Wednesday 18 June 2014

ललित साहित्य – फलश्रुती




सौंदर्यकल्पनेचा सांस्कृतिक मूल्याच्या क्षेत्रातील दबदबा अजूनही कायम आहे. म्हणूनच ललित साहित्याची फलश्रुती सौंदर्य, हीच आहे पण हे कितपत बरोबर आहे? सौंदर्यकल्पनेचे सांस्कृतिक औचित्य लक्षात घेऊनही ललित साहित्याला त्याहून अधिक व्यापक, अधिक जीवनस्पर्शी आणि अन्य सांस्कृतिक फलश्रुती आहे का? हा खरा प्रश्न आहे!!
ललित साहित्याच्या सांस्कृतिक फलश्रुतीविषयीचा हा अविश्वास, औद्योगिक आणि शास्त्रीय क्रांतीनंतर झपाट्याने विस्तारला तरी तो ग्रीक साहित्यशास्त्राइतका जुना आहे. ललित साहित्यावरील अविश्वासानेच पाश्चात्य साहित्यशास्त्राची सुरवात झाली, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. याबाबत प्लेटोने पहिला विचार मांडला आणि एकूणच सगळे विचारमंथन सुरु झाले, पुढे Aristotle, रस्किन, रिचर्डस,मर्ढेकर इत्यादींनी, वेगवेगळ्या विचारांनी अधिक विस्तारित केले.
आता, ललित साहित्याच्या फ़लश्रुतिबाबत अविश्वास का? या प्रश्नात अनेक विचार अंतर्भूत आहेत. १] शास्त्रीय साहित्य आणि त्यापासून उद्भवणारे विकासशील विचार, २] धार्मिक, नैतिक व राजकीय हेतूंनी लिहिलेले साहित्य आणि त्या अनुषंगाने होणारे स्थित्यंतर, ३] ललित साहित्याचे सृजन ज्या प्रकारच्या व्यक्तित्वातून होताना दिसते, त्यातील सुसंस्कृतपणा, सभ्यता यांच्याशी काहीवेळा होणारा विसंवाद, ४] ललित साहित्यातील विषयाच्या निव्वळ स्थूल स्वरूपावरून त्याच्या सूक्ष्म संस्काराचे स्वरूप अजमावण्याची खोडसाळ सवय,५] सर्वात महत्वाचे, ललित साहित्याचे स्वरूप आणि सांस्कृतिक फ़लश्रुतिच खरा अर्थ, याबाबत निर्माण झालेला गोंधळ!!
म्हणून ललित साहित्याची सांस्कृतिक फलश्रुती समजून घेण्यासाठी,”ललित साहित्य”, आणि “सांस्कृतिक फलश्रुती” यांचा अर्थ निश्चित करणे जरुरीचे ठरेल. विं.दा. करंदीकरांनी, याबाबत थोडक्यात म्हटले आहे, ” भाषेच्या साधनेने केलेली कल्पनाप्राप्त जीवनप्रक्रियेची बंदिश” आता, याचा थोडक्यात विचार करायचा झाल्यास, “बंदिश” म्हणजे “एकत्रित स्वयंपूर्ण घाट” असा बंदिस्तपणा दिसून येतो. इथे सौंदर्यनिष्ठ, हा शब्द फसवा ठरू शकतो, कारण ललित साहित्याची सांस्कृतिक फलश्रुती सौंदर्यकल्पनेच्या आधारे शोधणे फार किचकट ठरू शकते किंवा अर्थशून्य देखील!! कल्पनाप्राप्त जीवनप्रक्रिया हेच ललित साहित्याचे खरे वैशिष्ट्य मानावे लागेल. यासाठी काही उदाहरणे बघितले तर हा मुद्दा व्यवस्थित लक्षात यावा.
शेक्सपियरची नाटके, डोस्टोव्हस्कीच्या कादंबऱ्या, चेकोव्हच्या कथा तसेच आपल्याकडील व्यास, वाल्मिकींची महाकाव्ये लगेच ध्यानात येईल. भगवद्गीता येण्याची शक्यता कमी तसेच ज्ञानेश्वरी!! याचे कारण या दोघांचे मूळ स्वरूप, धार्मिक आणि तात्विक विचारांचे आहे.
ललित साहित्यात, हेतुगर्भ साहित्य, जीवनदर्शी साहित्य, आणि विशुद्ध साहित्य असे भाग करता येतील, अर्थात, यात आणखी पोटभेद करता येतील पण ते सगळे याच्याच आधारे येतील. हेतुगर्भ साहित्यात ज्ञानेश्वरी येऊ शकते तर पु.शि.रेग्यांची “सावित्री” विशुद्ध साहित्यात येऊ शकते. हेतूगर्भ साहित्य, प्रामुख्याने वैचारिक साहित्याच्या क्षेत्रावर आधारलेले असते तर विशुद्ध साहित्य, हे ललित कलांवर देखील आधारित असू शकते. जीवनदर्शी साहित्य, हे कल्पनाप्राप्त जीवनप्रक्रियेची बंदिश, याआधारे करता येते.
इथे २ गोष्टी कटाक्षाने ध्यानात घेतल्या पाहिजेत. लेखकाने जाहीर केलेले हेतू, चुकीचे ठरू शकतात आणि ते बाजूला ठेऊनच ग्रंथ वाचन करणे आवश्यक ठरते. म्हणजे, Anna Karenina किंवा Crime and Punishment, यांचे सृजनबाह्य हेतू धार्मिक आणि नैतिक असले तरी, त्याचा अंतर्भाव जीवनदर्शी साहित्यात करावा लागेल.
दुसरा भाग असा, कुठल्याही साहित्याचा, एका सुट्या भागावरून त्या ग्रंथाचे स्वरूप ठरविता येणार नाही. भगवद्गीता, हेतुबद्ध ललित साहित्य म्हणून गणले जाईल पण जर का, व्यासांच्या संपूर्ण महाभारताच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, त्या जीवनदर्शी साहित्याचा एक भाग म्हणून करावा लागेल!!
ललित साहित्याचे काहीसे संदिग्ध स्वरूप बघितल्यावर, त्याच्या सांस्कृतिक फ़लश्रुतिचा विचार करूया. “सत्य”, “शिव” आणि “सौंदर्य” या संकल्पनेच्या आधारेच विचार करणे शक्य आहे. कुठलीही संस्कृती याच ३ घटकांवर आधारित असते. संस्कृती ही स्वभावत: सामाजिक जरी असली तरी तिची फलश्रुती ही व्यक्तीचे जीवन अनिवार्यपणे संस्कारित करणे, हीच असते. समर्थ, जिवंत आणि सर्वस्पर्शी संस्कृतीचे लक्षण, त्या संस्कृतीच्या क्षेत्रात अंतर्भूत झालेल्या माणसांचे व्यक्तित्व हे कळत/नकळत संस्कारित झालेले असते. याच दृष्टीने,सुशिक्षित परंतु असंस्कृत किंवा अशिक्षित पण सुसंस्कृत असे आढळणे संभवनीय ठरते. इथे ५ मुद्दे नव्याने लक्षात घेणे आवश्यक ठरावे. १] सूक्ष्म संवेदनशक्ती, २] व्यापक कल्पनाशक्ती, ३] औचित्यविचाराच्या सापेक्षतेची समज, ४] सर्वसाक्षी सहानुभूती आणि ५] अपरिहार्य अस्वस्थता.
जीवनदर्शी ललित साहित्य याच स्वरूपाचा संस्कार मनावर करीत असतो. इथे एक चमत्कारिक विरोधाभास दडलेला आहे. जो संस्कार करण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नात क्वचितच यशस्वी ठरतो!! असे लिखाण जिद्दीने होणारे नसून स्वभावसिद्ध प्रकृतीनेच होते. उदाहरणे बघूया, Tolstoy – Anna Karenina, Hemingway – Old Man & Sea किंवा व्यासांचे महाभारत!! या सर्व कलाकृती आपली सांस्कृतिक फलश्रुती अटळपणाने साधित असतात. या सगळ्या एकाच तागडीत तोलणे चुकीचे ठरेल, जाणीवेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वावरत असतील परंतु त्यांच्या वाचनाने आपण, जीवनाच्या अधिक व्यापक अनुभूतीत सहभागी होत असतो. आपली संवेदनशक्ती अधिक सूक्ष्म बनवीत असतात. हे सगळे करीत असताना, आपल्या ज्या बरेवाईटपणाच्या कल्पनाशक्ती व्यापक करीत असतात, अधिक गतिशील आणि अधिक सापेक्ष बनवतात. एकीकडे, “सत्य”, “शिव”, आणि “सुंदर”, या मुल्यांचा अधिकाधिक सापेक्ष शोध घेण्याचा ध्यास निर्माण करतात. तसेच दुसरीकडे, या कल्पनांसाठी निर्माण केलेले तकलादू साचे व व्याख्या परत,परत मोडून टाकतात. जीवनाचे व्यापक दर्शन घडविताना त्यातील विसंगतीचा, अपूर्णतेचा साक्षात्कार क्षणोक्षणी घडवत असतात.
तसे बघितले तर, प्रत्येक माणसाला स्वत:चे असे खास, प्रत्यक्ष आणि स्थलकालसापेक्ष व्यक्तिजीवन असते. अनेक संभाव्य स्वरुपांपैकी एक विशिष्ट स्वरूप वाट्याला आलेले असते. किंबहुना त्याच्याच सहाय्याने, त्याला अधिक व्यापक जीवनात प्रवेश करणे शक्य असते. कल्पनेच्या सहाय्याने अनेक संभाव्य स्वरुपांचा अनुभव घेणे, म्हणजेच आपल्या मर्यादापलीकडे अनुभूती घेणे होय.अर्थात, प्रत्येक कलाकृतीच्या यात्रेमध्ये आपण, विश्वप्रदक्षिणेची लहान कक्षा अनुभवीत असतो परंतु वर निर्देशिलेले संस्कार कमीअधिक प्रमाणात सगळ्याच कलाकृतीत अनुभवायला मिळतात.
ललित साहित्याच्या मूळ स्वरूपातून निष्पन्न होणारी सांस्कृतिक फलश्रुती फक्त इतकीच असते!!

No comments:

Post a Comment