Tuesday 23 May 2017

छुपा लो यूं दिल में प्यार मेरा!!


खरंतर कथा नेहमीचीच - नायक आणि नायिका एकत्र भेटतात, काही भेटीनंतर प्रेम जमते. पुढे उच्च शिक्षणासाठी नायकाने गाव सोडणे आणि नायिकेची मानसिक कुचंबणा व पुढे फरफट होणे!! याची अखेर, नायिका कोठीवरील गायिका होणे आणि अचानक नायक गावात येणे आणि भेट होणे!! नायकाला पश्चात्ताप होणे आणि पुढे नायिकेच्या मुलीची काळजी घेणे!! अत्यंत सरधोपटपणे लिहिले आहे पण अशा प्रकारचे कथानक, हिंदी चित्रपटाला नवीन नाही. 
हिंदी चित्रपटात एकूणच प्रणयी प्रसंग बहुतांशी एकसाचीच असतात. त्यामुळे कथा कितीही सक्षम असली, अभिनेते कितीही नावाजलेले असले तरी प्रसंगात तोचतोचपणा बराच असतो, प्रसंगी बेचव देखील होतात. अर्थात, घाऊक उत्पादन झाले म्हणजे मग दर्जाच्या प्रतवारीत घसरण क्रमप्राप्तच होते. असे असले तरीही काही चित्रपट आणि काही प्रसंग मात्र आपल्या मनात कायमचे घर करून राहतात, त्यातील तजेला कायम ताजाच राहतो. १९६६ साली आलेल्या " ममता " चित्रपटाने घातलेली भुरळ, आजही मनावरून उतरत नाही.
पुढे कधीतरी वाचनात कविवर्य सुरेश भट यांच्या एका अजरामर कवितेतल्या या ओळी येतात. ही कविता जेंव्हा मी वाचली तेंव्हा मला कुठेतरी या ओळींशी नाते सांगणाऱ्या ओळींची आठवण यायला लागली. 

" मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

          मग सुटेल मंद मंद
          वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल ! " 

सुरेश भटांची कविता ही बरेचवेळा गझल वृत्ताशी नाते सांगणारी असते, जरी कविता गझल वृत्तात नसली तरी!! शेवटच्या ओळीत नवीन, चमकदार कल्पना आणायची आणि वाचकाला काहीसे स्तिमित करायचे, हा त्यांच्या कवितेचा खास भाग मला भावतो. अर्थात प्रत्येक कविता असा खेळ यशस्वी होत नाही पण जिथे खेळ जमतो, तिथे मात्र वाचक काहीसा चक्रावून जातो. वरील ओळी वाचताना, मला याच्याशी नाते सांगणाऱ्या ओळी, "ममता" चित्रपटातील " छुपा लो यूं दिल में प्यार मेरा " या गाण्यातील कविता वाचताना सापडल्या. एक मुद्दा, कुठल्याही कलाकृतीची अशी समांतर तुलना करण्यात फारसे हशील नसते कारण त्यातून फारसे काही हाती लागत नाही, बरेचवेळा केवळ शब्दच्छल होतो. परंतु एका कलाकृतीवरून दुसऱ्या कलाकृतीची आठवण होणे, सहजशक्य असते. 
उर्दू साहित्यात मजरुह सुलतानपुरी यांचे नाव फार सन्मानाने घेतले जाते तसेच चित्रपटात गाणी लिहिणाऱ्या शायरांपैकी एक महत्वाचे नाव म्हणून नेहमी उल्लेख केला जातो. ममता चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत आणि कविता म्हणून वाचताना, सुंदर वाचनानंद मिळतो. " छुपा लो यूं दिल में प्यार मेरा " हे गाणे चित्रपटात, नायकाच्या आयुष्यातील एका अत्यंत विकल संध्याकाळी, मानसिक दृष्ट्या कोलमडून गेल्यावर, झालेल्या उपरतीच्या क्षणाभोवती येते.
संगीतकार रोशन यांची बहुतांश गाणी अतिशय संथ, शांत प्रवृत्तीची असतात. त्याचा परिणाम, गाण्यातील मर्यादित स्तरावर वाजणारा वाद्यवृंद तसेच सगळे गायन देखील अतिशय संयत वृत्तीतून उमलत जातात.  वाद्यमेळ बहुदा,  सारंगी,बांसुरी, इत्यादी शक्यतो पारंपरिक भारतीय वाद्यांवर अधिक भर देत सजवलेला दिसतो. या गाण्याच्या संदर्भात विचार करता, प्रत्येक भाषिक वाक्यानंतर बांसुरी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, बांसुरीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे बांसुरी संगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनोखी विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.
या गाण्यात तर वाद्यांचा अतिशय मर्यादित स्तरावर वापर केलेला आहे, इतका की मानवी आवाज, हाच जणू काही वाद्य आहे असे वाटावे. गाण्याची सुरवात, थेट हेमंत कुमारांच्या स्वरांत होते. मुळातला धीरगंभीर आवाज, अत्यंत अशा प्रकारची शांत चाल, त्यामुळे गाण्याला सुरवातीलाच गहिरेपण लाभते. यमन रागात सुरावट बांधलेली आहे. मजरुह सुलतानपुरीचे शब्द देखील किती प्रत्ययकारी आहेत. 

" छुपा लो यूं दिल में प्यार मेरा
के जैसे मंदिर में लौ दिये की "

या दोन ओळींनंतर लताबाईंचा स्वर अवतरतो. सुरवातीची संथ आणि शांत चाल, प्रत्येक ओळींगणिक वरच्या सुरांत जाते पण शेवटची ओळ -  ' के जैसे मंदिर में लौ दिये की " गाताना, ज्या प्रकारे परत मूळ स्वरांशी येऊन मिळते, हा सगळं सांगीतिक वाक्यांश मुद्दामून परत, परत ऐकण्यासारखा आहे. शब्दांचे औचित्य सांभाळत चालीचे सौंदर्य कसे वाढवत न्यायाचे, याचा हा सुंदर वस्तुपाठ आहे.  

तुम अपने चरणों में रख लो मुझको 
तुम्हारे चरणों का फुल हैं मैं 
मैं सर झुकाये खडी हूं प्रीतम 
के जैसे मंदिर में लौ दिये की

आणखी एक वैशिष्ट्य सुरवातीलाच सांगितले पाहिजे, गाण्यात कुठेही रूढ असे तालवाद्य नसून, केवळ झांजेचा हलका आघात, हेच तालवाद्य म्हणून योजलेले आहे. मुळातली अत्यंत हळवी चाल, अशा तालवाद्याने अधिक खुलली आहे."  मैं सर झुकाये खडी हूं प्रीतम " ही ओळ दोन वेळा घेतली आहे, पहिल्यांदा किंचित वरच्या सुरांत घेतली आहे पण परत घेताना, मुखड्याच्या चालीशी जुळणारी घेतली आहे. शब्दातील आर्जव आणि मार्दव, सुरांच्या साहाय्याने कसे खुलवता येते, हा खरोखरच विलक्षण अनुभव आहे. रोशन यांच्या संगीताबाबत एक विलक्षण बाब ध्यानात येते, या संगीतकाराने आपल्या कारकिर्दीत युगुलगीते भरपूर बांधली आहेत आणि त्यांनी युगुलगीतांच्या बाबतीत आदिनमुना सादर केला आहे, हे म्हणावयास प्रत्यवाय नसावा. 
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ (?) म्हणजे बासुरीची लकेर आहे. यमन रागाची स्पष्ट ओळख दाखवणारी ही लकेर आहे. रोशन नेहमीच हात राखून वाद्यांचा वापर करतात असे मी वरती विधान केले आहे आणि त्या विधानाच्या पुष्ठयर्थ इथली बांसुरी दाखवता येईल. अतिशय सुंदर अशी लयकारी आहे. 

ये सच है जीना था पाप तुम बिन 
ये पाप मैंने किया हैं अब तक
मगर है मन में छबी तुम्हारी 
के जैसे मंदिर में लौ दिये की

पहिला अंतरा जरा वेगळ्या सुरांवर सुरु केला आहे. हेमंत कुमारांचा आवाज किंचित वरच्या स्वरांवर आहे. कवितेच्या ओळी बघता, पुरुष गायकाने सुरवात करणे इष्ट ठरते. किंचित ढाला आवाज, थोडी बंगाली वळणाची गायकी परंतु शब्दफेक अतिशय प्रत्ययकारी. मुळातच हेमंत कुमार हे संगीतकार असल्याने, एखादे गाणे गाताना, शब्दांवरील वजनाचा अचूक अंदाज दिसतो तसेच हरकत किती आणि कुठे घ्यायची/ तोडायची, याचे सम्यक दर्शन घडते. मुखड्यात जसे " मैं सर झुकाये खडी हूं प्रीतम " ही ओळ दोनदा घेऊन, परत मूळ स्वरावलीकडे चाल परतली आहे, तोच प्रकार " मगर हैं मन में छबी तुम्हारी " गाताना केला आहे. ही ओळ गाताना, " छबी " शब्दावर किंचित जोर दिला आहे आणि त्या शब्दाचे महत्व दर्शवून दिले आहे.

दुसरा अंतरा सुरु करण्यापूर्वीची बांसुरीची धून तीच ठेवली आहे. मला तर काहीवेळा असेच वाटते, अशा प्रकारच्या गाण्यात वाद्यमेळाची गरज असते का?? केवळ गायकांना काही क्षणाची उसंत मिळावी, या हेतूनेच वाद्ये योजली असावीत!! गाण्याची सुरावट इतकी मोहक आणि गोड आहे की इथे आणखी कसलीच सांगीतिक कलाकुसर गरजेची नाही, अगदी हरकती घेतल्या तरी त्याचे अतिशय माफक प्रमाण आहे. याचे महत्वाचे कारण - शब्दकळा भरजरी आहे आणि त्या शब्दकळेला सुरांच्या भाराखाली दाबून टाकण्याची जरादेखील गरज नाही. सगळी स्वररचना, हा उस्फुर्त स्वराविष्कार आहे.

फिर आग बिरहा की मत लगाना 
के जलके मैं राख हो चुकी हूं 
ये राख माथे पे मैंने रख ली 
के जैसे मंदिर में लौ दिये की "

कुठलेही युगुलगीत बसवताना, शब्दानुरूप गायक/गायिकेला स्थान द्यायचे, हा अतिशय ढोबळ अंदाज या गाण्यात फार बारकाईने पाळला आहे. दुसरा अंतरा गाताना, " फिर आग बिरहा की मत लगाना, के जलके मैं राख हो चुकी हूं" या ओळी लताबाईंच्या आवाजात तर " ये राख माथे पे मैंने रख ली, के जैसे मंदिर में लौ दिये की " या ओळी हेमंत कुमारांच्या आवाजात  गावुन घेण्यात, संगीतकाराने शब्दांची बूज कशी राखावी, हे सुरेखरीत्या सिद्ध केले आहे.

एकंदरीने रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता व खंत करण्याकडे झुकली आहे का? अर्थात, या विधानाला परस्पर शह देणाऱ्या रचना त्यांनी आपल्या कारकिर्दीत सादर केलेल्या दिसतात. लताबाईंच्या आवाजातील उंचावर पोहोचण्याच्या क्षमतेने मर्यादेपलीकडे मोहून न जाता, त्यांच्या आवाजातील मंद्र सप्तकातील किंवा मध्य सप्तकातील गायन कौशल्याचा वापर फार हुशारीने केला आहे आणि या गाण्यात देखील याच विशेषाचा आढळ होतो. या गाण्यात एकेक कडवे एकाच आवाजात जवळपास येते, दुसऱ्या आवाजाच्या कंठक्षेपाशिवाय. सांगीतदृष्ट्या लय आणि सुरावट यांची संगती राखूनही दोघेंही गायक जणू श्रोत्यांना थेट उद्देशून गातात, असेच वाटते. रोशन यांना बहुदा यमन रागाची विशेष आवड दिसत आणि हे त्यांनी, निरनिराळ्या प्रकृतीची गाणी या रागात बांधून आणि तरीही प्रत्येक चालीची स्वतंत्रता अबाधित ठेऊन, आपल्या सांगीतिक कौशल्याचा दाखला दिला आहे. वाद्यांचा स्वनरंग नेमकेपणाने ओळखून त्यानुसार गाण्यात त्यांचा वापर करण्याची कुशलता केवळ स्तिमित करणारी आहे.
आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर विचार करता, या गाण्यातील भावनेच्या दृष्टीने बघता, भारतातील मोज़क्या " पवित्र " गाण्यांत या रचनेचा समावेश होतो आणि तसा समावेश सर्वार्थाने योग्य आहे. 
त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात, 
"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे" 




Saturday 20 May 2017

इन आँखो की मस्ती के

प्रसिद्ध कविवर्य कै. बा.भ. बोरकरांची " जपानी रमलाची रात्र " ही कविता, मराठीतील एक अद्वितीय कविता मानली जाते. भोगवादी शृंगारावरील मनोज्ञ चित्रण या कवितेत वाचायला मिळते.

" नखें लाखिया, दांत मोतिया, वैदूरयी नेत्र,
अवयव गमलें चपल चिवट कीं मयवनींचे वेत्र;
कात सोडिल्या नागिणींचे तें नवयौवन होतें,
विळख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें "

बोरकरांच्या एकूणच स्वभावधर्मानुसार सौंदर्यलोलुप वृत्तीतून लिहिली गेलेली ही कविता. म्हटले तर उद्दीपित करणारी तरीही संयत मांडणीतून शृंगारसम भावनेची ही कविता आहे. भावकवितेच्या नात्याशी फार जवळचा संबंध राखणारी ही कविता. ही कविता केंव्हाही वाचल्यानंतर मनात मनात एक प्रकारचे धूसर चित्र उभे रहाते. कुठल्याही कलेची अशा प्रकारे इतिश्री होणे, हे एका दृष्टीने यशस्वी होणेच होय.
पुढे १९८१ मध्ये, " उमराव जान " चित्रपट आला, आणि त्यातील " इन आँखो की मस्ती के" ही गझल ऐकली आणि तसेच आव्हानात्मक शृंगाराचे चित्र मनासमोर उभे राहिले. शहरयार या उर्दू भाषेतील प्रख्यात शायरने ही गझल लिहिली आहे. गझलबाबत फार मागे एक सुंदर सूत्रबद्ध वाक्य वाचल्याचे आठवत आहे. भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार म्हणजे गझल. एखाद्या गझलेला मनपसंत दाद द्यावी तशी मला या वाक्याला दाद द्यावीशी वाटली.  मुळात गझलेचा आकृतिबंध हा अतिशय घट्ट विणीचा, एकसंध असला तरी देखील एका गझलेत ३,४ कविता असू शकतात ज्यांचा एकमेकांशी आशयाच्या दृष्टीने संबंध असेलच, असं नाही. खालील शब्दरचनेला, गझल हे वृत्त म्हणून वाचायला घेतले तर आपल्याला वरील विवेचनाची प्रचिती येईल. पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा, यातील आशयात काहीही साधर्म्य नाही आणि तरीही हे दोन्ही अंतरे, स्वतंत्र कविता म्हणून आपण आस्वादू शकतो आणि गझल या वृत्ताची खरी खासियत आहे. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगांना गझल वृत्तात अंगभूत प्रतिसाद मिळत असतो. गझलचा सांगीतिक दृष्ट्या विचार केल्यास, मानसिक अथवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशा प्रकारची आवाहक मागणी असते.
संगीतकार खैय्याम यांच्या सांगीतिक कारकिर्दीतील अजरामर संगीत. चित्रपटात बहुतांशी गझला आहेत आणि बहुतेक सगळ्या लखनवी ढंगाच्या ठुमरीवर आधारित आहेत. प्रस्तुत रचना, भूप रागावर आहे. वास्तविक पहाता, भूप रागाचे, संस्कृत ग्रंथातील वर्णन हे मांगल्यमय असे दिले आहे. त्या वर्णनाशी ताडून बघता, अशी श्रुंगारमय रचना भूप रागात तशी अपवादानेच सापडते आणि अशी " तर्ज " शोधून काढल्याचे संपूर्ण श्रेय हे, संगीतकार खैय्याम यांचेच म्हणावे लागेल. रचनेत भूप रागाची सावली आहे पण थोडे बारकाईने बघितले तर रागाचा तिरोभाव दृष्टीस पडतो. खरतर नृत्यगीत असून देखील, या मुजरा नृत्यात एल आदबशीर शृंगारच अवतरलेला आहे आणि एकूणच गझलच्या मूळ प्रकृतीला नेमके साजेसेच असे झाले आहे. छेडण्याचा तसेच गजांनी ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा या रचनेत आवाहक वापर आहे आणि असे आवाहनच गाण्याच्या प्रकृतीच्या नजरेतून बघितल्यास, गाण्याचा मूळ हेतू तडीस गेल्याचे समजून घेता येते.

" इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारो हैं  
इन आँखो से वाबस्ता अफसाने हजारो हैं

गाण्याची सुरवात, कुठल्याही वाद्याचे सूचन न होता, थेट होते. " इन आँखो की मस्ती के " ही गाऊन संपते आणि एक छोटासा आलाप घेतला जातो. भूप रागाची ओळख इथे होते. " सा रे ग प" या सुरांतून भूप नजरेसमोर येतो. आलापानांतर संपूर्ण ओळ गायली आहे. गाताना, एक बाब लगेच स्पष्ट होते, गायनातून निर्माण होणारे आव्हानात्मक आर्जव आणि सूचक शृंगाराची जाणीव. खरेतर सगळ्या रचनेतून हाच भाव दृग्गोचर होतो. संयत शृंगाराचा आदिनमुना संगीतकार खैय्याम आणि आशाबाई यांनी सादर केला आहे. गाण्यात कुठेही औषधाला देखील उठवलं वृत्ती प्रतीत होत नाही, बहुदा कारण असे असावे, संपूर्ण चित्रपट हा सरंजामी संस्कृती आणि विलासी वृत्तीवर आधारित असल्याने, तसे भाव निर्माण होण्याला फारसा वाव नव्हता. गायनात खानदानी वृत्ती दिसून येते. " इन आँखो की मस्ती के " गाताना " मस्ती " शब्द कसा गायला गेला आहे, हे ऐकण्यासारखेच आहे. " आँखो की मस्ती" यात एक खट्याळपणा दडलेला आहे आणि आवाहन देखील आहे. हे सगळे आशाबाईंनी सुरांतून फारच सुरेख दर्शविले आहे. आशाबाईंच्या गायनाला बरेचवेळा " शब्दभोगी " गायकी म्हणतात आणि तसे शब्दांचे अलौकिक " भोगणे " अशा गायकीतून प्रतीत होते. गझल रचनेत नेहमीच शेराच्या दुसऱ्या ओळीला कमालीचे महत्व असते. पहिल्या ओळीतून कल्पनेची मांडणी केली जाते आणि दुसऱ्या ओळीत त्या कल्पनेचा प्रभावी समारोप केलेला असतो. गझल गाताना देखील त्याच पद्धतीने दुसरी ओळ गायली जाणे अध्याहृत असते. दुसऱ्या ओळीत " वाबस्ता " हा उर्दू शब्द योजला आहे - याचा नेमका अर्थ - जोडलेले नाते किंवा नातेसंबंध. आता दोन्ही ओळींचा अर्थ आणि त्याची व्याप्ती ध्यानात येऊ शकते आणि संगीतकाराने, हाआशय स्वररचनेतून मांडलेला आहे.
इथेच सारंगीचे स्वर ओघळतात आणि चाल आपली मनाची पकड घेते. सारंगी वाद्याचे सवर्च असे असतात, वाजता क्षणीच तुमचे लक्ष वेधून घेतात. वास्तविक इथे सारंगीच्या जोडीने सतारीचे सूर देखील ऐकायला येतात पण इथे सतार झमझमत नसून सारंगीच्या सुरांना पूरक अशीच वाजली आहे आणि सतारीचे सूर संपत असताना परत सारंगीचे सूर ऐकायला येतात आणि त्याच सुरांत पहिला अंतरा सुरु होतो.

इक तुम ही नहीं तन्हा, उल्फत में मेरी रुसवा
इस शहर में तुम जैसे, दीवाने हजारो हैं
इन आँखो की मस्ती के

गझल वृत्ताचे जेंव्हा संगीतात रूपांतर होते, तेंव्हा बरेचवेळा मुखड्याची चाल आणि अंतऱ्याची चाल, यात फरक केला जातो. वेगळ्या शब्दात, अंतरा बांधताना स्वररचना वेगळ्या स्वरूपात बांधली जाते/जाऊ शकते. या मागे विचार असा  दिसतो, काव्य म्हणून प्रत्येक कडवे ही जर स्वतंत्र कविता असेल तर प्रत्येक अंतरा वेगळ्या सुरांत का गायला जाऊ नये? प्रश्नात तथ्य जरूर आहे पण हा भाग संपूर्णपणे संगीतकाराच्या अखत्यारीत येतो आणि त्याचा संगीताचा अभ्यास किती खोलवर आहे, त्यावर अवलंबून असते.  या रचनेतील अंतरा देखील वेगळ्या चालीत बांधलेला आहे. रचना भूप रागापासून दूर सरकल्याचे लक्षण. गंमत अशी आहे, " इस शहर में तुम जैसे, दिवाने हजारो हैं " ही ओळ परत मुखड्याकडे वाळवून घेतली आहे आणि भारतीय संगीत परंपरेनुसार समेची मात्रा अचूक घेतलेली आहे. गझल गाताना, त्यात स्वरोच्चारित ठसका आणि नखरा याचे अप्रतिम प्रमाण असते आणि तसा नखरा, आशाबाईंनी आपल्या गायनातून सादर केला आहे. वरती मी आशाबाईंची " भोगवादी " गायकी असे वर्णन केले आहे, त्याला पूरक असे गायन, हीच ओळ ऐकताना मिळते. " इस  शहर में " गाताना, " इस " शब्दावर नेमका जोर देऊन, त्या शब्दाचा अर्थ आणि त्याचे या ओळीतील वजन, सगळे एकत्रितपणे दर्शवून दिले आहे.   

इक सिर्फ हमी मय को, आँखो से पिलाते हैं
कहने को तो दुनिया में, मयखाने हजारो हैं
इन आँखो की मस्ती के

या अंतऱ्याच्या आधीच वाद्यमेळ जवळपास पाहिल्याप्रमाणेच आहे. सतार अतिशय मंद स्वरांत ठेवली आहे आणि त्यालाच जोडून सारंगी घेतली आहे. सारंगी या वाद्याचा गुणधर्म नेमका ओळखून, त्याला साजेशी अशीच स्वररचना इथे प्रदान केली आहे. कोठीवरील गाण्यात, सारंगी वाद्याने नेहमीच महत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि परिणामी, गझल गायनात सारंगीचे स्थान जवळपास अढळ स्वरूपाचे झाले. मानसिक चलनवलनाच्या गुंतागुंतींशी सारंगी वाद्य फार परिणामकारक साम्य दाखवते. हा या वाद्याच्या स्वनरंगाचा अप्रतिम गुण आहे. ही रचना, शायरी म्हणून वाचताना, या अंतऱ्याच्या दोन ओळी लक्षणीयरीत्या प्रत्ययकारी ठरल्या आहेत. खरतर गझल म्हटली की बरेचवेळा उच्च दर्जाच्या उर्दू शब्दांची फवारणी वाचायला मिळते आणि त्यातच बहुतांशीवेळा आशय गुदमरून जाण्याची शक्यता असते. इथे मात्र तासाला प्रकार दिसत नाही. असे देखील असू  शकेल,प्रस्तुत रचना ही जरी गझल वृत्तात लिहिली असली तरी मुलत: चित्रपटासाठी लिहायची असल्याकारणाने, शक्यतो प्रचलित उर्दू मिश्रित हिंदी भाषेत लिहिली गेली असावी.

इस शम्म-ऐ-फरोजा को, आँधी से डरातें हो
इस शम्म-ऐ-फरोजा के, परवाने हजारो हैं
इन आँखो की मस्ती के

इथे " फरोजा " हा उर्दू/अरेबिक शब्द योजलेला आहे - अतिशय मौल्यवान रत्न अशा अर्थाने योजलेला आहे. उर्दू भाषेत आणखी एक खासियत आढळते, जसे इथे " शमीम-ऐ-फरोजा " शब्दरचना वाचायला मिळते. अशा प्रकारे संपूर्ण शब्द विघटित केल्याने, आशयाची अभिवृद्धी सहज आणि संपूर्णपणे ध्यानात येऊ शकते आणि गझल ही बहुतेकवेळा गायली जात असल्याने, लयीचा अंदाज आणि गायकी (एखादी हरकत किंवा मुरकी किंवा खटका घेण्यासाठी) साठी याचा सुरेख उपयोग केला जातो. अशा शब्दरचनेमुळे काव्याला सौंदर्य मिळते, हा मुद्दा आणखी वेगळाच!! आशाबाईंनी, संपूर्ण रचना गाताना,, अंतऱ्यातील पहिली ओळ गाताना दोन भागात गायली आहे आणि तसे  करताना,तिथे प्रत्येकवेळेस एखादी हरकत/आलाप घेऊन, केवळ गायकीचा दाखवली  नसून, त्या ओळीतील अर्थ नेमका दर्शविला आहे जसे इथे, " इस शम्म-ऐ-फरोजा " नंतर छोटासा आलाप घेतला आहे.
आशाबाईंना कोणालाही हेवा वाटावा असा लाभला आहे. चैतन्यपूर्ण, कंपविहीन असूनदेखील भावपूर्ण, कुठेही घसरू न देता द्रुत लयीत फिरणारा, खालच्या आणि वरच्या तारतांवर सहज आविष्कारपूर्ण विहार करणारा आणि भरीव असून जणांनी सौंदर्याने तसेच लालित्याने युक्त असा आहे. आपली ताकद लपवू शकणारा  आवाज, भावुक न होता सूचन करण्याची अफाट क्षमता व शब्दांच्या अर्थापलीकडे त्यांच्या आशयापर्यंत नेऊ शकणार लगाव - या आणि यासारख्या इतर गुणांचे भांडवल गझल गायनासाठी लागते आणि ते आशाबाईंकडे भरपूर आहे. यामुळे गाताना आवाजात अनेकवेळा अनपेक्षितरित्या उतार-चढाव दाखविता येणे सहजशक्य झाले आणि परिणामी ललित गायन अधिक समृद्ध, श्रीमंत झाले. नेहमी (जरूर  नसताना) निकष म्हणून चित्रपटसंगीताभोवतो तरंगणाऱ्या गोष्टीकडे वळायचे तर, शास्त्रोक्त संगीताबाबत मत मांडायचे  झाल्यास, रूढ आणि नियमबद्ध रूपापासून सरकून अर्थपूर्ण बदल घडवून रागात नवीन प्रयोग करण्यात यश मिळाले आहे नाही, हा प्रश्न विचारता येऊ शकतो. प्रस्तुत रचनेच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास ,भूप रागाच्या तिरोभावातून स्वररचना उभी राहात असताना, त्या रचनेचे बंदिशीत किंवा ठुमरीत साच्यात गायन न  करता,गीतधर्मी गायन करीत, सुंदर गीत आपल्या समोर ठेवणे, हेच खरे त्यांच्या गायनाचे खरे यश म्हणायला हवे. mano
नैसर्गिक सौंदर्य आणि संवादी मनोभाव रचनाकाराने केरवा या तालातल्या डौलदार रचनेत आणला आहे. संयत गायन आणि मोजका वाद्यमेळ वापरून रचनासंबद्ध निश्चिततेने ही कामगिरी पेलणे सर्वांना जमते असे नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय हेच त्यांचे यश मानता येईल.


गुंजी सी हैं सारी फ़िझा

"लावण्याला असल्या असण्याच्या हक्कच ना;
प्रज्ञेतच फक्त तये उजळावे, आणि पुन्हा
जळताना, घडवावी प्रतिमा निस्तुल काळ्या
काळ्या पाषाणातून शब्दातून थिजलेल्या _____"

सुप्रसिद्ध कवी पु.शी. रेग्यांच्या या अजरामर ओळी. मराठीत रेग्यांच्या कवितेने, जीवनातल्या एका अत्यंत रसपूर्ण अशा भागाचं अत्यंत समरसतेने चित्रण केले, जे अपूर्व आहे. जीवनातील या आनंदाचा स्वीकार करताना मराठी मन बुजतं. म्हणूनच मुक्त आनंदाचा इतका मोकळा आविष्कार मराठी भाषेत क्वचित आढळतो. "स्त्री"ला आपले "स्त्रीत्व" जाणवून  देताना,पुरुषाच्या संयत नजरेतून आविष्कृत झालेली ही कविता, केवळ आणि केवळ निखळ सौंदर्याची अनन्यसाधारण निर्मिती अप्रतिम प्रतिमांच्या साहाय्याने उभी करते.
२००४ साली आलेल्या "क्यूँ...! हो गया ना" या चित्रपटातील " गुजी सी हैं सारी फ़िझा " हे गाणे ऐकताना, यातील कविता वाचताना, शायर जावेद अख्तर यांनी मांडलेल्या शब्दरचनेची आठवण, वरील कवितेच्या संदर्भात वारंवार येते. प्रणयी आविष्कार पण तरीही असली तरल, मोकळी भावना शायर जावेद अख्तर यांनी या गाण्यात सुरेख मांडली आहे. हिंदी चित्रपटात, प्रणयी प्रसंग तर पाचवीला पुजलेले असतात तेंव्हा एका दृष्टीने "थिजून चिवट" झालेल्या प्रसंगासाठी नवचैतन्याने भारलेली शब्दरचना करणे, खरोखरच अवघड असते. आधुनिक काळात, हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी आशयपूर्ण शब्दरचना करणाऱ्या कवींमध्ये जावेद अख्तर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. वडील, प्रसिद्ध शायर "जान निसार अख्तर" यांचा वारसा सहजपणे पुढे चालवला, असे सार्थपणे म्हणता येईल. मुळात शब्दरचना करताना, तिला भावकवितेच्या अंगाने मांडण्याचे अनोखे कसब या शायरकडे दिसते. आता याच कवितेच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, कवितेतील भावनाशयाचा प्रवास हा स्थूलतेकडून सूक्ष्माकडे सुरु झाल्याचे जाणवेल. वास्तविक, नायिकेला हवा असणारा प्रणयाचा प्रतिसाद मिळत आहे आणि त्या क्षणी जाणवलेली भाववृत्ती,हेच या कवितेचे प्रमुख लक्षण आहे आणि हे लक्षण मांडताना, निसर्गातील प्रतिमा, प्रसंगी संगीत वाद्याचा प्रतिमा म्हणून केलेला वापर आणि एकूणच लयीच्या अंगाने केलेली शब्दरचना, ही शब्दरचनाच वाचताना, आपण घाटाच्या प्रेमात पडतो. इथेच कवीचे अर्धे यश सिद्ध होते. शब्दांकित केलेल्या प्रतिमेच्या जाणिवेतून स्फुरणारा अनुभव, तो अनुभव हीच इथे भाववृत्ती म्हणून प्रगट होते. येथे संवेदना ही कल्पनास्वरूपात जाणवलेली नाही; संवेदना हाच अनुभव आहे. तेच भाववृत्तीचे शरीर आहे.  येथे भावानुभवाचे बाहेरून वर्णन करण्याचा प्रयत्न नसून, त्या अनुभवाचे संवेदनशरीर साकार करून त्याच्या द्वारे तोच अनुभव पुन्हा निर्मिण्याचा प्रयत्न आहे.
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, गाण्याच्या सुरवातीलाच सरगम ऐकायला मिळते पण त्यामागे अतिशय मंद आवाजात, गिटारचे सूर आहेत. ही सरगमच अशा पद्धतीने घेतलेली आहे, ज्यायोगे गाण्याच्या चालीचा "आराखडा" आपल्या समोर उभा रहातो. संगीतकार म्हणून शंकर/एहसान/लॉय यांनी गाण्याचा मुखडाच अशा अनोख्या पद्धतीने सादर करून, गाण्याची चाल मनावर ठसवली आहे. सरगम देखील अतिशय खालच्या सुरांत, गुणगुणत्या नादात घेतली आहे. गायिका साधना सरगमने याबाबत निश्चित आपली गायकी प्रस्थापित केली आहे. नीट कान टवकारून ऐकले म्हणजे गायल्या गेलेल्या सरगमचे चलन ध्यानात येईल. खरंतर, संगीतकाराने हीच सरगम संपूर्ण गाण्यात वेळोवेळी गाऊन घेतली आहे आणि मुखड्याला जो नाद ठेवला आहे, तीच नादमयता कायम ठेवली आहे.  
"गुंजी सी हैं सारी फ़िझा, जैसे बजती हैं शहनाईया" ही ओळ याच सरगमच्या नादमयतेतून गायली गेली आहे. स्वरांचे घेतलेले "वजन" जरा बारकाईने ऐकल्यावर ध्यानात येईल. जावेद अख्तर यांनी लिहिलेले नादमय शब्द तितक्याच हळव्या (पण अर्थात ओलसर, भावविवश नव्हे!!) सुरांनी गायले गेले आहेत. परिणाम, आधीची सरगम नेमकी मनात बसते.  
गुंजी सी है सारी फिझा, जैसे बजती हैं शहनाईया
लहराती हैं, महेकी हवा, गुनगुनाती हैं तनहाईयाँ
सब गाते हैं सब मदहोश हैं, हम तुम क्यूँ खामोश हैं
साज-ए-दिल छेडो ना
चुप हो क्यूँ, गाओ ना,
आओ ना.... आओ ना... आओ ना...

हा मुखडाच विलक्षण सौंदर्यपूर्ण स्वरांनी बांधलेला आहे. कुठेही गायकी दाखवायची म्हणून दीर्घ हरकत किंवा तान घेतलेली नाही. पहिली ओळ जशी गायली गेली आहे, त्याच लयीत, सुरांत सगळा मुखडा गायला गेला आहे. " साज-ए-दिल छेडो ना " ही ओळ गाताना साधना सरगमने किंचित हलक्या सुरांत छोटीशी पण आल्हाददायक हरकत घेऊन, लय किंचित लांबवली आहे. त्यामुळे मुखडा एकसुरी न बनता,  थोडे वैविध्य येते. त्यातच पुढे "आओ ना" या शब्दांवर स्वरांची फिरत घेऊन, वारंवार उच्चारून, बांधणी पक्की केली आहे.
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ तर फक्त सरगमनेच सजवला आहे. अर्थात इथे जी सरगम घेतली आहे, ती गाण्याच्या सुरवातीला घेतली आहे, त्याच्याशीच नाते सांगणारी आहे. आणि पार्श्वभागी गिटारचे मंद स्वर आणि Octopad या तालवाद्याचा तसाच काहीसा दबका ध्वनी.

तन मन में क्यूँ ऐसी बेहती हुयी
ठंडी सी इक आग हैं
सांसो में हैं कैसी ये रागिनी
धडकन में क्या राग हैं
ये हुवा क्या हमें, हमको समझाओ ना
सब गाते हैं.... खामोश हैं....
दिल में  जो बांते हैं
होटो पे लाओ ना.....
आओ ना.... आओ ना... आओ ना...

या अंतऱ्याची चाल तशीच ठेवली म्हणजे मुखड्याला जी चाल लावली आहे, त्याला समांतर अशीच चाल ठेवली आहे. पार्श्वभागी मात्र बासरीचे सूर आहेत आणि ते मात्र या अंतऱ्याच्या स्वररचनेस एक विलोभनीय अस्तर प्रदान करतात. ललित संगीतात अशा काही ""जागा" असतात, जिथे संगीतकाराला स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी असते. त्यामध्ये पार्श्वभागी वाजणारा वाद्यमेळ, फार महत्वाची भूमिका बजावत असतो. बाकी सांगीतिक दृष्ट्या या अंतऱ्यात काही वेगळेपण आणलेले नाही. संगीतकाराचा असा विचार असण्याची शक्यता असावी, मुखडाच इतका गोड झालेला असताना,त्यात आणखी वेगळे प्रयोग कशाला करायचे?  या प्रश्नाचे उत्तर मी पुढील विवेचनातून मांडेन. परंतु सॅम पातळीवर स्वररचना ठेवल्याने, रसिकांना चाल लक्षात ठेवायला मदत होते.

इथला अंतरा संपल्यानंतरच वाद्यमेळ मात्र नीट लक्ष देऊन ऐकणे जरुरीचे आहे. वाद्यमेळाची सुरवातच बासरीच्या छोट्याशा हरकतीने होते आणि ती हरकत संपताक्षणीच पियानोचे सूर ऐकायला मिळतात. हे जे पियानोचे सूर आहेत, त्याचा संबंध गाण्यात दरवाळणाऱ्या सरगमशी जोडलेला आहे!! आणखी थोडे बारकाईने ऐकले तर पाश्चात्य बॉल डान्सच्या  संगीताची आठवण देणारे आहेत. गमतीचा भाग असा आहे, सुरवातीची सरगम भारतीय संगीताशी जुळणारी आहे पण त्याच सुरावटीचे आविष्करण पियानोवर घेताना संपूर्ण वेगळी धाटणी अंगिकारली आहे आणि संगीतकाराने आपल्या व्यासंगाचा नेमका पुरावा सादर केलेला आहे. ही स्वररचना फार गुंतागुंतीची आहे पण ऐकायला तितकीच मोहक आहे.

अब कोई दुरी, ना उलझन कोई
बस इक इकरार हैं
अब ना कहीं हम ना तुम हद कही
बस प्यार ही प्यार हैं
सून सको धडकने, इतनी पास आओ ना
सब गाते हैं.... खामोश हैं....
अब मेरे सपनो पे तुम ही तुम चाहो ना
आओ ना.... आओ ना... आओ ना...

इथे गायक म्हणून उदीत नारायण यांचा आवाज ऐकायला मिळतो. हा अंतरा देखील पहिल्या अंतऱ्याच्या चालीशी जुळवून घेतलेला आहे. गायक म्हणून विचार करताना, उदीत नारायण यांचा आवाज मोकळा आहे पण कधी, कधी दाक्षिणात्य लहेजा जाणवतो तरीही उर्दू उच्चार मात्र व्यवस्थित घेतलेले आहेत. आवाजाचा पल्ला तसा मर्यादित, शक्यतो मंद्र अथवा मध्य सप्तकात गळा अधिक खुलून येतो. हा अंतरा गाताना सुरवातीला वरचा स्वर लावला आहे पण एकूणच शक्यतो मध्य सप्तकात खुलणारा आवाज, असेच वर्णन योग्य ठरेल. गायनावर काहीवेळा मोहमद रफींचा पगडा जाणवतो. भरीवपणा, समान ताकदीची फेक व मर्यादित अर्थाने जोमदारपणा ही खास वैशिट्ये लक्षात येतात.
साधना सरगमचा आवाज मोकळा आहे, सरगम घेताना देखील आवाज स्थिर ठेवला आहे आणि प्रशिक्षित गायिका असल्याचे ध्यानात येते. गाताना भावुक न होता, भाव सूचन करण्याची  अप्रतिम क्षमता. आणि शब्दांच्या अर्थापलीकडे त्यांच्या आशयापर्यंत नेऊ शकणारा लगाव इत्यादी गुणविशेष या गाण्यातून कळून येतात. एकूणच भारतीय पठडीतील गाणी गाणे, स्वभावतः मानवणारे आहे. चित्रपट गीतांत अशा प्रकारची गाणी वारंवार  अशी गाणी गायला मिळत नाहीत. बहुदा म्हणनूच स्पर्धेत साधना सरगम यांचे नाव काहीसे मागे पडलेले दिसते.

आधुनिक काळात, शंकर/एहसान/लॉय हे संगीतकारांचे त्रिकुट खूपच प्रसिद्ध झाले आहे. यांमधील शंकर महादेवन, हे भारतीय संगीताचे पायाभूत प्रशिक्षण घेतलेले कलाकार  असून,बाकीचे दोघे, पाश्चात्य संगीताचे व्यासंगी असल्याने, यांच्या संगीतात बरीच विविधता ऐकायला मिळते. बरेच रचनाकार असे मानतात, मुखडा बांधणे खरे कौशल्याचे असते. एकदा मुखडा जमला पुढे सगळे बांधकाम असते.  या दृष्टीने विचार करता, या संगीतकार त्रयीने संगीत रचना करताना, अनेक मुखडे समोर आणल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. आता याच रचनेचा स्वतंत्र विचार  केल्यास,भारतीय संगीताच्या  धाटणीवर आधारित स्वररचना आहे, हे तर उघड आहे पण तालाच्या मात्रा आणि वाद्यमेळ योजताना, त्यात आधुनिकता आणली आहे. अर्थात जरा बारकाईने ऐकले तर तालाचे योजन करताना, राहुल देव बर्मन यांच्या शैलीचा प्रभाव जाणवतो.
गुंजी सी हैं, गुनगुनाती हैं तनहाईया......
आओ ना.... आओ ना... आओ ना...

गाण्याचा शेवट करताना, मुखड्याचीच पुनरावृत्ती केलेली आहे, त्यामुळे संपूर्ण गाणे ध्यानात राहण्याऐवजी मुखडाच अधिक ध्यानात रहातो. आता हे स्वररचना म्हणून योग्य की अयोग्य? हा प्रश्न मनात उरतोच. परंतु वेधक मुखडा, अप्रतिम वाद्यमेळ आणि पाश्चात्य संगीताचा भरमसाट वावर होत असताना देखील, सरगमच्या साहाय्याने एका सुंदर गीताची बांधणी जी आपल्या मनात सतत तरळत राहते. यशस्वी गाण्यासाठी यापेक्षा वेगळ्या उपलब्धीची दुसरी कुठलीही गरज नसते/नसावी.


बडी धीरे जली

"संधिप्रकाशांतुनी जाणारा संधिप्रकाशापरी:
संदिग्धाच्या सन्निध लागे चाहूल ही शेंदरी;
पक्षी परतल्यानंतर आलें वळण हवेस हिवाळी,
दिवे गारव्यापारी जाहले शोकगीतांच्या ओळी;"
फार पूर्वी सुप्रसिद्ध कवी आरतीप्रभूंच्या या ओळी वाचताना वातावरणातील विदग्धता, शांतता आणि आत्ममग्नता प्रत्ययाला आली होती. मुळातच आरतीप्रभुंची कविता ही कुठल्याही विषयाच्या गाभ्याशी जाऊन आरपार प्रत्यय देणारी, त्यात इथे संध्याकाळची वेळ असल्याने, भावना अधिक टोकदार झालेली. 
नंतर पुढे, इश्किया चित्रपटातील, पहाटेच्या वातावरणातील "बडी धीरे जली" हे  ऐकताना या ओळी वारंवार मनात येत राहिल्या. वास्तविक, गाण्याची वेळ पहाटेची आहे आणि कवितेत तर संध्याकाळचा उल्लेख स्पष्ट आहे पण तरीही मनात याच ओळी यायचे कारण, बहुदा त्यावेळी जाणवणारी अंतर्मुख विदग्धता, हेच असणार.   
झमझमणाऱ्या तंबोऱ्याच्या तारांच्या झणत्काराने गाण्याला सुरवात होते आणि त्या सुरांतूनच ललत रागाची खूण आपल्या मनाला पटते. त्याच सुरांत, गायिका रेखा भारद्वाज यांनी आलाप घेतला आहे. जरा बारकाईने ऐकले तर या आलापावर सुप्रसिद्ध ख्याल गायिका किशोरी आमोणकरांच्या गायकीचा प्रभाव दिसतो.विशेषतः सुरवातीला घेतलेला "एकार" आणि लगेच खालच्या  सुरांत व्यक्त झालेला "कोमल धैवत" किशोरी आमोणकरांची  पुसटशी आठवण करून देतो. अर्थात, हा प्रभाव सुरवातीच्या काही सुरांपुरताच आहे. पुढील गायन मात्र स्वतंत्र अभिव्यक्तीने व्यक्त होते. रेखा भारद्वाज या प्रशिक्षित गायिका असल्याचे लगेच समजते. खऱ्या गायकाची ओळख होण्यासाठी काही सुरांचीच गरज असते आणि त्या सुरांतूनच, तो कलाकार आपली ओळख दाखवून देत असतो. हा आलापच इतका सुरेल, स्वच्छ आहे की पुढील रचना कशाप्रकारे वळणे घेत जाणार आहे, याची चुणूक दाखवतो. " रे ग नि रे ग म" या स्वरावलीत खरे तर चालीचा चेहरा लपलेला आहे. तंबोऱ्याचे स्वर या आलापीला भरीव साथ देत आहेत. जिथे गायिका "म" स्वर घेते तिथेच संगीतकार विशाल भारद्वाज यांनी समेची मात्रा ठेवली आहे. तशी मात्रा घेताना, पार्श्वभागी हलक्या सुरांत, गिटारचे स्वर घेतले आहेत आणि पारंपरिक तालवाद्य न घेता पाश्चात्य Octapad वाद्यावर समेची मात्रा घेतली आहे. तबल्यापेक्षा काहीसा दबका पण ड्रमपेक्षा अधिक उठावदार वाद्य. सकाळच्या मंद, शांत वातावरणातील रचनेला हलक्या आघाती तालवाद्याने साथ करणे, एकूणच सुसंगत होते. या सुसंगतेतच आपल्याला "बडी धीरे जली रैना" ही धीरगंभीर सुरांतली ओळ ऐकायला मिळते. तालाच्या मात्रा समजून घेतल्या तर केरवा ताल, संगीतकाराने योजल्याचे कळून घेता येते. पुढे "धुआ धुआ नैना" ओळ घेताना, वरील तालवाद्यासहित काहीशा दबक्या आवाजात ड्रम या तालवाद्याच्या मात्रा ऐकायला मिळतात. संगीतकाराचे कौशल्य हेच आहे, वास्तविक ही तालवाद्ये बरेचवेळा घणाघाती आवाजात सादर केली जातात पण इथे गाण्याचा मूड बघूनच ताल वाद्ये खालच्या सुरांत ठेवली आहेत. परिणाम गाण्यातील गंभीर भाव अधिक खोलवर जाणवावा. तालाची योजना करताना, संगीतकार विशाल भारद्वाजने एक मात्रा गिटारवर, पुढील मात्रा ड्रम आणि Octapad वाद्यावर घेतलेल्या आहेत - हा राहुल देव बर्मन शैलीचा प्रभाव!! जरी ललत रागाच्या सुरांचा आधार घेतला असला तरी रचनेची "घडण" बांधताना, संगीतकाराने रचनेचे गीत कसे होईल, याकडे लक्ष दिले आहे. बरेचवेळा असे घडते, रागाच्या चौकटीत स्वररचना तयार करताना फक्त रागाचे नियम पाळून, त्यानुसार गीताची रचना केली जाते. यामध्ये संगीतकाराचा रागदारी संगीताचा जरूर तो व्यासंग दिसतो पण त्याची खरंच जरुरी असते का? हा प्रश्न इथे उपस्थित करावासा वाटतो. 
रागाची चौकट आधाराला घेऊन, त्यात स्वतः:ची भर टाकून, प्रसंगी रागालाच बाजूला सारून, गीताची बांधणी करणे, हा व्यासंगीवृत्तीचा एक निकष जरूर मानला जावा.

रातोंसे होले होले, खाली है किनारी 
अखियों ने तागा तागा, भोर उतारी
खारी अखियों से, धुआ जाये ना
बडी धीरे जली रैना
धुआ धुआ नैना

शब्दरचना वाचताना, एखादे लोकगीत वाचत आहोत असाच भास होतो. चित्रपट गीताच्या संदर्भात विचार करताना, एक बाब अवश्य पाळावी लागते - पडद्यावर जे पात्र गाणे सादर करीत आहे, जो प्रसंग आहे, या सगळ्याची जाण ठेऊनच पद्यरचना करावी लागते. त्यामुळे बरेचवेळा जरी कवी प्रतिभावान असला तरी त्याला, आपल्या प्रतिभेला काहीशी मुरड घालून, सरळ, साध्या परंतु अर्थवाही शब्दातून व्यक्त होणे, आवश्यक ठरते. कवी गुलजार यांनी, इथे हाच विचार केलेला आढळतो. चित्रपटाची कथा सगळी उत्तर प्रदेश/बिहार भागातली असल्याने, तिथल्या बोली भाषेचा अवलंब करणे योग्यच ठरते. चित्रपटाची कथा ही गावरान भागातली, काहीशा दहशतवादी संस्काराची असल्याने, गीताचे शब्द त्याच संस्कृतीचे असणे क्रमप्राप्तच ठरते. "खारी अखियों से, धुआ जाये ना" ही ओळ किंवा "रातोंसे होले होले, खाली है किनारी" ही ओळ तिथल्या अंतर्भागातल्या बोली भाषेची ओळख करून देते. अर्थात असे   देखील,गुलजार कुठेही शब्दकळेतील कवितेचा प्रमाणित दर्जा खालावू देत नाहीत आणि हे यश स्पृहणीय असेच म्हटले पाहिजे. 
पहिला अंतरा सुरु होण्यापूर्वीचा वाद्यमेळ बांधताना, संगीतकाराने "मोहन वीणा" या नावाने प्रसिद्ध असलेल्या गिटारच्या सुरावटीचा सुरेख उपयोग करून घेतलेला आहे. रागदारी संगीतातील हरकती, संगीतकाराने इथे योजल्या आहेत, जेणेकरून गाण्याची एकसंधता भरीव होईल पण तसे करताना एकसुरीपणा टाळलेला आहे. खरतर ही रचना बंदिशींकडे सहज झुकू शकली असती परंतु संगीतकाराने तो मोह टाळलेला आहे. मी हे वाक्य मुद्दामून लिहिले आहे कारण, मुखडा संपवताना, "धुआ धुआ नैना" गाताना, "नैना" शब्दावरील घेतलेली हरकत, सहजपणे अवघड करता आली असती किंवा दीर्घ तानेत परावर्तित करता आली असती पण संगीतकार आणि गायिका, दोघांनीही तो मोह टाळला आहे आणि गीताचे "गीतत्व" राखले आहे. 

पलको के सपनों की, अग्नी उठाये
हमने तो अखियों के, अलने जलाये
दर्द ने कभी लोरिया सुनाई तो
दर्द ने कभी निंद से जगाया रे
बैरी अखियों से ना जाये धुआ जाये ना
बडी धीरे जली रैना
धुआ धुआ नैना

हा अंतरा अगदी वेगळ्या सुरावर सुरु केला आहे. चाल ललत रागावरच आहे पण स्वरांची "उठावण" वेगळी केली आहे, जेणेकरून स्वररचनेत वैविध्य येईल. हाताशी प्रशिक्षित गायिका असल्यावर, संगीतकाराला देखील काही नवीन जागा सुचू शकतात, नवे स्वरबंध जाणवतात आणि त्यायोगे गाण्याची सौंदर्यावृद्धी होऊ शकते. पहिल्या अंतऱ्यापेक्षा किंचित वेगळा सूर लावलेला आहे पण जर का शब्द बघितले तर त्यामागील विचार समजून घेता येतो. " पलको के सपनों की, अग्नी उठाये" ही ओळ जरा नीट, बारकाईने वाचली तर वेगळ्या सुरावटीची गरज का? या प्रश्नाचे उत्तर मिळते. तसे गाताना "अग्नी" असे न घेता "अगनी" असा काहीशा गावरान ढंगाने घेतल्याने, गायनाची खुमारी आणखी वाढते. " दर्द ने कभी लोरिया सुनाई तो, दर्द ने कभी निंद से जगाया रे" शब्दांमधून सहजपणे विरोधाभास कसा सुरेख दाखवला आहे. एका बाजूने "लोरिया सुनाई" तर लगेच पुढील ओळीत "निंद से जगाया" असा खेळ गुलजार नेहमीच आपल्या शब्दरचनेत करीत असतात. बरेचवेळा आपल्या मनावर सुरांचीच मोहिनी इतकी प्रचंड असते की गाण्यातील शब्दांबद्दल आपण वेगळी जाणीव ठेवावी, हेच बहुतांशी विसरले जाते!!  

जलते चिरागो में, नींद ना आये
फुंकोसे हमने सब तारे बुझाये
जाने क्या खोली, रात की पिटारी से
सुजी अखियों से, ना जाये धुआ जाये ना,
बडी धीरे जली रैना
धुआ धुआ नैना

हा शेवटचा अंतरा आणि त्या आधीचा वाद्यमेळ, यात तसा फारसा फरक नाही. तीच मोहन वीणा आणि त्यावर तशाच प्रकारचे स्वर छेडले आहेत. किंबहुना, "जलते चिरागो में, नींद ना आये" ही ओळ देखील आधीच्या अंतऱ्याच्या स्वररचनेशी साद्ध्यर्म्य दाखवते. फरक ठेवला आहे तो शब्दोच्चारात. अर्थात, कुठल्याही गाण्यात कुठल्या शब्दावर किती "वजन" द्यायचे आणि कुठला शब्द "मोकळा" ठेवायचा, हे स्वातंत्र्य संगीतकार घेतच असतो. या गोष्टींचा गाण्याच्या परिणामकारकतेवर फार फरक घडवून आणत असतो. 
गाण्याचा शेवट घेताना मात्र, एखादी बंदिश संपवावी त्याप्रमाणे "बडी धीरे जली रैना, धुआ धुआ नैना" या ओळी आळवून संपविल्या आहेत. याचा परिणाम, सगळीच रचना आपल्या मनात रेंगाळत रहाते. गाण्याची लय पहिल्यापासून कायम मध्य सप्तकात, क्वचित मंद्र सप्तकात ठेवली असल्याने, ऐकताना आपल्याला प्रत्येक सूर "अवलोकिता" येतो आणि त्याचा योग्य तो आनंद देखील घेता येतो. 

संगीतकार म्हणून विशाल भारद्वाज यांचा विचार करायचा झाल्यास, काही रचनांवर राहुल देव बर्मन यांचा ठसा उमटलेला दिसतो. असे असू देखील, त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि आधुनिक चित्रपट संगीतात, आधुनिकतेकडे लक्ष ठेवत असताना देखील परत, परत परंपरेकडे वळून बघण्याची सवय दिसून येते. अर्थात, ही शैली देखील राहुल देव बर्मन त्यांच्यासारखीच आहे. अर्थात, गाण्याचा मुखडा बांधणे, स्वरविस्तार करणे आणि आपण चित्रपट गीत तयार करीत आहोत, ही जाणीव सतत जागृत ठेवणे, इत्यादी बाबींकडे त्यांचे वेगळेपण दिसून येते. लोकसंगीताचा बाज उचलताना, त्याचा तोंडवळा कायम ठेऊन, त्यात स्वतःची भर टाकण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखेच आहे. तसेच निरनिराळ्या वाद्यांमधून निरनिराळे स्वनरंग पैदा करण्याचे कौशल्य निश्चितच कौतुकास्पद आहे. कारकिर्दीची सुरवात जरी एका संगीतकाराच्या प्रभावाखाली झाली असली तरी तो प्रभाव संपूर्णपणे पासून, स्वतःची नव्याने ओळख रुजवावी, यातच या संगीतकाराचे मोठेपण दृष्टीस पडते. 


हाय रामा ये क्या हुवा

This summary is not available. Please click here to view the post.

मेघा बरसने लगा है आज की रात

"अंधार असा घनभारी चंद्रातून चंद्र बुडाले,
स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले;
नाहींच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे,
दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे....."

सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांच्या "संध्याकाळच्या कविता" या काव्यसंग्रहातील या सुप्रसिद्ध ओळी. माणसाच्या दु:खाच्या गवाक्षातून लिहिलेल्या कविता. माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारची दु:खे येतात आणि काव्यातून दु:खाला अनेक प्रकारे चिरंतनत्व दिले गेले आहे. ग्रेसच्या कवितेतून हीच भावना/ जाणीव नव्या रचनेतून, घाटातून नव्याने झळाळत प्रगट होते आणि त्याच भावनेचे अलौकिक रूप स्तिमित करून जाते. अशाच प्रकारची परंतु चित्रपट गीताच्या स्वभावगत मर्यादा ध्यानात घेऊन, ज्या कवींनी अथकपणे प्रयत्न केले यात गुलजार यांचे नाव अवश्य घ्यावेच लागेल. चित्रपट गीतांत, मुक्त कवितेप्रमाणे गूढ, अगम्य अशा प्रतिमांना फारसे स्थान नसते, किंबहुना अजिबात नसते आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे चित्रपट गीत हे मुळात, पडद्यावरील पात्राचे अंतर्मुख असे "स्वगत" असते आणि पात्राची मनोभूमिका कधीही गूढ असणे हे जवळपास अशक्य असते. कवी म्हणून गुलजार यांचा विचार करताना, गाण्यात काव्य कसे मिसळावे, याचा सुरेख अनुभव दिला आहे. १९७६ साली आलेल्या "शक" या चित्रपटात असेच दु:खाची अनुभूती देणारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर अतिशय तरल, सुरेख असे गीत लिहिले आहे. एक बाब तर नक्कीच मानावी लागेल, अगदी गालिब सारखा जगद्विख्यात शायर घेतला तरी त्याच्या सगळ्याच रचना असामान्य, अलौकिक अशा नाहीत आणि तशीच सम्यक दृष्टी इतर कवींच्या बाबतीत ठेवावी, असे मला मनापासून वाटते.. गाण्याची शब्दरचना बघितली तर नेहमीच्या पठडीतली रचना नाही, हे सहज उमजून घेता येते. गुलजार यांच्या काही रचना या नेहमीच्या पारंपरिक संकेतांना धुडकावून लिहिलेल्या आढळतात. त्यांच्या दृष्टीने आशय महत्वाचा असून रूढार्थाने त्यासाठी यमकप्रधान रचना लिहिलीच पाहिजे असे बंधन घालून घेतलेले नाही. खरतर काहीशा संवादात्मक पद्धतीने कविता उलगडत गेली आहे. सुरवातीला केवळ पावसाचे वर्णन असावे, अशी कल्पना पहिल्या ओळीवरून होते पण नंतरच्या ओळी वाचत गेलो म्हणजे हळूहळू कविता आत्ममग्नतेकडे झुकल्याचे दिसून येते. सगळी कविता पावसाचेच वर्णन करीत असते पण मध्येच "आज दोनो जहां सुलगने दो" किंवा "कोई रिश्ता कहीं जरूर होगा" या ओळी वाचताना, मानवी नातेसंबंधांची चुणूक मिळते आणि मग सगळीच कविता आपला पोत बदलते. पडद्यावरील पात्राचे आत्ममग्न वावरणे अधिक अंतर्मुख होते आणि मग सगळीच कविता आपल्याला देखील अधिक खोलवर जाणवते.अशी शाब्दिक किमया घडवण्याची ताकद, चित्रपट गीतांमध्ये विरळाच बघायला मिळते.
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, सुरवातीलाच संथपणे गिटारचे सूर ऐकायला मिळतात आणि त्यातूनच गाण्याच्या स्वरिक लयीचे सूचन मिळते. "मेघा बरसने लगा है आज की रात" ही ओळ ऐकता,ऐकताच आपल्याला मेघ रागाची ओळख पटते. वास्तविक, मेघ राग म्हणजे म्हणजे मेघ मल्हार कुटुंबातील राग पण तरीही थोडा फटकून राहणारा!! गाण्याच्या सुरवातीलाच "कोमल निषाद" ज्या "वजनाने" वाजतो, तिथेच या रागाची खूण पटते. आशाबाईंच्या अगदी खालच्या सुरांत गाण्याची सुरवात होते आणि गाण्याचा "मूड" कळून येतो. थोड्या आळवणीच्या स्वरूपात गाणे सुरु होते, काहीसे संवादी स्वरूप म्हणता येईल. याच अनुरोधाने "मेघा बरसने लगा है, आज की रात" ओळ म्हटली आहे. आशाबाईंनी गाताना आवाज अतिशय लवचिक असा लावलेला आहे, त्यात पावसाची आळवणी केली आहे. याच अनुरोधाने या ओळीतील हरकती घेतल्या आहेत. हीच ओळ पुन्हा घेताना, स्वर किंचित वर गेला आहे पण तो ठेहराव किंचित क्षणापुरता असून लगेच मूळ स्वरावलीकडे ज्याप्रकारे आशाबाईंचे "उतरणे" आहे, ते ऐकणे हा अनिर्वचनीय अनुभव आहे आणि इथेच गाण्याची चाल, आपल्या मनाची पकड घेते.
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ, सारंगीच्या सुरांनी भारलेला आहे. "(कोमल) नि, सा, रे, (तीव्र) म, रे" या स्वरसंगतीने सारंगीचे स्वर अधिक खोलवर मनात राहतात. खरतर सगळे गाणे हे एकाच लयीत, संथपणे चालत आहे. कुठेही, उगीच वरच्या स्वरांत जाऊन "गायकी" दाखवणे, असला प्रकार नाही. शक्यतो मंद्र अथवा मध्य सप्तकातच गाण्याची चाल आणि गायन चाललेले आहे.     

पत्ते पत्ते पर बुंदे बरसेंगी
डाली डाली पे झुमेगा सावन
प्यासे होटों को चुमेगी बारीश
आज आँखो में फुलेगा सावन
धुआ धुआ सा हो रहा है जहां
आज दोनों जहां सुलगने दो
मेघा बरसने लगा है आज की

या पहिल्या अंतऱ्याची सुरवात इतक्या वेगळ्या सुरांवर होते की क्षणभर मनात संभ्रम निर्माण होतो, मुखडा कुठल्या चाळीत बांधला आहे आणि अंतरा कुठे सुरु होत आहे!! कविता म्हणून वाचताना पावसाशी चाललेला संवाद वाचत असताना, एकदम "आज दोनो जहां सुलगने दो " सारख्या ओळीतून भावनांचे वेगळे सूचना देणाऱ्या गुलजारच्या शब्दांना त्याच तोलामोलाच्या स्वरावलीने कोंदण देणे क्रमप्राप्तच ठरते. संगीतकार म्हणून वसंत देसाई, काय दर्जाचे होते, याची चुणूक दाखवणारी ही या अंतऱ्याची स्वरिक बांधणी आहे. वर दिलेल्या ओळीवरून पुन्हा जेंव्हा मूळ चालीशी सम गाठली जाते, हा सगळा बौद्धिक व्यामिश्रतेचा असामान्य अनुभव आहे. वसंत देसाई आणि आशा भोसले, यांच्या सांगीतिक ताकदीचा अप्रतिम नमुना म्हणता येईल. तार स्वरांत "धुआ धुआ सा हो रहा है जहां" गायले आहे पण तिथूनच हळूहळू पायऱ्या उतरत शमीची मात्रा गाठली जाते आणि त्यावेळी ती सगळीच चाल आपल्या मनात झिरपायला लागते. कुठलीही चाल मनात झिरपत जाणे, यासारखे दुसरे यश, एका संगीतकाराच्या दृष्टीने नाही.
वरील अंतरा संपवताना चाल पुन्हा तयार स्वरांत जाऊन पोहोचते जी परत संपूर्ण वेगळ्या सुरांत!! लय संगीतकाराच्या अंगी भिनलेली असेल तर तोच संगीतकार, स्वरिक लयीला कशाप्रकारे खेळवू शकतो, याचे हे सुंदर उदाहरण म्हणता येईल. "मेघा बरसने लगा है आज की रात" ही ओळ इथे परत घेताना, व्हायलिनचे स्वर किंचित वरच्या सुरांकडे झुकवून घेतले आहेत आणि मग हीच ओळ त्या सुरांच्या अनुषंगाने वरचे स्वर गाठायला लागते . हा प्रवास अतिशय देखणा आहे!! 
दुसरा अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ, आशाबाईंनी सोडलेल्या सुरांना जुळवूनच आपली करामत दाखवत आहे.जिथे आशाबाईंनी गायन थांबवले आहे तो सूर आणि वाद्यमेळाचा सुर याची बांधणी फार वेधक पद्धतीने केली आहे. लयीचे सूर बदलले आहेत पण म्हणून गाण्याचा स्वतःचा म्हणून जो अंगीभूत स्वभाव असतो त्याच्याशी तादात्म्य पावूनच सूर मिसळले आहेत.

आज चाहे कहीं भी ये पानी
चाहे कितना भी मुझसे दूर होगा
मेरे घर पे बरसती बदली से
कोई रिश्ता कहीं जरूर होगा
मोती मोती बिखर रहा है गगन
पानी पानी है सब पिघलने दो
मेघा बरसने लगा है आज की रात"

दुसरा अंतरा मात्र पहिल्याच्याच अंगाने बांधलेला आहे. तशीच स्वरांची वळणे घेतली आहेत, हरकती देखील त्याच अंगाने घेतलेल्या आहेत. अर्थात त्यामुळे सगळी चाल आपल्या जवळची होते. आता हरकतीच्या अंगाने लिहायचं झाल्यास, या हरकती अतिशय कठीण आहेत, ऐकायला सहज वाटतात, लांबीने देखील फार दीर्घ स्वरूपाच्या नाहीत पण त्यामुळेच ऐकताना फार फसगत होते. एकवेळ दीर्घ लांबीच्या हरकती घेणे तसे सोपे असते परंतु छोट्याशा हरकती घेणे, हे नेहमीच गायकाच्या गळ्याची परीक्षा घेणाऱ्या असतात.
संगीतकार म्हणून वसंत देसायांचे मूल्यमापन वेगवेगख्या स्तरांवर करावे लागेल. वसंत देसायांच्या रचनेत मराठी नाट्यगीतांचा गंध दरवळत असे आणि याचे  कारण,त्यांचा रंगभूमीशी असलेला दीर्घकालीन संबंध असावा.याचा परिणाम असा  झाला,त्यांच्या एकूणच सांगीतिक कारकिर्दीत दोन समांतर रेषा स्पष्टपणे दिसतात.व्ही. शांतारामसारख्या चित्रपटात चाली बांधण्याची एक शैली दिसते  तर बाहेर इतर चित्रपटांचे संगीत देताना वेगळी शैली स्पष्टपणे ओळखता येते. गाण्याची चाल शक्यतो रागाधारित असावी पण गाण्यातून आपल्याला रागाचे स्वरूप दाखवायचे  नसून,गाण्यासाठी रागाच्या चलनाचा यथायोग्य उपयोग करून घ्यायचं आहे, अशीच धारणा त्यांच्या रचनेतून समजून घेता येते. प्रसंगी प्रसिद्ध शास्त्रोक्त चीजेवर आधारित रचना करताना देखील गीतस्वरूप कायम राखण्यासाठी प्रचलित ताल  बदलून,दुसऱ्या वेगळ्याच तालात आणि लयीचे वेगवेगळे बंध स्वीकारून, गाण्याचे गीत बनविल्याचे आढळून येते. तसेच काही ठिकाणी पारंपरिक लोकगीत प्रकाराच्या धर्तीवर त्यांनी गाणी बनवताना, त्या रचनांना केवळ गीतांचे स्वरूप न देता केवळ चालीचं ठेवण्यात, परंपरेत राहून रचनापद्धतीत बदल करण्याचा अवलंब केला आहे. यातून एक बाब अधिक स्पष्टपणे मांडता येते, वसंत देसायांनी भारतीय संगीत परंपरेचा भरपूर व्यासंग केला होता आणि वेळीप्रसंगी त्याचा यथायोग्य उपयोगकरून, आपले सांगीतिक विश्व अधिक भरीव केले. मी वर जसे म्हटले होते, राजकमलसाठी केलेल्या रचनांपेक्षा अधिक वेगळ्या आणि प्रसंगी संपूर्ण वेगळ्या धाटणीच्या रचना सादर करून, आपल्या सर्जनशीलतेला व्यापक रूप दिले होते.  

आता गायिका म्हणून आशाबाईंनी हे गाणे १९७६ साली गायले. तोपर्यंत एक गायिका म्हणून त्यांनी आपला अधिकार चित्रपटसृष्टीत सिद्ध केला होता. तेंव्हा गायिका म्हणून विचार करता, त्यांनी काही गीतप्रकारांच्या सीमारेषा विस्तारल्या. कंठसंगीतातील ध्वनिपरिणामांच्या शब्दावलींत भर टाकून, त्यांनी चित्रपटीय आणि सांगीत शक्यतांची नवी एकत्रीकरण करण्यात असामान्य यश मिळविले. खरतर प्रस्तुत गाण्यात कुठेही नाट्यात्म रंग भरण्याची गरज नव्हती आणि तशी आशाबाईंनी केली देखील नाही पण अशा प्रकारच्या रचना गाताना, गायिका म्हणून त्यांनी हरकतीचा स्वरूप छोट्या स्वराकृतींनी सजवले आणि गाण्यात वेगळाच रंग भरला. ही रचना सुरेलपणे, गुंतागुंतीच्या तरीही संथगती ताना विलक्षण सफाईने घेण्याच्या त्यांच्या क्षमतेचे प्रत्ययकारक उदाहरण म्हणून नक्कीच म्हणता येईल. उलट्या शब्दात सांगायचे झाल्यास, हीच रचना दुसऱ्या कुणी गायली असती तर याच हरकती घेताना हरकतींत घुसमटल्यासारखी रचना वाटली असती, हे नि:संशयपणे मान्यच करावे लागेल. एखाद्या रचनेवर अशा प्रकारे आपली मुद्रा निर्माण करून ठेवावी, हे सर्जनशीलतेचे अप्रतिम उदाहरण म्हणावेच लागेल.





रुठ के तुम तो चल दिये

"वर्षेंतिल संध्येपरि, आले मी आवरीत,
रक्ताचा जाळ लाल, दु:खाची गडद लाट;
वर्षेंतिल रात्रीपरी आलें मी सावरीत,
नयनांतील अश्रू निळे, हृदयातील वीज-रक्त;
धगधगते जीवन हे, धरून कसे ओंजळीत
आलें मी कुठून कशी... आलें मी हेंच फक्त."

कवियत्री इंदिरा संत यांच्या "शेला" या काव्यसंग्रहातील या ओळी. मानवी आयुष्यातील एका अटळ, आदिम भावभावनांचे नेमके वर्णन करणाऱ्या ओळी. मला वाटतें, बहुतेकांच्या आयुष्यात अशा ओळींची सांगड घातलेली सापडेल. आजचे प्रस्तुत गीत देखील याच भावनांशी साद्ध्यर्म्य दर्शविणाऱ्या आहेत. आपल्या आयुष्यात दु:ख तर अटळ आहेच पण चिरंजीव देखील आहे, याचीच जाणीव सदैव करून देणाऱ्या अशा ओळी आपल्या आयुष्याचा भाग कधी होतात, याचाच पत्ता लागत नाही.

केवळ हिंदी गाणीच नव्हे तर इतर गाण्यांच्या बाबतीत बरेचवेळा नवल वाटते, गाण्याला आवश्यक असे सगळे घटक अस्तित्वात असतात, तरीही गाणे विस्मृतीत जाते. बहुदा असे होत असावे, चित्रपटच टुकार निघाला आणि परिणामस्वरूप गाणे देखील मागे पडत गेले आणि अखेर विस्मृतीत गेले. याचा परिणाम असा होतो, गाण्याचा दर्जा अप्रतिम असून देखील लोकमान्यतेची मोहोर उमटत नाही. लताबाईंची अशी काही गाणी सापडतात, जी खरोखरच असामान्य आहेत पण लोकप्रियता लाभली नसल्याने धुळीत जाऊन पडतात. खाजगी गाण्यांच्या बाबतीत, मुळातच "बजेट" तुटपुंजे असते, त्यामुळे गाणी कितीही सुंदर असली तरी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि बहुतेक गाणी अशीच विस्मरणात जातात. त्यामुळे अनेक गुणवंत संगीतकार तसेच त्यांच्या रचना, उपेक्षेच्या खाईत लुप्त झाल्याचे ध्यानात येते. अर्थात, अशी उपेक्षा अनेक लोकोत्तर संगीतकारांच्या वाट्याला देखील येते. अशाच वेळी "तकदीर" आणि "तदबीर" या शब्दांवर विश्वास ठेवणे भाग पडते. गाणे नुसतेच चांगले असून भागात नसून, ते लोकांपर्यंत सशक्तपणे पोहोचणे देखील तितकेच अत्यावश्यक असते. पूर्वीच्या काळात, प्रसिद्धी माध्यमांची सद्दी खूपच मर्यादित होती (आजच्या काळाच्या संदर्भात तर फारच तोकडी होती!!) त्यामुळे विस्मरणात गेलेल्या असामान्य रचनांची परत आठवण करणे, मला गरजेचे वाटते.
खरतर चित्रपटातले गाणे हे जरी चित्रपटाच्या कथेला अनुरोधून असणे, गरजेचे असले तरी देखील, त्याचे "स्वतंत्र" अस्तित्व देखील आवश्यक असते. ललित संगीत ही स्वतंत्र निर्मिती असते आणि त्यात सर्जनशीलता जरूर अनुस्यूत असते. "रुठ के तुम तो चल दिये" या गाण्याच्या बाबतीत वरील विवेचन अतिशय चपखल बसते. चित्रपट "जलती निशानी", काळाच्या ओघात कधीच विस्मृतीत गेला आणि त्या ओघाने हे गाणे देखील उपेक्षित राहिले. वास्तविक अनिल बिस्वास यांच्या सारखा व्यासंगी संगीतकाराची "तर्ज" आहे, लताबाईंनी गायले आहे, प्रत्ययकारी शब्दकळा आहे तरीदेखील या गाण्याला लोकप्रियता कधीही लाभली नाही, हे जळजळीत सत्य मागे उरतेच. 
आता या गाण्याचा मुखडा किती विलक्षण आहे. लताबाईंनी गाण्याची सुरवातच किंचित वरच्या सुरांत केलेली आहे. बहुतेक रचनांत, शब्द येण्याच्या आधी, किंचितकाळ वाद्यमेळाचे सूर वाजतात, जेणेकरून, रचनेची पार्श्वभूमी तयार होते आणि गायक/गायिकेला रचनेचा अंदाज येतो. इथे तसे काहीही घडत नाही. कानावर पडतो, तो लताबाईंचा अविस्मरणीय वरच्या सप्तकातील सूर. हे फार कठीण आहे. गायिका म्हणून लताबाई इतरांपेक्षा किती "वेगळ्या" ठरतात, हेच या पहिल्या आलापीतून सिद्ध होते. 
गाण्याची पार्श्वभूमी, बहुतेक चित्रपटात असलेली सरधोपट विरही भावनेची आहे. खरतर असे म्हणणे योग्य ठरेल, चित्रपटातील असले बेचव प्रसंग, संगीतकारांनी, आपल्या स्वररचनेने प्रचंड श्रीमंत केले आहेत. प्रस्तुत गाण्याबाबत हे विवेचन अगदी चपखल बसेल. आज, "जलती निशानी" नावाचा चित्रपट किती लोकांच्या खिजगणतीत असेल, शंका आहे पण अशाच चित्रपटात अशा प्रकारचे असामान्य गाणे असावे, हे त्या गाण्याचे दुर्दैव म्हणावे की आणखी काही म्हणावे!!
गाण्याची सुरवातच वरच्या सुरांत झालेली आहे. एकदम वरचा सूर घेऊन, गाण्याचा मुखडा सिद्ध करायचा ही सहज जमण्यासारखी बाब नव्हे. खरतर जरा बारकाईने ऐकले तर सगळी रचनाच बहुतांशी तयार सप्तकांत फिरत आहे परंतु, अर्थात, मध्येच काही ठिकाणी मंद्र सप्तकांत गाण्याची चाल येते. अर्थात आपल्या आस्वादात आपण या मुद्द्यांचा स्वतंत्र विचार करूया. जिथे मुखड्याची सुरवातच इतक्या अवघड सुरांतून झालेली असताना, पुढे रचनेचा परीघ कसा विस्तारत जाईल, याबाबत ठाम विचार करणे, जराही कठीण जात नाही. थोड्या विचारपूर्वक या गाण्याच्या चालीकडे बघितले तर असे आढळेल, अनिल बिस्वास यांच्या बहुतेक रचना या मंद्र सप्तकांत किंवा मध्य सप्तकांत चालत असतात. या गाण्यासारखी अपवादभूत रचनाच अशी आढळते, जिथे तार सप्तकांतील सुरांचा आढळ अधिक प्रमाणात आहे. "रुठ के तुम तो चल दिये, अब मैं दुआ तो क्या करूं" या दोन ओळी गाताना, पहिली ओळ वरच्या सुरांत घेतल्यावर, पुढील ओळीतील, "दुआ" शब्द गाताना, लताबाईंनी किंचित छोटीशी हरकत घेतली आहे आणि त्यातूनच दोन्ही ओळींतील "दुआ" या शब्दाचे महत्व अधोरेखित केले आहे. व्यासंगी संगीतकार हा नेहमीच हाताशी असलेल्या कवितेमधील महत्वाच्या शब्दांचे महत्व जाणून घेऊन, त्या शब्दांना सुरांत मांडताना, त्याचा आशय किती खोलवर व्यक्त करता  येईल,याची जाणीव करून देत असतो. याच ओळी परत गाताना मात्र, परत तेच सूर घेण्याची गरज संगीतकाराला भासत नाही आणि याच मुख्य कारण म्हणजे, ललित संगीताच्या स्वररचनेत तुम्हाला त्याच स्वरावली परत परत घेण्याला फारसा अवसर नसतो आणि एकदा एखादी जागा घेतली की मग परत त्याचा शब्दावर येताना, तेच शब्द वेगळ्या सुरांतून अभिव्यक्त करून, वेगळाच आशय व्यक्त करायचा!! अनिल बिस्वास यांच्या बहुतेक सगळ्या यशस्वी संगीतरचेनेबाबत असे विधान करता येईल.
ज्याला आपण खऱ्याअर्थाने "शब्दप्रधान गायकी" असे सार्थपणे म्हणता येईल, तशी गायकी आपल्याला अनिल बिस्वास यांच्या रचनांमधून सातत्याने ऐकायला मिळते. कुठेही शब्दांची ओढाताण नाही, किंबहुना असे देखील म्हणता येईल, अनिल बिस्वास यांच्या रचना ऐकताना, कवितेचा दर्जा देखील तितकाच महत्वाचा आणि सखोल असतो जेणेकरून संगीतकार गाण्याची चाल बांधायला प्रवृत्त होतो. "जिसने हमे जुदा किया, ऐसे खुदा को क्या करूं." या ओळी गाताना देखील, आधीच्याच सांगीतिक आकृतीची पुनरावृत्ती केलेली आहे, म्हणजे सुरवात वरच्या सुरांतून केली आहे आणि शेवट करताना खालचे सूर घेतले आहेत. मुखड्याची चाल रसिकांच्या मनावर बिंबवण्यासाठी चालीची पुनरावृत्ती आवश्यक असते अर्थात हा काही नियम नव्हे. काही रचनांमधून प्रत्येक अंतऱ्यासाठी वेगवेगळी चाल बांधून, आपल्या बौद्धिक कुशाग्रतेची ओळख करून दिली जाते. अर्थात, हा प्रत्येक रचनाकाराचा दृष्टिकोन असतो.
अनिल बिस्वास यांच्या सांगीतिक विचारांबाबत मागोवा घेतल्यास, काही बाबी स्पष्ट होतात. चाल जरी वरच्या सुरांत जाण्याची शक्यता जरी जाणवली तरी तिथेच चालीला रोधून धरायचे आणि शक्यतो मंद्र किंवा मध्य सप्तकात रचना ठेवायची. इथे गाण्याची सुरवात जरी वरच्या सुरांत झालेली असली तरी पहिला अंतरा सुरु होण्याआधीच्या वाद्यमेळात वरील विषयाचे प्रतिबिंब आढळते. मात्रांची लय तशीच कायम ठेऊन, विशेषत: व्हायोलिन वाद्यावरील सूर, मुखड्याच्या स्वरांशी जुळवून घेतले आहेत, जेणेकरून रसिकाचे मन गाण्यावर स्थिर राहील. आणखी एक गंमत ऐकायला मिळते. व्हायोलिनचे सूर वाजत असताना त्यातच बासरीचे सूर मिसळलेले आहेत पण त्याचे अस्तित्व हे पहिला अंतरा सुरु होण्याच्या आधी काही क्षण जाणवते. इथे "जाणवते" हा शब्द मी मुद्दामून वापरला आहे कारण, ललित संगीतात केवळ वाद्यांचे स्वतंत्र अस्तित्व दाखवायला फारसा वाव नसतो तसेच त्याची तशी गरज देखील नसते. याचे मुख्य कारण, रचनेचा बहुतांशी भाग हा चालीचे स्वर, शब्द  आणि गायन यांनीच व्यापलेला असतो.

"जीने की आरझू नहीं, हाल ना पूछ चारागर;
दर्द ही बन गया दवा, अब मैं दवा  तो क्या करूं".

शायर कमर जलालाबादी हे चित्रपटांसाठी म्हणून लिहिणारे असे फारसे प्रसिद्ध शायर नव्हते. जवळपास ३० वर्षे चित्रपट क्षेत्राशी संबंधित राहून, जवळपास तितकेच चित्रपट, गीतांसाठी लिहिणे, हे काही असामान्य योगदान नव्हे (इथे सांख्यिकी दृष्टिकोनातून लिहीत आहे) परंतु आपल्या पिंडाला शोभतील अशाच चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. काव्यात प्रामुख्याने उर्दू भाषेचा वापर परंतु भाषिक फुलोरा टाळून, थेट मांडण्याची प्रवृत्ती अधिक आढळते. या गाण्याच्या संदर्भात विचार केला असता, मुखडा आणि पहिला व दुसरा अंतरा विचारात घेतला तर उर्दू शब्द वाचायला मिळतात परंतु सहज कुणालाही समजतील, अर्थाला प्राप्य होतील, अशाच शब्दकळेकडे ओढा अधिक दिसून येतो. खरतर अशी प्रवृत्ती चित्रपट गीतांसाठी योग्य  पण,एकूण कारकीर्द लक्षात घेता मिळालेले चित्रपट संख्येने फारच कमी आढळतात.
आता या पहिल्या अंतऱ्याच्या बाबतीत लिहायचे झाल्यास, स्वररचनेची मांडणी आणि बांधणी मुखड्याशी जुळणारी आहे. वास्तविक अनिल बिस्वास यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतलेले आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, बोन्गो सारखी काही पाश्चात्य तालवाद्ये वगळता, भारतीय संगीत परंपरेतील सगळी तालवाद्ये त्यांनी वाजवली आहेत आणि त्यावर त्यांचे प्रभुत्व होते. संगीतावर इतका अधिकार असून देखील, अंतऱ्याची स्वररचना  करताना,मुखड्याच्या स्वररचनेभोवतीच अंतऱ्याची बांधणी करायची, असे एकूण सूत्र दिसते. वेगळ्या बांधणीने अंतरा बांधण्यात निश्चित सर्जनशीलता दिसते.  
अर्थात वेगळ्या बाजूने बोलायचे झाल्यास, मुखड्याची चाल सतत डोळ्यासमोर ठेवल्याने, चालीचा आकृतिबंध रसिकाच्या मनात ठसतो. गाण्याची चाल जर का शब्दभोगी असेल तर उगीच आहे तो आकृतिबंध बाजूला सारून, नव्याने स्वररचना करण्यात काय हशील आहे? हा प्रश्न देखील सहज बाजूला सारण्यासारखा नाही. एका दृष्टीने विचार केला तर गाण्याची चाल ही मुखड्यावर आधारित असते आणि सुयोग्य मुखडा बांधणे, हे खरे सर्जनशीलतेची लक्षण असते, असे सगळेच रचनाकार मानतात तेंव्हा मुखड्याला अनुलक्षून पुढील स्वररचना करण्यात काहीही कमीपणा नाही, असेच म्हणायला प्रत्यवाय नसावा. "

"सुनके मेरी सदा-ए- गम, रो दिया आसमान भी,
तुम तक ना जो पहूंच सके, ऐसी सदा को क्या करूं"

एक कविता म्हणून विचार करायला गेल्यास, "रो दिया आसमान भी" ही ओळ काहीशी  सपक वाटते, खटकते देखील!! विशेषतः "सुनके मेरी सदा-ए-गम" सारख्या भरजरी शब्दांसमोर!!  परंतु चालीचा गोडवा आणि लताबाईंची अप्रतिम गायकी, मनावर जे गारुड टाकते, त्यापुढे फारसे जाणवत नाही. लताबाईंनी मात्र गाताना, शब्दातीत व्यक्त केल्या आहेत. गाताना, प्रत्येक शब्दाचे स्वरोच्चारण कसे करावे, याचा आदिनमुना सादर केला आहे. गायनात अनेक छोट्या, छोट्या हरकती आहेत त्यादेखील ऐकताना त्याचा खास अभ्यास  करावा,इतक्या ताकदीच्या आहेत. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, कुठलीही हरकत  घेताना,शब्दांना किती प्रकाराने खेळवता  येते,तसेच शब्दांत दडलेला आशय कशाप्रकारे खुलवता येतो, याबाबत एक मानदंड निर्माण केला आहे. इथे देखील  गाताना,"सदा-ए-गम" वरील अलगद घेतलेली  नाजूक आणि हळुवार हरकत, माझ्या वरील विधानाला पुरावा म्हणून मांडता येईल. चित्रपट गीतांसारखे आविष्करण अशा सारख्या अलंकारांनीच गर्भश्रीमंत झालेले आहे आणि थोड्या तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, सप्तकातील श्रुतींचा प्रत्यय अशाच गायनातून घेता येतो. ही गायकी फार समृद्ध आहे.