Monday 19 July 2021

माझे नास्तिकत्व

आत्ता मला प्रसिद्ध रशियन लेखक चेकॉव्हचे एक वाक्य फार आठवले. *Let us not judge. Let us try to understand. If we can understand, perhaps we may even to forgive.* अर्थात या वाक्याचा संदर्भ माझ्या पुढील लेखात सतत घ्यावा लागेल असे वाटते. आपल्याकडे परकीय आक्रमण बनारसच्या देवळातील शिवलिंग विहिरीत उडून पडले आणि सुरक्षित राहिले, असे सांगण्यात येते!! परंतु त्याचवेळी आपल्या सामर्थ्याने त्याने परकीयांचा नायनाट केला नाही, ही गोष्ट आपल्याला कमीपणाची वाटत नाही किंवा सांगितली जात नाही. त्यामुळे आम्ही दुबळे म्हणून आमचा देव दुबळा, की देवाचं दुबळा म्हणून आम्ही दुबळे!! त्यात *सहिष्णू* म्हणून आपली ख्याती अधिक!! पण दौबर्ल्य आणि सहिष्णुता यात एक मर्यादारेषा आहे. कधीतरी *असहिष्णू* होण्याचा इसाळ येत नसेल तर  सहिष्णुता म्हणजे शिमग्यात एक सोंग, इतकेच म्हणावे लागेल.आपल्याकडे भव्य तेजाची कल्पना नाही असे नाही, शंकराचा तृतीय नेत्र आहेच पण त्या स्वरूपातील एकही मंदिर बघायला मिळत नाही.  लोणी चोरणारे पोर, अनेक तुकारामांचे आभास निर्माण करणारा गारुडी, दामाजीचे पैसे भरणारा महार, या आणि असंच गोष्टींनी आपले मन जिंकले. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते, *We get the GODS that We deserve.* *ज्ञानेश्वरी* दिसते खरी पण ती पूजेसाठी, वाचण्यासाठी नव्हे. गीतानीरूपणासाठी सांगितलेली ज्ञानेश्वरी, आज गणागणपाच्या पोरींचे कि नाही किंवा हरवलेली  शिवारात आहे कि हरवली, हे सांगू लागली. एखाद्या कवीला भविष्यवाद्याची भूमिका यावी, यात मोठेपणा वाटत असे मानणारे मानोत, पण आज *ज्ञानेश्वरी* लोकवाणी झाली, या वाक्याचा हा खरा अर्थ आहे. इथे मला एक अत्यंत कडवट मत एका विचारवंताने काढल्याचे आठवले - *मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव पानिपत इथे झाला नसून चंद्रभागेच्या काठी झाला!!* या वाक्यातील कडवटपणा बाजूला ठेवला तरी काही प्रमाणात मतितार्थ नक्कीच आहे. आधी!   माणसाचे मन स्वभावतःच  भाबडे, आणि काहीसे खुळचट असे आहे. वास्तविक Islam इतका एकेश्वरी उग्र पंथ नाही. मदिना येथील महंमदाच्या थडग्यावर नमस्कार करण्याची पूर्ण बंदी आहे - हा त्यांचा *रसूल* आहे, *अल्ला* नव्हे. मानवी स्वभावाची कल्पना असल्याने त्याने, आपण बसत असलेले झाड तोडून टाकायला सांगितले. पण इतकी काळजी घेऊन देखील, यात्रेकरू झमझमच्या पाण्यात कापड तसेच कापूस बुडवून आणतात, तसेच बुराक घोड्याचा नाल पवित्र मानतात. दाढीचा केस *Relic* मानला जातो. ख्रिश्चन अनुयायांनी तर त्याच्या वर ताण केली. मध्ययुगात निरनिराळ्या संतांचे अवशेष विकण्याचा प्रचंड व्यापार होता. Buddhism मध्ये *बोधिवृक्ष* पवित्र झाला आणि त्याच्या दातावर स्तूप चढले. . आज मला तरी उमर खैय्यामची एक रुबायत आठवते - *हे परमेश्वरा आता माझा अखेरचा क्षण आला आहे. तेंव्हा लवकरच तुझ्यापुढे मला उभे राहावे लागणार आहे. मी फार पापी आहे, हे ध्यानात घेऊन मला क्षमा कर. पण त्या क्षणी, तू मला असे पापी निर्माण केलेस, याबद्दल मी तुला क्षमा करीन!* निदान क्षमेसाठी तरी त्याने परमेश्वर मानला पण बौद्ध धर्माला त्याची देखील गरज वाटली नाही. ज्ञानेश्वरीत कुंडलिनीचे वर्णन करताना - *नागिणीवर कुंकू टाकल्याप्रमाणे ती जागृत होते* अशी एक प्रतिमा आहे. ती वाचल्यावर झर्रदिशी अंग चमकून जाते - अंधारात सुरीच्या जागृत धारेवर हलकेच हात सरकावा त्याप्रमाणे. परंतु अशा असामान्य साहित्याबद्दल चुकूनही अशी आस्था दाखवली जात नाही, हे दुर्दैव. आपल्याकडे *देव* आणि *देवभक्ती* याचे प्रमाणाच्या बाहेर अवडंबर माजवले जाते. *देवपूजा* करण्यामागे काहीतरी इच्छा असणे, मागणे असणे बहुतेकवेळा अनिवार्य असते आणि मग त्यासाठी नेसूचे सोवळे सोडायची प्रसंगी तयारी असते. यात काही प्रश्न उद्भवतात. जर का देव जागृत असेल तर मग निदान भारतात तरी प्रचंड प्रमाणात पूजाअर्चा चालतात, प्रसंगी आयुष्याचा *होम* करणारे भक्त देखील भेटतात. इतके करूनही मानवाचे दु:ख कुठेच, कधीच कमी होताना दिसत नाही. तेंव्हा एक प्रश्न विचारावासा वाटतो, *देवा, एकदाचे सांगून टाक,आम्ही आयुष्यात किती भोगायचे? किती काळ आराधना करायची? किती काळ *सौख्य* म्हणून उपभोगायचे नाही?* कुठल्याही संत साहित्यात कुणीही असे म्हटलेले नाही - अमुक एक काळ देवाची पूजा केली तर निदान मानसिक समाधान तरी लाभेल!! आर्थिक आणि भौतिक समाधान मिळवणारा, अजून तरी माझ्या पाहण्यात नाही!! एकदाचे सांगून टाक म्हणजे तशी *तजवीज* करून टाकू आणि निदान उर्वरित आयुष्य तरी मनाप्रमाणे घालवू. पण तसे घडत नाही. सतत आयुष्यात झिजत राहायचे, सहन करीत बसायचे - हीच इतिकर्तव्यता मानायची का? बरेचवेळा असे सांगितले जाते - पुढील जन्माची सोया म्हणून या जन्मी सगळे उपास/तापास करायचे आणि शरीराला झिजवत ठेवायचे. यात, एक बाब विस्मरणात टाकली जाते. आपलेच शरीर आणि त्या शरीरावर प्रेम करायचे नाही कारण आत्मा अमर सारखे खुळचट वाक्य अंगावर भिरकावले जाते. जो आत्मा, सध्याच्या आयुष्यात अनुभवण्याची शक्यता शून्य!! पुनर्जन्म आहे, म्हणून भभक्ती करायची, हा एक विचार नेहमी ऐकवला जातो परंतु पुनर्जन्माबद्दल ठाम काहीही सांगता येत नाही. किंबहुना अंधारात अचानक हाताला थंडगार वेटोळे लागावे त्याप्रमाणे चटका बसतो. त्याच अंधारात सतत ठेचकाळत, कधीतरी आपल्याला *अनुभूती* (साक्षात्कार तर अशक्य) मिळेल, याच अर्धुकलेल्या भावनेने आयुष्य संपवायचे!! कशासाठी? जर का भौतिक सुख नको तर मग *संन्यास* घ्यावा पण तसे घडत नाही. आयुष्याची आसक्ती काही सुटत नाही.  बुद्धाने सुखाचा संपूर्ण त्याग केला आणि मानवाला नवीन मार्ग सुचवला पण त्यातून *व्यक्तिपूजेचा अटळ* परिणाम टाळू शकला नाही. तेच आपल्या देवांबद्दल झाले. अगदी मानवी रूपे साकारली परंतु त्यांना देवघरात बंदिस्त करून ठेवण्यात आले आणि त्याचा धंदा मांडण्यात आला. माणसाला *माणूस* म्हणून स्वीकारणे अवघड करून टाकले.