Saturday 25 July 2015

अवर्णनीय देस



भारतीय रागसंगीतात असे बरेच राग सापडतात, जे "ख्याल" म्हणून अधिक प्रचलित न होता, उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात बरेच लोकप्रिय असतात. पूर्वी आपण, असे काही राग बघितले आहेत, जसे पिलू या रागाचे असेच नाव अग्रभागी येते. याचे मुख्य कारण, बहुदा या रागाचा उगम लोकसंगीतातून झाला असावा. याबाबत असे देखील विधान करता येईल, "ख्याल" म्हणून या रागात "भरणा" करणे जरा अधिक अवघड होत असणार. तसे बघितले तर, शास्त्रीय वादकांत, हे राग बरेच प्रसिद्ध आहेत आणि वादनातून, अशा रागांच्या भरपूर रचना आणि त्या देखील विविध भावनांशी संलग्न अशा, रचना ऐकायला मिळतात. असे असले तरी देखील, ज्या हिशेबात सुगम संगीतात आणि उपशास्त्रीय संगीतात, अशा रागांचे जे दर्शन घडते, ते केवळ अपूर्व असते.
देस रागाबाबत असेच काहीसे म्हणता येईल. थोडे खोलात शिरलो तर, देस रागाच्या अनेक छटा, भारतातील विविध राज्यांच्या लोकसंगीतातून आढळतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, देस रागाच्या, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब इथल्या लोकसंगीतात या रागाच्या प्रसंगानुरूप छटा ऐकायला मिळतात. अर्थात, प्रसिद्ध गायक कुमार गंधर्वांनी याबाबत भरपूर संशोधन करून, चक्क नवीन रागांची निर्मिती केली आहे. 
देस रागाबाबत म्हणायचे झाल्यास, या रागावर लोकसंगीताचा बराच पगडा दिसतो तरीही, शास्त्रीय संगीताच्या कलाकारांनी त्याला "संपूर्ण" रागाचे स्वरूप देण्यात यश मिळवले आहे. आरोही सप्तकात "गंधार" आणि "धैवत" स्वर वर्जित तर अवरोही सप्तकात सगळे स्वर उपयोगात आणले जातात, म्हणजे औडव-संपूर्ण जातीचा हा राग आहे. स्वरावलीत, दोन्ही निषाद आणि त्यातल्या त्यात कोमल निषाद स्वराला या रागात अतिशय महत्व आहे. दोन्ही निषाद सांभाळून, या रागाची बढत करायची, यातच या रागाचे खरे कौशल्य आहे. या रागाची "मींड" बघायला गेलो तर मात्र, रिषभ स्वर आणि त्याच्या जोडीने मध्यम आणि गंधार स्वर घेऊन, जे स्वरमाला तयार होते, ती अपूर्व अशी असते.

आता आपण, उस्ताद अमजद अली खानसाहेबांनी वाजवलेला राग देस ऐकू. उस्ताद अली अकबर खान साहेबांनी सरोदवर प्रस्थापित केलेले "गायकी" अंग आणखी वेगळ्या पायरीवर नेण्याचे काम, उस्ताद अमजद अली खान, यांनी फार समर्थपणे केले आहे. विशेषत: वाजत्या तारेवर, बोटातील नखीच्या  सहाय्याने, मींड काढण्याची करामत तर विशेष ऐकण्यासारखी असते. तसेच तान घेताना, एखादा स्वर लांबवत, त्यातून "गमक" या अलंकाराचे यथार्थ दर्शन, त्यांच्या वादनातून आपल्याला ऐकायला मिळते. 


इथल्या या वादनात, आलापीपासून सुरवात करीत, हळूहळू रागाची "बढत" घेत, राग सर्वांगाने खुलवला आहे. गत वाजवताना, एखादी जीवघेणी हरकत घेऊन, ऐकणाऱ्याला चकित करण्याची खासियत तर खासच आहे. 

वास्तविक, मेहदी हसन हे नाव गझल गायकीतील अत्यंत आदराने घ्यायचे नाव, परंतु त्यांनी देस रागात गायलेली ठुमरी देखील अप्रतिम आहे. या ठुमरी गायनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, खान साहेबांनी "गझल" गाताना ज्याप्रकारे "गायकी" पेश करतात, त्यापेक्षा इथे संपूर्ण वेगळा आविष्कार, त्यांच्या गायकीत दिसतो आणि मजेचा भाग म्हणजे, ठुमरी गायनाची सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. हे तर खरेच आहे, गझल गायकी आणि ठुमरी गायकी, यांचा गायकी "अंदाज" हा वेगळा असतो आणि तसा तो आविष्कृत होणे गरजेचे असते. 


शब्दार्थाने ही ठुमरी वाचल्यास, या ठुमरीमध्ये ढग, पाउस, याचेच वर्णन आहे पण तरीही, देस रागात "तर्ज" बांधली आहे. अर्थात, रचनेत, पुढे "बदरा" हा शब्द येतो, तिथे उस्तादांनी काही क्षणात "मल्हार" रागाची झलक दाखवली आहे!! हा भाग खरच असामान्य वकुबाचा आहे. रचनेत, निषाद स्वरावर केलेली "आंदोलीत" कामगत तर थक्क करणारी आहे. अर्थात, इथे परत मध्यम स्वरातून, गंधार स्वराचा आधार घेऊन, निषाद स्वरावरील ठेहराव जो, मिंडेद्वारे घेतला आहे, ते देखील खास अनुभवण्यासारखे आहे. 

आशा भोसल्यांनी हिंदीत गायलेल्या अजरामर गाण्यांच्यात या गाण्याचा समावेश नक्की करता येईल. "बेकसी हद पे" हेच ते अप्रतिम गाणे. आवाजाचा विस्तृत पल्ला, तारता मर्यादा सहज,वेगाने आणि अगदी गीताच्या प्रारंभी देखील घेणे, यात कुणाही गायिकेला बरोबरी करणे अशक्य!! या गाण्यात देखील याच विशेषाचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. अर्थात, केवळ स्वरांच्या फेकीचा पल्ला, हेच भूषण नसून, प्रसंगी वाद्यांचा स्वनगुण तंतोतंतपणे गळ्यातून काढून, चकित करण्याचे अलौकिक सामर्थ्य या गळ्यात आहे. 


या गाण्याच्या दुसऱ्या ओळीत, ज्या प्रकाराने लय आणि स्वरांची उंची, आशाबाईंनी गाठली आहे, ती खास ऐकण्यासारखी आहे. देस रागाचे ओळख म्हणून हे गाणे घेता येईल पण तरीही, गाण्यात अनेक ठिकाणी, इतर रागांचे स्वर देखील आढळतात!! खरतर, सुगम संगीतात ज्या सर्जनशीलतेच्या शक्यता असतात, त्या सगळ्या शक्यता, आशा भोसल्यांच्या गळ्यातून शक्य होतात.आवाजावरील नियंत्रण आणि ध्वनीवैशिष्ट्ये याचा अचूक वापर,यामुळे ऐकणाऱ्याला एक समृद्ध गायन ऐकल्याचा आनंद मिळतो.या आवाजाचे थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, कंठ्संगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलीत भर टाकून, सांगीत शक्यतांची नवी परिमाणे सादर केली. जागतिकीकरण झालेल्या संगीतात सुखाने वावरणाऱ्या एका मोकळ्या, गात्या आवाजाचा त्यांनी आदिनमुना पेश केला आहे. 

वसंत देसाई, हे बहुदा एकमेव संगीतकार असावेत, ज्यांनी हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमी इथे लीलया वावर केला आणि तसे करताना, त्या ठिकाणी, स्वत:ची स्वतंत्र मुद्रा उमटवली. शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास, चाल निर्माण करताना त्यात पुरेशी लवचिकता ठेवणे, जेणेकरून गाताना विस्तारशक्यता सहज निर्माण करता येणे शक्य. गायकी ढंगाच्या चाली करण्यात वाकबगार परंतु त्याचबरोबर, आपण कुठल्या माध्यमासाठी संगीत रचना करीत आहोत, याचे नेमके भान राखून, चाली निर्माण करण्याचा असामान्य ताकदीचा वकूब. मराठी रंगभूमीवर, संगीतकार म्हणून त्यांचा वावर प्रामुख्याने "ललित कलादर्श" या संस्थेपुरता अधिक करून होता. वसंतरावांनी तयार केलेली अशीच एक मनोरम रचना इथे ऐकुया. "देह देवाचे मंदिर" ही, उदयराज गोडबोले यांनी गायलेली रचना, देस रागाशी नाते सांगणारी आहे.  


उदयराज गोडबोले यांचा थोडा "खडा" आवाज म्हणजे तार सप्तकात अधिक रमणारा आणि हे ध्यानात ठेऊन, वसंतरावांनी या गाण्याचे "तर्ज" बांधली आहे. "प्रीतीसंगम" नाटकातील हे गाणे, देस रागाची ओळख करून देते. पहिल्या सुरांपासून तार स्वरांत गाणे सुरु होते. गाण्याची चाल मात्र, ज्याला "उडती छक्कड" म्हणता येईल अशा धर्तीची आहे आणि त्याला ढोलकीची साथ देखील अतिशय सुरेख आहे. अर्थात, पारंपारिक नाट्यगीताचा बाज नसून, थोडा भावगीताचा बाज वापरलेला आहे. 

आता आपण, सरदारी बेगम चित्रपटातील ठुमरी सदृश, चित्रपट गीत ऐकुया. "सांवरिया देख जरा इस ओर" हेच ते गाणे आहे. आरती अंकलीकर आणि शुभा जोशी यांनी एकत्रितपणे ही रचना गायलेली आहे. देस रागाशी या रचनेचे खूप जवळचे नाते सांगता येते. वनराज भाटीया, या संगीतकाराने ही रचना बांधली आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा संगीतकार परंतु व्यावसायिकदृष्ट्या काहीसा मागे पडलेला. 


वास्तविक या दोघी शास्त्रीय संगीतातील गायिका पण तरीही ठुमरीसदृश रचना असूनही सादरीकरण अतिशय सुंदर झाले आहे. गाण्याच्या पहिल्या सुरापासून देस रागाची आठवण येते. एखाद्या उपशास्त्रीय रचनेचे, चित्रपट गीतात रुपांतर करताना, बरेचवेळा अनावश्यक काटछाट केली जाते आणि मूळ सौंदर्याला बाधा आणली जाते. तासाला कुठलाच प्रकार इथे नाही. अत्यंत सुंदर लयीत गाणे पुढे सरकत जाते आणि गाताना, हरकती, अर्धताना वगैरे अलंकार सहज येतात. यात, सहज येतात, हे फार महत्वाचे!!  

आता आपण अशीच काही गाणी बघू, ज्यायोगे देस राग आपल्या आठवणीत कायमचा राहील. 

गोरी तोरे नैन कजर बिना कारे 

आपको प्यार छुपाने की बुरी आदत है 

Monday 20 July 2015

अंतर्मुख शिवरंजनी



क्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, फिकट राखाडी रंग दिसावा आणि मनात कुठल्यातरी आर्त, हळव्या आठवणींच्या सुट्या आठवणी याव्यात, त्याप्रमाणे शिवरंजनी रागाचे स्वरूप मला वाटते. खरतर याचा पाच स्वरांचा कारभार. भूप रागातील शुध्द गंधार, कोमल केला की लगेच शिवरंजनी राग मिळतो. गमतीचा भाग म्हणजे याही रागात, "मध्यम" आणि "निषाद" स्वर वर्ज्य आहेत, म्हणजे रागाचे स्वरूप "औडव-औडव" असे आहे. 
गमतीचा भाग म्हणजे हा राग मैफिलीत फारसा गायला जात नाही परंतु अनेक वादकांनी मात्र या रागाची अनंत रूपे दर्शवलेली आहेत, पण हे तर रागदारी संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. थोडे तांत्रिक भागात शिरायचे झाल्यास, या रागातील, "रिषभ","गंधार", "धैवत" हे स्वर द्विश्रुतिक आहेत आणि या चलनातुनच या रागाची खरी ओळख होते. वास्तविक, "श्रुती" विषय फार किचकट आणि थोडा दुर्बोध आहे परंतु भारतीय संगीतात त्यांचे महत्व अपरिमित आहे. 
आपल्याला बरेचवेळा असे आढळते, अनेक रागांतील स्वर सारखेच आहेत पण तरीही ते राग, स्वत:ची ओळख स्वतंत्रपणे राखून असतात आणि हे असे घडते, यामागे, स्वरांतर्गत असणारी श्रुतीव्यवस्था कारणीभूत असते.  
पूर्वीच्या ग्रंथात या रागाचे वर्णन करताना, "शिवरंजनी" या शब्दाची फोड केलेली आढळते. "शिव" + "रंजनी" - वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, रुद्र शिवाला प्रसन्न करणारा राग म्हणजे "शिवरंजनी" असे केले आहे. एका दृष्टीने हे वर्णन चपखल बसणारे आहे परंतु कुठलाही राग, असा एकाच साच्यात बसवणे, अवघड व्हावे, अशा रचना ऐकायला मिळतात आणि आपले रागसंगीत किती श्रीमंत आहे, याची प्रचीती देतात.
कवी अनिलांची एक अतिशय सुंदर कविता आहे. मुक्तछंदात आहे. 
"सारेच दीप कसे मंदावले आता 
ज्योती विझू विझू झाल्या 
की झड घालून प्राण द्यावा पतंगाने 
असें कुठेच तेज नाही!! 
थिजले कसें आवाज सारे? 
खडबडून करील पडसाद जागे 
अशी कुणाची साद नाही?" 
खरेतर या ओळी, या रागाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगता येईल.
या रागात तसे बघितले तर वादकांचे प्राबल्य अधिक दिसते आणि सुगम संगीतात तर हा राग प्रचंड प्रमाणात पसरलेला आहे. 
 आता इथे आपण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बांसुरी ऐकू. मुळात या रागाची गंभीर बैठक, स्वभाव अत्यंत "ठाय" लयीतला, यामुळे, या रागातील पंडितजींचे वादन खुलले नाही तर नवल!! 


ही रचना थोडी काळजीपूर्वक ऐकली तर सहज समजून घेता येईल, पंडितजींनी इथे "कोमल गंधार" च्या जोडीने "शुद्ध गंधार" देखील वापरलेला आहे पण, त्याचा वापर इतका अल्प आणि बेमालूमपणे लयीत मिसळलेला आहे की, प्रथमत: या प्रयोगाची नेमकी जाणीव होत देखील नाही आणि हे या कलाकाराचे वैशिष्ट्य. 
बाबूजी उर्फ सुधीर फडके म्हणजे मराठी संगीतातील सन्मान्यजनक नाव. स्पष्ट तरीही अत्यंत भावपूर्ण उच्चार, कवितेतील आशय नेमका जाणून घेऊन, आशयाची अभिवृद्धी सुरांच्या माध्यमातून तितक्याच समर्थपणे मांडणारे रचनाकार, म्हणून अपरिमित ख्याती मिळवणारे. खरतर चित्रपट गीतांत भावपूर्ण चालींना जन्म देऊन, त्यांनी आपले नाव अजरामर केले आहे. इथे आपण, अशाच एका अप्रतिम गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. "जगाच्या पाठीवर" या नितांतसुंदर चित्रपटातील - "एक धागा सुखाचा" हे गाणे, शिवरंजनी रागाची आठवण करून देते.  


माडगूळकरांच्या चित्रदर्शी शैलीचा, स्वरांच्या माध्यमातून, इथे जो काही आविष्कार केला आहे, त्यातून, "अंतर्मुख" भावावस्था नेमकेपणी जाणून घेता येते. 
"या वस्त्राचे विणतो कोण? एक सारखी नसती दोन; 
कुणा न दिसले त्रिखंडात या, हात विणकऱ्याचे." 
अशी प्रश्नार्थक सुरवात करून, तरीही असामान्य गेयतापूर्ण आणि प्रासादिक रचना करणारे माडगुळकर आणि त्याला चिरंजीवित्व देणारे बाबूजी!! 

हिंदी चित्रपट संगीतात, गूढ गाण्यांना तशी भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. अगदी "महल" या चित्रपटापासून सुरु झालेली अशा प्रकारची गाणी, रसिकांच्या मनात ठाण मांडून बसलेली आहेत. याच परंपरेतील एक गाणे इथे ऐकुया. "कही दीप जले कही दिल" हे लताबाईंच्या आवाजात प्रसिद्ध पावलेले गाणे, शिवरंजनी रागाची ओळख करून देतात. खरतर गाण्याची सुरवात वेगळ्या सुरांतून होते, गूढ वातावरण तयार होते परंतु गाण्याचा सुरवातीचा दीर्घ आलाप आणि शाब्दिक चाल यात सत्कृतदर्शनी फरक वाटला नसला नसला तरी तो फरक आहे आणि या शब्दांच्या सुरावटीत हा राग लपलेला आहे. 
अर्थात, अखेर हे चित्रपटातील गाणे आहे आणि इथे गाण्याची पार्श्वभूमी महत्वाची. या दृष्टीकोनातून, पुढील आलाप आणि चाल, इथे हा राग आढळत नाही. संगीतकार हेमंतकुमार यांची खुबी अशी की कालस्तरावरील लय तशीच कायम ठेऊन, स्वरिक लय किंचित बदलेली आहे आणि गाण्याचा परिणाम साधलेला आहे. 
गाणे केरवा तालात आहे पण, मात्रांचे वजन इतके वेगळ्या प्रमाणात ठेवलेले आहे की प्रथमत: हा केरवा ताल वाटतच नाही. खरतर गाण्यात रूढार्थाने ताल वाद्य नाही. बेस गिटारचा वापर केलेला आहे आणि याचा परिणाम गाण्यातील गूढत्व वाढण्याकडे होतो आणि हेच या गाण्याचे खरे यश. 


संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडगोळीने बरीच अप्रतिम गाणी आहेत. अगदी मोजके सांगायचे झाल्यास, या जोडीने जी गाणी दिली आहेत, त्या गाण्याचा "मुखडा" नेहमी ऐकण्यासारखा असतो. किंबहुना, संगीतक्षेत्रात एक पक्का समज आहे, गाण्याचा मुखडा सुंदर बनविणे, म्हणजे गाण्याचे खरे यश असते आणि हे जर खरे मानले तर या जोडीची गाणी यशस्वी मानता येतील. प्रस्तुत गाणे असेच अत्यंत श्रवणीय गाणे आहे आणि गाण्यचा "मुखडा" तर खास आहे. 

"बहुत दिन बीते" हेच ते गाणे आहे. गाण्याच्या सुरवातीला व्हायोलीनचा अत्यंत "ठाय" लयीत तुकडा आहे आणि हे व्हायोलिनचे सूर(च) शिवरंजनी राग दर्शवतात. या गाण्याची "गायकी" हा तर खास अभ्यासाचा विषय ठरावा. शब्दोच्चार कसे असावेत आणि ते करताना, सुरावटीतून, त्याच शब्दांचा अर्थ अधिक खोलवर दाखवून द्यावा, ही खासियत असते आणि प्रत्येकाला ती जमत नाही. अतिशय धीमा केरवा ताल आहे पण, खरी गंमत आहे ती, गाण्यातील असंख्य हरकती आणि तानांची. प्रसंगी रागाला बाजूला सारून, त्याच लयीत वेगळे सूर वापरणे, हा व्यामिश्र सांगीतिक प्रकार आहे. लताबाईंच्या आवाजातील "तारता" पल्ला किती विस्तृत आहे, या गाणे ऐकताना समजून घेता येते.  

वास्तविक किशोर कुमारने संगीताचे कधी पद्धतशीर शिक्षण घेतलेले नव्हते पण तरीही भारतीय संगीतातील हा एक अद्भुत चमत्कार मानला जातो. या गायकाच्या गळ्याची "रेंज" केवळ अतुलनीय अशीच होती. अतिशय मोकळा आवाज, अत्यंत सुरेल तसेच लवचिक आवाज, ही त्याची काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील. अर्थात, या बाबींचा चुकीचा संदेश आपल्याकडे पसरला. किशोर कुमारने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नाही म्हणून आपल्याला देखील त्याची गरज नाही, असला अत्यंत खुळचट समज पसरला!! याच मोकळ्या आवाजाचा, संगीतकार राहुल देव बर्मनने, या गाण्यात अतिशय सुरेख वापर करून घेतलेला आहे. रूढार्थाने, हे गाणे रागदारी संगीतावार आधारित आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही परंतु गाण्याची रचना, त्यातील हरकती, आलाप इत्यादी अलंकार इतक्या खुबीने वापरले आहेत की आपण, मनोमन संगीतकाराला दाद देतो. 


"मेरे नैना सावन भादो" हे ते गाणे आहे. खरेतर. हे गाणे शिवरंजनी रागावर आधारित आहे का? असा माझ्या देखील मनात संशय आहे कारण, सुरवातीचे स्वर आणि नंतरची चाल, याचा सत्कृतदर्शनी काहीही नाते लावता येत नाही पण, अखेर संगीतकार राहुल देव बर्मनची हीच तर खासियत आहे. आणखी एक गंमत. गाण्याचा ताल केरवा आहे पण, हा संगीतकार, कुठलाच भारतीय ताल, पारंपारिक पद्धतीने वापरत नसून, तालाच्या बाबतीत, या संगीतकाराने इतके प्रयोग केले आहेत की तो सगळा खास अभ्यासाचा विषय आहे. 
या गाण्यातील गिटार वाद्याच्या झंकारातून, तालाची जाणीव होते. पुढे गाण्यात तबल्याच्या मात्रा आहेत पण त्या सरळ, स्पष्टपणे ऐकायला येत नाहीत. 

आता मी रागाशी नाते सांगणाऱ्या गाण्याच्या लिंक्स देऊन, हा लेख इथेच संपवतो. 

बहारो फुल बरसाओ मेरा महेबूब आया है 

सावळाच रंग तुझा 

ओ मेरे शाहे खुबां 


अवखळ आनंदी खमाज



सर्वसाधारणपणे उर्दू शायरीत एकतर कमालीचे दु:ख किंवा प्रणयी छेडछाड तसेच काही प्रमणात उदात्त विचार भरपूर वाचायला/ऐकायला मिळतात. बरेचवेळा या भावनांचे थोडे अतिरंजित उदात्तीकरण देखील वाचायला मिळते. आता इथे हाफिज होशियारपुरी या शायरने अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे.
"जमानेभर का गम या इक तेरा गम, 
ये गम होगा तो कितने गम ना होंगे" 
असे लिहून त्याने प्रणयी तडफड व्यक्त केली आहे. वास्तविक, एक कविता किंवा गझल म्हणून या रचनेत तसे फारसे नाविन्य नाही, वेगळा विचार नाही तसेच असामान्य असा आशय व्यक्त होत नाही पण, याच शब्दांना संगीताची जोड मिळाली की लगेच हेच शब्द आपल्या मनात रुतून बसतात. 
उस्ताद मेहदी हसन साहेबांनी हीच कमाल, खमाज रागाच्या सहाय्याने अप्रतिमरीत्या सादर केली आहे. मी इथे मुद्दामून गझलेच्या पहिल्या ओळी दिल्या नाहीत पण, आता देतो. 
"मुहब्बत करनेवाले कम ना होंगे,
तेरी महफ़िल मे लेकिन हम ना होंगे" 
मेहदी हसन यांची ही अतिशय प्रसिद्ध रचना खमाज रागावर आधारित आहे. 


  शब्दांचे अचूक उच्चारण, खमाज रागावर आधारित असले तरी गझल गायकीचे स्वत:चा असा खास "खुशबू" असतो, त्याची यथार्थ जाणीव करून देणारी गायकी आणि आपण, राग सादर करत नसून, त्या रागाच्या सावलीत राहून, शायरीमधील आशय अधिक अंतर्मुख करीत आहोत, हा विचार, हे सगळे गुण या रचनेत अप्रतिमरीत्या ऐकायला मिळतात. रागाच्या सुरांची मदत तर घ्यायची पण, शायरीला प्राधान्य द्यायचे, अशी दुहेरी कसरत मेहदी हसन खरोखरच अप्रतिमरीत्या सादर करतात. कुठेही शब्दांना म्हणून दुखवायचे नाही, ही आग्रह तर प्रत्येक ओळीच्या गायकीतून दिसून येतो. 
"अगर तू इत्तफाकन मिल भी जाये, 
तेरी फुरकत से सदमे कम ना होंगे" 
या ओळी, माझे वरील म्हणणे तुम्हाला पटवतील. वास्तविक, पहिली ओळ खमाज रागापासून थोडी दूर गेली आहे पण, लगेच दुसऱ्या ओळीत, गायकाने चालीचे वळण, योग्य प्रकारे आणून, आपल्या बुद्धिमत्तेचा अफलातून प्रत्यय दिला आहे. 
इथे मी थोडी गंमत केली आहे. लेखाचे शीर्षक "अवखळ आनंदी खमाज" असे दिले आहे पण, वरील रचना तर या भावनेपासून फार दूर आहे. हेच तर भारतीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या रागाचे नेहमी एकाच भावनेत वर्णन करणे, सर्वथैव अशक्य!! रिषभ वर्जित आरोही सप्तकात दोन्ही निषाद  बाकीचे सगळे स्वर शुध्द लागतात तर अवरोही सप्तकात सगळे स्वर लागतात पण, निषाद फक्त कोमल वापरला जातो. वादी स्वर गंधार तर संवादी स्वर निषाद असलेल्या या रागाची खरी ओळख तुम्ही (कोमल) निषाद कसा लावता आणि तो लावताना पुढच्या षडजाला किंचित स्पर्श करून अवरोही सप्तकाकडे कसे वळता, या कौशल्यावर आहे. खरे तर या रागात संपूर्ण "ख्याल" फारसे आढळत नाहीत. 
वेगळ्या भाषेत, ख्याल गायक, या रागाकडे तसे फार बघत नाहीत असे दिसते. परंतु वादकांचे मात्र अलोट प्रेम या रागाला लाभले आहे तसेच सुगम संगीतात, या रागावर आधारित भरपूर रचना आढळतात. हे थोडेसे पिलू रागासारखे झाले.

आता आपण, उस्ताद विलायत खानसाहेबांचा अप्रतिम खमाज ऐकू या. उस्ताद विलायत खान म्हणजे सतार वादनात स्वत:चे "घराणे" निर्माण करणारे कलाकार. वास्तविक सतार म्हणजे तंतुवाद्य, म्हणजेच वाद्यावर "मिंड" काढणे तसे अवघड काम पण तरीही, सतारीच्या तारेवरील "खेंच" आणि मोकळी सोडलेली तार, यातून ते असा काही असमान्य सांगीतिक वाक्यांश "पेश" करतात की ऐकताना रसिक अवाक होतो. विशेषत: द्रुत लयीत, गत संपूर्ण सप्तकाचा आवाका घेत  असताना,मध्येच "अर्धतान" घेऊन, सम, ते ज्याप्रकारे  गाठतात, तो प्रकार तर अविस्मरणीय असाच म्हणायला हवा. 


या वादनात उस्तादांच्या कौशल्याची पुरेपूर प्रचीती येते. जरा बारकाईने ऐकले तर सहज ध्यानात येईल, वादन "जोड" आणि "झाला" यांच्या मध्ये किंचित गुंतलेले असताना, एके ठिकाणी ठुमरी अंगाची तान घेतली आहे पण तिचे अस्तित्व किती अल्प आहे. आणखी विशेष म्हणजे "जोड" वाजवताना, एके ठिकाणी, तारेवर किंचित दाब देऊन, स्वर रेंगाळत ठेवला आहे, म्हणजे बघा, लय मध्य लयीत चाललेली आहे पण, इथे तान सगळी न घेता मध्येच किंचित खंडित करून त्या रेंगाळलेल्या स्वरावर संपवलेली आहे. फार, फार अवघड कामगत आहे. 
कवी अनिलांच्या बऱ्याच कविता, गीत म्हणून रसिकांच्या समोर आल्या आहेत. त्यातलीच ही एक रचना, खमाज रागाशी मिळती जुळती आहे. अर्थात, हे गाणे, गीत म्हणून लिहिले नसल्याने, कविता म्हणून देखील फार सुरेख रचना आहे. संगीतकार यशवंत देवांनी चाल देखील फार सुरेख लावली आहे. मुळात यशवंत देव हे कवी प्रकृतीचे संगीतकार असल्याने, ते कवीच्या भावना फार नेमक्या दृष्टीने अभ्यासतात आणि शब्दांना सुरांचा साज चढवतात. देवांच्या चालीत, कवितेचे मोल, त्यांनी जाणलेले सहज दिसून येते आणि चाल लावताना, ओळीतील कुठल्या शब्दाने, कवितेचा आशय अधिक गहिरा होईल, याकडे लक्ष दिलेले आपल्या देखील लक्षात आणून देतात. त्यांची बहुतेक गाणी तपासली तर असे दिसून येईल, गाण्याच्या पहिल्याच ओळीत, कवितेतील नेमका शब्द पकडून, त्यावर नेमका "जोर" देऊन, कवितेतील आशय व्यक्त करतात. इथे देखील, त्याचा हाच आग्रह दिसून येतो. 


"वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर जळते उन, 
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला" 

प्रणयी ढंगाची कविता आहे. या ओळीतील, "माध्यान्ह" हा शब्द आणि पुढे "जळते उन" हे शब्द ऐका. दुपारचा रखरखाट आहे, डोके उन्हाने तापले आहे आणि असे असून देखील, माझ्या प्रिये, तू कोमेजून जाऊ नकोस. या संदर्भात वरील शब्द ऐकावेत म्हणजे, "शब्दप्रधान गायकी" म्हणजे क्काय याचे आपल्याला उत्तर मिळेल.  

हिंदी चित्रपट गीतांत देखील खमाज राग भरपूर पसरलेला आहे. दिलीप कुमारच्या "देवदास" चित्रपटात अशीच अत्यंत मनोरम अशी रचना ऐकायला मिळते. मुबारक बेगमच्या खणखणीत आवाजात ही चीज ऐकायला फारच बहारीचे वाटते. 


"वो ना आयेंगे पलट कर,उन्हें लाख हम बुलाये" हीच ती साहीरची अफलातून रचना. खरतर गाणे फार थोडा वेळ, चित्रपटात ऐकायला मिळते पण तरीही सुरांची, स्वत:ची अशी खासियत असते, ज्यायोगे एखादा सूर देखील आपल्या मनावर परिणाम करून जातो. इथे तसेच घडते. मुबारक बेगमचा स्पष्ट, खणखणीत आवाजाने, खमाज रागाची झलक देखील मनाला मोहवून जाते. 

मराठी भावगीतात असेच एक मानाचे पान राखून असलेली रचना ऐकायला मिळते. मानील वर्मांच्या आवाजात "त्या चित्तचोरट्याला का आपुले मी" ही रचना, खमाज रागाशी फार जवळचे नाते सांगून जाते. कविता म्हणून, गझल सदृश रचना आहे. मधुकर गोलवळकरांनी अतिशय सुंदर चाल लावून, या कवितेला अप्रतिमरीत्या सादर केले आहे. 


माणिकबाईंचा किंचित "नक्की" स्वरांतला आवाज परंतु शास्त्रीय संगीताच्या रियाजाने, आवाजाला घोटीवपणा प्राप्त झालेला. सहजता आणि संयमितपणा हे त्यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागते. तसेच त्यांनी मराठी भावगीत गायनात उत्तरेचा रंग आणि ढंग व्यवस्थितपणे रुजवला आणि हे वैशिष्ट्य, ही रचना ऐकताना आपल्याला सहज दिसून येईल. गायकी ढंगाची चाल आहे, त्यामुळे गाण्यात, "ताना","हरकती" भरपूर आहेत तसेच तालाच्या गमती जमती देखील आहेत. शास्त्रीय संगीताचा रियाज असल्याने, गायनात नेहमी विस्ताराच्या जागा, त्या निर्माण करतात. याचा परिणाम, गाणे ऐकायला अतिशय वेधक झाले आहे. 

आता आपण या रागावरील आणखी रचना ऐकुया. त्या गाण्याच्या खालील प्रमाणे लिंक्स आहेत. 

नजर लागी राजा तोरे बंगले पर

तोरा मन बडा पापी 

मियां मल्हार

आपल्या रागदारी संगीतात, परंपरेला अतिशय महत्व आहे आणि त्यानुरूप जे संकेत निर्माण झाले आहेत, त्यांची जीवापाड जपणूक करण्याची तोशीस केली जाते. मग, त्यात रागाचे समय, ऋतूप्रधान राग इत्यादी वर्गीकरणे अंतर्भूत होतात. शास्त्रानुसार अभ्यास करायला गेल्यास, शास्त्रात खरेतर, कुठल्याही रागाचा "समय" असा दिलेला नाही तसेच ऋतूप्रधान राग, असे वर्गीकरण केलेले नाही परंतु सुरांचे साद्धर्म्य जाणून घेऊन, असे अनेक संकेत जन्माला आले आहेत. तसे बघितले तर स्वरांच्या देवता, स्वरांचे रंग इत्यादी वर्णने वाचायला मिळतात पण, या सगळ्यांचा "मूलाधार" अखेर संकेत, या शब्दापाशी येउन ठेपतो. सुरांचे, मानवी भावनांशी अतिशय जवळचे नाते असते आणि याच भावनांची जोड, अशा प्रकारच्या वर्गीकरणात झाली. 
मियां मल्हार राग, याच स्वरूपाचा आहे. या रागाची उत्पत्ती तानसेन पासून सुरु झाली असे मानण्यात येते आणि त्यातूनच तानसेन आणि त्याच्या दंतकथा प्रसृत झाल्या. अर्थात या कुठल्याच गोष्टींना कसलाच शास्त्रीय आधार नसल्याने, त्याबद्दल अधिक लिहिणे योग्य नाही. 
दोन्ही गंधार, दोन्ही  निषाद, आणि दोन्ही मध्यम, हे स्वर या रागाची खरी ओळख पटवून देतात. सगळे सूर या रागात उपयोगात येत असल्याने, रागाचा विस्तार प्रचंड प्रमाणात होतो. दोन्ही मध्यम जितक्या प्रभावी मांडता येतात, तितके या रागाचे रूप खुलून येते. खरतर मध्यम, रिषभ आणि पंचम या स्वरांचे चलन, इथे महत्वाचे ठरते. 

आता आपण, या रागाचे शास्त्रीय स्वरूप समजून घेऊया. उस्ताद अली अकबर साहेबांनी वाजवलेला मियां मल्हार इथे ऐकुया. सगळी रचना, केवळ आलापी आणि जोड इतकीच आहे.एकतर सरोद्सारखे अंतर्मुख करणारे वाद्य त्यात, या रागाचे धीरगंभीर स्वरूप!! वास्तविक आपल्या मनात उगीचच मियां मल्हार म्हटलं की पावसाच्या घनघोर धारा आणि तांडव, असे एक चित्र डोळ्यासमोर येते परंतु, या चित्राच्या नेमकी उलट अवस्था उस्तादांनी काय अप्रतिम वाजवली आहे. सुरवातीपासून, प्रत्येक सूर अतिशय स्पष्ट, रेखीव वाजवला आहे. त्यामुळे स्वरांचा "मझा' घेता येतो. ज्यांना, स्वरज्ञान नाही, त्यांना देखील, रागातील कोमल स्वर कुठले, याचा सहज अंदाज घेता येतो.   


सरोद खरेतर तंतूवाद्य, परंतु अशा वाद्यावर उस्तादांनी अशी काही हुकुमत ठेवली आहे की, ऐकताना आपल्याला, वादनातील "गायकी" अंग सहज कळून घेता येते. तंतूवाद्यांवर "गायकी" अंग  वाजवणे,हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. वाद्यातून सलगता निर्माण होणे शक्यच नसते परंतु खंडित सुरांतून "मींड" काढायची, हे खरच अति अवघड काम असते आणि इथे उस्ताद अली अकबरांनी हे काम अतिशय लीलया केलेले आहे. जरा बारकाईने ऐकल्यावर, एका सुरावरून दुसऱ्या सुरांवर जो "प्रवास" घडतो, ते ऐकणे खरोखरच चिरस्मरणीय आहे. या वादनात, सूर बोलके होत आहेत. वास्तविक, स्वरांना स्वत:ची अशी भाषा नसते परंतु कलाकार, त्यात दडलेली "भाषा" शोधून काढतो. 

तबलानवाज म्हणून उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव जगात गाजलेले आहे. परंतु त्यांनी, चित्रपट संगीताच्या क्षेत्रात फारसे योगदान दिलेले नाही. त्यांनी ज्या थोड्या चित्रपटांना संगीत दिले, त्यात "साझ" चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. अर्थात त्यांनी या चित्रपटात काही अप्रतिम गाणी दिली आहेत. त्याच चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे ऐकुया. रागात आपल्याला या रागाची "छटा" ऐकायला मिळेल. 

https://www.youtube.com/watch?v=yQqVtUEMK3E

गाण्याची चाल एका अप्रतिम तानेने होते. अगदी पूर्ण सप्तकी तान आहे. ही तानच इतकी अवघड आहे की, पुढे गाणे कशाप्रकारे विस्तारणार आहे, याची कल्पना येते. तीनतालात बांधलेले गाणे, अतिशय द्रुत लयीत आहे. या गाण्यात, इतर गाण्याच्या वेळेस, सुरेश वाडकर जसा आवाज लावतो, तसा नसून, रियाज करून घोटवलेला आवाज लावलेला आहे. अर्थात, असे सगळे गाताना, गाण्याची बंदिश होण्याचा एक धोका असतो आणि तो इथे पूर्णपणे टाळलेला आहे.  गाण्याच्या शेवटी, गायकाने " चक्री" तान इतकी सहज घेतली आहे की ऐकताना, आपण देखील गाण्यात संपूर्ण गुंगून जातो. अखेर, संगीताचा मुख्य उद्देश तरी काय असतो ?? कलाकाराने मांडलेल्या सांगीतिक कलाकृतीत, रसिकाला हरवून जाण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आणि त्या पातळीवर हे गाणे नि:संशय अप्रतिम अनुभव देते. या गाण्यात मात्र, मियां मल्हार रागाचे जे प्रचलित रूप आहे - प्रचंड सोसाट्याचा वारा आणि घनघोर पाउस, याचे मूर्तिमंत दर्शन ऐकायला मिळते.

आता आपण मेहदी हसन साहेबांची अशीच अमूर्त रचना ऐकुया. मेहदी हसन म्हणजे गझल गायकीत स्वत:चे स्वतंत्र घराणे निर्माण करणारी गायकी. गझल गायनाचा तोंडावळा पूर्णपणे बदलून टाकून, रागदारी संगीताची "कास" धरून तरीही, रागदारी गायन बाजूला सारून, संपूर्ण वेगळ्या धाटणीची गायकी इथे रुजवली. अत्यंत मुलायम आवाज, सगळ्या सप्तकात हिंडणारा आवाज. अर्थात, तरीदेखील, मंद्र सप्तकात खानसाहेबांची गायकी खऱ्याअर्थी  खुलून येते. चाल बांधताना, रागाच्या स्वरांचा आधार घ्यायचा, परंतु रागाचे  रसिकांना करून द्यायची, असा या गायकीचा सगळा कारभार असतो. "एक बस तू ही नहीं" हीच ती गझल.  


दादरा तालात बांधलेली रचना, अगदी सुरवातीपासून या रागाची छाप आपल्या कानावर येते. मेहदी हसन, नेहमीच रचनेची सुरवात अतिशय संथ, खर्जाच्या सुरांत करतात पण तो जो खर्ज असतो, तोच अति विलक्षणरीत्या आपल्या मनाचे पकड घेतो. गाण्याच्या  ",जिसे बस खफा हो बैठा" इथे "हो" शब्दावर किंचित "ठेहराव" घेतलेला आहे आणि तो खरोखरच असामान्य आहे. जणू रागाची सगळी वैशिष्ट्ये त्या एका सुरांत एकवटली आहेत!! उत्तम  श्रीखंडात हळूहळू केशर कांडी विरघळत जावी त्याप्रमाणे इथे गायकी, त्या शायरीच्या अनुरोधाने आपल्या मनात उतरत जाते. या गायकीचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे, रचनेच्या बंधात समजा एखादा शब्द बसत नसेल तर तेव्हढ्यापुरते चालीला वेगळे वळण देण्याची किमया, या गायकाने असामान्य प्रकारे साधलेली आहे.

मराठीत अर्थगर्भ गाणी तशी भरपूर सापडतात. याच यादीत "जन पळभर म्हणतील हाय हाय" हे गाणे निश्चित अंतर्भूत करावे लागेल. भा. रा तांब्यांची अप्रतिम कविता आणि त्याला तितकीच अर्थवाही अशी वसंत प्रभूंची चाल आणि लताबाईंचे गायन. यामुळे हे गाणे संस्मरणीय झाले आहे. तांब्यांच्या कवितेत, नेहमीच एकप्रकारचा राजसपणा आणि गेयता आढळते. कवितेतील शब्द आणि त्याची "जोडणी" यात, सहज आणि उस्फुर्त अशी लय असते. शब्दातील अंतर आणि त्यातून  खटके, हे सगळेच फार विलोभनीय असते. वसंत प्रभूंच्या चाली या, बहुतांशी अत्यंत श्रवणीय आणि शब्द्वेधी असतात, त्यामुळे, त्या लगेच रसिकांच्या मनाची पकड घेतात. चाल सहज गुणगुणता येण्यासारखी असते. 
  

या गाण्याची एक गंमत बघण्यासारखी आहे. कवितेचा आशय बघता आणि मियां मल्हारचा स्वभाव बघता, या गाण्यात, या रागाची "पाळेमुळे" सापडण्याची शक्यता सुतराम वाटत नाही. तरीदेखील, हे गाणे याच रागावर आधारीत आहे. अगदी पावसाळा झाला तरी मानवी आयुष्यात अंतर्मुखता, व्याकुळता, विरही भावना अस्तित्वात नेहमीच असतात. अर्थात, रागातून अशी नेमकी भावना अचूक शोधायची, हा संगीतकाराचा अप्रतिम आविष्कार. इथे आणखी एक मजा बघूया. वरती, आपण मेहदी हसन यांच्या रचनेतील " जिसे खफा हो बैठा" या ओळीची चाल बघा आणि या गाण्यातील "पळभर म्हणतील हाय,हाय" या ओळीचे स्वर ऐका आणि या गाण्याची चाल कशी मियां मल्हार रागावर आधारित आहे, हे समजून घेता येईल. 

आता मी इथे खाली या रागावर आधारित अशा काही गाण्यांच्या लिंक्स देत आहे. अर्थात, एकूणच सुगम संगीतात, रागाचे "मूळ" फारसे कधी आढळत नसते. परंतु रागाचे "ठेवण" कशी आहे, याचा नेमका अदमास घेत येतो, हे नक्की आणि मुळात, राग आणि त्याची आवड निर्माण होऊ शकते. 

माना मानव वा परमेश्वर - गायक सुधीर फडके 

घन घन माला नभी दाटल्या - गायक मन्नाडे - वरदक्षिणा - वसंत पवार 

बोले रे पपी हरा - चित्रपट गुड्डी - गायिका वाणी जयराम - ताल केरवा - वसंत देसाई 


आश्वासक जयजयवंती

मुळात भारतीय संगीत हे नेहमी(च) शांतीचा प्रसार करणारे, भक्तिमार्गाकडे नेणारे तसेच मनाचे उन्नयन करणारे आहे. या संगीतात, उथळ वृत्ती, भ्रमर वृत्ती याचा समावेश जवळपास नाही आणि याचा परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे नेहमीच, लोकानुनयाचा मार्ग न स्वीकारता, काहीसे खडतर पण चिरस्थायी परिणाम देणारे संगीत झाले. खरतर, पहिल्याप्रथम दर्शनी रागदारी संगीत आवडेल, असे काही या संगीतात लगेच आढळत नाही. त्यासाठी, सतत ऐकण्याची सवय ठेवावी लागते. अर्थात, एकदा का या संगीताची गोडी लागली (सुरांची "आस" लागली) की मग, खऱ्याअर्थाने भारतीय संगीताचा  येतो.
 आपण सगळेच दिवसभर सतत, अविश्रांतपणे कामात अडकलेले असतो. सतत धावपळ, डोक्यावर "टेंशन" आणि कसेही करून आयुष्य पुढे रेटायचे किंवा अधिक सुखकर बनवायचे, ह्याच ध्यासाने पछाडलेले असतो. अगदी जेवणासारखी प्राथमिक बाब देखील, आपण "उरकून" टाकतो!! मनाला विश्रांती म्हणून द्यायला तयार नसतो आणि अशा वेळेस, रात्रीची जेवणे आटोपून, मनाला किंचित विसावा मिळावा म्हणून घराच्या एका कोपऱ्यात निवांत बसण्याचा प्रयत्न करीत असतो. अशाच वेळी, कानावर "जयजयवंती" रागाचे सूर यावेत आणि मन हलके होऊन, पिसाप्रमाणे तरंगायला लागते. सुरांची ही जादू खरच विलक्षण म्हणायला हवी. 
दोन्ही गंधार(कोमल आणि शुद्ध) तसेच दोन्ही निषाद, यांच्या सहाय्याने सगळ्या सुरांना सामावून घेणारा हा "संपूर्ण/संपूर्ण" जातीचा राग फार विलक्षण गारुड मनावर टाकतो. या रागातील हे जे दोन "कोमल" स्वर आहेत, तेच आपल्या पाठीवर आश्वासकतेचा हात फिरवतात. हा सगळा राग अतिशय मृदू, कोमल स्वरांनीच वेढून टाकलेला आहे. तसे बघितल्यास, या रागात, रागाचे म्हणून जे सगळे "अलंकार" आहेत, त्याचा संपूर्ण आढळ होतो पण, एकूणच प्रकृती ही आश्वासकतेकडे झुकणारी, एखादा मित्राने पाठीवर हात टाकून, विश्रब्ध मैत्रीचा विश्वास दर्शविणारी!!  
मनाला विसावा देण्याच्या मनस्थितीची ओळख आपण आता पंडित हरिप्रसाद चौरसिया, यांच्या बासरी वादनातून अनुभवूया. 


मृदुतेचा परिपूर्ण अनुभव देणारे हे वादन. सुरवातीपासून, नेहमीच्या धाटणीने "ठाय" लयीत सुरु झाले आहे. सुरांच्या पहिल्याच आवर्तनात, आपल्याला "कोमल" गंधाराची ओळख पटवून देते. रिषभ सुरावरून दोन्ही गंधारावर जशी लय झुकते, तिथे आपल्या जयजयवंती रागाची खूण पटते. इथे आपल्याला प्रत्येक सूर आणि त्या सुराच्या चलनाचा आनंद घेता येतो. प्रत्येक सूर कसा "अवतरतो" आणि आपले अवतरणे सिद्ध करताना, आपल्या बरोबर इतर सुरांना कसा सोबतीने घेऊन येतो, हेच ऐकण्यासारखे आहे. 
ही रचना आपल्या ऐकताना, आपल्याला सहज समजून घेता येईल. मी मुद्दामून अतिशय संथ लयीत चालणारी रचना घेतली आहे जेणेकरून, आपल्याला रागातील स्वरांचे स्थान, त्यांचे विहरणे आणि परत पुन्हा घरट्यात परतणे, आपल्याला किती समृद्ध करून जाते, हे सहज समजून घेत येईल. सगळी रचना आलापी आणि शेवटाला द्रुत लयीत गेलेली आहे परंतु जर का आलापी बारकाईने (बारकाईने ऐकणे, ही तर भारतीय संगीताची मुलभूत "अट" आहे!!) ऐकली तर पुढील द्रुत लयीतील रचना ऐकणे आणि त्याचा मन:पूत आनंद घेणे, हा विश्रब्ध आनंदाचा भाग ठरेल. आणखी एक मजा या रचनेत आहे, रचना जरी द्रुत लयीत शिरली असली तरी, केवळ द्रुत लयीत आहे म्हणून तानांचा पाउस नाही तर आलापीमध्ये स्वरांचा जो विस्तार केलेला आहे, तोच "तोंडवळा" कायम ठेऊन, फक्त त्रितालात रचना बांधलेली आहे, त्यामुळे आधीच केलेली आलापी अधिक भरीव आणि परिपूर्ण होते. 

आता आपण, गुलाम अली साहेबांची "दोस्त बन कर भी नही साथ निभानेवाला" ही या रागाची ओळख वेगळ्या पद्धतीने करून देणारी गझल ऐकू. गझल गायकीत, ठुमरी रंगाचा अत्यंत यशस्वी वापर करून तशी गायकी रुजवणारा हा गायक. 


गायकाचा गळा जर तयार असेल तर तो रागाची ओळख किती चटकन आणि समर्थपणे करून देतो, हे इथे ऐकण्यासारखे आहे. जयजयवंती रागातील कोमल गंधार स्वराचे महत्व आपण वर बघितले आहे, त्याचाच अत्यंत सुंदर आविष्कार इथे ऐकायला मिळतो. सुरवातीच्या "आकारा"नंतर लगेच "नि सा रे" या स्वरावलीनंतर ग(कोमल)" किती अप्रतिम लावला आहे. रिषभ स्वरावरून गंधार स्वरावर येताना, स्वरांत जी "उतरंड" घेतली आहे आहे आणि त्या स्वराचा नाजूक स्वभाव दर्शवला आहे, तेच खरे ऐकण्यासारखे आहे. खरे तर त्यांनी संपूर्ण सप्तक घेतले आहे आणि त्यातून रागाचा आवाका दाखवला आहे आणि हे देखील किती सहज, कसलेही आडंबर न घेता दाखवले आहे. तसे बघितले तर गुलाम अलीची गायकी "अवघड" म्हणावी अशी असते. कुठलीही तान, सरळ रेषेत न घेता, वक्रोक्तीने घ्यायची असा अगदी अट्टाहास वाटावा, इतका आग्रह दिसतो परंतु इथे मात्र रागाची प्रकृती ओळखून, रचना मृदू स्वभावात गायली आहे.

मन्नाडे हा गायकाने अशीच अफलातून चीज "देख कबीरा रोया" या चित्रपटात गायली आहे. मदन मोहन यांची रचना, जयजयवंती राग आणि मन्नाडे यांचे गायन, तेंव्हा गाणे श्रवणीय झाले नसल्यास काय नवल!! 


ध्वनीशास्त्राच्या तंत्रानुसार मन्नाडे इतका अप्रतिम आवाज, हिंदी चित्रपट संगीतात झाला नाही, असे विधान सहज करता येईल. सगळ्या सप्तकात अत्यंत मोकळेपणी फिरणारा गळा, तानेला कुठेही अटकाव नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गाण्याला योग्य तो आवाज पुरवण्याची असामान्य क्षमता, या गायकाच्या गळ्यात होती. दुदैवाने, शास्त्रीय गीते(च) गाऊ शकणारा गायक, असे "लेबल" नावावर चिकटले आणि तीच ओळख अखेरपर्यंत राहिली!! 
अर्थात प्रस्तुत गाणे, सरळ सरळ जयजयवंती रागावर आधारलेले आहे तरीही चित्रपटातील गाणे आहे, याचे भान राखून रचना बांधलेली आहे. संथ, ठाय लायोत झालेली गाण्याचे सुरवात, पुढे सहजपणे द्रुत लयीत शिरते पण तरीही गाण्याची "बंदिश" होऊ न देण्याची काळजी, गायक आणि संगीतकाराने घेतलेली आहे. अगदी पहिलीच ओळ, "बैरन हो गयी रैन" गातानाच आपल्या समोर हा राग स्पष्ट उभा राहतो. पुढे गाण्यात, द्रुत लयीतील ताना आहेत, सरगम आहे पण तरीही गाणे चित्रपटातील आहे. या तानांची "जातकुळी" बघितल्यावर, या गायकाच्या श्रेष्ठत्वाची साक्ष पटू शकते. 

श्रीनिवास खळे आणि आशा भोसले यांनी तशी तुलनेने कमी गाणी गायली आहेत परंतु त्यातील प्रत्येक गाणे म्हणजे भावगीतातील वेचक दृष्टी आहे. इथे आता आपण, असेच एक सुंदर भजन ऐकुया. "अजि मी ब्रह्म पाहिले". हेच ते गाणे. 

एकतर खळेसाहेबांच्या रचना या नेहमीच अवघड असतात - ऐकायला श्रवणीय वाटतात परंतु गायला घेतल्यावर त्यातील "अवघड" जागा दिसायला लागतात. रचना गायकी ढंग दाखवणारी आहे आणि अशी रचना गायला मिळाल्यावर, आशा भोसले यांचा गळा काय अप्रतिम खुलून येतो. इथे आपण एक गंमत करुया. या गाण्याची सुरवात जरा बारकाईने ऐकुया आणि वरती, मी दिलेली पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची रचना ऐकुया. पंडितजींच्या सुरवातीच्या आलापित, या गाण्याच्या चालीचे "मूळ" सापडेल. अर्थ एकच, एकाच रागातील रचना असल्यावर त्यात कशाप्रकारे साद्धर्म्य सापडते. 
गायकी ढंगाची चाल मिळाल्यावर, ही गायिका गळ्यात किती वेगवेगळी "वळणे घेते बघा. सुरवातीची ओळ - "अजि मी ब्रह्म पाहिले" किती वेगवेगळ्या अंगाने गायली आहे आणि प्रत्येक वेळेस समेवर येताना, स्वरिक वाक्यांश किती विलोभनीय पद्धतीने आला आहे. गाण्यात पारंपारिक भजनी ठेका आहे परंतु खरी गंमत चालीच्या बांधणीत आहे. अचूक शब्दोच्चार, शब्दांना जोडून येणाऱ्या हरकती, क्वचित ताना, आणि त्यामुळे त्याच शब्दांना मिळणारा वेगळा अर्थ, या सगळ्या अलंकारांनी हे गाणे अधिक श्रवणीय झाले आहे. 

आता मी इथे काही गाण्याच्या लिंक्स देत आहे, ज्या योगे हा राग आपल्या अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येईल. 

मन मोहना बडे झुटे 

ये दिल कि लगी कम क्या होगी 

Attachments 

मन:स्पर्शी भटियार

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर साक्षरता कार्यक्रमाच्या संदर्भात, एक अतिशय सुंदर जाहिरात केली होती. जाहिरात, नेहमीप्रमाणे २,३ मिनिटांची होती परंतु, जाहिरातीचे सादरीकरण आणि त्याचे शीर्षकगीत फारच विलोभनीय होते. सकाळची वेळ, एक लहान वयाचा मुलगा आणि त्याचे आजोबा. असाच काहीसा खट्याळ चेहऱ्याचा परंतु आश्वासक नजरेचा. पहाटेच्या पार्श्वभूमीवर, धुकाळ सकाळी, अप्रतिम हिरवळीवरून, तो मुलगा धावत असतो आणि पाठोपाठ गाण्याचे सूर आणि शब्द ऐकायला येतात. "पूरब से सूर्य उगा" आणि ऐकताना आपलेच मन ताजेतवाने होते. त्या गाण्याचे सूर मात्र अतिशय सुरेख, मनात भरणारे होते आणि याचे श्रेय, संगीतकार अशोक पत्की यांचे. हेच सूर, आपल्याला "भटियार" रागाची ओळख करून देतात. खालील लिंक ऐका म्हणजे माझे म्हणणे समजून घेता येईल. 



वास्तविक आपल्या भारतीय रागसंगीतात, सकाळच्या पार्श्वभूमीवर बरेच राग ऐकायला मिळतात तरी देखील भटियार ऐकताना, आपल्या मनात नेहमीच सात्विक भाव येतात, अर्थात हा सगळा संस्काराचा भाग आहे. प्रस्तुत गाण्यातील वातावरण निर्मिती आणि सूर मात्र, आपल्याला याच चित्राकडे घेऊन जातात, हे मात्र निश्चित. जाहिरातीसारख्या काही सेकंदात, सगळा आविष्कार दाखवण्याच्या माध्यमात, अशा प्रकारे, रागाची समर्थ ओळख करून देणे, हे निश्चित सहज जमण्यासारखे काम नाही. 

आता रागाच्या तांत्रिक भागाबद्दल थोडे समजून घेऊया. रागाची "जाती" बघायला गेल्यास, "संपूर्ण/संपूर्ण" जातीचा राग आहे, म्हणजे या रागात कुठलाच स्वर वर्ज्य नाही. असे असून देखील, दोन्ही मध्यम(तीव्र + शुद्ध) तसेच कोमल निषाद वगळता सगळे स्वर शुद्ध   स्वरूपात लागतात. तरी देखील, या रागात, कोमल निषाद, हा स्वर घेतल्यावर परत षडज स्वराकडील प्रवास हा खास उल्लेखनीय असतो. तसेच, तीव्र मध्यमावरून शुद्ध पंचमावर स्थिरावणे, हे तर खास म्हणायला हवे. इथे कलाकाराला फार काळजी घ्यावी लागते. जरा स्वर कुठे घसरला तर तिथे लगेच भूप किंवा देशकार रागात शिरण्याचा संभव अधिक, म्हणजे पायवाट तशी निसरडी म्हणायला हवी. 
आपल्या भारतीय संगीताची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यात हीच खरी गंमत आहे आणि त्या दृष्टीने आव्हान आहे. इथे अनेक राग, एकमेकांशी "नाते" सांगत असतात पण त्याचबरोबर स्वत:चे "रूप" वेगळे राखून असतात आणि हे वेगळेपण राखण्यातच, कलाकाराची खरी कसोटी असते.   
आता आपण, या रागाचे शास्त्रीय सादरीकरण समजून घेऊ आणि त्यायोगे, स्वरांची ओळख पक्की करून घेऊ. या चीजेचे शब्द देखील, रागाच्या प्रकृतीशी संलग्न आहेत - "आयो प्रभात सब मिल गाओ". ठाय लयीतील ही चीज, पंडित राजन/साजन मिश्रांनी किती समरसून गायली आहे. प्रत्येक सूर अतिशय स्पष्ट आणि मागील सुराशी नातेसंबंध राखून आहे, त्यामुळे इथे "मिंड" हा अलंकार फारच खुलून ऐकायला मिळतो.अणुरणात्मक स्वरांचे गुंजन असल्याने, आपण देखील ऐकताना कधी "ऐकतान" होतो, हे कळतच नाही. खर्जातील आलापी घेताना, मध्येच तीव्र मध्यमाचा प्रत्यय देऊन, स्वरावली खुलविणे, हे खास ऐकण्यासारखे आहे, तसेच "उपज" आणि "बोलतान" हे अलंकार बहारीचे लागतात. रागदारी संगीत ऐकताना, काही गोष्टी प्रामुख्याने समजून घ्याव्या लागतात, त्यात ही परिभाषा आवश्यक असते कारण, "उपज","बोलतान" या शब्दांना दुसरे तितकेच अर्थवाही शब्द नाहीत, त्यामुळे आनंद घेताना, या अलंकारांची ओळख असेल तर रागदारी संगीत ऐकण्याची खुमारी अधिक वाढते, हे निश्चित.   


वास्तविक रागदारी गायनात युगुलगान हा प्रकार तसा विरळाच परंतु इथे या दोघां बंधूंनी, एका सुरातून, दुसरा सूर आणि पुढे ताना, अशी बढत फार सुरेख केलेली आहे. 

आता आपण, "सूरसंगम" चित्रपटातील याच मुखड्याचे गाणे ऐकुया. अर्थात, रचना याच, भटियार रागावर आहे आणि गंमत म्हणजे वरील चीज, ज्या दोन भावांनी गायली आहे, त्यांनी या रचनेचे गायन केले आहे. अर्थात, चित्रपट गीत म्हटल्यावर, रचनेत अधिक बांधीव, घाटदार बांधणी अनुस्यूत असते आणि इथे संगीतकार लक्ष्मीकांत/प्यारेलाल यांनी हाच मार्ग चोखाळला आहे. चित्रपट गीत म्हटल्यावर, ती रचना काही प्रमाणात लोकानुनयी असावीच लागते आणि तशी ही रचना आहे. 


इथे आणखी एक मजा लिहावीशी वाटते. गाणे भटियार रागावर आहे, गाण्याचे सुरवातीचे बोल, रागाच्याच प्रसिद्ध बंदिशीचे आहेत परंतु पुढे गाण्याचा विस्तार मात्र स्वतंत्र आहे. केवळ हाताशी रागाचे सूर आहेत, तेंव्हा एखादे "लक्षणगीत" बनवावे, असा विचार न करता, त्या रचनेत, आपले काहीतरी "अस्तित्व" ठेवावे, या उद्देशाने, गाण्याची रचना केली आहे. गाण्याचा ठेका ऐकताना तर हा विशेष लगेच लक्षात येतो. "पंजाबी ठेका" आहे, जो रागाच्या चीजेत नाही. याचाच वेगळा अर्थ, गाण्याची सुरवातीची लय तशीच ठेऊन, गाणे जेंव्हा तालाच्या जवळ येते, तिथे गाण्याची चाल, किंचित बदलेली आहे आणि गाण्याचा चेहरा स्वतंत्र राखला आहे. 

आता, आपण रेहमानच्या संगीताची जादू अनुभवूया. रेहमान, हा कुठलीही चाल, काहीतरी वेगळेपण घेऊन येते, ज्या योगे गाण्यात, स्वत:चे contribution घालता येते. इथे देखील, गाण्यात, गायकीला पूर्ण प्राधान्य दिले आहे. पार्श्वभागी, वाद्यांचे किंचित जाणवणारे सूर आहेत, ज्या योगे प्रस्तुत प्रसंग  अधिक खोलवर मनात ठसेल. 


पार्श्वभागी तालाचा वापर देखील इतका हळुवार आहे आणि जोडीला पियानोचे स्वर देखील इतके हळवे आहेत, की नीट लक्ष देऊन, ऐकल्यास, या वाद्यांचे अस्तित्व जाणवते. याचा परिणाम असा होतो, सगळे गाणे, गायिकेच्या, पर्यायाने साधना सरगमच्या गायकीवर तोलले जाते. एकतर भटियार रागाचे सूर पण, राग मूळ स्वरूपात सादर न करता, आधाराला ते सूर घेऊन, चालीची बढत करायची, असा सगळा प्रकार आहे. सकाळची वेळ आहे, हे ध्यानात घेऊन, वाद्यांचा स्वर तसाच हलका ठेवला आहे. ताल देखील केरवा आहे, हे केवळ लयीच्या अंगाने तपासल्यावर समजते. फारच सुरेख गाणे.  अर्थात तालाबाबत असे प्रयोग करायचे, याची पूर्वतयारी, त्याच्या आधीच्या पिढीतील, राहुल देव बर्मनने केली होती, हे सुज्ञांस सहज उमजून घेता येईल. 

आपल्या मराठी संस्कृतीत अभंगाचे महत्व अपरिमित आहे आणि असाच एखादा अभंग जर का, किशोरी आमोणकरांनी गायलेला असेल तर, केवळ रागाची नव्याने ओळख होत नसते पण, त्याच जोडीने अभंगाची लज्जत देखील नव्याने समजून घेता येते. "बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल" हाच तो अभंग इथे ऐकुया. 

भजनाचा ताल अगदी सरळ, पारंपारिक आहे पण, त्याच कालस्तरावरील लयीत, स्वरस्तरावरील लय किती विलोभनीय आहे, हे ऐकण्यासारखे आहे. मुळात किशोरी आमोणकरांचा धारदार आवाज, त्यात अभंगाची गायकी अंगाची चाल, त्यामुळे हा अभंग ऐकणे, हा श्रवणीय आनंद आहे. अभंगातील प्रत्येक स्वर, त्याला जोडून केलेले शब्दांचे उच्चार आणि त्यातून निर्मिलेला स्वरिक वाक्यांश, सगळेच अप्रतिम आहे. भजनाच्या सुरवातीला घेतलेला "आकार", रचना पुढे कशी वळणे घेणार, याचा अदमास घेता येतो. किंचित अनुनासिक स्वर पण, तरीही स्वरांची जात खणखणीत. ज्या हिशेबात, किशोरी आमोणकर रागदारी संगीताची बढत करतात, तसाच थोडा प्रकार या रचनेत आढळतो. हळूहळू, तानांची जातकुळी बदलत जाते पण तरीही स्वरीत वाक्यांश नेहमीच स्वत:च्या  ताब्यात ठेऊन, सगळी मांडणी अतिशय बांधीव होते. वास्तविक, भजन म्हणजे ईश्वराची आळवणी आणि याचे नेमके भान इथे ठेवलेले आहे. गाता गळा आहे, त्याला रियाजाची असामान्य जोड आहे म्हणून, गाताना तानांच्या भेंडोळ्या सोडून, रसिकांना चकित करून सोडायचे, असला पारंपारिक प्रकार इथे आढळत नाही. आवाज, तीनही सप्तकात फिरतो परंतु गायन एकूणच आशयाशी सुसंगत असे झाले आहे. 

आता, नेहमीप्रमाणे इथे मी आणखी काही गाण्याच्या लिंक्स देतो आणि हा लेख संपवतो. 

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा 

धागा धागा अखंड विणूया 

Attachments area

चुनरी संभाल गोरी



हिंदी चित्रपट गीतांत, भारतीय लोकसंगीताचा वापर आणि प्रयोजन, याला तशी  परंपरा आहे. चित्रपटात गाण्यांचा अंतर्भाव व्हायला लागला आणि चित्रपट गीताने लोकसंगीताची कास धरल्याचे समजून घेता येते. अर्थात, लोकसंगीत आणि त्याचा जन्म, याचा नेमका ठावाठिकाणा जाणून घेणे केवळ अशक्य. बऱ्याचवेळा असे वाचनात येते, रागदारी संगीत अस्तित्वात नव्हते, त्या काळापासून लोकसंगीत प्रचलित आहे. याचा अर्थ, लोकसंगीताला काही शतकांची परंपरा आहे, हे नक्की. तसे बघायला गेल्यास, लोकसंगीताचा,सुगम संगीतात किंवा जनसंगीतात वापर करणे, यात तशी "उचलेगिरी" म्हणता येणार नाही, कारण नेमके श्रेय कुणाला द्यायचे? हा प्रश्न उद्भवतो(च). 
लोकसंगीत म्हणजे सुगम संगीताचा "ग्राम्य" अवतार, अशी मांडणी काहीवेळा केली जाते परंतु या शेऱ्यात कुठेतरी "कुत्सितपणा"चा वास येतो.  लोकसंगीताची स्वत:ची अशी खास वैशिष्ट्ये आहेत, ठराविक लय आहे, वेगवेगळे ताल आहेत, संगीताच्या रचनांचा स्वतंत्र असा ढाचा आहे. सर्वात मुख्य म्हणजे ती आपल्या मातीतले आहे आणि आपल्या सांगीतिक संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. 
आता, इथे आणखी एक प्रश्न उद्भवतो. लोकसंगीत हे परंपरेने चालत आले आहे आणि संगीतकाराच्या व्यासंगानुसार, मगदुरीनुसार, त्याचा उपयोग करून घेतला जातो. प्रश्न असा आहे, हातात असलेले लोकसंगीत, जसेच्या तसे वापरावे की त्यावर थोडी वेगळी प्रक्रिया करून, त्या रचनेला वेगळे स्वरूप द्यावे? हुशार संगीतकार, तसेच्या तसे लोकसंगीत स्वीकारत नाहीत!! (अर्थात ज्यांनी स्वीकारले, त्याच्या बुद्धीमत्तेबद्दल शंका घेण्याचे कसलेही कारण नाही) हाच विचार रागदारी संगीताबाबत मांडता येतो, म्हणजे हातात रागाचे बंदिश आहे, तेंव्हा त्या बंदिशीवर आधारित गाणे रचायचे, असा प्रकार देखील वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. 
काही रचनाकारांच्या मते, चाल तशीच्या तशी उचलण्यात कसले कौशल्य? एका बाजूने यांचे म्हणणे पटू शकते. अर्थात, अशा प्रकारे हातात असलेल्या चालीवर, स्वत:च्या मगदुराप्रमाणे प्रक्रिया करणे, याला देखील प्रचंड व्यासंग लागतो, हे नक्की. लोकसंगीताचा ढाचा स्वीकारायचा परंतु  स्वीकारताना,त्यात स्वत:ची अशी वेगळी "भर" टाकायची, ही काही साधे, सोपे  काम नव्हे. 
"चुनरी संभाल गोरी" हे गाणे याचा विचाराने तयार केलेले आहे. मुळात राहुल देव बर्मन, हा अतिशय प्रयोगशील संगीतकार होता. अशा प्रकारची लोकसंगीतातील चाल हाताशी आल्यावर, त्याने चालीचा "आराखडा"  तसाच ठेवला परंतु गाण्याचा  विस्तार,वाद्यमेळ आणि गायनात, खूपच प्रयोगशीलता ठेवली. सरळ आता गाण्याकडे वळतो. गाण्याची सुरवात, ढोलक वादनाने होते पण, जरा बारकाईने ऐकले तर सहज कळेल, तळाच्या प्रत्येकी चार मात्रानंतर त्याने चक्क "थाळी"च्या आवाजाची मात्रा घेतली आहे आणि गाण्यातील वैविध्याला सुरवात केली आहे. राहुल देव बर्मन, हा माझ्या मते, केवळ हिंदी चित्रपट संगीत नव्हे तर भारतीय चित्रपट संगीतातील असा अलौकिक संगीतकार होता, ज्याने गाण्यातील तालाच्या बाबतीत असंख्य प्रयोग केले. त्याने कधीही कुठलाच ताल पारंपारिक पद्धतीने वापरला नाही. तालाच्या मात्रा तशाच ठेवल्या पण, त्यात निरनिराळी वाद्ये (ज्यात, ज्याला "तालवाद्ये" म्हणता येणार नाहीत - रूढार्थाने, अशी वाद्ये वापरून, रसिकांसमोर तालाचे वेगळेच स्वरूप पेश केले) इथे देखील त्याने, ढोलकवर सुरवातीच्या मात्रा तशाच घेतल्या आहेत पण, लगेच थाळीच्या आवाजाचा वापर, एका(च) मात्रेपुरता आणून, तालाच्या सादरीकरणात "मजा" आणली आहे. 
तालाचे वर्तुळ पूर्ण होताक्षणीच, मन्ना डेच्या आवाजात  होतात. वास्तविक मन्नाडेच्या गायकीवर, अकारण केवळ शास्त्रीय पद्धतीची(च) गाणे म्हणणारा, असे "लेबल" चिकटवले गेले. खऱ्या अर्थाने गायकी ढंगाचा आवाज आणि वेळप्रसंगी आवाजात अप्रतिम लवचिकता आणून, गाण्याची खुमारी अफाट वाढवणारा, असा गायक होता. लोकसंगीत  गाताना, आवाजात "जोरकस" पणा असणे किंवा आणणे अप्रक्षित असते. मन्नाडे यांचा पहिलाच सूर या दृष्टीने ऐकावा. "चुनरी संभाल गोरी, उडी चाली जाये रे" इथे "जाये" शब्दावर किंचित वजनदार हरकत आहे आणि अशा प्रकारचीच गायकी, लोकसंगीतावरील गाण्यात अपेक्षित असते. या ओळीनंतर परत वाद्ये आणि ताल, याचा सुंदर "वाक्यांश" आहे, ज्या योगे, गायलेली पहिली ओळ, मनात ठसते. जिथे ताल संपतो, तिथे मन्नाडे ने किंचित "एकार" घेतला आहे, जो लोकसंगीताशी नाते सांगतो आणि गाण्याच्या चालीत "वजन" आणतो. लगेच गाणे वेगवान पद्धतीने पुढे सुरु होते. हीच पहिली ओळ, नेहमीच्या ढाच्यात संपते परंतु लगेच हीच ओळ स्वरांच्या वेगळ्या पट्टीत "पट्टीत" म्हणजे वरच्या सुरांत सुरु होते. याचा परिणाम असा  होतो, द्रुत लयीतील चाल पण, लगेच त्याच लयीत वेगळी "पट्टी" लागल्याने, ऐकणारा देखील चकित होतो. हेच तर लोकसंगीताचे खरे वैशिष्ट्य. एका लयीत गुंगवून ठेऊन, अचानक वेगळ्या वेगळ्या स्वरावलीत, रसिकाला चकित करायचे. 
"चुनरी संभाल गोरी, उडी चाली जाये रे, मार ना दे डंख कहीं नजर कोई हाय" 
आता इथे एक गंमत आहे. या ओळीत शेवटचा शब्द आहे "हाय". हा शब्दातून, मन्नाडे किती सुंदर विभ्रम निर्माण केले आहेत. तीन मिनिटांच्या गाण्यात हेच खरे सौंदर्य असते आणि हेच आपण जाणून घेण्यात बरेचवेळा कमी पडतो. त्यानंतर मन्नाडे "अरारारारा" असली लोकसंगीतात प्रचलित असलेली "बोलतान" घेतात. वास्तविक नेहमीच्या चालीत, अशा "ताना" येत नाहीत पण, चाल लोकसंगीतावर  आधारलेली आहे,याची जाण ठेऊन, इथे असली स्वरावली घेतली आहे. ही तान, संपते ना तोच, लताच्या आवाजात "उचकी" सदृश स्वर येतात. लयीत हे सगळे किती अप्रतिमरीत्या गुंफलेले आहे. ताल वेगवान आहे, लय द्रुत आहे आणि त्याच अंगाने गायन करताना, असे "ध्वनी"  वापरल्याने, लोकसंगीताची खुमारी अपेक्षेपेक्षा अधिक वाढते. 
किंबहुना, पुढील  रचनेत,हेच ध्वनी वारंवार ऐकायला येतात आणि त्याचा परिणाम मनावर ठाम होतो. पहिल्या अंतरा सुरु होतो, तिथला वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे, वास्तविक, संगीतकाराच्या बुद्धिमत्तेची कुशाग्रता दाखवण्याचे हे एक प्रमुख ठिकाण. ताशा वापरताना, त्याचा आवाज थोडा "बसका" ठेवला आहे पण, लगेच "ल ल ला" अशा आलापींनी गाण्याचे "कुळशील" तसेच ठेऊन, चालीत वेगळेपण आणले आहे. या आलापीनंतर मन्नाडे उंच स्वरांत (उंच स्वरांत गाणे, ही लोकसंगीताचे प्रथमिल गरज वाटावी, इथे या स्वरांचे ठळक अस्तित्व असते) आलापी घेतो. ही आलापी नेहमीच्या ढंगाची नसून, संपूर्ण लोकसंगीत देखील नाही तर ज्याला आधुनिक "योडलिंग" (किशोर कुमार गातो, ती पद्धत) स्वरावली आहे, त्याचा सुंदर उपयोग केला आहे. 
"फिसले नही चल के, कही दुख की डगर पे; 
ठोकर लगे हंस दे, हम बसने वाले, दिल की नगर के; 
अरे, हर कदम बहक के संभल जाये रे!!" 
आता या कवितेच्या ओळी  बघा,पहिल्या पेक्षा दुसऱ्या ओळीत शब्दसंख्या अधिक आहे. कवितेतील गेयतेच्या दृष्टीने अवघड रचना. संगीतकार अशाचवेळी आपली कुशाग्रता दाखवतो. चालीला वेगळे वळण दिले म्हणजे काय? याचे उत्तर इथे मिळते. शब्द तसेच ठेवले पण, चालीत किंचित फेरफार केला पण तसा करताना शब्दांना कुठेही "धक्का" दिलेला नाही आणि लय तशीच कायम ठेऊन, गाण्याची मजा कुठेही कमी पडू दिली नाही. लताची गायकी देखील काय अप्रतिम आहे. "ठोकर लगे हंस दे, हम बसने वाले, दिल की नगर के" ही ओळ संपताना, आवाजात किंचित कंप घेऊन, "हा हा" असे स्वर घेतले आहेत, जे परत लोकसंगीताशी जवळीक साधणारे आहेत. 
लता सगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकत नाही, असा तिच्या गायकीवर बरेचवेळा आक्षेप घेतला जातो (आशा भोसलेच्या संदर्भात तर नेहमीच) परंतु या गाण्यातील तिची गायकी ऐकावी. आपोआप आपले पाय, ताल धरत असताना, वेगवेगळ्या स्वरांच्या "नक्षी" निर्माण करण्यात लता खरच अतुलनीय आहे. इतके गाणे वेगवान लयीत आहे, पण, लता, एकच ओळ दोनदा म्हणताना, त्यात देखील वैविध्य आणते!! हे काम खरच फार अवघड आहे. लयीची अत्यंत सूक्ष्म नजर असलेल्या कलाकारांनाच असल्या चमत्कृती जमू शकतात. या गाण्यातील तिची "उचकी" तर केवळ लाजवाब आहे. गाण्याला कसला अप्रतिम उठाव मिळतो. 
दुसरा अंतरा घेताना, बांसरीचे पारंपारिक स्वर ऐकायला येतात. त्याचबरोबर "कोरस" ऐकायला येतो (लोकसंगीतात कोरस अत्यावश्यक) ते स्वर देखील म्हटले तर पारंपारिक आहेत पण तरीही त्यात किंचित बदल आहे. संगीतकार म्हणून राहुल देव बर्मन किती "विचारी" संगीतकार होता, याचे हे उत्तम उदाहरण. ह्या इथे वाद्यमेळ्यातील ताल, किंचित "हलका" आहे पण क्षणात लताची गायकी सुरु होते आणि परत ताल पूर्वपदावर सुरु होतो. ऐकताना किंचित विश्रांती घ्यायची, आणि अचानक, परत द्रुत लय सुरु करून रसिकांना चकित करायचे!! खरे तर ही पारंपारिक पद्धत तरीदेखील इथे वेगळे स्वरूप प्रकट करून येते.
पुढील कडवे याच अंदाजाने बांधले आहे. 
"कितने नही अपनी, तो है बाहो की माला; 
दीपक नहीं जी में, उन गलियो है हमसे उजाला; 
भूल ही से चांदनी खिल जाये रे". 
हे कडवे संपूर्ण लताने गायले आहे आणि लता कधीही, केवळ संगीतकाराने जो "आराखडा" मांडला आहे, त्याबर गात नाही, गाताना, एखादा शब्द, एखादी हरकत ही खास, तिची "नजर" दर्शवून जाते. कधी कधी केवळ शब्दोच्चारावर लता कमाल करून जाते. इथे देखील, "तो है बाहो की माला" इथे "बाहो" आणि "माला" इथे घेतलेली हरकत, शब्दोच्चाराबरोबर घेतली आहे. अतिशय अवघड काम. लता अगदी सहज गाउन जाते, कुठेही, कसलेही प्रयास नाहीत!! 
तिसरा अंतरा घेताना, लताने "ल ल ला" अशी स्वरावली घेताना, काय जीवघेणी हरकत घेतली आहे. वास्तविक, श्रुतीशास्त्र याचे योग्य विश्लेषण करू शकेल पण, हे चित्रपट संगीत आहे, शास्त्र नव्हे, याचे जाणीव ठेवलेली बरी. 
"पल छिन पिया पल छिन, अंखीयो का अंधेरा;
रैना नहीं अपनी, पर अपना होगा कल का सवेरा; 
रैना कौन सी जो ढल ना जाये." 
इथे देखील परत लताची गायकी पुन्हा त्याचा अंगाने आपल्या समोर येते आणि आपण केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय काहीही करू शकत नाही. खरतर राहुल देव बर्मनने असे गाणे तयार करून, लोकसंगीतावर आधारित गाणे कसे "सजवता" येते याचा अफलातून मानदंड घालून दिला आहे, हे नक्की.   


अनोखा भीमपलासी

आपल्या रागदारी संगीतात काही राग असे आहेत, की त्यांना "अचाट" असेच विशेषण लावावे लागेल. अशा रागांच्या यादीत, भीमपलासी रागाचे नाव अवश्य घ्यावे लागेल. भीमपलासी रागाचे वर्णन करणे फार अवघड आहे. अनेक कलाकार या रागाच्या विविध छटांचे असे काही अकल्पित दर्शन घडवतात की, त्या क्षणापुरते तरी, ते दर्शन, हीच या रागाची ओळख मनात ठसते. भीमपलासी रागाबाबत असे विचार वारंवार मनात येतात - या रागाची नेमकी ओळख काय? एका दृष्टीने बघायला गेल्यास, आपल्या संस्कृत ग्रंथात प्रत्येक रागाचे आणि पर्यायाने स्वरांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केल्याचे वाचायला मिळते परंतु त्याला शास्त्राधार फारसा मिळत नाही. अर्थात, परंपरेने निर्माण केलेले संकेत, संस्कार याचा जबरदस्त पगडा आपल्या मनावर होत असतो आणि आपल्या विचारांची ठेवण देखील याच अनुषंगाने होत असते. रागाचा समय, ही संकल्पना देखील याच दृष्टीकोनातून तपासून घेणे, गरजेचे आहे. असो, हा भाग सगळा "वैय्याकरण" यांच्या अधिपत्याखाली येतो. 
भीमपलास रागाचा विचार करता, याचे "औडव-संपूर्ण" स्वरूप तर लगेच ध्यानात येते. आरोहात, "रिषभ" आणि "धैवत" स्वर वर्ज आहेत तर अवरोही सप्तकात, सगळे स्वर लागतात. अर्थात, "कोमल निषाद" आणि "कोमल गंधार" हे स्वर या रागाची खरी ओळख ठरवतात. अर्थात' "मध्यम" स्वराचा "ठेहराव" हे सौंदर्यलक्षण आहे. भीमपलास म्हटला की एक किस्सा वारंवार वाचायला मिळतो - बालगंधर्वांचा "स्वकुल तारक सुता" या गाण्यात आरोही स्वरातील "धैवत" स्वराचा वापर. भारतीय संगीत एका बाजूने शास्त्राला प्रमाणभूत मानणारे आहे पण तरीही कलाकार तितकाच तोलामोलाचा असेल तर "वर्जित" स्वराचा वापर करून, त्याच रागाची नवीन "ओळख" करून दिली जाते. 


हेच गाणे आता आपण ऐकुया. बालगंधर्व "लयकारी" गायक होते, हे फार ढोबळ वर्णन झाले. केवळ ताल आणि त्याची पातळी लक्षात घेतली तरी तालातील कुठलाही "कालबिंदू" चिमटीत पकडावा तसे ते नेमका पकडीत असत, तसेच मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, हे त्याचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल. सुरावटींचा पुनरावतार असावा पण पुनरावृत्ती टाळावी, हे ध्यानात येते. एका मागोमाग एक आणि एका वेळेस एक स्वर घेणे, हे बहुतेक गायकांच्या बाबतीत संभवते परंतु एकाच वेळेस एका स्वराबरोबर इतर स्वरांच्या सान्निध्यात वावरणे, हे फार अवघड असते. वास्तविक हा भाग "श्रुती" या संकल्पनेत येतो. आवाज फार बारीक नव्हता पण लगाव नाजूक होता पण अस्थिरता नव्हती. 

आता आपण पंडित कुमार गंधर्व यांचा भीमपलासी ऐकू. या रचनेत देखील आपल्याला, "ध, नि सा" अशी अफलातून स्वरसंगती ऐकायला मिळते. एकूणच कुमार गंधर्वांचे गायन म्हणजे रागाच्या व्याकरणावर किंवा क्रमवारतेकडे लक्ष न वेधता, रागाच्या भावस्थितीवर ध्यान केंद्रित करण्याचा नेहमी प्रयत्न असायचा. मघाशी मी म्हटले तसे, "वर्जित" स्वरांशी सलगी करून त्यांना, त्यांचा रागांत प्रवेश करवून, त्या रागाचे सौंदर्य आणखी वेगळ्या दृष्टीने वाढवायचे, असा गायनाचा बराचसा कल होता. रागाचे आलाप, बोल-आलाप, बोलतान आणि तान असा प्रवास त्यांना फारसा मान्य नव्हता. आवाज पातळ, टोकदार होता आणि लयीचे बारकावे टिपू शकणारा होता. तसे बघितले तर गायनात बरेचवेळा, "ग्वाल्हेर","जयपुर","किराणा" इत्यादी घराण्यांची गायकी दिसते आणि तरी देखील "भावगर्भता" आढळते. बरेचवेळा असे जाणवते, यांच्या गायकीवर "टप्पा" पद्धतीचा प्रभाव आहे. टप्पा चमकदार असतो, क्रमाक्रमाने सावकाश पुढे जाणे यापेक्षा मधले स्वरपुंज अल्प विस्तारासाठी घेऊन मग पुन्हा चपलगतीने पुढे झेपावणे आहे, हीच त्यांच्या गायकीचे खरी ओळख वाटते आणि हे सगळे या रचनेत आपल्याला अनुभवता येईल. 


"है चांद सितारो मी चमक" ही थोडी अनवट, अप्रसिद्ध गझल मी इथे घेतली आहे. "अहमद हुसेन","मुहमद हुसेन" या जोडीने ही गझल गायली आहे. हल्ली गझल गायन म्हणजे "गायकी" असा एक प्रघात बनला आहे. सगळ्यांनाच तसे गायन करणे जमत नाही आणि बरेच वेळा तशा प्रकारचे गायन फार "वरवरचे" होते. गझल भावगीताच्या अंगाने देखील गायली जाऊ शकते - तलत मेहमूद याचे उत्तम उदाहरण. इथे देखील त्याच अंगाने गझल गायली गेली आहे. 
अर्थात जरी भावगीताच्या अंगाने गझल गायली तरी, लयीचे वेगवेगळे बंध, वाद्यमेळातून चालीची खुमारी वाढवायची तसेच निरनिराळ्या हरकतीमधून "अवघड" गायकीचा प्रत्यय देता येतो. मोजकीच वाद्ये असल्याने, रचनेचा "कविता" म्हणून आस्वाद घेता येतो आणि रचना आपल्याला अधिक समृद्ध करून जाते. 

आता लताबाईंचे एक अतिशय गाजलेले आणि तरीही दर्जाच्या दृष्टीने  अतुलनीय असे गाणे आपण ऐकायला घेऊया. भीमपलासी रागाची ओळख या गाण्यातून फार जवळून घेता येते. 


सतारीच्या पहिल्याच सुरांतून आपण या रागाची ओळख करून घेऊ शकतो. गाण्याची चाल तर श्रवणीय नक्कीच आहे पण, गाण्यात अनेक "जागा" अशा आहेत, तिथे गायला केवळ हाच "गळा" हवा, याची खात्री पटते. "नैनो मे बदरा छाये" हेच ते गाणे. संगीतकार मदन मोहन आणि लताबाई यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत तरी या गाण्याची "लज्जत" काही और आहे. 
गाणे जरा बारकाईने ऐकणे जरुरीचे आहे कारण, इथे प्रत्येक शब्दामागे किंवा ओळ संपत्ना अतिशय नाजूक, बारीक हरकती आहेत, ज्या केवळ चालीचे सौंदर्य वाढवीत नसून, कवितेतील आशय अधिक समृद्ध करीत आहेत. राजा मेहदी अली या शायराची कविता आहे आणि कविता म्हणून देखील अतिशय वाचनीय आहे.  वास्तविक,मदन मोहन म्हणजे चित्रपटातील गझलेचा "बादशाह" अशी प्रसिद्धी आहे आणि तशी ती गैरलागू नाही पण तरीही प्रस्तुत गाणे त्या पठडीत बसणारे नाही आणि तसे नसून देखील अतिशय श्रवणीय आहे. या गाण्यावर खरे तर विस्ताराने लिहावे, अशा योग्यतेचे गाणे आहे.


मराठी गाण्यात एकूणच सोज्वळता अधिक आढळते आणि तसे ते संस्कृतीला धरून आहे परंतु काही गाण्यांत विरोधाभासातून उत्तम निर्मिती झाल्याचे दिसून येते. माडगूळकरांचे शब्द आणि बाबूजींची चाल, याचा या गाण्यात अतिशय सुंदर मिलाफ झालेला दिसतो.  
"धुंद येथ मी स्वैर झोकितो" हेच गाणे आपण इथे ऐकणार आहोत. दोन अत्यंत विरुद्ध टोकाच्या भावनांची सुरेख चित्रे कवितेत वाचायला मिळतात. भीमपलासी रागाची अत्यंत समर्थ तसेच वेगळ्याच अर्थाचे अनुभूती हे गाणे देते. 
"कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली;
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली". 
मघाशी मी "विरुद्ध टोकाच्या भावना" असे जे म्हटले ते याच ओळीच्या संदर्भात. माडगूळकरांच्या रचनेत, बरेचवेळा संस्कृतप्रचुर शब्द येतात जसे इथे "कनकांगी" हा आहे आणि काही वेळा, त्यांच्यातील न्यूनत्व दाखवण्याच्या मिषाने  पण, असे शब्द वापरणारे, माडगुळकर एकमेव कवी नव्हेत. एक मात्र नक्की मान्यच करावे लागेल, भावगीतासाठी लागणारी शब्दरचना जर का "गेयतापूर्ण" असेल तर चाल बांधायला हुरूप येतो. अर्थात, कवितेची चिकित्सा करणे, या लेखात अभिप्रेत नसल्याने, इथेच पुरे.  

खाली आणखी काही गाण्याच्या लिंक्स देत आहे. 


इंद्रायणी काठी देवाची आळंदी 


किस्मत से तुम हमको मिले हो 

 एरी मै तो प्रेमदिवानी 

हृदयस्पर्शी आसावरी

रागदारी संगीतातील काही खास मजेच्या बाबी म्हणजे, जर रागांचे स्वरलेखन तपासले तर, एका रागातील काही स्वर दुसऱ्या रागात तंतोतंतपणे सापडतात पण तरीही, प्रत्येक राग वेगळा असतो. त्यानुसार त्यातील भावना, स्वरांची बढत, ताना, हरकती इत्यादी अलंकार, त्याची आभूषणे आणि तेजाळ लखलखणे वेगळे असते. अर्थात प्रत्येक रागात झगझगीतपणा निश्चित नसतो तरीही रागाच्या ठेवणीत फरक नक्की असतो. हे कसे काय घडते? रागदारी संगीत, स्वत:चे हे वेगळेपण कसे काय जपून ठेवते?  
यात खरे वैशिष्ट्य असते, ते त्या रागातील पहिला स्वर - बहुतेक रागात षडज हाच पहिला स्वर असतो, त्या स्वराचे स्थान, त्या स्वराचे वजन (किती जोरकसपणे लावायचा) आणि कुठल्या ध्वनीवर तो स्वर स्थिरावतो, तिथे त्याचे वेगळेपण सिद्ध होते. मागे एकदा, पंडित  कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, "प्रत्येक रागाचा "सा", हा त्या रागाचे "ड्रेस" असतो"!! याचा नेमका अर्थ हाच लावता येतो, जेंव्हा, रागाच्या सुरवातीची आलापी सुरु होते आणि एका विविक्षित क्षणी, षडज स्वराचा "ठेहराव" येतो, तिथे त्या रागाचे "रागत्व" सिद्ध होते आणि तो राग वेगळा होतो. एकदा या स्वराची "प्रतिष्ठापना" झाली की मग, त्याच्या अनुषंगाने इतर स्वरांच्या "जागा" निर्माण होतात, तानांचे स्वरूप स्पष्ट होते इत्यादी, इत्यादी… अर्थात, पुढे मग, अनेक स्वर असे असतात, त्यांची "जागा" जरा हलली, की लगेच आपण, दुसऱ्या रागात प्रवेश करतो!! त्यात, इतके बारकावे असतात की, सादर करताना, कलाकाराला अत्यंत जागरूक असणे, क्रमप्राप्त(च) ठरते. 
आसावरी रागाबदाल विचार करताना, स्वरांची "जपणूक" अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते अन्यथा, आसावरी रागातून, आपण कधी "जीवनपुरी" रागात प्रवेश करू, हेच नेमकेपणाने ध्यानात येत नाही. 
"औडव-संपूर्ण" असे याचे आरोही/अवरोही स्वर आहेत. यात आणखी एक गंमत आहे. वादी/संवादी स्वर - "धैवत" आणि "गंधार" आहेत पण, आरोही स्वरांत "गंधार" स्वराला स्थान नाही!! परंतु जसे प्रत्येक रागाचे स्वत:चे "चलन" असते आणि तेच त्या रागाची ओळख ठरवते. म प ध(कोमल) ग(कोमल) रे ही स्वरसंगती, या रागाची ओळख आहे. वास्तविक, या रागात "निषाद" शुद्ध आहे परंतु काही कलाकार (कोमल) निषाद घेऊन याचे सौंदर्य द्विगुणीत करतात.  


आता आपण, पंडित जसराज यांनी सादर केलेला राग आसावरी ऐकुया. तिन्ही सप्तकात लीलया विहार करणारा, स्वरांचे शुद्धत्व अबाधित ठेवणारा आणि तरीही स्वरांचे लालित्य कायम राखणारा, असा हा असामान्य गळा आहे. ठाय लयीतील आलापी इतकी मंत्रमुग्ध करणारी आहे की, पुढे आपण काय आणि किती ऐकणार आहोत, याची उत्सुकता वाढवणारी ही रचना आहे. प्रत्येक स्वर स्वच्छ तरीही, गुंजन करणारा स्वर!! संथ लयीत बंदिश सुरु असल्याने, आपल्याला प्रत्येक स्वर "अवलोकिता" येतो. पहाटेचे शुचिर्भूत वातावरण किती अप्रतिमरीत्या इथे अनुभवता येते. आलापी चालू असताना, मध्येच वीणेचे स्वर देखील या बंदिशीला लालित्य पुरवतात. 
खरतर, "मुर्घ्नी" स्वर हा उच्चारायला अतिशय कठीण स्वर असतो पण इथे एक,दोन ठिकाणी, पंडितजी किती सहजतेने तो स्वर घेतात. तसेच, हरकती घेताना, देखील प्रसंगी आवाज अतिशय मृदू ठेऊन, आविष्कार करतात. वास्तविक हा कोमल रिषभ घेऊन, गायलेला आसावरी आहे. 


पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली "अभंगवाणी" कुणी रसिक विसरू शकेल, असा रसिक विरळाच असावा. "तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल" हा अभंग आसावरी रागाशी नाते सांगणारा आहे. वास्तविक, अभंग ही रचना दोन प्रकारे गायली जाते (गझलेबाबत देखील हेच म्हणता येईल) १] भावगीताच्या अंगाने, २] मैफिलीच्या स्वरूपात. अर्थात, पंडितजी हे मुळातील "मैफिली" गायक आणि इतर बाबी नंतरच्या. असे असले तरी, त्यांनी अभंगाला अपरिमित प्रसिद्धी मिळवून दिली, हे कुणालाच नाकारता येणार नाही. मुळातला दमदार आवाज, दमसास आश्चर्यचकित करणारा आणि तीनही सप्तकात गळा फिरणारा, त्यामुळे देवाची आळवणी, त्यांनी वेगळ्या स्तरावर नेउन ठेवली. 
अत्यंत मोकळा आवाज, दीर्घ पल्ल्याच्या ताना घ्यायची असामान्य ताकद, साध्या हरकतीतून, मध्येच पूर्ण सप्तकी तान घेऊन, रसिकांना आश्चर्यचकित करण्याची क्षमता, यामुळे, त्यांचे गायन रसिकाभिमुख झाले. आणखी काही वैशिष्ट्ये लिहायची झाल्यास, आवर्तन, लयखंड किंवा ताल विभाग दाखवायचे पण, तंतोतंत त्याला चिकटून गायचे नाही. अर्थात हे सगळे लयीच्या अंगाने चालते.  घोटून तयार केलेला आवाज, सूक्ष्म स्वरस्थाने पकडण्याची ताकद आणि नव्या आकर्षक सुरावटी घेऊन, शब्द खुलवण्याची असामान्य क्षमता. 


साहिर लुधीयान्वी यांची अप्रतिम कविता आणि आशा भोसले व रफी यांनी गायलेले हे युगुलगीत म्हणजे आसावरी रागाची प्राथमिक ओळख असे म्हणता येईल. वास्तविक गाण्याची चाल तशी असामान्य नाही पण वेधक आहे. सहज गुणगुणता येणारी चाल, साधा केरवा ताल परंतु कवितेतील आशय सुंदररीत्या व्यक्त करणारी गायकी, हेच या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गझलसदृश रचना आहे पण पुढे सुगम संगीताच्या अंगाने चाल विस्तारली आहे. 
"बहुत सही, गम ए दुनिया, मगर उदास ना हो;
करीब है शब ए गम की, सहर उदास ना हो; 
किंवा 
"ना जाने कब ये तरीका, ये तौर बदलेगा;
सितम का गम कब मुसिबत का दौर बदलेगा ;"
या सारख्या ओळी केवळ साहिर सारखा(च) कवी लिहू शकतो. इथे असा एक प्रवाद आहे, चित्रपट गीतात, काव्य कशासाठी? किंवा त्याचे अजिबात गरज नसते. परंतु साहिर सारख्या कवीने या प्रश्नाला सुंदर उत्तर दिले आहे. कवितेत जर का "काव्य" असेल तर संगीतकाराला चाल बांधण्यास, हुरूप मिळतो आणि त्यातूनच अनेक अजरामर गाण्यांचा जन्म होतो.  



कवियत्री मीराबाईंच्या अनेक रचना प्रसंगोत्पात संगीतबद्ध झाल्या आहेत. ही देखील अशीच "तुफान और दिया" या चित्रपटातील एक सुंदर रचना. "पिया ते कहां" हे ते गाणे. खरे तर यात आसावरी रागाशिवाय इतर रागांचे सूर ऐकायला मिळतात परंतु या रागावरील लक्षणीय गीत म्हणून उल्लेख करावा लागेल. संगीतकार वसंत देसायांची चाल आहे. गाण्याची सुरवातच किती वेधक आहे - एक दीर्घ आलाप (लताबाईंच्या गायकीचे एक वैशिष्ट्य) आणि त्यातून पुढे विस्तारत गेलेली चाल. 
गाण्याचा ताल करावा आहे पण ताल वाद्य खोल आहे (बंगाली तालवाद्य) त्यामुळे ताल सहज उमजून घेता येत नाही पण तालाच्या मात्रा आणि त्यांचे वजन ध्यानात घेतले की लगेच ओळख होते!! संगीतकार म्हणून वसंत देसायांनी इथे काही खुब्या वापरल्या आहेत. लयीच्या अंगाने गाणे ऐकायला  गेल्यास, गाण्याची चाल काही ठिकाणी सहज वरच्या सुरांत जाऊ शकली असती परंतु त्याने गाण्याचा "तोल" बिघडला असता. चित्रपट संगीतात अशा गोष्टीचे व्यवधान फार बारकाईने सांभाळावे लागते. लयीच्या ओघात चाल वेगवेगळ्या सप्तकात जाऊ शकते आणि गाणे ऐकताना आपण चकित होऊन जातो पण, गाण्याचा प्रसंग काय आहे, याचे भान राखून, रचनेला, योग्य जागी रोधून, आवश्यक तो परिणाम साधणे जरुरीचे असते. इथे हेच केले गेले आहे, हाताशी लताबाईंसारखा "चमत्कार" आहे म्हणून अतिशयोक्त गाउन घेणे, जरुरीचे नसते. इथे अनेक ठिकाणी, तान वेळीच रोखली आणि लयीचे बंधन, बांसरीच्या सुरांनी पूर्ण केले आहे - असाच प्रकार संगीतकार रोशन यांच्या रचनेत बरेचवेळा दिसून येतो.  

आता मी इथे आणखी काही गाण्याच्या लिंक्स देत आहे. 
१] अवघे गर्जे पंढरपूर 

२] जादू तेरी नजर 

Attachments area

ऋजू स्वभावाचा बिहाग

खरतर संगीतात अनेक भावना आढळतात पण त्या भावनांचा शास्त्राशी संबंध जोडला तर हाताशी तसे फारसे लागत नाही. काहीवेळा असेच वाटते, केवळ काही स्वरांच्या साद्धर्म्याने विचार केला तर, काही भावना मनाशी येऊ शकतात तरीही, अखेर शास्त्रकाट्यावर तपासणी करता, सूर आणि भावना, याचे नेमके नाते जोडता येत नाही, हेच खरे. मग प्रश्न पडतो, राग आणि समय, किंवा राग आणि भावना, याला काय आधार आहे? हे सगळे केवळ "संकेत" असेच मानायचे का? तसे मानले तर, हे "संकेत" निर्माण करण्यामागे काय उद्दिष्ट असावे? आज वर्षानुवर्षे, बहुतेक रागांचे समय, त्याला लगडलेल्या भावना, याचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो, त्या परिणामाचा कार्यकारण भाव आणि संगती कशी लावायची? की पुन्हा कोऱ्या पाटीवर नव्याने धुळाक्षरे शिकायची? या प्रश्नांची उत्तरे तशी सोपी नाहीत पण, विचार करायला नक्की लावणारी आहेत.
मी, जेंव्हा "बिहाग" रागाला, "ऋजू" भावनेची जोड देतो तेंव्हा , माझ्या मनात पारंपारिक संकेत आणि त्याला जोडून आलेले विचार, याचेच प्राबल्य असते.आपल्याला बरेचवेळा, मी एका कवितेत वाचलेल्या ओळी आठवतात. 
"शब्दांना नसते सुख, शब्दांना दु:खही नसते;
जे वाहतात ओझे, ते तुमचे माझे असते"!!
स्वरांच्या बाबतीत असाच विचार करणे योग्य आहे का? खरेतर स्वर म्हणजे निसर्गातील ध्वनी. त्यांना आपण, शास्त्राची जोड दिली आणि त्याला अभिजात स्वरूप प्रदान केले. याचाच वेगळा अर्थ, त्या स्वरांचे नैसर्गिकत्व कायम राखणे, हाच उद्देश असू शकतो. त्यावर मानवी भावनांचे आरोपण करणे, अन्यायकारक असू शकते. असे झाले तरी देखील, स्वरांच्या सान्निध्यात वावरताना, आपल्या मनात भावनांचे तरंग उमटत असतात, अगदी अनाहूतपणे, ही देखील वस्तुस्थिती आहे. 
आरोही स्वरांत, "रिषभ" आणि "धैवत" वर्जित  असल्याने, "औडव" जातीचा राग तर पुढे अवरोहात हे दोन्ही वर्जित स्वर अस्पष्टपणे लावले जातात. पूर्वीच्या संदर्भात बघायला गेलो तर, या रागात, "मध्यम" फक्त शुद्ध स्वरूपात लावला जायचा परंतु आधुनिक काळात, "तीव्र मध्यम" उपयोगात आणला जातो. अर्थात, जेंव्हा हा स्वर लावला जोतो, तेंव्हा हा राह लखलखून समोर येतो. आरोहात "ग म प नी सां" ही स्वरसंगती या रागाची ठेवण दर्शवते. बहुतेक स्वर "शुध्द" स्वरूपात लावत असल्याने, या रागाला "ऋजू" स्वरूप प्राप्त झाले. आक्रमकता, या रागाच्या स्वभावाशी फटकून वागते. वास्तविक, "गंधार" आणि "निषाद" हे "वादी - संवादी" असले तरी देखील, "मध्यम" स्वराचा प्रयोग हेच वैशिष्ट्य मानले जाते. आता आपण, शास्त्राच्या अधिक आहारी न जाता, त्याच्या "ललित" स्वरूपाकडे वळूया.  


उस्ताद रशीद खान यांची बिहाग रागातील रचना ऐकुया. मुळात, या गायकाचा अत्यंत मृदू आवाज, त्यामुळे उपरिनिर्दिष्ट भावना, इथे अतिशय सुंदररीत्या सादर झाली आहे. स्वर उच्चारताना, त्याचा "स्वभाव" ओळखून, गायला गेला तर होणारे गायन, अधिक प्रभावी ठरते. रशीद खान, इथेच नव्हे तर एकुणातच "मंद्र सप्तक" किंवा "शुद्ध स्वरी सप्तक" गायन करतात. याचा एक परिणाम असा होतो, रसिकाला स्वराची "ओळख" करून घेता येते. ताना घेताना देखील, अति दीर्घ स्वरूपाच्या ताना टाळून, गायची पद्धत आहे, प्रसंगी तान  खंडित करून, दोन भागात तान, पूर्ण करण्याचा विचार दिसतो.सुरवातीला लावलेला अति खर्ज आणि त्यातून पुढे आवाजात आलेला मोकळेपणा, यामुळे ही रचना अधिक वेधक होते. कधीकधी तर, बंदिश, भावगीताशी दुरान्वये का होईना, पण नाते सांगते की काय? असा भास निर्माण करण्याइतकी जवळीक साधली जाते. या मागे अर्थात, जे रसिक, शास्त्रापासून दूर असतात, त्यांना देखील रंजक वाटावे, हा स्पष्ट विचार दिसतो. असे करताना देखील, आपण "बंदिश" गात आहोत, याचे भान कुठेही सुटलेले दिसत नाही आणि खरेच तारेवरची कसरत आहे.  


"गृहप्रवेश" चित्रपटात या रागावर आधारित अतिशय सुंदर गाणे आहे. "बोलिये सुरिली बोलीया" हेच ते गाणे. संगीतकार जयदेव यांची निर्मिती आहे. या संगीतकाराच्या बहुतांशी रचना या "गायकी" ढंगाच्या असतात आणि त्यामुळे गाताना, फार जपून, विचार करून गाव्या लागतात. रचनेतच, अनेक गुंतागुंतीच्या रचना करून, गायक/गायिकेच्या गळ्याची परीक्षा बघणाऱ्या असतात. गाण्यात, सरळ, स्पष्ट असा केरवा ताल आहे पण, ताल अत्यंत "धीमा" ठेवलेला. त्यामुळे कविता आणि गायन, याचा आपल्याला सुरेख आस्वाद घेता येतो. 
गाणे जरा बारकाईने ऐकले तर ध्यानात येईल, गाण्यात काही ठिकाणी "बिहाग" दिसत नाही!! विशेषत: गाण्याचा पहिला अंतरा झाल्यानंतर, गाण्याची सुरवात ऐकताना, असे आढळून येते. हा संगीतकार किती कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता, याचे हे एक उत्तम उदाहरण. गाण्यात, राग सादर करणे किब=नवा त्या रागाच्या सावलीत गाणे तयार करणे, यात तशी "निर्मिती" आढळत नाही कारण, गाण्याच्या चालीचा "नकाशा" तुमच्या समोर असतो आणि त्यानुरूप गाणे तयार करायचे, इतकेच तुमच्या हाती असते परंतु, प्रत्येक रागात, अनेक छटांच्या शक्यता आढळत असतात आणि हाताशी असलेल्या कवितेनुरूप, रागातील एखादी छटा, कवितेच्या आशयाशी जुळते आणि त्या छटेनुसार, पुढे चालीचा वेगवेगळ्या लयीच्या अंगाने विस्तार करायचा, ही या संगीतकाराची खरी खासियत होती आणि तीच इथे दिसून येते.   


"गुंज उठी शहनाई" या चित्रपटात, खऱ्या अर्थात, "बिहाग" राहाची "ओळख" देणारे गाणे आपल्याला ऐकायला मिळते. "तेरे सूर और मेरे गीत", हेच ते गाणे. मघाशी, मी या रागाचा स्वभाव "ऋजूतेशी" जोडला होता आणि या गाण्याच्या चाल्लीतून, नेमका तोच भाव दृग्गोचर होतो. संगीतकार वसंत देसायांची ही अजरामर कृती. लताबाईंच्या पहिल्याच आलापात हा राग समोर येतो. किती अप्रतिम लडिवाळ हरकत गायिकेच्या गळ्यातून निघाली आहे. या गाण्याची आणखी एक गंमत इथे मानादायाची आहे. गाण्याच्या प्रत्येक कडव्यानंतर जे संगीत असते, ती खास ऐकण्यासारखे आहे. बासरीचे सूर सुरवातीला खंडित स्वरूपात येतात परंतु एका विविक्षित क्षणी त्याच बासरीच्या सुराने, लयीचे संपूर्ण "वर्तुळ" पूर्ण केले जाते. हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही. गाणे "दादरा" या प्रचलित तालात बांधले आहे, गाण्याचा स्वभाव उत्फुल्ल आहे परंतु गाणे कुठेही आपली संयतशील मर्यादा सोडून भिरकटत नाही, 
सगळे गाणे, एका सुंदर बंधनात बांधले आहे पण तरीही बंधनातीत आहे. लताबाईंची सुंदर गायकी आणि मुळात, गाण्यच्या चालीत असलेला "अश्रुत" गोडवा, यामुळे हे गाणे कधीही ऐकायला सुंदर वाटते.  


काही वर्षापूर्वी "आलाप" नावाचा चित्रपट आला होता. त्यात, बिहाग रागाशी नाते सनगनारे एक गाणे आढळले. "कोई गाता मै सो जाता". याची चाल ऐकतानाच अवघड आणि गायकी ढंगाची आहे, हे जाणवते. संगीतकार जयदेवने या गाण्याची "तर्ज" बांधली आहे. राग संगीताच्या असंख्य छटा कशा असतात, हे इथे बघता येईल. वरती, याच संगीतकाराने अगदी वेगळ्या धाटणीची चाल निर्माण केली आहे आणि इथे संपूर्ण वेगळी चाल!! 
या गाण्यात मात्र, "तीव्र मध्यम" लागलेला दिसतो, जो मी वरती उद्मेखून मांडला आहे तरीही, हे गाणे, बिहाग रागाचे लक्षणगीत म्हणून मानणे कठीण आहे, इतके "तीरोभाव" या गाण्यात दिसतात. 
या गाण्याची मजा म्हणजे, गाण्यात हा राग दिसत आहे, असे वाटत असताना, चाल वेगळे वळण घेते आणि ऐकणाऱ्याला आश्चर्यचकित करते. पहिल्या ओळीत राग सापडतो पण, लगेच पहिला अंतरा वेगळ्या सुरावर सुरु होतो, तिथेच चाल थोडी रेंगाळते आणि अंतरा संपत असताना, आपल्याला बिहाग परत भेटतो!! या गाण्यात अगदी दोष(च) काढायचा झाल्यास, गायक येशुदास याचे शब्दोच्चार. कित्येकवेळा, त्याच्या आवाजातील "दाक्षिणात्य" हेल बरेचवेळा कानाला खटकतात. अन्यथा हे गाणे अतिशय सुंदर आहे.   


आपल्या मराठीत देखील या रागावर आधारलेली काही गाणी ऐकायला मिळतात. "चिमुकला पाहुणा" या चित्रपटात, असेच "गायकी" ढंगाचे अप्रतिम गाणे ऐकायला मिळते. "तुज साठी शंकरा" हे, संगीतकार स्नेहल भाटकर यांनी बनवलेले गाणे ऐका. ईश्वराची आळवणी आहे पण तरीही गाण्यात जबरदस्त गायकी आहे. पहिलीच ओळ बघा, "तुज" शब्द तसा खर्जात लावलेला आहे पण क्षणात "शंकरा" शब्दावर वरच्या सुरांत केलेली आलापी ऐकताना, आपण दिपून जातो आणि ही करामत लताबाईंची. खरतर, या गायिकेच्या गळ्याला कुठे "अटकाव" आहे, हा संशोधनाचा(च) विषय आहे. लयीची कितीही अवघड वळणे असू देत, गळ्यावर अशा काही पद्धतीने तोलून घेतली जातात आणि आपल्या समोर सादर होतात, की ऐकताना अविश्वसनीय वाटावे!! 
खरेतर, बिहाग रागापासून, काही ठिकाणी फटकून, चाल वळणे घेत पुढे सरकते, इतकी की, काही ठिकाणी "मारुबिहाग" रागाची सावली आढळते. अर्थात, "मारुबिहाग" राग हा, "बिहाग" रागाच्या कुटुंबातला असल्याने, तसा फार फरक पडत नाही.  

अटकर बांध्याचा हंसध्वनी

भारतीय रागसंगीतात एकूणच, बहुतेक सगळे राग हे, धार्मिक, भक्तीभाव समर्पण, प्रणयी किंवा दु:खी असेच भाव दर्शविणारे आहेत. अर्थात ह्या भावना, आपल्या संस्कृतीचा स्थायीभाव असल्याने, या भावनांचे प्रतिबिंब, कलेवर पडणे साहजिक आहे. या समजाला छेद देणारे काही राग आहेत, त्यात हंसध्वनी रागाचा समावेश होतो. एकूणच या रागाची ठेवण, आनंदी, उत्फुल्ल अशी आहे. खरेतर हा राग, कर्नाटकी संगीतातून उत्तर भारतीय संगीतात "आयात" केला गेला आहे पण, आता तो इतका चपखल बसला आहे  की,अशी ओळख दिली नाही तर दुसरी बाजू ओळखणे अशक्य!! 
कितीही झाले तरी कर्नाटकी संगीत हे देखील भारतीय संगीत(च) आहे. फरक आहे तो स्वर लावण्यात, सादरीकरणात. अन्यथा स्वर तेच असतात. हंसध्वनी, कलावती सारखे राग उत्तर भारतीय संगीताने आपलेसे केले तर तिलक कामोद राग कर्नाटकी संगीतात मानाने स्थिरावला.  हंसध्वनी राग, हा जसा कर्नाटकी संगीतात आहे, तसाच अगदी उचलून, उत्तर भारतीय संगीतात आणला. अर्थात मांडणी वेगळी झाल्याने सत्कृतदर्शनी, हा राग उत्तर भारतीय संगीतातलाच वाटतो. दोन्ही प्रकारात, या रागात, "मध्यम" आणि "धैवत" स्वर वर्ज्य आहेत आणि "पंचम"/"षडज" हे वादी - संवादी स्वर राहिले आहेत. "हंसध्वनी" हे नाव तसे संस्कृत भाषेच्या जवळ जाणारे असल्याने, आणि त्या अनुषंगाने विचार केल्यास, हा रागाचा अगदी प्राचीन ग्रंथांतून देखील उल्लेख आढळतो. तशी या रागाची प्रकृती "अटकर" बांध्याची आहे, एखादी सुडौल तरुणी किंचित नखरेलपणा दाखवीत रस्त्यावरून हिंडावी त्याप्रमाणे या रागाचे थोडे स्वरूप आहे. षडज, पंचम स्वरांचे प्राबल्य असले तरी जेंव्हा निषाद स्वरावर "ठेहराव" होतो, तिथे या रागाची खरी खुमारी जाणवते. आणखी थोडे शास्त्रोक्त लिहायचे झाल्यास, या रागातील "निषाद" स्वर हा चतु:श्रुतिक असल्याने, आरोह संपताना, हा निषाद अगदी वेगळा लागतो. अर्थात, श्रुती आणि स्वरांतर्गत श्रुतीव्यवस्था, हा विषय किचकट आणि प्रचंड मतभिन्नता असल्याने, इथेच थांबतो. 

आता आपण, उस्ताद अमीर खान साहेबांची या रागातील एक चीज ऐकुया. 


वास्तविक पाहता उस्ताद अमीर खान साहेबांची शैली आणि या रागाचा स्वभाव, हे समीकरण काही जुळणारे नव्हे पण तरीही या रागातील गंभीर भाव शोधून काढून, "जय माते" सारखी बंदिश सादर केली आहे. या गायकाची शैली हे बहुतांशी "मंद्र" सप्तकात किंवा "शुद्ध स्वरी" सप्तकात फिरणारी. आवाज अति खर्जातील असल्याने, आणि ठाय लयीत गाणे सादर करण्याची प्रवृत्ती असल्याने, बरेचवेळा या गायकावर टीका देखील झाली आहे परंतु रागाचे शुद्धत्व, स्वरांचे लगाव आणि "राग" सादर करण्याकडे ओढा असल्याने, आजही यांची गायकी अजोड मानली जाते. 
ही बंदिश ऐकताना देखील आपल्याला हेच  मिळेल. लय अगदी संथ, त्यामुळे आपण प्रत्येक स्वराचा नुसता आनंदच नव्हे तर प्रत्येक स्वर "न्याहाळू" शकतो. प्रत्येक स्वराला विस्तार करण्याची संधी, हा गायक देतो आणि असे फक्त ठाय लयीतच शक्य असते. इथे प्रत्येक तान, बोलतान, आणि हरकत ऐकण्यासारखी आहे. तान घेतली जाते पण लयीशी अचूक गणित जुळवून!! वेगळ्या शब्दात, इथे "तान" या अलंकाराला वेगळे अस्तित्व नसून स्वरसमुच्चाय बांधून, त्याला अनुलक्षून तान घेतली जाते. तसेच सरगम देखील या विचाराने घेतली आहे.  रागसंगीतात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारा हा गायक आहे. 

आता आपण, ज्या कर्नाटकी संगीतात, या रागाचे "मूळ" आहे, त्याचे स्वरूप बघूया. 


एम.एस. सुब्बलक्ष्मी हे नाव तसे भारतीयांना अपरिचित असू नये. ही रचना , तशी त्यांच्या उतरत्या वयाच्या काळातील आहे पण तरीही स्वरावरील पकड तसेच लयीवरील ताबा, विलक्षण म्हणायला हवा. कर्नाटकी संगीतात, बहुतांशी रचना या मध्य लयीत सुरु करतात, याउलट उत्तर भारतीय संगीतात सुरवातीला "आलापी" साठी भरपूर अवसर असतो. अर्थात या दोन्ही शैलीत आणि सादरीकरणात भरपूर फरक आहे. साधारणपणे, सामवेदातील ऋचा पठनातून या शैलीचा उगम झाला असे म्हटले जाते आणि वीणा वादनातून रचनांची निर्मिती झाल्याचे मानले जाते. याचा परिणाम असा झाला, कर्नाटकी संगीतात, रचना सादर करताना, साथीला म्हणून, "वीणा","बांसरी"."व्हायोलीन" तसेच "घटम","खंजीरा", "मृदुंगम" इत्यादी तालवाद्ये वापरली जातात. या सगळ्याचा परिपोष प्रस्तुत रचनेत आपल्याला मिळेल. 
मी मुद्दामून, "वातापी गणपती भजेहम" हीच रचना निवडली आहे कारण, याच रचनेचा आधार घेऊन, पुढे अनेक रचना तयार झालेल्या दिसून येतील. तसे बघायला गेल्यास, documentation या दृष्टीने, पंडित शारंगदेव यांच्या लेखणीतून उतरलेला "संगीत रत्नाकर" या ग्रंथात कर्नाटकी संगीताची पाळेमुळे वाचायला मिळतात. अर्थात त्या बाबत आणखी इथे लिहिणे थोडे अप्रस्तुत ठरेल. 


प्रस्तुत गाणे म्हणजे या रागाचे लक्षण गीत असे म्हणता येईल. "जा तोसे नही बोलू कन्हैय्या" ही लताबाई आणि मन्ना डे यांनी गायलेले युगुलगीत म्हणजे रागदारी संगीत, सुगम संगीतात कसे वापरावे, याचा सुंदर वस्तुपाठ आहे. तीन तालात सुरु होणारी ही रचना, खरे तर एक नृत्यगीत आहे पण तरीही ऐकताना, नृत्याचे बोल आणि सरगम, याचा फारच बहारीने उपयोग करून घेतलेला आहे. लताबाई काय किंवा मन्ना डे काय, दोघेही गायक, शास्त्रीय संगीताची आवश्यक तितकी तालीम घेऊनच या सुगम संगीताच्या क्षेत्रात आले. सुगम संगीतात, गायकी किती दाखवायची आणि कशाप्रकारे रंजकतेने मांडायची, यासाठी हे गाणे नक्की अभ्यासपूर्ण आहे. गाण्यात, दीर्घ ताना आहेत, वक्र गतीच्या हरकती आहेत पण हे सगळे, गाण्यात अलंकार म्हणून न वावरता, त्या गाण्याला पूरक असे यांचे अस्तित्व आहे.  
युगुलगीत हे नेहमी एकमेकांच्या गायकीला "पूरक" असे असते, निदान असावे. त्यादृष्टीने बघायला गेल्यास, या गाण्यात, दोन्ही गायकांनी ज्या प्रकारे, ताना किंवा हरकती घेतल्या आहेत, त्या खास ऐकण्यासारख्या आहेत. कधीकधी तर, संपूर्ण तान न घेता, मध्येच तान खंडित करून, रचनेतील ताण वाढवीत, सुंदररीत्या मांडणी केली आहे. इथेच तुमच्या गायकीचा खरा "कस" लागतो. तान घेताना, तुम्हाला एक सांगीतिक "अवकाश" मिळालेला असतो परंतु अशा काही प्रसंगी, तो अवकाश मध्येच खंडित करून, क्षणात दुसऱ्या गायकाने नवीनच हरकतीची निर्मिती करून ऐकणाऱ्याला स्तिमित करायचे, हा खेळ फारच बहारीचा झाला आहे. 


ही रचना म्हणजे मीरेचे अप्रतिम भजन आहे. "करम की गती न्यारी" कविता म्हणून फारच सुंदर आहे. याच्या सुरवातीला, पारंपारिक भजनी ठेक्यात, "राम कहिये, गोविंद कहिये" या ओळी ऐकायला मिळतात पण, त्या ओळी हंसध्वनी रागाशी नाते सांगत नाहीत. लगेच लताबाईंची अप्रतिम आलापी ऐकायला येते आणि पाठोपाठ ही रचना सुरु होते. सुरवात तर पारंपारिक केरवा तालात होते परंतु पहिल्या अंतरा जिथे संपतो तिथे हाच ताल "दुगणित" जातो आणि लय देखील वाढते. 
तसे बारकाईने पाहिले तर, ही रचना काही वेळा रागाची बंधने सोडून वेगळी होते, जे सुगम संगीताच्या संस्कृतीस सुसंगत आहे म्हणा. एकुणात ही रचना, हंसध्वनी रागाशी नाते सांगते असे म्हणता येईल. अर्थात, संगीतकाराच्या शैलीनुसार (संगीतकार हृदयनाथ मंगेशकर) गाण्यात नेहमी प्रमाणे अनेक, गुंतागुंतीचे सांगीतिक वाक्यांश आहेत, जेणेकरून, रचना हळूहळू अवघड बनत जाते. परंतु तालाच्या मात्रा आणि त्यानुरून येणाऱ्या हरकती, फारच विलोभनीय आहेत. 


मराठी चित्रपटातील एक अजरामर गाणे - "आली हासत पहिली रात". गाण्याची चाल बघायला गेल्यास, त्यात फारशा गुंतागुंतीच्या ताना नाहीत, अपवाद गाण्याच्या सुरवातीचा असामान्य आलाप. असला अवघड आलाप केवळ लताबाईच घेऊ शकतात. तो आलाप संपतो आणि गाणे अतिशय द्रुत लयीत सुरु होते आणि गाण्याची गंमत सुरु होते. सुरवातीला, मी हंसध्वनी रागाचा "स्वभाव" आनंदी, उत्फुल्ल असा केला आहे आणि हे गाणे त्या वर्णनाला पूरक असे आहे. 

आता मी इथे काही गाण्यांच्या लिंक्स देत आहे, ज्यायोगे हा हंसध्वनी राग आणि त्याचे स्वरूप आपल्याला नेमकेपणे समजून घेता येईल. अतिशय गोड चाल आहे, त्यामुळे तुमच्या मनात सहज उतरते. सुरवातीचा आलाप, रसिकांचे लक्ष वेधून घेतो आणि शेवटपर्यंत या गोड चालीचे गारुड मनावरून खाली उतरत नाही. गाण्यात अतिशय बारीक हरकती, ज्या गाण्याच्या सौंदर्यात अनुपम भर टाकते. 

१] झाले युवती मना दारुण रण 

२] शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती 

३] दाता तू गणपती गजानन