Saturday 5 July 2014

कुमार गंधर्व - प्रयोगशील गायकी(??) - भाग १

कुमार गंधर्वांचे रागदारी संगीतातील श्रेष्ठत्व कुणीही जाणकार किंवा सामान्य रसिक, सहज मान्य करील आणि त्याबाबत फारसा विरोध असू नये. माळव्यातील लोकसंगीताचा अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण नजरेने व्यासंग करून, नवीन राग निर्मिती करणे, हे खरच अचाट म्हणावे, असे काम. लोकसंगीतातून, "मधुसुरजा","अहिमोहीनी","लगनगांधार","मालवती","संजारी" सारख्या अनवट रागांची निर्मिती, ही नेहमीच अविश्वसनीय वाटावी, अशीच राहील. तसेच, त्यावेळेस, भारतीय रागसंगीतात "थोडे साचलेपण" तयार झाले होते, म्हणजे, रागाचे सादरीकरण साचेबंद झाले होते, त्यातून कुमार गंधर्वांनी मोकळेपणा आणला.  
आणखी काही वैशिष्ट्ये लिहायची झाल्यास, गायनाची मांडणी तसेच पद्धत, यात बरेच नाविन्य आणले. लहानपणीच भोगलेल्या आजारातून निर्माण झालेल्या शारीरिक दौर्बल्यावर मात करून, आपली स्वत:ची संपूर्ण वेगळी शैली निर्माण केली. शास्त्रीय संगीतातील, "मुर्घ्नी स्वर,"गमक", तार सप्तक" इत्यादी जे खास अलंकार आहेत, त्या सर्वांना स्वत:चा असा नवीन आयाम दिला. ताण घेताना, संपूर्ण सप्तक एकवटून न घेता, खंडित तान घेऊन तरीही लयीचा बिकट बोजा अत्यंत सुविहित आणि सौंदर्यपूर्ण रीतीने घेत असत.  
दुसरे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, गायकी जयपुर अंगाने तालातील सूक्ष्म लयखंडाशी नाते ठेऊन, पुढे जातात. तसेच किराणा घराण्याच्या प्रभावामुळे (ओंकारानाथांचा प्रभाव लक्षणीय जाणवतो) आवाहकता सांभाळून गायन होते पण किराणा घराण्यातील स्वच्छ-स्पष्ट "आ"कार टाळून स्वारांस टोकदार पण गुंजनयुक्त करण्यावर जोर देते. याचा परिणाम, गायनात "ये" किंवा "या" कार भरपूर मिळतात. तार सप्तकातील स्वर किंवा मंद्र सप्तकातील गायनात "आ"कार ऐकायला मिळत नाही, त्यामागे हे इंगित आहे. 
ख्याल गायनाचा थोडा आणखी विचार केला तर,ख्यालावर "टप्पा" गायनाचा अधिक प्रभाव दिसतो. "टप्पा" चमकदार असतो, क्रमाक्रमाने, सावकाश पुढे जाणे यापेक्षा मधले स्वरपुंज अल्प विस्तारासाठी घेऊन पुन्हा चपलगतीने पुढे झेपावणे, ख्याल गायनात वारंवार आढळते. ख्याल गायनात एक एक स्वर फुलवला जातो तर टप्पा गायनात स्वरगुच्छांची खुलावट असते. यात थोडाफार कृत्रिमपणा जरूर असतो पण, चमत्कृती व आकर्षकता देखील भरपूर असते. अर्थात, हे झाले, कुमार गंधर्वांच्या रागदारी गायनाबद्दल. इथे मी फार थोडक्यात आढावा घेतला आहे, याची खेदयुक्त जाणीव आहे. इथे मला, कुमार गंधर्वांच्या उपशास्त्रीय आणि सुगम संगीताच्या गायनाबद्दल लिहायचे आहे आणि त्यासाठी मी, त्यांचे काही कार्यक्रम विचारात घेतले आहेत. 
१] गीतवर्षा, २] त्रिवेणी,३] मला उमजलेले बालगंधर्व, ४] गीत हेमंत,५] मराठी भावगीते, ६] मराठी नाट्यगीते. प्रत्येक कार्यक्रमाचा थोडक्यात पण तरीही सगळ्या बाजूने परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 
पहिलीच बाब अशी आहे की, हे सगळे कार्यक्रम हे रागदारी संगीताचा आधार घेऊन तरीही शब्दाच्या आशयाशी संबंधित आहेत आणि या दृष्टीनेच माझा प्रयत्न राहणार आहे. अर्थात हे सगळे कार्यक्रम मी प्रत्यक्ष ऐकलेले नसून त्यांचे रेकॉर्डिंग ऐकून मदमास घेतलेला आहे. 
१] गीतवर्षा:- नावावरून ध्यानात येते की कार्यक्रम ऋतूप्रधान रचनांवर आहे. आपल्या हिंदू कालगणनेनुसार ६ ऋतू आणि त्यासंबंधीच्या रचना, असे स्वरूप आहे. रचना बंदिश स्वरुपाच्या आहेत. वसुंधरा कोमकली आणि मीरा राव असे स्त्री आवाज तर कुमार गंधर्वांचा पुरुषी आवाज अशी आखणी. अर्थात, त्यांच्या मैफिली गायनाचा प्रभाव सर्वत्र जाणवत असतो. अर्थात, रागविस्ताराप्रमाणे इथे स्वरविस्तार शक्य नसल्याने, गायन, थोडेसे "संपादित" स्वरूपाचे आहे. निश्चित केलेला ताल, व स्वरबिंदू यापासून न ढळता, बंदिशी गायन झाल्याने, जरी उपशास्त्रीय गायन असले तरी बरेचवेळा "मल्हार","मारवा" ऐकायला येत आहे का? असा भास होत होता. राग आणि वेळ, ही गोष्ट भारतीय संगीतात नवीन नाही आणि त्यानुरूप चीजांच्या रचना असतात. परंतु राग,ऋतू व शब्द यांचा तपशीलवार, योजनाबद्ध विस्तारित  विचारपूर्वक सांगड घालणे, या कल्पनेतील नवीनता मान्य करावी लागते. इथे एक प्रश्न उद्भवतो. स्वर आणि शब्द एकेमेकांचे प्रतिनिधित्व करू शकतात का? दुसरा प्रश्न, भिन्न माध्यमांतर्गत रचनाबंधांतून प्रतीत होणाऱ्या अनुभवाचे स्वरूप एकच असू शकते का?याच बाबीचा पुढील भाग असा, राग आणि ऋतू व इतर भौतिक घडामोडी यांचा खरोखरच अतूट, निश्चित आणि अतूट संबंध आहे का? इथे मात्र या कार्यक्रमाचे यश काहीसे दुरावलेले दिसून येते. कार्यक्रम उपशास्त्रीय संगीताचा असून देखील बरेचवेळा रागविस्ताराला महत्व मिळाल्याचे ऐकायला मिळाले. 
२] गीत हेमंत :- तसे पाहिले तर "गीतवर्षा" या कार्यक्रमाचे वेगळे स्वरूप असे म्हणावे लागते. विशिष्ट ऋतूंमधील घटना आणि विशिष्ट संगीत, यांत कल्पनासहचर्य साधने, हाच मूळ उद्देश.बागेश्री, दुर्गा सारख्या परिचित रागात, तर धनबसंती, शिवभटियार सारख्या काहीशा अनवट रागात रचना बांधलेल्या आहेत. प्रश्न असा उद्भवतो, असा रचनांचा संग्रह सादर करून कोणत्याही पातळीवर सांगीत आणि आशयबद्ध - एकसंध असा अंतिम परिणाम साधणे, भारतीय संगीताच्या पार्श्वभूमीवर शक्य आहे का? पाश्चात्य संगीतात "प्रोग्रॅम म्युझिक" सारख्या आविष्कारांसारखे आहे. त्यानुसार विचार करायचा झाल्यास, "प्रोग्रॅम म्युझिक" मध्ये, विशिष्ट घटना आणि त्यांचा क्रम यांची संगीताविष्कारांशी सांगड घालणे, हा विचार अनुस्यूत असतो. यात घटना कथासुत्राच्या साखळीतील असतील किंवा एकाच प्रसंगाच्या स्वरूपाच्यादेखील असतील. 
या सगळ्याचे अंतिम फलित, प्रसंगवर्णन करणाऱ्या शान्दांचा त्यांनी आधार घेतला पण या शब्दांना शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताच्या संस्कारांनी अधिक सांगीत व गायनयोग्य बनविणे, त्यांना भाग पडले आणि त्यामुळे, भौतिक पातळीवरील घटनांचे वा प्रसंगांचे सूचन आणि संभाव्य नाद्सृष्टी यांचे समानांतर अनुभव  -अशा दोन्ही गोष्टींतील अपयश अधिक गडद झाले. 

पुढील भागात, "त्रिवेणी" "मला उमजलेले बालगंधर्व" " मराठी नाट्यगीते" आणि "मराठी भावगीते" या संबंधी अशाच प्रकारे विचार मांडायचा प्रयत्न करणार आहे. 

No comments:

Post a Comment