Tuesday 30 June 2020

नॅशनल क्रुगर पार्क - भाग १

एकूणच आफ्रिका खंड म्हटले की लगेच Wild Safari सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते, विशेषतः केनयामधील नैरोबी शहराजवळील "मसाई मारा" तर जगप्रसिद्ध आहे. दुर्दैवाने मला काही तिकडे जाता आले नाही परंतु साऊथ आफ्रिकेच्या उत्तर सीमेला लागून असलेले नॅशनल क्रुगर पार्क मात्र बघता आले. एकूण १,२०० Sq.Km. इतका प्रचंड परिसर आहे. अर्थात या परिसरातील ७०० कि.मी. परिसर बोट्स्वाना देशात येतो तर उरलेला ५०० कि.मी. साऊथ आफ्रिकेत येतो. तुमच्याकडे जर का साऊथ आफ्रिकेचा अधिकृत व्हिसा असेल तर बोट्स्वाना इथे जाता येते. आता इतका विस्तीर्ण परिसर बघायला म्हणजे जवळपास कमीत कमी ७ दिवस/रात्र तर हवेतच, त्यातून सगळी जनावरे रात्री/मध्यरात्री बाहेर पडतात. हा सगळा परिसर स्वतःच्या जीवावर करायचा असतो. उद्या कुणी हिंस्र जनावराने हल्ला केल्यास, सरकार जबाबदार नसते. तुम्ही उघडी जीप नेऊ शकता किंवा तुमच्या नेहमीच्या वापरातली गाडी नेऊ शकता. तिथे भाड्याने गाड्या मिळण्याची सुविधा आहे पण त्यासाठी पैसे मोजायला लागतात. बहुतेकजण जंगलाच्या आधी एखाद्या जवळच्या हॉटेलमध्ये जागा आरक्षित करतात. अर्थात ६,७ दिवस इथे राहायला यायचे म्हणजे तितकी सुटी घ्यायला हवी आणि अशी सुटी फक्त ख्रिसमस मध्येच मिळू शकते. 
मी २००५ मध्ये रस्टनबर्ग(इथेच जगप्रसिद्ध सन सिटी आहे!!) इथे नोकरीसाठी आलो असताना प्रथम संधी साधली. एकतर या शहरापासून क्रुगर पार्क साधारणपणे १,००० कि.मी. दूर आहे. जोहान्सबर्ग इथून १५० कि.मी. कमी पडतात पण तेंव्हा जोहान्सबर्ग माझ्या दृष्टीक्षेपात नव्हते. इथे मी नोकरी करीत असताना काही भारतीय मित्र ओळखीचे झाले आणि आम्ही सामायिक गाडी काढून क्रुगर पार्कचा बेत आखला. डिसेंबरमध्ये हॉटेल मिळवायचे झाल्यास, कमीत कमी ३ महिने आधी जागा आरक्षित करावीच लागते. आयत्या वेळी जायचे ठरवल्यास, कुण्या कुटुंबात आसरा घेणे आवश्यक ठरते पण मग तुमच्या थोडी बंधने पडतात. इथे तर आम्ही तिघे मित्र सडाफटिंग म्हणजे मीच एकटा लग्न झालेला, बाकीचे तेंव्हा विशीच्या आसपास होते. हातात गाडी आहे तेंव्हा सामान कुठे,कसे ठेवायचे हा प्रश्नच नसतो. २४ डिसेम्बरला सकाळीच निघालो. मध्ये पीटर्सबर्ग शहर लागले आणि तिथे जेवण घेतले. डिसेंबर महिना म्हणजे कडाक्याचा उन्हाळा त्यामुळे अंगावर शॉर्ट आणि टी शर्ट घातले होते. साऊथ आफ्रिकेत एक पद्धत चांगली आहे. तुम्ही जर का क्लबमध्ये किंवा भपकेबाज समारंभात जात नसाल तर कुठेही शॉर्ट घातलेली चालते मग पंचतारांकित मॉल असले तरी काही फरक पडत नाही. मी तर सन सिटीसारख्या अतिशय महागड्या हॉटेलमध्ये सर्रास शॉर्ट घालून हिंडत असे. आता अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात बियर पिणे हा अत्यावश्यक सोहळा असतो तरीही प्रमाणातच घ्यावी लागते अन्यथा पोलिसांनी, गाडी चालवताना पकडले तर सरळ तुरुंगात रवानगी!! साऊथ आफ्रिकेत Drunk n Drive अपघाताचे प्रमाण प्रचंड आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी भीषण अपघात झाला नाही!! एकतर रस्ते अतिशय गुळगुळीत, त्यामुळे गाडी वेगाने चालवायचा मोह होतो त्यातून गाडी चालवणाऱ्याची अवस्था "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशा प्रकारची!! 
असो, पिटर्सबर्ग वरून आम्ही थेट क्रुगर पार्क इथे पोहोचलो. पोहोचायला संध्याकाळ झाली होती. आम्ही हॉटेलमध्ये जागा आरक्षित केल्या असल्याने, सरळ जागेचा ताबा घेतला आणि श्रम विहार सुरु केला. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टनेच आम्हाला कुठे आणि कसे जायचे याची संपूर्ण माहिती दिली. रात्र झाली तशी गाडी काढली. आता आम्ही माणसाच्या जगातून जनावरांच्या जगात शिरत होतो. सगळीकडे मिट्ट काळोख होतो आणि आम्हाला महत्वाची सूचना मिळाली होती, गाडीचे हेड लाईट्स शक्यतो झगझगीत ठेवू नयेत कारण समजा दिव्यांचा प्रकाश जनावरांच्या डोळ्यात शिरला तर जनावरे बिथरू शकतात. सुरवातीलाच आफ्रिकन झेब्रे घोळक्याने दिसले. चांगलेच दणकट वाटले. त्यांच्याकडे बघून असे मनात आले, या जनावरांना आता माणसांच्या काही सवयीची सवय झाली असावी कारण गाडीचा लाईट कितीही कमी ठेवला तरी अंधारात त्याचा प्रकाश चमकणारच. तसे बघायला गेल्यास झेब्रा हा प्राणी निरुपद्रवी त्यातून रात्रीची वेळ म्हणजे त्यांची, बाहेर फिरायला जायची वेळ!! जवळपास १०, १२ तरी असावीत. अर्थात आम्ही काही झेब्रे बघायला इथे आलो नसल्याने थोडा वेळ गाडी थांबवून पुढे निघालो.गाडी पुढे जात असताना अचानक लक्षात आले, तिथे एक पाणथळ होता आणि त्या पाणथळाकाठी झेब्र्यांचा घोळका पाणी प्यायला आला होता. 
पुढे जवळपास १० मिनिटे गाडी चालवली पण नावाला एक जनावर दृष्टीस पडले नाही!! इथे गाडीच्या वेगावर निश्चित मर्यादा होती त्यामुळे आजूबाजूचा परिसर व्यवस्थित न्याहाळता येत होता. अचानक जरा दूर अंतरावर हत्तींचा कळप दिसला. हत्ती शक्यतो घोळक्याने वावरतात असे वाचले होते, त्याचे प्रत्यंतर बघायला मिळाले. भारतातील हत्तींपेक्षा इथले हत्ती चांगलेच धिप्पाड, मजबूत दिसले. अर्थात गाडी तशी सुरक्षित अंतरावर ठेवली होती. घोळक्यात अनेक आकाराचे हत्ती होते आणि चाल अत्यंत संथ होती. काही हत्ती ठार काळे होते तर काही करडे असावेत असे वाटले कारण एव्हाना काळोख दाट पसरला होता. आमची गाडी जरी लांब असली तरी एकूण अवाढव्य आकारमान, काळजात धडकी भरवणारे होते. 
इथे एक नियम पाळायचा असतो, गाडी कुठंही प्रमाणाबाहेर थांबवायची नसते. जनावरांना  तितका इशारा पुरेसा ठरू शकतो. या जंगलात जागोजागी एकतर पाणथळ आहेत किंवा तलाव केले आहेत जेणेकरून जनावरांना पाणी पिणे सोयीचे होऊ शकते. आता आम्ही मोबाईलचे Flash Light सुरु केले होते. बराच वेळ गाडी फिरवली पण निराशा पदरी पडत होती. आम्हाला असेही सांगण्यात आले होते, तुम्हाला मनाचा बांध घालायलाच हवा, वाट बघायलाच हवी कारण हिंस्र जनावरे ही मध्यरात्रीनंतर बाहेर पडतात!! अर्थात तरीही बघायला मिळतीलच असे नाही. आम्हाला चित्ता शेवटपर्यंत बघायला मिळाला नाही. अगदी ४ रात्री आम्ही तिथे घालवून देखील. पुढे हरणांचा घोळका दिसला. लांबून प्रकाश दिसल्यावर उधळायला लागला. अर्थात उड्या मारणारे हरीण बघायला भलतेच देखणे असते. तशी ५,६ हरणे असतील. असे ऐकले आहे की हरणांच्यात देखील पोटजाती असतात पण त्यासाठी वर्षानुवर्षे घालवावी लागतात. इथे मी फक्त ६ दिवस आलेला तेंव्हा आणखी किती बारकाईने बघणार!! पुढे बराच वेळा गाडी चालवल्यावर अच्चनक एका मोठ्या तळ्यापाशी आलो आणि पाण्यात काहीतरी हालचाल दिसली. सुदैवाने तिथे आमच्यासह आणखी ३ गाड्या होत्या. जरावेळाने जनावराचे डोके आणि शिंग बाहेर आले आणि क्षणात पाणी उसळून महाकाय "हिप्पो" पाण्यातून बाहेर आला. मनाशी कल्पनाच नव्हती असले जनावर बघायला मिळेल. एव्हाना पहाट व्हायला लागली होती म्हणून आम्ही परत हॉटेलवर परतलो. 

Sunday 28 June 2020

सुंदर ते ध्यान

सांगीत आविष्कारातील उच्चतम आविष्कारापर्यंत म्हणजे गीतापर्यंत पोहोचणे ही एक दीर्घ प्रक्रिया असून त्यात इतर अनेक व दरम्यान होणाऱ्या प्रक्रिया अंतर्भूत असतात. या शिवाय प्रत्येक क्रियेस आपापली अविष्कारक क्षमता असते. कृती करणाऱ्याच्या निर्मितीक्षमतेवर आणि ग्रहण करणाऱ्याच्या ग्रहणक्षमतेवर या प्रत्येक क्रियेने महत्वाची भूमिका बजावली आहे. 
या परिप्रक्ष्येत एकसुरीपणापासून दूर जाणे, हे संगीतनिर्मितीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय. कंठसंगीत आणि वाद्यसंगीताच्या विशिष्ट आविष्कारात पूर्णतः एकाच तारतेस चिकटून राहणे म्हणजे एकसुरीपणा असे म्हणता येईल. दुसरा टप्पा म्हणजे गुणगुणणे वा गुंजन. या क्रियेत सांगीत प्रक्रिया आकाराला आलेली असते पण तिचे प्रक्षेपण होत नाही. अर्थात काहीही असले तरी सांगीत कल्पनेचे अस्तित्व जाणवते, एक विशिष्ट घुमारा जाणवतो. या पुढे, सुनिश्चित, यशस्वीपणे प्रक्षेपित तारतांची सहेतुक रचना हा भाग येतो.सुनिश्चीतता व प्रमाणशीर पुनरावृत्ती या कारणांनी स्वरपाठ आकलनगम्य होतो. याच्या पुढे, संगीतपरता अधिक महत्वाकांक्षी होते आणि तिथे लय,वाद्ये आणि काव्य अंतर्भूत होतात. आपल्या भारतीय संगीतात ज्या ६ कोटी प्रमाणबद्धता केलेल्या आहेत त्यात धर्मसंगीत या कोटीशी वरील विवेचन फार जवळून लागू पडते.  
भक्तिसंगीत हा आविष्कार याच कोटीतील अत्यंत महत्वाचा आविष्कार आहे. भारतीय संगीत भक्तिपर आहे. अर्थातच हे विधान काहीसे एकांगी आहे. याचे कारण नं. १) भक्तिपर संगीताची स्वतंत्र अशी कोटी आहे, नं. २) प्रयुक्त होत असलेल्या एकंदर संगीतापैकी बरेचसे संगीत भक्तिपर आहे, असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. या बाबत असे म्हणता येईल, विशिष्ट संगीताविष्कार सादर करीत असताना संगीतकाराची मनोवस्था भक्तिपर आहे/होती म्हणून संगीत भक्तिपर ठरत नाही. सादरीकरणातील सांगीत आशय आणि साचे, बहुसंख्य आणि गुणबहुल संगीतरचनांच्या संचांशी निगडित होतात. भक्तिसंगीत या कोटीस हाच न्याय लागू होतो.
आजचे आपले गाणे हे याच पातळीवरून आस्वादायचे आहे. संत तुकारामांच्या रचना या, कविता या पातळीवर अजोड ठरतात आणि याचे कारण त्यातील स्पष्टवक्तेपणा, रचनेतील गेयता आणि अर्थपूर्ण आशय. वास्तविक पाहता,महाराष्ट्रात "विठ्ठल" या देवाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि बहुतेक संतकाव्य हे याच कल्पनेभोवती फिरत आहे. आता, भक्ती म्हटले म्हणजे त्यात प्रेम,आळवणी तसेच आर्त विरह इत्यादी सगळ्या भावभावना येतात. आजच्या कवितेत हाच भाव सर्वत्र आढळत आहे. खरतर संतकाव्य हे नेहमी कवितेच्या अंगाने आस्वादले गेले पाहिजे परंतु आपल्याकडे बरेचवेळा भावनिक अंगानेआस्वादण्याची क्रिया केली जाते आणि यात कवितेचा मूळ हेतू बाजूला राहतो आणि बाह्य आकर्षणाने कवित्व गाजले जाते. तुकारामांच्या कवितेत नेहमीच शब्दांतून लय सापडत जाते आणि तीअंतिमतः गीतत्वापर्यंत पोहोचते. एक तर ही अल्पाक्षरी कविता आहे, त्यामुळे इथे प्रत्येक शब्दाला बहुश्रुत अर्थ प्राप्त होऊ शकतो. विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन आणि त्या दर्शनाप्रतीची समर्पण भावना, इतपत या अभंगातील आशयाचा अर्थ काढता येऊ शकतो. आता हे एकदा नक्की झाल्यावर, पुढे "पितांबर","मकरकुंडले" अशी बाह्य आकर्षणे इथे अंतर्भूत होतात आणि ते, भक्तिभाव म्हटल्यावर साहजिकच होते. एकदा का काव्याची मध्यवर्ती संकल्पना लक्षात आल्यावर मग पुढे शब्दांचा, प्रतिमांचा अन्वयार्थ लावणे सुलभ जाते. 
संगीतकार श्रीनिवास खळ्यांनी स्वररचना करताना नेहमी कवितेचा आधार हेच प्रमाण मानले. वास्तविक पहाता संत रचना संगीतबद्ध करणे फार पूर्वीपासून चालू आहे आणि प्रत्येक संगीतकार आपापल्या मगदुराप्रमाणे चालींची निर्मिती करीत होता आणि अशा परिस्थितीत पुन्हा त्याच शब्दकळांना नव्याने चाल देणे म्हणजे एकंदरीत पुनर्रचना करणे होय. खळेकाकांनी हे आव्हान अप्रतिमरीत्या पेलले. यमन रागावर आधारित स्वररचना आहे. खळे काकांनी  चालीसाठी नेहमीच पारंपरिक रागांचा आधार घेतल्याचे दिसते. उदाहरणार्थ आजच्या गाण्यासाठी वापरलेला यमन राग किंवा इतर ठिकाणी त्यांनी तोडी, पुरिया धनाश्री सारखे प्रचलित राग वापरल्याचे दिसून येते. झांजेच्या आवाजाने रचना सुरु होते आणि पुढे स्वरमंडळाच्या सुरांत डौलदार ठेका सुरु होतो. खळेकाकांच्या रचना या लयीच्या अंगाने अवघड असतात असे सहज विधान केले जाते पण याचा नेमका अर्थ काय? तालाच्या मात्रेतून एक लय निर्माण होत असते आणि ती लय, स्वरिक पातळीवर जोडून घ्यायला लागते आणि तिथेच खळेकाका गंमत करतात. या गाण्याचा मुखडा ऐकायला घेतल्यावर, या विधानाची प्रचिती घेता येते. मध्य लयीत ठेका सुरु होतो मुखड्याची दुसरी ओळ घेताना शेवटचा शब्द "ठेवोनिया" गाताना किंचित लांबवला आहे आणि हे जे किंचित लांबवणे आहे तिथे समेची मात्रा गाठली जाते. पहिला अंतरा ऐकताना, एकतर वेगळ्याच सुरावर "उठावण" आहे आणि ती "बिकट उठावण" घेताना लयीतील स्वर प्रत्येक ठिकाणी किंचित लांबवला आहे. हे लयीत सांभाळणे कौशल्याचे असते आणि इथे खळेकाकांची गाणी अवघड होऊन बसतात. अन्यथा चालीतील गोडवा तर लगेच रसिकांच्या मनावर गारुड घालतो. प्रत्येक अंतरा वेगळ्या सुरांवर बंधने हे निश्चितच असामान्य सर्जनशीलतेचे द्योतक मानायला हवे. अशा ठिकाणी "अर्धी हरकत" किंवा "अर्ध तान" या सांगीतिक सौंदर्याचा आढळ दिसतो. आणखी गंमत म्हणजे प्रत्येक अंतरा सुरु होताना मुखड्याच्या लयीशी समांतर आहे परंतु पुनरावृत्त करताना लय दुगणी करून स्वररचना पारंपरिक सांगीतिक सौंदर्याशी आणून सोडली आहे. 
अशी बुद्धीगामी स्वररचना गायला लताबाईंचा गळा मिळावा यासारखा सुंदर योग नाही. लताबाईंच्या गायन कौशल्याचा पुरेपूर वापर या गाण्यात झालेला दिसतो. क्षणात वरच्या सुरांत तर लगोलग खालच्या सुरांत वावरणे हे मुळात अतिशय कठीण असते आणि इथे तर तुकारामाची रचना आणि खळेकाकांची चाल म्हटल्यावर शब्दांचे औचित्य आणि चालीचा बिकट प्रवास सांभाळणे, या दोन्ही बाबींवर वावरणे कठीणच असते. साधारणपणे भक्तिसंगीतात समर्पणाचा भाव अधिक दृग्गोचर होत असतो आणि इथे तर काव्यात हाच भाव प्रामुख्याने दिसत आहे. अशा वेळेस गायकीतून तोच भाव नेमकेपणाने लताबाईंनी दर्शविलेला आहे. आज हे गाणे प्रसिद्ध होऊन जवळपास अर्ध शतक उलटून गेले तरीही या गाण्याची लोकप्रियता आणि गोडवा रतिभर देखील कमी झाला नाही. यावरून एक विधान नक्की करता येते. जे काही लोकप्रिय असते त्यात सवंगता असते किंवा मार्केटिंगचा भाग अधिक असतो, असे सरसकट मत मांडण्यात येते आणि या मताला पूर्णपणे डावलून टाकण्यात या गाण्याने यश मिळवले आहे. 



सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 
कर कटावरी ठेवोनियां 

तुळसी हार गळा कासे पितांबर 
आवडे निरंतर तेंचि रूप 

मकरकुंडले तळपती श्रवणी 
कंठी कौस्तुभमणि विराजित 

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख 
पाहीन श्रीमुख आवडीने 


Friday 26 June 2020

एक सुन्न करणारा अनुभव

आपल्याकडे अजूनही खऱ्याअर्थाने हुकूमशाही, दमनशाही फारशी कुणीही अनुभवलेली नाही. अर्थात मी देखील अनुभवलेली नाही परंतु परदेशी राहताना, सलग २ वर्षे मला एक गुजराती शेजारी भेटला होता. सुरवातीला फारसा बोलायचं नाही - नाव मुद्दामून टाळत आहे. जवळपास घुम्याच होता. सकाळी ऑफिसला निघताना, नजरभेट व्हायची आणि काही दिवसांनी ओठांवर स्मित फुटायला लागले. वयाने माझ्याच इतका होता - बहुदा अजूनही तो साऊथ आफ्रिकेत राहात असावा. अंगाने शिडशिडीत, रंगाने उजळ, दिसायला टिपिकल गुजराती आणि अर्थात हिंदी, गुजराती भाषा अस्खलित बोलायचा. जवळपास महिनाभर आमची "नजरभेट" इतकाच संवाद - संवादाची पायरी पुढे सरकायचीच नाही.
एकदा, एका शुक्रवारी संध्याकाळी, मीच थोडा पुढाकार घेतला आणि त्याला घरी कॉफी घ्यायला बोलावले. लगेच तयार झाला. मला, सुरवातीला वाटले होते , हा भारतातूनच आला असणार आणि इथले टिपिकल युरोपियन वातावरण बघून काहीसा बुजला असणार!! परंतु पहिल्याच भेटीत त्याने, "मी युगांडातून निर्वासित म्हणून पळून आलो. तिथे मी १५ वर्षे बिझिनेस केला." इतपत सांगितले.
आता गुजराती आणि परदेशी इतकी वर्षे वास्तव्य, म्हटल्यावर इतपत सहजपणे गृहीत धरता येत होते. याचा प्रत्यक्ष अनुभव मी डर्बन इथे राहात असताना घेतलेला होता. स्थिरस्थावर झालेला गुजराती हा बव्हंशी बिझिनेस करायलाच नेहमी उद्युक्त होत असतो!! वास्तविक, माझा शेजारी,हा त्याच्या वडिलांच्या बिझिनेसमध्येच शिरला होता. त्याचे वडील १९७० मध्ये "कंपाला" या राजधानीच्या शहरात आले. आले त्यावेळी खिशात रोजच्या खर्चाला पुरतील इतकेच पैसे होते. आल्यावर तिथेच नोकरी पकडली, हळूहळू आपल्या कुटुंबाला कंपाला इथे आणले आणि स्थिरस्थावर व्हायला लागले. अर्थात, १९७५ मध्ये धंद्याच्या खाचाखोचा समजावून घेतल्या आणि स्वतंत्रपणे धंदा सुरु करायचे ठरविले. आत्तापर्यंतचा अनुभव हा कपड्यांच्या व्यवसायात घेतलेले असल्याने, त्यांनी त्याच व्यवसायात उडी घेतली.
इथे एक बाब समजून घेण्यासारखी आहे, पहिली नोकरी गुजराती माणसाकडे केली होती आणि जेंव्हा त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु करायचे ठरवले तेंव्हा देखील आजूबाजूच्या गुजराती व्यावसायिकांनीच मदत केली!!  सुदैवाने लगेच धंद्याला "बरकत" आली. अर्थात हे सगळे मला नंतरच्या भेटींत कळले. सुरवातीला "घुम्या" वाटणारा हा गुजराती, नंतर बराच मोकळा झाला, इतका की नंतर तो माझ्याबरोबर ड्रिंक्स घ्यायला लागला - जेवायला मात्र फक्त व्हेज!! असो,
पुढे ईडी अमीनची निर्दयी राजवट सुरु झाली. कुठेही कसलाच धरबंध नव्हता. त्यावेळी याचे वय होते २०!! नुकतीच वडिलांना धंद्यात मदत करायला सुरवात केली होती आणि व्यवसाय इतर देशांत फैलावत होता!! अशाच एका बैठकीत त्याने, अक्षरश: अंगावर शहारे आणणारे अनुभव सांगितले. अशीच एक दुर्दैवी सकाळ उगवली आणि घरात ईडी अमीनचे सैनिक घुसले!! कसली नोटीस नाही, कसले फर्मान नाही. दरवाजा ठोठावला आणि किंचित उघडलेल्या दारातून आता शिरले. हातात रायफल्स!! सकाळचे जवळपास ९ वाजले होते. त्यांना काय हवे आहे, हे विचारायच्या आधीच त्यांनी वडिलांना गोळ्या घातल्या!! तिथल्या तिथे वडील रक्ताच्या थारोळ्यात!! घरातले सगळेच गर्भगळीत. रडायची देखील सोया नाही. मुलाला, त्याच्या बेडरूममध्येच समजले, घरात सैनिक घुसले आहेत. मुलगा तसाच बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडला. पाठोपाठ बाईच्या आवाजाची किंकाळी ऐकायला मिळाली आणि घर संपल्यातच जमा झाल्याचे त्याला समजले. तसाच रस्त्यावर धावत सुटला. काय करायचे, कुठे जायचे? काही समजत नव्हते. इथून सुखरूप बाहेर पडणे, आताच विचार!!
थोडा वेळ एका दुकानापाशी थरथरत उभा राहिला. तितक्यात एका उघड्या जीपमध्ये आई आणि बहीण, यांना पहिले!! आपलीच आईला, आपलीच धाकटी बहीण पण आपण काहीही करू शकत नाही, अशी असहाय जाणीव झाली. आजतागायत कुठे आहेत, याचा पत्ता नाही. एका बैठकीत त्याने अत्यंत थंड सुरांत सांगितले - आता जर माझ्या समोर दोघी उभ्या राहिल्या तर मी ओळखणार देखील नाही!! आई, बहिणीला उचलून नेल्याचे बघितल्यावर त्याच हताश अवस्थेत मी ओळखीच्या गुजराती माणसाच्या घराचा दरवाजा ठोठावला.
कुणीही दरवाजा उघडायला तयार नव्हता - बरोबर आहे, बाहेर कोण आहे? हाच प्रश्न!! अखेरीस मी जोरात हाक मारली तशी किंचित दरवाजा उघडला गेला आणि मी अक्षरश: घरात घुसलो. घरात एकमेव म्हातारी आजी होती. दोनच दिवसांपूर्वी, यांच्या घरातील प्रसंग त्या घरात घडला होता. त्या बिचाऱ्या म्हातारीला तर काय करावे हेच सुचत नव्हते. मी अधिकच गर्भगळीत. तसाच घराच्या बाहेर पडलो कारण आता फक्त अस्तित्व हेच महत्वाचे. रस्त्यावर नुसता गोंधळ उडाला होता आणि कुणीच कुणाला विचारीत नव्हते. अवघी गुजराती वस्ती संपूर्णपणे उजाड झाली होती. चार दिवस रस्त्यावर झोपून काढले आणि लपतछपत अखेर
सरळ बँक गाठली आणि जेमतेम ५०० डॉलर्स हातात घेतले आणि सरळ कंपाला बंदर गाठले. तिथून नायजेरिया - लागोस बंदर गाठले. बंदरावरच निर्वासित असल्याचा दाखला दाखवला आणि लागोस मध्ये प्रवेश केला!! १९८२ मध्ये नायजेरिया देश संपन्नावस्थेत होता. नोकरी धंद्यांच्या भरपूर सुविधा होत्या. लागोस मध्ये सुदैवाने, एका सिंधी माणसाची दुरून अशी ओळख निघाली. कंपालातील व्यावसायिक संबंध इथे उपयोगी पडले.
त्यावेळी नायजेरिया खूपच प्रगत देश होता. वातावरण जरी युगांडासारखे असले तरी तेंव्हा राज्यव्यवस्था बरीच स्थिर होती. तिथे सलग १६ वर्षे काढली. हळूहळू नायजेरिया देखील मरणपंथाला लागला होता - अर्थात हा अनुभव मीच घेतलेला होता. मी देखील त्याला माझे १९९२/९३ मधील अनुभव सांगितले. लागोसला देखील त्याला दडपशाहीचा विदारक अनुभव आला परंतु  एव्हाना तो बराच अनुभवी झाला होता. शहाणपणाने त्याने आपले चंबूगबाळे आवरले आणि साऊथ आफ्रिकेचा रस्ता धरला.
या सगळ्या अस्थिरतेच्या धावपळीत त्याचे लग्न करायचे राहून गेले. त्याने लागोसचे विदारक अनुभव सांगितले पण मला त्यात काही नवल वाटले नाही कारण माझ्या २ वर्षांच्या कालावधीत मी देखील जवळपास असेच अनुभव घेतले होते. आता जरी साऊथ आफ्रिका त्याच  मार्गाला लागला असला तरी (ही घटना २००७ मधील) त्याच्या मते आता दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नाही!!

Wednesday 24 June 2020

मदन मोहन

आपला जन्म कुठं व्हावा तसेच आपले प्राक्तन काय आहे? याचा गुणसूत्रानुसार ताळा मांडणे अशक्य. मदन मोहन यांच्याबाबतीत हे विधान फार खरे आहे. वास्तविक रायबहादूर चुनीलाल सारख्या व्यक्तीच्या घरात जन्म झालेला म्हणजे घरात चित्रपट संस्कृती पाणी भरत होती तरीही सैन्यात भरती झाले. सलग २ वर्षे तिथे काम केले. परंतु काही कारणास्तव हकालपट्टी झाली आणि १९४३ मध्ये लखनौ इथल्या "ऑल इंडिया रेडिओ" केंद्रात नोकरी पत्करली!! इथेच त्यांच्या सांगीतिक प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. इथे प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्या संपर्क झाला, ओळख वाढली आणि संस्कार झाला. 
मदन मोहन यांनी जेंव्हा आपली कारकीर्द सुरु केली तेंव्हा चित्रपट संगीताच्या प्रांगणात नौशाद, सी.रामचंद्र, शंकर-जयकिशन इत्यादी नामवंत भरात होते. असे असून देखील त्यांनी लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. वास्तविक २५ वर्षांची कारकीर्द आणि जवळपास ९० चित्रपट म्हणजे फार प्रचंड काम म्हणता येणार नाही. बहुदा त्यामुळेच असू शकेल त्यांना आपला दर्जा सांभाळता आला असावा. एक निरीक्षण, मदन मोहन पोषाखाच्या बाबतीत संपूर्ण पाश्चात्य ढंगावर गेले होते तरी संगीतात ते पूर्णपणे भारतीय वळणावर राहिले. विशेषतः उत्तर भारतीय संगीतात ते मन:पूर्वक रमले. थोडी वेगळी माहिती शोधल्यास त्यांनी संगीतकार रफिक गझनवी यांच्याकडे संगीत शिक्षण घेतल्याचे समजते पण तरीही ते नेहमी अवधानयुक्त श्रवणार्थी होते. विशेषतः बेगम अख्तर आणि बरकत अली खान यांचे ते असीम चाहते होते. वेगळ्या अर्थाने त्यांचे घराणे "लखनौ" होते असे म्हणता येईल. आणखी बारकाईने विशेष धुंडाळला तर असे हाताशी लागते - मदन मोहन यांना खरे आकर्षण हिंदुस्थानी उपशास्त्रीय म्हटल्या जाणाऱ्या रागरागिण्यांचे आणि त्यांना संलग्न असलेल्या काव्यात्मकतेतून भावनेला आवाहन करू पाहणाऱ्या प्रकारांचे होते असे म्हणता येईल. अर्थात त्यांना इतर राग अप्रिय होते असे अजिबात सुचवायचे नाही. "मैंने रंग ली आज"(पिलू), "बैंय्या ना धरो"(चारुकेशी) किंवा "जारे बदरा" आणि "जिया ले गयो जी (यमन) या रचनांचे रूप निश्चितपणे आकर्षक आहे. पण त्यांचा यासारख्या रागांकडे पाहण्याचा पाहण्याचा दृष्टिकोन मुलत: आवाहक सुरावटींच्या शोधात असणाऱ्या रचनाकाराचा होता. रागाचा विस्तार वा त्याची मांडणी करण्यात त्यांना अजिबात रस नव्हता.एकेकाळी त्यांच्यावर अनिल बिस्वास आणि सी.रामचंद्र यांचा पगडा नसला तरी प्रभाव होता असे म्हणता येईल.
या साऱ्या पार्श्वभूमीवर मदन मोहन यांची सांगीत प्रतिभा कशी प्रतीत होते याचा आढावा घ्यायचा आहे. 
१) मदन मोहन यांची प्रतिभा "गीतधर्मी" होती. थोडक्यात सांगायचे झाल्यास, अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे तरंग निर्माण करण्याची ज्यामध्ये अंगभूत ताकद असते अशा काव्याला प्रतिसाद म्हणून रचनाकार जेंव्हा एखादी भावपूर्ण सुरावट उभी करतो तेंव्हा तिथे गीत संभवते. मात्र आपल्या बांधणीमुळे सांगीत विस्तार अपरिहार्य वाटणार वा ठरणार नाही याची गीतरचनाकारास काळजी घ्यावी लागते. मदन मोहन तुमरीकडे न वळता गझलकडे का वळले हे यावरून स्पष्ट होऊ शकते. 
२) गीतधर्मी रचनाकार लयबंधापेक्षा सुरावटींकडे आणि प्रवाही चलनांकडे झुकतात. लयबंधाच्या वा तालाच्या, ठळक वा ढोबळ आणि मुख्यतः कालिक अक्षावरील वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते तिच्यापेक्षा स्वनरंगातले सूक्ष्म भेद दाखवून अनुभवास येणारी गतिमानता ते पसंत करतात. 
३) प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात गीत आणि गझल यात फरक केला पाहिजे. अर्थात गझल हा गीतप्रकार आहे हे मान्यच करायला हवे. एक हमखास जाणवणारा धूसर हळवेपणा प्रकट करण्यावर गझलचे लक्ष अपरिहार्यपणे केंद्रित असते. सैलपणे किंवा काहीशा विरोधसंबंधदर्शक अशा दोन, दोन चरणांची मांडणी करत कविता उभी करण्याचे तंत्र. त्यामुळे आशयाची अनेक केंद्रे निर्माण करणे गझलला जमते. 
उदाहरणार्थ "नैना बरसे" (वो कौन थी) हे गीत ध्यानात घेतले तर काही विशेष मांडता येतील. (१) गझलची बांधणी न वापरणे, (२) मुखडा समोर ठेवत असल्याचा अनुभव न देता एकदम सुरावटीत बुडी मारणारे चलन, (३) एकामागोमाग येणाऱ्या कडव्यांचे पट्टी बदलून गायन आणि नकळत पुन्हा मूळ पट्टीकडे येऊन तणाव-विसर्जन करून गीत समाप्ती करणे. 
४) मदन मोहन यांच्या रचनांचे काही मुख्य सांगीत विशेष गझलच्या घटकांशी वा बांधणीशी थेट संवादी असावेत हे नवल नाही. उदाहरणार्थ (अ) त्यांच्या रचनांचे मुखडे गुणगुणत राहावे असे असतात.(ब) मुखड्यानंतर येणारी कडवी अशी असतात की ज्यांचा उद्भव साखळीतील दुव्यांप्रमाणे कार्यरत असलेल्या वाद्यवृंदाच्या आगमनाशिवाय सहज, नैसर्गिकपणे शक्य असतो. 
५) चालीस आधारभूत म्हणून व्याकरणसिद्ध वा विरळा स्वरचौकटींची योजना करण्याचा सोस नसल्याने यमन, भैरवी यांसारखे आम राग वा धनुराग म्हणून ओळखले जाणारे इतर राग यांच्या योजनांवर मदन मोहन संतुष्ट असतात. सैलसर,गतिविविध व इतरांचे स्वागत करणारी बांधणी हे या प्रकारच्या स्वर-चौकटीचे विशेष होय. काही गाणी आपण नजरेखालुन घालूया. (अ) हमसे आय ना गया (बागेश्री), (ब) बैरन नींद ना आये (बागेश्री कानडा), (क) रस्मे उल्फत को निभाये (मधुवंती), (ड) उनको यह शिकायत  है (मालगुंजी), (इ) तू जहाँ जहाँ चलेगा (नंद) 
६) मदन मोहन यांच्या संगीताला वेदनेचे प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्या संगीतरचना कधीही चैतन्यमय चलनांतून उसळणाऱ्या वाटत नाहीत. द्रुतगती लयबंध किंवा उत्साही राग इत्यादींकडे त्यांचे फारसे लक्ष नसते. त्यांच्या रचनेत नाईट क्लब गीते फारशी नाहीत याचे हे एक महत्वाचे कारण आहे. जेंव्हा त्यांनी अशा प्रकारची गीते रचली तेंव्हा त्यात ओढीपेक्षा त्यांची कर्तव्यभावना अधिक जागृत झाली असे वाटत राहते. "तुमसे नजर मिली (गीता दत्त - जागीर) किंवा "थोडी देर के लिये (आशाबाई - अकेली मत जैयो) या रचना ऐकल्यावर वरील विधानाचा प्रत्यय मिळून जातो. 
७) लयबंध वा सुरावट या दोन्ही बाबतीत त्यांच्या रचना मुद्दाम केलेल्या बांधण्या आहेत असे वाटत नाही परंतु सुरावटींबाबत ते जितके तत्पर होते तितके लयबंधांच्या शक्यता धुंडाळण्यात उत्साही नाहीत. 
८) मदन मोहन यांना नव्या स्वनरंगांचे फारसे आकर्षण आहे, नवीन वाद्ये वापरून तो आयात करावा, असे वाटत नव्हते. काहीतरी गमावल्या विषयीची धूसर हळहळ या भावस्थितीच्या वेगवेगळ्या छटा शोधीत राहणे आपल्या सांगीत कार्याचे ध्येय म्हणल्याप्रमाणे तसे झाले असावे. याच कारणामुळे त्यांच्या रचनांत वाद्यवृंदास तसेच त्यांच्या नादविश्वात फारसे स्थान नाही. कंठसंगीताचे थेटपण आणि लताबाईंच्या आवाजासारखे भावविश्वाशी सहजसंवादी वाहन मदन मोहन यांना आपल्या दिमाखदार वाटचालीस पुरेसे होते. 
एकंदरीने असे म्हणता येईल, चित्रपट संगीतातील गीतांत, मुरक्या मारत पुढे येऊ पाहणाऱ्या संगमी किंवा संयोगी गीताचा प्रभाव मदन मोहन यांच्या तीव्र तसेच अविरत गीतशोधास मानवणारा नव्हता. ऐकणाऱ्याला दिपवणे किंवा ध्वनीकल्लोळात बुडवून टाकणे त्यांना अभिप्रेत नाही. सैलसर बांधणीने भावनिक तरंगाच्या लीलेस अनुकूल स्वररचना उभारणे हे त्यांच्या संगीताचे खरे रूप होय. शवाय आपल्याला जे सांगायचे आहे त्यासाठी सांगीत व साहित्तिक स्पंद एकमेकांत गुंतलेल्या वेलींसारखे यायला हवेत याचा त्यांना ध्यास होता. कारण त्यांचे संगीत जरी चित्रपटात आले तरी ते चित्रपटांशी जखडलेले नसायचे.

Tuesday 23 June 2020

ओ मेरे सनम

दोन तरुण व्यक्तींनी प्रेमात पडणे ही सार्वत्रिक भावना आहे आणि त्यात काही फारसे नवल नाही. अर्थात प्रेमात पडणे म्हणजे सर्वस्व द्यायचे का? हा प्रश्न जरी अति वैय्यक्तिक असला तरी या प्रश्नावर ठाम असे उत्तर नाही. प्रेमात पडणे आणि आपले आयुष्य एका कारकिर्दीच्या मागे लावणे,या दोन्ही विरुद्ध बाबी ठरू शकतात. त्यातून काही (समज) गैरसमज होणे इत्यादी घटना भोलागाव्याच लागतात. अशा वेळीची संत्रस्त अवस्था ही चिरंतन असते. खरतर या परिस्थितीचे योग्य विश्लेषण एक तर अवघड असते कारण त्यात अनेक मुद्दे गुंतलेले असतात आणि दुसरे म्हणजे मानसिक विचारांचा मागोवा घेणे अशक्य असते तरीही जगभर सतत वेगवेगळ्या पद्धतीने परामर्श घेतला जातो, नवनवीन विचार प्रसूत होतात, त्यातील अपूर्णता सिद्ध होते आणि त्याच अपूर्णतेतून पुन्हा वेगळ्या थियरीज मांडल्या जातात. हा खेळ कधी संपणारा नाही आणि या चकव्यातून सुटका नाही. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधीतरी या चक्रव्यूहात गुंतला जातो, त्यात अडकतो,बाहेर पडण्याचा (विफल??) प्रयत्न करीत असतो. कधी काही वाटते, कधीतरी याच विफलतेतून सफल होणे जमू शकेल परंतु तोपर्यंत तरी मानसिक व्याकुळता हेच प्राक्तन  ठरते. आजच्या आपल्या गाण्याची हीच पार्श्वभूमी आहे. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल भावव्याकुळ भावना आहेत पण तरीही कुठेतरी गैरसमजाला जागा मिळाल्याने दोघांत अंतर पडले आहे. स्त्री समजावण्याचा प्रयत्न करते पण पुरुष मात्र घट्टपणे आपल्याच समजाला धरून आहे. 
हे गाणे म्हणजे एका व्याकुळ स्त्रीचे आक्रंदन आहे. प्रेमाची याचना आहे. अर्थात आजच्या आधुनिक जगात अशा याचनेला फारसे स्थान नाही परंतु मागील शतकात मात्र असेच बहुतांशी घडत होते. आता ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर मग गाण्यातील कवितेचा आशय समजून घेणे अशक्य होत नाही. प्रसिद्ध गीतकार (कवी) शेलेंद्र यांची शब्दकळा आहे. शैलेंद्र यांनी नेहमीच आपल्या रोजच्या वापरातले शब्द वापरले परंतु खरी गंमत केली ती, त्या शब्दांच्या रचनाकौशल्यात. त्यामुळे नेहमीचे परिचित शब्द वेगळ्याच अनुभूतीने आपल्याला जाणवतात. आता इथेच बघा "दो जिस्म मगर एक जान है हम" या साध्या ओळीतून स्त्रीची भूमिका लक्षणीयरीत्या मांडली आहे आणि पुढे याच भावनेचा विस्तार केला आहे. ही कविता म्हणजे एका स्त्रीचा संत्रस्त मानसिकतेशी चाललेला संवाद आहे जो आपल्या प्रियकराच्या मानसिकतेशी जमवून घेण्याचा, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. परिणामी कवितेत व्याकुळता हाच भाव पसरलेला आहे. "ये धरती है इन्सानों की, कुछ और नहीं इन्सान है हम" ही अशीच साधी ओळ परंतु किती सुंदर आशय व्यक्त झाला आहे. रसिकांना अशा प्रकारच्या कवितेमुळे, गाणे ऐकताना शब्द आणि शब्दार्थ जाणून घेण्यास काहीही परिश्रम पडत नाहीत. 
संगीतकार शंकर/जयकिशन यांनी स्वरसाज चढवला आहे. राग शिवरंजनी हा आधारभूत आहे. " रे ग प" किंवा "ध प ग रे" या स्वरसंहतीला प्रमुख स्थान देणारा राग आणि इथे हेच स्वर संपूर्ण गाण्यात तरळत आहेत. पहिला अवघड आलाप झाल्यावर, सतारीवर जी छोटी गत वाजते ती याच सुरांच्या मदतीने वाजली आहे. परंतु या जोडगोळीने कायम - आपण प्रथम चित्रपट गीत बांधत आहोत,हाच दृष्टिकोन कायम ठेवल्याने रागाचे काही स्वर हाताशी घेऊन "मुखडा" सजवायचा आणि पुढे स्वतंत्र विस्तार करायचा, हाच विचार कायम केला (अर्थात काही ठिकाणी केवळ रागस्वरूप समोर ठेवले पण त्याची कारणे वेगळी आहेत). या जोडीने चित्रपट गीत बांधताना मोठा वाद्यवृंद वापरणे, याला प्रतिष्ठा दिली. त्यांच्या पूर्वी मोठा वाद्यवृंद वापरणे सुरु होते परंतु जे मोठ्या वाद्यवृंदाने साधण्यासारखे असते,ते अतिशय सुबुद्धपणे साधले. हिंदी चित्रपटांच्या शैलीशी पूरक रचना करणे, यात ते निश्चित अग्रेसर होते. सुरावटी आणि लयबंध वापरून दृश्याचे आवाहन वाढविण्यास त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. या गाण्यात देखील वाद्यवृंद वापरताना सतारीच्या सुरांसोबत व्हायोलिनचे सूर घेताना त्यांनी जे "जडावाचे" काम केले आहे, ते खास ऐकण्यासारखे आहे. इथे गाण्यातील नाट्यात्मकता लक्षात घेता, या वाद्यवृंदाची केलेली रचना लक्षणीय आहे. त्यामुळे रचनाकार चित्रपटीय नजरेशी संवाद राखून एक सांगीत संवादही साधत आहेत. अर्थात हे सगळे सुलभ आहे, असे सुचविण्याची अजिबात इच्छा नाही तर संबंधित सांस्कृतिक-सामाजिक परिस्थिती आणि चित्रपटीय भवताल यांचे संदर्भ लक्षात घेता ती अपरिहार्य, उपयुक्त आणि संस्कृतीसंगीतशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून पाहता बऱ्याच अर्थाने आविष्कारक्षम होती. गाण्याच्या चित्रणात शेवटाला नृत्यपदन्यास आहे आणि तिथे पखवाजासारखे वाद्य वापरून गाण्याकडे नव्याने लक्ष वेधून घेतले. 
गायन अर्थातच लताबाईंचे आणि एक अंतरा मुकेश यांच्या आवाजात आहे. गाण्याच्या सुरवातीलाच एक दीर्घ आणि गुंतागुंतीचा आलाप आहे. साथीला फक्त व्हायोलिनचे स्वर वाजतात आणि एकदम वरच्या स्वरांत आलाप सुरु होतो. ही लताबाईंच्या आवाजातील असामान्य क्षमता आहे. हा आलाप जरा बारकाईने ऐकलं तर समजेल की तो प्रत्येक क्षणात बदलते रूप घेतो आणि हे बदलते रूप त्याच ताकदीने गेल्यावर पेलणे ही असामान्य बाब म्हणायला हवी. खरेतर रसिकाचे लक्ष इथेच गाण्याकडे पूर्णांशाने वेधले जाते. आलाप संपतो आणि सतारीवर राग "शिवरंजनी" अवतरतो. गाणे मध्य लयीत सुरु होते परंतु फार अवघड स्वरावली ऐकायला मिळतात. गायन बहुतांशी तार सप्तकात, क्वचित अति तार सुरांत चालते. या गाण्याच्या वेळी लताबाईंच्या गळ्याच्या प्रतिभेची ओळख बहुतेक रचनाकारांना झालेली असल्याने,रचनाकार देखील मोठ्या विश्वासाने अवघड रचना करायला लागले होते. खरतर चाल तशी कठीण नाही, गोड आहे परंतु आपल्या गायनाने लताबाईंनी कठीण करून ठेवले आहे. शेवटच्या अंतऱ्यात, "जो सच है सामने आया है, जो बीत गया एक सपना था" या ओळीचा पूर्वार्ध थोड्या वरच्या सुरांत आहे पण उत्तरार्ध मात्र एकदम अति तार सुरांत जातो. इथे रचनाकार आणि गायिका, दोघांचेही कौतुक करायला हवे. नुसते सूचना देऊन एकदम वरचे सप्तक गाठायचे आणि ते गाठताना कुठेही शाब्दिक आशय पातळ करायचा नाही, अशा दोन्ही पातळ्यांवर हे गाणे यशस्वी होते.
दुसरा अंतरा मुकेश यांच्या आवाजात आहे. कवितेतील शब्द बघता, मुकेश यांच्या गळ्यातील नैसर्गिक सांत्वनात्मक भाव दृग्गोचर होणे ओघानेच येते. मुकेश यांच्या गळ्याला, गायक म्हणून मर्यादा होत्या परंतु त्या मर्यादा ओळखून त्यांनी आपली कारकीर्द सजवली असे म्हणता येईल. दुसरा अंतरा बारकाईने ऐकला तर तसा मध्य सप्तकात फिरतो, जिथे मुकेश आश्वस्त असतात.मोठा वाद्यवृंद वापरूनही गाण्याच्या सांगीतिक आशयात भरपूर वृद्धी होऊ शकते हे साप्रमाणं सिद्ध करणारी ही रचना. 


ओ मेरे सनम,ओ मेरे सनम
दो जिस्म मगर एक जान है हम 
इक दिल के दो अरमान है हम 
ओ मेरे सनम,ओ मेरे सनम

तन सौंप दिया,मन  सौंप दिया 
कुछ और तो मेरे पास नहीं 
जो तुम से है मेरे हमदम
भगवान से भी वो आस नहीं 
जिस दिन से हुए एक दुजे से 
इस दुनिया से अंजान है हम 
 इक दिल के दो अरमान है हम 
ओ मेरे सनम,ओ मेरे सनम

सुनते है प्यार की दुनिया में 
दो दिल मुश्किल से समाते है 
क्या गैर वहा अपनों तक के 
संग भी ना आने पाते है 
हमने आखिर क्या देख लिया 
क्या बात है क्यूँ हैरान है हम 
इक दिल के दो अरमान है हम 
ओ मेरे सनम,ओ मेरे सनम
मेरे अपने, अपना ये मिलन 
संगम है ये गंगा जमुना का 
जो सच है सामने आया है 
जो बीत गया इक सपना था 
ये धरती है इन्सानों की 
कुछ और नहीं इन्सान है हम 
इक दिल के दो अरमान है हम 
ओ मेरे सनम,ओ मेरे सनम

Thursday 18 June 2020

सांज ढले गगन तले

राज्यातील निरव शांतता .आसमंत काहीसा गहिरा आणि मंद्र सप्तकात हळुवार वावर असलेला. नायक आपल्या घराच्या सौंधात अस्वस्थपणे फेऱ्या मारीत असलेला. आपल्याला ही उदासीनता कुठून प्राप्त झाली? या प्रश्नाच्या गर्तेत सापडलेला. दरबारातील राजनर्तिका वसंतसेना बघून त्याचे मन हलले का? या प्रश्नावर काहीसा थबकलेला. वसंतसेना म्हणजे  मूर्तिमंत मादक सौंदर्य हे तर खरेच पण आपल्याला अप्राप्यआहे का ? हा एक प्रश्न चारुदत्ताला छळत असतो आणि या प्रश्नानेच त्याच्या मनातील द्वंद्वाचे उत्तर मिळते. अर्थात आपण ब्राह्मण म्हणजे आर्थिक बाजू काहीशी लंगडी पण तरीही "अचपळ मन माझे, ना आवरीता" अशी अवस्था झालेली. आपल्या आजच्या गाण्याची ही पार्श्वभूमी. १९८४ साली आलेल्या "उत्सव" चित्रपटातील "सांज ढले गगन तले" या गाण्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चित्रपट हा प्रसिद्ध संस्कृत नाटककार शुद्रक यांच्या "मृच्छकटिक" नाटकावर आधारित आहे. आता इ.स.पूर्व २०० या काळात लिहिलेले नाटक म्हणजे राजे,संस्थानिक यांची विलासी राजवट आणि हे तर ओघानेच आले. त्या काळात "उज्जयिनी" नगरी  ही जगात मान्यताप्राप्त नगरी, ऐश्वर्याने आणि कलाविष्काराने नटलेली. आता तो काळ लक्षात घेता, त्यावेळचे शांत, विलासी तरीही संयत वातावरण संपूर्ण चित्रपटात आढळते. आपल्या प्रेमाची कबुली कशी द्यायची? या विवंचनेतून आजचे गाणे आपल्या पुढे येते. 
प्रसिद्ध हिंदी कवी वसंत देव यांनी चित्रपटाची सगळी गाणी लिहिली आहेत. वसंत देव हे रूढार्थाने  महाजन चित्रपटांसाठी लिहिणारे कवी नव्हते परंतु एकूणच चित्रपटाचा सगळा बाज बघता, इथे नेहमीच्या चटपटीत शब्दकळेची आवश्यकता नसून ज्यांना "कविता" म्हणता येईल आणि संस्कृतोद्भव बाजाची गीते गरजेची होती आणि ती गरज वसंत देवांनी सार्थपणे पूर्ण केली असे म्हणता येईल. गीतातील कविता वाचताना याचा अनुभव येईल. "किरणों के पाखी" किंवा "मगन हुयी थी कलियां" किंवा "निशिगंधा के सूर में" हे शब्द वाचतानाच डोळ्यासमोर सगळे वातावरण उभे राहते. "किरणों के पाखी" म्हणजे "किरणांचे किरण, "निशिगंधा के सूर में" इथे "निशिगंध" हेच फुल योग्य आहे कारण या फुलाच्या सुगंधाचे प्रणयी वातावरणाशी जुळलेली सायुज्यता!! कवितेत कुठेही उर्दू शब्द नाही कारण त्याची आवश्यकताच नाही. कविता ही कविता म्हणून सुंदर आहे. आशय राजस आहे पण संयत आहे. कुठेही उठवळपणा नाही किंवा घीसेपीटे शब्द नाहीत. "इतने में तिमिर धसां सपनीले नैनों में" या ओळीत चक्क "तिमिर" हा शब्द आला आहे तर ओळ संपवताना "सपनीले नैन" इतका अप्रतिम काव्यात्मक शब्द योजला आहे. 
संगीतकार लक्ष्मीकांत/प्यारेलाल या गाजलेल्या जोडीचे आहे. या संगीतकारांनी इथे आपल्या संगीताचा बाजच संपूर्णपणे वेगळा ठेवला आहे .किंबहुना संपूर्ण संगीत पारंपरिक भारतीय वाद्यांवर आधारलेले आहे. अर्थात याचाच परिणाम चित्रपटात वेगवेगळ्या रागरागिण्यांचा अंतर्भाव असणे होय. चित्रपटीय सौंदर्यशास्त्रानुसार जी अधिकार परंपरा अपरिहार्य असते , तिची हुकूमत मान्य करून रचनाकारांनी आपल्या कामगिरीवर स्वतःच मर्यादा घालण्याचा सुज्ञपणा दाखवला आहे. प्रस्तुत गाण्याची थोडी तपासणी केल्यास काही बाबी ठळकपणे लक्षात येतात. खरतर या जोडगोळीची बहुतेक गाणी म्हणजे गीताचा पहिला चरण सप्तक मर्यादेतील मधल्या स्वरावर म्हणजे मध्यम स्वरावर आणि दुसरी ओळ खाली आणून आधारस्वरावर म्हणजेच षडजावर ठेवणे. आपल्या भारतीय संगीतात "समेची पूर्तता" ही नेहमी "सा" या स्वरावर आणण्यात होते आणि हा निकष लक्षात ठेवला म्हणजे वरील विधानाच्या महत्वाच्या अंगाची जाणीव होऊ शकेल. अनेक सामाजिक-सांस्कृतिक कारणांनी सुरावट "सा" या स्वरावर संपली की एक प्रकारची पूर्णता आणि स्थैर्याची भावना दृढ होते आणि विधानाची प्रचिती या गाण्याच्या बाबतीत स्पष्टपणे दिसते. यामुळेच ही रचना एक सुंदर गीत म्हणून आपल्या समोर येते. दुसरा बारकावा असा दिसतो, या गीतात हिंदुस्थानी कला संगीतातील मारवा आणि बिभास रंगांच्या अवतीभवती फिरत राहते आणि हेच राग योजायच्या मागील हेतू समजून घेता येतात. या दोन्ही रागांच्या चौकटीचे वा बांधणीचे स्वरूप असे आहे, त्यात "सा" या आधारेश्वराचे महत्व या ना त्या प्रकारे कमी होते. परिणामतः सुरावटींच्या चलनांतून उत्पन्न होणाऱ्या तणावाचे विसर्जन होत नाही. चित्रपटाच्या कथेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, जे प्रेम सर्वसाधारण शिष्टसंमत मानले जात नाही - तेंव्हा सांगीत ताण विसर्जित न होणे हा सांगीतिक लाभ नव्हे का!! इथे या गाण्यात रचनाकारांनी वाद्यवृंदाचा उपयोग हात राखून केलेला आहे.खऱ्या अर्थाने वाद्यवृंद इथे मवाळ आणि साहाय्यकारी भूमिका बजावतो. वीणा या वाद्याचा नाजूक झंकार यात लक्षणीय भर टाकतो. 
या रचनाकारांची संपूर्ण कारकीर्द लक्षात घेता, यांनीही भारतीय कलासंगीतातील राग,ताल आणि रूढ प्रकारांपासून दूर सरकण्याचा कल दाखवला. मुद्दा असा आहे की असे दूर सरकण्यातून त्यांनी निश्चितच गुणवत्तापूर्ण रचना करण्यात यश मिळवले असे म्हणता येईल. मुख्य म्हणजे जी शंकर/जयकिशन यांनी चित्रपटीय भाषा निर्माण केली, त्याचीच पुढील पायरी या जोडीने गाठली. ध्वनीच्या वापरातील प्रगत अवस्था त्यांनी निर्माण केली असे विधान सहज करता येईल आणि तसे करताना त्यांनी नेहमीच चित्रपटाचा रसिक ध्यानात ठेवला. अर्थात त्यांची दीर्घ कारकीर्द लक्षात घेता त्यात बरेच उणे सापडते पण त्याला इलाज नाही. आणखी गमतीचा विशेष असा दिसतो, कुठलीही रचना करताना त्यांनी गीताच्या मुखड्यावर नेहमीच विशेष मेहनत घेतली आहे परंतु पुढील अंतरे बांधताना त्यांनी तितके वैविध्य दाखवले नाही. 
आता गायक म्हणून सुरेश वाडकर यांनी या गाण्याला यथोचित न्याय दिला आहे असे म्हणावेच लागेल. कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात असे टिकाऊ स्वरुपाचे गाणे मिळाले. भारतीय रागसंगीताचा पायाभूत अभ्यास असल्याचे, हे गायन ऐकताना समजून घेता येते. जरी स्वररचना संपूर्णपणे रागाधारित नसली तरी "गायकी" अंगाकडे झुकणारी आहे. रचनेत अनेक हरकती, अर्धाताना इत्यादी अलंकार सढळपणे ऐकायला मिळतात. खरतर आवाजाचा पल्ला चांगला आहे परंतु काहीवेळा अकारण लाडिकपणा डोकावतो. त्यामुळे त्यांच्या गायनावर काहीशी मर्यादा आल्याचे दिसते. आता या गाण्याबाबत बोलायचे झाल्यास. एकूणच गाण्याचा "स्वभाव" अचूक ओळखून गायन केले आहे.नेमके शब्दोच्चार तसेच गाताना हलक्या अंदाजाने घेतलेल्या हरकती, यामुळे गायन मनात रुजत जाते आणि ही चांगल्या गायनाची फलश्रुती मानवीच लागेल.

सांज ढले गगन तले,हम कितने एकाकी 
छोड चले नैनों को किरणों के पाखी 

पाती की जाली से झांक रही थी कलियां 
गंध भरी गुनगुन में मगन हुयी थी कलियां 
इतने में तिमिर धसां सपनीले नैनों में 
कलियों के आंसू का कोई नहीं साथी 

जुगनू का पट ओढे आएगी रात अभि 
निशिगंधा के सूर में कह देगी बात अभी 
कंपता है मन जैसे डाली अंबुवा की 



Saturday 13 June 2020

शब्दावाचून कळले सारे

गाण्यामध्ये कविता कशी मिसळावी,याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मंगेश पाडगांवकरांची भावगीते. एका बाजूने सुबोध शब्दकळा तर दुसऱ्या बाजूने आशयाची श्रीमंत अभिव्यक्ती!! फार पूर्वी आकाशवाणीवर अनेक संगीतिका सादर व्हायच्या आणि त्यातील एक गाजलेली संगीतिका म्हणजे "बिल्हण". मंगेश पाडगावकरांनी नेहमीच भावगीत लिहिताना कविता आणि गाणे यामधील सीमारेषा अस्पष्ट केल्या. पाडगावकरांची कितीतरी गाणी ही, सर्वात आधी सक्षम आणि आशयपूर्ण अशी कविता आहे. बरेचवेळा हा मुद्दा पाडगावकरांच्या गीतांच्या संदर्भात विसरला जातो. याचे मुख्य कारण, आपण निष्कारण केलेला पंक्तिप्रपंच. वास्तविक कुठलेही अप्रतिम गीत ही त्या प्रसंगाची एक शाब्दिक अशी उत्कट अभिव्यक्ती असते. परंतु रसिकांना आधी भूल पडते ती गायनाची आणि तद्नुषंगाने ऐकायला मिळणाऱ्या सुरांची. यात फार चूक काही नाही परंतु आस्वादाच्या परिघाचा विचार करताना, सुरांसह कवितेचा आस्वाद घेणे म्हणजे गीताला संपूर्ण न्याय  देणे होय. 
पाडगावकरांची बरीचशी गीते अशी "गेयता" म्हणजे काय? या प्रश्नाची उदाहरणे म्हणून सांगता येतील.गीत लिहिताना एक ठराविक प्रसंग डोळ्यासमोर असतो परंतु त्या प्रसंगाला अनुरूप अशी सुयोग्य शब्दकळा देण्यात पाडगावकर निश्चितच प्रतिभाशाली होते. गीत शक्यतो गूढ असू नये जेणेकरून कवितेचा अर्थ लावण्यातच रसिकांची शक्ती खर्च होईल परंतु कवितेत सपकपणा,विसविशीतपणा आणि भोंगळपणा नावालाही असू नये,ही दक्षता पाडगावकरच्या गीतांतून आढळते.परिणामी त्यांची गीते अर्थपूर्ण होण्यात मदत होते आणि मुख्य म्हणजे संगीतकाराला प्रेरित करण्यास महत्वाचा हातभार लावते. आता या कवितेत, व्याकुळ प्रियकर  आपल्या प्रणयाच्या भावना दर्शवित आहे. खरा प्रणय हा नजरेतून आणि स्पर्शातून साकार होतो,हे झाले जुने वचन परंतु कवीने इथे अधिक रंगेलपणातून धीट वृत्तीतून आशय व्यक्त केला आहे. 
"प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले" या ओळीतून हीच काहीशी धीटपणाची भावना व्यक्त होते. प्रियकर आधुनिक काळातला आहे तेंव्हा त्याची अभिव्यक्ती नेहमीच कालसुसंगत असणार. तसेच दुसऱ्या अंतऱ्याची शेवटची ओळ - "मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले". प्रियकर - प्रेयसी संबंधात अंगस्पर्श तर ओघाने होणारच म्हणजेच "मिठी" या कृतीत त्याची सांगता होणार. अर्थात इथे "या विश्वाचे रहस्य"  कसलाही गूढार्थ नसून, जोडप्याचे जे अवघे प्रणयी विश्व आहे, त्याचा नेमका अर्थ कळला,असाच अन्वयार्थ लावणे सुसंगत ठरेल. 

पु.लं.च्या स्वररचनेवर त्यावेळच्या नाट्यगीतांचा प्रभाव जाणवत आहे. विशेषतः: मास्तर कृष्णराव यांचा जाणवण्याइतका प्रभाव दिसतो. मास्तरांच्या रचनेतील प्रासादिकता, कल्पक छोट्या अशा ताना, आवाजाला तरलपणे फिरवण्याची हातोटी, एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीत दोन वेगळ्या सुरांचा वापर करून चमत्कृती घडवायची आणि रचनेत रमणीयता आणायची इत्यादी खुब्यांचा आढळ पु.लं.च्या बहुतेक रचनांमधून ऐकायला मिळतो. आता या गाण्यातून देखील हाच विचार स्पष्ट होतो. "काफी" रागावर आधारित स्वररचना आहे परंतु रागाला बाजूला सारून शब्दांना महत्व देत चालीचे चलन ठेवायचे,हाच विचार प्रमुख दिसतो. मी वर म्हटल्याप्रमाणे शैलीवर मास्तर कृष्णराव यांचा गडद रंग आहे तसेच बालगंधर्व शैलीचे अनुकरण अजाणता का होईना पण आढळते. विशेषतः "बोलताना" ऐकताना हा प्रभाव दिसतो. खाजगी भावगीत असेल किंवा आणि काही कारणे असू शकतील पण वाद्यमेळात फार नावीन्य ऐकायला मिळत नाही तसेच काही खास प्रयोग केलेत असे आढळत नाहीत. आपण निर्माण केलेली चाल, आपली सर्जनशीलता दर्शवायला पुरेशी आहे, असा विचार जाणवतो. 
गायक म्हणून जितेंद्र अभिषेकी बुवांनी आपली छाप स्वच्छपणे या गायनावर सोडली आहे आणि ती इतकी लोकप्रिय आहे की बहुतेकांना या गाण्याची स्वररचना अभिषेकी बुवांनीच केली आहे, असे मानून घेतले आहे. अर्थात याला कारण अभिषेकी बुवांचे संगीतकार म्हणून असलेली प्रचंड लोकप्रियता आणि पु.लं. नी संगीतकार म्हणून दाखवलेली उदासीनता. अत्यंत स्वच्छ आणि भावपूर्ण शब्दोच्चार तसेच "रियाझी गळा" असल्याने सहज व उस्फुर्त वाटाव्यात अशा हरकती, हे वैशिष्ट्य सांगता येईल. अर्थात गायन करताना रागदारी संगीताचा ठसा पुसता येत नाही पण हे तर सगळ्याच शास्त्रोक्त गायकांबाबत म्हणता येईल. काही शब्दोच्चार मात्र अधिक "ठळक" गायले गेले आहेत - उदाहरणार्थ मुखड्याच्या ओळीतील "घडू" हा शब्द नव्याने घडवल्यासारखा उच्चारला आहे कारण गळ्यावरील रागदारी संगीताची तालीम. परंतु असे २,३ उच्चार वगळता गायन अतिशय परिणामकारक झाले आहे. मुळात अभिषेकीबुवांना कवितेचे भान अतिशय सजग असल्याने कवितेतील आशयाबाबत सुसंवादी गायन ठेवावे, हे सूत्र त्यांनी उद्मेखूनपणे पाळले आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या कविता, या विधानाची साक्ष देतील. 
शब्दावाचून कळले सारे,शब्दांच्या पलीकडले 
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले 

अर्थ नवा गीतास मिळाला  
छंद नवा अन ताल निराळा 
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले 

आठवते पुनवेच्या रात्री 
लक्ष दीप विरघळले गात्री 
मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले 


Thursday 11 June 2020

फिर कहीं कोई फुल खिला

हिंदी चित्रपटात प्रणय हा विषय फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि त्याचा बऱ्याच चित्रपटात चोथा झाल्याचे बघायला मिळाले आहे. किंबहुना असे विधान करता येईल, हिंदी चित्रपटाने प्रणयी भावनेबद्दलच्या संकल्पना नकारार्थी पद्धतीने समाजात रुजवल्या. हे नकारात्मक विधान नक्कीच आहे पण वस्तुस्थिती काही फार वेगळी नाही. तेच प्रसंग, तोच आशय, तशाच बोथट अभिव्यक्ती यामुळे प्रणयाबद्दलची रुची बदलली. मागील शतकातील सत्तरीच्या दशकात हळूहळू ही प्रतिमा बदलायला लागली, अधिकाधिक वास्तववादी व्हायला लागली. आजचे गाणे ज्या चित्रपटातील आहे - "अनुभव" हा चित्रपट, त्याकाळी "वास्तववादी सिनेमा" हा शब्द प्रचलित व्हायच्या आधीच्या काळातील चित्रपट होता. लग्न होऊन काही वर्षे झाल्यावर,नवरा - बायको नात्यात काहीसा शिळपटपणा येणे, यात फारसे नवीन नाही कारण बहुतेक नात्यात हा अनुभव येतच असतो. अशा वेळी मानसिकदृष्ट्या प्रगल्भ असणे महत्वाचे ठरते. सुप्रसिद्ध निर्माते - दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी त्यावेळी या विषयावर नितांतसुंदर अशी Trilogy "अनुभव","आविष्कार" आणि "गृहप्रवेश" निर्माण केली होती आणि मानवी नात्यांचे गुंतागुंतीचे नाते पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आधुनिक काळातील धडपड आणि त्यातून उद्भवलेली मानसिक तडफड याचे अप्रतिम चित्रण या चित्रपटातून दिसते. केवळ भौतिक सुख म्हणजे आयुष्य नव्हे परंतु मानसिक आणि शारीरिक समाधान हे मुद्दे देखील संसाराच्या सामंजस्यासाठी तितकेच आवश्यक असतात.खरतर चित्रपटाच्या पडद्यावर मानसिक भावनांचे चलनवलन सार्थपणे दाखवणे अति अवघड असते तरीही अनेक दिग्दर्शकांनी यशस्वीपणे सिद्ध केले आहे. "अनुभव"हा चित्रपट म्हणजे मानवी नात्याची सुंदर तरल कविता आहे. 
या गाण्यातील कविता म्हणून वाचन करायला गेल्यास, काहीशी वक्रोक्ती शैली आहे. पहिल्या दोन ओळीतून जो विचार मांडला आहे त्याला काहीसा धक्का देणारा विचार, तो अंतरा समाप्त  होताना वाचायला मिळतो. पहिल्या कडव्यात समुद्राची प्रतिमा घेतली आहे आणि शेवट करताना समुद्राच्या लाटांना वादळ म्हणून नये, असे म्हटले आहे. तसेच शेवटच्या कडव्यात स्वप्नांच्या प्रवासातील सजणे आणि शेवटी स्वप्नपूर्ती विफल होत असताना, शांती म्हणू नये, हे वाचायला मिळते. सगळ्या चित्रपटात, ज्या जोडप्याची मानसिक तडफड दाखवली आहे, त्याला साजेसेच शब्द आहेत. याबाबतीत कवी गुलजार यांचे कौतुक करायलाच लागेल. गुलजार बहुतेकवेळा नेहमीच्या वापरातील शब्द वापरतात परंतु रचनाकौशल्य असे असते की त्या जुनाट शब्दांवरील धूळ पुसली जाते आणि तेच शब्द आपल्या वेगळी अनुभुती देतात. अगदी स्पष्ट मांडायचे झाल्यास, गुलजार यांच्या "कविता" प्रामुख्याने "भावकविता" असतात नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा  अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी आणि ही अट या कवितेतून पूर्ण होते. 
संगीतकार म्हणून कनू रॉय हे कधीही हिंदी चित्रपटसंगीताच्या इतिहासात आघाडीचे संगीतकार म्हणून कधीही नाव घेतले जाणार नाही. १९४३ पासून कार्यरत असलेला हा संगीतकार परंतु केवळ ७ हिंदी चित्रपटांना संगीत दिले!! हे काही सृजनात्मक सर्जनशीलतेचे उदाहरण होऊ शकत नाही तरीही या चित्रपटांवर त्यांनी आपला ठसा उमटवला असे म्हणता येईल. कदाचित याचा परिणाम असावा पण त्यांनी कधीही मोठा वाद्यमेळ वापरण्याचा हव्यास धरला नाही. बहुतांशी गीते बंगाली लोकसंगीताशी किंवा रवींद्र संगीताशी नाते जोडणाऱ्या आहेत. आजचे गाणे देखील जरी "देस" रागाधारित असले तरी चालीवर बंगाली ठसा जाड आहे. कवितेत एका व्याकुळ क्षणाचे चित्रण असल्याने, वाद्यमेळ प्रामुख्याने सतार,सारंगी आणि अस्पष्ट अशी बासरी अशाच वाद्यांवर आधारलेला आहे. चाल ठाय लयीत असल्याने, ताल वाद्य देखील त्याच अंगाने वाजत आहे आणि बहुतेकवेळा ललित संगीतात वावरणारा "केरवा" ताल आहे. थोडे तांत्रिक लिहायचे झाल्यास "रिषभ - पंचम" अंगाने चालीची सुरवात आहे आणि तिथेच देस रागाची स्पष्ट ओळख पटते. खरतर थोडे बारकाईने ऐकले तर गाण्यात बरेचवेळा, स्वररचनेने देस रागाची कास सोडलेली आहे आणि याचे कारण, आपल्याला चित्रपट गीत सादर करायचे आहे आणि राग नव्हे, या पंथाचे हे संगीतकार असल्याने,आधारभूत स्वर घ्यायचे आणि पुढे आपल्या मनानुसार मांडणी करायची. त्यामुळेच चाल कधीही शब्दांवर कुरघोडी करताना आढळत नाही. इथे शब्द वावरतो तो भाषिक तसेच सांगीत ध्वनींचा समूह म्हणून. अर्थानुसार गरज भासल्यास, तालाच्या आवर्तनास ओलांडूनही चरण वावरताना दिसतो. आपल्या रचनेत कुठेतरी बौद्धिक अंश असावा अशी इच्छा दिसते आणि याचाच परिणाम म्हणून चित्रपटसृष्टीत भारंभार संधी मिळण्याचा अभाव. 
गायक म्हणून मन्ना """"डे यांनी आपले गायन कौशल्य इथे जवळपास पूर्णांशाने सिद्ध केले आहे. देस रागावर आधारित चाल आहे म्हणून "गायकी" दाखवायची असे काहीही घडलेले नाही. एका भावनिक स्पंदनांचे भावपूर्ण चित्रण आहे आणि चाल देखील अतिशय संथ, शांत स्वभावाची आहे, हे लक्षात ठेऊन गायन हृद्यपणे केले आहे. मुळातला मोकळा आणि स्थिर आवाज इथे काहीसा कंपायमान ठेवला आहे पण त्यात कुठेही "नाट्यात्म" भाव येत नाही. पहिल्याच ओळीत "फिर कहीं कोई फुल खिला" "फ" हे अक्षर दोन वेळा येते . आता हे अक्षर उच्चारताना, आपण श्वास बाहेर फेकतो. परिणामी हे अक्षर हुंकारात्मक तरी होते किंवा अधिक वजनदार होते. गायक म्हणून मन्ना डे यांनी सर्वतोपरी काळजी घेतली आहे आणि पहिल्याच ओळीत चालीतील व्याकुळता अप्रतिमरीत्या सादर केली आहे. "शास्त्रोक्त संगीतावर आधारित गाण्यांचा गायक" हे लेबल किती चुकीच्या पद्धतीने लावले आहे,याची प्रचिती हे गायन ऐकताना येते. 

फिर कहीं कोई फुल खिला 
चाहत ना कहो उसको 
फिर कहीं कोई दीप जला 
मंझिल ना कहो उसको 

मन का समंदर प्यासा हुआ 
क्यों किसीसे मांगे दुआ 
लहरों का लगा जो मेला 
तुफ़ा ना कहो उसको 

देखे क्यों सब वो सपने  
खुद ही सजाये जो हमने 
दिल उनसे बहल जाए तो 
राहत ना कहो उसको 



Thursday 4 June 2020

आजा रे परदेसी

सोडुनी वाट 
   तुडवीत जावे काटे 
मोडुनी रांग ती 
    पडावे बाहेर वाटे 
जायचे कुठे,
     जरी ठरले अजून नाही 
झोपेन जिथे, 
    उठवणार कोणी नाही 
आपल्या मराठी भाषेत कवी रॉय किणीकर हे अतिशय कलंदर व्यक्तिमत्व होऊन गेले. "रुबाया" छंदाच्या धर्तीवर त्यांनी कविता केल्या. मुळात कविता हा अत्यंत अल्पाक्षरी साहित्य प्रकार त्यातून रुबाया तर चार ओळींचा प्रपंच तरीही त्यातून आशयपूर्ण रचना करता येते. आज हि कविता आठवण्याचे कारण म्हणजे आजचे आपले गाणे होय. चित्रपटातील नायक असाच वाट तुडवीत हिंडत असतो आणि एका निवांत माळरानाच्या शिखरावर असताना त्याला काही सूर ऐकायला येतात. किंबहुना त्याआधी त्याचे चालणे हे निव्वळ निरुद्देश असते आणि त्या अद्भुत सुरावटीमुळे त्याचे भान हरपते. 
चित्रपट "मधुमती" म्हणजे चंदेरी पडद्यावरील तरल कविता आहे ज्या कवितेला दिग्दर्शक बिमल रॉय यांनी गूढत्व प्रदान करून हिंदी चित्रपटाची क्षेत्रे विस्तारित केली. वास्तविक याच मूलभूत कल्पनेवर पूर्वी "महल" चित्रपट आला होता परंतु बिमल रॉय यांनी त्याचा परीघ विस्तीर्ण केला, कक्षा वाढवल्या. तसे बघितले तर "मधुमती" हा नायिका प्रधान चित्रपट तरीही नायक ठळकपणे लक्षात राहतो. आपल्या चित्रपटातील कुठलेही पात्र उगीच घुसडल्यासारखे वाटू न देण्याची बिमल रॉय यांची हातोटी लक्षणीय होती.  
आजच्या आपल्या गाण्यातील कविता ही प्रसिद्ध कवी शैलेंद्र यांची आहे. भारतीय संस्कृतीमधील मूलतत्वांना त्यांनी अतिशय सोप्या शब्दात मांडून आपली कविता सामान्य माणसांच्या जवळ नेली आणि तसे करताना आशय कधीही गढूळ केला नाही, हे फार महत्वाचे. आजचे गाणे, कविता म्हणून वाचायला गेल्यास, कुठेही गूढ, अगम्य अशी शब्दरचना वाचायला मिळत नाही. किंबहुना "पंथ निहार" ,"मैं दिये की ऐसी बाती" किंवा "मैं नदीया फिर भी मैं प्यासी,भेद ये गहेरा बात जरासी" या शब्द तसेच ओळींतून सुरवातीच्या ओळींचा शाब्दिक विस्तार तर वाचायला मिळतोच परंतु आशय आकळायला कुठेही अडचण येत नाही. एक सुंदर चित्रपटीय कविता असे वर्णन करता येईल. कवितेत कुठेही ("क्यूँ " सारखे अक्षर वगळल्यास) "जोडाक्षर" नसल्याने गाताना अकारण खटका किंवा वजन देण्याची गरज भासत नाही. कवितेची जातकुळी उत्तर भारतीय लोकसंगीतात काव्याशी सांगणारी आहे. लोकसंगीतात कधीही अवजड प्रतिमा वाचायला मिळत नाहीत, जे वाचायला मिळते ते थेट असते. शैलेंद्र यांनी हेच धोरण कायम अनुसरले. 
चित्रपट "मधुमती" हे संगीतकार सलील चौधरी यांचे सर्वोत्तम संगीत म्हणावे इतक्या तोडीचे आहे. लोकसंगीत, कलासंगीत,आदिम संगीत अशा संगीत कोट्यांचे दर्शन आपल्याला होते. स्वररचना "बागेश्री" रागाशी नाते सांगणारी आहे. वास्तविक बागेश्री रागाची प्रकृती काहीशी करुण भावावस्थेशी जुळणारी आहे तरीही संगीतकार सलील चौधरींनी त्यातून अशी अप्रतिम धून साकारली. थोडे अधिक तांत्रिक लिहायचे झाल्यास "मुखडा"आणि "अंतरा" हे "पंचम" स्वरावर सुरु होतात आणि संपताना "कोमल निषाद" स्वरावर थांबतात. परिणाम स्वरूप गाण्यातील गूढत्व अधिक खोलवर व्यक्त होते. आणखी एक बाब विशेष मांडावीशी वाटते, वाद्यमेळ बांधताना व्हायोलिन वाद्यावर चक्क "पाश्चात्य हार्मनी" म्हणावी अशा स्वररचना ऐकायला मिळतात. संगीतकारावर "मोझार्ट","बीथोवन" या पाश्चात्य संगीतकाराचा प्रभाव कायम दिसत आला आहे परंतु खासियत अशी असते, पाश्चात्य संगीत आणि पौर्वात्य संगीत याची अप्रतिम सांगड घातली जाते. बौद्धिक कौशल्य हे असे दिसून येते. सांगड घालताना सरळ सरळ डल्ला मारला असे होत नाही तर गुंतागुंतीच्या सांगीतिक वाक्यांशाचे अनुपम सादरीकरण ऐकायला मिळते. अशा प्रकारे चाल भारतीय बनावटीची परंतु वाद्यमेळ पाश्चात्य संगीतावर आधारित, असे भारतीय संगीतात फार कमी वेळा ऐकायला मिळते. अशा प्रकारच्या संगीतरचनेमुळे चित्रपटातील गूढ वातावरण आणखी अगम्य होऊन जाते. तोपर्यंत तरी अशा तऱ्हेचे संगीत, हिंदी चित्रपट संगीतात निर्माण झाले नव्हते. त्यामुळे वाद्यवृंद कारागिरीपूर्ण आहे. परिणामस्वरूप शहरी आणि नागरी संस्कृतीच्या बाहेरील विश्वातले ध्वनी ऐकत आहोत असे सारखे वाटत राहते. 
लताबाईंनी अशा प्रकारच्या गायनाचा एक मानदंड तयार केला. या गायनात लताबाईंचा आवाज अधिक भरीव आहे. सदर प्रेमगीत म्हणजे अनोळखी प्रकारास आवाहन आहे, पण आवाहन असे आहे की जणू काही प्रकारची जन्मजन्मांतरीची ओळख असावी. अंतरीच्या अंतरात प्रेमाविषयी खात्री आहे आणि किंचित काळजी वावरते पण ती बाह्य वास्तवाच्या पातळीवर.गीताची लै द्रुत आहे परंतु आपल्याला बळजबरीने खेचून नेत आहे,असे अजिबात वाटत नाही.गाण्याची रचना काहीशी नांगर संस्कृतीशी नाते जोडणारी असली तरी गाता आवाज मात्र नि:संशय संस्कारित लगावाचा आहे. लताबाईंच्या सादरीकरणात नेहमी "लालित्य" हा शब्द वारंवार वापरला जातो. अर्थात याचे सखोल विवेचन करणे हा वेगळा विषय आहे परंतु सौंदर्य,आकर्षण,माधुर्य, रुबाबदारपणा इत्यादी अनेक शब्दांचे स्पष्टीकरण देताना त्याच जोडीने लालित्य शब्द वापरला जातो आणि हे अतिशय वेधक आहे. आजच्या या गाण्यात हे सगळे विशेष संपूर्णपणे आकाराला येतात. त्यामुळे हे गीत अनेक उत्कर्षबिंदूंची प्रतीती आणू देते पण याच बिंदूवर गाणे संपत नाही. ही कामगिरी निश्चितच संगीतकार सलील चौधरी आणि गायिका लताबाईंची, अशी जोडीने केली आहे. 

मैं तो कब से खडी इस पार,
ये अंखिया थक गयी पंथ निहार 
आजा रे परदेसी 

मैं दिये की ऐसी बाती,जल ना सकी जो बुझ ना पाती 
आ मिल मेरे जीवन साथी, ओह 
आजा रे, मैं तो कब से खडी इस पार

तुम संग जनम जनम के फेरे, भूल गये क्यूँ साजन मेरे 
तडपत हूं मैं सांज सवेरे,ओह 
आजा रे, मैं तो कब से खडी इस पार

मैं नदीया फिर भी मैं प्यासी,भेद ये गहेरा बात जरासी 
बिन तेरे हर बात उदासी, ओह 
आजा रे, मैं तो कब से खडी इस पार