Saturday 28 November 2015

अलौकिक अडाणा



असेच काही द्यावे….  घ्यावे…. 
         दिला एकदा ताजा मरवा;
देता घेता त्यात मिसळला 
         गंध मनातील त्याहून हिरवा. 
कवियत्री इंदिरा संत यांच्या "मरवा" कवितेतील या ओळी, "अडाणा" राग ऐकताना, बरेचवेळा माझ्या मनात येतात. वास्तविक पाहता, दरबारी रागाच्या कुटुंबातील, हा महत्वाचा सदस्य पण जातकुळी मात्र फार वेगळी आहे. एकाच कुटुंबातील भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्वे असावीत आणि तरीही रक्ताचे नाते असावे, त्यातला हा प्रकार आहे. दरबारी गंभीरतेकडे झुकणारा तर अडाणा थोडा अवखळता दर्शविणारा!! राग अडाणा शक्यतो मध्य आणि तार सप्तकात रमत असल्याने, रागातील भावना देखील काहीशा तीव्र असतात. 
रागाच्या तांत्रिक भागाकडे वळल्यास, आरोही सप्तकात "गंधार" स्वराला प्रवेश नाही तर अवरोही सप्तक, सगळ्या सुरांना सामावून घेते. त्यामुळे रागाची जाती ही "षाडव/संपूर्ण" अशी होते. त्यापुढे बघायचे झाल्यास, "गंधार","धैवत"आणि "रिषभ" स्वर कोमल आहेत आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध. असे असले तरी "कोमल निषाद" स्वर या रागात फार महत्वाची भूमिका बजावतो. अर्थात, नेहमीप्रमाणे, "षडज-पंचम" वादी - संवादी असल्याने, कोमल निषाद स्वराचे नाते, या स्वरांबरोबर जुळून येते. रागच समय, रात्रीचा दुसरा प्रहर दिला असल्याने, आपसूक कोमल स्वरांना प्राधान्य मिळणे क्रमप्राप्त होते.   

आता आपण, या रागाची बंदिश ऐकायला घेऊ. "माता कालिका" ही अत्यंत सुप्रसिद्ध चीज म्हणजे, पंडित जसराज यांच्या गायनाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे, इतक्या जवळची आहे. ही बंदिश ऐकताना, आपल्याला रागदारी गायन, लालित्यपूर्ण पद्धतीने कसे मांडता येऊ शकते, याचा अप्रतिम अंदाज घेत येतो.  किंचित अनुनासिक स्वर, तिन्ही सप्तकात सहज विहार, तारता पल्ला अतिशय विस्तृत असल्याने, ताना, बोल ताना तसेच मुर्घ्नी स्वर, इत्यादी अलंकार सहजपणे गळ्यातून दृष्टीस पडतात. वास्तविक, नेमका मुर्घ्नी स्वर, ही फार कौशल्याची बाब मानली जाते पण, पंडितजी, अतिशय सहजपणे, हा अलंकार गळ्यातून साकार करतात. 


 प्रस्तुत रचनेत, या सगळ्या गुणांचा आढळ तर दिसतोच पण, त्यापेक्षा वेगळी बाब म्हणजे शब्दोच्चार. बंदिशीत स्पष्टपणे, काली मातेची पूजा आहे तेंव्हा स्वरांत समर्पण वृत्ती आढळणे, सहज शक्य आहे. भावनेच्या अंगाने सादरीकरण,हे पंडित जसराज यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. 

"ऐ दिल मुझे ऐसी जगह" हे "आरझू" चित्रपटातील,अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केलेले गाणे, म्हटले तर "अडाणा" रागावर आहे. याचे मुख्य कारण, गाण्याची सुरवात, "दरबारी" रागाच्या काठाने होते पण, अस्ताईच्या दुसऱ्या ओळीत आपल्याला "अडाणा" रागाची खूण सापडते. मी वरती म्हटल्याप्रमाणे, दरबारी आणि अडाणा, हे दोन राग एकाच कुटुंबातले पण, वेगळ्या स्वभावाचे. त्यामुळे एखादा सूर जरा वेगळ्या प्रकारे लागला की लगेच रागाची अदलाबदल होते आणि हेच भारतीय रागदारी संगीताचे फार मोठे वैशिष्ट्य मानावेच लागेल. केरवा तालात, ही रचना बांधली आहे. अनिल दा, आपली रचना कधी "आक्रोशी", "अनघड" स्वरुपाची करीत नाहीत परंतु रचना गाताना, त्यातील गायकी अंग आपल्याला दिसून येते. खरतर असे म्हणता येईल, "अनिल दा" म्हणजे हिंदी चित्रपट गीतातील एक असामान्य "स्कूल" होते आणि त्यांच्या रचनेचा प्रभाव, अगदी राहुल देव बर्मन पर्यंत अव्याहतपणे पडलेला होता. शास्त्रीय संगीताचा सांगोपांग व्यासंग आणि चित्रपटासाठी गाणे कसे बांधायचे, याची नेमकी जाण असलेला हा संगीतकार. तलत मेहमूद आणि मुकेश, या गायकांना प्रकाशात आणणारा संगीतकार, म्हणून या रचनाकाराची ओळख दीर्घकाळ स्मरणात राहील. 

लखनौ सारख्या संगीताने प्रभावित असलेल्या शहरात वावरल्याने, आवाजात खास "लखनवी तहजीब" बाळगून असलेला गायक म्हणजे तलत मेहमूद. तसे बघितले तर तलतच्या आवाजाला काही प्रमाणात मर्यादा होत्या, चित्रपटात अनेक प्रसंग असतात आणि त्यानुरूप गायन करणे, ही गायकाची गरज असते. तलतने आपल्या गळ्याची "जात" ओळखली होती आणि त्यानुरूप गाणी स्वीकारली. परिणाम असा झाला, संख्येच्या दृष्टीने, तलतची गाणी फारच तुरळक झाली.वरील गाणे जे आपण ऐकले, तोच या गायकाचा खरा पिंड!! लखनौच्या संपन्न, शिष्ट,सुसंस्कृत आणि संयमित वातावरणाचा हा अपरिहार्य परिणाम म्हणावा लागेल. थोडक्यात, बेगम अख्तर यांनी गझल गायनात जो आदर्श निर्माण केला, त्याच्या जवळपास फक्त तलत जाऊ शकतात. १९६० नंतर या गायकाची पीछेहाट झाली कारण, नंतरच्या संगीत शैलीत, सुरावट, संथ गती व नाजूक प्रक्षेपणास जागा नव्हती. आपण कुठली गीते गायची त्यांच्या संहितेबाबत ते चोखंदळ होते. अर्थात लखनौचा वारसा म्हटल्यावर, उर्दूचे स्वच्छ, शुद्ध उच्चारण आणि कोणत्या रचनेस गाण्याच्या योग्यतेचे काव्य समजायचे याबाबतची उच्च अभिरुची!! शक्यतो, मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात, गायनाची पातळी ठेवायची. गाताना, शायरीचे नितांत महत्व जाणून, गायकी दाखवायची तसेच ताना घेताना देखील कधीही आशयाच्या अभिव्यक्तीला धक्का पोहोचणार नाही, हीच वृत्ती ठेवायची. परिणाम असा झाला, गायनात, कधीही संपूर्ण सप्तक आवाक्यात घेतले आहे, असे ऐकायला मिळत नाही. अर्थात, हा मुद्दा सुगम संगीताच्या बाबतीत गैरलागू आहे.    

"मन मोहन मन मे हो तुम्ही" हे "कैसे कहू" चित्रपटातील असेच एक अतिशय सुश्राव्य चालीचे गाणे, या रागाच्या सावलीत वाढते. संगीतकार  एस.डी.बर्मन,याच्या चतुरस्त्र प्रतिभेचे आणखी अप्रतिम उदाहरण, म्हणून या गाण्याचा निर्देश करता येईल. गाण्याच्या सुरवातीच्या आलापीपासून, आपल्याला "अडाणा" रागाची ओळख करून घेता येते पण, हा संगीतकार, नेहमीप्रमाणे, रागाच्या आधार स्वरांना हाताशी घेतो आणि पुढील वाटचाल, स्वतंत्र करतो, जणू या संगीतकाराचा हा स्वभाव असावा, असेच वाटते. त्रिताल वापरलेला आहे आणि तो देखील सरळ, स्पष्ट वापरला आहे. रफी/सुमन कल्याणपूर/एस.डी. बातीश, या त्रयींनी हे गाणे गायले आहे. गाणे जरा बारकाईने ऐकले तर आपल्याला सहज समजून घेता येईल, या रागाचे जे वादी/संवादी स्वर आहेत, (षडज/पंचम) ते ज्या वजनाने, या रागात वावरतात, त्याच वजनाने, या रचनेत वावरत आहेत. "मन मोहन मन मे" ही ओळ ऐकताना(च) आपल्याला या रागाची ओळख होते. असे असून देखील, आपण, पुढील अंतरा ऐकला तर, रागाच्या सावलीतून ही रचना बाहेर पडते आणि आपले "स्वतंत्र" अस्तित्व प्रगट करते. अशा खेळात, हा संगीतकार फार वाकबगार होता.  


आवाजाचा पल्ला, भरीवपणा, समान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा, सुरेल आणि लहान स्वरांशांचे सफाईदार द्रुतगती गायन, हे गुण, रफी यांच्या बाबतीत मांडता येतील. सुरवातीच्या काळात, ढाल्या स्वरात आणि नंतर अवतरलेल्या नाटकी प्रत्ययाशिवाय गायलेली आढळतात. आवाज आणि गायनशैली या बाबतीतल्या, नव्या युगाच्या मागण्या त्यांनी विनासायास पूर्ण केल्या. आपल्या आवाजात "गोलाई" आहे, याची त्यांना यथार्थ जाणीव होती आणि प्रसंगी त्या विशेषाचा त्यांनी वापर केल्याचे आढळून येते. अर्थात इथे एक प्रश्न उपस्थित होतो. प्रचलित म्युझिक व्हिडियोसाठी गायन करणे, त्यांना कितपत भावले असते? खरतर चित्रपटीय आविष्कारांच्या गतीमानतेस लवचिक प्रतिसाद देण्याचे रफी यांचे कौशल्य अतुलनीय होते पण, कलाविचारांत अशा "जर-तर" या बाबींना तसा फारच कमी वाव असतो. 
सुमन कल्याणपूर हे असेच काहीसे दुर्लक्षित गेलेले नाव. सुरेल आवाज, हलका पल्लेदार आणि पारदर्शक आवाज, भडक नसलेले स्वनरंग आणि त्यांच्या छत विपुलतेने ऐकायला मिळतात. परिणाम असा, त्यांच्या गायनातून विस्तीर्ण भावपट धुंडाळता येतो. गायीकेस रागदारी संगीत अवगत होते का नव्हते, याची प्रचीती देणाऱ्या रचना फारशा मिळाल्या नाहीत पण, जिथे शक्यता होती, तिथे त्या रचनेनुरुप पडताळा घेता येतो. लताबाईंनी आवाज आणि लगाव, याबाबत जे कौशल्य ज्या प्रकारे आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दाखवले त्याच्या जवळपास, केवळ हीच गायिका पोहोचू शकली असती, असे ठामपणे मांडता येते. तितकी या गायिकेच्या गळ्याची क्षमता आणि ताकद नक्कीच होती. अर्थात, त्यांना जर का संधी लीलाल्या असत्या, अधिक टिकाऊ चित्रपट मिळाले असते तर लताबाईंच्या कर्तृत्वास पर्यायी केंद्र म्हणून उभी राहण्याची क्षमता, त्यांच्या गायकीत निश्चित आढळत होती पण दुर्दैवाने तसे घडले नाही!!    
आता आपण, या रागावरील आणखी आधारित काही गाणी ऐकुया आणि रागाची ओळख पूर्णपणे घेऊया. 
आपकी नजरो ने समझा प्यार के काबील मुझे - मदन - अनपढ - लता मंगेशकर

झनक झनक पायल बाजे - वसंत देसाई -झनक झनक पायल बाजे -उस्ताद अमीर खान

Sunday 22 November 2015

झुळझुळणारा छायानट

"ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे 
कोणती पुण्ये अशी येती फळाला 
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे"
ना. धों. महानोरांच्या प्रसिद्ध कवितेतील या ओळी राग "छायानट" रागाशी काहीसे साद्धर्म्य दाखवतात. रात्रीच्या पूर्वांगात गायला जाणारा हा राग, "षाडव/संपूर्ण" अशा जातीच्या या रागात, आरोही स्वरसप्तकात "निषाद" स्वराला स्थान नाही. "पंचम/रिषभ" हे या रागाचे वादी/संवादी स्वर असून, "षडज" आणि "मध्यम" स्वरांना या रागात भावदर्शनासाठी महत्वाचे स्थान आहे. "जोंधळ्याला चांदणे लखडून जावे" अशी असामान्य ओळ वाचताना, नजरेसमोर रात्रीच्या शांत समयी, शेतातील डुलणारी जोंधळ्याची रोपे येतात आणि या रागाच्या समयाला भाविक स्वरूप देतात. 

खालील रचना, ही छायानट रागातील अप्रतिम बंदिश आहे. पंडित ओंकारनाथ ठाकुरांच्या असामान्य गायकीने नटलेला, छायानट. पंडितजींच्या गायनाची सगळी वैशिष्ट्ये यथार्थपणे दाखवणारी, ही रचना आहे. सुरवातीची मंद्र सप्तकातील घुमारेदार गायकी आणि त्या आलापीतून, पुढे विस्तारीत होणारी ही रचना म्हणजे या रागाचा "अर्क" आहे. 


ओंकारनाथ ठाकुरांच्या आवाजाची काही वैशिष्ट्ये बघायला गेल्यास, आवाजाचा केलेला आवाहक उपयोग. तसे बघितले तर ग्वाल्हेर घराण्यातील गायकांच्या आवाजात एक प्रकारे एकाच स्वन डोकावत राहतो. मग, स्वरमर्यादा, गायनप्रकार, विस्तारासाठी कुठलाही राग निवडलेला असो. कारणे अनेक देता येतील पण आवाजात स्वनभेद फार क्वचित अनुभवायला मिळतो. ओंकारनाथ ठाकूर इथे स्वत:चे वेगळेपण ठसठशीतपणे जाणवून देतात. मग, तो कधीतरी हळुवार, आर्त असेल किंवा काहीवेळा विलक्षण बोचरा वाटणारा पण प्रचंड ताकदवान आवाज जोरदार तानांनी भारून टाकतो. आपण नेमके काय करीत आहोत, याची यथार्थ जाणीव गायनातून आढळते. आपल्या मांडणीत विविधता यावी म्हणून त्यांनी किराणा सारख्या वेगळ्या घराण्याच्या गायकीचा अवलंब आपल्या गायनात केल्याचे आढळते. तसेच शब्दांच्या उच्चारांवर अधिक भर दिसतो. वास्तविक, रागदारी गायनात, शब्दोच्चाराला फारसे महत्व दिले जात नाही, ओंकारनाथ अपवाद. गायनातील कारागिरी, हा भाग फार महत्वाचा आहे. सुरवातीला, गायनात, क्षमता तसेच कौशल्य, याचा आढळ दिसतो पण पुढे त्याला मात्र दुर्दैवाने, त्याला प्रदर्शनाचे स्वरूप आले. विशेषत: द्रुत लयीत, गुंतागुंतीच्या ताना घेणे तसेच तार ते खालचे स्वर व उलट अशी झेप घेणे, अवाक करणारे होते. गायनात, "नाट्यात्म" आणणे आणि रसिकांना भारून टाकणे, हा विशेष खास म्हणावा लागेल.   
हिंदी चित्रपट गीतांत, शास्त्रीय नृत्य आणि त्यावर आधारित गीते, याना अपरिमित लोकप्रियता मिळाली आहे. एकात नृत्यावर आधारित गाणे म्हणजे रचना बहुतांशी द्रुत लयीत आणि अधिक आवाहक असल्याने, रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम, ही गाणी यथास्थित पार पाडतात. वास्तविक, शास्त्रीय नृत्यावर आधारित अशी गाणी असतात, त्यामुळे नृत्यातील जरी संपूर्ण शास्त्र जरी मांडता येत नसले तरी नृत्याबद्दल रुची निर्माण होण्यास नि:संशय मदत होते, हे निश्चित. "तलाश" चित्रपटातील "तेरे नैना तलाश कर जिसे" हे गाणे या पठडीतले आहे. या गाण्यात, "छायानट" राग जरी अस्पष्ट दिसत असला तरी जेंव्हा रचना त्या रागातील स्वरांवर "ठेहराव" घेते, ती जागा विलक्षणरीत्या झगमगून उठते. मन्नाडे यांचे गायन, अतिशय वेधक आहे. सतारीच्या द्रुत लयीतील गत आहेत आणि त्या लयीशी, गायन अप्रतिमरीत्या जुळून आलेले आहे. 

मन्नाडे  यांचा आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्याचा पल्ला चांगला, अतिशय विस्तृत आहे. याचा परिणाम असा होतो, गाण्यात सर्वत्र, खुलेपणा आणि ताकद राखणे, त्यांना जमू शकत होते. त्यांचा आवाज हलका (सुगम संगीताला अतिशय पूरक) असल्याने, सर्व प्रकारच्या ताना, सहजतेने घेता येतात. भारतीय शास्त्रीय गायनात स्वच्छ "आ"करणे गायन करण्यावर भर असतो आणि हे देखील मन्नाडे, सहज करू शकतात. (खरे सांगायचे तर अनेकदा व्यावसायिक शास्त्रीय गायकांना देखील हे जमत नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक) आकाराने शक्य होणारा विशेष गुण म्हणजे सहकंपन वा गुंजन हा परिणामत: त्यांच्या गायनात ओतप्रोत भरला आहे. दुसरा भाग असा, प्रत्येक रचनेनुरूप जी एक भावस्थिती ढोबळमानाने निश्चित झालेली असते, ती दाखवणारा आवाजाचा लगाव, ते देऊ शकतात. वास्तविक चित्रपट गीतास, सांगीत कल्पनांची बढत करायची नसून, एक संबंधित मूड निर्माण करून, बाकीची कार्ये साधायची असतात. म्हणून, सुरेलपणा, भरीवपणा आणि यथायोग्य उच्चार या बाबी अत्यावश्यक ठरतात आणि हे करताना, आवाजातून, चित्रपटीय व्यक्तिमत्व मिळावे लागते. मुख्य बाब, म्हणजे हे सगळे करताना, त्यांचा आवाज कुठेही नाटकी होत नाही भावनिक संतुलन करून, चित्रपट संगीत अधिक परिणाम करते, हे वैशिष्ट्य, त्यांनी सतत कायम राखले. 

आता आपण, लताबाईंच्या सुरवातीच्या काळातील एक अतिशय सुश्राव्य गाणे ऐकुया. गाण्याची चाल खरोखरच अतिशय गोड, ओघवती आहे. प्रसंगी रचना द्रुत लयीत जाते परंतु शब्दकळेच्या आस्वादाला कुठेही बाधा पोहोचत नाही. गाण्याच्या सुरवातीपासून, रागाची ओळख होते, म्हणजे  बघा,"चंदा रे जा रे" ही ओळ गाताना, स्वरांच्या हेलाकाव्यातून, आपल्याला छायानट भेटतो आणि पुढे, अंतरा आणि मधले संगीत ऐकताना, याच रागाचे सूर ऐकायला मिळतात पण तरीही, हे गाणे म्हणजे या रागाचे लक्षणगीत नव्हे!! या गाण्यात, बहुतेक हिंदी गाण्यात सहजपणे वावरणारा केरवा ताल आहे. प्रेमाची कबुली देणारे गाणे आहे पण, तेंव्हाच्या संस्कृती नुसार गाण्याची हाताळणी अतिशय संयत रीतीने झाली आहे.  आता, गाण्यात कुठे छायानट बाजूला पडतो? हे बघायला गेल्यास, गाण्याचा पहिल्या अंतरा सुरु होताना, स्वरांची जी "उठावण" आहे, ती बारकाईने ऐकायला हवी. तिथे, रचनेने, हलक्या हाताने, रागाला बाजूला सारले आहे. अर्थात, ही कारागिरी, संगीतकार म्हणून नि:संशय, खेमचंद प्रकाश यांची. 


एकूण कारकीर्द ध्यानात घेत, या संगीतकाराला, "पियानो","सेक्साफोन" ,"क्लेरीनेट " इत्यादी पाश्चात्य वाद्यांची आवड लक्षात येते. एक तांत्रिक विशेष इथे मांडणे जरुरीचे ठरते. तसे बघितले तर ही तिन्ही वाद्ये एका वेधक सीमारेषेवर उभी आहेत. एक तर अखंड व सलग ध्वनी पुरवायचा किंवा सुटेसुटे, तुटक पण ठोस ध्वनी पुरवायचे, या दोन टोकांच्या दरम्यानची जागा या वाद्यांनी व्यापली आहे. "सतार","जलतरंग" इत्यादी वाद्ये वापरली नाहीत, असे नाही (वरील गाणे या संदर्भात ऐकावे) पण त्यांची वाद्ययोजना आधी उल्लेखलेल्या अभारतीय वाद्यांनी निर्माण केलेल्या ध्वनीप्रतिमांशी अंतरंग नाते जोडून आहे. आणखी एक बाब बघता येते. खेमचंद प्रकाश, यांना नाट्यात्म क्षण उभा करण्यासाठी ताल व ठेका आणि वाद्ये न वापरण्याचे तंत्र मनपसंत आहे, असे ठामपणे म्हणावे लागते. अशा वेळेस, गाता आवाज जेंव्हा सुरावट रेखायला लागतो, तेंव्हा ही वाद्ये, त्या सुरावटीला पाठींबा देतात, पण ध्यानात येईल इतक्या नरमाईने. गाणारा आवाज तार स्वरांत जाईल किंवा खालच्या पट्टीवर पोहोचेल पण, त्याचे परिणामकारक कार्य अतिशय नियंत्रित गतीने होत राहील. वरील गाण्याचाच आधार घ्यायचा झाल्यास, सुरवातीचे शब्द किंवा "मुखडा" कानावर पडेपर्यंत सुरावट खालच्या स्वरांवर रुंजी घालत असते आणि जेंव्हा ठाशीव किंवा वरच्या स्वरावर झेप घेणारा मुखडा येतो, तेंव्हा गीताचा रोख(च) बदलतो. आणि हे सगळे करताना, गाण्याची लय देखील, मंद्र सप्तकात वावरत असते. 

आता आपण या रागावरील आणखी काही गाणी ऐकायला घेऊ आणि या रागाची ओळख, आपल्या मनात कायमची ठसवून घेऊ. 

मुझ से नाराज हो तो - पापा कहते है - राजेश रोशन - सोनू निगम 

बाद ए मुद्दत ये घडी - जहांआरा - मदन मोहन - रफी/सुमन 

Attachments area

तू चंदा मै चांदनी



हिंदी चित्रपट गीतांत फारच कमी गाणी अशी सापडतात, जी खऱ्या अर्थी असामान्य असतात परंतु त्यांना लोकाश्रय लाभत नाही आणि हळूहळू विस्मरणात जातात. तसे बघितले तर ज्या गाण्यांना, लोकसंगीताचा आधार लाभला आहे, ती गीते देखील वर्षानुवर्षे लोकांच्या स्मरणात रहातात. थोडक्यात, असे अनुमान आपल्याला सहज काढता येईल, कुठल्याही गाण्याची "कुंडली" मांडणे, जवळपास अशक्य कोटीतली बाब आहे.
गाण्याची चाल, रसिकांच्या मनाची "नाळ" जोडणारी हवी, असा एक मतप्रवाह अनेक वर्षे प्रचलित आहे, विशेषत: गाण्याचा "मुखडा" जितका आकर्षक असेल तितके ते गाणे, रसिकांच्या पसंतीला उतरते. गाण्याचा "मुखडा" आकर्षक असणे, आवश्यक आहे पण त्याच बरोबर त्याच्या नंतरची "बांधणी" देखील तितकीच आकर्षक असणे, अत्यावश्यक असते अन्यथा, सुरवातीला मनावर घडलेला असर, हळूहळू पिछाडीला पडतो आणि गाणे निरस होण्याची शक्यता बळावते. 
काही गाण्यांच्या बाबतीत असे घडते, गाण्याची चाल पहिल्या प्रयत्नात, लक्षात(च) येत नाही आणि ते गाणे आवडीच्या बाबतीत, मागे पडते. गाण्याची चाल "अनवट" असणे, हा विचार देखील बरेचवेळा पुढे येतो. "अनवट" म्हणजे काय? चाल अवघड असणे, म्हणजे अनवट, असा एक मतप्रवाह आढळतो, त्यात थोडेफार तथ्य आहे पण पूर्णांशाने सत्य नाही. या सगळ्या मतांतून, आपल्याला एक गोष्ट ठरवावीच लागेल. गाण्याची चाल कशी असावी, याबाबत कुठेही ठाम अशी "थियरी" नाही आणि गाण्याचे आयुष्य किती आहे, याचा अंदाज करणे तर केवळ अशक्यप्राय. प्रत्येक संगीतकार, आपापल्या कुवतीनुसार उत्तरे शोधीत असतो पण काही काळाने, त्या उत्तरातील वैय्यर्थ्य जाणवायला लागते. 
"तू चंदा मै चांदनी" या गाण्याबाबत काही ठाम विषाने करताना, माझी थोड्याफार प्रमाणात द्विधावस्था होते. गाण्याची चाल सुंदर आहे, त्यात अनेक लयीचे बंध आहेत, इत्यादी सौंदर्यस्थळे शोधता येतात पण, या गाण्यात असे काय आहे, ज्यामुळे हे गाणे, माझ्या मनात ठाण मांडून आहे? या प्रश्नाचाच शोध, या निमित्ताने घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. 
आपण, या गाण्याचा आस्वाद घेताना, कवितेचा आस्वाद घेणे देखील, मला अत्यावश्यक वाटते कारण, गाण्यात शब्द आहेत म्हणून ते "गाणे" आहे!! तेंव्हा, गाण्याचा आस्वादाला सुरवात करण्याआधी, आपण, हे गाणे, "कविता" म्हणून काय दर्जाचे आहे? या प्रश्नाचा पडताळा घेऊया. 
कवी बालकवी बैरागी यांची शब्दरचना आहे. इथे हे ध्यानात ठेवावे लागेल, हा कवी, कधीही चित्रपटासाठी गाणी लिहिणारा कवी नव्हता आणि ही रचना देखील, कविता म्हणून प्रसिद्ध झाली होती. 
" तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे,
तू बादल मै बिजुरी, तू पंछी मै पात रे. 

ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
चंद्रकिरण तो छोड कर, जाये कहा चकोर, 
जाग उठी है सांवरे, मेरी कुंवारी प्यास रे,
अंगारे भी लगने लगे पिया अंगारे भी लगने लगे,
आज मुझे मधुमास रे 

तुझे आंचल मे रखुंगी ओ सावरे 
काळी अलको से बांधुंगी ये पांव रे
गल बैय्या वो डालू की छुटे नही 
मेरा सपना सजन अब टुटे नही 
मेहंदी रची हथेलिया, मेरे काजलवारे नैन रे,
पल पल तुझे पुकारते पिया पल पल तुझे पुकारते
हो हो कर बेचैन रे 

ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,
अंग लगाकर सायबा अंग लगाकर सायबा,
कर दे मुझे निहाल रे" 

ही कविता म्हणून वाचताना आपल्या सहज ध्यानात येऊ शकते, राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवरील प्रणयकथा आहे.  "बिजुरी","बावडी","केसरिया" हे खास राजस्थानच्या संस्कृतीतले शब्द. खरे तर या कवितेचा घाट बघितला तर, चित्रपट गीताच्या पारंपारिक रचनेत अजिबात बसणारा नाही. किंबहुना, गाण्याचा "मीटर" ठरवण्याच्या प्रक्रियेत तर ही शब्दकळा फार अवघड आहे. असे असून देखील संगीतकार जयदेव, यांनी गाणे करताना, ज्या कुशलतेने, रचनेला वेगवेगळी वळणे दिली आहेत, तोच खरा अभ्यासाचा भाग आहे.   
 मी सुरवातीला जे म्हटले त्याप्रमाणे विचार करता, गाण्याचा "मुखडा" हा काही इतका आकर्षक नाही. किंबहुना, गाण्याच्या आधी, जवळपास, १ मिनिट फक्त वाद्यमेळ आहे. संतूरच्या सुरांनी या गाण्याची पार्श्वभूमी तयार होते आणि ते सूर जिथे थांबतात, तिथे लताबाईंचा टिपेचा सूर लागतो - तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे!! गाण्याच्या सुरवातीला तार स्वर लावणे आणि त्याच सुरांत गाण्याचा विस्तार करायला घेणे, हीच खरे म्हणजे गळ्याची असामान्य परीक्षा आहे. गाण्याची चाल "मांड" रागावर आहे पण हा "मांड" राग, तसाच्या तसा वापरलेला नसून, त्यात, राजस्थानी लोकसंगीताची फोडणी दिलेली आहे. वास्तविक पहाता पारंपारिक मांड रागात, सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात पण, तसे इथे घडत नाही. इथे "कोमल गंधार" आणि "कोमल धैवत" तसेच "तीव्र मध्यम" स्वरांचा उपयोग केलेला आहे आणि हे लोकसंगीताचे contribution!! अर्थात, असे म्हटले जाते, मांड रागाची उपपत्ती ही राजस्थानी लोकसंगीतातून झालेली आहे आणि एकूणच सगळी स्वरावली बघता, या म्हणण्यात बरेच तथ्य आढळते. 
पुढे "तू बादल मै बिजुरी" हे शब्द कसे घेतले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे. "बिजुरी" शब्दावरील जी हरकत आहे, ती इतके अवघड आहे की, केवळ लताबाई(च) अशी हरकत घेऊ शकतात!! जयदेव, गाण्याच्या पार्श्वभागी जो वाद्यमेळ वापरतात, तिथे अत्यंत मिजाकी वाद्ये पण प्रत्येक वाद्याचा "कस" लागेल, अशी योजना करतात. मग,  वापरताना,५ ६ वाद्येच असली तरी, त्यांचे काम भागते, किंबहुना त्यामुळे इतर वाद्यांची गरजच भासत नाही. इथे बघा, संतूर, स्वरमंडळ, बासुरी, सारंगी, तार सनई अशीच मोजकी वाद्ये संपूर्ण गाण्यात आहेत पण, प्रत्येक वाद्याचे "जिवंत" अस्तित्व आहे. राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर, ज्याप्रकारे सारंगी वाजली आहे, ती फार बारकाईने ऐकायला हवी. सगळे वाळवंट आपल्या समोर उभे रहाते. संगीतकार म्हणून जयदेव, इथे इतरांपेक्षा वेगळा ठरतो. गाणे ऐकताना, पार्श्वसंगीत आणि गाण्यातील शब्द, याचे बांधलेले नाते देखील वेगळेपणी ऐकावे लागेल. 
ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
या ओळी ऐकताना, आपल्याला "गायकी"चा आनंद तर मिळतोच पण त्याच बरोबर शब्दातून उभे केलेले वातावरण देखील अनुभवता येते. ओळीची सुरवात, मंद्र सप्तकात होते पण क्षणात वरच्या सुरांत चाल जाते आणि लय अवघड होते. हा सांगीत वाक्यांश अति गुंतागुंतीचा तर नक्कीच आहे पण त्याच बरोबर, कवितेच्या आशयाचा आनंद देखील, घेणे जरुरीचे भासते. 
लताबाईंच्या गायनातील आणखी वैशिष्ट्य इथे आपल्याला जाणवते आणि ते म्हणजे, गाण्याची चाल, राजस्थानी मांड रागावर आहे तेंव्हा शब्दोच्चार देखील त्याच धर्तीवर केले आहेत. हा आणखी कठीण भाग. गाण्यात हरकत घेताना, शब्दातील दडलेला आशय तर स्वरांनी अधिक अंतर्मुख करायचा पण, कुठेही शब्दांना दुखवायचे नाही!! ही कसरत, संगीतकार म्हणून जयदेव आणि गायिका म्हणून लताबाई ज्या प्रकारे करता, ते केवळ अतुलनीय आहे. गाण्यात, हिंदी चित्रपट गाण्यात वारंवार वापरलेला "दादरा" ताल आहे पण, तालाच्या प्रत्येक मात्रेचे "वजन" ध्यानात घेऊन, तिथे केवळ शब्द(च) नव्हे तर अक्षराचा शेवट करण्याइतकी तल्लख बुद्धीमत्ता, जयदेव यांनी, या गाण्यात दाखवली आहे. आपण, एका सक्षम कवितेला चाल लावत आहोत, याचे भान, जयदेव यांनी, या रचनेत कायम राखले आहे. 
गाण्यात तीन अंतरे आहेत आणि प्रत्येक अंतरा सुरु करताना, पार्श्वसंगीत जवळपास अजिबात नाही, म्हणजे संपूर्ण स्तब्धता राखून, केवळ लताबाईंच्या सुरात अंतरा सुरु करायचा आणि मग त्या सुरांचा मागोवा घेत, वाद्यांनी आपली मार्गक्रमणा करायची, अशी या गाण्याची बांधणी आहे. 
ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,

या ओळी गाताना, "चार पहर की चांदनी" इथे "चार" शब्द उच्चारताना, स्वरांत जो काही "हेलकावा" दिला आहे, त्यातून वाळवंटातील रात्रीच्या थंडीचा "शहारा" जणू व्यक्त केला आहे!! अशी सांगीतिक सौंदर्यस्थळे, या गाण्यात भरपूर आढळतात. तसेच पुढे "केसरिया" म्हणताना, "टिपिकल" राजस्थानी ढंग, स्वरांत आणला आहे. जयदेव काय ताकदीचे संगीतकार होते, याचे हे उत्तम उदाहरण ठरेल. 
गाणी सगळेच संगीतकार बांधत असतात पण, अशा प्रकारे लोकसंगीताची डूब देऊन, गाण्यात अनेक लयींना अवघड पद्धतीने खेळवत गाण्याची रचना  बांधायची,हे तल्लख आणि व्यासंगी बुद्धीमत्तेचे(च) काम आहे. जवळपास ९ मिनिटांची रचना आहे पण गाण्यातील प्रत्येक सेकंद, हा अतिशय अर्थपूर्ण रीतीने भरून काढला आहे. 
जयदेव, यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक असामान्य गाणी दिली आहेत तरी, या गाण्यासारखी रचना, खुद्द त्यांना देखील अपवादानेच करता आली. This is the creation of par excellence. 

डर्बन भाग २

डर्बन शहर तसे समुद्र किनारी वसलेले असले तरी उपनगरे मात्र डोंगराळ भागात आहेत. याचा परिणाम असा होतो, मुख्य शहरात डिसेंबर/जानेवारी मध्ये कडाक्याचे उन असले तरी उपनगरी भागात तितका कडाका जाणवत नाही. इथे आणखी एक गन्मात वारंवार बघायला मिळते. उन्हाळ्याच्या महिन्यात समजा सलग ३ दिवस उन्हाची काहिली (मुंबईच्या तुलनेत) झाली तरी ४ थ्या दिवशी हमखास पावसाची सर येते किंवा जोरदार पाउस पडतो आणि वातावरण पुन्हा सुस्नात होते. हवामान कोरडे असल्याने, पावसाची साधी सर देखील, इथले वातावरण थंड करते. 
जोहान्सबर्गच्या मानाने, इथली जीवनशैली शांत आहे. अर्थात इथे देखील मॉल संस्कृती रुजली आहे. इथले मॉल्स मात्र अतिशय प्रशस्त आहेत. Pavilion, Gateway सारखे मॉल्स म्हणजे प्रचंड संस्थाने आहेत. एकाच ठिकाणी, जगातील कुठलीही वस्तू इथे प्राप्य असते, भौतिक सुखाच्या परिसीमा इथे गाठलेल्या आहेत. जवळपास ३,४ मजली इमारतीमधून नुसते चालत हिंडणे, हाच पायांना व्यायाम आणि सुखाचे आनंदनिधान असते. डर्बन नॉर्थ भागात तर Pick n Pay Hypermarket म्हणून अवाढव्य मार्केट आहे. जगातील अति महागडे कपडे इथे बघायला मिळतात. इथल्या वस्तू महाग असतात, हे तर खरेच पण, थोडी माहिती काढली की इथे तशी स्वस्त किमतीची दुकाने देखील आहेत. अर्थात दर्जाच्या बाबतीत कुठेही तडजोड नसते आणि किराणा माल, खाण्याच्या वस्तूबाबत हेच बघायला मिळते. पहिल्यांदा मला नवल वाटायचे, इथे मॉल्समध्ये असंख्य हॉटेल्स असतात पण तिथे कोण खायला/जेवायला येत असेल? नंतर समजले, शिनिवार सकाळ, रविवार सकाळ इथल्या हॉटेल्समध्ये येउन नाश्ता करायची पद्धत आहे. अगदी सकाळ, सकाळी ८ वाजता देखील, शनिवार/रविवारी हॉटेल्स तुडुंब भरलेली असतात. केवळ, तरुण/तरुणी नसून, कुटुंबाचा सगळा जथ्था इथे हॉटेलमध्ये हजर असतो!! 
मला तर नेहमी असेच वाटते, इथला सगळा समाज, हा हॉटेल्स मध्ये खाणे आणि सदैव काहीना काही तरी शॉपिंग करणे, यातच गुंग असतो. त्यातून, इथली खरेदी म्हणजे सदैव क्रेडीट कार्डचा वापर. नगदी चलनाचा वापर फारसा इथे आढळत नाही. तुमच्या पाकिटात, किती क्रेडीट कार्डस आहेत, यावर तुमची पत ठरत असते. सुरवातीला मला देखील नवल वाटायचे पण नंतर मी देखील याच मार्गाने जायला सुरवात केली!! बरे यांचे हॉटेल्स मधील खाणे म्हणजे एक सोहळा असतो. प्रथम ड्रिंक्स ऑर्डर करायचे, नंतर "स्टार्टर्स" मागवायचे. यात जवळपास, एक, दोन तास निघून जातात. त्यानंतर मग, "मेन मेन्यु" ठरवायचा!! यात, ड्रिंक्सचे आचमन चालूच. इथे मी कितीतरी गोरे लोकं सज्जड पिणारे बघितले आणि त्यांना पिताना बघून, "अजून यांची शरीर यष्टी कशी काय सडपातळ राहू शकते?" याचे नवल वाटायचे!! काळ्यांच्या बाबतीत तर पिण्याबाबत तोड नाही. मी तर कधीच पासंगादेखील पुरू शकलो नाही, शकणारच नाही. 
पुढे, या समाजात जसा रुळायला लागलो तशी ध्यानात आले, इथले लोकं - यात स्त्रिया/मुली देखील आल्या, रोज पहाटे व्यायामशाळेत तरी जातात किंवा मैलो न मैल, धावण्याचा जबरदस्त व्यायाम करतात. आदल्या दिवशीचे सगळे खाणे, दुसऱ्या दिवसाच्या व्यायामात रिचवून टाकतात!! इथे सायकलिंग करणे, हा देखील आनंदाचा खेळ असतो. वातावरणात कितीही गारवा असला तरी, विशेषत: डोंगराळ भागात राहणारे, कितीतरी गोरे युवक/युवती, आपल्या सायकल घेऊन, रपेट करीत असताना, नित्याच्या दिसत असतात. अर्थात, यांच्या सायकली देखील देखण्या तर असतातच पण अतिशय दणकट असतात. एकूणच इथल्या समाजात, स्वच्छता, व्यायाम, कायदे पाळणे या बाबतीत जागरूकता आहे आणि मला वाटते, ती लहानपणापासून मनावर बिंबवली जाते. 
अर्थात, "गाव तिथे महारवाडा" या उक्तीप्रमाणे उकिरडा प्रत्येक ठिकाणी आढळतो. आपण, साउथ आफ्रिका टीव्हीवर बघतो, त्यामुळे या देशाची चांगली(च) बाजू नेहमी प्रकाशात येते. इथे काही वर्षे काढली म्हणजे अस्तरामागील ठिगळे दिसायला लागतात!! डर्बन इथे देखील गुन्हेगारीचे प्रमाण जरी भयानक नसले तरी नगण्य अजिबात नाही. १९९७/९८ साली, मी रात्री, बेरात्री रस्त्यावरून हिंडत असे, मध्यरात्री समुद्राकाठी जाउन बसत असे पण, जेंव्हा २००९ मध्ये परत इथे राहायला आलो आणि बदलत्या परिस्थितीचे वास्तव भान आले. हळूहळू, इथले जीवन देखील काहीसे बकाल व्हायच्या मार्गावर लागले आहे. भ्रष्टाचार अगदी आचारसंहिता झाली नसली तरी बऱ्याच प्रमाणात वाढ होत आहे. त्यातून, इथल्या चलनाचे आंतरराष्ट्रीय पतमापन घसरायला लागले आहे आणि महागाईचे चटके बसायला लागले आहेत. आर्थिक विषयी बोलायचे झाल्यास, या देशात प्रचंड प्रमाणात आयात केली जाते आणि चलन विनिमयाच्या दरातील घसरण, प्रामुख्याने महागाईला कारणीभूत ठरत आहे. अजूनही, इथे गोऱ्या लोकांचा प्रभाव असेल किंवा कायद्याविषयी आदर असेल म्हणा, भारताच्या मानाने, इथे निश्चितपणे, सुस्थित जीवन जगण्याच्या विपुल संधी आहेत. आजही, Tax Evasion संस्कृती भारताइतकी बोकाळलेली नाही. अर्थात, इथे Tax चे प्रमाण बरेच आहे पण त्याचबरोबर ज्या प्रकारच्या सुविधा मिळतात, त्याची तुलना केली तर, युरप किंवा अमेरिकेपेक्षा इथे जीवनमान स्वस्त आहे. 
एक अनुभव सांगण्यासारखा आहे. N3 या राष्ट्रीय महामार्गावर, मी गाडी चालवत होतो, महामार्गावर गाडी चालवणे म्हणजे गाडीचा वेग, कमीत कमी ८० कि.मी.!! अशा भरघाव वेगात गाडी धावत असताना, समजा अपघात झाला तर मृत्यूचे प्रमाण हमखास. बराच वेळ गाडी चालवत असताना, माझ्या मागून, एक मर्सिडीज गाडी पुढे गेली. त्यावेळी मी १०० कि.मी. वेगाने गाडी चालवत होतो, तेंव्हा मर्सिडीजचा वेग माझ्यापेक्षा अधिक, हे ओघाने आलेच. त्यापाठोपाठ दुसरी मर्सिडीज, माझ्या गाडीला pass on करून गेली आणि काही क्षणात, माझ्या समोर दोन्ही गाड्या, एकमेकांवर आदळल्या!! सुदैवाने, माझ्या गाडीपासून, अपघाताचे अंतर तसे सुरक्षित असल्याने, मी गाडीचा वेग कमी केला . एकात गौर वर्णीय तर दुसऱ्यात कृष्ण वर्णीय लोक होते, माझ्या डोळ्यासमोर गाड्यांच्या पुढील भागाचा चकणाचूर होत होता. सुदैवाने, गाडीतील लोकं सुरक्षित होते. त्यातील एकाने, Help नंबर लावला आणि अक्षरश: दहाव्या मिनिटाला, तिथे ३ Ambulance, ४ पोलिस गाड्या आणि वरून helicopter (टेहळणीसाठी) हजर!! लगेच पुढील कारवाईला सुरवात झाली आणि अर्ध्या तासात, तिथे अपघाताची साधी निशाणी देखील उरली नव्हती!! आपण, इथे infrastructure म्हणून धोशा लावतो आणि तसे बघितले त्याची आवश्यकता आहे, कारण आता आपल्याकडे देखील अशाच प्रकारचे प्रचंड महामार्ग अस्तित्वात येत आहेत. पण, त्याचबरोबर अशा सुविधा मिळणे देखील अत्यंत गरजेचे आहे. असे अपघात जरी झाले, तरी रस्ता कमीत कमी वेळात मोकळा करणे, अत्यावश्यक असते. 
इथे लोकांच्या गरजेची किती काळजी घेतली जाते, याचे दुसरे उदाहरण देतो. एकतर इथे "वीज" जाणे, असे प्रकार जवळपास नाहीच!! डर्बन इथे राहताना, एकदा, इथे काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता भासली. अर्थात, इथे वीज नाही म्हणजे आयुष्य ठप्प!! अशा वेळी, डर्बन महापालिकेने, आमच्या भागातील प्रत्येक घरात, एक छापील पत्र पाठवले होते. त्या पत्रात, कुठल्या दिवशी वीज पुरवठा खंडित होणार आहे आणि किती वेळ खंडित होणार आहे, याची सगळी माहिती दिली होती. प्रत्यक्षात काम सुरु होणार होते, ते २ आठवड्यांनी!! तरी देखील कुणालाही गैरसोय होऊ नये, याची इथे नित्यनेमाने काळजी घेतली जाते आणि पत्रात दिलेली वेळ, अत्यंत कसोशीने पाळली जाते. प्रकार, रस्ता दुरुस्तीबाबत चालतो. हे केवळ महामार्गाबाबत घडते असे नसून, शहरातील आडमार्ग जरी दुरुस्तीला काढायचा असेल तरी हीच पद्धत पाळली जाते.
डर्बन शहर माझ्या डोळ्यादेखत विस्तारले पण, प्रत्येक ठिकाणी अत्यंत कसोशीने आणि काटेकोरपणे Planning केले जाते. आहे रिकामी जागा म्हणून बांधली बिल्डींग, असा प्रकार इथे अजिबात चालत नाही. काहीवेळा याचा त्रास होतो म्हणजे समजा, तुम्ही रस्ता चुकलात तर तुम्हाला कमीत कमी, १,२ कि.मी. चा फटका बसतो!! महामार्गावर तर अधिक लांबचा फटका बसतो. महामार्ग आखतानाच, लोकांच्या सोयींचा तसेच commercial complexes ध्यानात घेऊनच बांधले जातात. तसेच अशा नवीन मार्गांवर वृक्षांची लागवड, अत्यंत आग्रहाने केली जाते. डर्बन इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने हिरव्या रंगाचा सोहळा अनुभवता येतो. रिकामी जागा आहे आणि तिथे काही बांधकाम करायचे झाल्यास, तिथल्या वृक्षांची निगराणी कशी राखली जाइल, याचा विचार प्रथम केला जातो. उचलली कुऱ्हाड आणि तोडले झाड, हा इथे अक्षम्य गुन्हा आहे. मी जिथे रहात होतो, तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती आणि संध्याकाळी, रस्त्याच्या कडेने, फिरत रहाणे, हा एक आनंदसोहळा असायचा. 
आता, कधीकधी मनात असा विचार येतो, हे इथले सौंदर्य, सोयी, सवलती आणखी किती वर्षे शाबूत राहणार आहेत? डर्बन तसे टुमदार शहर आहे. जोहान्सबर्गप्रमाणे अंगावर येत नाही. जोहान्सबर्ग शहराचा विस्तार बघून, तुमची छाती दबून जाते. डर्बन आकाराने छोटे आहे, म्हणूनच तुम्ही त्याच्या लगेच प्रेमात पडू शकता. हे शहर तुम्हाला प्रेमात पडायला भाग पाडते आणि प्रेमात पडावे, अशा इथे असंख्य जागा आहेत, उद्याने आहेत, लायब्ररी आहे, समुद्र किनारे आहेत. प्रश्न परत, परत मनात येतो, हे शहर किती काळ, आपल्याला असे ओढून घेईल?