Friday 28 September 2018

तलत मेहमूद - मुलायम गायकीचा अनोखा आविष्कार

" मी नखलत नाही शिरा कोवळ्या ओल्या 
दुमडून कडांना दुखवत नाही देठ.... 
मी फक्त ठेवते उजेड हिरवा आत 
अन प्रेमासाठी मिटून घेते ओठ...."

सुप्रसिद्ध कवियत्री अरुणा ढेरे यांच्या या सुप्रसिद्ध ओळी वाचताना, मनात कुठेतरी अनाहूतपणे तलत मेहमूदची आठवण जागी होते. तलतची गायकी ही अशीच स्वतः:ला मिटून घेणारी, अनाक्रोशी आहे. त्यात कुठेही अत्याग्रह, आक्रमकपणा जराही आढळत नाही. स्वतः:शीच संवाद साधणारी आणि स्वतः:च अंतर्मुख होणारी अशी गायकी आहे. 
लखनौसारख्या शहरात एका संपन्न, सुसंस्कृत, साहित्यप्रेमी कुटुंबात या गायकाचा जन्म झाला आणि या शहराच्या वैशिष्ट्यांचा तलतच्या एकूणच सगळ्या व्यक्तिमत्वावर गाढा परिणाम झाल्याचे समजून घेता येते. वास्तविक, या कुटुंबात संगीताकडे फार विशेष कौतुकाने बघितले जात नसे, किंबहुना काहीशी तुच्छताच असायची परंतु तलतच्यामावशीने - मेहला बेगमने या मुलाची आवड ओळखली आणि मॉरिस संगीत विद्याकायात नाव दाखल करून, शास्त्रोक्त संगीताच्या शिक्षणाची सुरवात करून दिली. व्हायच्या १६ व्या वर्षी सर्वात प्रथम प्रसिद्ध संगीतकार कमल दास गुप्ता यांच्या कडे गायन केले - बन जाऊंगा क्या से क्या!! या गाण्यामुळे लोकांचे लक्ष या गाण्याकडे वळले. पुढे दुसऱ्या संचातील "तस्वीर 'तेरी दिल मेरा बहेला ना सकेगी" या रचनेने तलतचे नाव सगळीकडे झाले आणि प्रथमच लोकप्रियतेचा खरा अनुभव घेता आला. अर्थातच या पुढील पाऊल म्हणजे त्यावेळच्या प्रमुख चित्रपट निर्मिती केंद्रास - कोलकत्ता इथे प्रयाण करणे. तिथे त्यांनी काही चित्रपटात भूमिका देखील केल्या असा वेधक तापाशी वाचायला मिळतो - पुढे हिंदी चित्रपट क्षेत्रात आल्यावर पुन्हा चित्रपटात भूमिका करण्याची इच्छा होणे, हा काही योगायोग म्हणता येणार नाही. लवकरच चित्रपट सृष्टी मुंबईत आली आणि हा गायक मुंबईत आला. त्यावेळी या गायकाचा तसा बराच बोलबाला झाल्याकारणाने, लगेच प्रख्यात संगीतकार अनिल बिस्वास यांनी त्यांना "आरझू" चित्रपटात प्रथमच गावयाची संधी मिळाली - ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल, हेच ते सुप्रसिद्ध गाणे. अनिल बिस्वास सारख्या संगीतकाराकडे संधी मिळाल्याने साहजिकच इतर संगीतकारांचे लक्ष वळले तर त्यात नवल ते काय!! 
आणखी वेधक तपशीलद्यायाचा झाल्यास, अनिल बिस्वास यांच्याकडे गायच्या आधी तत्कालीन प्रसिद्ध संगीतकार विनोद यांच्याकडे "अनमोल रतन" या चित्रपटासाठी गायन केले पण "आरझू" चित्रपट आधी आला आणि श्रेय अनिलदांकडे गेले. एकूणच विनोद, अनिल बिस्वास यांच्या शैलीनुसार गाण्यांची स्वररचना असल्याने एकूणच गायन हे कोमलमधुर, अंत:स्पर्शी, अंतर्मुख, काहीसे उदास आणि अनाक्रमक गायन हीच एक मान्यवर शैली ठरली. एकूणच सगळ्या कारकिर्दीवर जरी ढोबळ नजर फिरवली तरी या वैशिष्ट्यांचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला मिळेल. ही शैली इतकी प्रसिद्ध ज़ाली की १९५० साली पारदर्शी झालेल्या चित्रपटणापैकी १६ चित्रपटात गायन केले पण हीच शैली रूढ केली. काही उदाहरणे बघितली म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. "शुक्रिया ऐ प्यार तेरा (अनिल बिस्वास), "हमसे आय ना गया" (मदन मोहन) "बेचैन नजर बेताब जिगर (सी. रामचंद्र) वगैरे. त्यांच्या गायनाबाबत एक कथा वारंवार सांगितली जाते -  नौशाद आणि इतर संगीतकारांनी तलतच्या आवाजातील सुप्रसिद्ध "कंप-परिणाम" या वैशिष्ट्यावर टीका केली होती. परंतु त्याचवेळी अनिल बिस्वास यांनी नि:शंकपणे सांगितले - तलतच्या आवाजातील आंदोलने हाच उपयुक्त गुण ठरेल आणि या गायकाला प्रचंड विश्वास मिळवून दिला. याचमुळे तलतच्या आवाजातील आत्मविश्वास दुणावला आणि आपल्या खास भावपूर्ण गायनशैलीला विकसित करणे त्यांना शक्य झाले. आवाजातील कंप आणि भावपूर्ण गायन, याचा पुढे अनेक गायक कलाकारांवर प्रभाव पडला. उदाहरणे द्यायची झाल्यास, अरुण दाते, जगजीत सिंग इत्यादी. अर्थात या दोघांनी पुढे आपली वेगळी वाट चोखाळली आणि तशी वेगळी वाट शोधणे आवश्यकच असते परंतु शब्दोच्चाराबाबत याच गायकाचा आदर्श त्यांनी कायम आपल्या गायनात आणला. 
तलत मेहमूद यांच्या गायनाचे आणखी खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, त्यांनी केलेले चित्रपटबाह्य गझलगायन अतिशय लोभनीय आणि उच्च गुणवत्तेचे होते. कदाचित या गायकाने आपले गझल गायन १९३९मध्ये लखनौ नभोवाणी केंद्रावरून सुरु करावे, हा योगायोग नक्कीच नसावा. संपन्न, शिष्ट, सुसंस्कृत आणि संयमित वातावरणाचा हा अपरिहार्य परिपाक म्हणता येईल. थोडक्यात पण योग्य विधान असे करता येईल की बेगम अख्तर या गझल गायन सम्राज्ञीने प्रस्तुत आविष्काराबद्दल जो एक आदर्श निर्माण केला होता त्यासारख्या आसपास फक्त तलत मेहमूदच पोहोचतात. एक आणखी बाब विशेषत्वाने नोंदवावी लागेल - १९८६मध्ये त्यांनी "गझल के साज उठाओ" या अल्बम नंतर संगीतजगतास रामराम ठोकला. स्पष्टपणे मत मांडायचे झाल्यास, १९५०-६०या दशकात तलतचा खरा बहराचा काळ होता. त्यानंतरच्या संगीतशैलीशी हा गायक जुळवून घेऊ शकला नाही. आणि याचे प्रमुख कारण मांडायचे झाल्यास, या शैलीत सुरावट, संथ गती आणि नाजूक प्रक्षेपणास जागा नव्हती. असे आता खात्रीने म्हणता येते, पाश्चात्य वळणाचे लयबंध इत्यादीही या गायकाला मानवले नसावेत. 
एकूणच गायनाची प्रकृती वर निर्देशिल्याप्रमाणे असल्याने एका अर्थाने त्यांच्या गायनाला हिंदी चित्रपटसृष्टीत मर्यादित वाव होता. ज्या रचनेत विशेष काव्यगुण आहेत अशीच गीते गायला घ्यायची, असा आग्रह असल्याने, त्यांच्या वाट्याला कमी गाणी येणे क्रमप्राप्तच होते. त्यांनी गायलेल्या गाण्यांवर नजर फिरवली तर हा मुद्दा ठसठशीतपणे दिसून येतो. त्यातून उर्दू भाषेचा संस्कार असल्याने, गायनावर उर्दू संस्कृतीचा लहेजा दृष्टीस पडतो. वर म्हटल्याप्रमाणे त्यांचा बहराचा काळ हा १९५०-६० हा असणे, हा योगायोग निश्चितच मानता येणार नाही. त्यावेळी चित्रपट सृष्टीत वावरणारे शायर - साहिर, शकील, मजरुह, राजेंद्रकृष्ण यांच्यासारखे उर्दू भाषिक लेखक हिंदी चित्रपटात उद्मेखूनपणे लिहीत असल्याने, त्यावेळच्या शब्दरचनांवर उर्दू शैलीचा - विशेषतः: गालिब, जौक, दाग यांसारख्या प्रतिभावंत शायरांचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो आणि याचा परिणाम त्यावेळची गाणी ही अधिक प्रासादतुल्य, गेयबद्ध अशीच असायची जी तलत मेहमूद यांच्या शैलीला उपकारक ठरली. 
आता आणखी काही आक्षेप. तलत मेहमूद यांची शैली बघता, आणि गळ्याचा आवाका ध्यानात घेता, काही गीतांबद्दल असे ठामपणे म्हणता येईल, पाश्चात्य ढंग स्वीकारणे अशक्य होते तसेच उछलकूद करणारी गाणी गाणे केवळ अशक्य होते. गायनाच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपट क्षेत्र निवडल्याने आणि चित्रपटात असंख्य विभ्रमाची गाणी गायला लागणे गरजेचे असल्याने, या गायकाच्या गायनावर खूपच मर्यादा आल्या. आवाज अतिशय सुरेल, शक्यतो मंद्र किंवा शुद्ध सप्तकात गायचे - तार सप्तकात जरी काहीवेळा गायन केले तरी तसे गायन करणे हा त्यांचा पिंड नव्हता हेच खरे. आपण कशाप्रकारचे गाऊ शकतो आणि तशाच गायनावर ठाम राहणे ही प्रवृत्ती असल्याने, याच्या परिणामाची या गायकाला पूर्ण कल्पना होती त्यामुळे गायनाची संधी वारंवार मिळणे अशक्य होते. तारता पल्ला तसा मर्यादित तसेच आवाजाची गाज देखील अनाक्रोशी, आणि संयत. किंबहुना संयत गायन हेच तलत मेहमूद यांच्या गायनाचे खरे वैशिष्ट्य. 
आणखी एक मुद्दा मांडता येईल. समकालीन गायक रफी, किशोर यांच्यापेक्षा त्यांची लोकप्रियता कमी का? तशी लोकप्रियता कमी नक्कीच होती. एका गीतसंग्राहकाने नोंदलेले मत - एकूण गीतसंख्या जवळपास ४५० भरते म्हणजे सांख्यिकीच्या दृष्टीने, रफी, किशोर हे गायक फारच पुढे होते. यावर त्यांचे स्वतः:चे मत असे होते - जरी संख्येने गाणी कमी असली तरी टी सगळी उच्च दर्जाची म्हणून लोकांच्या स्मरणात आहेत. हे प्रमाण इतर गायकांनी गायलेल्या गीतांबाबत जेमतेम २५% इतकेच भरेल. यात मात्र निश्चित तथ्य आहे. 
आणखी एक मुद्दा मांडता येईल. १९६० नंतरच्या बदलत्या प्रकृतीशी या गायकाचे जुळण्यासारखे नव्हते. आपण जी कुठली गीते गायची आहेत, त्याच्या संहितेबाबत हा गायक विलक्षण चोखंदळ होता. याबाबत आणखी असे विधान करता येईल, लखनौच्या वारसा म्हटल्यावर दोन गोष्टी स्वाभाविक वाटतात - उर्दूचे स्वच्छ, शुद्ध उच्चारण आणि कोणत्या रचनेस गाण्याच्या योग्यतेचे काव्य समजायचे याबाबतची उच्च अभिरुची. अशा विचारसरणीला हिंदीच कशाला एकूणच कुठल्याही चित्रपटसृष्टीत संधी फार मर्यादित असतात. याचाच अनिवार्य परिणाम या गायकाच्या कारकिर्दीवर झाला. 
लेखाचा शेवट करताना परत एकदा काही काव्यपंक्ती आठवतात - कवी ग्रेसांच्या सुपरसुद्धा ओळी आहेत. 
"पाऊस कधीचा पडतो, वाऱ्याने हलती पाने,

हलकेच जाग मज आली, दु:खाचा मंद स्वरांने" 

Tuesday 4 September 2018

सलील चौधरी - प्रयोगशील संगीतकार



8:03 AM (3 hours ago)
चित्रपट गीतांमध्ये प्रयोग करायला तसा वाव कमी(च) असतो. मुळात ३ घटक असलेला अटकर बांध्याचा हा आविष्कार आणि त्यातून केवळ ३ ते ४ मिनिटांचे सादरीकरण. त्यामुळे, प्रयोग करायचे झाले तरी, शब्द, स्वरांची रचना, वाद्यमेळ आणि गायन, याच घटकातून होणार. आणि तिथे तिन्ही स्वतंत्र व्यक्ती!! म्हणजे प्रत्येकाच्या प्रतिभेचा आविष्कार वेगळा आणि तरीही मर्यादित स्तरावरील. चित्रपटातील कविता अति गूढ असून चालत नाही अन्यथा शब्दकळेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक. जरी, गायक/गायिका स्वतंत्र व्यक्ती असली तरी गायनाचा पल्ला हा संगीतकाराने आधीच आखून दिलेल्या मार्गावरून गाठायचा.  तसे, इथे " मी गाण्यात वेगळे प्रयोग केले" असा "दावा" करणारे भरपूर भेटतात परंतु यामुळेच बहुदा "प्रयोग" हा शब्द थोडा हास्यास्पद झाला आहे. अशा परिस्थितीत, ज्या संगीतकारांना खऱ्याअर्थी "प्रयोगशील" संगीतकार म्हणावे, अशा फार थोड्या संगीतकारांमध्ये सलिल चौधरी यांचा समावेश सहज होतो. आपल्याला इथे, त्यांनी नेमके काय प्रयोग केले, आणि त्याचे किती दूरगामी परिणाम झाले, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 

बालपण, आसाम आणि बंगाल इथे गेल्याने, या दोन्ही प्रदेशातील आदिम आणि लोकसंगीताचा गडद परिणाम झाला, असे त्यांच्या पुढे निर्माण केलेल्या रचनांवरून सहज अनुमान काढता येते. त्यातून, लहानपणी "कम्युनिस्ट" विचारसरणीशी संबंध आल्याने, ज्या कलांचा लोकांशी थेट संबंध असतो, ज्या कलांना लोकांच्या  कला म्हणता येते, त्याच कला महत्वाच्या असतात. अर्थातच, आदिम, लोन आणि धर्म या भारतीय संगीताच्या कोटी आपोआपच खास महत्वाच्या ठरतात. सलिलदांच्या एकंदर सांगीत निवडीत, ही भूमिका बरीच ठामपणे दिसून येते. 

या संदर्भात, पुढे विचार करण्यासाठी, आपल्याला निदान ४ टप्पे ध्यानात घेतले पाहिजेत. युथ क्वायर (युवासमूह गायन) क्षेत्रांतील त्यांचे काम, हा पहिला विशेष आणि त्यांच्यातील ज्वलंत कम्युनिस्ट विचारसरणी लक्षात  घेता, हा टप्पा त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत महत्वाचा टप्पा ठरतो. त्या दृष्टीने, त्यांनी, मुंबई आणि कोलकत्ता इथे असे गायकसमूह स्थापले. 

दुसरे कार्यक्षेत्र - त्यांनी दिलेले हिंदी चित्रपट संगीत आणि ते मात्र संपूर्णपणे मुंबईत फळाला आले. 

तिसरा टप्पा, "बंगाली गीत" आणि या क्षेत्रात त्यांनी खूपच वेधक कामगिरी केली आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजे "बालगीते". 

या सगळ्या टप्प्यांचे विवेचन अशा साठी करायचे, त्यांनी जी चित्रपट गाणी तयार केली, त्या सगळ्या निर्मितीवर, कुठे ना कुठेतरी या टप्प्यांचा प्रभाव ठामपणे जाणवतो. डाव्या विचारसरणीशी असलेल्या बांधिलकीमुळे, विविध भारतीय प्रदेशांतील लोकसंगीत, समूहगायनाची सहेतुक योजना आणि वाद्यवृंदाचा वापर त्यांच्या संगीतात सर्वत्र आढळतो. शिवाय, भारतीय संगीतात ज्याची कमतरता अनेकांना जाणवते , त्या स्वनरंगाची विविधता या ३ विशेषांमुळे त्यांना सुलभ झाले. भारतीय संगीतात, कुठलेही चावीफलक वाद्य (हार्मोनियम, पियानो, ऑर्गन इत्यादी वाद्ये) म्हटले की नवा स्वन्रंग, एक प्रकारचे प्रमाणीकरण आणि सर्वांना उपलब्ध सांगीत उपयुक्तता, या गोष्टी अपरिहार्यतेने जाणवतात. संगीतातून, अखिल भारतीय आवाहकता कशी साधायची, या मुलभुत प्रश्नाला इथे स्पर्श झाला. सलिलदांनी समूहगायनाचा आपल्या पार्श्वसंगीतासाठी वाद्यांसारखा वापर केला आहे. 

बंगाली गीताचा आधुनिक अवतार सिद्ध करण्यातली त्यांची आस्था, तसेच रवींद्र संगीत आणी त्याचे वातावरण, याविषयी विरोधविकासवादी भूमिका, यामुळे, त्यांना आपल्या खास ठशाचे बंगाली गीत रचणे भाग पडले, हे सहज ध्यानात येण्यासारखे आहे. यातूनच, त्यांनी पुढे आपली अनेक बंगाली गीते, हिंदीत आणली. 

याचाच परिणाम असेल, पण सलीलदा पाश्चात्य कलासंगीताचे अभ्य्सक झाले. बीथोवन, मोझार्ट इत्यादी "क्लासिकल" रचनाकार त्यांच्या खास पसंतीचे होते, हे सहज समजून घेता येते. याच संगीताच्या प्रभावामुळे, त्यांना वाद्यवृंद रचनेत प्रयोग करण्याची स्फूर्ती मिळाली असणार, हे उघड आहे. भारतीय वैदिक संगीत, आदिवासी संगीत, इतकेच नव्हे तर तंबोरा या वाद्यातही, स्वरसंवाद (हार्मनी) हे तत्व आहे, असे त्यांचे ठाम मत होते. 

"दो  बिघा जमीन" या चित्रपटातून, त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले. "धरती कहे पुकार के" ही गाणे, लोकसंगीताशी फार जवळचे नाते सांगणारे आहे. या गाण्याच्या सुरवातीला, "भाई रे" अशी पुकार आहे आणि ती पुकार, या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.  

पुढे, त्यांच्या "परख" चित्रपटातील गाणे विशेष गाजली. "मिला है किसीका झुमका" हे गाणे ऐकण्यासारखे आहे. एकाच बासरीचा वाक्यांश ऐकायला येतो. ढाल्या तारतेचा ताल आणि साधी चाल तरीही लोकसंगीताचा बाज आणि त्याच्याच चलनाचा थेट वापर, यामुळे हे गाणे वेधक होते. सुरवातीला म्हटल्या प्रमाणे , बंगाली लोकसंगीताचा त्यांच्या गडद परिणाम जाणवतो - "क्या हवा चली" किंवा "ऋत बदली" या गाण्यांवर बंगाली "बाउल" संगीताची छाप आहे. याचा वळणाने, वेगळे गाणे बघायचे झाल्यास, "बन्सी क्यो बजाये" हे गाणे ऐकावे. एक वेगळे नृत्यगीत आहे 

मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी अनेक बंगाली रचना, (स्वत:च्या) हिंदीत आणल्या - "जारे, जारे उड जारे पंछी","ओ  सजना,बरखा बहार आई" किंवा " ना जिया लागे ना" ही गाणी, त्यांच्याच मुळातल्या बंगाली गाण्यांची हिंदी नक्कल आहे. असे असले तरी ती मुळातली गाणी ऐकताना, त्यांच्या प्रतिभेची साक्ष मिळते, हे नक्की. 

त्यांनी, पाश्चात्य रचनाकारांचा अभ्यास केला होता आणि त्यांनी ज्याप्रकारे गाण्याचे वाद्यमेळ रचले, त्यातून आपण सहज समजू शकतो. याचाच परिणाम असा झाला, त्यांच्या गाण्यात, दोन्ही सांगीतिक संस्कृतीचा अप्रतिम मिलाफ आढळतो. तसेच पारंपारिक वाड्यातून देक्गील नवनवीन सुरावटी काढून, गाण्यालाच वेगळे परिमाण देण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षणीय ठरतो. तसेबघितले तर, "इतना ना मुझसे तू प्यार बढा" हे गाणे सरळ, सरळ मोझार्टच्या सिम्फनीवर बेतलेले आहे (सलिलदांनी ते कधीही लपविले नाही) तरीही गाण्यातील वाद्यमेळ बारकाईने ऐकला तर, त्यात सलिलदांच्या अभ्यासाची चुणूक दिसून येते. असाच प्रकार, त्यांनी इतर रचनांच्या बाबतीत केलेला दिसतो. म्हणजे चालीचा मुलस्त्रोत जरी उचलेल असला तरी त्यात स्वत:चे वैशिष्ट्य म्हणून काहीतरी सांगीतिक करामत करून दाखवायची आणि ही जाणीव, त्यांनी शेवटपर्यंत ठेवली होती, अगदी "रजनीगंधा", "छोटी छोटी सी बात" या चित्रपटातील गाणी ऐकावीत. चाली तशा सरळ, साध्य आहेत परंतु प्रत्येक अंतरा आणि तिथला वाद्यमेळ, यात काही ना काहीतरी वेगळेपण दिसून येते. त्या दृष्टीने, त्यांच्या आधी सी. रामचंद्रांनी जी पाश्चात्य संगीताची जाणीव ठेवली होती, त्याचे सुसंस्कारित रूप, सलिलदांनी आपल्या रचनांमधून आपल्या समोर आणले. 

आज, ए.आर, रेहमान जे प्रयोग करीत आहे, म्हणजे भारतीय आणि पाश्चात्य संगीताचे एकत्रीकरण, याचा पाया, सलिलदा आणि नंतर राहुल देव बर्मन, यांनी घातला आहे, हे आपल्याला सहज समजून घेता येईल. 

संपूर्ण गीतत्वास पोचलेली अशी एक रचना - "ओ सजना बरखा बहार" बघूया. वास्तविक चाल, ही त्यांच्या मूळ बंगाली गाण्याची आहे तरीही स्वरपट्ट्यामध्ये मुक्त फिरणारी, संगीत कल्पनांनी भरलेली, उत्साही, द्रुत अशी मधुर चाल आहे. कोमल निषाद स्वरावर येउन थांबणारा मुखडा,  हा या रचनेचा मनोज्ञ विशेष. नायिकेच्या मनोवस्थेचे नेमके चित्रण स्वरांच्या सहायाने अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने घडते.

पाश्चात्य संगीताचा अभ्यास असल्याने, "जिंदगी ख्वाब है" या गाण्यात, Violin, Accordion, Trumpet इत्यादी वाद्यांचा वापर खास ऐकण्यासारखा आहे. 

सलिलदांच्या सांगीतिक कारकिर्दीचे  शिखर म्हणजे "मधुमती". या चित्रपटात, सलिलदांच्या सांगीत सर्जनक्षमतेचा विस्तीर्ण पट जवळपास उलगडलेला दिसतो. "आजा रे" सारखे पछाडून टाकणारे गीत, "दैय्या रे दैय्या" सारखे लोकसंगीतावर आधारित गाणे, "जंगल मे मोर नाचा" सारखे हलके फुलके गीत तर "टुटे हुवे ख्वाबो ने" सारखे अप्रतिम विरह गीत, चित्रपट संगीताच्या गाण्यांच्या जीतल्या काही महत्वपूर्ण "कोटी" आहेत, त्या सगळ्यांचा या चित्रपटात समावेश होतो आणि त्यामुळे, त्यातील प्रत्येक गाण्याला सलिलदांनी स्वत"चे खास वैशिष्ट्य प्रदान केले आहे. 

सलिलदांची गीतसर्जनशक्ती वारंवार आपले सौंदर्यपूर्ण सांगीत वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्याने भारलेली होती. काम जर अधिक केंद्रीभूत झाले असते तर संगमसंगीताच्या गतिमान कोटींत चपखल बसणारे संगीत ते आपल्याला देऊ शकले असते. त्यांची गाणी ऐकताना, अनेकवेळा हिंदी चित्रपट संगीतात जे संगीत होते त्यापेक्षा अधिक टिकाऊ आणि सार्थ संगीतसंगम साधण्याची त्यांना इच्छा होती, असे फार जाणवते आणि तशी त्यांची क्षमता देखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारे काम नव्हते!!