Friday 21 July 2023

मिडोज हाऊस

वास्तविक आता त्या इमारतीचे नाव "गणेश स्मृती" आहे परंतु मी जन्माला आलो, तेंव्हा त्याचे नाव मिडोज हाऊस असे होते. इथे जवळपास सलग १० वर्षे तरी नक्कीच काढली. माझ्या आई वडिलांनी अर्थात त्यापेक्षा अधिक काळ व्यतीत केला. खरतर, अचानक हा विषय डोक्यात आला आणि बऱ्याच आठवणी डोक्यात घुसळायला लागल्या. अर्थात जन्माला आल्यापासूनची पहिला ३,४ वर्षे तरी काहीच लक्षात रहात नाही म्हणा. परंतु मी जसा चिकित्सक शाळेत - त्यावेळी मॉंटेसरी होती, जायला लागलो आणि बाहेरचे जाग आणि हे घरातले जग, अशा स्वतंत्र आठवणी मनात राहिल्या, हे नक्की. आता आठवते, माझ्या आजूबाजूला तेंव्हा इतर जी कुटुंबे होती, ती जवळपास सगळी पारशी होती आणि सुरवातीला तरी माझे मित्र पारशी होते. अर्थात बाजूच्या हेमराजवाडीतील मराठी मित्र त्यावेळी होतेच. अजूनही ही पारशी कुटुंबे आठवणीत राहिली आहेत. आमच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर माझ्याच वयाचा असावा पण गोरागोमटा "बर्जेस"' नावाचा मुलगा राहात असे. तसे बव्हंशी पारशी लोकं गोऱ्या वर्णाचे. या बर्जेसला एक धाकटा भाऊ असल्याचे अंधुकसे स्मरणात आहे. वास्तविक आता वाडीत औषधाला देखील पारशी राहात नाहीत पण तेंव्हा आमच्या करेलवाडीत ५०% पारशी तर ५०% महाराष्ट्रीयन राहात होते. मी वर म्हटल्याप्रमाणे, माझ्या आजूबाजूला तर सगळी पारशी कुटुंबे होती. आमच्या वाडीच्या टोकाला ४ मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरील "'यझदी"' नावाचा माझ्याच वयाचा मुलगा रहात होता. बरेच वर्षे तो आणी मी मित्र म्हणून एकत्र भेटत होतो आणि माझ्या त्याच्याशी गप्पा व्हायच्या. त्याच्याकडून पारशी समाजाशी माझी जवळीक झाली. आमच्या बिल्डिंगच्या बाजूच्या इमारतीत २ऱ्या मजल्यावर "जेम्स आणि त्याची बायको ''केटी" आपल्या मुलाबाळांसह रहायचे. ही केटी दिसायला भलतीच देखणी आणि आमच्या मित्रांची "'क्रश"' होती.आम्ही सगळे मराठी मित्र जवळपास एकाच वयाचे, फारतर १,२ वर्षांचा फरक. आम्ही सगळे वागायला ""टगे"' असेच होतो. महा व्रात्य, जरा म्हणून स्वस्थ बसणे स्वभावातच नव्हते. त्यातून ही केटी म्हणजे आमच्या वाडीचे सौंदर्य स्थान!! केसांचा डौलदार बॉब केलेला (माझ्या लहानपणी बाईने केसांचा "बॉब" करणे म्हणजे फॅशनची परमावधी!) गोरापान वर्ण, ओठांवर बहुतेकवेळा लालचुटुक लिपस्टिक लावलेली, अंगात बऱ्याचवेळा मिडी अथवा मॅक्सि घातलेली, बाहेर पडताना, अंगावर सुगंधी स्प्रे मारलेला(त्याकाळी स्प्रे वगैरे चैनीच्या गोष्टी आम्हा मित्रांच्या खिजगणतीत देखील नव्हत्या) आणि ती ठुमकतच वाडीतून बाहेर पडायची. ती घरातून बाहेर पडल्याचे, मला आणि माझ्या मित्रांना (त्यावेळी माझे मित्र आमच्याच घरी बरेचवेळा असायचे कारण तळमजल्यावरील घर) दिसली की आमची ""गॅंग"" जरा अंतर राखून तिचा पाठलाग (तिला कसे कळणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन) करत असू. तिच्या आरस्पानी सौंदर्याचा,आमच्या डोळ्यांनी "'आस्वाद" घेत असू. अतिशय प्रमाणबद्ध बांधा,किंचित निळसर डोळे आणि एकूणच चालीतून ओसंडून जाणारा आत्मविश्वास, या सगळ्याचे आम्हा शाळकरी मुलांना कमालीचे आकर्षण होते. आता ती आमची वाडी सोडूनच जवळपास ४० वर्षे झाली आणि आता समोर आली तर ओळख पटेल का? कारण आता आम्ही सगळेच साठी पार म्हणजे केटी कमीतकमी सत्तरीपार असणारच. आता तिचे देखणेपण लयाला नक्कीच गेले असणार. तेंव्हा जरी ओळख झाली/पातळी तरी ते आकर्षण नक्कीच नसणार. ती तेंव्हा "विप्रो" कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टरची सेक्रेटरी म्हणून नोकरीला होती. त्याकाळी काय किंवा आजही, घरातले पाणी भरायला मिळण्याची वेळ म्हणजे पहाटे ५ वाजता नळाला पाणी येणार आणि फक्त ६ ते फारतर ६.१५ पर्यंत पाणी भरायला मिळणार. आजही यात काही फरक नाही. आम्ही तळमजल्याला रहात असल्याने पहिल्यांदा आम्हाला पाणी मिळायचे. तेंव्हा घरात त्याकाळच्या तथाकथित बाथरूम - मोरीच्या बाजूला माझ्या वडिलांनी मोठे पिंप ठेवले होते, पिंपात पाण्याचा पाईप सोडून पिंप भरायचे, नंतर घरासाठी पिण्याचे पाणी भरायचे. हा पहाटेचा कार्यक्रम कितीतरी वर्षे नाना एकट्याने करत होते. जिथे माझेच वय ५,६ इतपतच तेंव्हा मी कसली बोडक्याची मदत करणार! मी पुढे होऊन मदत करावी,असे कधी सुचल्याचे देखील आठवत नाही. मोरीच्या बाजूच्या आमचे छोटेसे स्वयंपाकघर आणि तिथे पहाटेपासून आईची वर्दळ सुरु असायची कारण, स्वयंपाक करून तिला नोकरीची वेळ गाठायची निकड होती. आई १९७४ पर्यंत, क्रॉफर्ड मार्केट जवळील पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये नोकरी करीत होती. कधीकधी, आमच्याकडे काका, मावशी, मामा आणि त्यांची मुले रहायला यायची. ती आली म्हणजे मग घरात जास्तीचे पाणी भरून ठेवायला लागायचे. परिणामी आम्हाला पाणी भरायला वेळ लागायचा. जरा जास्तीचा वेळ लागला कि वरच्या मजल्यांवरून पारशांचा आवाज यायचा - ए तल माला, नल बंद करो!!. पहाटे पहाटे थोडा वेळ तरी नक्कीच ही आरडाओरड चालायची. आता समजते, त्यांची तरी काय चूक म्हणा, पाणी फक्त १. ३० तास मिळणार आणि आमचे झाल्यावर मग पहिला, नंतर दुसरा, नंतर तिसरा आणि मग शेवटी चौथा मजला यांना पाणी भरायची संधी मिळणार. यावरून अधूनमधून आमच्याशी भांडणे व्हायची. अगदी बर्जेसचे आई/वडील आमच्या दाराशी भांडायला यायचे.मग नाना आणि आई विरुद्ध ते दोघे, अशी शाब्दिक चकमक व्हायची. पारशी "गरम" होताना,असे दुर्मिळ दर्शन व्हायचे. अन्यथा पारशी जमात अतिशय थंड डोक्याची आणि कधीही कुणाच्या आयुष्यात डोकावून बघणार नाही. आपण बरे आणि आपले आयुष्य बरे, असाच एकूण खाक्या. दुसरी भांडणाची वेळ म्हणजे, बरेचवेळा वरील मजल्यावरील पारशी, माशांचे धुतलेले पाणी, खालच्या गटारात टाकायचे. इमारतीचे गटार इमारतीला लगटूनच आहे. त्यामुळे मग त्या पाण्याचे काही थेंब आमच्या स्वयंपाकघरात पडायचे. मग आई खवळायची आणि मग पुन्हा शाब्दिक चकमक जुंपायची. असे असले तरी कुणाच्याही सणासुदीला खास डिशेस घरी केल्या असल्या की मोकळ्या मनाने आदानप्रदान व्हायचे. आजही पारशांचा शेवयांचा गोड शिरा, अगदी चारोळी तसेच काजू वगैरेची पखरण केलेला शिरा घरात आला म्हणजे आम्हा भावांचा गोविंदा!! त्याकाळी पदार्थात, "ड्रायफ्रूट्स" टाकून तो पदार्थ अधिक स्वादिष्ट करायचा, ही चैनीची परमावधी असायची. माझी आई देखील दिवाळीचे घरगुती पदार्थ त्यांच्याकडे मी किंवा माझ्या भावांकरवी पाठवत असे. त्यानिमित्ताने केटीच्या घरी जायची संधी मिळायची!! का कुणास ठाऊक, मी तरी तिच्या घरी मोकळ्या मनाने गेलो नाही, सारखे छातीत धडधडायचे. केटी कशी बोलेल,कशी वागेल इत्यादींचा मनाशी खेळ चालायचा. प्रत्यक्षात काहीही कधी घडले नाही, माझ्याच मनाचा नाचरेपणा. दुसरे निरीक्षण म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्येच नव्हे तर इतर बिल्डिंग मधील पारशी अत्यंत टिपटॉप रहात असत, कपडे कधीही गबाळे, विना इस्त्री केलेले अजिबात नसायचे. अगदी ४,५ वर्षाचा मुलगा असला तरी. ही पारशी जमात कधीही वाडीतल्या लोकांच्यात फारशी मिसळली नाही. सतत आपण निर्माण केलेल्या कोषात रहात असत. कधी रस्त्यात भेटले तरी जेव्हड्यास तेव्हडे बोलायचे, अर्थात काही काम असेल तर अन्यथा ओठावरील स्मित, त्यांना पुरेसे असायचे. दुसरे म्हणजे बहुतेक सगळे पारशी अतिशय मोठ्या म्हणजे "टाटा", "गोदरेज" "वाडिया'' असल्या फाउंटन भागातल्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी जात असत. पारशी म्युनिसिपालिटी किंवा सरकारी ऑफिसमध्ये काम करत असल्याचे दृश्य फारच दुर्मिळ असायचे. अगदी बँक म्हटली तरी परदेशी बँकेत नोकरी करायचे. परिणामी त्यांच्या वागण्या,बोलण्यात एक प्रकारचा "पॉलिशनेस"' असायचा. आम्हा मित्रांना त्याचे देखील नवल वाटायचे. त्याकाळी आम्हाला इस्त्रीचे कपडे घालायला मिळणे, ते बव्हंशी सणासुदीला किंवा कुणाकडे भेटायला जायचे असेल तरच मिळायचे. बहुतेक पारशांकडे स्कुटर असायची गाड्यांचे दिवस फार उशिराने आले. पहाटे हवेत कितीही गारवा असला तरी, पारशी पाण्याची बालदी घेणार आणि आपली स्कुटर धुणार!! हा सोहळा जवळपास तासभर चालायचा. इतक्या निगुतीने स्कुटरची काळजी घेणारे नंतरही फारसे पाहण्यात आले नाही. आमच्या इमारतीच्या बाजूच्या इमारतीत,तळ मजल्यालाच एक म्हातारी पारशी एकटीच रहायची. नवरा बहुदा पूर्वीच निर्वतला असावा. तिच्या मुलीचे लग्न होऊन, ती सासरी गेलेली. त्यामुळे असेल पण तिचे आमच्या कुटुंबावर, विशेषतः आईवर फार प्रेम होते. तिच्या घराच्या बाजूला बुजलेली विहीर होती. बुजलेली कारण तिचे झाकण उघडल्याचे स्मरत नाही आणि पारशांच्या दृष्टीने विहीर म्हणजे त्यांचा देव. दर संध्याकाळी ही म्हातारी, विहिरीला चक्क आंघोळ घालायची, मग विहीर पुसायची. त्यानंतर रांगोळी (रांगोळीचे भोके असलेले भांडे असायचे, त्यातून छापा मारावा तशी रांगोळी तयार होत असे) रांगोळी काढून झाली कि मग त्याच्यावर फुलांची चादर चढवली जायची आणि शेवटी एका पाण्याच्या ग्लासमध्ये तरंगता दिव्याची ज्योत पेटवली जायची. हा पूजा सोहळा जवळपास तासभर चालायचा. तेंव्हा जरावेळाने आम्ही व्रात्यपणे ते दिवे फुंकर मारून विझवत तरी असू किंवा उडी मारून घरी जात असू कारण बाजूच्या हेमराज वाडीत जायचे म्हणजे एकतर बाजूच्या गटाराच्या भिंतीवर चढून जायचे किंवा या विहिरीवरून उडी मारून जायचे. त्यावेळी पायाने फुले कुस्करून जाण्यात एक विचीत्र आनंद मिळवत असू. कधीतरी मग त्या पारशी म्हातारीला आमचा खोडकरपणा कळायचा. मग तिचे वाक्ताडन सुरु व्हायचे. अर्थात तिच्या बोलण्याकडे कसे दुर्लक्ष करायचे, हे माहीत होते. इतके असूनही आम्हा भावांवर तिचे निरपेक्ष प्रेम होते. तिच्या घरात नेहमी २ कुत्रे असायचे त्यामुळे आम्ही तिच्या घरी फार वेळा गेल्याचे आठवत नाही. असाच एक पारशी कायमचा स्मरणात राहिला. "मिनू" त्याचे नाव. ठाकूरद्वारच्या चौकात त्याचे "सनशाईन" नावाचे इराणी हॉटेल होते.(आता भूतकाळ वापरायला हवा कारण आता redevelopment मध्ये ती सगळी इमारत पडली) आणि हा त्याच्या गल्ल्यावर बसलेला असायचा. अवाढव्य दणकट शरीरयष्टी, अत्यंत भेदक निळे,घारे डोळे, बहुतेकवेळा हाफ शर्ट अंगात घातलेला. प्रथमक्षणी बघायला भीतीच वाटायची. पण मनाने अत्यंत मवाळ आणि मनमिळाऊ होता. मोडके तोकडे मराठी बोलत असे पण प्राय: पारशी (मिश्र गुजराती भाषा) बोलत असे. आता हॉटेलचा गल्ल्यावर बसायचा म्हटल्यावर तोंडाची टकळी सतत चालू असायची आणि अर्थात तोंडातून मंत्रपुष्पांजली प्रमाणे शिव्यांचा उच्चार व्हायचा. आजूबाजूला स्त्रिया आहेत, हे बघून देखील तोंड आवरून बोलायचे, हा संकेत यथेच्छ नाकारायचा. आता चौकात हॉटेल असल्याने, गर्दी कायमची. पूर्वी तिथे बियर बार नव्हता पण नंतर आला. आम्हा मित्रांचा तिथे तळ ठोकलेला असायचा आणि आमचा घरातला वावर वगळता, बहुशः इथेच भेटत असू. प्रत्येकवेळी चहा (तेंव्हा खिशाला इतकेच परवडायचे) घेतलाच पाहिजे असले फालतू बंधन नसायचे. हॉटेलमधून रस्त्यावरील देखणे सौंदर्य न्याहाळणे, प्रसंगी आकंठ रसपान करणे, आणि त्याचे अत्यंत चविष्ट शब्दात वर्णन करणे, हा तर आमचा नेहमीचा उद्योग असायचा. अर्थात तोंडात तेंव्हा सिगारेट कायम असायची. बाहेर रस्त्यावर सिगारेट ओढण्याची प्राज्ञा नसायची. त्यामुळे हॉटेल हे नेहमीच सुरक्षित!! तसे आमचे घर ३ खोल्यांचे होते. त्यात आम्ही ३ भाऊ आणि आई,नाना राहात होतो. तेंव्हा आमच्या गरजा देखील मर्यादित होत्या. घरातच Toilet facility ही सुखाची परमावधी होती कारण आजूबाजूला चाळ संस्कृती आणि common toilet!! पुढे कधीतरी घरात डायनिंग टेबल आले तसेच मला वाटते, आजूबाजूचा परिसरात कुठेही नसलेला आणि आमच्या घरी असलेला असा फोन आला!! डायनिंग टेबल आणि खुर्च्या!! त्या खुर्च्यांवर बसून जेवण घ्यायचे, हा ऐषाराम होता तर घरात फोन येणे म्हणजे आपले समाजातील स्थान थोडे उंचावर गेल्याची भावना झाली होती. आज हे सगळे बालिश वाटते कारण आयुष्य प्रचंड प्रमाणात बदलले. मला आठवत आहे त्याप्रमाणे नानांनी नॅशनल कंपनीचा टेप रेकॉर्डर घरी, विकत आणला तेंव्हा सगळ्या नातेवाईकांत प्रचंड औत्सुक्य पसरले होते. यंत्रात कॅसेट टाकायची आणि रेकॉर्ड बटन दाबले की बोलणे रेकॉर्ड व्हायचे. पहिल्यांदा नातेवाईकांना याची कल्पना नसायची आणि त्यामुळे बरेचसे नातेवाईक, यंत्रातून आपलाच आवाज ऐकायला येत आहे, हे बघून आश्चर्यचकित व्हायचे. कुठलाही मानवी आवाज, कधीही, केंव्हाही ऐकायला मिळायचा. त्या टेप रेकॉर्डर सह एक इंग्रजी वाद्यसंगीताची टेप मिळाली होते. त्या वयात ती टेप ऐकणे, म्हणजे फुशारकी मारायला मिळालेले एक कारण होते. पुढे मी काही पाश्चात्य संगीताच्या मैफिली परदेशी असताना ऐकल्या, तेंव्हा ही अर्थात ही आठवण नेहमी यायची. त्या काळात आमच्याकडे "नारायण" नावाचा एक नोकर कमला होता, घरातच राहायचा. घरातील चौथ्या खोलीत पारशांची विहीर असल्याने (त्या विहिरींची देखील सटीसामासी पूजा व्हायची) ती खोली वापरण्यासाठी फारच अयोग्य होती. आम्हा भावांच्या कपड्यांचे कपाट त्या खोलीत होते आणि त्याच खोलीत नारायण झोपायचा. कला चेहरा, बुटकी उंची आणि स्थूल म्हणावा अशीच शरीरयष्टी. सतत अर्धी पॅन्ट आणि हाफ शर्ट, या अवतारात असायचा. आमचे घर पूर्ण शाकाहारी तरी त्याच्या हाताला चव होती. एक आठवण, घरात लोखंडाचे भांडे होते, आता इडल्या बनवताना वापरतात तसे आणि एकदा त्याने "आप्पे" म्हणून पदार्थ केला होता. पुढे बरेच वेळा खाल्ला. त्यावेळी नवीन पदार्थाची नवलाई होती. चवीला गोड आणि चमचमीत असा होता. जेवण मात्र सुंदर बनवायचा पण कर्माने अतिशय हलका होता. बाहेरच्या जागेत नानांचा वर्कशॉप होता आणि तिथे मशीन वाईंडिंग वगैरे कामे सतत चालायची. परिणामी घरात बऱ्याचवेळा तांब्याच्या कॉइल्स असायच्या. त्या नारायण चोरायचा आणि आपल्या गादीत लपवून ठेवायचा!! नानांना संशय होता आणि एकदा नानांनी त्याला विचारले. अर्थात नारायण कडून नकारघंटा. तरी एकेरात्री नानांनी त्याला गादी दाखवायला आणि सगळं "ऐवज" बाहेर आला!! अर्थात घरात भांडण सुरु झाले, इतके की बाहेर बहुदा आवाज गेला असावा. कारण दुसऱ्या दिवशी बाजूच्या पारशांनी विचारणा केली होती. इतके होऊनही आई/नानांनी त्याला घरात सांभाळला होता कारण आम्ही तिघेही वयाने फारच लहान होतो, आईची नोकरी चालू होती. पुढे असे प्रकार वाढत गेले तशी नानांनी त्याला काढून टाकला. वाडीत तो "धैर्यवान" कुटुंबात कामाला गेला पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्याप्रमाणे त्या घरातही त्याने चोरी केली. मग मात्र तो वाडी सोडून गेला. आमचा काहीच संपर्क उरला नाही. या सगळ्यांच्या आधी, घरात नानांनी पाणी गरम करायचा हीटर आणला होता. धातूची वर्तुळाकार आतून पोकळ अशी नळी होत. ती पाण्यात टाकायची आणि इलेक्ट्रिक बटन ऑन करायचे! हळूहळू ती नळी तापत जायची आणि पाणी गरम व्हायचे. अर्थात पाणीपुरेसे गरम झाल्यावर स्विच बंद करायचा आणि हीटर थंड होईपर्यंत पाण्यात ठेवायचा आणि मगच काढायचा. मी एकदा भयानक अगोचरपणा केला होता. पाणी गरम झाले, स्विच ऑफ झाला होता पण हीटर थंड झाला नव्हता आणि मी हीटर बाहेर काढला. कुठेतरी हलगर्जीपणा झाला आणि त्या हीटरचा पोटाला स्पर्श झाला!! अजूनही त्यावेळी अंगातून उठलेला वेदनेचा लोळ आठवत आहे. अर्थात जिथे तप्त हीटरचा स्पर्श झाला, ती जागा पोळून सुजली होती. माझे वय बहुदा ६,७ वर्षे असावे. माझा थयथयाट तर सुरु झाला पण प्रथम आईने मला गप्प केले आणि नानांनी घरातील एक मलम की औषध लावले. थोड्या वेळाने वेदना कमी व्हायला लागल्या पण भाजलेला व्रण मात्र पुढे काही महिने अंगावर बाळगून होतो. हळूहळू आमची वये वाढत होती. घरात नवीन घर घ्यायचे विचार सुरु झाले आणि १९६९ मध्ये आमच्या समोरील एक इमारत पूर्ण दुरुस्त होत होती. त्याचा मालक, नानाच्या ओळखीचा झाला आणि त्याच्याकडून आम्हाला चौथा-शेवटचा मजला मिळाला. अर्थात हळूहळू घरातले सामान वरच्या घरात गेले आणि माझा त्या घराशी असलेला संबंध तुटला. माझी जवळपास १० वर्षे या घरात गेली होती. खरंतर आणखी देखील आठवणी असतील पण आत्ता तरी इतक्याच आठवत आहेत पण त्याने माझे बालपण ढवळून काढले, हे नक्की.

Monday 10 July 2023

स्थलांतरित नागरिकत्व

दुसऱ्या देशात स्थलांतर करणे आता जवळपास सगळ्या देशात मान्य झाले आहे. स्थलांतरीत व्यक्ती या साधारणपणे, आर्थिक,भौतिक सुख डोळ्यासमोर ठेऊन इतर(मुख्यतः प्रगत देशात) देशात जात असतात. आता प्रगत देशाचे काही प्रश्न असतात. प्रगत देशात शक्यतो मजुरी करणारे फार महाग असतात कारण तिथले कडक कायदे. स्थलांतरित व्यक्ती या, आपल्या देशातील एकूणच परिस्थिती बघून, राहणीमान, वेतन इत्यादी बाबींत, त्यामानाने "स्वस्त"उपलब्ध होतात. स्थलांतरितांना नवीन देशात, स्थायिक व्हायचे असते आणि त्यासाठी त्यांची मेहनत करायची तयारी असते. याचाच फायदा स्थानिक लोकं घेतात आणि त्यांना स्वस्तात पडून घेतात. काही उदाहरणे देतो. मी बरीच वर्षे साऊथ आफ्रिकेत काढली असल्याने, तिथल्या स्थलांतरित लोकांचे प्रश्न किती गहाण आहेत, याची कल्पना आली. इतिहासात फार मागे जायचे झाल्यास, १८५० साली, भारतातून साऊथ आफ्रिकेत, तिथल्या उसाच्या शेतात काम करण्यासाठी, प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि आताचे तामिळनाडू, इथून असंख्य मजूर कामाला नेले आणि त्यांच्याकडून वेठबिगारी कामे करवून घेतली.त्यावेळी भारताची स्थिती ब्रिटिशांनी हलाखीची केली होती, विशेषतः वर निर्देशित राज्यांची परिस्थिती तेंव्हाही हलाखीची असल्याने, तिथले मजूर, ब्रिटिशांना खूपच स्वस्तात मिळाले. डर्बन, पीटरमेरित्झबर्ग सारख्या शहरातील भारतीय लोकवस्तीचे मूळ हे इथे आढळते. अर्थात त्यावेळी आणि आजही, भारतापेक्षा तिथे परिस्थिती केंव्हाही चांगलीच आहे. असाच प्रकार ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे देखील केला. यात एक मेख आहे. मुख्यतः आर्थिक बाब आहे. भारतीय माणसे, स्थानिक लोकांपेक्षा स्वस्तात काम करायला तयार असतात कारण आपण भारतीय, कुठेही गेलो तरी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याइतके लवचिक असतो. अगदी पांढरपेशे भारतीय घेतले तरी, आपली वागणूक तशीच राहते. वास्तविक ऑफिसमध्ये काम करणारे भारतीय उच्च शिक्षित तसेच प्रचंड मेहनत करणारे असतात , प्रसंगी ऑफिसवेळ संपली तरी ऑफिसमध्ये काम करायला तयार असतात पण साऊथ आफ्रिकेतील गोरे, त्याबाबत अतिशय ताठर असतात. घड्याळात संध्याकाळचे ४.३० किंवा ५.०० वाजले की लगेच ऑफिस सोडणार. आपण भारतीय प्रसंगी रात्री उशिरापर्यंत काम करीत बसणार!! त्यातून एकुणात वेतनाचा मुद्दा बघितला तर गोऱ्या माणसापेक्षा आपण भारतीय स्वस्तात नोकरी करायला तयार असतो. पुढे एकदा का "नागरिकत्व" मिळाले की मग हळूहळू आपण, आपली नखे बाहेर काढतो. परंतु तोपर्यंत कंपनीचा मालक देईल ते काम स्वीकारत असतो. प्रगत देशात कामगार कायदे अतिशय कडक असतात आणि सहसा कायद्याची पायमल्ली करायला फारसे कुणी धजावत नाही. याचा परिणाम असा झाला, साऊथ आफ्रिकेत, इतर गरीब आफ्रिकन देशातून प्रचंड प्रमाणात स्थलांतरित आले, विशेषतः नायजेरियन तर लाखोंच्या हिशेबात आले. नायजेरिया कायदा पालनाबाबतीत भयानक आहे. कायदा मोडणे, हे आपले "ब्रीद"असल्याप्रमाणे सगळे वागत असतात. अशा प्रवृत्तीची माणसे साऊथ आफ्रिकेत आली, बहुतांशी बेकायदेशीर स्थलांतरित आहे. बनावट कागदपत्रे सादर करून तर कधी काही आफ्रिकन देशातील माणसे "निर्वासित" म्हणून देशात प्रवेश करतात आणि इथल्या समाजात मिसळून जातात. याच नायजेरिन माणसांनी साऊथ आफ्रिका देश आतून पोखरला आहे, इतका की आता तर रस्त्यावर देखील "ड्रग्ज" मिळतात!! प्रसंगी हिंस्र होतात, मुडदेफराशी तर वारंवार घडणाऱ्या घटना आहेत. आता तर त्या देशाने "असुक्षितता" कायमची स्वीकारली आहे, इतकी पराकोटीची परिस्थिती झाली आहे. असेच चित्र आता बऱ्याच युरोपियन देशात दिसत आहे. स्थलांतर करताना, एक प्रश्न वारंवार भेडसावतो आणि तो म्हणजे तिथली संस्कृती किती प्रमाणात आणि कशी स्वीकारायची? अर्थात हा प्रश्न प्रामुख्याने पांढरपेशा समाजाला भेडसावतो. जे स्वीकारतात ते पुढे सुखाने राहतात पण अन्यथा फार त्रांगड अवस्था होते. हे जे इतर आफ्रिकन देशातून आले, त्यांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही कारण त्यांना लपूनछपून राहण्याची सवय असते आणि बेकायदेशीर राहात असल्याने, घर नावाची वस्तू कधीच स्थिर नसते, कुटुंबकबिला नसतो. भणंग अवस्थेत राहण्याची तयारी असते. त्यातुन मग, कधीतरी एखादी स्थानिक मुलगी गटवायची आणि तिच्या सोबत "Contract Marriage" करून, नागरिकत्व पदरी पाडून घ्यायचे. एकदा का तुम्ही "Legal Citizen" झालात की मग उजळ माथ्याने समाजात वावरायला मोकळे!! बहुतेक देशात असेच चालू असते आणि असे घडत असल्याने अशा लोकांचा धीर चेपला जातो आणि गुन्हेगारी करायला मोकाट सुटतात. आज फ्रांस सारख्या अत्यंत प्रगत देशात हेच झाले आहे. फ्रांस देश हा तास मवाळ, सहानुभूती दर्शवणारा म्हणून ख्यातकीर्त आहे. शक्यतो दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावयाचे नाही की त्याच्या फंदात पडायचे नाही, अशी वृत्ती. अर्थात अशी वृत्ती बहुदा सर्वत्र आढळते आणि याचा फायदा बेकायदेशीर स्थलांतरित असतात, ते उठवतात. आज फ्रान्समध्ये प्रचंड जाळपोळ चालू आहे, कारणे असंख्य देता येतील, अगदी हिंसा करणारे आणि ती हिंसा भोगणारे. परंतु केवळ फ्रांस कशाला, बेल्जीयम मध्ये फार वेगळे चालू नाही. जर्मनीत मध्यंतरी सीरियामधील निर्वासितांनी असाच गोंधळ घातला होता. मागील वर्षी साऊथ आफ्रिकेत, डर्बन इथल्या प्रचंड मॉल मध्ये असाच धुडगूस घातला, कित्येकांचे प्राण गेले, भयानक नासधूस झाली.अगदी आगीचे लोळ उठले होते. पुढे चौकशी केली असता, बेकायदेशीर निर्वासितांचा हात होता, हे बाहेर आले. आता त्यांना शोधणे पण अतिशय जिकिरीचे असते. इतका अवाढव्य देश, किती आणि कुठले कानेकोपरे शोधायचे? त्यातून स्थानिक लोकांची देखील त्यांना साथ असते, अर्थात त्याशिवाय असा हिंसाचार अवघड म्हणा. आता हा प्रश्न जागतिक झाला आहे. त्यातून त्या देशाची घटना अशी असते, सरसकट अटकसत्र राबवता येत नाही कारण सुक्याबरोबर ओले जळण्याची भीती. ओले जळले की लगेच मीडिया कान टवकारून टीका करायला मोकळे! दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय जटील होत चाललेला आहे. आज शेजारचा देश जळत आहे म्हणून दुर्लक्ष करणे, परवडणारे नाही. उद्या आपल्या देशात अशी परिस्थिती उद्भवू शकते. मुळात, "Easy Money" चा हव्यास प्रत्येक पावलावर नडतो आणि त्यातून गुन्हेगारी बोकाळत जाते. प्रत्येक देशाची घटना स्वतंत्र असते आणि घटना बदल करायला, कुठलेच सरकार शक्यतो धजावत नाही कारण राजकारणात त्यांना देखील स्थिर व्हायचे असते. स्थलांतरितांच्या प्रश्नांचे असंख्य कंगोरे आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर असंख्य अडथळे आहेत., हेच खरे.