकाणी अत्यंत कसोशीने आणि काटेकोरपणे Planning केले जाते. आहे रिकामी जागा म्हणून बांधली बिल्डींग, असा प्रकार इथे अजिबात चालत नाही. काहीवेळा याचा त्रास होतो म्हणजे समजा, तुम्ही रस्ता चुकलात तर तुम्हाला कमीत कमी, १,२ कि.मी. चा फटका बसतो!! महामार्गावर तर अधिक लांबचा फटका बसतो. महामार्ग आखतानाच, लोकांच्या सोयींचा तसेच commercial complexes ध्यानात घेऊनच बांधले जातात. तसेच अशा नवीन मार्गांवर वृक्षांची लागवड, अत्यंत आग्रहाने केली जाते. डर्बन इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने हिरव्या रंगाचा सोहळा अनुभवता येतो. रिकामी जागा आहे आणि तिथे काही बांधकाम करायचे झाल्यास, तिथल्या वृक्षांची निगराणी कशी राखली जाइल, याचा विचार प्रथम केला जातो. उचलली कुऱ्हाड आणि तोडले झाड, हा इथे अक्षम्य गुन्हा आहे. मी जिथे रहात होतो, तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती आणि संध्याकाळी, रस्त्याच्या कडेने, फिरत रहाणे, हा एक आनंदसोहळा असायचा. 
आता, कधीकधी मनात असा विचार येतो, हे इथले सौंदर्य, सोयी, सवलती आणखी किती वर्षे शाबूत राहणार आहेत? डर्बन तसे टुमदार शहर आहे. जोहान्सबर्गप्रमाणे अंगावर येत नाही. जोहान्सबर्ग शहराचा विस्तार बघून, तुमची छाती दबून जाते. डर्बन आकाराने छोटे आहे, म्हणूनच तुम्ही त्याच्या लगेच प्रेमात पडू शकता. हे शहर तुम्हाला प्रेमात पडायला भाग पाडते आणि प्रेमात पडावे, अशा इथे असंख्य जागा आहेत, उद्याने आहेत, लायब्ररी आहे, समुद्र किनारे आहेत. प्रश्न परत, परत मनात येतो, हे शहर किती काळ, आपल्याला असे ओढून घेईल?

Friday 30 October 2015

डर्बन भाग १

मुंबई वगळल्यास, डर्बन असे शहर आहे, जिथे मी जवळपास ४ वर्षे राहिलो. भारतात, अनेक शहरांना भेटी दिल्या, काही दिवस राहिलो पण, शहराची "ओळख" काही झाली नाही. अगदी आजही, पुण्याबाबत माझे हेच म्हणणे आहे. पुण्याला आजमितीस भरपूर भेटी झाल्या, पण अजूनही पुणे शहर "ओळखले" असे म्हणवत नाही!! ही बाब पुण्याबाबत, मग दिल्ली, चंडीगड, बंगलोर, चेन्नई बाबत तर काही बोलायलाच नको. 
मी डर्बन शहरात नोकरीसाठी आलो, त्या आधी, इथे ९० कि.मी. दूर असलेल्या, पीटरमेरीत्झबर्ग शहरात, सलग ३ वर्षे काढली. अर्थात,पीटरमेरीत्झबर्ग ही जरी "नाताळ" राज्याची राजधानी असली तरी शहर म्हणून तितकेसे विकसित झालेले नाही. अर्थात, त्याला भौगोलिक कारणे देखील आहेत,  पीटरमेरीत्झबर्ग शहर, हे ५,६ डोंगरावर वसलेले शहर, त्यामुळे औद्योगिक विकासाला, नैसर्गिक मर्यादा पडतात. डर्बन हे, अरेबियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले शहर. त्यामुळे, इथे व्यापार, उद्योग, इत्यादींना भरपूर वाव. अर्थात, केवळ डोंगरावर शहर आहे, म्हणून मर्यादा, याला तसा फार अर्थ नाही कारण, जोहान्सबर्ग शहर देखील समुद्रसपाटी पासून जवळपास ६००० फुट उंचावर आणि असेच डोंगराळ भागात वसलेले आहे आणि साऊथ आफ्रिकेतील जवळपास ५०% औद्योगिक वाढ ही, हे शहर आणि आजूबाजूचा परिसर, इथेच झाली आहे. 
साऊथ आफ्रिकेतील, एक अतिशय महत्वाचे, औद्योगिकदृष्ट्या गजबलेले तसेच "Tourist Attraction" म्हणून जागतिक स्तरावर मान्यता पावलेले शहर. आपल्या सारख्या भारतीयांच्या दृष्टीने तर या शहराला फार महत्व आहे. २०११ साली, इथे एक फार मोठा समारंभ झाला होता. भारतातून, इथे निर्यात केलेले मजूर, या घटनेला १५० वर्षे झाली म्हणून मोठ्या प्रमाणावर सोहळा साजरा केला होता. त्यावेळी आणि आजही, भारताच्या दृष्टीने, साऊथ आफ्रिकेचे "प्रवेशद्वार" म्हणजे डर्बन!! एकतर मुंबईहून इथे जहाजाने यायचे झाल्यास, डर्बन बंदर हेच सर्वात जवळचे. याचा परिणाम असा झाला, या शहरात आणि बाजूच्या  पीटरमेरीत्झबर्ग शहरात, आपल्याला लाखोंच्या संख्येने, भारतीय वंशाची लोकवस्ती आढळते. पूर्वी, इथल्या गोऱ्या लोकांना, इथे उसाची लागवड आणि एकूणच शेतीची अवजड कामे करायला, कुणीतरी "मजूर" म्हणून हवेच होते आणि त्यादृष्टीने "भारत" आणि तिथली लोकसंख्या, त्यांना फारच सोयीचे पडले आणि तेंव्हापासून, भारतातून, इथे मनुष्यबळ आयात करण्याची प्रक्रिया सुरु झाली. 
आता, इथे भारतीय वंश चांगलाच स्थिरावला आहे. आताची पिढी म्हणजे कमीत कमी पाचवी, सहावी पिढी आहे. त्यामुळे, इथले भारतीय वंशाचे लोक म्हणजे केवळ नावाने भारतीय, इतकेच म्हणायला हवे. या लोकांना भारताविषयी आकर्षण आहे, आपले जुने गाव कुठले, हे बघण्याची उत्सुकता आहे पण, ती उत्सुकता तात्पुरती.परत भारतात येउन, नव्याने आयुष्य काढायची अजिबात तयारी नाही आणि थोडा विचार केला तर त्यांनी तरी असे का करावे? त्यांना ज्या प्रकारे इथे सुख-सोयी मिळतात, त्याच्या ५०% देखील सोयी भारतात मिळू शकणार नाहीत आणि हे निखळ वास्तव आहे. 
भारतीयांना, डर्बन अधिक पसंत पडले याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या शहराचे हवामान आणि भारतातील हवामान, यात सत्कृतदर्शनी फारसा फरक नाही. इथे हाडे गोठवणारी थंडी अजिबात नसते. तशी हवा कोरडी आणि थंड असते पण आपल्या भारतीय लोकांनी आल्हाददायक म्हणावी, अशीच असते. आजही, साऊथ आफ्रिकेतील Import Business, जवळपास ७०% व्यापार, याच बंदरातून होतो. त्यामुळे, इथे आंतरराष्ट्रीय कंपन्यांची ऑफिसेस भरपूर आहेत. अजूनही, साऊथ आफ्रिकन चलनाला, जागतिक स्तरावर महत्वपूर्ण मान्यता आहे. मी ज्या कंपनीत काम करीत होतो (१९९८ ते २००१) त्या कंपनीचा बराचसा व्यापार हा सिंगापूर देशाशी असल्याने, आम्हाला तर डर्बन फारच सोयीचे पडत होते. 
भारतीयांच्या दृष्टीने बघायला गेल्यास आणि अचंबा करण्यासारखी बाब म्हणजे इथले समुद्र किनारे. अरेबियन महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले शहर तेंव्हा या शहराला प्रचंड लांबीचे समुद्र किनारे लाभले आहेत. मी तिथे रहात असताना, एखादा आठवडा देखील असा गेला नसे, मी समुद्रावर गेलो नाही. आधुनिकता म्हणावी तर उत्तर डर्बन भागातले किनारे खरोखरच अप्रतिम आहेत. पाण्यावर किती प्रकारचे खेळ खेळता येऊ शकतात, याचे इथे प्रात्यक्षिक बघता येईल. केवळ खेळापुरते नसून, ज्या प्रकारच्या सोयी पुरवल्या जातात, ज्या प्रकारे स्वच्छता राखली जाते, आपण भारतीयांनी धडे घेण्यासारखे आहे. शनिवार/रविवारी तर हजारोंच्या संख्येने इथे माणसे जमतात, पण कुठेही गडबड, गोंधळ नसतो. शिस्त तर वाखाणण्यासारखी असते. अर्थात, याला "काळी" बाजू देखील आहे. रात्रीच्या वेळी, एकटे, दुकट्याने हिंडणे, भयानक धोक्याचे ठरत आहे. जीवाला धोका उद्भवू शकतो. काही वर्षांपूर्वी, इथल्या "मरीन परेड " - सेन्ट्रल डर्बन भागातील समुद्र किनारी, लंडन वरून एक जोडपे, रात्रीच्या सुमारास गप्पा मारीत बसले होते आणि कुठूनतरी काही कृष्ण वर्णीय लोक आले आणि त्यांच्याकडे बहुदा पैशाची मागणी केली असावी. त्यातून बाचाबाची झाली असणार पण, त्याचे पर्यवसान, त्या जोडप्याचा खून होण्यात झाले. प्रकरण फार वरच्या स्तरावर पोहोचले होते आणि तेंव्हा पासून, इथे गस्तीचे प्रमाण फार वाढले आहे. अर्थात, समुद्रावर येउन, शांतपणे बसणे, यासारखा आनंदाचा भाग नाही आणि हे मी कितीतरी वेळा प्रत्यक्ष अनुभवले आहे. मी आणि माझे काही मित्र, बरेच वेळा इथे येउन बसायचो, किनाऱ्यावरील एखाद्या उघड्या हॉटेलमध्ये, हातात बियरचा ग्लास घेऊन, अगदी ब्रम्हानंदी टाळी लावलेली आहे!! 
इथेच, अगदी समुद्र किनाऱ्यावर, एका रविवारी सकाळी/दुपारी, fashion show बघितला होता!! सगळ्या तरुण सुंदरी, अगदी तोकड्या कपड्यात येउन, आपल्या कपड्यांची जाहिरात करीत होत्या!! आता, असा सोहळा अनिल कसा सोडणार!! मजेचा भाग म्हणजे, सगळा कार्यक्रम, ज्या प्रकारे, बंद सभागृहात चालतो, त्याच प्रकारे इथे चालत होता. कार्यक्रम उघड्यावर होता, म्हणून आजूबाजूची माणसे चेकाळली होती, शिट्या मारीत होती, असे अश्लाघ्य प्रकार अजिबात घडत नव्हते. जवळपास तीन तास कार्यक्रम चालला होता. अर्थात त्या दिवशीची बियरची चव वेगळी लागली, हा भाग वेगळा!! 
केवळ इथेच नव्हे पुढे मी साऊथ आफ्रिकेत अनेक शहरात राहिलो, अगदी गावसदृश ठिकाणी राहिलो पण, "हा देश आपला आहे आणि याची स्वच्छता आपण राखली पाहिजे" असा एकही फलक, बोर्ड पहिला नाही आणि तरीही गाव देखील अतिशय स्वच्छ असायचे. मला वाटते, हा त्या समाजावरील संस्काराचा भाग आहे. "आपला देश" असे न सांगता, त्याबद्दल ममत्व वाटणे, ही मानसिक गरज निर्माण होणे महत्वाचे!! घाण होतच नाही, हे म्हणणे खोटे आहे पण, झालेला कचरा त्वरित साफ करून परत जागा स्वच्छ ठेवणे, या वृत्तीचे मला कौतुक वाटले. 
नाताळ राज्य आणि इतर राज्यात आणखी एक फरक जाणवण्यासारखा आहे. नाताळ राज्यात आणि विशेषत: डर्बन शहरात, जितकी घनदाट झाडी, हिरवीगार हिरवळ दिसते तितकी इतर भागात दिसत नाही, अगदी केप टाऊन सारखे निसर्ग रमणीय शहर घेतले तरी!! डर्बन इथे वृक्षांची सोबत कधीच सुटत नाही त्यामुळे, डिसेंबर/जानेवारीतील कडक उन्हाळा देखील खूप प्रमाणार सुसह्य होतो. जागोजाग अप्रतिम रस्ते आहेत, महामार्ग आहेत पण कुठेही झाडांची सोबत सतत तुमच्यावर सावली धरून असते. शहरातील आडमार्ग तर भरभक्कम वृक्षांच्या साथीने नटलेले आहेत. अगदी, जून/जुलै मधील हिंवाळा (वर म्हटल्या प्रमाणे कडाक्याचा हिंवाळा इथे नसतो तरीदेखील) घेतला तरी थोडीफार पानगळ होते पण, जसे जोहान्सबर्ग/प्रिटोरिया शहरात, वृक्ष उघडे/बोडके होतात, तसे इथे फार क्वचित आढळते. 
मी इथे "मॉर्निंगसाईड" भागात रहात होतो, जो एकेकाळचा गौरवर्णीय भाग. अर्थात, इथे नीटनेटकेपणा, शिस्तशीर वृत्ती अंगी बाणवावीच लागते. मनात येईल तिथे थुंकणे, हातातील कोक किंवा बियरचा टीन, संपल्यावर रस्त्यावर(च) फेकून देणे, सिगारेटचे थोटूक पायाखाली चिरडणे, असले प्रकार मनात आले तरी करायला शक्यतो मन तयार होत नाही. आजूबाजूची माणसे ज्या शिस्तीने वावरत असतात, ते बघून, आपण देखील तसेच वागायला सुरवात करतो. मी इतकी वर्षे या देशात काढली पण, इतक्या वर्षांत (काही अपवाद वगळता) रस्त्यात, कुणीही लघवी करीत आहे, असे चुकूनही आढळले नाही आणि जे आढळले, ते सगळे कृष्णवर्णीय लोकांच्या भागात. तिथे मात्र उकिरडा!! 
याच शहरात, पुढे २०१० मध्ये, आंद्रे रुई, या जगप्रसिद्ध कलावंताचा सिंफनी ऑर्केस्ट्रा बघितला. खरे सांगायचे झाल्यास, इथेच मला पाश्चात्य संगीताची आवड असणारे काही गोरे मित्र भेटले आणि त्यांनी, मला खूपच आनंदाने, त्यांच्या घरी नेले आणि त्यांच्याकडील संगीताचा संग्रह दाखवला आणि अगदी रात्रभर, मला थांबवून, तो संग्रह ऐकवला. इथेच, मला एका आणखी गोऱ्या मित्राने, माझा क्रिकेटमधील रस बघून, १९६०/७० च्या दशकातील, असामान्य साऊथ आफ्रिकन खेळाडूंच्या DVD दाखवल्या. तसे बघितले तर डर्बन शहर शांत स्वभावाचे आहे. जोहान्सबर्ग शहरात जसे, सगळे घड्याळाला जुंपून, धावत असतात, तसा प्रकार इथे फारसा आढळत नाही. सकाळी ८ वाजता(च) ऑफिसेस उघडता आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होतात, संध्याकाळी सहा वाजता, रस्त्यावर (ऑफिस भागातील रस्त्यावर) चिटपाखरू देखील नसते. 
आधुनिक शहरांप्रमाणे, या शहरात देखील प्रचंड मॉल्स आहेत आणि इथे देखील "मॉल" संस्कृती वाढलेली आहे. भारताच्या जवळ असलेले शहर असल्याने, इथे आपले भारतीय कलाकार आणि त्यांचे "शूटिंग" हा आता नेहमीचा कार्यक्रम होत आहे. अर्थात केप टाऊन इथे त्याचे प्रमाण अधिक!! अर्थात, इथे असलेली प्रचंड भारतीय वंशाची लोकवस्ती असल्याने, इथे नवीन येणाऱ्याला तसे हायसे वाटते आणि इथल्या भारतीयांना देखील, भारतातून आलेल्या "पाहुण्यांचे" आगत-स्वागत करायला फार आवडते. तदनुषंगाने बघायला गेल्यास, इथे नवरात्र अगदी पारंपारिक पद्धतीने चालते. फरक इतकाच, इथे एक मोठे सभागृह भाड्याने घेतले जाते आणि त्या सभागृहापुरताच सगळा सोहळा मर्यादित असतो आणि त्याला जोडून आवाजाची मर्यादा!! इथेच मी, आवाजाचे प्रदूषण म्हणजे काय असते, याचा जबरदस्त अनुभव घेतला होता. 
नुकताच डर्बन इथे आलो होतो, दोनच दिवस झाले होते, घर व्यवस्थित लावले आणि नेहमीच्या इच्छेप्रमाणे, घरात गाणे ऐकायचे म्हणून सिस्टीम सुरु केली. सुरु करून, १५,२० मिनिटे झाली असतील तोच घराचा दरवाजा ठोठवला गेला. दारात चक्क पोलिस उभा!! नाही म्हटले तरी तंतरलीच. पोलिसाने, लगेच सिस्टीमचा आवाज कमी करण्याची विनंती केली आणि माझ्या शेजाऱ्याने, पोलिस ठाण्यावर तक्रार केली म्हणून मला यावे लागले, अशी तंबी दिली. मला नवल वाटले, शेजारी राहणारा, मला लगेच सांगू शकला असता पण नाही!! त्याने पोलिसाकडे तक्रार केली!! इथे एकूणच Pollution बाबत फार कडक कायदे आहेत आणि मुख्य म्हणजे लोकांच्यात जागरुकता आहे.

Thursday 29 October 2015

हुरहुरणारा किरवाणी

"झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर".
मराठीतील काही अजरामर कवितांमधील ही एक कविता!! आज जवळपास शतक उलटून गेले तरी देखील या ओळीचा मोह, वाचकांना अनेकवेळा होतो आणि त्यानिमित्ताने अर्थाचे अनेक पदर विशद केले जातात. उत्तम कवितेचे हे एक लक्षण मानावेच लागेल. राग "किरवाणी" ऐकताना, मला बरेचवेळा या ओळी आठवतात. रागाचा समय, प्राचीन ग्रंथांनुसार मध्यरात्र दिलेला आहे. या रागात, "गंधार" आणि "धैवत" स्वर कोमल लागतात आणि त्या कोमल स्वरांचे प्राबल्य अधिक जाणवते. त्यातून, रागाचे सादरीकरण "पिलू" रागाच्या अंगाने जात असल्याने, रागाच्या ठेवणीतच लालित्य अमुर्तपणे सापडते.एकूण स्वररचना आणि त्याची मांडणी बघितली तर मध्यरात्रीच्या घनगर्द अंधारात, तळ्याकाठाची आत्ममग्न शांतता आणि त्याची अनुभूती घेताना, कवितेतील "गोड काळिमा" आणि तळ्यातील झाकोळलेले कृष्ण वर्णीय जल, याचे कुठेतरी आंतरिक नाते जाणवते आणि आपण, रागाचे स्वर ऐकताना, त्या अजरामर वृक्षाच्या संगतीत वावरत असतो.

काहीकाही वाद्ये ही त्या कलाकाराच्या नावाशी इतकी निगडीत असतात की ती वाद्येच जणू, त्या व्यक्तित्वाचा अभेद्य अंश बनून जातात. उस्ताद अली अकबर खान साहेब आणि सरोद, यांचे नाते असेच मांडता येईल. वडिलांकडून खडतर तालीम घेऊन, या वाद्यावर जे अभूतपूर्व प्रभुत्व मिळवले आहे, त्याला तोड नाही. साधारणपणे, तंतू वाद्य म्हटले की त्यातून स्वरांची "सलगता" निर्माण करणे, नेहमीच अवघड बाब असते कारण, स्वर नेहमीच तुटक स्वरूपात सादर होतात. असे असून देखील, वाद्यातून "गायकी" अंग अति तलमपणे मांडून दाखवणे, याला वेगळेच कौशल्य लागते.

https://www.youtube.com/watch?v=om3qC-T3a3U

प्रस्तुत रचनेत, सुरवातीची जी आलापी आहे, त्यातून रागाची जी "मूर्ती" उभी केली आहे, ती खास ऐकण्यासारखी आहे. प्रत्येक स्वर नितळ, स्वच्छ आणि सुरेल लावलेला आहे. एका स्वराहून दुसऱ्या स्वरावर जो "प्रवास" घडतो, तो देखील जीवघेणा आहे. खरेतर श्रुती तत्वानुसार याचे समग्र विवरण करता येणे शक्य आहे पण तरीही स्वरांचा म्हणून एक स्वभाव आणि त्या स्वभावानुसार निर्माण केलेले भावविश्व केवळ अपूर्व असे आहे. रचना, द्रुत लयीत जाताना देखील, स्वर कुठेही विस्कळीत होत नाही, किंबहुना द्रुत लयीत निर्माण केलेली "मिंड" ऐकणे, हा तर रागाच्या सौंदर्याचा विलोभनीय भाग आहे.

हिंदी चित्रपट गीतांना जर कुणी आधुनिक पेहराव दिला असेल तर तो राहुल देव बर्मन, या संगीतकाराने!! तालाच्या बाबतीत तर या संगीतकाराने इतके प्रयोग केले आहेत की ते प्रयोग ऐकताना, केवळ चकित होणे, इतकेच आपल्या हाती राहते. "अनामिका" चित्रपटातील "मेरी भिगी भिगी सी" हे किशोर कुमारने गायलेले गाणे, आपल्याला किरवाणी रागाची सुंदर झलक दाखवते. गाण्यात केरवा ताल आहे पण इथे संगीतकाराने मजा केली आहे. ८ मात्रांचा हा ताल आहे आणि याची पहिली मात्रा "धा" या बोलाने सुरु होते आणि इथे संगीतकाराने, ही मात्रा गिटारवर घेतली आहे!! सर्वसाधारण प्रघात असा, मात्रा या आघाती वाद्यांवर घेतल्या जातात पण, इथे पारंपारिक पद्धतीला बगल देऊन, गिटार वाद्याचा सूर, हीच समेची मात्रा ठेवली आहे आणि पुढील मात्रा Actopad वाद्यावर घेतल्या आहेत. परिणाम, गाण्याला संपूर्ण आधुनिक पेहराव!! याचा अर्थ, तालाचे नियम पाळले आहेत पण सादरीकरणात वैविध्य आणले आहे. सुगम संगीतात प्रयोग कसे करता येतात, याचे हे उत्तम उदाहरण मानता येईल. तालासाठी या संगीतकाराने अनेक वैश्विक वाद्यांचा उपयोग केला आहे, जसे "मादल","क्लेव्ज",'ब्लासको" किंवा प्रसंगी ज्याला "न-स्वरी" वाद्ये म्हणता येतील, उदाहरणार्थ झांजेसारखी घन वाद्ये, झायालोफोन, केस्टानेट, खुळखुळे सारख्या वाद्यांचा परिणामकारक उपयोग, हे प्रयोगात्वाचे निर्देशक म्हणता येईल.मुळात, परिणाम साधणे, हे प्राथमिक उद्दिष्ट.

https://www.youtube.com/watch?v=K0THyu8oNlw

स्वरसंहतीतत्वावर आधारलेल्या भारतीय संगीतासारख्या पद्धतीत एका वेळेस एक स्वर आणि पुढे दुसरा, असे पायाभूत वळण असते. या लक्षणालाच बाजूला सारण्याची धमक दाखवली. आवाजांचे लगाव, तुटक गायन फेक, घसीट किंवा खालच्या स्वरावरून वरच्या स्वरावर जाताना दबाव निर्माण करणे, छोटेखानी ध्वनी विलक्षण चमकदारपणे योजणे, यामुळे संबंधित सांगीत घटना गुंतागुंतीची होते. यातून आपण ठामपणे एक निष्कर्ष सहज काढू शकतो. याचे संगीत, रचनाकाराच्या संभवनीय सर्जनशीलतेच्या दर्जाविषयी खात्री पटविणारे संगीत आहे. त्याने संगीत आकारले ते चित्रपटीय सादरीकरणासाठी. परस्परविरोध, विरोधाभास आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे आकर्षण म्हणजे आधुनिक सांगीत संवेदनशीलता. या संगीतकाराकडे, विशिष्ट रागापासून दूर सरकून देखील रागाचे एकसंधपण आपल्या चाळीस देण्याची प्रशंसनीय क्षमता होती. हे गाणे वास्राविक काहीसे अंतर्मुख करणारे गीत आहे पण ती अंतर्मुखता मांडताना, संयमित भावनावेग आविष्कृत शास्त्रोक्त बाज, किंचित पातळ करून, अतिशय चांगल्या कामी लावला आहे, असे आपल्याला सहज म्हणता येईल. वाद्यांच्या वापरातून आणि रूढ सुरावटीच्या सूचनेतून, ही रचना आपले स्वतंत्र स्वरूपच व्यक्त करीत आहे.तसे बघितले सुरावट सरळ जात आहे पण लयबंध तिरकस जातो आणि आपल्याला ही रचना काहीशी अस्वस्थ करते. गाण्यातील कवितेच्या भावाशयाशी नाते राखून केलेली ही रचना, आपण सहज गुणगुणू शकतो.
आधुनिक गझल गायनात आमुलाग्र बदल करून आणि त्याचा प्रभाव पुढील पिढ्यांवर अव्याहतपणे रुजवण्याचे अलौकिक काम, उस्ताद मेहदी हसन यांच्या गायनाने केले आहे. "शोला था जल बुझाने" ही रचना ऐकताना या वाक्याचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला येते. "किरवाणी" रागावर ही रचना निश्चित आधारलेली आहे. सुगम संगीतात, अत्यंत विपुलपणे जे ताल वापरले जातात, त्यातील "दादरा" तालात ही रचना बांधलेली आहे. शक्यतो अति ठाय लय, खर्जातील स्वरांनी सुरवात करायची आणि मंद्र सप्तक ते शुद्ध स्वरी सप्तक, इतपतच गायनाचा बराचसा आवाका ठेवायचा, अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील.   अर्थ असा नव्हे, तार सप्तकात गायचेच नाही पण, गाताना, आपण ज्या शायरची रचना गात आहोत, त्याच्या शब्दांवर आणि पर्यायाने आशयाच्या अभिव्यक्तीवर परिणाम होऊ द्यायचा नाही, अशी जणू प्रतिज्ञा केल्याप्रमाणे, गायन केले असल्याने, तार सप्तकात फार काळ गायन होत नाही.

https://www.youtube.com/watch?v=cDqTxSPuylk

या रचनेत, मेहदी हसन नेहमीप्रमाणे, रागाच्या शुद्धतेचे नियम पाळतात पण, तसे करताना, राग संगीतातील अलंकाराचे तंतोतंतपणे सादरीकरण करत नाहीत. वेगळ्या शब्दात, ताना घेताना, शक्यतो पूर्ण सप्तकाचा धांडोळा न घेता, ३,४ स्वरांच्या हरकती घेणे आणि घेताना, हातात असलेल्या शायरीचे सौंदर्य वाढविणे, हा उद्देश अगदी स्पष्ट दिसतो. बरेचवेळा, काही शब्द लयीच्या "मीटर" मध्ये बसणे अवघड जाते, तेंव्हा चालीला मुरड घालायला, त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही आणि हे वैशिष्ट्य जाणीवपूर्वक, त्यांनी आयुष्यभर जपल्याचे दिसून येते.

हिंदी चित्रपट गीतांत "रवींद्र" संगीताचा वापर, ही पूर्वापार चालत आलेली घटना आहे. एकूणच, हिंदी चित्रपट गीतांत, ज्या बंगाली संगीतकारांनी बहुमोल भर टाकली, त्यात संगीतकार हेमंत कुमार, यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मुळातले गायक पण पुढे अनेक रचना करून, व्यामिश्र रचनाकार म्हणून मान्यताप्राप्त झाले. वास्तविक पहाता, त्यांनी शास्त्रीय संगीताचे पायाभूत शिक्षण घेतले नव्हते तरीदेखील, अतिशय मधुर, स्वरेल आणि मन:स्पर्शी गायन, ते सहज करीत असत. त्यांचे तर नेहमी असेच म्हणणे असायचे, कुठलाही रचनाकार, "रवींद्र" संगीत टाळून, रचना करणे शक्य नाही. यातील थोडा अहंकारी भाव सोडला तरी तथ्य काही प्रमाणात आहे आणि ते त्यांनी, आपल्या कारकिर्दीत दाखवून दिले. "नागीन" चित्रपटातील गाण्यांनी, त्यांची, रचनाकार म्हणून ओळख मुंबईला आणि पर्यायाने देशाला झाली. याच चित्रपटातील, "मेरा दिल ये पुकारे आजा" हे गाणे, किरवाणी रागाची दाट छाया दाखवते. केरवा तालात बांधलेल्या या रचनेत, एक अश्रूत गोडवा आहे. चाल तशी साधी, सरळ आहे पण सहज गुणगुणता येत असल्याने, ही रचना कमालीची लोकप्रिय झाली.

https://www.youtube.com/watch?v=mr_n9R3E_w4

एकूणच त्यांच्या कारकिर्दीकडे जरा बारकाईने बघितले तर काही वैशिष्ट्ये लगेच आपल्या ध्यानात येतील. हेमंतकुमारांना पाश्चात्य संगीत किंवा आगळे वेगळे स्वनरंग, यांचे फार आकर्षण दिसत नाही. त्याचप्रमाणे, अतिद्रुत आणि हिसकेबाज हालचालीस पूरक असे नृत्यासंगीत देखील फारसे आवडत नव्हते. नागीन मधील नृत्यगीते, याला प्रमाण म्हणून दाखवता येतील. तरी देखील, गाण्यात "हुंकार" इत्यादी ध्वनीद्रव्यांचा वापर करण्याची आवड, अनेक रचनांमधून आपल्याला दिसून येईल. "नागीन" चित्रपटाचे संगीत इतके गाजले की ती लोकप्रियता, त्यांना चक्क अडचणीची वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली.  एक प्रकारचा हळवेपणा आणि अ-दृश्याची ओढ, हे भाव, त्यांच्यातील रचनाकाराला नेहमी आव्हानात्मक वाटावेत, इतक्या मुबलक प्रमाणावर त्यांनी रचना केल्या आहेत. अर्थात, अशा रचनांवर देखील कुठेतरी "रवींद्र" संगीताची पडछाया दिसून येते. 'रवींद्र" संगीत(च) नव्हे तर बंगाली लोकसंगीतातील "बाउल""कीर्तन" या शैलींचा देखील अतिशय परिणामकारक वापर केलेला आढळतो. मघाशी मी ज्या "अ-दृश्य" गीतांचा उल्लेख केला, त्यात परत, लयहीन अंतलक्षी कुजबुज, मग्न पठण, यांचा मुख्य हेतू म्हणून हळूहळू गायनापर्यंत पोहोचणारी संगीतस्पंदने, यातून गीत उभे करण्याचे त्यांचे कौशल्य खास वाखाणण्यासारखेच होते. अशी गाणी जणू, आपल्याला ते संगीतमय धुक्यात गुरफटून टाकण्याची अलौकिक किमया करतात. जरी पाश्चात्य संगीताकडे ओढा नसला तरी देखील, काही रचनेतून, त्याचा अंधुकसा प्रत्यय नक्कीच येतो.

आता आपण, "किरवाणी" रागावरील काही गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी, खालील रचनांच्या लिंक्स ऐकुया.
सूरसुखखनी तू विमला - वसंतराव देशपांडे
https://www.youtube.com/watch?v=Nug2yKgi0iw

आंखो से जो उतरी है दिल मे - ओ.पी.नैय्यर
https://www.youtube.com/watch?v=qitBaM3Ly8s