Wednesday 18 June 2014

सचिनच्या निमित्ताने – भाग १



सचिन तेंडूलकर निवृत्त होऊन आता बरेच महिने झाले तेंव्हा आता एकूणच त्यानिमित्ताने सचिन आणि हा खेळ, याचा सम्यक विचार करायला हरकत नाही. भारतात, क्रिकेट बाबत सरळ सरळ २ तट दिसतात. १] क्रिकेटवर जीव तोडून (आंधळे म्हणायला हरकत नाही) प्रेम करणारे, २] या खेळावर तितकीच कडवट टीका करणारे. अर्थात, एकूण भारतीय मन:स्थिती बघितली तर ही टोकाची भूनिका या समाजाला सुसंगत आहे. आपल्याला अजूनही कुठल्याही विषयाचा “सुवर्णमध्य” शोधून विचार करताच येत नाही, हे दुर्दैव!! आपण इथे या दोन्ही मुद्द्यांचा थोडा सविस्तर विचार करूया.
मुळात, क्रिकेट हा इतर खेळांसारखा (च) एक खेळ आहे आणि त्याच्याकडे खेळाच्या दृष्टीनेच बघणे जरुरीचे आहे. जर आपण, १९७० च्या काळातील खेळ आठवला तर असे दिसेल, या खेळाची प्रसिद्धी हळूहळू वाढत होती. याला खरी लोकप्रियता मिळाली, भारताने १९७१ साली, आधी वेस्टइंडीज आणि नंतर इंग्लंड इथे अभूतपूर्व विजय मिळवले. हे यश कुणाच्याच ध्यानीमनी नव्हते, अगदी अनपेक्षित असे यश मिळाले. त्यावेळी वाडेकर, सोलकर, गावस्कर, विश्वनाथ आणि फिरकी चौकडी, जणू राष्ट्रीय संपत्ती असल्यासारखे वातावरण झाले होते. पुढे १९७४ साली इंग्लंडमध्येच अत्यंत भयंकर अशी नामुष्की पदरात पडली आणि भारतीय संघाला भयानक टीका सहन करावी (डांबर फासणे वगैरे याच काळातले) . खरेतर याचवेळेस भारतीय रसिकांचे आंधळे प्रेम लक्षात यायला हवे होते. याचवेळी भारतीय क्रीडाक्षेत्रात “गावस्कर” नावाचे आश्चर्य उदयाला यायला लागले होते. क्रिकेट भारतात का इतके लोकप्रिय झाले, याची कारणमीमांसा करायची झाल्यास, एक गोष्ट ध्यानात घ्यावीच लागेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावेळेस, हॉकी आणि क्रिकेट वगळता कुठल्याही खेळात भारताचे नाव नव्हते. पुढे हॉकीतील राजकारणाने खेळाचा सत्यानाश केला आणि क्रिकेटला खेळाचे आकाश मोकळे करून दिले.
गावस्करच्या वाढत्या लोकप्रियतेचा क्रिकेट बोर्डाने व्यवस्थित फायदा करून घेतला आणि खेळाचे जाळे व्यावसायिक पद्धतीने देशभर पसरवले. १९८३ साली, भारताने ध्यानीमनी नसताना, वर्ल्ड कप जिंकला आणि हा खेळ खऱ्याअर्थी देशात व्यापक स्वरूपाने पसरला. तोपर्यंत, हॉकी खेळात, आपण जितकी घसरण करू शकतो, तितकी केली. एक लक्षात घ्यायला हवे, कुठलाही खेळ जर व्यावसायिक पद्धतीने घडवायचा असेल तर त्याचे मार्केटिंग करणे अत्यावश्यक असते आणि तिथे त्या खेळाच्या संघटनेची जबाबदारी असते.
वास्तविक १९७४ साली, भारताने अजितसिंगच्या नेतृत्वाखाली हॉकीमधील आंतरराष्ट्रीय जगज्जेतेपद मिळवले होते पण तिथेच खेळातील राजकारण उधळले आणि या यशाचा व्यावसायिक फायदा उठवण्यात संघटना कमी पडली. त्याउलट क्रिकेट संघटनेने मिळालेले यश व्यावसायिक पद्धतीने लोकांत प्रसिद्ध होईल, याची काळजी घेतली (पुढे याचा विपर्यास झाला, हा वेगळा भाग) जोपर्यंत सुनील/कपिल तळपत होते, तोपर्यंत संघटनेला खेळाची काळजी करण्याचे काहीच कारण नव्हते. १९८८ साली सचिन क्रिकेटच्या क्षेत्रात शिरला आणि लोकांत प्रचंड कुतूहल पसरले.
भारतीय क्रिकेट मध्ये सचिन क्रिकेट प्रवेश इतकी महत्वाची घटना दुसरी झाली नसेल. या खेळात, सचिनने आमुलाग्र बदल घडवून आणला. भारतीय खेळाडू, जलदगती गोलंदाजाला फोडून काढू शकतो, हे दाखवून दिले. गावस्करने जलदगती गोलंदाजीला तोंड कसे द्यायचे याचे धडे दिले (संजय मांजरेकर, द्रविड याच स्कूलचे विद्यार्थी) तर सचिनने त्याच्या पुढचे पाऊल टाकले आणि जलदगती गोलंदाजीवर वर्चस्व गाजवता येते, हे दाखवून दिले.
इथे एक बाब ध्यानात ठेवायला हवी, सचिन लोकप्रिय होण्यात, BCCI चा देखील मोठा हात होता. त्यांनी सचिनच्या लोकप्रियतेचा भरपूर फायदा करून घेतला आणि क्रिकेट खेळाचे चक्क “धर्मात” रुपांतर करू टाकले – हे योग्य कि अयोग्य हा वेगळ्या वादाचा विषय आहे पण ही वस्तुस्थिती मान्य करणे भाग पडते. क्रिकेटवर अतोनात प्रेम करणे, ही वृत्ती याच काळात बळावली, अगदी याच काळात खेळाच्या विश्वासाला तडा जाणाऱ्या घटना घडल्या तरी देखील या खेळात सचिन आहे, यावर लोकांची श्रद्धा असल्याने, लोकप्रियतेला खळ बसली नाही.
आता, याची दुसरी बाजू बघायला गेलो तर असे दिसते, या खेळावर कडवट टीका करणारे दिसतात. परंतु टीका करताना, बरेचवेळा असे दिसून येते, १] खेळात अनेक अपप्रवृत्ती (Match Fixing इत्यादी) शिरल्या, २] खेळाडूंना अति पैसा मिळाला. या खेळात अनिष्ट प्रवृत्ती शिरल्या, हे तर मान्यच करायला हवे. अगदी, काही प्रसिद्ध खेळाडू देखील यात सामील झाल्याचे सिद्ध झाले आणि खेळाबद्दल अप्रीती निर्माण झाली. हे मान्यच करायला हवे. परंतु खेळाडूंना अति पैसा मिळतो, हे टीकेचे कारण समजण्याच्या पलीकडचे आहे, खेळाडूंना पैसा मिळतो, काय झाले त्यात.खेळाडूंनी सतत गरिबीत(च) राहिले पाहिजे का? सोलकरचे उदाहरण देतो. १९७० च्या काळात, त्याच्या इतका जागतिक दर्जाचा क्षेत्ररक्षक दुसऱ्या कुठल्याच संघात नव्हता आणि कौशल्याची वाखाणणी झाली होती पण आयुष्यभर हा खेळाडू अगदी दारिद्र्यात राहिला नसला तरी जितके पैसे मिळायला हवे होते, त्यामानाने काहीच मिळाले नाहीत. आज मला त्याकाळातील अनेक असे खेळाडू दळावता येतील ज्यांना “पैसा” मिळालाच नाही.
एकतर खेळाडू लोकांचे आयुष्य हे अधिकाधिक २० वर्षांचेच असते, निवृत्तीनंतर पैशाचा मार्ग आटतो. काही सन्माननीय खेळाडू इथे वगळूया. बरे असे तर नसते, हे खेळाडू तुमच्या दाराशी वाडगा घेऊन उभे असतात. या खेळात अतोनात पैसा आला, तर त्यात खेळाडूंची काय चूक? हे सगळे संघटनेने विणलेले व्यावसायिक जाळे आहे आणि त्यातून संघटनेने प्रचंड पैसा मिळवला. बरेचवेळा क्रिकेट खेळाबद्दल फारशी माहिती न घेता टीका केली जाते. आपल्याला फक्त यश दिसते परंतु क्रिकेट हा जगातील काही अपवादात्मक खेळातील एक खेळ आहे, जिथे तुमचा जरा अंदाज चुकला तर जीव जाऊ शकतो, अगदी हेल्मेट घातलेले असले तरी. क्रिकेटचा बारकाईने बघितला तर अशी उदाहरणे आढळून येतील. टेनिस, फुटबॉल, गोल्फ, इत्यादी खेळत तुमच्या जीवाला धोका अजिबात नसतो. दुखापती होऊ शकतात पण जीव सुरक्षित असतो. जे कुणी प्रत्यक्ष क्रिकेट खेळले असतील त्यांना, या वाक्याचा मतितार्थ लगेच कळून येईल.
तुमच्याकडे सेकंदाचा क्षण हातात असतो त्या वेळातच निर्णय घेऊन, आलेला चेंडू खेळायचा असतो आणि येणारा चेंडू ताशी १५० कि.मी. वेगाने घोंगावत येत असतो!! सुनील गावस्करचे कौतुक याचसाठी करावेसे वाटते, ज्या देशात, सलामीचा फलंदाज म्हणजे सुरवातीची चार,पाच षटके खेळण्याची जबाबदारी, अशी समजूत रूढ असताना, या माणसाने केवळ देशालाच नव्हे तर जगाला दाखवून दिले, संहारक गोलंदाजी कशी खेळायची असते. भारतीय क्रिकेटपुरते बोलायचे झाल्यास, सुनील म्हणजे भारतीय संघाला संजीवनी देणारा अलौकिक खेळाडू होता. मी स्वत: एकेकाळी स्पर्धात्मक क्रिकेट खेळलो असल्याने, खेळपट्टीवर जाऊन, हा खेळ खेळण्याचे दिव्य काय असते, याची पुरेपूर प्रचीती घेतलेली आहे.
दुसऱ्या भागात, सचिन नावाचे रसायन काय होते, आणि त्याच्या खेळातील गुण आणि अवगुण , याबद्दल चार शब्द लिहायचा प्रयत्न करणार आहे.

No comments:

Post a Comment