Sunday 24 May 2020

तेरे बिना सुने

"मध्यरात्री नभघुमटाखाली,
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी 
त्यक्त बहिष्कृत मी त्या काळी 
एकांती डोळे भरती 
तेथे कर माझे जुळती 
कवी बा.भ.बोरकरांच्या "तेथे कर माझे जुळती" या अमाप लोकप्रिय कवितेतील शेवटचा चरण. खरतर या कवीच्या नावाशी ही कविता निगडित झाली आहे. या कवितेबाबत एक मुद्दा - अशा कविता व्यापक आवाहनक्षेत्र संपादन करतात म्हणून त्या कमी प्रतीच्या असतात!! असा एक अभिप्राय नेहमीच लोकप्रिय असतो परंतु हा अभिप्राय असमंजसपणाचा आहे,हे या कवितेने निखालस सिद्ध केले आहे. शिवातील सुंदरतेचा शोध हा बोरकरांच्या कवितेचा स्थायीभाव आहे. या शोधला या कवितेत एक मनोहर शब्दरूप मिळाले आहे. ही कविता म्हणजे संस्कृतीला आधारभूत असलेल्या माणसाच्या दिव्यत्वाला केलेला एक भावपूर्ण नमस्कार आहे अर्थात अशा सगळ्या दिव्यत्वाचा शोध घेताना अचानक विरक्ती येते आणि त्या विरक्तीचे काव्यस्वरूप म्हणजे वरील ओळींनी केलेला अक्षय समारोप. अशा तऱ्हेचा विदग्ध समारोप फार थोड्या कवितांच्या वाटेला येतो. आजचे आपले जे गाणे आहे  - "तेरे बिना सुने नयन हमारे" या गाण्यातील आशय आणि भाव हा वरील ओळीशी मिळता जुळता आहे. चित्रपटातील नायक अतिशय संत्रस्तावस्थेत व्याकुळ झालेला आहे आणि नजरेसमोर केवळ निराशा हेच दिसत आहे. अशा काळवंडलेल्या मनस्थितीचे वर्णन गाण्यात केलेले आहे.   
सुप्रसिद्ध कवी शैलेंद्र यांची शब्दकळा आहे. सातत्याने लिहून देखील कवितेची एक ठराविक पातळी ठरवून त्या पातळीच्या खाली त्यांची रचना बहुतांशी गेली नाही. चित्रपट गीते म्हणजे नेहमी हुकुमाबर लेखन. त्यात अनेक घटक अस्तित्वात असतात आणि त्यामुळे प्रतिभेला मर्यादा पडू शकतात. परिणाम काव्याचा दर्जा खालावणे. त्यातून चित्रपटात गीते लिहायची म्हणजे पडद्यावरील पात्रानुरूप तसेच प्रसंगानुरूप लिहिणे भाग पडते. इतक्या प्रकारच्या मर्यादा सांभाळून शैलेंद्र यांनी अर्थपूर्ण गीते लिहिली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काव्यातील भाषा ही सहज,सोपी आणि कुणालाही समजेल अशी ठेवली. खरंतर असे म्हणता येईल , भारतीय मातीशी नाते जुळवून घेणारी त्यांची शब्दकळा होती. आता इथे सुरवातीच्या ओळीत "बाट तकत गए सांझ सकारे" त्यांनी उत्तर प्रदेशातील लोकसंगीताच्या आधारे संदर्भ घेतले आहेत. तसेच "दिन का है दुजा नाम उदासी" या ओळीतील आशय कुणालाही समजून घेणे अवघड नाही. अशीच दुसऱ्या अंतऱ्यातील दुसरी ओळ उदाहरण म्हणून बघता येईल - "साया भी मेरा मेरे पास ना आया"!!  किती साध्या ओळी आहेत बघा. आपलीच सावली पण आपल्या सोबत नाही, व्याकुळता किती मनात साठून राहिलेली आहे ,याचे प्रत्यंतर घेता येते. 
संगीतकार एस.डी.बर्मन यांनी चाल लावली आहे. चित्रपटातील गाणे हे नेहमी चित्रपटाच्या प्रसंगाशी तसेच पात्रांशी सुसंवादी असावे या विचारसरणीचे जे थोडे रचनाकार होते , त्यातील प्रमुख नाव. तसेच बंगाली लोकसंगीताचा यथायोग्य वापर करून त्यांनी आपल्या रचनांत बरीच विविधता आणली. काफी रागावर चाल आहे .एक निष्कर्ष काढता येतो . संगीतकार नौशाद यांनी हिंदी चित्रपटगीतांचा साचा तयार करण्यात पुढाकार घेतला तर सचिनदांनी त्याचा आवाका आणि आशय वाढवण्यात हातभार लावला. म्हणजे तसे बघता दोन परस्परविरोधी वाटणाऱ्या प्रवृत्तीचा पाठपुरावा करत सचिनदांनी किमया साधली. दुसरा महत्वाचा निष्कर्ष काढता येतो - सांगीत परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो सुसंस्कृत संयम दाखवला. चित्रपटसंगीतातील संगीत या अंगावर भर देता यावा म्हणून हालचालींकडे किंवा ठरीव (कधी कधी बटबटीत) अभिनयाकडे गीताला खेचू पाहणाऱ्या शक्तींना पायबंद घालण्याचा प्रयत्न जारी ठेवला. आता या गीताच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, गीताची लय ही मध्य सप्तकात ठेवली आहे. विरही थाटाचे गीत असल्याने वाद्यमेळ देखील अतिशय मर्यादित आहे. गाण्यात जरी स्त्री आणि पुरुष असे दोन आवाज असले  युगुलगीत असे स्वरूप नाही. सुरवातीलाच व्हायोलिन आणि बासरीचे सूर आहेत जे काफीरागाची ओळख करून देतात. पुढे वाद्यमेळ म्हणून संतूर वाद्याचा लक्षणीय वापर आहे. सचिनदांच्या संगीतरचनेचे आणखी वैशिष्ट्य दाखवायचे झाल्यास कुठेही आक्रोशी सादरीकरण होत नाही आणि गीत हे नेहमी "गीतधर्म" जागवते. सुरवातीलाच पुरुषी आवाजात हलका असा "आकार" ऐकायला मिळतो आणि चालीचे स्पष्ट सूचना होते. गीतातील भावनेचा परिपोष करायचा परंतु तसे करताना कधीही भडकपणा आणू द्यायचा नाही. मी वरती "संयतपणा" असा उल्लेख केला तो या गीताच्या संदर्भात चपखल बसतो. अंतरे मुखड्याशी समांतर बांधले आहेत. सचिनदांच्या बाबतीत बरेचवेळा असा प्रकार आढळतो, अंतरे बांधताना बरेचवेळा मुखड्याच्या चालीचा विस्तार असेच स्वरूप दिसते. चाल कुठेही अकारण वरच्या सुरांत जात नाही कारण तशी गरजच भासत नाही. अनेक प्रतिभावंत रचनाकारांप्रमाणे सचिनदांच्या संगीताचे वर्गीकरण करावेच लागते इतकी विविधता त्यांनी आपल्या संगीतात दाखवली होती. त्यांनी सांगीत प्रयोग केले तसेच चित्रपटगीतातही प्रयोग केले. अभारतीय संगीताचे स्वागत करणारे, पण तरीही भारतीय राहणारे संगीत रचण्यात त्यांनी विलक्षण यश मिळवले. गुणगुणण्यासारखे, लक्षात राहणारे संगीत वाद्यवृदाने रचावे परंतु भारून टाकणारे नव्हे,हे त्यांचे ध्येय होते. याचा परिणाम त्याची ऐकणाऱ्याबरोबर नाती जुळली हे नक्की होते. 
हे गीत प्रामुख्याने मोहमद रफीचे जरी शेवटचा अंतरा लताबाईंनी गायला असला तरी. रफींचे अतिशय संयत , भावव्याकुळ गायन हीच या गाण्याची खरी खासियत आहे. जर अशाप्रकारची चाल गायला मिळाली तर आपण कसे गारुड घालू शकतो याचे अप्रतिम उदाहरण रफींनी दाखवून दिले आहे. गायन करताना जो संयम संगीतकाराने स्वररचनेत दाखवला आहे त्याचेच अचूक अनुकरण किंवा सादरीकरण रफींनी आपल्या गायनातून दर्शवले आहे. संगीतकाराला अभिप्रेत असलेली स्वराकृती आपल्या गळ्यातून इथे जिवंत केली आहे. एरव्ही काही प्रमाणात "नाट्यात्म" भासणारे गायन इथे संपूर्णपणे सुसंस्कृतपणा वावरते. कुठेही खटका घेण्याचा हव्यास नाही ,उगीच "गायकी" दाखवायचा यत्न नाही. सचिनदांनी जे आर्जव स्वररचनेत मांडलेले आहे त्याचा सुंदर परिपोष आपल्या गायनातून रफींनी केलेला आहे , परिणामी चाल आणि शब्द हळूहळू मनात उतरत जातात. वाद्यमेळाची मिळालेली संयत साथ देखील वाखाणण्यासारखी आहे. लताबाईंना गायला केवळ शेवटचा अंतरा मिळाला आहे. जे मुळात आहे त्याचेच वर्धिष्णू स्वरूप लताबाईंनी आपल्या गायनातून सादर केले. दोघांनीही गायन करताना आपल्या गळ्यातील धार किंचित कमी केली आहे. त्यामुळे शाब्दिक आशय आणि चालीतील अनुस्यूत गोडवा कमालीचा खुलतो.  

तेरे बिना सुने नयन हमारे 
बाट तकत गए सांझ सकारे 

रात जो आए ढल जाये प्यासी 
दिन का है दुजा नाम उदासी 
निंदिया ना आये अब मेरे द्वारे 

जग में रहा मैं जग से पराया 
साया भी मेरा मेरे पास ना आया 
हंसने के दिन भी रो के गुजारे 

ओ अनदेखे ओ अनजाने 
छुप के ना गा ये प्रेम तराने 
कौन है तू मोहे कुछ तो बता रे 



Saturday 23 May 2020

रात्र आहे पौर्णिमेची

मराठी भावगीत प्रांगणात अशी असंख्य गाणी तयार झाली ज्या गाण्यांत काहीही "बौद्धिक" नाही, काहीही प्रयोगशील नाही पण तरीही निव्वळ साधेपणाने त्या रचनांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. विशेषतः आकाशवाणीवर "भावसरगम" कार्यक्रम सुरु झाला आणि अनेक विस्मरणात गेलेल्या कवींच्या शब्दरचना असोत किंवा अडगळीत गेलेले संगीतकार असोत किंवा बाजूला पडलेल्या गायक/गायिका असोत, अनेक कलाकारांना अपरिमित संधी मिळत गेल्या आणि त्यांनी त्या संधीचे काहीवेळा सोने केले. ललित संगीतात रचना करताना, नेहमीच अभूतपूर्व काही घडते असे अपवादानेच घडते, खरेतर कुठल्याही कलेच्या क्षेत्राला हे विधान लागू पडते. असामान्य असे नेहमीच तुरळक असते तरीही निव्वळ साधेपणाचा गोडवा देखील तितकाच विलोभनीय असतो. यात एक गंमत असते, बहुतेक तथाकथित चोखंदळ रसिकांना वाटते, ज्या रचनेत काही "बुद्धिगम्य" नाही ती रचना टुकार असते!! जणू काही साधी, सोपी रचना करणे हे सहजसाध्य असते. खरंच तसे आहे का? 
आजचे आपले गाणे असेच साधे, सरळ गाणे आहे.  कविता शांताराम नांदगावकरांची आहे. नांदगावकर हे कधीही प्रथा दर्जाचे कवी म्हणून मान्यताप्राप्त कवी नव्हते परंतु कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांनी काही अर्थपूर्ण कविता लिहिल्या हे देखील तितकेच खरे. आता प्रस्तुत कवितेत नवीन असे वाचायला मिळत नाही किंवा नवा आशय समोर येत नाही. साधी प्रणयी व्याकुळता सांगणारी शब्दरचना आहे. त्यातील प्रतिमा देखील सरधोपट म्हणाव्या अशा आहेत. "निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी" या ओळीत तसे काहीही नाविन्यपूर्ण सिवाचायाला मिळत नाही, या उलट "वितळलेला चंद्र" सारखी अगम्य शब्दयोजना वाचायला मिळते . अर्थात ललित संगीताची प्राथमिक मागणी - गेयताबद्ध कविता असणे, इथे पुरी होते. तसे बघितले तर सोपी कविता लिहिणे कधीही सहज घडणारे नसते परंतु साध्या शब्दांतून देखील बराच अर्थपूर्ण आशय सामावला जातो. दुर्दैवाने इथे तसे काही हाताला मिळत नाही. प्रणयिनीची व्याकुळ अवस्था आणि प्रियकराची सतत वाट बघणे, ही अनादी काळापासून साहित्यात वावरत असलेली भावना आहे. परंतु बहुदा "रात्र आहे पौणिमेची, तू जरा येऊन जा" ही मुखड्याची ओळ संगीतकाराला भावली असावी. 
संगीतकार दशरथ पुजारी हे मराठी भावसंगीताच्या प्रांगणातील मान्यताप्राप्त नाव. जे मत  कवितेबाबत मांडले आहे तेच मत स्वररचनेबाबत मांडता येते. ओठांवर सहज रुळणाऱ्या चाली या संगीतकाराने निर्माण केल्या. "चंद्रकौंस" रागाधारित चाल आहे. खरतर रागाचे स्वर फक्त आधाराला घेतले आहेत. स्वररचनेचा विचार करायचा झाल्यास, या गाण्याचा "मुखडा" जरा बारकाईने ऐकल्यास, "जाणिवा थकल्या जीवाच्या, एकदा ऐकून जा" ही ओळ खास ऐकण्यासारखी आहे. ओळीतील आर्तता इतकी समृद्धपणे आपल्या समोर येते की गाणे आपल्या मनाची पकड घेते ती शेवटपर्यंत सोडत नाही. ललित संगीताच्या चालीबाबत हा विशेष, विशेषरीत्या लक्षात ठेवायला हवा. गाण्याने रसिकाला पहिल्या सूरापासून भारून टाकायला हवे. रसिकाचे सगळे लक्ष केवळ आणि केवळ गाण्याकडे केंद्रीभूत होणे अत्यावश्यक असते. संगीतकाराचे हे खरे कौशल्य. वाद्यमेळ हा बराचसा सतार आणि व्हायोलिन या वाद्यांवर आधारित आहे. किंबहुना गाण्याच्या सुरवातीचा जो स्वरिक वाक्यांश आहे, त्यातच चंद्रकौंस रागाची ओळख दडलेली आहे. गाण्यात एकूण ३ अंतरे आहेत. अंतरे बांधताना फार काही बदल किंवा वेगळ्या सुरांवर केलेली नसून मुखड्याचा चालीशी समांतर बांधले आहेत. 
या संगीतकाराचे मूल्यमापन करायचे झाल्यास, त्यांच्या रचनांचे खास लक्षण असे की त्यात वाद्यरंग आकर्षक असतात. सर्वसाधारणतः वाद्यरंगात भिडलेले आणि काहीशी द्रुत लय पसंत करणारे, मुख्यतः वाद्यवृंदाच्या व गतिमान लयबंधांच्या साहाय्याने गीताची उभारणी करतात. संगीतकार आपल्या रचनेचा जाणीवपूर्वक असा रोख ठेवतात की रचना निदान काही प्रमाणात तरी सुरावटीकडे झुकलेली असावी. याचा एक परिणाम असा  झाला,त्यांच्या रचनांचे मुखडे कायम लक्षात राहतात. मी  वरती, "अंतरे समान बांधणीचे बांधले आहेत",  या विधानाला वरील विवेचन पूरक आहे. त्यामुळे गीत साधे असले तरी त्याची खूण मनात रेंगाळत राहते. यामधून एक नक्की सिद्ध होते, या संगीतकाराने "आपण काही नवीन देत आहोत" असला आव कधीही आणला नाही. साध्या, सामान्य श्रोत्यांसाठी रचना करण्यात समाधान मानले. अर्थात भारतीय संगीतपरंपरेत वाढलेला साधा श्रोता देखील संतुलित असतो आणि त्याची सांगीतिक गरज अशाच रचनांतून भागू शकते. 
अगदी स्पष्टपणे मांडायचे झाल्यास, या गाण्यावर गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गायकीचा निर्विवाद हक्क पोहोचतो. सुरेल आणि स्वच्छ गायकी तसेच श्रोत्यांपर्यंत स्वररचना थेटपणे पोहोचवण्याची हातोटी ही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. मुळात आवाजात कुठेही कसल्याच प्रकारचा भडकपणा नसल्याने, गायनात एकप्रकारची शालीनता नेहमी डोकावते. संयत अभिव्यक्ती, हे तर या गायिकेचे वैशिष्ट्य म्हणता येईल आणि प्रस्तुत रचना बघता, अशाच गायनाची आवश्यकता होती. याचाच परिणाम या गायनातून विस्तीर्ण असा भावपट धुंडाळता येतो. अर्थात असे असूनही ही गायिका प्रामुख्याने मराठी भावसंगीतापुरतीच सीमित राहिली, हे दुर्दैवच म्हणायला हवे. 

रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा 
जाणिवा थकल्या जीवाच्या, एकदा ऐकून जा 

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी 
मिसळल्या मृदू भावनाही झोपल्या पानांतुनी 
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा 

पाखरे पाहून जा,जी वाढली पंखांविना 
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना 
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा 

अर्थ तू ऐकून जा,फुलवील जो वैराण ही 
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही 
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा 



Thursday 21 May 2020

दिल चीज क्या है

"तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ,
आलीस मिरवीत चालीमधुनी नागिणीचा डौल;
करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले 
जळता गंधक पाच उकळती यांही रंगलेले". 
प्रसिद्ध कवी बा.भ.बोरकरांच्या "जपानी रमलाची रात्र" या सुप्रसिद्ध कवितेतील काही ओळी. मराठी कवितेच्या इतिहासातील एक अतिशय लोकप्रिय अशी कविता. कवी बोरकरांवर त्यावेळच्या पोर्तुगीज गोव्याच्या संस्कृतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. मुळात मराठीत "स्त्री"चे अस्तित्व बहुतांशी सोवळे, पडद्याआड असे केलेले आत्ता आत्तापर्यंत सर्वमान्य होते. कवितेत स्त्री असायची पण त्याजोडीने सोज्वळता, शालीनता असायची. स्त्री देहाबद्दल आसक्ती  दाखवणारे बोरकर हे पहिले कवी निश्चितच नव्हेत परंतु बोरकरांच्या व्यक्तिमत्वावर असलेला पोर्तुगीज आणि एकूणच युरोपियन संस्कृती आणि साहित्याचा प्रभाव बघता अशा प्रकारची कविता लिहिणे साहजिकच होते. उर्दू गझलमध्ये जसा "भोगवादाचा मनोज्ञ" आविष्कार दिसतो त्याचेच काहीसे संयत प्रतिबिंब बोरकरांच्या कवितेतून आढळते. अर्थात रूढार्थाने बोरकरांनी "गझल" वृत्तात कधी कविता केल्याचे निदान माझ्यातरी वाचनात आलेले नाही. आजचे आपले गाणे - दिल चीज क्या है, हे गाणे याच ओळींची प्रचिती देणारे आहे. कविता म्हणून बघायला गेल्यास गझल "वृत्त" आहे परंतु स्वररचना म्हणून बघायला गेल्यास, चालीची "वृत्ती" लखनवी ढंगाच्या ठुमरीकडे झुकणारी आहे. अर्थात ठुमरी अंगाने गझल गाता येते हे आपण पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्या गायकीतून ऐकू शकतो. 
"शहरयार" या उर्दूतील नामांकित शायरने हे गाणे लिहिले आहे. हिंदी चित्रपटासाठी, जे शक्यतो चित्रपटासाठी लिहिणारे म्हणून प्रसिद्ध नाहीत अशा कवींनी नाममात्र का होईना शब्दरचना केल्या आहेत आणि त्यात या शायरचे नाव घ्यावेच लागेल. कविता म्हणून वाचायला गेल्यास अप्रतिम गझल वृत्तातील रचना आहे, हे सहज समजून घेता येते. चित्रपटात खऱ्याअर्थी गझल वृत्त राबवता येत नाही कारण चित्रपटातील गाणी ही नेहमी प्रसंगोत्पात असतात आणि त्यात मुखड्याला जी भावना असते, त्याला अनुलक्षून पुढील अंतरे लिहावे लागतात आणि त्यामुळे चित्रपटात "नझ्म" वृत्त भरपूर आढळते. आता या गाण्याबाबत बोलायचे झाल्यास, इथे प्रत्येक कडवे ही एक सार्वभौम कविता आहे (गझलचा एक आवश्यकनिकष) तसेच प्रत्येक कडवे २ ओळींचे आहे. प्रत्येक काढावयाचा समारोप हा पहिल्या ओळीला समांतर पण तरी काहीशी  आश्चर्यचकित करणारी अभिव्यक्ती आहे. ही सगळी चांगल्या गझल वृत्ताची लक्षणे आहेत. थोडक्यात, सुदृढ गझल वृत्त वाचण्याचा आनंद आपल्याला मिळतो. पहिल्या ओळींतून प्रणय भावना दृग्गोचर होते. आता कोठीवरील गाणे म्हटल्यावर प्रणय, त्याचे लाघवी आवाहन वगैरे रंग बघायला मिळणे क्रमप्राप्तच ठरते. गीताचा समय अर्धरात्रीच्या आधीचा आहे. कोठीवर आलेल्या रसिकाला आवाहन करायचे पण तसे करताना आपला तोल कुठेही ढळू द्यायचा नाही,किंबहुना प्रणयाची आदबशीर मांडणी करायची, असाच भावाविष्कार दिसतो. कवितेची भाषा तशी सोपी उर्दू भाषा आहे. त्यामुळे कविता म्हणून वाचताना फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. भाषेचे सौष्ठव - "दिवार-ओ-दर को गौर से पहचान लिजीये" सारखी ओळ अशा पद्धतीने लिहिली आहे की एकूण आशय लगेच ध्यानात येतो.  
संगीतकार खैय्याम यांनी या गाण्याची तर्ज बांधली आहे. शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास तसेच पहिल्यापासून उर्दू शायरीचा गाढा व्यासंग असल्याने, असा उर्दू संस्कृतीवर आधारित चित्रपट मिळाल्यावर त्यांची शैली खुलून आली. एक काळ असा होताहोता , खैय्याम हे चित्रपट क्षेत्राच्या बाहेर होते, हातात कुठलेही चित्रपट नव्हते आणि त्यांना "उमराव जान" सारखा चित्रपट मिळाला आणि या संधीचे त्यांनी सोने केले. गाण्याची चाल बिहाग रागावर आधारित आहे पण अधिकतर रागाचा तिरोभाव अधिक दिसतो. अर्थात हे तर सगळ्याच ललित संगीताच्या रचनाकारांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पाहा असे अजिबात गर्जून न सांगता हे गीत आपला भावपरिणाम सिद्ध करतात. खरंतर खैय्याम याच्या संगीताचे हे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. मानसिक अथवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, ही गझलची मागणी असते. बिहाग रागातील "तीव्र मध्यम" आणि "शुद्ध मध्यम" यांचे प्रभुत्व गाण्याच्या पहिल्याच ओळीतून दिसून येते. गाण्याच्या वाद्यमेळात छेडण्याचा आणि गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे आणि तो तसा वापर केल्यानेच स्वररचनेची खुमारी वाढते. त्यांच्या संगीतात नेहमीच एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. त्यांनी शक्यतो मोठा वाद्यवृंद वापरण्याकडे कल दाखवला नाही तसेच वाद्यांचा उपयोग हात राखून केल्याचे दृष्टोत्पत्तीस पडते. त्यामुळे गीतांतील संगीत आणि शब्द आपल्या मनात झिरपत जातात. वास्तविक ही रचना एक नृत्यरचना आहे पण तरीही संयमित भावदर्शन आपल्याला सतत दिसते. खैय्याम यांच्यावर एक आरोप नेहमी केला जातो - पहाडी रागाचा अतोनात वापर. सत्कृतदर्शनी हा आरोप नाकारणे अशक्य परंतु जरा बारकाईने ऐकल्यावर त्या रागातील अनेक दडलेल्या छटा शोधून काढून त्यांनी गाण्यांना अर्पिल्या आहेत, हे लक्षात येईल. तेंव्हा हा आरोप थोडा एकांगी आहे असे म्हणता येईल. 
आशाबाईंनी या चित्रपटाची गाणी गाऊन मुजरा धर्तीच्या गायनाचा एक मानदंड तयार केला. वास्तविक तिन्ही सप्तकात सहज फिरणारा गळा. परिणामी कुठलेही गाणे गळ्याला वर्ज्य नाही आणि ललित संगीताच्या दृष्टीने हे वैशिष्ट्य अधिक भावणारे. इथे तर कोठीवरील गाणे म्हणजे उद्दीपित करणे हे  प्राथमिक उद्दिष्ट. परंतु गायनात, मी वर लिहिल्या प्रमाणे "आदबशीर" आणि "संयत" हे भावगुण इथे आढळतात. कुणालाही हेवा वाटावा असा आवाज आशाबाईंना लाभला आहे. तो चैतन्यपूर्ण, कंपविहीन, न घसरता द्रुत लयीत फिरणारा आणि भरीव असूनही जनानी सौंदर्याने आणि लालित्याने युक्त असा आहे आणि या सगळ्या अलंकारांचा प्रत्यय या गाण्यात येतो. गाण्याच्या पहिल्या ओळीपासून याचे प्रत्यंतर येते. गायनातील प्रत्येक खटका, प्रत्येक हरकत ही काव्यातील आशयाला अधिक खोल मांडणारी आहे. खरंतर प्रत्येक अंतऱ्याची  वेगळी बांधलेली आहे पण तरीही कुठल्या शब्दावर "वजन" द्यायचे आणि कुठला शब्द "हलक्या" स्वरांत घ्यायचा, यामागे आशाबाईंचा स्वतःचा विचार दिसतो. त्यामुळे उठवळपणा नावाला देखील नाही. ठुमरी प्रमाणे रचना बांधली आहे पण आपल्याला ठुमरी गायची नसून चित्रपट गीत गायचे आहे तेंव्हा त्यादृष्टीनेच हरकतींचे स्वरूप ठेवणे गरजेचे आहे. आशाबाईंची प्रतिभा यादृष्टीने "निखरली" आहे. कोठीवरील गाणे फारच वरच्या स्तरावर गेले.  

दिल चीज क्या है ,आप मेरी जान लिजिये 
बस एक बार मेरा कहा मान लिजीये 

इस अंजुमन में आप को आना है बार बार 
दिवार-ओ-दर को गौर से पहचान लिजीये 

माना के दोस्तो को नहीं,दोस्ती का नाझ 
लेकिन ये क्या के गैर का एहसान लिजीये 

कहिये तो आसमान को जमीं पर उतर लाइये 
मुश्किल नहीं है कुछ भी अगर थान लिजीये 


Sunday 17 May 2020

प्रभू तेरो नाम

भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून आपण ६ संगीतकोटींच्या अस्तित्वाचा नेहमी निर्देश केला जातो. त्या म्हणजे "आदिम","लोक","धर्म","कला","संगम" आणि "जनप्रिय" संगीतकोटी.खरतर या संगीतकोटींसमवेत विचार व्हायला पाहिजे भक्तिसंगीतकोटींचा. भक्तिसंगीताचा निराळा विचार व्हायला हवा कारण खरे पहाता भक्तिसंगीताची तपासणी एका अधिक व्यापक अभ्यासाचा भाग ठरते. मानवी व्यक्तिमत्वाच्या आध्यात्मिक अंगांपैकी ३ गोष्टींचा संगीताशी संबंध वारंवार येत असतो : धर्मपरता, साक्षात्कारयुक्तता आणि भक्तिपरता. संगीत आणि अध्यात्म यांच्या परस्परसंबंधातील काही प्रमाणात एकमेकांत मिसळणाऱ्या आणि अधिकाधिक संकोच पावत जाणाऱ्या अवस्थांचे दर्शन या तिहींत होत असते. संगीत आणि धर्म यांची अपार विविधता आणि दीर्घ परंपरा भारतात आढळत असल्याकारणाने प्रस्तुत तपासणीस अपूर्व अशी संधी मिळते. याशिवाय भारतीय भाषांची विविधता आणू बहुसंख्याही ध्यानात घ्यावीच लागेल. या दृष्टीने असे ठाम विधान करता येईल, अध्यात्म आणि संगीत यांचे नाते तपासण्यास असे आव्हान इतरत्र क्वचितच मिळेल. 
भारतीय संगीत भक्तिपर आहे असे विधान वारंवार केले जाते परंतु भारतीय संगीतपरंपरा समग्रतेने विचारात घेता या स्तुतीपर विधानाने काहीशी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. याचे एक कारण असे, भक्तिपर संगीताची एक निराळी कोटी अस्तित्वात आहे याची स्वतंत्र जाणीव  होणे. दुसरे कारण असे की सादर होत असलेले एकंदर संगीत बरेचसे भक्तिपर म्हणणे हे हास्यास्पद ठरते. याचे महत्वाचे कारण संगीतकोटी सत्य स्वरूप धारण करतात. 
भक्तिसंगीताचे मंचीय सादरीकरण होत असते  त्या सादरीकरणावर अनेक संस्कार करावे लागतात आणि याच पार्श्वभूमीवर आपण आजचे गीत ऐकणार आहोत. 
प्रस्तुत गीताची शब्दकळा ही साहिर लुधियान्वी यांची आहे. एक बाब नक्की सांगता येते, भक्तिपर रचनेत काही ठराविक प्रतिमा या वारंवार डोकावतात आणि त्या प्रतिमांच्या आधारेच काव्य निर्माण होत असते. याचा वेगळा परिणाम असा होतो. काहीवेळा ही एक मर्यादा म्हणून कवीला काचू शकते. भक्तिपर रचनांत प्रामुख्याने देव आणि देवभक्ती प्रामुख्याने येत असली तरी त्याला अनुलक्षून तत्वज्ञान देखील अवतरते. अर्थात आजच्या कवितेत "देव" आणि त्याच्याकडे केलेली मागणी - याच आशयाभोवती कविता फिरते. देवाची स्तुती हाच प्रमुख विषय असल्याने, त्या संदर्भातील मानवी इच्छा इतकाच मर्यादित परीघ आहे. चित्रपट गीताला आवश्यक अशी गेयता या कवितेत आहे आणि वाचताना कुठेही (एक,दोन अपवाद वगळता) जोडाक्षरे नाहीत जेणेकरून संगीतातील "खटका" अलंकाराला मदत होईल. 
संगीतकार जयदेव यांची स्वररचना आहे. जयदेव यांची कारकीर्द बघता त्यांना ""हम दोनो" चित्रपटातील गाण्यांइतकी अफाट लोकप्रियता कधीही मिळाली नाही आणि या गाण्याच्या लोकप्रियतेचा त्यांना तसा फार फायदा झाला नाही. फक्त जयदेव यांचे नाव लोकांच्या ध्यानात राहिले. या चित्रपटातील सगळी गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. एक गंमत - या चित्रपटातील "अल्ला तेरो नाम" अतिशय लोकप्रिय भजन म्हणून प्रसिद्ध झाले आणि त्या प्रसिद्धीच्या झाकोळात हे गाणे राहिले. वास्तविक स्वतंत्र गाणे म्हणून मुद्दामून दखल घ्यावी, या योग्यतेचे गाणे निश्चितच आहे. राग धानी मध्ये चाल बांधली आहे. सर्वत्र आढळणारा "केरवा" ताल आहे. "ग म नि प ग रे सा" या सुरावटीतून हा राग सिद्ध होतो आणि हे गाणे याच सुरावटीला अनुलक्षून बांधले आहे. राग तसा समोरून आपल्या समोर येतो. खरतर जयदेव यांच्या रचनांत राग शक्यतो आडमार्गाने आपल्यापर्यंत पोहोचतो. मी वर म्हटल्याप्रमाणे जरी कवितेत जोडाक्षरे नसली तरी चाल बांधताना आपल्याला अनेक जागी "खटके" ऐकायला मिळतात जेणेकरून काव्यातील भाव अधिक खोलवर ध्यानात यावा. इथे संगीतकाराचा कवितेबद्दलचा व्यासंग दिसून येतो. मुखड्यातील शेवटची ओळ - "जीवन धन मिल जाए" ही गाताना "जाए" शब्दावर बारीकसा खटका घेतला आहे ज्यामुळे सगळ्या ओळीचे महत्व अधोरेखित झाले. चाल तशी साधी आहे पण जयदेव यांची शैली काही लपत नाही. वाद्यमेळातील बासरी किंवा सतार असो, वाजताना आशय तर प्रकाशात येतोच पण शब्दांचे महत्व तितकेच प्रकाशात येते. 
गाण्यातील लय अभ्यासण्यासारखी आहे. व्यासंगी संगीतकार" हा नेहमीच सर्जनशीलतेच्या जागा शोधत असतो. गाताना निव्वळ शब्द नव्हेत तर अक्षराने चालीचे सौंदर्य खुलवता येते. सोप्या स्वरांनी सुरु होणारी चाल एकदम "जो ध्याये फल पाए" गाताना बारीकशी निमुळती होत जाणारी हरकत ऐकायला मिळते. "गायकी अंग" अशाच स्वराकृतीतून सिद्ध होत असते. गाण्यात दोनच अंतरे आहेत. पहिल्या अंतऱ्याची सुरवात मुखड्याच्या चालीशी समांतर अशी आहे परंतु पुढे मात्र अंतऱ्याच्या दुसऱ्या ओळीपासून संगीतकार जयदेव आपले अस्तित्व दाखवतात. "हर बिगडी बन जाए, जीवन धन मिल जाए" या ओळीतील उत्तरार्ध प्रथम एका सुरात घेतला आहे परंतु पुन्हा घेताना चाल मुखड्याशी नाते जुळवून घेते. स्वरज्ञान म्हणतात ते या स्वरवाक्यांशाला. लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे लय तशीच ठेवली आहे पण चालीत किंचित बदल केला आहे. हे सगळे व्यामिश्र बदल लताबाईंनी आपल्या गायकीतून सर्वांगाने खुलवले आहे. इथे संगीतकार आणि गायिका याचे अचूक तादात्म्य दिसते. संगीतकाराला काय अपेक्षित आहे याची नेमकी जाणीव ठेऊन आणि तरीही आपल्या गायकीचे स्वत्व कायम ठेऊन कलाकृती सादर करणे , आपण समजतो इतके सहज सोपे नाही. परकायाप्रवेश म्हणतात तो असा अचानक रसिकाला उमजतो. शेवटचा अंतरा मात्र पहिल्यापासून वरच्या सुरांत घेतलेला आहे परंतु वरच्या सुरांत जाणे म्हणजे गायकी दाखवणे नव्हे. कवितेतील सात्विक भाव तसाच कायम ठेवत गाण्यात रंगत आणली आहे. गाणे द्रुत लयीत आहे पण ताल कुठेही स्वरांवर कुरघोडी करीत नाही. द्रुत लयीत हा धोका कायम असतो. स्वरचना दुगणित जात असताना तालाच्या मात्र चौगणीत वाजवून "कलाकारी" प्रगट करायचा हव्यास भल्याभल्या कलाकारांना टाळता येत नाही परंतु आपण जी कलाकृती सादर करीत आहोत त्याचे प्रयोजन नेमकेपणाने समजून घेऊन त्याच्या संस्कृतीशी नाळ जुळवित कलाकृती अंतिम टप्प्यापर्यंत एक विशिष्ट दर्जा राखून सिद्ध करणे हे तर गायक/गायिकेचे मूळ कर्तव्य. अशावेळी गाण्याचे तिन्ही घटक एकजीव होतात आणि रसिकांना पराकोटीचा आनंद देतात. 


प्रभू तेरो नाम , जो ध्याये फल पाए 
सुख लाए तेरो नाम 
तेरी दया हो जाए तो दाता 
जीवन धन मिल जाए 

तू दानी तू अंतर्यामी 
तेरी कृपा हो जाए तो स्वामी 
हर बिगडी बन जाए, जीवन धन मिल जाए 

बस जाए मोरा सुना अंगना 
खिल जाए मुरझाए कंगना 
जीवन में रस आए, जीवन धन मिल जाए 



Saturday 16 May 2020

मनस्वी यमन

मराठी चित्रपट "कामापुरता मामा" मध्ये "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे यमन राग आनंदाने निथळत असतो, याची ग्वाही देणारे आहे. नुकताच प्रणयाचा स्वीकार  झालेला आहे आणि नव्या जीवनाची स्वप्ने नायिकेच्या मनात असतत. याचा पार्श्वभूमीवर हे गाणे आहे. संगीतकार यशवंत देवांची चाल आहे आणि गीत रचना देखील त्यांचीच आहे. रूढार्थाने यशवंत देव हे कवी नाहीत परंतु त्यांनी प्रसंगोत्पात रचना लिहिल्या आहेत. लिहिताना, आपण "कवी" नसून केवळ काही गाण्यांच्या बाबतीत रचना करीत आहोत,याचे भान नेहमी आढळते. परिणामी शब्दरचना सहज, सोपी आणि गेयता प्रमुख असते.  

"जीवनात ही घडी अशीच राहू दे,
प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे."


त्यांनीच एकेठिकाणी म्हटले आहे, "चाल ही शब्दातच दडलेली असते. संगीतकार फक्त ती चाल शोधून काढतो". अर्थात देवांनी काही प्रसंगी चालीवर देखील शब्दरचना केल्या आहेत पण तरीही तो केवळ अपवाद मानावा. गाणे अतिशय द्रुत लयीत आहे, पण तरीही शब्दोच्चार (अर्थात लताबाईंचे) आणि त्याची सुरांबरोबर घातलेली सांगड विलक्षण सुंदर आहे. एक गंमत आहे. पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी जो वाद्यमेळ आहे, त्यातील व्हायोलीनचे सूर किंचित "पुरिया धनाश्री" रागाची छटा दाखवतात!! चाल यमन रागावर आणि त्यात पुरिया धनाश्री रागाची छटा!! काय बिघडले? गाण्याच्या चालीत तर कुठेही विक्षेप आलेला नाही. संगीतकार म्हणून यशवंत देवांची ही खुबी खरोखरच अप्रतिम आहे.  

मराठी माणसाच्या भावजीवनात माडगुळकरांच्या गीत रामायणाचे स्थान अढळ आहे. आज इतकी वर्षे उलटून गेली तरी या गाण्यांची मोहिनी काही उतरलेली नाही. गेयबद्ध रचना कशी करावी याचा आदीनमुना माडगूळकरांनी पेश केला आहे. अर्थात, अशा कवितांना तितकीच तोलामोलाची सुरांची साथ सधीर फडक्यांनी दिली असल्याने, यातील सगळीच गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. ""दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा" हे गाणे तर चिरंजीवित्व लाभलेले गाणे. यमन रागाचे सूर या गाण्यात ओतप्रोत भरलेले आहेत. मुळात, गाण्याची शब्दरचना(च) इतकी अप्रतिम आहे की अशा कवितेला चाल देखील तितकीच सुमधुर लागणार. आयुष्याचा "अर्क" म्हणून गणले जावे, अशा ताकदीची शब्दरचना आहे. 
"दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा."


 गाणे लांबीला बरेच मोठे आहेत आणि हे ध्यानात घेऊन, सुधीर फडक्यांनी चाल बांधताना आणि गायन करताना, त्यात निरनिराळे "खटके" घेतले आहेत, प्रसंगी चाल तार स्वरांत नेउन ठेवली आहे. अर्थात तिथे देखील संगीतकाराने, शब्दांचे औचित्य सांभाळून गायन केले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, 
"दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, 
 एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ" 
अगदी सोप्या पद्धतीने आशय व्यक्त केला आहे पण, गायन जर का नीट ऐकले तर चालीतील फरक कळून घेता येतो. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, फडके गाताना, शब्दांबाबत फार विचक्षण दृष्टी ठेवतात. "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा", या ओळीतील "दोष" हा शब्द किती अचूक पद्धतीने उच्चारला आहे, हे अभ्यासण्यासारखे आहे. सूर आणि लयीचा सगळा बिकट बोजा सांभाळून, शब्दांबाबत सजग भान ठेवणे, हे सहज जमण्यासारखे नव्हे. 
सुप्रसिद्ध कवी बा.भ.बोरकरांची "दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती." ही कविता आजही, त्यांच्या लोकप्रियतेची निदर्शक अशी कविता आहे. आजही कवी बोरकर, बहुतांशी याच कवितेच्या संदर्भात ओळखले जातात. या कवितेचे गाण्यात रुपांतर केले आहे, संगीतकार वसंत प्रभू यांनी, "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटाच्या निमित्ताने. कविता अतिशय भावगर्भशील आहे जीवनाला यज्ञाची उपमा देण्याची कल्पकता आहे तसेच कवितेच्या शेवटी, "मध्यरात्री नभघुमटा खाली, शांतीशिरी तम चवऱ्या ढाळी; त्यक्त बहिष्कृत मी त्या काळी, एकांती डोळे भरती" सारख्या अजरामर ओळींनी करून, ही कविता सामान्य माणसाच्या भावजीवनाचा भाग बनून गेली. 


तशी कविता सरळ, सोपी आहे आणि त्याच प्रकाराने, वसंत प्रभूंनी गाणे तयार करताना, चालीची निर्मिती केली आहे. कवितेतील काही ठराविक कडवी घेतली आहेत परंतु चित्रपटातील प्रसंग उठावदार करण्याच्या दृष्टीने सुयोग्य आहेत. सरळसोट यमन राग या गाण्यात दिसतो. चालीत कुठेही औचित्यभग होणार नाही आणि आशयाची अभिवृद्धी सतत होत राहील, याची काळजी घेतली आहे. अर्थात, आशा भोसले यांचे परिणामकारक गायन देखील तितकेच महत्वाचे आहे.  

पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी "भोळी भाबडी" चित्रपटात यमन रागावर आधारित सुंदर अभंग गायलेला आहे - "टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग". अभंग, माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला आहे आणि त्याला तितकीच समर्पक चाल, संगीतकार राम कदम यांची आहे. संगीतकाराने, या दोन दिग्गज गायकांची गायकी समोर ठेऊन, चालीची निर्मिती केली आहे. स्वरांवर ताबा ठेवण्याची वसंतरावांची शैली तर घुमारेदार, गोलाईयुक्त गायनाची भीमसेन जोशीची शैली, दोन्ही प्रकारच्या गायकीचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला ऐकायला मिळते. यमन सारखा सर्वसमावेशक राग हाताशी असल्याने, चालीत "गायकी" अंग अंतर्भूत होणे क्रमप्राप्त(च) आहे.  
"टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग;
देवाजीच्या  दारी आज रंगला अभंग." 


भीमसेन जोशींचे अभंग गायनाशी कायमचे नाव निगडीत होण्यापूर्वीची ही रचना आहे परंतु गाणे ऐकताना पंडितजींच्या आवाक्याची आणि पुढील वाटचालीची कल्पना करता येते. तसे बघितले तर या गाण्यात वसंतरावांपेक्षा भीमसेनी गायनाचा प्रभाव अधिक आहे आणि त्यांना गायला बराच अवसर मिळालेला आहे. नवल असे वाटते, इतकी समृद्ध रचना काळाच्या ओघात मागे कशी पडली? 
कविवर्य भा.रा.तांब्यांनी आयुष्यात असंख्य गीतसदृश रचना केल्या. किंबहुना, त्यांच्या कविता वाचताना, आपल्या मनात आपोआप लयबद्ध चालीचा आराखडा तयार होतो. कवितेच्या प्रत्येक ओळीत गेयता सामावली गेली आहे. मुळात त्याकाळच्या इंदोरच्या सरंजामी राजवटीचा गाढा परिणाम त्यांच्या कवितेवर पडलेला दिसतो. 
"तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वाचन तुला;
आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला."


या कवितेत देखील याच वृत्तीचा प्रभाव दिसतो. काही ठिकाणी संस्कृत प्रचुर शब्द वाचायला मिळतात परंतु त्यामुळे कविता अधिक "श्रीमंत" होते, ही बाब नाकारणे अवघड आहे. संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी, या कवितेतील "राजस" भाव ओळखून, नेमका यमन राग(च) निवडला. आपण मागील लेखात बघितले त्याप्रमाणे, यमन रागच समय, प्राचीन ग्रंथात "सांजसमय" दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर, या गाण्याच्या सुरवातीला संतूर वाद्यातून यमन रागाची धून छेडलेली आहे आणि पुढील रचनेची सूचना मिळते. चाल गायकी अंगाची आहे. 
किंबहुना हृदयनाथ मंगेशकरांच्या बहुतेक रचना या गायकी थाटाच्याच असतात आणि त्यामुळे गायला अवघड होतात. लताबाईंनी चालीतील अश्रुत गोडवा ओळखून गायनाची शैली ठेवली आहे आणि त्यामुळे गाणे कमालीचे रमणीय होते. चालीचा तोंडावळा खरेतर रागदारी चीजेकडे वळतो पण तसे असून देखील रागातील "लालित्य" शोधून, संगीतकाराने चालीचे खरोखर सोने केले आहे.

कळीदार कपूरी पान

आपल्या महाराष्ट्रात लोकसंगीताला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत धर्म संगीत, भक्ती संगीत, प्रादेशिक संगीत तसेच लावणी इत्यादी संगीत प्रकार येतात. तसे बघितले तर लावणी ही पेशवेकाळापासून सुरु झाली होती. मध्यंतरी या कलेला उतरती कळा प्राप्त झाली होती . अर्थात आजही फार मोठी उर्जितावस्था आलेली नाही म्हणा. लावणीच्या सादरीकरणात २ प्रकार ढोबळ मानाने बघायला मिळतात. १) बारीवरील लावणी, २) बैठकीची लावणी. आजचे आपले गाणे हे बैठकीची लावणी म्हणूनच ऐकायचे आहे. बैठकीची लावणी ही बरीचशी आदबशीर, सुसंस्कृत आणि ठराविक प्रकारच्या गायनाची मागणी करणारी आहे, म्हणजे कुणीही गायिका उठली आणि बैठकीची लावणी गायला बसली असे संभवत नाही. गळ्यावर  संगीताची पद्धतशीर तालीम घ्यावी लागते तसेच गायन संस्कार घडवून घ्यावे लागतात. उपशास्त्रीय संगीतातील महत्वाचा आविष्कार म्हणून बैठकीच्या लावणीकडे बघणे अधिक श्रेयस्कर ठरेल. डॉ.अशोक रानड्यांनी तर बैठकीच्या लावणीची तुलना थेटपणे उत्तर भारताच्या ठुमरी बरोबर केली आहे. तद्नुषंगाने विचार करायचा झाल्यास, जसे ठुमरी गायन सादर करण्यासाठी गायक/गायिकेला ठुमरीचा अंदाज, लहेजा तसेच शब्दांना प्राधान्य देऊन गायन करणे जरुरीचे असते त्याप्रमाणेच बैठकीच्या लावणीबाबत हे निकष पाळावेच लागतात. प्रणयी आवाहन खरे पण त्यात कुठेही उथळपणा किंवा बटबटीतपणा नावाला देखील दिसता कामा नये आणि हा दंडक पाळणे जरुरीचे असते. 
कवी राजा बढे यांची शब्दकळा आहे. थोडे बारकाईने वाचले तर राजा बढे हे जरी कवी असले तरी त्यांची प्रसिद्धी खासकरून गीतकार अशीच झाली आहे. त्यांच्या बहुसंख्य रचना संगीतबद्ध झाल्यामुळे बहुदा ही प्रसिद्धी झाली असावी. आता लावणी म्हटली त्यात श्रुंगाराचे आवाहन आलेच परंतु या कवितेतील शब्द वाचताना कुठेही शब्द आपला दर्जा घसरू देत नाहीत आणि कवी म्हणून राजा बढे यांचे कौतुक करायलाच हवे. आता माडीवर मैफिल रंगायची म्हणजे प्रथेप्रमाणे विड्याचे आदानप्रदान होणे क्रमप्राप्तच ठरते. मुखड्यातच विड्याचे वर्णन आणि आलेल्या रसिकाला विडा घेण्याचे आमंत्रण - आमंत्रण हे आर्जवी असावेच लागते जेणेकरून त्या रसिकाची मती गुंग व्हावी. आपण देत असलेला विडा कसा आहे याचे वर्णन झाल्यावर तो विडा रसिकाला देण्याची कृती "घ्या हो मनरमणा" याच शब्दातून व्यक्त व्हायला हवी होती. आदबशीर आर्जव असे झाल्यावर रसिक ती माडी कशाला सोडून जाईल? दुसऱ्या अंतऱ्याची शब्दरचना खास वाचण्यासारखी आहे. लावणी सादर होत आहे म्हणजे तिथे नृत्य तर यायलाच हवे. नृत्यांगनेचा कमरेचा (नोकदार) झोक, काजळी नजर आणि खिडकीतून चमचमणारी चांदणी (असा बेहोष करणारा माहोल) तसेच लाल ओठांचे वर्णन करताना - "छेडिता लालडी मुलाम"!! खरतर मराठीतील नजाकतदार ठुमरी असे या कवितेचे वर्णन करता येईल. 
अशी ढंगदार कविता हाताशी आल्यावर संगीतकार श्रीनिवास खळ्यांनी तशीच आर्जवी आणि शृंगारिक चाल तयार केली. वास्तविक खळेकाका हे शांत, संथ स्वरांचे रचनाकार म्हणून ख्यातकीर्त तरीही ही चाल बांधताना पठ्ठे बापूरावांच्या खानदानी परंपरेशी  जुळवणारी रचना निर्माण केली. यमन रागाशी थोडे साधर्म्य दाखवते पण लगेच रागाला बाजूला सारून चालीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते. खळेकाकांची चाल म्हणजे लयीचे अवघड बंध, हे ओघानेच येते. इथेही चाल सरळ आपल्यासमोर येत नाही. लावणीचा सगळा डौल चालीत उतरला आहे पण चाल आपले खानदान सोडत नाही. ढोलकी खणखणत आहे पण ताल चालीवर स्वार होत नसून स्वरांनी निर्माण केलेले जग अधिक खुलवून मांडतो. अर्थात खळेकाका चाल बांधताना कवीच्या शब्दांना आणि त्यातील अमूर्त अशा आशयाला अधिक खोलवर मांडतात. गाण्याची सुरवात करताना "कळीदार" आणि नंतर मुखड्याच्या उत्तरार्ध घेताना लय दुगणित घेतली आहे पण "घ्या हो मनरमणा" गाताना आर्जव अप्रतिमरीत्या व्यक्त झाले आहे आणि चालीची खुमारी आणखी वाढते. अंतरे कसे बांधले आहेत याचा स्वतंत्र अभ्यास करण्यासारखे आहे. एकतर अंतरे वेगळ्याच सुरांवर बांधले आहेत तरीही पुन्हा मुखड्यावर येताना लयीचा सगळा डौल चालीत उतरला आहे. 
गायिका सुलोचना चव्हाण म्हणजे लावणी खानदानाची महाराणी असेच वर्णन करावे लागेल. आवाजातली धार,ठसका आणि विशिष्ट शब्दांवर जोर देऊन गाण्याची लज्जत वाढवणारी शैली. या लावणीत देखील ही सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. खळेकाकांनी चालीत आणलेला ढंगदारपणा सुलोचनाबाईंनी अतिशय खुमासदारपणे गायला आहे. ढोलकीच्या मात्रेगणिक येणारी अर्धतान किंवा हरकत ही मुद्दामून अभ्यास करावी अशा योग्यतेची आहे. आपण बैठकीची लावणी गात आहोत तेंव्हा स्वरांत छचोरपणा जरादेखील न येता माडीवर आलेल्या रसिकाला खिळवून ठेवण्याचा सामर्थ्य त्यांनी आपल्या गायनातून दाखवून दिले आहे. एकाबाजूने आवाहन करायचे पण दुसऱ्या बाजूने लाचारीपासून दूर राहून रसिकाला खिळवून ठेवायचे,  अशी दुहेरी कसरत इथे सुलोचनाबाईंनी आपल्या गायनाद्वारे दाखवून लावणी गायनाचा आदीनमुना पेश केला आहे.  


कळीदार कपूरी  पान, कोवळं छान, केशरी चुना 
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा, घ्या हो मनरमणा 

बारीक सुपारी निमचिकनी घालून 
जायपत्री वेलची लवंग वरि दाबून 
बांधले तसे या कुडीत पंचप्राण 
घ्या रंगत करी मर्दूनी चतुर्दशगुणी संख्या सजणा 

कंबरेचा झुलता झोक,नूर बिनधोक उरी मावेना 
काजळी नजर छिनीमिनी चांदणी रैना 
छेडिता लालडी मुलाम, तुमची गुलाम झाले सजणा 
पायीं पैंजण छुन्नक चैना 


Saturday 9 May 2020

हाये जिया रोये

"आज अंधारी रात आहे, चंदेरी दरिया नसे 
तारांची बरसात आहे,विश्व सारे स्तब्ध आहे. 
कसल्या तरी धुंदीतला,ओठांवरी शब्दार्ध आहे,
दूरचाही दीप नाही,सारीकडे काळोख आहे 
अंतरंगी त्यातही पण, ओळखीचा प्रकाश आहे. 
आज अंधारी रात आहे. 
कवी अनिल यांच्या "सांगाती" या कवितासंग्रहात ही कविता. वास्तविक या कवीला नेहमी "प्रेमकवी" अशा लेबलात आपण अडकवून टाकले आहे - आपल्या समाजाला हा छंद जडला आहे आणि त्याशिवाय कसलीच पूर्ती होत नाही पण त्यामुळे बहुतेकवेळा एकांगी अन्याय केला जातो हे देखील तितकेच खरे आहे. खरतर अनिलांनी काव्याच्या बाबतीत अनेक प्रयोग केले. गद्यप्राय रचना आणि शब्द यांचा वापर बरेचवेळा दिसतो. पण कित्येकदा "काव्यमय" शब्द आणि रचना आढळतात,जसे वरील कवितेच्या ओळींतून दिसते. मुक्तछंदाने बद्ध-छंदाची चौकट मोडली खरे. त्यामुळे केवळ ओळीच लांबलचक झाल्या नसून भाषा देखील नवनवीन तऱ्हेने वळवण्यास आरंभ झाला. छंदोबद्ध रचनांतील कर्मठपणा संपला आणि या मार्गावरील कवी अनिल हे एक ठळक नाव घ्यावे लागेल. 
"आज अंधारी रात आहे, चंदेरी दरिया नसे 
तारांची बरसात आहे,विश्व सारे स्तब्ध आहे."
या ओळींच्या संदर्भात मी आजच्या "हाये जिया रोये" या गाण्यातील कवितेचा विचार केला. कवी प्रेम धवन यांनी एकेकाळी आपल्या शब्दरचनांनी हिंदी चित्रपट सृष्टी बरीच गाजवली होती तरीही कवी म्हणून त्यांचे नाव साहिर,शकील किंवा मजरुह यांच्या पंक्तीत घेता येईल का? याचा, या कवितेच्या संदर्भात विचार केला तर प्रणयी तडफड या हिंदी चित्रपटातील सरधोपट भावनेच्या भोवती गाण्याची निर्मिती झाली आहे. याच नजरेतून बघायला गेल्यास, कवितेतील प्रतिमायोजन पारंपरिक आहे. चंद्र,तारे यांच्या साक्षीने प्रणयभंग होणे ही कल्पना तशी जुनीच आहे किंवा त्यांच्या साक्षीने प्रकारची आळवणी करणे यामध्ये काहीही नावीन्य नाही. खरतर चित्रपट गीतांच्या संदर्भात एकुणातच विचार केला तर प्रसंग एकसाची असतात तरीही त्यातून नव्या प्रतिमा, शब्दांची नव्याने जडण-घडण करणे आणि त्यातून नवी अनुभूती देणे या शक्यता धुंडाळता येतात आणि तशा रचना काही कवींनी केल्या आहेत देखील. अर्थात सातत्य राखण्याच्या प्रयत्नात सपक शब्दरचना होणे साहजिक ठरते. प्रेम धवन हे चित्रपट सृष्टीत १९४६ साली आणि सतत कार्यमग्न होते. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे प्रस्तुत कवितेत काही खास दर्जेदार वाचायला मिळत नाही. अर्थात ललित संगीताच्या आकृतिबंधाला अनुसरून कवितेत "गेयता" दिसते तसेच शब्द वाचताना एक लय सापडते. 

संगीतकार हंसराज बहेल यांची हिंदी चित्रपटातील कारकीर्द तशी फार मोठी होती असे नक्कीच नाही परंतु जे चित्रपट केले त्यात त्यांनी काही दर्जेदार स्वररचना बांधून आपले स्थान निर्माण केले, हे निश्चित. शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने बहुतेक रचना रागावर आधारित आहेत परंतु रागाचे काही स्वर आधाराला घ्यायचे आणि त्यातून गाण्याची चाल निर्माण करायची, अशा मतांचे जे काही रचनाकार होते त्यात हंसराज बहेल यांचे नाव घ्यावेच लागेल. याचा परिणाम असा झाला, मुखडा रागाची छाया दर्शवतो परंतु पुढील विस्तारीकरण वेगळ्याच अंदाजात समोर येते. एकंदरीने हा संगीतकार गंभीर संगीताकडे बराचसा झुकला होता असे विधान नक्की करता येते. आणखी एक विशेष मांडता येईल - लताबाईंच्या आवाजामुळे उपलब्ध झालेल्या तारस्वर मर्यादांच्या लोभात पडलेल्या रचनाकाराचे आणखी एक उदाहरण म्हणून या संगीतकाराचे नाव घेता येईल. तसेच थोडे तांत्रिक मांडायचे झाल्यास, अनेक सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक कारणांमुळे भारतीय रचनाकारांचे भारतीय कलासंगीतपरंपरांशी नाते काय होते, ते तपासावे लागते. बहुतेकवेळा रचनाकारास भारतीय राग - ताल - संगीतप्रकर इत्यादींचे ज्ञान किती आणि त्याने जाणता वा अजाणता यांचा वापर केला त्याची गुणवत्ता काय, याची चर्चा कमीजास्त प्रमाणात तपशिलात जाऊन करणे हे कर्तव्य ठरते. या दृष्टीने आजची रचना फार महत्वाची ठरते. वास्तविक कारकीर्द तशी छोटी तरीही त्या कारकिर्दीत त्यांनी अशा प्रकारची अतिशय महत्वपूर्ण रचना सादर केली. या रचनेची बांधणी कशी केली हे बघणे वेधक ठरेल. यात त्रिताल हा ताल असून आरंभी आवाहन केलेला दरबारी कानडा हा राग आहे, मजणजे मुखडा या रागाच्या स्वरांशी संवादी आहे. परंतु लवकरच संगीतकार उघड उघड भासणाऱ्या शास्त्रीय बंधनातून रचनेस मुक्त करून तिला गीताच्या प्रांगणात आणून ठेवतो. परंत थोडे तांत्रिक लिहायचे झाल्यास, स्थायी-अंतरा या बांधणी सूत्राचा हा संगीतकार स्पष्टपणे त्याग करतो. याऐवजी पाठोपाठ येणारी कडवी हे रचनातत्व कार्यकारी होते. आणि मग दरबारी रागाचे ढोबळ कारुण्य बाजूला सारून काफी या रागिणीची संदिग्ध आणि सुखद नरमाई समोर  आणली जाते. अंतऱ्यांची चाल बारकाईने ऐकल्यास काफी रागाचे स्वर मिळतात. एकापाठोपाठ येणाऱ्या चरणांत ही भावस्थिती अनेक गुंतागुंतीच्या सांगीत वाक्यांशातून विणली जाते. एकदा मुखडा बांधल्यावर, पुढे वेगवेगळ्या अंदाजात अंतरे बांधणे हे एक सर्जनशीलतेचे महत्वाचे अंग मानावेच लागेल. 
आता सर्वात महत्वाचा भाग. लताबाईंची गायन. चाल "तर अति गुंतागुंतीची आहे, हे वर म्हटलेच आहे. अंतरा सुरु करताना मध्य सप्तकातील सूर ऐकत असताना क्षणात चाल अति तार सप्तकात जाते!! "तुमने तो देखा होगा, ऐ चांद तारों" ही पहिल्या अंतऱ्यातील पहाच ओळ ऐकावी. "तुमने तो देखा होगा" ओळीचं पूर्वार्ध शुद्ध सप्तकात अवगाहन करतो पण पुढील क्षणात "ऐ चांद तारों " हा उत्तरार्ध अति तार स्वरांत जातो. लगेच त्याच लयीच्या अंगाने पुढील ओळ "कित गाये मोरे सैंय्या"  मूळ पहिल्या ओळीशी संवादित्व राखतात आणि त्यापुढील "सारा जग सोये" इथे मुखड्याच्या स्वरांशी नाते प्रस्थापित होते. हे सांगीतिक वळण कमालीचे बिकट आहे. दुसरा अंतरा याच स्वरान्तराने बांधलेला आहे. लताबाईंनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत वरच्या स्वरांतील गाणी असंख्य गायली आहेत परंतु इतक्या तार स्वरात पोहोचून पुढील स्वर खालच्या स्वरांत घ्यायचा,अशा पद्धतीची गाणी फार विरळा गायली आहेत. आता प्रश्न इतकाच उभा राहतो - लताबाईना इतक्या उंच स्वरांत गायला लावणे अपरिहार्य होते का? 
हाये जिया रोये रोये, पिया नाही आये 
इक मैं ही जागू, सारा जग सोये 
हाये जिया रोये

तुमने तो देखा होगा, ऐ चांद तारों 
कित गाये मोरे सैंय्या, तुम ही पुकारो 
जाओ उनको इतना बताओ 
 हाये जिया रोये

कब तक जिये कोई, बिरहा की मारी 
चंदा तेरी चाँदनी मोहें लागी अंधियारी 
आओ सैंय्या अब आ जाओ 
हाये जिया रोये



Monday 4 May 2020

ये हवा ये रात ये चाँदनी

लिलीची फुले 
   तिने एकदा 
     चुंबिता, डोळां 
       पाणी मी पाहिले ....!
लिलीची फुले
    आता कधीही 
       पाहता, डोळां 
         पाणी हे साकळे ....!
प्रसिद्ध कवी पु.शि.रेग्यांची अतिशय छोटेखानी कविता तरी एका समृद्ध अनुभवाला सामोरी जाणारी कविता. रेग्यांच्या कविता बहुतांशी "भावकविता" असतात आणि वरील कविता हे एक समर्पक उदाहरण ठरते. मोजक्या शब्दांतून अर्थपूर्ण भावाशय मांडायची अप्रतिम शैली म्हणून रेग्यांच्या कवितेची समर्थ ओळख करून देता येईल. साधी लिलीची फुले परंतु त्यातून नायिकेच्या २ स्वतंत्र भावनांची ओळख करून दिली जाते. शब्दातील लय अचूकपणे सांभाळून एकदम कलाटणी दिली जाते. रेग्यांच्या कविता वाचताना मला काहीवेळा एका इंग्रजी वाक्याची फार आठवण येते - Witten by Maurice Barres "And it is I alone whom I have for the feminine perfume of my soul." आजचे आपले जे गाणे आहे - "ये हवा ये रात ये चाँदनी" या गाण्यातील कवितेशी काहीसा मिळत जुळता असा आशय वरील कवितेत मला आढळला. प्रणयी थाट तर खराच परंतु प्रणयाच्या जोडीने दु:खाची आर्त,व्याकुळ करणारी  जाणीव दर्शविणे, ज्यायोगे कवितेतील आशय मनात संपृक्तपणे रिक्त होतो. 
"संगदिल" चित्रपटातील गाणी प्रसिद्ध शायर  राजिंदर कृष्णन यांनी लिहिली आहेत. हिंदी चित्रपटात भरपूर गाणी लिहूनही ज्या कवींनी आपला दर्जा एका ठराविक पातळीच्या खाली घसरू दिला नाही, अशा काही मोजक्या कवींच्या यादीत या कवीचे नाव नक्की येते. कुठल्याही आविष्कारात सातत्य आले म्हणजे दर्जाशी प्रतारणा होणे हे साहजिक असते. कुणीही कलाकार कधीही सातत्याने वर्षानुवर्षे एकाच दर्जाची निर्मिती कधीही करू शकत नाही, हे निव्वळ अशक्यप्राय असते आणि मग अशा वेळी आपल्या हातात एकच मुद्दा असतो आणि तो म्हणजे त्या कलाकाराने आपल्या कारकिर्दीत "उच्च शिखर" किती वेळा गाठले आहे, याची तपासणी करणे. या मुद्द्यावर विचार केला तर राजिंदर कृष्णन यांनी निश्चितच प्रशंसनीय कामगिरी केली आहे. गझलच्या वजनात कविता लिहिली आहे परंतु चित्रपटासारख्या माध्यमात जिपडद्यावरील पात्राच्या भावना,हेच कविता लिहिण्याचे मूळ कारण असते तिथे खऱ्या अर्थाने गझल वृत्तात कविता लिहिणे फार अवघड असते. किंबहुना जर का चित्रपटात "मुशायरा" सारखी मैफिल असेल तर तिथे अचूक गझल वृत्त मांडता येते. परंतु असे प्रसंग एकुणातच विरळा असतात. तेंव्हा ही कविता म्हणजे "नझम" वृत्तातील कविता ठरते. कविता बरीषाशी उर्दू भाषिक आहे पण तरीही अर्थ आकळायला फारसा त्रास होत नाही. कविता वाचतानाच त्यातील लय आणि गेयता लक्षात येते. चित्रपट गीतांसाठी हे मुद्दे फार महत्वाचे असतात. एका बाजूने एक आशय आणि दुसऱ्या बाजूने त्या आशयाशी समांतर पण काहीशा तिरोभावाने शब्दांची रचना केली आहे. "मुझे क्यू ना हो तेरी आरझू,तेरी जुस्तजू में बहार है" ही ओळ जरा बारकाईने वाचली तर माझा मुद्दा लक्षात यावा. चित्रपट गीतात काव्य कसे मिसळता येते (काही जणांच्या मते याची काही गरज नसते पण ते असो....) या साठी प्रस्तुत कविता हे सुंदर उदाहरण आहे. 
संगीतकार सज्जाद हुसेन यांनी या गीताची तर्ज बांधली आहे. मळलेली पायवाट सोडून वेगळ्याच लयबंधांनी गाणे सजवण्याचे अलौकिक कौशल्य बाळगून असलेला संगीतकार. चाल बांधताना गायकी अंग तर ठेवायचेच परंतु त्यात हरकती ठेवताना शब्दांगणिक "अर्धतान"या सांगीत अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करून घ्यायचा. गाण्याच्या चालीत भैरवी रागाची छाया तरळत आहे. गीताचा जरी प्रणयी थाटाचे असले तरी त्यात विरही छटा ही आहेच. भैरवी  रागिणीचे अंगभूत सौंदर्य लक्षात घेऊन, स्वररचना केली आहे. खरे तर भैरवी राग "मुखडा" चालू असतानाच बाजूला सारला जातो पण राग बाजूला सारत आहोत असा अभिनिवेश कुठेही आढळत नाही. या संगीतकाराच्या चाली गायला अवघड असतात कारण शब्दागणिक लयबंधांचे प्रयोग. "ये हवा ये रात ये चाँदनी, तेरी एक अदा पे निसार है" ही ओळ आपण ऐकायला घेतली तर ओळीतील पहिला भाग दरबारी रागावर आहे आणि सरळ, सुश्राव्य आहे परंतु ओळीचा उत्तरार्ध " तेरी एक अदा पे निसार है" गाताना "अदा" या शब्दानंतर अति अवघड हरकत घेतली आणि चालीचे स्वरूप कठीण करून टाकले आहे. लयीच्या अंगाने ऐकायला घेतले तर माझे विधान पटू शकेल. 
पहिला अंतरा सुरु होतो तेंव्हा देखील हीच पद्धत अवलंबली आहे. सुरवात किंचित वरच्या सुरावटीत केली आहे (मुखड्यापेक्षा वेगळी) पण "तेरी एक नजर में हैं क्या असर" हा चरण गाताना ओळीचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध वेगळा बांधला आहे म्हणजे जी शैली मघाशी मुखड्याच्या पहिल्या ओळीशी घेतली आहे त्याच अंदाजात "तेरी एक नजर में हैं क्या असर ही ओळ गाताना गायली आहे. थोडे तांत्रिक भाषेत मांडायचे झाल्यास, गीतभाव पक्केपणाने नोंदवणाऱ्या पहिल्या चरणांचे दोन अर्ध अनुक्रमे सा या मूळ स्वरावर आणि मी या त्याच्याशी संवाद साधणाऱ्या पण सप्तकाच्या मध्यावर असलेल्या स्थानावरच्या स्वरावर संपतात. त्यामुळे ऐकताना एक पूर्णता आणि एक अपूर्णता, या दोहोंची प्रतीती येते. खरतर पहिल्या मात्रेस फारसा उठाव न देणाऱ्या सात मात्रांचा रूपक ताल योजला आहे, हे एकूण गाण्याच्या प्रकृतीस साजेसेच आहे. 
गायक म्हणून तलत मेहमूद यांच्या गायनाची सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. चालीतील अवघडपणा गळ्यातून नेमकेपणाने दर्शवला आहे. तलत मेहमूद यांनी आपल्या गळ्याची जातकुळी नेमकेपणाने ओळखली होती आणि आपल्या गळ्याला कुठल्या प्रकाराची गाणी साजून दिसतील याचा त्यांच्या मनात पक्केपणाने विचार ठसला होता. गायक म्हणून विचार केल्यास, आवाज अतिशय सुरेल, शक्यतो मंद्र किंवा शुद्ध सप्तकात गायचे - तार सप्तकात जरी काहीवेळा गायन केले तरी तसे गायन करणे हा त्यांचा पिंड नव्हता हेच खरे. तारता पल्ला तसा मर्यादित तसेच आवाजाची गाज देखील अनाक्रोशी, आणि संयत. किंबहुना संयत गायन हेच तलत मेहमूद यांच्या गायनाचे खरे वैशिष्ट्य. प्रस्तुत गीत गायन या विधानाला पूरक उदाहरण म्हणून सांगता येते. अगदी स्पष्ट सांगायचे झाल्यास, बेगम अख्तर यांनी रूढ केलेल्या गझल गायकीच्या आसपास जर कुणी गेले असेल तर तलत मेहमूद यांचेच नाव घ्यावे लागेल. गळ्यातील कंप (कारकिर्दीच्या सुरवातीला याच कंपावर टीका झाली होती परंतु संगीतकार अनिल बिस्वास यांनी तेच वैशिष्ट्य कायम राखून तलत मेहमूद यांच्या आत्मविश्वास वाढवला) जाणीवपूर्वक वापरून काव्यातील विरही, व्याकुळ आशयाची व्याप्ती वाढवण्याचे कौशल्य निव्वळ अजोड असे होते. परंतु आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडतो.  आपण जी कुठली गीते गायची आहेत, त्याच्या संहितेबाबत हा गायक विलक्षण चोखंदळ होता. याबाबत आणखी असे विधान करता येईल, लखनौच्या वारसा म्हटल्यावर दोन गोष्टी स्वाभाविक वाटतात - उर्दूचे स्वच्छ, शुद्ध उच्चारण आणि कोणत्या रचनेस गाण्याच्या योग्यतेचे काव्य समजायचे याबाबतची उच्च अभिरुची. अशा विचारसरणीला हिंदीच कशाला एकूणच कुठल्याही चित्रपटसृष्टीत संधी फार मर्यादित असतात. याचाच अनिवार्य परिणाम या गायकाच्या कारकिर्दीवर झाला. 

ये हवा ये रात ये चाँदनी, तेरी एक अदा पे निसार है 
मुझे क्यू ना हो तेरी आरझू,तेरी जुस्तजू में बहार है 

तुझे क्या खबर है ओ बेखबर, तेरी एक नजर में हैं क्या असर 
जो गझब में आए तो कहर है, जो हो मेहरबां तो करार है 

तेरी बात, बात हैं दिलनशी, कोई तुझसे बढ के नहीं हसीन, 
है कली कली पे जो मस्तिया, तेरी आँख ये खुमार है