Tuesday 30 April 2019

घन घन माला नभी दाटल्या

मराठी ललित संगीताच्या वैभवशाली इतिहासात आजपर्यंत अनेक अमराठी गायक/ गायिकांनी आपली कला सादर केली आहे. त्यामुळे आवाजाचे नावीन्य, नवीन गायकीचे बंध इत्यादी अनेक सौंदर्यस्थळे उघडकीस आली, मराठी ललित संगीत श्रीमंत झाले. अमराठी गायक जेंव्हा मराठी गीते गातात तेंव्हा बरेचवेळा सर्वात आधी खटकतो, तो त्यांचा शब्दोच्चार. विशेषतः: उर्दूतील नाजूक लहेजा मराठी भाषेत येतो तेंव्हा मराठी शब्दांतील सौंदर्य डागाळते. उदाहरणार्थ "च", "ख" या अक्षरांचा उच्चार उर्दू भाषेत आणि मराठी भाषेत संपूर्ण वेगळा आहे आणि गाताना तो उच्चार तसाच येणे अपेक्षित असते परंतु काहीवेळा निराशा पदरी पडते. आजच्या आपल्या मराठी गाण्यात मात्र असा प्रकार ऐकायला अजिबात मिळत नाही. हिंदी/उर्दूतील सुप्रसिद्ध गायक मन्नाडे यांनी गायलेले "घन घन माला नभी दाटल्या" हे गाणे यादृष्टीने समाधान देणारे आहे. वास्तविक तंत्राच्या दृष्टीने मल्हार रागावर आधारित गाणे आहे पण तरीही रागाच्या पलीकडील भावना दर्शविणारे गाणे आहे. संगीतकार वसंत पवारांनी गाण्याला चाल लावली आहे. मी मागे देखील एका लेखात या संगीतकाराबद्दल एक विधान केले होते - संगीतकार वसंत पवारांना लावणीचे सम्राट अशी बिरुदावली दिली आहे. वास्तविक अशा पदव्या देण्याची काही गरज नसते. कलाकार असे एकाच साच्यात बसणारे नसतात पण तरीही आपली खोड काही जात नाही. कवितेच्या पहिल्याच  वाचनाने, आपल्याला आशय आकळतो. पावसाळी ऋतूचे वर्णन केले असून, त्या वेळच्या सगळ्या प्रतिमांचा यथेच्छ वापर कवी ग.दि.माडगूळकरांनी केलेला आहे. पावसाळा आणि मोराचे नाते तसे चिरंतन आहे तसेच मोराचा केकारव, ही पंत कवी मोरोपंतांची आवडती प्रतिमा, पावसाळ्यातील यमुना नदी, नदी काठच्या गवळणी इत्यादी प्रतीके कवीने या शब्दरचनेत योजिली आहेत. यमुनेला "कालिंदी" म्हणणे ही ज्ञानेश्वरांची आवडती प्रतिमा. 

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा 
केकारव करी मोर काननी, उभवुनी उंच पिसारा 

अर्थात आपल्याच संस्कृतीतील प्रतीके सुयोग्यपणे वापरणे आणि त्यातून अचूक आशय दृग्गोचर करणे, कवीच्या प्रतिभेच्या संदर्भात महत्वाचे लक्षण मानावे लागेल. गाण्याची चाल तशी परिचित आणि सरळ, सरळ मल्हार रागाच्या प्राथमिक स्वरांची मांडणी ध्यानात घेऊन केलेली आहे परंतु तिला चित्रपट गीताचे स्वरूप प्रदान करताना, त्यात आवश्यक तितके बदल आणि स्वातंत्र्य घेतलेले आहे. एक संगीतकार म्हणून स्वतः:ला इतकी मोकळीक घेणे हे नेहमीच अपेक्षित असते अन्यथा कलासंगीताची कार्बन कॉपी, असा ठपका येण्याची शक्यता असते. चालीचे कुलशील जाणून घेताना, संगीतकाराच्या कलासंगीताचा पायाभूत अभ्यास नेमका झाल्याचे समजून घेता येते. 

कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी 
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारात 

वास्तविक गायक मन्नाडे हे हिंदी/उर्दू/बंगाली भाषिक गायक. संपूर्ण कारकीर्द याच भाषेतील गाणी गाण्यात गेलेली तरीही असले अस्सल गायकी ढंगाचे गाणे आणि खास मराठी शब्द असलेली कविता गाताना, भस्व्हेचा अचूक अभ्यास केल्याचे दिसते. "उंच", "सायंकाळी" "घुमवी" असा शब्द गाताना, शब्दोच्चार अतिशय अचूक आणि नेमके केले आहेत. गायक म्हणून मूल्यमापन करायचे झाल्यास, आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्याचच पल्ला विस्तृत आहे व त्यात सर्वत्र खुलेपणा आणि ताकद राखणे त्यांना जमले. त्यांचा आवाज हलका आहे आणि सर्व प्रकारच्या ताना, हा आवाज लीलया घेऊ शकतो. शास्त्रोक्त संगीताच्या संदर्भात हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात स्वच्छ "आ"काराने गायन करण्यावर अधिक भर असतो आणि हे देखील मन्नाडे सहज करू शकतात (अनेकदा व्यावसायिक शास्त्रोक्त गायकांनासुद्धा हे जमत नाही, ही बाब इथे महत्वाची ठरावी!!) आकाराने शक्य होणारा विशेष गुण सहकंपन वा गुंजन हा परिणामतः: त्यांच्या गायनात भरपूर पसरलेला आहे. 

वर्षाकालीन सायंकाळी 
लुकलुक करिती दिवे गोकुळी 
उगाच त्यांच्या पाठीस लागे भिरभिरता वारा 

ललित गायनात तुम्हाला कधी तिन्ही सप्तकात गायला आलेच पाहिजे, अशी सक्ती नसते, नसावी. अर्थात गरजेनुसार अपेक्षा ठेवणे योग्य आहे. इथे भावना परिपोष याला अधिक महत्व. या गाण्यातील मुखडा संपताना मन्नाडे यांनी "खंडित" असा "आ"कार घेतलेला आहे, तो मुद्दामून ऐकण्यासारखा आहे. त्यांच्या गळ्याची ताकद दर्शवून देणारा आहे. 

कृष्णविरहिणी कोणी गवळण 
तिला अडविते कवाड, अंगण 
अंगानी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा 

याव्यतिरिक्त मन्नाडे यांचा विशेष सांगायचा झाल्यास, प्रत्येक संगीतप्रकारानुसार जी एक भावस्थिती ढोबळ मानाने परंपरेत निश्चित झालेली असते ती सुचवणारा आवश्यक तो लगाव ते सहज देऊ शकतात आणि त्यात कुठेही चाचपडलेपणाची भावना नसते. मुळात, चित्रपटसंगीतात सांगीत बढत करायची नसते तर एक संबंधित मूड निर्माण करून बाकीची कार्ये साधायची असतात. म्हणूनच "सुरेलपणा","भरीवपणा" आणि "यथायोग्य" उच्चार या बाबी फार महत्वाच्या ठरतात आणि मन्नाडे इथे पुरेपूर उतरतात. 


Wednesday 24 April 2019

होल्डींगची असामान्य लयकारी

१९८१ मधील वेस्टइंडीज/ इंग्लंड मधील बार्बाडोस इथला कसोटी सामना. इंग्लंडची बॅटिंग सुरु होणार होती. फलंदाज म्हणून बॉयकॉट तर त्याला गोलंदाजी टाकायला होल्डिंग आणि क्रिकेट इतिहासातील असामान्य ओव्हर सुरु झाली. एव्हाना, होल्डींगची ओळख जगाला पूर्णपणे ज्ञात झाली होती तसेच बॉयकॉट तर तंत्राचा आधारभूत आधारस्तंभ. पहिले ४ चेंडू फलंदाजाला  नाही - फलंदाज बॅटीवर घेण्याचा प्रयत्न करीत आहे पण तरीही बॅट चुकवून चेंडू विकेटकीपरच्या हातात स्थिरावत आहे. फलंदाज गोंधळलेला आणि क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि अवघे स्टेडियम उत्साहाने उसळलेले!! बॉयकॉटला नक्की काय घडत आहे, हेच समजेना. तंत्र तर अचूक आहे पण चेंडू बॅटवर येताच नाही. ही चेंडूच्या वेगाची असामान्य करामत होती. ज्यावेगाने चेंडू येत होता, त्याच्या जोडीने फलंदाजाचे reflexes कमी पडत होते. अखेरीस शेवटचा चेंडू टाकला आणि बॉयकॉटच्या यष्ट्या उध्वस्त झाल्या!! फलंदाज आणि खुद्द बॉयकॉट हतबुद्ध अवस्थेत पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याला समजेना, आपले तंत्र कुठे चुकले? तंत्राच्या बाबतीत बॉयकॉट जगन्मान्य होता पण चेंडूचा वेगच इतका भन्नाट होता, तिथे निमिष हा क्षण देखील मोठा वाटेल इतक्या अवकाशातील चूक फलंदाजाला महाग पडली. ही ओव्हर क्रिकेट जगात आजही अतुलनीय अशी मानली जाते. इथे केवळ बॉयकॉट नव्हे तर जगातील कुठलाही फलंदाज तग धरू शकला नसता, हे आता सर्वांनी एकमुखाने मान्य केले आहे. 
६ फुटापेक्षा उंच, अशी लाभलेली उंची, सडपातळ बांधा तरीही सडसडीतपणा सगळ्यांच्यात उठून दिसणारा (त्यावेळेचा वेस्टइंडीज संघ आठवावा म्हणजे या विधानाची प्रचिती येईल). होल्डिंग बाबत सर्वात लक्षवेधी भाग म्हणजे त्याचा "स्टार्ट"!! जवळपास मैदानाच्या एका टोकापासून बॉलिंगसाठी धावत येणारा येणारा होल्डिंग बघणे, हाच खरा नयनरम्य सोहळा होता. १९८३ च्या विश्वचषकात, आता नेमका सामना आठवत नाही पण, एका सामन्याच्या वेळी, होल्डिंग धावत असताना, त्याच्या जोडीने चित्त्याची धाव दाखवली होती आणि त्यातील विलक्षण साम्य बघून, मी विस्मित झाल्याचे आठवत आहे. होल्डिंग हा वेगवान गोलंदाजांमधील असामान्य कलाकार होता. वेग तर दहशतवादी होताच पण त्याची धाव, आणि चेंडू टाकण्याची शैली, यात सुंदर कलात्मक रचना होती. वर्षानुवर्षे ती कला अबाधित राहिली होती. त्याच्या वेगावर मोहित होऊन, त्यावेळी १०० कि.मी. वेग हा मापदंड निर्माण झाला होता. तसे बघितले तर त्याचा स्विंग फार मोठा नव्हता जसा अँडी रॉबर्ट्सचा होता. परंतु त्याची भरपाई, होल्डिंग आपल्या वेगाने आणि अचूकतेने करीत असे. तसेच त्याच विलक्षण अचूकतेला, होल्डींगने "यॉर्कर"ची जोड दिली होती. मी बघितलेल्या वेगवान गोलंदाजात होल्डिंग आणि थॉमसन, असे दोनच वेगवान गोलंदाज बघितले, ज्यांच्या यॉर्करने फलंदाजांची गाळण उडाली होती. टप्पा अतिशय खोलवर टाकणे, हे कौशल्य आहे कारण जर का टप्पा चुकला तर चेंडू फुलटॉस पडणार आणि चौकार निश्चित बसणार. पण, जर का चेंडू अचूक यॉर्क झाला तर दोनच बाबी संभवतात, एकतर पायचीत होणे किंवा यष्ट्या उध्वस्त होणे. १०० कि.मी. वेगाचा चेंडू बॅटीच्या खाली येणे म्हणजे काय असते, हे प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांना अधिक नेमके समजून घेता येईल. निव्वळ हताश, अशीच भावना आपल्यापाशी असते. 
होल्डींग हा तितकाच अफलातून क्षेत्ररक्षक होता. १९८० च्या ऑस्ट्रेलिया/वेस्टइंडीज मालिकेतील एका सामन्यात ( You Tube वर बघता येते) होल्डींगने चेंडू टाकला आणि समोरच्या फलंदाजाने, स्ट्रेट ड्राइव्ह मारला. वास्तविक गोलंदाजाने अडवण्याचा प्रयत्न देखील केला नसता परंतु इथे होल्डींगने चेंडू टाकल्यानंतर जो follow through असतो तोच थांबवला आणि मैदानावर झोकून देऊन, तो फटका अडवला. निव्वळ अविस्मरणीय परंतु इथेच होल्डिंग थांबला नाही तर त्याच ऍक्शनमध्ये हातातील चेंडूने समोरील यष्ट्या उध्वस्त केल्या. Complete Athletics. खुद्द फलंदाजच नव्हे तर समालोचन करणारा रिची बेनॉ देखील अवाक झाला होता. मानवी प्रयत्नांच्या पलीकडील ही घटना होती - निदान त्या वेळेपुरते तरी नक्कीच. 
हॉलनंतर निव्वळ वेगाने दहशत निर्माण करणारा हाच वेस्टइंडीजकडून गोलंदाज निर्माण झाला होता. अर्थात वयोमानानुसार वेग मंदावतो पण इथे होल्डिंग फार वेगळा ठरला. अचूकता तर कायमची वस्तीला आलीच होती पण त्याला आता त्याने स्विंग करण्याच्या कलेची जोड दिली. इथे त्याला अँडी रॉबर्ट्स मदतीला आला. आजही होल्डिंग आणि गार्नर, याबद्दल रॉबर्ट्सचे ऋण सांगायला चुकत नाहीत. खरंतर, त्यावेळची "रॉबर्ट्स, होल्डिंग,गार्नर आणि क्रॉफ्ट" ही जगप्रसिद्ध चौकडी तयार करण्यामागे फक्त रॉबर्ट्स हाच कारणीभूत होता. उतार वयात देखील होल्डींग चेंडू टाकण्याच्या वेगात विलक्षण आणि अनपेक्षित बदल करून आणि त्याला स्विन्गची जोड देऊन, फलंदाजाला गांगरून टाकत होता.
१९८३ च्या भारत/ वेस्टइंडीज मालिकेत जेंव्हा मार्शल भारतात धुमाकूळ घालत होता तेंव्हा त्याला प्रतिउत्तर म्हणून सुनीलने मार्शलवर प्रतिहल्ला चढवला होता (दिल्ली इथल्या सामन्यात सुनीलने केलेली अविस्मरणीय १२५ धावांची खेळी) आणि काहीवेळा मार्शल हतबुद्ध झाल्याचे जाणवले पण तिथे होल्डिंग वेगळा निघाला. आजही सुनील कबूल करतो, त्या मालिकेतील होल्डिंग फार अवघड होता कारण आता तिथे निव्वळ वेग नसून, अचूकतेसोबत स्विंग आणि वेगवेगळे बाऊंसर्स मदतीला होते. वास्तविक, ५० ओव्हर्सच्या सामन्यात देखील होल्डिंग अफलातून गोलंदाजी करायचा. पुढे. पुढे त्याने स्टार्ट थॊडा कमी केला पण त्याची भरपाई, खांद्यातून चेंडू टाकणे, या कलेतून केली. खांदा वापरणे, ही खासियत रॉबर्टसची पण ती कला पुढे होल्डींगने विस्तारली. याचा परिणाम असा झाला, स्टार्ट छोटा झाला म्हणून वेग थोडा कमी झाला, असे सुरवातीला तरी बरेचसे फलंदाज मानत होते पण लवकरच त्यांचा भ्रमनिरास झाला. 
होल्डिंगचे क्षेत्ररक्षण हा दुसरा विलोभनीय भाग. मैदानाच्या टोकावरून विकेटकीपरकडे फेकलेला चेंडू बघणे, हे देखील तितकेच सौंदर्यवान होते. होल्डींगकडे चेंडू आला आहे, म्हणजे धाव चोरण्याची शक्यताच बंद. इथे देखील तो ज्याप्रकारे खांद्यातून थ्रो करीत असे, (त्यावेळी,  रिचर्ड्स,गार्नर असे क्षेत्ररक्षक असाच चेंडू फेकत असत) ते बघण्यासारखे होते. फलंदाजी मात्र कामचलाऊ स्वरूपाची होती. तरीही प्रसंगी उपयोगी पडणारी होती -  आठवा,रिचर्ड्सची इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यातील १८९ धावांची खेळी. सगळं संघ परतला  असताना,दुसऱ्या बाजूने रिचर्ड्सला होल्डींगनेच खंबीर साथ दिली होती तरीही होल्डींगला फलंदाज म्हणून मानता येणार नाही. त्याची त्या संघाला गरजच नव्हती म्हणा.त्याला कसोटी क्रिकेट अतिशय आवडीचे होते आणि जेंव्हा संघाच्या Physiotherapist ने होल्डींगला फक्त एकदिवसीय सामान्यांपुरते राखून ठेवायचे ठरवले तेंव्हा होल्डींगने तात्काळ क्रिकेटमधून संन्यास घ्यायचे ठरवले.
जागतिक क्रिकेट एका असामान्य वेगवान गोलंदाजाला कायमचे मुकले. 

Monday 22 April 2019

मनगटी जादूगार - इरापल्ली प्रसन्ना

मला वाटतं १९७०/७१ चा रणजी सामन्यांचा मोसम असावा, मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर मुंबई विरुद्ध कर्नाटक, हा सामना होता. मी तर हाडाचा मुंबईकर म्हटल्यावर मुंबईला पाठिंबा, हे ओघानेच आले. नुकतीच शाळेच्या संघातून खेळायला सुरवात झाली होती. त्यावेळी मुंबई संघातून, सुनील, रामनाथ (याच्यासारखा क्षेत्ररक्षक फार विरळा बघायला मिळाला!!) दिलीप सरदेसाई, वाडेकर, अशोक मंकड, शिवलकर, सोलकर, बाळू गुप्ते सारखे खेळाडू तर कर्नाटक संघातून विश्वनाथ, ब्रिजेश पटेल (हे नाव नव्यानेच प्रकाशात आले होते) चंद्रशेखर आणि प्रसन्ना. या सामन्यात प्रथमच मी प्रसन्नाला प्रत्यक्ष खेळताना बघितले. 
काहीशी जाडसर शरीरयष्टी, काहीसा बुजरा परंतु हसरा चेहरा हीच या गोलंदाजांची पहिली आठवण. १९६७/६८ च्या ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड दौऱ्यात प्रसन्नाचे नाव मी प्रथम ऐकले/वाचले होते. प्रत्यक्ष आयन चॅपलने तोंडभरून कौतुक केल्याचे मुलाखतीत वाचले होते. त्यावेळचा ऑस्ट्रेलियन संघ खरोखरच असामान्य असाच होता आणि त्यांच्या घरी जाऊन २५ विकेट्स घेणे, ही काही सहज जमण्यासारखी कामगिरी नव्हती. पुढे त्याच मालिकेला जोडून, न्यूझीलंड मालिकेत २४ विकेट्स पदरी पाडल्या होत्या. आयन चॅपेलने तर गिब्सपेक्षा मोठा स्पिनर, अशी वाखाणणी केली होती. या पार्श्वभूमीवर मी त्याला मैदानावर बघताना काहीसा हरखूनच गेलो होतो - माझे ते वयच असे होते, एक शाळकरी मुलगा, मनावर तसे काही फार संस्कार झालेले नव्हते आणि त्यावेळी कसोटी क्रिकेटपटू बघणे, हाच दुर्लभ आनंद असायचा. ब्रेबर्न स्टेडियमवर बहुदा मी प्रथमच गेलो होतो. इतका विस्तीर्ण परिसर, आजूबाजूला चकचकीत वातावरण, काहीशी ब्रिटिश छाप आणि संपूर्ण मैदान हिरवळीने भरलेले. एकूणच भारून गेलो होतो. आता सामन्याचा तपशील फारसा आठवत नाही पण मनावर बिंबले टी प्रसन्नाच्या गोलंदाजीची शैली. किती सहज सुंदर अशी शैली होती. 
चार, पाच पावलांचा स्टार्ट आणि त्याच सहजतेने, हाताची ऍक्शन. कुठेही आकांडतांडव नाही की चेहऱ्यावर कसलेही भाव नाहीत. सध्या लयीत धाव घ्यायची आणि पुढे चेंडूची जी काही करामत करायची, ती सगळी त्याची बोटे करीत असत. वास्तविक ब्रेबर्नची खेळपट्टी फलंदाज धर्जिणी होती आणि स्पिनर्सना खेळण्यासाठी मुंबईकडे वाडेकर, सरदेसाई, मंकड सारखी अफलातून फौज होती पण तरीही यामधील प्रत्येक फलंदाज, प्रसन्नाला जपूनच खेळत होता. त्यावेळी मी प्रसन्ना आणि बेदी, असे दोनच मंदगती गोलंदाज पाहिले ज्यांची चेंडू टाकायची शैली अतिशय साधी असायची पण निव्वळ मनगटावर ते फलंदाजांना नाचवायचे. त्यासाठी, प्रसन्ना, वेगवेगळ्या प्रकारे चेंडूला उंची द्यायचा - चेंडूला वेगवेगळी उंची देण्यात तर प्रसन्ना निव्वळ जादूगार असायचा. एकाच शैलीत चेंडू टाकताना, चेंडूचा फ्लाईट कमी-जास्त करून, समोरील फलंदाजाला आव्हान द्यायचा. चेंडू "ओव्हरपीच" पडेल असे वाटायचे आणि म्हणून फलंदाज पाय पुढे टाकून ड्राइव्ह मारण्याच्या पवित्र्यात यायचा आणि अंदाज चुकायचा - परिणाम, फलंदाजांची यष्टी उखडली जायची किंवा जर का फटका मारायचे ठरवलेच तर बॅटीची कड लागून थेट प्रसन्नाच्या हातात झेल!! हे दृश्य अविस्मरणीय. 
फलंदाजाला गंडवणे, हा प्रसन्नाच्या डाव्या हाताचा मळ होता. आपण कुठे चुकलो, याचा शेवटपर्यंत पत्ता लागायचा नाही. एकतर चेंडूला वळवणे (प्रसन्ना आपल्या मर्जीनुसार चेंडू वळवत असे, त्यासाठी खेळपट्टीचा साथ हवीच असला आग्रह नसायचा) या कलेवर त्याचे कमालीचे प्रभुत्व होते. ऑफ स्टम्पच्या बाहेर - किती बाहेर तर पाचव्या किंवा सहाव्या यष्टीवर चेंडू टाकायचा आणि अखेरीस लेग स्टंपपर्यंत आता वळायचा!! एखाद्या जहरी कोब्राने १८० अंशाच्या कोनात डंख द्यावा तसा त्याचा चेंडू फलंदाजाला डंख द्यायचा. त्याच्या भात्यात अनेक शास्त्रे होती. चेंडूच्या फ्लाईटमधील अगम्य बदल करणे, मध्येच "फ्लोटर" टाकणे, चेंडू किती "स्पिन" करायचा हे नेमके मनात ठरवून तसा चेंडू टाकणे. अखेरच्या क्षणी चेंडू स्पिन करण्याच्या पद्धतीत अकल्पित बदल केल्याने, समोरील फलंदाज बावचळून जायचा. आधीचा  चेंडू संपूर्णपणे १८० कोनात वळलेला असायचा, त्याच शैलीत पुढील चेंडू चक्क फ्लोटर असायचा किंवा स्पिन थोडा कमी असायचा. त्यामुळे व्हायचे असे, येणार चेंडू पुन्हा त्याचा अंशात वळणार या भ्रमात असलेला फलंदाज, कमी वळलेल्या चेंडूला तितका तयार नसायचा आणि त्याची फसगत व्हायची. प्रसन्ना या कलेतील जादूगार होता, तो इथे. 
मी वर म्हटल्याप्रमाणे, त्याचे फ्लाईटवर पूर्ण नियंत्रण असायचे. फसवा फ्लाइटेड चेंडू टाकणे, ही प्रसन्नाची खासियत होती. वास्तविक "ओव्हरपीच" चेंडू म्हणजे फलंदाजाला कव्हर ड्राइव्ह मारायला निमंत्रण आणि तसा फटका खेळावा असे प्रसन्ना आमंत्रण देत असे परंतु आयत्यावेळी फलंदाजाला समजायचे, जरी चेंडूला उंची दिली असली तरी त्याचा टप्पा थोडा अलीकडे पडलेला आहे. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असायची. ही करामत मैदानावर बघणे, हा नयनरम्य सोहळा असायचा. वेगवान गोलंदाजीत सगळा खेळ निमिषात संपणारा असतो परंतु इथे पुंगी वाजवून नागाला खेळवीत मारणे, ही स्पिनर्सची खरी खासियत असते आणि इथे प्रसन्ना अतुलनीय होता. 
आणखी एक गंमत. आपल्या मनाप्रमाणे फलंदाजाला खेळवून त्याची विकेट घेतल्यावर, त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरायचा, ते स्मित, बघण्यासारखे असायचे. मी या फलंदाजाला, माझ्या मर्जीप्रमाणे खेळवले आणि त्याला बाद केले, याचा आनंद असायचा. त्यावेळी भारतीय संघात, स्पिनर्स गोलंदाजीत तगडी स्पर्धा होती. एकाचवेळी, प्रसन्ना, चंद्रशेखर, बेदी, वेंकट तसेच संघाबाहेर, शिवलकर, राजिंदर गोयल सारखे असामान्य मंदगती गोलंदाज उपलब्ध होते. या सहा गोलंदाजांपैकी गोयल आणि  शिवलकर,यांना निव्वळ दुर्दैवी म्हणावे लागेल. चुकीच्या काळात जन्माला आले. त्यामुळे भारतीय संघात नेहमी स्पर्धा ही प्रसन्ना आणि वेंकट, या दोघांच्यात असायची आणि प्रसन्नाच्या तुलनेत वेंकट, क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत बराच उजवा होता आणि त्याचा वेंकटला बराच फायदा मिळाला. अन्यथा फक्त, चेंडू वळवणे आणि मंदगती गोलंदाज म्हणून प्रसन्ना नेहमीच उजवा होता. 
प्रसन्ना एक क्षेत्ररक्षक म्हणून कामचलाऊच होता. खरतर त्या काळात क्षेत्ररक्षण म्हणून काही खास बाब असते, इकडे दुर्लक्षच असायचे. बेदी, चन्द्रशेखर, प्रसन्ना कधीही क्षेत्ररक्षक म्हणून मान्यता पावले नाहीत जे आज रवींद्र जडेजा बाबत म्हणता येईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा संघाला नेहमीच फायदेशीर असतो परंतु त्याकाळात ही कल्पना तितकीशी स्वीकारली गेली नव्हती. (वाडेकर, सोलकर, वेंकट सारखे अपवाद) अर्थात याची भरपाई हे गोलंदाज आपल्या कलेतून पुरेपूर दाखवून देत असत. 
प्रसन्नाने हिरवळीवरून ३, ४ पावलांच्या स्टार्टमध्ये हातातील बोटांच्या साहाय्याने भल्याभल्या फलंदाजांवर दहशत गाजवली होती. याचा अर्थ असा  नव्हे,प्रसन्नाने नेहमीच आपले वर्चस्व गाजवले. ऐन भरात असताना, एका रणजी सामन्यात मुंबईच्या संघातील वाडेकर/सरदेसाई जोडगोळीने ३०० धावांची भागीदारी करून प्रसन्ना/ चंद्रशेखर जोडीला कसे आपल्या तालावर नाचवायचे, याचा आदिनमुना पेश केला होता पण असे फार क्वचित घडायचे. अर्थात कारकिर्दीच्या अखेरीला मात्र प्रसन्नाची जादू लयाला जायला लागली आणि जे घडायचे तेच घडले. १९७७/७८ च्या सुमारास प्रसन्नाने आपली कारकीर्द आटोपती घेतली. त्यानंतर आता ४० वर्षे झाली पण भारताला अजून दुसरा प्रसन्ना सापडू शकला नाही. 

Tuesday 16 April 2019

रॉबेन आयलंड

१९९८ मधील केप टाऊन सफरीत, रॉबेन आयलंडला भेट देणे, हा कार्यक्रम नक्की केला होता. हा तुरुंग, विशेषतः नेल्सन मंडेलांच्या दीर्घ कारावासाच्या पार्श्वभूमीवर या तुरुंगाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. केप टाऊनला पोहोचलो आणि लगोलग रॉबेन आयलंडला जाण्याच्या मरीन बोटीची चौकशी केली. सुदैवाने हवामान चांगले असल्याने मला तिकिटे लगेच मिळाली. खराब हवामानामुळे रॉबेन आयलंड आणि केप किनारा मधील समुद्र प्रचंड खवळलेला असतो आणि मग फेरी बोट बंद ठेवतात. रॉबेन आयलंडला जाण्यासाठी साधारणपणे बोटीला अर्धा ते पाऊण तास लागतो. बोटीतून जाताना लक्षात येते, इथे तुरुंग बांधण्यात, त्यावेळच्या गोऱ्या राजवटीने किती धूर्त विचार केला असणार. दोन्ही प्रदेशांमधील समुद्र अतिशय धोकादाय असा असतो. तुरुंगातून पळून जाऊन, समुद्रात उडी टाकून नसण्याचा प्रयत्न करणे, महा भयंकर धाडस आहे आणि ही आजची अवस्था!! 
रॉबेन आयलंड हे मोठे बेट आहे, चारी बाजूने समुद्राने वेढलेले. या बेटावर राहायचे म्हणजे तुम्हाला पाण्यापासून सगळ्या गोष्टी केप टाऊनमधूनच आणाव्या लागतात. सध्या इथे थोडे अधिकारी राहतात परंतु आता त्याचे स्वरूप म्युझियमसारखे ठेवले आहे. जातानाच तुरुंग किती भयाण असणार, याचा अंदाज येतो.  जेंव्हा  या देशात १९९४ साली आलो तेंव्हा या देशाची जी काही तुटपुंजी माहिती होती, त्यात नेल्सन मंडेला आणि त्यांचा तुरुंगवास, या माहितीला अधिक महत्व होते. हा देश किती पुढारलेला आहे, वगैरे माहिती, मी इथे आलो, अनुभवले तेंव्हा झाली. तेंव्हा याच पार्श्वभूमीवर मी आणि माझा  मित्र,रॉबेन आयलँडच्या सफरीवर निघालो होतो. 
आकाश निरभ्र होते, दुपारचे ऊन टळटळीत होते. जवळपास अर्ध्या, पाऊण तासाने आमची फेरी बोट या बेटाच्या धक्क्याला लागली. फेरी बोटीच्या सफरीत, हा समुद्र किती धोकादायक आहे, याची कल्पना आली. 
आता रॉबेन आयलंड हे म्युझियम स्वरूपात असले तरी तुरुंग त्याच काळातील ठेवले आहेत. थोडीफार डागडुजी केल्याचे कळत होते परंतु इथे उतरल्यावर पहिली जाणीव हीच होते, आपला बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. कुठेही मानवी वस्ती असल्याचे जाणवत नव्हते. अर्थात सर्वात आधी, नेल्सन मंडेलांना जिथे ठेवले होते, त्या खोलीकडे आलो. बघताना, मला आपल्या अंदमान इथल्या तुरुंगाची फार आठवण येत होती. अंदमान तुरुंग देखील असाच असणार, जगापासून तुटलेला!! आज अंदमान बऱ्यापैकी सुधारलेले आहे. रॉबेन आयलंड आजही त्याच अवस्थेत ठेवलेले आहे आणि त्यामुळे भयाणता अधिक भावते. आसमंतात कुठेही (पक्षी वगळल्यास) कसलाच आवाज नाही, सुनसान शांतता असते. गाईड बरोबर असतो आणि त्याच्याकडून बरीचशी माहिती कळते. 
Mbeki, Zuma किंवा सध्याचे Ramaphosa हे अध्यक्ष देखील मंडेलांसोबत इथेच आयुष्य कंठत होते. इतकेच नव्हे तर असंख्य मुस्लिम लोकांना देखील इथेच डांबून ठेवले होते. काहींची इतिश्री इथेच झाली होती!! सगळा इतिहास फोटोंच्या रूपाने तसेच तिथे काही पुस्तिका मिळतात, त्यावरून लक्षात येतो. या देशाने काय आणि किती भोगले होते, किती अपमानास्पद जिणे जगावे लागले होते, याची कल्पना (आपण कल्पनाच करू शकतो) येते. इथे तुरुंगात आयुष्य सडत असताना, कित्येकांचे संसार कायमचे उध्वस्त झाले, कित्येकांच्या कायमच्या ताटातुटी झाल्या, हे सगळे कळते. आपल्याला फक्त नेल्सन मंडेलांनी किती भोगले, इतकेच सांगितले जाते - निदान त्यावेळेपर्यंत तरी माझी तितकीच कल्पना होती. वास्तविक मी या देशात १९९४ साली आलो त्याच वर्षी इथे पहिल्या लोकशाही राजवटीची पुनर्स्थापना झाली होती आणि मला देखील वांशिक भेदाभेदीचे अनुभव आले होते परंतु वर्षानुवर्षे नकारात्मक आयुष्य जगणे म्हणजे काय अनुभव असतो, हे समजून घेण्यासाठी तरी इथे यायला हवे. 
इथे कृष्णवर्णीयांबरोबर हजारोंच्या संख्येने आशियायी वंशीय लोकांनीही लढ्यात भाग घेऊन, आपली आयुष्ये उधळली आहेत, त्यात मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, दाक्षिणात्य आहेत. सगळ्यांचे फोटो आणि माहिती इथल्या म्युझियममध्ये बघायला मिळते. एकदा या बेटावर प्रवेश केला म्हणजे सगळे संपले कारण पळून जायचे तरी कुठे? बेटाच्या टोकावरून खवळत्या समुद्रात उडी मारणे, हाच एकमेव मार्ग आणि समुद्रात काय आहे, याचा कसा थांग लागणार? या बेटावर आणलेल्या बंदींना अमानुष पद्धतीने कामाला जुंपायचे, जेवणाचा पत्ता नाही, आपल्या माणसांशी संपर्क नाही. मनाची किती कुतरओढ झाली  असेल,कल्पनाच येत नाही. १९८५ नंतर जेंव्हा मंडेलांच्या हालाचे वर्णन जगात पसरायला लागले आणि आंतर राष्ट्रीय दबाव वाढायला लागला, त्यावेळेस इथे थोड्याफार सुधारणा झाल्या. अर्थात सुधारणा झालेले आयुष्य, सध्या  बघताना,पूर्वी काय प्रकारचे आयुष्य असेल, याची साधी कल्पना देखील अवघड. 
या देशाने अपरिमित हाल भोगले आहेत आणि निव्वळ सत्तेचा वरवंटा गौरवर्णियांनी आपल्या हातात ठेवायच्या अपरिमित लालसेपोटी, इथली आयुष्ये उजाड झालेली आहेत. 
इथे हिंडताना, मनाची फार विचित्र अवस्था होते आणि त्याच अवस्थेत आम्ही परतीची बोट पकडली. 

एक अविस्मरणीय गुड फ्रायडे.



अर्थात मी परदेशात (साऊथ आफ्रिका) रहात असतानाचा हा अनुभव आहे. भारतात अजूनतरी "इस्टर मंडे" अशी सुटी मिळत नाही त्यामुळे सलग ४ दिवसांची रजा म्हणजे भटकायला गाडी काढणे  आणि लांब फिरायला जाणे नेहमीचेच असायचे. एप्रिल महिना म्हणजे थंडीच्या मोसमाला सुरवात. हवा बोचरी नसली तरी अंगात स्वेटर घालणे आवश्यक. १९९८ मध्ये मी डर्बन इथे नोकरी करीत होतो. या देशात येऊन, ४ वर्षे आली तरी केप टाऊन झालेले नव्हते म्हणून इस्टर मंडे ला जोडून आणखी ३ दिवस रजा घेतली आणि एका मित्राला बरोबर घेऊन, गुरुवारी संध्याकाळीच केप टूर सुरु केली. रात्री ब्लूम  फॉन्टेन शहरात वस्तीला राहिलो. ब्लूम  फॉन्टेन शहर हे समुद्र सपाटीपासून खूपच वर असल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. आम्ही दोघे मित्रच असल्याने तशी राहण्याची काही फारशी व्यवस्था केली नव्हती, जिथे मिळेल तसे राहायचे, असेच ठरवले होते. एकतर आयत्यावेळेस ठरवले त्यामुळे बरीचशी हॉटेल्स आधीच भरलेली होती तरी देखील ब्लूम फॉन्टेन शहराच्या उपनगरात, सुदैवाने "सिटी लॉज" सारख्या उपयुक्त हॉटेलमध्ये जागा मिळाली. रात्रीचाच प्रश्न असल्याने, फारसा विचार केला नाही. रात्री शहर फिरायला बाहेर पडलो. तसे शहर फार मोठे नाही पण टुमदार आहे. डर्बन सारख्या शहरात राहिल्यानंतर मग मॉल्स, उंच इमारती वगैरे गोष्टींचे फार आकर्षण रहात नाही. बाहेर पडलो तेंव्हा रात्रीचे ८ वाजून गेले होते. हवेत गुड फ्रायडे असल्याने रस्त्यावर थोडीफार गर्दी होती. रस्त्यावरील हॉटेल्स तुडुंब भरलेली होती. हवेत गारवा असल्याने, टेबलांवर काचेचे चषक भरलेले अत्यावश्यक. मग अनिल कशाला मागे राहील? गार थंडीत On the Rocks घेणे म्हणजे काय अप्रतिम अनुभव असतो, हे शब्दात मांडणे फार अवघड आहे. आम्ही रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक टेबल पकडले आणि ड्रिंक्स सहित जेवणाची ऑर्डर केली. 
दुसऱ्या दिवशी पहाटेच निघालो आणि सरळ N2 हा हायवे पकडला. इथे सलग ८०० कि.मी. रस्त्यात कुठेही कॅमेरा नाही त्यामुळे गाडी जवळपास १६०, १७० वेगाने हाणली. अशा वेगाने गाडी चालवणे, हे खरोखरच थ्रिल असते. साऊथ आफ्रिकेत फक्त याच रस्त्यावर तुम्ही सलग इतक्या वेगाने गाडी चालवू शकता अन्यथा, १२०,१३० वेग इतकीच मर्यादा!! गुड फ्रायडेच्या दुपारी आम्ही केपच्या प्रवेशाशी आलो, Worsester इथला वाईन पार्क प्रसिद्ध आहे, लगेच गाडी आत घेतली. तोपर्यंत वायनरी अशी बघितलेली नव्हती. साऊथ आफ्रिकेची वाईन जगभर प्रसिद्ध आहे. फाटकातून आत शिरलो आणि साथीला देखणी हिरवळ आली, ती शेवटपर्यंत. सुरेख, निगुतीने राखलेली हिरवळ बघणे, हा अनिर्वचनीय अनुभव असतो. आजूबाजूला वाईन  विकण्याची दुकाने होती. आम्हाला, जिथे वाईन बनवतात, तिथेच जाण्यात अधिक रस होता, वाईन फॅक्टरी सगळ्यांना बघता येते. Worcester मध्ये प्रचंड द्राक्षाच्या बागा आहेत आणि सगळी लागवड ही फक्त वाईनसाठी केलेली असते. आयती बाजारपेठ उपलब्ध असल्याने, उगीच "मालाला पडलेला भाव" वगैरे प्रकार नाही. आणखी महत्वाची  बाब,ही वायनरी खाजगी आहे , जशी आता आपल्याकडे नाशिककडे "सुला वायनरी" झाली आहे. 
फॅक्टरीपाशी गाडी थांबवली आणि आत शिरलो. कारखाना म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर अवजड यंत्रे, खडखडाट आवाज असला सीन डोळ्यासमोर येतो पण वायनरीत यंत्राचा आवाज येतो पण तो कानाला अतिशय सुसह्य असतो. वाईन कशी बनवली जाते, याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. बहुतेक सगळी प्रक्रिया यंत्रांकडूनच पार पाडली जाते. द्राक्षे विशिष्ट प्रकारे आंबवली जातात, त्यात यीस्ट आणि इतर केमिकल्स मिसळली जातात,  गाळली जाते, तिथे खरा "अर्क" बाहेर निघतो. नंतर अवाढव्य पिंपात साठवली जाते ( हे सगळे मी स्कॉच वरील फिल्ममध्ये बघितलेले होते म्हणून फारसा विस्मय वाटलं नाही). इथे तुम्हाला ताजा अर्क घोटाच्या स्वरूपात प्यायला मिळतो. अनिल कशाला असला चान्स सोडणार!! 
पांढरी, सोनेरी आणि याच रंगाच्या आणखी छटांमधून वाईन तयार होते. गाळलेली वाईन, बाटलीत भरलेली बघणे - अप्रतिम सोहळा. तिथेच तुम्हाला वाईन कशी  घ्यावी,हे देखील शिकवले जाते. प्रत्येक वाईनचे स्वतः:चे असे स्वतंत्र काचेचं ग्लासेस असतात आणि त्यात ओतून, घोटाघोटाने तोंडात घोळवत वाईन घेतली म्हणजे तुम्ही खऱ्याअर्थी वाईनचा आस्वाद घेता. नाझी एक गमतीचा भाग लक्षात  आला,वायनरीतील वाईनची चव आणि बाहेर विक्रीला ठेवलेल्या बाटलीतील वाईनची चव, यात फरक पडतो. ताजी वाईन, म्हणून तिचा गुणधर्म वेगळाच असतो. 
आजतर गुड फ्रायडे, त्यामुळे तर तिथे उत्सवच होता. संध्याकाळी, तिथल्या क्लबमध्ये खास पार्टीचे आयोजन केले होते. वास्तविक तिथे जागा आधीच आरक्षित केलेल्या असतात पण निव्वळ नशिबाने आम्हा दोघांना प्रवेश मिळाला. वास्तविक तिथून केप टाऊन २५० कि.मी. दूर आहे आणि तिथे राहण्याची सोय बघायला हवी होती. तरी देखील आम्ही या पार्टीत सामील झालो. वास्तविक पार्टीचा खर्च तसा महागडा होता पण तरीही सगळे सोसायचे ठरवले. क्लब पार्टीला जायचे तर तुम्हाला पार्टी ड्रेस कोड पाळणे अत्यावश्यक अन्यथा प्रवेश मिळत नाही. आम्ही दोघे तर सडाफटिंग कपड्यात!! तिथल्याच एका गोऱ्या आयोजकाने आमची अडचण समजून घेतली आणि त्याने त्याच आवारातील एका दुकानात नेले. तिथे पार्टी ड्रेस भाड्याने मिळत होते. अशा प्रकारे इथे काही  मिळते,याचीच आम्हाला कल्पना नव्हती. लगोलग सूट,टाय आणि पॅन्ट भाड्याने घेतल्या आणि तिथल्याच एका लॉजमध्ये रात्रीची सोय केली. इथे सगळेच तसे आमच्या बजेटच्या बाहेर बसणारे होते तरी एकदा जीवाचे केप टाऊन करायचे म्हटल्यावर फारसा विचार केला नाही. 
आता हवेत चांगलाच गारठा वाढला होता. रात्री ९ च्या सुमारास पार्टी सुरु झाली. त्या हॉल मध्ये आम्हीच वेगळ्या रंगाचे. बाकीचे सगळे एकतर गौरवर्णीय अथवा कृष्णवर्णीय. सुरवातीला शॅम्पेन फोडली आणि पार्टीला रंग चढायला सुरवात झाली. मंद आवाजात पाश्चात्य जॅझ संगीत सुरु झाले आणि जोडप्यांनी पाय थिरकवायला सुरवात केली. चखणा म्हणून सॉसेजीस आणि चॉप्स होते. हॉलच्या बाहेरच बार्बेक्यू लावला होता. बार्बेक्यूच्या जाळीवर मंदपणे सॉसेजीस भाजले जात होते  आणि जशी गरज असेल त्याप्रमाणे प्रत्येकजण तिथून चॉप्स, सॉसेजीस घेत होते. तिथेच मी, मेयोनीजमध्ये कुस्करून मिसळलेला बटाटा, उकडलेली अंडी आणि बारीक तिखट मिरची आणि मिरीपावडर एकत्रित करून तयार केलेला पदार्थ खाल्ला. काय अफलातून चव होती. आम्ही सडाफटिंग असल्याने नृत्य करण्याचा प्रश्नच नव्हता त्यातून ओळखीचे कुणीही नाही. त्यामुळे कुणाला नृत्यासाठी विचारायचे? हा प्रश्नच होता. एक, दोनदा आमच्या बाजूच्या एका गोऱ्या जोडप्याने, आम्ही नृत्य करत नाही, म्हणून आश्चर्यच व्यक्त केले (यात एक बाब अशी होती, तोपर्यंत तरी मला पाश्चात्य नृत्य कसे करायचे, याची सुतराम कल्पना नव्हती) गोरा माणूस अशा वेळी किती खेळकर असतो याचा सुरेख अनुभव आला. आमच्याकडे "पार्टनर" नाहीत हे बघितल्यावर, त्याने त्याच्या बायकोलाच माझ्याबरोबर नृत्य करावे, अशी विनंती केली. इथे मात्र अनिल गांगरला!! वास्तविक मी बावळट होतो, हेच खरे. मी काहीच बोलत नाही, हे बघितल्यावर तीच माझ्याशी बोलायला आली. तेंव्हा मीच कबूल केले, मला पाश्चात्य नृत्य येत नाही. तिला थोडे आश्चर्यच वाटले कारण मी या देशात येऊन एव्हाना ४ वर्षे झाली होती आणि मला पाश्चात्य नृत्य येत नाही!!  शेवटी तिनेच पुढाकार घेतला आणि माझा हात हातात घेतला. मी पण मनात  म्हटले,च्यायला होतोय राडा तर होऊ दे. उद्या इथे कोण कुणाला भेटणार आहे. 
अर्थात  सुरवातीची १०मिनिटे अनिल बावचळला. पाय कशा लयीत कसे मागे, पुढे करायचे, काहीच समजेना पण तरीही पुढे रेटायचे ठरवले. हळूहळू अंदाज यायला लागला आणि सफाईदार जरी नसले तरी नवखेपणा निघून गेला. मुळातला बुजरेपणा कमी झाला आणि थोड्या आत्मविश्वासाने पाय हलायला लागले. जवळपास, अर्धा तास नृत्य करीत होतो, मनात कुठेही वासना डोकावली नाही - त्यावेळी याचे देखील आश्चर्यच वाटले. आणखी गंमत म्हणजे मी फक्त एकच ग्लास वाईन घेतली होती पण मुद्दामून घ्यावीशी असे पण वाटले नाही. रात्री ११ च्या सुमारास टर्की आली आणि आता आम्ही चौघांनी एक टेबल पकडले. रात्रभर संगीताचा धुडगूस चालू होता. 
आम्ही दोघांनी मात्र रात्री २ च्या सुमारास काढता पाय घेतला.   

Sunday 14 April 2019

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा

मराठी संगीत रंगभूमीवरील रचनाकार नेहमीच असा दावा करतात की ते भारतीय कलासंगीताचा यथायोग्य वापर, आपल्या स्वररचनेतून दाखवतात. ही भूमिका आणि हा दावा निश्चितच योग्य आहे. मराठी संगीत रंगभूमीचा जवळपास शतकभरातला इतिहास पडताळून बघितला तर या दाव्यातील सत्यता स्पष्टपणे दिसते. अण्णासाहेब किर्लोस्करांपासून सुरु झालेला प्रवास हा आजतागायत भारतीय कलासंगीताचे बोट धरूनच झाला आहे. किंबहुना असे म्हणता येईल, रागदारी संगीताची ओळख आणि जवळीक, सामान्य रसिकांना मराठी संगीत रंगभूमीने समर्थपणे करून दिली. अर्थात, संगीत रंगभूमीवरील रचनाकार हे मुळातून कलासंगीताचे व्यापक अभ्यासक, मीमांसक होते आणि याचा परिणाम, रसिकांना झालेले रागदारी संगीताचे परिपूर्ण आकलन. याच प्रदीर्घ परंपरेतील एक प्रतिष्ठित नाव - पंडित जितेंद्र अभिषेकी. मुळात "आग्रा" घराण्याची यथास्थित तालीम घेऊन, अभिषेकी बुवा रंगभूमीवर अवतरले. याचा परिणाम असा झाला, त्यांच्या बहुतेक स्वररचनांना रागदारी संगीताचे अधिष्ठान लाभले. आजचे गाणे " अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा" हे सरळ सरळ "भटियार" रागावर आधारलेले आहे पण तरीही अस्ताईच्या शेवटाला "ललत" रागाचा शिडकावा झालेला दिसतो. 


अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा 
धर्म न्याय निती सारा खेळ कल्पनेचा 

"संगीत मत्स्यगंधा" नाटकातील गाजलेली रचना. विशेष मुद्दा विचारात घ्यायचा झाल्यास, प्रस्तुत गाणे कविता म्हणून विचारात घ्यावे, असे आहे. थोडा बारकाईने विचार केल्यास पूर्वीच्या काळातील संगीत नाटकांतील शब्दरचना ही शब्दबंबाळ, संस्कृतप्रचुर अशी असायची. काव्य म्हणून आस्वाद घेणे निरातिशय अवघड असायचे आणि या पार्श्वभूमीवर, प्रस्तुत कविता ही सुबोध, गेयतापूर्ण, लालित्यपूर्ण अशी वाचायला मिळते. वास्तविक, वसंत कानेटकर हे गद्य नाटककार म्हणून प्रसिद्ध तरीही या नाटकातील काही गाणी त्यांनी लिहून थोडा आश्चर्याचा धक्काच दिला असे म्हणता येईल. वास्तविक कविता म्हणून वाचताना एक,दोन ठिकाणी शब्द डाचतात परंतु वसंत कानेटकर हे कुणी सिद्धहस्त कवी नाहीत, ही बाब इथे ध्यानात ठेवलेली बरी. 

ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे 
वीज त्यावरी जो पडूनी शिल्प कोसळावे 
सर्वनाश एकच दिसतो नियम जगाचा 

"संगीत मत्स्यगंधा" नाटकाचे संगीत हा खरे तर दीर्घ निबंधाचा विषय आहे. संगीतकार म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकींचे पहिले नाटक पण पहिल्याच नाटकात बुवांनी आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. संगीत नाटकातील संगीतात संपूर्ण परिवर्तन घडवून आणले. नाटकातील गाणी सहजपणे गुणगुणता येतील, अशा चाली बांधल्या पण तसे करताना, स्वरविस्ताराला भरपूर जागा ठेवल्या. गाणारा गायक/गायिका प्रशिक्षित असेल तर अशी स्वररचना गाताना त्याच्या प्रतिभेला वाव मिळेल, अशा प्रकारच्या चाली बांधल्या. मुळात, लिखित शब्दाला प्राधान्य देऊन आणि शब्दांचे औचित्य राखणाऱ्या चाली निर्माण केल्या आणि हे पंडित जितेंद्र अभिषेकींचे निर्विवाद आणि निखळ यश होय. चालींमध्ये लालित्य तर आहेच पण गायकीला आव्हान देखील आहे. हे सगळे करताना, स्वतः: संगीतकार हे आग्रा घराण्याचे प्रशिक्षित गायक असूनही बहुतेक स्वररचनांचा पिंड आणि बाज, त्यांनी ललित संगीताच्या अंगाने फुलवला. रागदारी संगीतातील लालित्य नेमके वेचून काढून, आपल्या रचना करताना, त्या संगीताचा सढळ उपयोग करून घेतला, मराठी संगीत रंगभूमी श्रीमंत केली. त्यांनी चालीचा धर्म, नेहमीच "गीतधर्मी" ठेवला. गाणे तयार करताना, कवीच्या शब्दांना सुद्धा तितकेच महत्व द्यायचे, हा विचार रुजवला. 
प्रस्तुत स्वररचना ही केवळ ३,४ मिनिटांत संपते परंतु त्यातही आपले सांगीतिक कौशल्य तितकेच प्रभावीपणे सादर होईल आणि संगीताबरोबर शब्दांचे औचित्य सांभाळले हा विचार प्राधान्याने ठेवला. यापूर्वी काही अपवाद वगळता, असा विचार जोरकसपणे मराठी संगीत रंगभूमीवर कुणीही मांडलेला नव्हता. चाकोरी मोडण्याचे प्रयत्न झाले परंतु चाकोरी मोडून, पुन्हा नवीन विचारांची पुनर्स्थापना करताना, जुन्या वळणाची काही अंगे कायम ठेऊन, नावीन्य सादर केले. ही एक प्रकारची बंडखोरीच होती. 
दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा 
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा 
वाहणे प्रवाहावरती धर्म एक साचा 

गायिका म्हणून आशालता वाबगावकर यांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, गेल्यावर रागदारी संगीताचे ठळक संस्कार दिसत नाहीत परंतु छोट्या हरकती, हलक्या ताना इत्यादी अलंकारांनी गायन फुलवण्याचे कौशल्य मात्र सुरेख, असेच म्हणायला लागेल. गळ्याचा तारता पल्ला मर्यादित, स्त्री गळा असल्याने तार सप्तकात निसर्गत: निमुळत्या स्वरांत जाणे शक्य. इथे या रचनेची लय थोडी द्रुत असल्याने, तालाच्या मदतीने गायन ठसठशीत झालेले आहे. मुखड्याचीच चाल पुढील दोन्ही अंतऱ्यांना असल्याने, कुठेही अवघडलेपण आढळत नाही. संगीतकाराने जो "नकाशा" आखलेला आहे, त्यातून मार्ग काढून इप्सित स्थळी भाव व्यवस्थित पोहोचवला आहे. पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा घेताना, दुसऱ्या ओळींनंतर चाल वरच्या स्वरांत जाते आणि तो प्रवास नीटसपणे गायिकेने निभावला आहे. परिणामी ,गाण्याचा स्वतः:चा म्हणून एक खास परिणाम घडतो, त्यात गायिकेला यश मिळाले, रसिकांना सुद्धा एक समृद्ध संगीत रचना ऐकल्याचे दीर्घकाळ समाधान मिळते. ललित संगीताची व्याप्ती यापेक्षा फार वेगळी नसते.