Tuesday 14 June 2022

याला काय म्हणायचे?

*गाय हा निव्वळ पशु आहे* किंवा *२ दगड. एकात शिल्पकर्त्याला मूर्तीस्वरूप आढळले आणि त्याने छिन्नी चालवली. दुसरा फक्त दगडच राहिला*. हे आणि असे अनेक विचार सावरकरांचे आहेत जे त्यांच्या हयातीत आणि नंतर देखील स्वीकारले गेले नाहीत. *मृत झाल्यावर विद्युतदाहिनी मघ्ये शव जाळून टाकावे* म्हणणारे सावरकर, त्यांच्या हयातीतच नाकारले गेले आणि आजही मृत शव हे *पिंडदान*, *तेरावा विधी* आणि *वर्षश्राद्ध* अशा विधीत गर्क आहेत. याचे मुख्य कारण, शास्त्रोक्त विचार करणारे सावरकर कुणालाच पचणारे नाहीत आणि हे विचार नाकारणारे देखील स्वतःला *सावरकरभक्त* म्हणवून घेतात. अर्थात इथे फक्त *सावरकरच* नव्हेत तर *गांधी*, *आंबेडकर* आणि *नेहरू* देखील अपवाद नाहीत आणि याचे मुख्य कारण आपण आपल्याला जे सोयीचे वाटते, तितकेच स्वीकारले आणि प्रचंड *उदो उदो * केला आणि आजही तसाच केला जातो. सावरकरांनी आपल्या मुलाची *मुंज* केली नाही आणि कधीही *मुहूर्त* वगैरे विषयावर विश्वास ठेवला नाही आणि त्यांचे भक्त फक्त तेच आचरतात!! असे करण्यात आपण काही चुकीचे करत आहोत, याची जाणीव देखील कुणाला होत नाही कारण असे सगळे करण्यामागे त्यांच्या *भक्तिभाव* प्रचंड आहे. वास्तविक हे सगळे नेते आधी *माणूस* आहेत आणि त्यांच्या हातून देखील *प्रचंड चुका* झाल्या आहेत पण ते मान्य करण्यात, या भक्तांचा अहंकार दडलेला असतो. दुसरे असे, हे सगळे विचार मानण्यासाठी वेगळाच *बुद्धीवाद* आवश्यक असतो आणि तिथे *बौद्धिक प्राज्ञा* गरजेची असते. त्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज असते. हे सगळे कोण करणार? त्यापेक्षा, आपल्या गरजेनुसार आपल्या आवडत्या नेत्याची *पूजा* केली की सगळे पुरेसे होते आणि मुख्य म्हणजे *मेंदूला ताण* देण्याची आवश्यकता भासत नाही.