Wednesday 30 September 2015

पीटरमेरीत्झबर्ग भाग १

१९९३ च्या अखेरीस, मी नायजेरियाहून परत मुंबई इथे आलो. परदेशी नोकरी करण्याची जरी हौस फिटली नसली तरी अनुभव मात्र भरपूर पदरी जमा झाला होता. ध्यानीमनी नसताना, त्यावेळी मला Hongkong इथल्या नोकरीसाठी बोलावणे आले आणि मी निवडला गेलो. या शहराविषयी तशी बरीच माहिती होती आणि मी जायला उत्सुक देखील होतो. निवड पक्की झाली आणि तिसऱ्या दिवशी मला, साउथ आफ्रिकेसाठी, मुलाखतीचे बोलावणे आले. वास्तविक, त्यावेळी, साउथ आफ्रिकेबद्दल, इनमिन ४ शहरे आणि नेल्सन मंडेला व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हती. वर्णभेदाचा देश आणि तिथल्या संघर्षाची तुटपुंजी माहिती, इतपतच. परंतु साउथ आफ्रिकेचा व्हिसा लवकर मिळाला. किंबहुना, माझी नोकरी, "पीटरमेरीत्झबर्ग" शहरात आहे आणि या शहराचे नाव. मी प्रथमच ऐकले होते. गांधींना गाडीबाहेर काढले, हा इतिहास माहित होता पण, याच शहरात, याची कल्पना नव्हती!! व्हिसा मिळाला, तशी माझी पहिली भावना - चला आणखी एक नवीन देश बघुया, इतपतच मर्यादित होती. त्यावेळी, भारतातून जोहान्सबर्ग आणि डर्बन, या शहरात थेट विमान वाहतूक होती आणि त्यानुसार मी, एयर इंडियाच्या विमानातून, डर्बन इथे उतरलो. विमानतळावर उतरलो आणि या देशाच्या संपन्नतेची झलक बघायला मिळाली!! तोपर्यंत, माझी मजल, मुंबई आणि लागोस, इतकीच होती. लागोस विमानतळ म्हणजे म्हणजे मुंबईचा विमानतळ भव्य आणि आधुनिक वाटावा!! अत्यंत सुव्यवस्थित व्यवस्था, कुठेही कसलाही गोंधळ नाही आणि अति स्वच्छ आणि प्रचंड. पुढे जोहान्सबर्ग बघितल्यावर, याचे आकर्षण कमी झाले. 
विमानतळाच्या बाहेर, आमचा M.D. हरून उभा होता - यानेच मुंबईत माझी निवड केली होती. त्याच्या गाडीतून (त्याची मर्सिडीज ५०० गाडी होती आणि तेंव्हा त्याचे आकर्षण वाटले होते!!) मी, पीटरमेरीत्झबर्ग शहराकडे निघालो. डर्बन पासून ९० कि.मी. अंतरावर वसलेले हे शहर. जसे डर्बन पाठी राहिले तशी वातावरण बदलले. वास्तविक, सरत्या थंडीचे दिवस होते पण, तरीही गारवा जाणवत होता. तसेच आजूबाजूला असलेली गर्द झाडी, तसेच रस्त्यांचा गुळगुळीतपणा!! अगदी सलग ४०कि.मी.चा सरळ, स्वच्छ रस्ता!! याचेच मला तेंव्हा कितीतरी आश्चर्य वाटले. हॉलीवूड चित्रपटातून किंवा अनेक इंग्रजी पुस्तकांमधून, रस्त्याची वर्णने, इतकी वर्षे वाचीत/बघत होतो, त्याचा प्रत्यक्षानुभव केवळ अफलातून असाच होता (आजही मनावर तेच चित्र उमटलेले आहे) हरूनने, मला माझ्या घराशी सोडले, घराची व्यवस्था दाखवून दिली आणि निघून गेला. त्या घरात, मी आणि इतर दोन मित्र रहात होते. गाडीतून येताना, हरूनने कंपनीची सगळी माहिती दिली. कंपनीची सध्या एक (खाद्य) तेलाची रिफायनरी, त्याला जोडून मार्जरीन बनवण्याचा कारखाना, तसेच साबण बनवण्याचा देखील कारखाना आणि Corrugated Boxes बनविण्याचा, त्यामानाने छोटा कारखाना होता. नवीन रिफायनरी बांधण्याची सुरवात झाली होती. एकूण आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेली कंपनी असल्याने, डोक्यावरील प्रेशर कमी झाले. 
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो. नेहमीप्रमाणे "ओळख परेड" झाली आणि कामाचे स्वरूप समजून घेतले. हवेत चांगलाच गारठा होता कारण आदल्या दिवशी रात्री पाउस शिंपडला होता. ऑफिसमध्ये एक, दोन व्यक्ती सोडता, सगळे भारतीय वंशाचे होते आणि मुख्य म्हणजे माझ्या वयाच्या आसपास असलेले होते. त्यामुळे इथे "सेटल" व्हायला फारसा वेळ लागला नाही. माझ्या ऑफिसमध्ये, सुरवातीला दोन मुस्लिम मुली होत्या - नसीमा आणि फरझाना. दोन्ही वागायला अतिशय मोकळ्या होत्या पण तरीही त्यांच्या मनात कुठेतरी "खंत" जाणवायची, विशेषत: आमच्या गप्पा ड्रिंक्स वगैरे विषयावर आल्या म्हणजे इथे मौनव्रत!! 
हळूहळू गाव परिचयाचे व्हायला लागले. पीटरमेरीत्झबर्ग, हे शहर ४ डोंगरांवर वसलेले आहे पण हे कळण्यासाठी, मला बरेच भटकावे लागले. माझ्या ऑफिसच्या गल्लीच्या टोकाला गेलो म्हणजे या शहराच्या विस्ताराची कल्पना यायची आणि गंमत म्हणजे माझे ऑफिस देखील डोंगराच्या एका टोकावर आहे, हे समजले!! समुद्र सपाटीपासून इतक्या उंचावर हे शहर असल्याने, इथे थंडीचा प्रभाव अधिक आहे. दुसरी बाब लगेच ध्यानात आली म्हणजे इथे घरात शक्यतो "Ceiling Fans" नाहीत. हवा चोवीस तास कोरडी, वर्षातील सहा ते सात महिने थंडीचे आणि उन्हाळ्यात देखील, पावसाचे लक्षणीय प्रमाण असल्याने, हवा थंड रहायची. त्यामुळे घरात पंख्यांची फारशी गरज भासायची नाही.  शहरात,गोरे आणि भारतीय वंशाच्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक. साउथ आफ्रिकेत, डर्बन सोडल्यास, याच शहरात, भारतीय वंशाची माणसे भरपूर भेटतात. याचे प्रमुख कारण म्हणजे, जेंव्हा इथे गोऱ्या लोकांना, या भागात आणि इतर भागात, उसाची आणि पर्यायाने साखरेची लागवड करायची होती, त्यावेळेस,  त्यांनी भारतातून इथे "गुलाम" आणले आणि तेंव्हा ते भारतातून जहाजाने इथे आले, ते प्रथम डर्बन किनाऱ्यावर आणि मग पुढे, डर्बन पासून केवळ ९० कि.मी. वर असलेल्या या शहरात हे भारतीय वस्तीला आले. आता, विचार केला तर, या गोष्टीला १५० वर्षे होऊन गेली. 
इथे भारतीय वंशाची माणसे विपुल भेटतात. त्यांचे भारतातले मूळ बघायला गेल्यास, प्रामुख्याने, तामिळनाडू, आंध्र तसेच बिहार, उत्तर प्रदेश व राजस्थान इथून बरीच "आयात" केली. अर्थात गुजरात यात आलाच. गंमतीचा भाग म्हणजे जरी गुजरातवरून इथे माणसे आली तरी त्यातही बहुतेक माणसे ही काठीयावाड, कच्छ, सौराष्ट्र इथल्या भागातून अधिक आली आहेत. आता इथे यांच्या पाच, सहा पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि ही माणसे आता "पक्की" साउथ आफ्रिकन झाली आहेत. अपवाद इथल्या गुजराती लोकांचा. हे गुजराती मात्र अजूनही, घरात पारंपारिक गुजराती संस्कार टिकवून आहेत, इतकेच नव्हे तर, गुजराती भाषा देखील अस्खलित बोलतात, विश्वास बसत नाही की ही इथली पाचवी, सहावी पिढी आहे. अन्यथा, इतरेजनांनी मात्र, मूळ भाषेशी कधीचा "काडीमोड" घेतलेला!! अर्थात, त्यांना तसा दोष देण्यात काहीही अर्थ नाही. वर्षानुवर्षे हा देश "बाजूला" टाकलेला असल्याने, यांचा बाहेरच्या देशांशी फारसा संपर्क उरलेला नव्हता. अशा परिस्थितीत, त्यांना हिंदी भाषा आलीच पाहिजे, असा आग्रह धरणे चुकीचेच ठरते. 
अर्थात, या लोकांना भारताचे कमालीचे आकर्षण आहे. कधीतरी भारतात यायचे आणि आपले "मूळ" गाव बघायचे, असली ओढ लागलेली असते. प्रत्यक्षात फार थोड्यांची इच्छा पूर्ण होते. याचा परिणाम असा होतो, इथे हिंदी चित्रपटांचे वाढलेले अतोनात प्राबल्य. मी मुंबईचा म्हटल्यावर, सुरवातीला इथले कित्येकजण, माझ्याकडे अमिताभ बच्चन, शाहरुख यांच्याबद्दल चौकशी करायचे आणि मी त्याच शहरात रहात असून देखील अजून भेटलो नाही, हे समजल्यावर आश्चर्य व्यक्त करायचे!! तोच प्रकार सचिन बाबत!! इथे एक गोष्ट स्पष्ट करायलाच लागेल, युरोप/अमेरिकेत गेलेले बहुतेकजण "बौद्धिक" दृष्ट्या वरच्या पातळीवर शिकलेले होते आणि ते तिथे गी आणि कायमचे स्थिरावले. साउथ आफ्रिकेत जे भारतीय आले, त्यांची आर्थिक परिस्थिती भारतातच हलाखीची होती, शैक्षणिक पात्रता फारशी नव्हती आणि अशा परिस्थितीत ही माणसे इथे कायमची रहायला आली. आज, इथले बरेचजण, सुस्थितीत आहेत पण तरीही अजूनही शिक्षणाच्या नावाने वानवा(च) आहे. इथले बरेचसे भारतीय अधिकाधिक केवळ "Metric"  होण्यातच धन्यता मानणारे आहेत. इथे आणखी एक बाब नोंदवावी लागेल आणि ती म्हणजे इथे शिक्षण, भारताच्या मानाने प्रचंड महाग आहे आणि त्यामुळे इथे शिक्षणाबद्दल काहीशी अनास्था आढळते. पदवीधर होणे, म्हणजे मोठा सोहळा असतो आणि त्याला समाजात भरपूर मान असतो. यात आणखी एक बाब मांडायला लागेल. आता इथे गोऱ्यांचे राज्य खालसा झाले आणि Blacks लोकांचे राज्य आले. या नवीन राज्यपद्धतीत, Blacks लोकांना अनंत सुविधा मिळाल्या, मग त्या आर्थिक असोत, सामाजिक असोत. मात्र, या नवीन राज्यात, भारतीय वंशाच्या लोकांच्या पदरी फारसे काही पडले नाही. 
काळ्यांना अतिशय स्वस्तात शिक्षण उपलब्ध झाले, राहायला स्वस्तात घरे मिळाली, नोकऱ्यांमध्ये "आरक्षण" मिळाले. एकूणच पुनर्वसन चांगल्या प्रकारे होत गेले. यात, इथले भारतीय बहुतांशी तसेच राहिले. कधीकधी यांच्या बोलण्यात खंत आढळते. मी जेंव्हा या शहरात आलो, तेंव्हा काही महिन्यांपूर्वी इथे प्रथमच लोकशाही मार्गाने निवडणुका होऊन, नेल्सन मंडेला प्रथमच सत्तेवर विराजमान झाले होते. लोकांना, त्यांच्यापासून खूप अपेक्षा होत्या आणि त्या दृष्टीने, मंडेलांनी पावले देखील टाकली होती पण दुर्दैवाने, १९९९ नंतर त्यांनी राजकारण संन्यास घेतला आणि देशाला उतरती कळा लागली!! वास्तविक, मंडेलांनी, मंत्रिमंडळ बनवताना, काळे, गोरे आणि भारतीय, यांचा चांगला समन्वय राखला होता. त्यांनी, गोऱ्या लोकांचे महत्व ओळखले होते पण त्यानंतर अशी दूरदृष्टी ठेवणारे नेते लाभले नाहीत आणि इथला भारतीय समाज, आता कात्रीत सापडलेला आहे!! आमच्या ऑफिसमध्ये, जे भारतीय होते, त्यांच्या मनात ही खंत होती आणि बरेचवेळा पार्टीला बसल्यावर, कधीतरी मनातून हे शल्य बाहेर पडायचे!! 
तसे बघितले तर, इथले भारतीय, इथल्या सामाजिक आणि आर्थिक स्तराच्या दृष्टीकोनातून बघितल्यास, अपवाद वगळता, कधीही उच्च आर्थिक गटात सामावण्याइतके वरच्या पातळीवर पोहोचले नाहीत. आता, नोकरी हा जिव्हाळ्याचा विषय घेतला तर इथे आता, Black Empowerment कायदा लागू केला आहे आणि त्यानुसार, एखाद्या कंपनीचा आर्थिक व्यवहार, एका ठराविक पातळीवर गेला की, तिथे १० टक्के कामगार काळे असणे, अत्यावश्यक आहे आणि याचा या समाजाला भरपूर फायदा होतो पण असे कायदे इथल्या भारतीयांना लागू होत नाहीत!! म्हणजे, पूर्वी गोऱ्यांची सत्ता होती तेंव्हा त्या समाजाची चलती होती आणि आता काळ्या लोकांचे राज्य आले तर त्यांनी आपल्या समाजाचा फायदा बघितला!! भारतीय वंशाचे यात कुठेच बसले नाही!! असे असून देखील, इथे सामाजिक आणि आर्थिक स्तर, भारताच्या मानाने बराच वरचा आहे. एक उदाहरण देतो. आमच्या कंपनीच्या इमारतीसाठी, सुरक्षा व्यवस्था लागणे क्रमप्राप्तच होते. ती व्यवस्था, इथला एक भारतीय वंशाचा माणूस बघत होता आणि हा पुढे माझा चांगला ओळखीचा झाला. पुढे चांगली ओळख झाल्यावर, एकदा मी त्याच्याबरोबर, त्याच्या घरी गेलो. शहराच्या उपनगरात Raisethorp भागात घर आहे. घर कसले, दुमजली राजवाडा म्हणावा इतके प्रशस्त घर, घराबाहेर २ मर्सिडीज गाड्या उभ्या!! वास्तविक याचे शिक्षण बघायला गेल्यास, हा माणूस, शाळेच्या केवळ ६ इयत्ता शिकलेला पण इथे राजासारखा रहात आहे आणि असले जीवन इथे अपवाद म्हणून नसून, बहुतेक भारतीय याच भागात रहातात आणि प्रत्येकाची, कमी अधिक प्रमाणात, अशीच घरे आहेत. इथे टोलेजंग इमारतींना स्थान नाही!! आजही इथे Flat संस्कृती रुजलेली नाही. 
इथे गाडी घेणे, ही अत्यावश्यक गरज आहे. गाडी नसेल तर तुम्ही कायमचे घरात अडकलेले!! कुठेही बाहेर जायचे म्हणजे डोंगर उतरायचा किंवा चढायचा आणि इथे आपल्यासारखी, नाक्यावरच्या वाण्याची दुकाने, असला प्रकार नाही. म्हणजे कुठेही खरेदी करायचे झाल्यास छोटेखानी मॉल किंवा बाजार गाठणे क्रमप्राप्त. एकतर इथे रस्त्यावर हिंडणे, हा प्रकारच फारसा आढळत नाही. रस्त्यावर सतत गाड्या, सुसाट वेगाने धावत असतात. रस्ते अप्रतिम असल्याने, गाड्यांना त्या वेगाने जाणे सहज शक्य असते. पीटरमेरीत्झबर्ग शहर हे नाताळ राज्याचे, राजधानीचे शहर - डर्बन नव्हे!! त्यामुळे इथे सरकारी ऑफिसेस भरपूर. शहरात सगळीकडे ब्रिटीश व्यवस्थेची छाप पडलेली. इमारती देखील त्याच वळणाच्या आणि मॉल्स देखील त्याच धर्तीवर. शहर डोंगरावर वसलेले, त्यामुळे आजूबाजूला दाट झाडी आणि बहुतेकवेळा, विशेषत: डिसेंबर, जानेवारीच्या उन्हाळ्यात, इथे जो काही फुलांचा "मोसम" फुललेला असतो, तो बघण्यासारखा असतो, अगदी रस्त्याच्या कडेला देखील, कितीतरी रंगीत फुलांनी परिसर रंगतदार केलेला असतो. त्यामुळे इथे गाडी चालविणे, हा एक नयनरम्य सोहळा असतो. 
तसे बघितले तर इथे आजही प्रचंड इंडस्ट्रीज नाहीत पण तरीही इथल्या लोकांची सहज गुजराण होईल, इतपत आर्थिक व्यवहार चालतात. हवामान बघितले तर, इथे जोहान्सबर्ग, प्रिटोरिया प्रमाणे हाडे गोठवणारी थंडी नसते पण तरीही इथे थंडीत Jackets घालणे अत्यावश्यक. थंडीच्या मोसमात, इथल्या मैदानावर पायी हिंडणे, हा एक अनिर्वचनीय अनुभव आहे. पानगळ झालेली असते, सूर्याचा प्रकाश अंधुकसा असतो, वातावरण साधारणपणे ४ ते ५ तापमान इतके असते आणि अशा वातावरणात इथल्या मैदानावर हिंडणे, हाच खरा आनंद असतो. आकारमानाने गाव तसे लहानखोर आहे पण त्यामुळे असेल, मला इथे जिव्हाळ्याचे मित्र बरेच भेटले. त्यांच्या घरी, मी बहुतेक शनिवार रात्र जागवून काढल्या, त्यांच्या घरात हक्काने वावरलो. असे वावरणे, मला पुढे कधी जमले नाही. वातावरणात एक प्रकारचा स्निग्धपणा आहे, आपुलकी आहे. मोठ्या शहरात, जो रुक्षपणा जाणवतो, तसे इथे जाणवत नाही. 
या शहराने मला काय दिले? सर्वात प्रथम, या नवीन देशात कसे राहायचे? कसे वागायचे? याचे प्राथमिक धडे दिले, जे पुढे मोठ्या शहरांत राहताना उपयोगी पडले. मुख्य म्हणजे, तोपर्यंतचे माझे "तर्खडकरी" इंग्रजी बदलून, उच्चारात "हळुवार"पणा आणला. समोरच्याशी वागताना, त्याला योग्य मान देऊन, वागण्याची रीत शिकवली. नायजेरियात, वागण्यात एकप्रकारचा उर्मटपणा शिरला होता, त्याचे नामोनिशाण, इथल्या पहिल्या ४,५ महिन्यात शिल्लक राहिले नाही. तसे बघितले तर लागोसला राहताना मला, मी परदेशी रहात आहे, असे फारसे जाणवले नाही कारण तिथे हजारोंच्या संख्येने रहात असलेले भारतीय, जे माझ्यासारखे केवळ नोकरीसाठी आले होते आणि त्यामुळे माझी तिथली २ वर्षे कधी उलटून गेली, याचा पत्ता लागला नाही. इथे प्रथमच गोऱ्या लोकांबरोबर वारंवार वावरण्याचा अनुभव मिळाला. आमच्या कंपनीचा ऑडीटर गोरा असल्याने आणि त्याच्याशी सारखा संबंध येत असल्याने, माझे आयते शिक्षण झाले. आजदेखील, मी ठामपणे म्हणून शकतो, गोरा माणूस इतरांच्या मानाने खूपच विश्वासार्ह आहे, अर्थात अपवाद असतातच आणि ते तर प्रत्येक क्षेत्रात आढळतात. 
इथला अमेरिकन भारतीय तर फारच जवळून बघायला मिळाला आणि त्याच जोडीने, त्यांची "बाबा वाक्यं प्रमाणम" आंधळी वृत्ती देखील बघायला मिळाली. इथे, "गुड फ्रायडे" आणि जोडीने "इस्टर मंडे" एकत्रित साजरा केला जातो. त्यानिमित्ताने, सगळा देश चार दिवसांची सुटी उपभोगतो. (आणखी एक बाब, इथे त्यामानाने सुट्ट्यांचे प्रमाण फार नगण्य आहे. भारताप्रमाणे सुकाळ नाही!!) इथे, हे दिवस, तामीळ समाज आणि इतर हिंदू समाज, वेगवेगळ्या रीतीने साजरा करतात. गुड फ्रायडेला, "निर्जळी" उपास असतो. त्यानिमित्ताने देवळात, पूजा, होम हवन इत्यादी कार्यक्रम असतात. संध्याकाळी, मोठी मिरवणूक निघते. त्यात काही लोकं "तारेत" असतात!! म्हणजे, उघड्या अंगाने वावरत असतात आणि अंगावर लोखंडी आकडे अडकवतात, अडकवलेल्या आकड्यांत काही वेळा फुले तर काहीवेळा फळे लटकवून ठेवतात. काहीजण तर, जिभेत किंवा पापण्यांत आकडा अडकवतात (फळासकट!!) आणि मिरवणुकीत मिरवत असतात. ही मिरवणूक, देवळाशी येउन थांबते. तिथे, तोपर्यंत, होम वगैरे विधी संपलेले असतात. या होमात जे जळते निखारे असतात, ते सभागृहाच्या बाहेरील अंगणात आणून, जमिनीवर पसरवून ठेवतात. पुढील कार्यक्रम म्हणजे, या जळत्या निखारयावरून अनवाणी चालणे!! हे दिव्य अतिशय आनंदाने केले जाते. पहिल्याच वर्षी, मी हा सोहळा, अथ पासून इथि पर्यंत बघितला. मी उत्सुकतेने बघत आहे, हे पाहून, माझ्या ओळखीच्या कुटुंबातील एका वयस्कर माणसाने, माझे बौद्धिक घेतले आणि "आम्ही भारतीय परंपरा, किती अभिमानाने जतन केल्या आहेत", हे मला सांगतो. काय बोलणार!! साउथ आफ्रिकेसारख्या प्रगत देशात, भारतातील हळूहळू अस्ताला जाणारी कृत्ये, इथे "भारतीय संस्कृती" म्हणून अभिमानाने मिरवतात. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी!! पुढे, हाच सोहळा अधिक भव्य प्रमाणावर, डर्बन इथल्या "फिनिक्स" या उपनगरात बघितला!! 
अर्थात, या सोहळ्यात, इथले गुजराती मात्र सामील होत नाहीत. त्यांचे देऊळ वेगळे. हा तर इथला आणखी अतर्क्य प्रकार. तामीळ + तेलगु यांचे देऊळ वेगळे तर गुजराती समाजाचे देऊन वेगळे आणि इतर हिंदूंचे देऊळ वेगळे!! खरतर, इथे तामीळ आणि हिंदू, असे दोन वेगळे घटक आहेत. असे का? या प्रश्नाला उत्तर नाही!! देऊळ वेगळे, हे समजण्यासारखे आहे पण म्हणून त्या वेगळ्या देवळात जायचे देखील नाही, असला प्रघात!! असे असले तरी, एकमेकांच्या घरी जाणे असते, लग्ने होतात. लग्न झाल्यावर, मग जाणारी मुलगी लगेच "धर्मांतर" करते!! 
या शहराने मला शिस्त, स्वच्छता आणि शांतता, यांचे अपरिमित महत्व पटवून दिले. वास्तविक, सुरवातीला, जरा गोंधळलो होतो, हे शहर संध्याकाळी पाच नंतर शांत होते. रस्त्यावरील वर्दळ, जवळपास नाहीशी होते!! सगळे शहर चिडीचीप होऊन जाते. मला फार नवल वाटायचे आणि मुंबईची आठवण यायची. मुंबई संध्याकाळी, पुन्हा ताजीतवानी होते!! माझ्या शेजारी, गोरे कुटुंब रहात होते. त्यांचा खाक्या तर फारच अजब. माझ्या घरात जरा मोठा आवाज झाला तर दारावर लगेच टकटक!! आवाज फार वाढत आहे, तेंव्हा जरा सबुरीने घे.गंमत आणि नवलाचा भाग म्हणजे, त्यांना दोन वर्षांचे मूल होते. इतके महिने शेजारी राहिलो, एका रात्री देखील त्या मुलाच्या रडण्याचा आवाज कानी पडला नाही!! एकूणच गोऱ्या लोकांची मुले देखील बहुतांशी कमी बडबडी आढळली!! 
इथल्या रेल्वे स्टेशनवर महात्मा गांधींना ज्या डब्यातून बाहेर काढले होते, तो डबा आणि तो इतिहास, जतन करून ठेवला आहे. इथेच एक सुंदर छोटेखानी म्युझियम आहे, वर्णभेदाच्या काळातील, हालअपेष्टांचे साग्रसंगीत प्रदर्शन मांडून ठेवले आहे. इथे केवळ वर्णभेद नव्हता तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनंत घटना घडल्या होत्या, अनन्वित छळ तर पाचवीला पुजला होता. केवळ मानसिक खच्चीकरण नसून शारीरिक हालांना पारावार नव्हता. कुणाकडे तक्रार करायची आणि काय म्हणून करायची? या देशाने फार भोगले पण म्हणूनच नेल्सन मंडेलांचे एका बाबतीत नेहमीच कौतुक करायला लागेल. १९९४ साली, त्यांचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी देशांत विध्वंस होणे सहज शक्य होते पण त्यांनी, आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा उपयोग करून, सत्ताबदल शांततेत घडवून आणला. उलट्या बाजूने विचार करता, इतर आफ्रिकन देशांतील सत्ताबदलाचा इतिहास बघणे, आवश्यक ठरेल.  

Tuesday 29 September 2015

विकल जोगिया



"तो हाच दिवस हो, तीच तिथी, ही रात; ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत;
वळूनी न पाहतां, कापीत अंधाराला, तो तारा तुटतो - तसा खालती गेला. 
हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान, त्या खुल्या प्रीतीचा खुलाच हा सन्मान; 
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षांत एकदां असा "जोगिया रंगे."
माडगूळकरांच्या या अजरामर ओळी खरेतर, 'जोगिया" रागाची एक छटा दर्शवतात. तसे   काय किंवा  काय, या कलाकृतींचा एकच एक ठाम अन्वयार्थ लावणे, हे त्या कलाकृतीवर काहीसे अन्याय करणारे असते आणि बहुदा हा एक (एकमेव नव्हे) निकष, उत्तम कलाकृतीबाबत मांडता येईल. आस्वादाच्या दृष्टीने हे गुंतागुंतीचे होऊ शकते परंतु सतत वेगवेगळ्या अर्थछटा दृग्गोचर होणे, हे आव्हानात्मक देखील असू शकते. एका बाजूने मांडायचे झाल्यास, कविता काय किंवा संगीत निर्मिती काय, याची निर्मिती ही नेहमीच "अबोध" मनातून होत असते आणि त्याचे चलनवलन नेमके शब्दबद्ध करणे, निरातिशय जिकीरीचे होऊ शकते आणि परत त्यात व्यक्तिपरत्वे अनुभूती येउन, मग अन्वयार्थ अधिक अवघड होऊ शकतो. पण, हीच कलेची खरी "मजा" आहे, हे लक्षात घेतल्यास, बऱ्याच शंकांचा निचरा होऊ शकतो.
जोगिया रागाबाबतची माझी भूमिका यावरून लक्षात येणे शक्य आहे. "गंधार" आणि "निषाद" स्वर वर्ज्य असलेल्या या रागात, "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत", या स्वरांचे प्राबल्य आहे, इतके की, जरी "षडज","मध्यम" हे स्वर या रागांचे "वादी - संवादी" असले तरी  मनात तरळत राहतात, ते हेच कोमल स्वर आणि या स्वरांवर घेतलेला "ठेहराव". संस्कृत ग्रंथानुसार रागाचे वर्गीकरण "भैरव" थाटात केलेले आहे आणि बहुदा याचा परिणाम असावा, पण रागाची वेळ ही, पहाटेचा पहिला प्रहर सांगितलेला आहे. आता, याच अनुषंगाने बघायचे झाल्यास, वर दिलेल्या माडगूळकरांच्या ओळी किती अन्वर्थक ठरतात, हे सहज ध्यानात येऊ शकेल. या रागाची खरी ओळख दाखवायची झाल्यास, "प ध नि ध प" किंवा "प ध म रे सा" या स्वरसंहतीचा मागोवा घेत राहिले तर समजून घेता येईल. 
एखाद्या कलाकाराची एखाद्या रचनेशी कायमची नाळ जुळते आणि ती रचना म्हणजे त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्वाची नाममुद्रा म्हणून प्रस्थापित होते. पंडित भीमसेन जोशींची "पिया मिलन की आस" ही रचना इतकी लोकप्रिय झाली की इतर कुणा गायकाने, ती रचना गायला दहादा विचार करावा. आपण इथे तीच रचना ऐकायला घेऊया. जोगिया रागाचा "अर्क" म्हणजे ही रचना, असे म्हणता येईल. विशेषत: तार सप्तकातील ठेहराव आणि आस, फारच अप्रतिम आहे. 


ज्या रागांत भावनिक आवाहन आहे, असेच राग बहुतांशी वेळा या गायकाने निवडल्याचे सहज ध्यानात येऊ शकते. आता, रागामध्ये भाव किंवा मूड का निर्माण होतो, हा संगीत सौंदर्यशास्त्रातील जटील प्रश्न आहे. परंतु, अनवट रागांपेक्षा प्रचलित राग, हे रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करू शकतात आणि त्यानुसार रागांची निवड करणे, हे धोरण या गायाकाच्याच बाबतीत नेमकेपणी दिसून येते. अर्थात, अशा प्रकारच्या निवडीने, गायनात साचेबद्धता येण्याचा धोका निर्माण होतो पण पंडितजींनी त्याबाबत सावधगिरी बाळगून, त्यात नाविन्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हे देखील समजून घेता येते. एकूणच संपूर्ण गायनाचा विचार केला तर, तानांची गुंतागुंत, आग्रा घराण्याच्या आघातयुक्त आणि पुनरावृत्त स्वरांच्या परिणामांवर अवलंबून असलेल्या तानांच्या अंगाने जाते, असे म्हणता येईल. शिवाय त्यात भर आहे, ती आवाजाच्या लगावातील विरोधसंबंधामुळे अवतरणाऱ्या नाट्यात्मतेची. बोल-लय, बोलतान वा तिहाई वगैरेंवर फारसा भर नाही परंतु अंतिम परिणाम रंगदार होतो की नाही, हीच कसोटी अखेरची असते आणि तिथे मात्र पंडितजी बाजी मारून जातात.  ठुमरी अंगाने जाणारी रचना पण तरीही शब्दाचा आशय बघता, त्यानुसार केलेले असामान्य सादरीकरण, असेच इथे म्हणता येईल.  
 भारतीय संगीतरचनाकारांना त्यांच्या शास्त्रोक्त संगीताकडील झुकावानुसार जोखणे योग्य आणि गरजेचे आहे, हा अत्यंत चुकीचा समज आहे. परंतु दुर्दैवाने, भारतीय रागसंगीताचे ज्ञान वा तत्संबंधीची सर्वसाधारण माहिती असणे, याला एक योग्यता-निकष म्हणून बरीच प्रतिष्ठा लाभली आहे. मग, संगीतरचनाकार कुठल्याही संगीतकोटीत काम करीत असू दे. या दृष्टीने विचार करता, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांचा विचार, रचनाकार म्हणून करताना, विश्लेषण करणे आवश्यक ठरते. वास्तविक त्यांची सगळी कारकीर्द बघितली तर आणि प्रसिद्धीचा अदमास घेतला तर, त्यांची गणना, तालाचे बादशहा म्हणून करण्यात येते आणि अर्थात ती फार एकांगी आहे. प्रस्तुत गाणे, "रात भर का है मेहमां अंधेरा" - चित्रपट "सोने कि चिडिया", मुद्दामून ऐकायला हवे.  वास्तविक त्यांच्या संगीताचा ढंग बघता, त्यांना भारतीय रागसंगीत वा संबंधित बाबींचे फार तीव्र आकर्षण आहे,असे दिसत नाही. त्यामुळे, त्याच्या रचनांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तर, ते राग वापरतात, कारण विशिष्ट गीतप्रकार हाच मुळी एखाद्या रागात वा त्याच्या सावलीत मुरलेला असतो दुसरा भाग म्हणजे चाल अवतरते आणि नंतर त्यात रागाची बीजे सापडतात. प्रस्तुत गाणे दीपचंदी तालात बांधलेले आहे पण या गाण्याच्या बाबतीत, असे ठामपणे म्हणता येईल, गाण्याची लयच मुळी अशा प्रकारे बांधली आहे की तालवाद्य नसले तरी चालले असते!! 


गाण्याचा मुखडा, जर बारकाईने ऐकला तर ध्यानात येईल, इथे राग जोगिया आणि त्याचे स्वर केवळ आधार म्हणून घेतलेले आहेत. गाण्याची सुरवात अति तार स्वरांत सुरु झाली तरी गाण्याचा "मुखडा" घेताना, मात्र एकदम खालच्या सुरांत आणि शांतपणे सुरु होते.राग जोगिया इथे स्पष्टपणे दिसतो. पण पहिला अंतरा सुरु होण्याआधीचे, जे वाद्यमेळातून संगीत आपल्या समोर येते, ज्यात "कोरस" संगीताचा वापर केला आहे, तिथे तर स्पष्टपणे, ऑपेरा संगीताचा प्रभाव जाणवतो. याचा वेगळा अर्थ असा घेता येईल, रचनाकार, इथे गाण्याच्या अंतिम सादरीकरणाला महत्व देत आहे आणि त्यासाठी मग कुठूनही सांगीतद्रव्य उचलण्याची तयारी आहे, मग त्यात सुरवातीला ज्या रागाचा आधार घेतला आहे, त्याला सहज बिनदिक्कतपणे बाजूला सारण्याची हिम्मत आहे. याचाच दुसरा दृश्य परिणाम असा दिसतो, नैय्यर यांनी आकर्षक सांगीत विलासासाठी प्रचलित रागांत का होईना, पण नवे मुखडे समोर आणले असेही दिसत नाही. नवीन मुखडे बंधने, हे अनेकदा, सर्जनशिलतेचे उदाहरण म्हणून दाखवता येते. या संगीतकाराचे प्रयत्न याबाबतीत तरी कमी पडले, असे म्हणायला जागा आहे.   
सुप्रसिद्ध गायकनट बालगंधर्वांनी गायलेले आणि अतिशय लोकप्रिय झालेले "वद जाऊ कुणाला शरण" हे पद ऐकुया. खरतर, गाण्याचे ध्वनिमुद्रण काहीसे सदोष आहे पण तरीही खास वैशिष्ट्ये नक्कीच समजून घेता येतात. या गाण्याची चाल बघितली तर "जोगिया/कलिंगडा" या दोन्ही रागांचा आढळ या रचनेत ऐकायला मिळतो. अर्थात, रचनेचा मुखडा मात्र नि:संशय जोगिया रागावर आहे आणि याच रागाची दाट सावली आहे.  


बालगंधर्वांनी लयसिद्धी प्राप्त होती. विशिष्ट मात्रांचे तालावर्तन सुरु झाले की त्याचे स्पंदन अंगी भिनल्यासारखे कायम राखणे, तबलजीने कसेही आड वाजवले तरी सुखाने गात राहायचे त्याना जमते, हे इथे लक्षात येते. मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, ही खास लयकारी पण शब्दांची किंवा अक्षरांची फेक जरा इकडे, तिकडे केल्याने सबंध तालावर्तन कसे उठून येते, हे देखील ऐकण्यासारखे आहे. सुरावटींचा पुनरावतार असावा, पण त्यांची पुनरावृत्ती टाळावी, हे एक कालासुत्र, त्यांच्या गाण्यात प्रत्ययाला येई.लयकारीची सूक्ष्म क्रीडा, हा विशेष इथे प्रत्ययाला येतो. आवाज फार बारीक नाही पण लगाव नाजूक आहे. विशेष म्हणजे त्यात अस्थिरता नाही. पट्टी उंच आहे पण तरीही मध्यममार्ग आहे. आवाज सहजपणे हलका होतो. आवाजात काही वेळा असे आढळते, त्याला स्वरावर स्थिर करून बघितले की तो जडावतो. तसे इथे काहीच घडत नाही. सहजपणे, दुसऱ्या स्वरावर जाणे, तिथे हलकीशी हरकत घेणे आणि त्यातून लय लांबविणे, इत्यादी अनेक सांगीत सौंदर्यवाचक क्रिया, या गाण्यात सहज ऐकायला मिळतात.आशयनिश्चिती करणारा एक काहीसा अमूर्त घटक म्हणजे त्यांच्या गायकीतील उत्कटता. तसे बघितले तर, उत्कटता ही मनोवृत्ती सर्जनशिलतेची पूर्वअट असते. बालगंधर्व जे काही गात असत, त्यात एक उत्कटता, एक भारलेपण होते आणि ते ऐकणाऱ्यापर्यंत संक्रांत होणे, ही अपरिहार्यता होती. तसे बघितले तर संगीताचा आशय, गवयी-गाण्याचा नाही. पण तरीही त्या गायनाची सावली सादरीकरणावर पडलेली आढळते.    
आता आपण या रागावरील आणखी काही गाणे ऐकुया. 

कहे दो कोई ना करे यहां प्यार 

दिल एक मंदिर  

Thursday 24 September 2015

महिंद्र साउथ आफ्रिका

UB group मधील नोकरीचे "बारा" वाजायला लागल्यावर, नवी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. वास्तविक, या नोकरीत स्थिरस्थावर व्हायची इच्छा होती पण प्रारब्ध वेगळेच होते. Standerton हे गाव, म्हणावे अशा अटकर बांध्याचे आहे. आजूबाजूला कुठलेच शहर नजरेच्या टप्प्यात नाही. जुन, जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी असल्याने, लोकवस्ती तशी विरळ!! सुदैवाने, माझ्याच ओळखीत, जोहान्सबर्ग इथे एका कंपनीत, नोकरी संदर्भात मुलाखत झाली आणि तिथे नोकरी पक्की झाली.  तेंव्हा,मनात विचार केला, जर का ही नोकरी स्वीकारली तर आपले भारतात जाणे आणखी एक वर्ष तरी पुढे जाईल. म्हणून मग लगेच मुंबईचे तिकीट काढले आणि मुंबईत महिना काढावा, म्हणून निघालो. नव्या नोकरीला होकार दिला होता पण त्यांना, जानेवारीत join करण्याचा वायदा केला आणि मुंबईच्या विमानात पाउल ठेवले. हातात नोकरी असली म्हणजे, तुमच्या वागण्या,बोलण्यात आत्मविश्वास येतो आणि एकूणच सगळे व्यवस्थित होत आहे, असे वाटत रहाते. एव्हाना, विमान प्रवासात वेळ कसा घालवायचा, याचे पक्के गणित मनाशी केलेले असल्याने, विमानात बसलो आणि वाचायला पुस्तक काढले. अचानक मनात विचार आला, मुंबईत जात आहोत तर महिंद्र कंपनीत, आपला खुंटा हलवून बघायचा!! महिंद्र कंपनीने, साऊथ आफ्रिकेत, नव्यानेच व्यवसाय सुरु केला होता आणि तिथे काही संधी मिळते का? अशी चाचपणी करायचे ठरविले. 
सुदैवाने, एक, दोन मित्रांच्या ओळखी निघाल्या आणि त्या जोरावर, वरळी इथल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, P.N.Shah, या माणसाला भेटायला गेलो. सुदैवाने, लगेच भेट मिळाली आणि वेगळे सुदैव म्हणजे, त्याच सुमारास, साऊथ आफ्रिकेतील, १]विजय नाक्रा, २] हेतल शाह, मुंबईला येणार आहेत, तेंव्हा त्यांच्याशीच पुढील मीटिंग ठरवली. आणि पुढील आठवड्यात, भेट होऊन, नोकरीचे पक्के केले. इतक्या झटापट सगळे झाले की मलाच आश्चर्य वाटले. प्रिटोरिया इथे कंपनीचे मुख्य ऑफिस असल्याने, परत शहरात येण्याचा आनंद काही वेगळाच!! सेंच्युरीयन भागात, कंपनीचे ऑफिस - इथे क्रिकेटचे जगप्रसिद्ध स्टेडीयम आहे. हेतलने, मला भारतात फोन करून, कंपनीत कशी रुजू होणार आहेस, हे विचारले आणि माझी, पुन्हा परत जाण्याची लगबग सुरु झाली. 
पोहोचलो, त्याच दिवशी हेतलने ऑफिसला येण्याचे सुचवले. वास्तविक रात्रभराचा प्रवास अंगावर होता पण, नवी नोकरी आणि तो देखील सेंच्युरीयन भागात, हे आकर्षण असल्याने, तशीच गाडी कंपनीच्या ऑफिसमध्ये नेली. इथे एक बरे असते, तुम्ही जर का नेमका पत्ता हातात ठेवला असेल तर या देशात कुठेही जायला प्रश्न उद्भवत नाही. जर का एखादा Off Ram चुकला तर मात्र जबरदस्त हेलपाटा पडतो, कमीतकमी १५, २० कि.मी.चा फटका बसतो!!  अतिशय सुंदर ऑफिस, त्यामुळे मनाला देखील उल्हसित झाल्यासारखे वाटले. पहिल्या प्रथम, एक बाब आढळली, ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय होते आणि सगळीकडे लगबग चालू होती. मी पोहोचलो आणि तिथे श्रीधर नावाच्या माणसाने, माझी ओळख करून घेतली. हा, मुंबईतून, हेड ऑफिसमधून बदलून इथे आला होता. अर्थात, इथे येणाऱ्या सगळ्याच भारतीय कंपन्या, आपल्या ओळखीची माणसे, भारतातून, बोलावून घेतात. Inter Company Transfer, या नावाने, त्यांना व्हिसा देखील लगेच मिळतो. त्यावेळी, आमच्या ऑफिसमध्ये, विजय नाक्रा, हेतल शाह, विजय देसाई, महेंद्र भामरे आणि श्रीधर, हे भारतातून इथे आले होते. (आता यापैकी एकही नाही!!) 
आता इथे ऑफिस म्हटल्यावर आसपास घर शोधणे गरजेचे (तोपर्यंत, मी "लोडीयम" इथे एका मित्राच्या घरात रहात होतो)  आणि सुदैवाने लगेच "एको पार्क" या अत्यंत प्रशस्त आणि अवाढव्य संकुलात, मला एक जागा मिळाली. हे संकुल मात्र खरोखरच अवाढव्य आहे. इतकी वर्षे मी देशात काढली पण, मला इतके सुंदर घर आणि जागा, यापूर्वी आणि नंतर देखील मिळाली नाही!! संकुलात, ४ क्लब्ज, ५ स्विमिंग पूल, २ गोल्फ मैदाने आणि अनेक गोष्टी होत्या, जेणेकरून, संकुलाच्या बाहेर जायची फारशी गरज भासू नये. 

पहिल्याच दिवशी, नेहमीप्रमाणे ओळख परेड झाली. ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे लक्षणीय प्रमाण होते. अर्थात, एव्हाना, गोऱ्या लोकांच्या कामाची मला सवय झाली होती. बरेचवेळा तर त्यांच्या बोलण्याच्या धर्तीवर माझे इंग्रजी बोलणे व्हायला लागले होते. हे तर कधी ना कधीतरी होणारच होते म्हणा. सतत, त्या लोकांच्या सहवासात राहिल्यावर कुठला न कुठला तरी गुण, नकळत आत्मसात केला जातो, इतकेच नव्हे तर आफ्रिकान्स भाषा देखील काही प्रमाणात समजायला आणि काहीवेळा बोलण्याच्या ओघात, तोंडातून बाहेर पडायला लागली. आफ्रिकान्स भाषा म्हणजे जुनी डच भाषा!! इथे फार पूर्वीपासून, डच आणि ब्रिटीश लोकांचे वर्चस्व होते. पुढे ब्रिटिशांनी युद्धात, डचांचा पराभव करून, सगळ्या देशावर स्वामित्व मिळवले. तरी देखील, आजही इथे इंग्रजी भाषेच्या जोडीने, आफ्रिकान्स भाषा बोलली जाते. आता तर राष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून मान्य केली आहे. भाषेचा टोन बघता, जर का बारकाईने ऐकली नाही तर इंग्रजी आणि आफ्रिकान्स भाषेच्या उच्चारात फारसा फरक नाही - "ख" या व्यंजनाचा आफ्रिकान्स भाषेत भरपूर वापर केला जातो. असो!! 
जेम्स,वेंडी, सुझन, लिझा, वेडबर्न इत्यादी अनेक माणसे, दीर्घ काळ माझ्या संपर्कात होती, जेम्स आणि वेंडी, तर अजूनही आहेत. गोऱ्या लोकांचे प्राबल्य म्हटल्यावर, एक बाब अधोरेखित झाली, इथे कामाच्या बाबतीत टंगळ मंगळ नसणार आणि तो विश्वास इथे नेहमीच सार्थ ठरला. अर्थात, एक बाब अजूनही अदृश्य स्वरूपात वावरत असते. गोऱ्या लोकांना, आपल्या कातडीचा प्रचंड, अगदी घमेंड म्हणावी इतका पराकोटीचा अभिमान असतो. मला एकूणच बहुतांशी गोरे लोकं भेटली, त्यांनी अगदी न चुकता, माझा विश्वास सार्थ ठरवला!! एका दृष्टीने विचार केला तर, कामाच्या बाबतीत, चोख काम करण्यात, गोरा समाज, अगदी डोळे मिटून विश्वास ठेवण्या लायकीचा म्हणावा लागेल तर काळा समाज, अपवाद वगळता, अत्यंत कामचुकार!! वास्तविक, आता साऊथ आफ्रिकेत, कायद्याने, वर्णभेद नाहीसा केला आहे पण, तरीही समाजात एक अदृष्य रेघ आहे, तिथे हा फरक जाणवतो. किंबहुना असे देखील म्हणता येईल, अजूनही काळ्या लोकांचा समाज, वर्णभेदाच्या जोखडाखालून मोकळा झालेला नाही!! अर्थात, ही मानसिक गुलामगिरी आहे आणि याचे कारण, वर्षानुवर्षाचे झालेले संस्कार!!   
खरतर,राष्ट्रीय मंत्रिमंडळात, काळ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यांना आता पुरेसे अधिकार देखील प्राप्त झालेत. पण, ही सुधारणा फार वरवरची आहे. अजूनही इथे मानसिक गुलामगिरी चालूच आहे आणि गंमतीचा भाग म्हणजे, याला बहुतांशी, काळा समाज(च) कारणीभूत आहे. मी, पूर्वी लागोस - नायजेरिया मध्ये दोन वर्षे काढली आणि ऑफिस कामासाठी, काळा माणूस किती "उपयुक्त" आहे, याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. अर्थात, नायजेरिया देशातील काळा माणूस आणि साऊथ आफ्रिकेतील काळा माणूस, यात सुतभर देखील फरक नाही. कामाबाबत तसाच उदासवाणा दृष्टीकोन, फटाफट पैसे आणि ते देखील शक्यतो विनासायास पैसे कमावण्याची जबरदस्त इच्छा आणि त्या इच्छेपोटी, कुठल्याही थराला जायची तयारी!! शारीरिक काम जबरदस्त ताकदीने रेटून नेतील पण, बौद्धिक कामाचा प्रश्न आला, की शक्यतो पाय मागे!! 
वास्तविक, आता इथे काळ्या समाजातील लोकांसाठी असंख्य सुविधा आहेत, आर्थिक, सामाजिक इत्यादी सुविधा भरपूर आहेत पण मुळात बौद्धिक कष्ट घेण्याचीच वृत्ती कमी असल्याने, हा समाज, जितका पुढे यायला हवा त्याप्रमाणात, आजही मागासलेला आहे. मी हे मत अतिशय विचारपूर्वक मांडत आहे. आज, इथल्या बँकेत वरिष्ठ पदावर बरेच काळे अधिकारी दिसतात तसेच प्रचंड मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ पदावर देखील काळ्या वर्णाची माणसे दिसतात पण, एकूण समाजाच्या आकारमानाने, हे प्रमाण आजही नगण्य आहे, हे जळजळीत वास्तव आहे. आता, याबाबतीत असे देखील म्हणता येईल, यांना स्वातंत्र्य मिळून, उणीपुरी २२, २३ वर्षेच झाली आहेत (इथली पहिली लोकशाही निवडणूक १९९२ साली झाली) आणि गुलामगिरीचे जिणे, त्यांनी शतकानुशतके झेललेले आहे.ते मानसिक जोखड इतक्या सहजपणे, भिरकावून देणे अवघड आहे. हा मुद्दा जरी मान्य केला तरी, आता स्वातंत्र्यानंतरची दुसरी पिढी इथे आली आहे आणि हे ध्यानात घेता, सुधारणांचा वेग केवळ नगण्य आहे. किंबहुना, काळ्या धंद्यात, हा समाज नको तितका गुंतलेला आहे आणि हा मुद्दा निश्चित चिंताजनक आहे. 
एक सुंदर प्रसंग - माझ्याच बाजूला रेमंड नावाचा एक काळा तरुण कामाला होता. इतर काळ्यांच्या मानाने शिकलेला आणि कामाची आवड असलेला. आता, बाजूला बसत होता, म्हटल्यावर गप्पा मारणे साहजिक होते आणि तशा आमच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या. एकदा, कामाच्या निमित्ताने तो ऑफिसमध्ये फिरत असताना, आमचा C.O.O. वेडबर्नच्या खांद्याला किंचितसा धक्का लागला!! आता असे धक्के, ऑफिसमध्ये लागणे, सहज शक्य असते. इथे एक गोची झाली, वेडबर्नने, धक्का लागल्याबद्दल, रेमंडची माफी मागितली नाही!! झाले!! रेमंडला हा अपमान वाटला आणि "मी केवळ काळा आहे, म्हणून मला अशी वागणूक मिळते" असे अधिकृत पत्र लिहिले आणि जर का "न्याय" मिअल नाही तर पोलिस तक्रार करण्यात येईल, अशी धमकी देखील मांडली होती. या प्रसंगाला, साक्षीदार म्हणून हेतल आणि माझे नाव, त्यात घेतले होते!! वास्तविक, प्रसंग किती किरकोळ होता पण, रेमंडच्या डोक्यात काय भूत शिरले, समजले नाही. अखेर, त्याच्या "बाबा पुता" करून, प्रकरणावर पडदा पाडला. परिणाम एकच, दुसऱ्या दिवसापासून, त्याला जवळपास, "वाळीत" टाकण्यात आले!! कुणीही त्याच्याशी बोलायला देखील तयार नाही!!  
असो, इथे मला "सेटल" होणे अजिबात अवघड गेले नाही. दुसरा भाग म्हणजे, इतकी वर्षे, मी इथल्या मित्रांशी शक्यतो, फोनवरून संपर्क साधित असे आणि आता, प्रत्यक्ष भेटीगाठी सहज शक्य झाल्या. यात, मकरंद, विनय हे माझे जुने मित्र, माझ्या नेहमीच्या भेटीगाठीच्या संपर्कात आले. मकरंद इथे १९९२ पासून असल्याने, त्याचे मित्रवर्तुळ मोठे आणि त्याचा मला बराच फायदा झाला. दर वीक एंड एकत्र घालवायचा असे ठरले आणि त्याप्रमाणे, आम्हाच्या भेटी सुरु झाल्या. प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग, यात केवळ ६० कि.मी. इतकेच अंतर,त्यामुळे जोहान्सबर्ग मधील मित्रांशी संपर्क ठेवणे खूपच सुलभ झाले. याच सुमारास, मी दुसरी गाडी घेण्याचे ठरवले आणि परत डेव्हिडच्या जावयाशी संपर्क साधला. यावेळेस, त्याने मला VW कंपनीची "पोलो १.६" ही गाडी मिळवून दिली. एव्हाना, या देशात बऱ्याच गाड्या फिरवून झाल्या, पण या गाडीला तोड नाही!! जर्मन टेक्नोलॉजी म्हणजे काय, याचे ही गाडी म्हणजे मूर्तिमंत उदाहरण. लाल रंगाची गाडी म्हणजे कुणीही प्रेमात पडावे, इतकी सुरेख गाडी होती. पुढे, मी देखील,ही गाडी मनसोक्त फिरवली. 
याच वास्तव्यात, इथे T20 विश्वकप स्पर्धा सुरु झाली आणि आमच्या मित्रांच्या चमूने, ही स्पर्धा मनसोक्त उपभोगली. मकरंदची, त्यावेळच्या लालचंद राजपूत बरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यामुळे, त्याच्याकडून आम्हाला, free passes मिळायचे. इथल्या स्टेडीयम मध्ये जावे आणि भारताने, अजिंक्यपद मिळवावे, असली वेडी आशा इथे पूर्ण झाली. अंतिम सामना - भारत/पाकिस्तान यांच्यात झाला आणि अति अतितटीची झुंज, अखेर भारताने जिंकली!! त्यावेळचा स्टेडीयम मधील आरडा-ओरडा, बक्षीस समारंभ, हातात असलेल्या बियरची अवर्णनीय चव, या आठवणी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. विश्वविजयाची चव, आम्हा मित्रांच्या चमूने, स्टेडीयम शेजारील पब मध्ये, रात्रभर जागून साजरा केला. केवळ अविश्वसनीय विजय.
ऑफिसमध्ये त्यामानाने लवकर स्थिरस्थावर झालो. आमच्या कंपनीचा व्यवसाय, भारतातून "रेडीमेड" गाड्या मागवणे - सोबत स्पेअर पार्टस देखील आणि त्यांचे देशभर वितरण करणे. खरेतर इथे इतक्या प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत, तेंव्हा महिंद्र कंपनीने म्हटले तर धाडस केले. अर्थात, गाड्यांची किंमत, हा वाजवी मुद्दा असल्याने, आमचा भर त्यावरच अधिक. या ऑफिसची स्वत:ची अशी कार्यशैली होती आणि ती मी लगेच अंगवळणी करून घेतली. आमच्या ऑफिसमध्ये दर महिन्याला, शेवटच्या शुक्रवारी, पार्टी असायची आणि ती शक्यतो ऑफिसमध्येच असायची. त्या दिवशी ऑफिस दुपारी ४. वाजता बंद. गोरा माणूस, काय सज्जड ड्रिंक्स घेतो, याचा अप्रतिम नमुना या पार्टीत सतत मिळत गेला. ऑफिसमधील मुली देखील ड्रिंक्स घेत असत. अर्थात, प्रमाण हात राखून. 
त्यावर्षी, कंपनीने, राष्ट्रीय पातळीवर, सगळ्या एजंट्सची वार्षिक बैठक, दोन दिवसांची ठरवली. फायनान्स मधून, मी आणि हेतल हजार राहणार होतो. बैठकीचा इतका तपशीलवार विचार आणि नोंदी बघून, आपल्याला "प्रोफेशनल" व्हायला किती अवकाश आहे, याची नव्याने जाणीव झाली. बैठकीच्या प्रत्येक मिनिटांचा चोख हिशेब, आणि त्याबर सगळे नेमकेपणी घडवून आणण्याची तोशीस. चहापान, दुपारचे जेवण, संध्याकाळी, सत्रे कधी आणि कशी संपतील, याचा अचूक आराखडा, बैठक व्हायच्या आधी, आठवडाभर आमच्या हातात. कुठेही कसलाही हलगर्जीपणा नाही की गोंधळ नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील अत्यंत मुद्देसूद मिळायची. कणभर देखील फापट पसारा नाही. एकदा का संध्याकाळ झाली, म्हणजे गोरा माणूस रंगायला लागतो. त्यावेळचा गोरा माणूस, हा दिवसभराच्या कार्यक्रमात दिसणाऱ्या माणसापेक्षा संपूर्ण वेगळा. 
एक गंमत. फेब्रुवारी महिना (इथे फायनांशियल वर्ष फेब्रुवारी महिना असतो)  जवळ आला की, अकाउंटस विभागात, वार्षिक गडबड सुरु होणे, क्रमप्राप्त असते. आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे, आता रोज, ऑफिसमध्ये उशिरा बसणे, नेहमीचे असते. एका शुक्रवारी, मी जेम्सला, उशिरा बसण्याची विनंती केली आणि त्याची खरच जरुरी होती. माझे बोलणे ऐकून घेतल्यावर, अत्यंत थंड आवाजात," Anil, I got family at home and it's my family time!! I can't work after office hours!!". ऐकल्यावर, अनिल थंड!! इथे अशी बळजबरी कुणावरही करता येत नाही. ऑफिस वेळेत, काहीही काम सांगा, तिथे कुचराई नाही पण, एकदा का, संध्याकाळचे ४.३० वाजले, म्हणजे मग तिथला गोरा हा स्वतंत्र असतो, कंपनीशी काहीही देणेघेणे नसते!! समजा, उशिरा बसला तर कंपनीवर जणू उपकार केले, याच भावनेने (हे क्वचित घडते) काम करणार आणि त्याचा मोबदला, नेमका वसूल करणार आणि त्याहून महत्वाचे म्हणजे, "मी त्यावेळी उशिरा बसलो होतो", याची तुम्हाला सतत जाणीव करून देणार!! 
समजा, कंपनीचे बाहेरचे काही काम असेल तर, गोरा माणूस, आपली गाडी चुकूनही काढणार नाही. त्यामुळे प्रत्येक कंपनीला, स्वत:च्या अशा वेगळ्या गाड्या ठेवणे भाग असते. उं उलट, काही बँकेची कामे असतील आणि त्या साठी काळा माणूस पाठवला तर, तो काहीही करून, ते काम करून देईल. हा फार मोठा फरक, या दोन समाज प्रवृत्तीत आहे. गोरा माणूस अतिशय materialistic असतो आणि तिथे "माझी कंपनी" असली भावनिक गुंतवणूक अजिबात नसते. कंपनीचे काम, मनापासून करतील पण ती गुंतवणूक, केवळ कंपनी वेळेपुरती. पुढे, माझ्या घरी काय किंवा, इतर गोऱ्या लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला, प्रत्येकवेळी हाच अनुभव आला.  
याच सुमारास, इथल्या मराठी मंडळ आणि तिथल्या लोकांची ओळख झाली. खरेतर, इथले मराठी मंडळ, हे प्रामुख्याने, जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, या दोन शहरांपुरते आहे. इतर शहरांत, त्यामानाने फारशी भारतीय माणसे आढळत नाहीत. याचे मुख्य कारण, जी माणसे भारतातून इथे येतात, ती प्रामुख्याने, Inter Company Transfer व्हिसावर येतात आणि त्यांची कार्यालये, ही बहुतांशी याच दोन शहरात असतात. मुळात, इथे भारतातून येण्याचे प्रमाण, अगदी  २००० सालापर्यंत, जवळपास नगण्य होते. हळूहळू, भारतीय कंपन्यांनी इथे व्यवसाय केंद्रे उघडली, निरनिराळ्या बँकांची ऑफिसेस उघडली आणि इथे भारतीय माणसे यायला लागली. त्यामुळे, तसे म्हटले तर इथले मराठी मंडळ हे तसे नाममात्र(च) आहे (आजही यात फारसा फरक नाही). त्यातही, बहुतेक मराठी माणसांना, इथे आलो म्हणजे आपण युरोप/अमेरिकेत आलो, असेच वाटायला लागते!! याचा परिणाम असा झाला, त्यांना मराठी बोलण्याची "लाज" वाटायला लागली!! आपलीच भाषा पण, बोलायला देखील अवघड!! कारण विचारले तर, आमचे इंग्रजी भाषेत शिक्षण झाले, त्यामुळे मराठीशी संपर्क कमी राहिला!! अशीच काहीशी थातूर मातुर कारणे द्यायची. त्यामुळे, मंडळाचे जी काही तुरळक कार्यक्रम व्हायचे, त्यात मंडळाची कार्यकारिणी मंडळी वगळता, इतर लोकांची उपस्थिती नेहमीच तुरळक राहिली!! मी ही तुलना, विशेषत: नायजेरिया - लागोस इथल्या मराठी मंडळाशी केली आहे. मला आजही  आश्चर्य वाटत आले आहे, मराठी आपली मातृभाषा आहे,  असे असून देखील ती भाषा बोलायला "जड" जाते!! आपल्या भाषेचे संवर्धन आपण  करायचे नाही तर कुणी करायचे?  इथे, ना कुणाला खेद, ना कुणाला खंत!! मी इथे दोन वर्षे होतो आणि दोन वर्षात इथे काही ठराविक कार्यक्रम झाले आणि एकही कार्यक्रम, अपवाद म्हणून भरपूर गर्दीचा झाला!! 
तसे प्रिटोरिया शहर हे राजधानीचे शहर. इथे पार्लमेंट इमारत आणि सभागृह आहे. वर्णभेदाची चळवळ इथे फोफावली आणि इथेच नेल्सन मंडेलाचा शपथविधी झाला. याच शहरात, मी आयुष्यातील पहिला "सिंफनी ऑर्केस्ट्रा" अनुभवला आणि तो थरार आजही मनावर कोरलेला  आहे. इथले म्युझियम बघण्यासारखे आहे, वर्णभेद किती भयानक होता, याची साक्ष इथे बघायला मिळते. परंतु ते प्रसंग अंगावर येतात, ते केप टाऊन इथल्या रॉबेन आयलंड इथल्या तुरुंगात!! तो भाग तर फारच विलक्षण आहे. इतर शहरांप्रमाणे इथे देखील प्रचंड मॉल्स आहेत, ऐषारामी हॉटेल्स आहेत, ऐय्याशी क्लब्ज आहेत. अर्थात हे सगळे पैशाचे खेळ आणि याचबरोबर येणारी असुरक्षितता देखील विपुल आहे. जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, ही दोन्ही शहरे, सुरक्षिततेच्या दृष्टीने भयानक आहेत. केवळ संध्याकाळ उजाडल्यावर नव्हे तर  दिवसाढवळ्या देखील,पायी हिंडणे अवघड झाले आहे. एकेकाळी, अमेरिकन कादंबऱ्या मधून,"मगिंग"ची वर्णने वाचली  होती,त्याचे तंतोतंत प्रत्यंतर इथे अनुभवायला मिळते.  
 आताच अनेक भारतीय वंशाची माणसे बोलायला लागली आहेत, " Racism was okay, just because crime rate was minimal". हे तिथल्या सामाजिक परिस्थितीचे द्योतक आहे. हळूहळू आर्थिक संकटे कोसळायला लागली आहेत आणि सर्वात भयानक म्हणजे आर्थिक विषमतेची दरी वाढत चाललेली आहे. आजही हा देश अप्रतिम सुबत्तेचा आहे, इथे भौतिक सुखाच्या अपरिमित संधी आहेत आणि आयुष्य कसे उपभोगावे, हे इथे समजून घेता येते. प्रश्न असा आहे, हे ऐश्वर्य आणखी किती वर्षे अबाधित राहील?

अबोध सोहनी



काळीभोर मखमली मध्यरात्र पुढ्यात असावी, वातावरणात गोड शिरशिरी अंगावर उठवणारी थंडी असावी, समुद्राच्या पाण्यावर चंदेरी लहरी हेलकावे घेत असाव्यात आणि हातात असलेल्या ग्लासातील मद्यात चंद्र किरण शिरून, त्या मद्याची लज्जत अधिक मदिर व्हावी!! दूर अंतरावर क्षितिजाच्या परिघात कुठेच कसलीही हालचाल नसावी आणि त्यामुळे शांतता अबाधित असावी!! समुद्राच्या लाटा देखील, नेहमीचा खळखळ न करता, आत्ममग्न असल्याप्रमाणे वहात होत्या. पाण्यात, निळ्या रंगाबरोबर विलोभनीय काळा रंग देखील आपले अस्तित्व देखणेपणाने दर्शवत होता!! किंबहुना, पाण्यातील निळा आणि काळा रंगांचे मिश्रण, वरून ओतत असलेल्या चंद्राच्या किरणांत इतके एकजीव झाले होते की, रंगांना स्वत:चे वेगळे आयुष्य लाभावे,असा अपरिमित गोडवा, मनाला अधिक गोड करीत असावा!! महाभारतात, व्यासांनी द्रौपदीच्या सौंदर्याचे वर्णन करताना, "तिच्या अंगाला निळ्या कमळाचा सुगंध होता" अशी असामान्य प्रतिमा वापरली आहे, त्याच प्रतिमेची नेमकी आठवण, पाण्याचा निळा रंग बघताना व्हावी!! आणि कानावर दुरून कुठूनतरी आर्त "रिषभ" यावा आणि तो सूर नेमक्या सोहनी रागाची आठवण करून देणारा असावा, इतका तरल असावा!! 

आरती प्रभूंच्या ओळी या संदर्भात आठवल्या. 
"वाजून मेघ जातो घननिळासा विरून,
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे; 
बोलें अखेरचे तो: आलो इथे रिकामा,
सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे". 

एकाच वेळी प्रणयाची धुंद साद घालणारा, त्याचबरोबर प्रणयातील विरहाची प्रचीती देणारा, मृदुभाषी असा हा सोहनी राग. सोहनी राग असाच स्वप्नांच्या प्रदेशात हिंडवून आणणारा प्रणयोत्सुक राग आहे. कोमल रिषभाची आच घेऊन, तीव्र मध्यमाला स्पर्श करून, जेंव्हा शुद्ध धैवत स्वरावर स्थिरावतो, तेंव्हा प्रणयाचे एक सुंदर वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटते!! वास्तविक "मारवा थाट" मध्ये या रागाचे वर्गीकरण आहे आणि हा राग ऐकताना, कुठेतरी पुरिया आणि मारवा रागाची पुसटशी का होईना आठवण होते. आडव/षाडव जातीचा हा राग तसा मैफिलीत फारसा गायला जात नाही परंतु वादकांनी मात्र या रागावर मनापासून प्रेम केलेले आढळते. "पंचम" स्वर, आरोह आणि अवरोह सप्तकात वर्ज्य असला तरी या रागाची अवीट गोडी कुठेही रतिभर देखील कमी होत नाही. वास्तविक भारतीय रागसंगीतात, "षडज पंचम" भावाला अपरिमित महत्व आहे पण, इथे खुद्द "पंचम" स्वराला अजिबात स्थान नाही. वादी, संवादी स्वर - धैवत आणि गंधार हे असले तरी अखेर, परिणाम घडवतात ते कोमल रिषभ आणि तीव्र मध्यम,हेच स्वर. या रागातील खास स्वरसमूह झाल्यास, "सा नि ध ग म(तीव्र) ध ग म(तीव्र)" किंवा "सा नि ध नि ध ग म(तीव्र) ग म(तीव्र) ग रे(कोमल) सा" यांचा वेध घेणे, बहारीचे ठरेल. 

आता आपण पंडित शिवकुमार शर्मा यांनी सादर केलेला राग सोहनी ऐकुया. मुळात, लोक संगीतातील वाद्य परंतु त्याला शास्त्रीय संगीताची बैठक देऊन, मैफिलीत स्थान प्राप्त करून दिले, ते याच कलाकाराने. तसे बघायला गेल्यास, या वाद्याला काहीशा मर्यादा आहेत, म्हणजे या वाद्यातून अति खर्ज किंवा अति तार सप्तकाची ओळख करून घेता येणे कठीण जाते. खरे तर मंद्र आणि शुद्ध सप्तकात हे वाद्य खुलते. ऐकायला अतिशय गोड असल्याने, रसिकांच्या मनाची पकड लगेच घेतली जाते. वाद्यातील तारांच्या नादाला देखील काही मर्यादा असल्याने काही वेळा "मींड" काढणे अवघड जाते आणि विशेषत: द्रुत किंवा अति द्रुत लयीत सुरांचा सुटेपणा काहीसा अदृश्य स्वरूपात वावरतो. अर्थात, इथे मी सतार आणि सरोद ही वाद्ये ध्यानात घेऊन, ही विधाने केली आहेत.  


वरील सादरीकरणात, पंडितजींनी सुरवातीच्या आलापीमध्ये, या रागाची ओळख करून दिली आहे आणि ती जरा बारकाईने ऐकली म्हणजे लगेच समजून घेता येईल, मी वरती मारवा आणि पुरिया रागाच्या साद्धर्म्याशी सांगड घातली होती पण ती घालताना, फरक सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि तो फरक इथे प्रकर्षाने ऐकायला मिळतो. रागाचे स्वरूप पहिल्याच आलापीमध्ये स्पष्ट झाल्यामुळे, पुढील वादनात, रागाचा विस्तार कसा होणार आहे, याची कल्पना करणे अवघड जात नाही. 
हिंदी चित्रपट संगीतात, "मोगल-ए-आझम" या चित्रपटाचे अढळ स्थान आहे. प्रचंड आणि वैभवशाली मोगल राज्याची कल्पना करता येऊ शकेल, अशा भव्यतेची कल्पना देणारा चित्रपट. त्यालाच साजेशा अशा संगीत रचना, संगीतकार नौशाद यांनी तयार केल्या. त्यातलीच, उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेबांनी अजरामर केलेली रचना, या रागाची सुंदर ओळख करून देते. वास्तविक पहाता, रूढार्थाने हे चित्रपट गीत नव्हे, लखनवी ढंगाची ठुमरी आहे पण चित्रपटात ती चपखल बसली आहे. दीपचंदी सारख्या अनघड तालात ही रचना आहे. ठुमरी गायन, हा खास बडे गुलाम अली साहेबांचा प्रांत. ठुमरीला किती लडिवाळ पद्धतीने रंगवता येते, याचा खानसाहेबांचे गायन, हा अप्रतिम वस्तुपाठ ठरावा. मुळात, ठुमरी म्हणजे शृंगाराचा मनोज्ञ आविष्कार आणि तो आविष्कार त्याच तितक्याच रंजकतेने, खानसाहेब सादर करतात. यांच्या गायनाबाबत बोलायचे झाल्यास, आलापचारी गुंतागुंतीची नाही, सगळ्या स्वरांना त्यांचे मूल्य प्रदान करत, ती आवाहक होत असे. तान  मात्र गुंतागुंतीची असे. एक तान सरळ तर दुसरी तान जवळजवळ तिन्ही सप्तकात प्रवेश करीत असे. याचा परिणाम, गायली गेलेली ठुमरी वैविध्यतेने सादर होत असे.  


उपरीनिर्दिष्ट रचना, सरळ सरळ ठुमरी गायन आहे पण, चित्रपटातील गायन असल्याने, थोडक्यात स्वरिक मजकूर भरून काढलेला आहे. पहिल्याच आलापीत सोहनी राग सिद्ध होतो आणि त्याच अंगाने, पुढे या रचनेचा विस्तार होत रहातो. परिणाम असा झाला, चित्रपटातील प्रसंग अधिक गहिरा आणि उठावदार झाला. अर्थात, चित्रपटातील गाण्यांचे मूळ प्रयोजन हेच तर असते. रचना ऐकताना, प्रत्येक स्वर, लोचदार तान आणि एकूणच, गायनाची संपूर्ण अभिव्यक्ती भारून टाकणारी आहे. 
असेच एक सुंदर गाणे, "गृहस्थी" या चित्रपटात आहे. अगदी या रागाची ओळख म्हणून निर्देश करावे, असे हे गाणे - "जीवन ज्योत जले". त्रितालात रचना बांधली आहे आणि संगीतकार रवी आहे. गाणे अतिशय श्रवणीय आहे पण गाण्याची चाल म्हणून स्वतंत्र विचार केला तर त्यात तसे फार गुंतागुंतीचे काही नाही. गाण्यात, गायकीच्या अंगाने ताना आहेत आणि त्याचाच वेगळा विचार करावा लागेल. आता यात असे आहे, राग आधाराला घेतल्यावर, रागाच्या अंगाने, ज्या सुरावटी बांधल्या जातात, त्यात बहुतेकवेळा "अंगभूत" ताना अंतर्भूत असतात, त्यासाठी रचनेत फारसा बदल करावा लागत नाही. रचना म्हणून, संगीतकाराने अगदी सरळसोट रचना बांधली आहे. गायकी म्हणून निश्चितरीत्या आशा भोसले, यांचे कर्तृत्व अधिक पुढे येते. कविता म्हणून देखील फार उच्च प्रतीचे काव्य नाही. चालीच्या "मीटर" मध्ये शब्द चपखल बसले आहेत. पहिल्या सुरापासून, आपल्याला यात "सोहनी" राग ऐकायला मिळतो पण, रागाचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात पातळ ठेवले आहे.    

गायकी म्हणून विचार करताना काही वैशिष्ट्ये इथे मांडावी लागतील. रचनाकारांना हवासा वाटेल त्या प्रकारचा स्वन (टोन) घेऊन, त्यास सांगीत गुण प्रचुर प्रमाणात बहाल करण्यासाठी आवश्यक ते कौशल्य आणि लागणारी कल्पनाशक्ती या आवाजात भरपूर आहे प्रस्तुत रचना, रागाधारित असल्याने, स्वरांचा लगाव कसा असावा आणि त्यातून, नेमकी गायकी कशी सादर केली जाईल, हा विचार ही रचना गाताना, स्पष्टपणे दिसून येतो. थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, कंठसंगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलीत भर टाकून, या आवाजाने चित्रपटीय आणि सांगीत शक्यतांची नवी परिमाणे एकत्र करण्यात लक्षणीय आणि ठाम पाउल पुढे टाकले. वास्तविक वरील रचना, "बंदिश" सहज होऊ शकली असती पण या गायिकेने तो धोका टाळला आणि सुगम संगीताच्या सीमारेषा आणि त्याचा परीघ, अधिक विस्तारित केला आणि हे योगदान, केवळ अतुलनीय, असेच म्हणावे लागेल. चित्रपट गीत गाताना, त्यात किती प्रमाणात नाट्यमयता आणायची, याबाबत या आवाजाने आदीनमुना पेश केला आहे आणि जसे लता मंगेशकर, यांच्याबाबत ठामपणे विधान करता येईल, त्याच विचारात आणखी पुढे जाउन, आशा भोसले यांनी स्वत:च्या गायकीचे स्वतंत्र "घराणे" निर्माण केले. 

या रागावरील काही रचना खालीलप्रमाणे आहेत. 

कुहु कुहु बोले कोयलिया - सुवर्ण सुंदरी - त्रिताल - आदी नारायण राव 

सुरत पिया की छिन बिसराये - वसंतराव देशपांडे. 

Sunday 20 September 2015

Standerton

हळूहळू, साउथ आफ्रिकेत थंडीचा कडाका वाढायला लागला होता. Standerton हा प्रदेश तर अति थंडीचा प्रदेश!! जून, जुलै महिन्यात, एकही रात्र उणे तापमानाच्या वर येत नाही!! सतत -६, -७ हेच तापमान!! या भागात थंडी भरपूर असते, याची माहिती होती आणि तशी कपड्यांची व्यवस्था केली होती तरी देखील, प्रत्यक्ष अनुभव चटका देणारा होता. नुकताच, रस्टनबर्ग इथून इथे आलो होतो. रस्टनबर्ग इथे जरी थंडी असली तरी इतका कडाका नव्हता. त्यामुळे तिथून निघताना, हातमोजे वगैरे गोष्टींची खरेदी केली. इथे मी UB group मध्ये General Manager - Finance या पदावर रुजू होणार होतो. आत्तापर्यंत, अनेक इंडस्ट्रीज बघितल्या होत्या परंतु आता इथे बियर इंडस्ट्रीचा अनुभव नव्याने घ्यायचा होता आणि तसा पुढे भरपूर घेतला. इथला General Manager दुसऱ्या बृवरीमध्ये बदली म्हणून जात होता आणि त्याच्या जागेवर माझी नेमणूक झाली होती. तसे, Standerton हे गाव आहे. इथे प्रचंड मॉल्स नाहीत, अवाढव्य हॉटेल्स नाहीत. मुळात, गावाची लोकसंख्या काही हजारात होती आणि जी होती, ती बहुसंख्य गोऱ्या वर्णांची!! 
या गावात, आमची बृवरी आणि नेसले कंपनीची Factory वगळता, ज्याला मोठ्या इंडस्ट्रीज म्हणाव्यात, असे काहीही नव्हते (आता तर दोन्ही कंपन्यांनी आपला "गाशा" गुंडाळलेला आहे!!) छोटासा शॉपिंग मॉल (अर्थात तिथेही एका दुकानात भारतीय सामान मिळण्याची सोय होती) ४ हॉटेल्स, त्यातील एक "वाल" नदीकिनारी!! हे हॉटेल आहे छोटे पण अतिशय टुमदार आणि चक्क, त्या हॉटेलचा एक भाग, नदीच्या पाण्यावर आहे. इथे, या हॉटेलात येउन खाणे, हा अप्रतिम अनुभव आहे. गावात, एक क्लब आहे आणि त्याला लागून, गोल्फ कोर्ट ( 11 holes) आहे. क्लब मात्र पारंपारिक युरोपियन धर्तीवर आहे. ठराविक ड्रेस असल्याशिवाय प्रवेश नाही आणि वेळेच्या बाबतीत अति काटेकोर!! दोन नाजूक कलाकुसर असलेली चर्चेस आहेत आणि एक छोटे मंदिर देखील आहे. गावात, जवळपास तीनशेच्या आसपास भारतीय वंशाची माणसे आहेत आणि खऱ्या अर्थी, "अल्पसंख्य" आहेत!! 
मी शनिवारी रात्री गावात आलो आणि गावाच्या वेशीवर, मला राम नायडू (याचीच बदली झाली होती) भेटायला आला. कंपनीने माझी सोय एका खासगी गेस्ट हाउसमध्ये केली होती. अर्थात, ही सोय तात्पुरती होती. मी पोहोचलो तेंव्हा रात्रीचे १० वाजले होते. दुसऱ्या दिवशी, मी न्याहारीसाठी तिथल्या हॉलमध्ये आलो तेंव्हा माझी ओळख, त्या गेस्ट हाउसच्या मालकिणीशी झाली. एलिझाबेथ उर्फ लिझ. गोऱ्या वर्णाची, सोनेरी केस, तशी ठेंगणी पण अति बडबडी. केसांचा पोनीटेल आणि अधून मधून सिगारेट ओढायची सवय. चेहऱ्यावर दोन, तीन तीळ आणि वय जवळपास ३२,३३ च्या आसपास. घटस्फोटीत पण सध्या एका बलदंड गोऱ्या माणसाबरोबर "लिव्ह-इन-रिलेशन" मध्ये रहात आहे. गेस्ट हाउस तसे खूप मोठे आहे. एकूण ५० खोल्या आहेत आणि प्रत्येक खोली म्हणजे स्वतंत्र घर,असे स्वरूप. त्यामुळे कुणालाही "एकांतवास" सहज प्राप्य. 
मला, रोजची न्याहारी, त्या बिलाच्या पैशात अंतर्भूत होती. पहिल्याच दिवशी, तिथे "सलामी" सारखे बेचव पदार्थ बघितल्यावर, काय खायचे, हा प्रश्नच पडला. मी काही घेत नाही, हे बघितल्यावर लिझ माझ्याकडे वळली. मला, "बीफ","पोर्क" खाण्याची बंदी (त्यावेळेस माझा रक्तदाबाचा प्रश्न थोडा उग्र झाला होता आणि बीफ,पोर्क वगैरे कायमचे सोडायला लागले होते) असल्याचे सांगितले. लगेच तिने, मला अंड्याचे आम्लेट आणि टोस्ट करून दिले आणि माझी ओळख वाढली. रविवार होता, त्यामुळे काय करायचे, हा प्रश्नच होता. नवीन गाव, परिचयाचे कुणीही नाही, त्यामुळे पुस्तक काढून वाचायला घ्यावे असा विचार मनात आला. 
थोड्या वेळात, तिथे राम नायडू आला आणि मला, त्याने त्याच्या घरी नेले. दुपारचे जेवण त्याच्याच घरी!! त्याच्या घरी, एकूणच कंपनीची सगळी माहिती मिळाली, इथे, माझ्या हाताखाली कितीजण आहेत आणि आणखी कितीजण लागण्याची शक्यता आहे, वगैरे बाबींबद्दल गप्पा झाल्या. राम तसा मोकळ्या मनाचा वाटला. अर्थात पहिल्या भेटीत आणखी किती समजून घेणार, हा प्रश्नच असतो. संध्याकाळी परत गेस्ट हाउसवर परतलो. रात्री जरा पाउस शिंपडला आणि वातावरण थंड झाले. वास्तविक ऑक्टोबर महिना म्हणजे हिंवाळा संपायच्या मार्गावर पण पावसाने परत थंडी आणली. चक्क खोलीतील हीटर लावून, बेड गाठला. 
सोमवारी, सकाळी लगेच तयार झालो आणि राम आला आणि लगेच ऑफिस गाठले. रामने, माझी ओळख स्टीफन डेवीस बरोबर करून दिली. हा, इथल्या बृवरीचा General Manager. गोरापान वर्ण,निळे डोळे, हाडपेर मजबूत (पुढे समजले, हा मिलिटरी मध्ये होता) किंचित घोगरा आवाज, उंची साधारणपणे सहा फुट. खरतर प्रथमदर्शनी उग्र चेहऱ्याचा वाटला आणि याच्याशी माझे कसे काय जमणार, हाच विचार मनात आला. नंतर, माझी ओळख, माझ्या Department staff बरोबर झाली. Accountant सह, माझ्या साथीला ४ माणसे होती. एक भारतीय वंशाची मुलगी सोडल्यास, बाकी सगळा गोऱ्या लोकांचा कारभार. लगेच मी, माझ्या केबिनमध्ये शिरलो आणि कामाचे स्वरूप समजून घ्यायला सुरवात केली. 
दर महिन्याच्या १० तारखेच्या आत, संपलेल्या महिन्याची Balance Sheet तयार करून देणे, त्याच्या बरोबर, इतर आर्थिक व्यवहाराचे रिपोर्ट्स तसेच काही नवीन खरेदी करायची झाल्यास, त्याबद्दलचे पेपर्स इत्यादी रिपोर्ट्सचा फोल्डर, जोहान्सबर्ग इथे, आमचे हेड ऑफिस होते, तिथे पाठवायचे. हेड ऑफिसमध्ये महिन्यातून एकदा, देशातील सगळे फायनान्स अधिकारी एकत्र जमून, मीटिंग होत असे. तिथे सगळ्या प्रश्नांचा साकल्याने विचार विनिमय होत असे आणि पुढे आणखी सुधारणा करायच्या झाल्यास, कशा करायच्या आणि त्या कशा राबवायच्या, इत्यादी बाबींची चर्चा होत असे. 
माझे आणखी मुख्य काम म्हणजे, दिवसांतून एकदा बृवरीला भेट द्यायची आणि Stock चा अंदाज घ्यायचा. अर्थात बृवरी आणि ऑफिस एकाच प्रांगणात असल्याने, त्याचा फारसा प्रश्न नव्हता परंतु आमचे ४ डेपोज होते, तिथे जाउन, Stock Audit करणे आवश्यक होते आणि त्यात नियमितता आणायची होती. हे डेपोज, शहरापासून फार दूर आणि अगदी अंतर्भागात होते. एका डेपो भेट द्यायची म्हणजे सगळा दिवस जायचा. 
पहिल्या दोन दिवसांत, या सगळ्या कामाची कल्पना आली आणि मला पुढे काय करायचे आहे, हे देखील समजले. प्रत्येक कंपनीची, स्वत:ची अशी कार्यशैली असते, रिपोर्ट्स कसे बनवायचे, याबाबत स्वतंत्र विचार असतो आणि ती तुम्ही जितक्या लगोलग आत्मसात कराल, तितके तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता अधिक!! माझे पहिले काम म्हणजे घर शोधणे. गेस्ट हाउस, ही कंपनीने केलेली तात्पुरती सोय होती. लगोलग पेपर्समधून एजंट्सची नावे शोधली आणि पुढील आठवड्याभरात एक घर नक्की केले.
एव्हाना लिझशी चांगली ओळख झाली होती. सकाळी, केवळ माझ्यासाठी म्हणून, ती मसाला आम्लेट करून देणे किंवा मला कॉफी आवडते म्हणून , दुधाची कॉफी न करता, क्रीम टाकून कॉफी तयार करीत असे. आता कुणीही असे म्हणेल, आमच्या कंपनीकडून तिला बराच "बिझनेस" मिळत होता, म्हणून माझी बडदास्त राखली जात होती पण तसे नव्हते. कारण, आमच्या हेड ऑफिसमधून बरेच वेळा वेगवेगळे अधिकारी यायचे आणि तिथेच उतरायचे पण, त्यांना अशी Treatment मिळाल्याचे, निदान मी तरी बघितले नाही. असो……. 
माझ्या Department मध्ये, स्टीव, कारेन, डेल्फी या गोऱ्या तर, किम नावाची भारतीय वंशाची मुलगी होती. तिथेच आमचा मार्केटिंग विभाग होता आणि हा विभाग मात्र बहुतांशी काळ्या लोकांच्या हातात होता. कंपनीचा सगळा व्यवहार Cash basis वर चालायचा आणि तिथेच खरी जोखीम होती. Cash Collection हे माझ्या अखत्यारीत येत असल्याने, तो व्यवहार फार काळजीपूर्वक बघावा लागत असे.खरे सांगायचे तर, आमची बियर ही, दर्जाच्या दृष्टीने कमअस्सल आणि स्वस्त होती, जिला तिथे "सोर्घम बियर" असे नाव होते. मी, जवळपास दोन वर्षे तिथे काढली पण एखाद दुसरा प्रसंग वगळता, कधीही घेतली नाही आणि घेतली ती देखील थेंबाच्या स्वरूपात!! 
मी, तिसऱ्याच दिवशी, माझ्या खात्याची मीटिंग घेतली आणि प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप समजून घेतले. एक बरे होते, सगळेजण याच गावात राहणारे होते. मी, वगळता, सगळेजण इथे जवळपास, काही वर्षे काम करून, अनुभवी झाले होते. एकतर गाव संपूर्ण अपरिचित, गावात ओळखीचे कुणीही नाही. जवळपास कुठले शहर देखील नाही - जोहान्सबर्ग शहर इथून २०० कि.मी. लांब!! सुरवातीला, इथे दिवस कसे काढायचे, हा प्रश्नच होता!! अर्थात, सोमवार ते शुक्रवार, कामाचे दिवस असल्याने, इतर काही करण्याचा प्रश्नच नव्हता पण, शनिवार, रविवार, मात्र आ वासून उभे राहायचे!! 
स्टीफनने माझी अडचण ओळखली आणि त्याने मला, तिथल्या गोल्फ क्लबचा मेंबर होण्याचे सुचवले, नुसते सुचवले नाही तर तिथला फॉर्म आणून, माझ्याकडून भरून घेतला!! मला आजही स्पष्टपणे आठवत आहे, माझा पहिला दिवस. आयुष्यात कधीही गोल्फ खेळायचा प्रसंग आला नाही आणि इथे मी त्यानिमित्ताने सगळा सरंजाम विकत घेतला!! मी आणि तो, तिथे एकत्रच गेलो. गेल्यावर, लगेच त्याने माझी, तिथल्या ट्रेनरशी ओळख करून दिली आणि माझे शिक्षण सुरु झाले!! आपल्याला वाटतो तितका हा खेळ सहज, सोपा अजिबात नाही, हे पहिल्याच दिवशी ध्यानात आले. या खेळत वेगवेगळ्या प्रकारच्या "स्टिक्स" असतात आणि ज्या प्रकारे फटका मारायचा आहे, त्याला साजेशी स्टिक्स वापरणे जरुरीचे असते. हळूहळू खेळाचे नियम समजायला लागले आणि मला त्याची गोडी वाटायला लागली. इथे सतत जाण्याचा फायदा एक(च) झाला, गावातील अनेक प्रतिष्ठित गोऱ्या वर्णाची माणसे प्रत्यक्ष ओळखायला लागली. 
महिन्यातील शेवटच्या शनिवारी रात्री तिथे, बॉल डांस पार्टी असते. अशा पार्ट्यांमध्ये माझा शिरकाव झाला. तिथे मला, खऱ्याअर्थाने, हे नृत्य समजले आणि आपण समजतो तितके सोपे, अजिबात नाही, हे नव्याने आकळले. इथे तुम्हाला ड्रेस कोड पाळावाच लागतो अन्यथा प्रवेश नाकारला जातो. क्लबची तशी शिस्त आणि नियम आहे. ज्या रंगाचा सूट असेल, त्याच रंगाची ट्राऊझर आणि गळ्याला टाय किंवा बो, लावणे क्रमप्राप्त!! ड्रिंक्स कसे घ्यावे, कुठल्या ग्लासातून घ्यावे, याचे देखील शास्त्र असते, हे नव्याने समजले. ड्रिंक्स घेताना, संभाषण कसे करावे आणि कुठले विषय बोलायला घ्यावेत तसेच विनोद देखील कसे करावेत, हे सगळे शिक्षण तिथे मला मिळाले. ड्रिंक्स घेताना वचावचा बोलणे म्हणजे ड्रिंक्सचा अपमान आहे. ड्रिंक्स घुटक्या घुटक्याने, गालात घोळवत घेतले म्हणजे त्याची खरी लज्जत कळते आणि मुख्य म्हणजे, मी आख्खी बाटली रिचवली, असला मूर्ख शेखीपणा इथे औषधाला देखील बघायला मिळत नाही!! 
वास्तविक, स्टीफन फक्त वाइन घेतो आणि ती देखील प्रसंगोत्पात पण, ड्रिंक्सला अफलातून कंपनी. ऑफिसमधील करडेपण, अशावेळी चुकूनही आढळत नाही. हलक्या नर्म आवाजात बोलत असतो. माझा आवाज म्हणजे काय वर्णावे? परंतु पुढे मी देखील आवाजाचा आवाज, खालच्या पातळीवर आणला. आमची ओळख आजही टिकून आहे आणि याचे खरे श्रेय स्टीफनकडे!! या माणसाने माझ्यावर अपरिमित प्रेम केले. त्याच्या घरी, वारंवार घेऊन गेला आणि त्याच्या कुटुंबाचा सदस्य असल्यासारखे वागवले. वास्तविक, गोरे लोकं फारसे इतरांच्यात मिसळत नाहीत आणि त्यांच्या घरात तर अजिबात प्रवेश मिळत नाही. स्टीफन याबाबत वेगळा!! त्याच्या घरी मी दोन ख्रिसमस साजरे केले पण त्याची आठवण आजन्म राहिली!!
महिन्याभरात, नव्या जागी रुळायला लागलो. नवीन घर घेतले आणि आता गाडी घेण्याची गरज निर्माण झाली. इतकी वर्षे, ज्या कंपनीत नोकरी केली, तिथे त्या कंपनीची गाडी मिळत असे पण आता, या कंपनीने, पगारात "अलाउन्स" दिल्या कारणाने गाडी आवश्यक ठरली. इथे परत स्टीफन कामाला आला. त्याचा जावई, जगप्रसिद्ध Avis कंपनीचा सेल्स डायरेक्टर असल्याने, माझे काम भलतेच सोपे झाले. इथे एक पद्धत फार छान आहे. कुठल्याही कामासाठी "लोन" मिळणे, सहज शक्य असते. तुमची पगाराची स्लिप आणि राहण्याचा कायमचा पत्ता - ज्याला Permanent Residency म्हणतात, तसेच ड्रायविंग लायसन्स कॉपी असली की दोन दिवसात, तुमचे काम होते. 
या कंपनीत, दर महिन्याला जोहान्सबर्ग इथल्या हेड ऑफिसमध्ये जाणे भाग असल्याने, गाडी आवश्यक आणि तशी मी ओपेल कोर्सा घेतली. गाव तसे फारच लहान असल्याने, रोजचे ड्रायविंग तसे फार होत नसे, फारतर ३,४ कि.मी.!! घरी जेवण करणे, आता मला चांगल्यापैकी जमायला लागले आणि एके दिवशी मी, लिझला घरी जेवायला बोलावले. अर्थात, तिच्याबरोबर तिचा बॉय फ्रेंड आलाच. अर्थात, त्याच्याशी देखील ओळख चांगली झाली होती. घरी आले, तशी मी ड्रिंक्सबद्दल विचारले तर लिझ एका पायावर तयार पण, तिचा बॉय फ्रेंड (नाव विसरलो) मात्र निर्व्यसनी!! मी, तसे भारतीय पद्धतीचे जेवण करायला शिकलो होतो आणि इथे एकूणच मसाले वापरण्याचे प्रमाण नगण्य, हे ध्यानात ठेऊन मी पदार्थ बनविले होते. माझ्या मते सपक पण त्यांच्या मते मसालेदार!! रविवारी, सकाळी आले पण दिवसभर आम्ही गप्पा मारीत होतो. परत एकदा, ड्रिंक्स घेताना, गोरा फार मिकाला होऊन, गप्पा मारतो, याचा तुडुंब अनुभव घेतला. मला आजही असेच वाटते, पार्टी करावी तर गोऱ्या लोकांनी!! कुठेही गोंधळ नाही, सगळे अतिशय शिस्तवार आणि शांतपणे!! याचा अर्थ असा नव्हे, सगळेच गोरे एकाच माळेचे मणी असतात. क्लबमध्ये धुडगूस घालणारे बरेच गोरे, मी बघितलेले आहेत. पुढे प्रिटोरिया शहरात नोकरी करताना, भिक मागणारे गोरे देखील बघितले आहेत. 
ऑफिसमध्ये, स्टीव जरा दुखावलेला होता. रामची बदली होत असताना, त्या जागेवर, त्याला यायचे होते आणि मी मध्ये आलो, म्हणून त्याचा, त्याला राग होता. वास्तविक स्टीफनने मला, पहिल्याच भेटीत हे सांगितले होते. त्यामुळे, त्याच्याशी वागताना, मी जरा नरमाईने वागत होतो. अखेर, त्यांच्याकडून काम करवून घेणे, ही माझीच जबाबदारी होती. बाकीच्या तीनही मुली मात्र व्यवस्थित काम करायच्या. काही दिवसांनी, मी त्यांच्याशी हसत खेळत दोस्ती जमवली. कारेन तर पुढे बरीच वर्षे माझ्या संपर्कात होती. कारेन म्हणजे चेन स्मोकर!! घटस्फोटिता, पदरी एक मुलगी (मुलीचे वय तेंव्हा ५ वर्षे!!) असल्याने, नोकरी आवश्यक. एकटीच रहात होती. मला खरेच नवल वाटते, आणि या मुलीबद्दल तर जास्तच. एका लग्नाचा विषण्ण करणारा अनुभव जमेस असून देखील, लगोलग कुणाच्या तरी प्रेमात पडतात. ही मुलगी देखील, आमच्याच ऑफिसमधील, केप टाऊन इथल्या स्मिथच्या प्रेमात पडलेली!! स्मिथचे लग्न झालेले आणि बायको घरात असून देखील, हिच्याशी संबंध ठेऊन!! सगळे राजरोस!! कुठेही लपवाछपवी नाही!! ऐकताना, अनिल कानकोंडा!! 
महिन्याच्या महिना रिपोर्ट्स जायला सुरवात झाली. बृवरीत रोजची फेरी सुरु झाली. आणि एके दिवशी, एका डेपोला भेट देण्याचे ठरविले. भेट, ही काहीही न कळविता करायची!! ऑफिसची गाडी आणि ड्रायव्हर घेतला आणि सकाळी १० वाजता निघालो. सखिले गावात डेपो होता, आमच्या ऑफिसपासून, १०० कि.मी.वर!! या भेटीत मला "खरी" साउथ आफ्रिका बघायला मिळाली. आपल्याला टीव्हीवर जे दर्शन घडते, तो सगळा मार्केटिंगचा भाग असतो. थोड्या वेळात, आमची गाडी, हमरस्ता सोडून, आडमार्गाला लागली आणि मातीचा रस्ता सुरु झाला. आणखी पुढे गेल्यावर, वस्ती तर विरळ झालीच पण, रस्ता खडकाळ लागला!! अगदी भारतीय रस्त्यांची आठवण झाली!! डेपो गाठला आणि लगोलग stock check सुरु झाले. दोन तासानंतर, फारशा गंभीर गफलती न आढळल्याने, तसा रिपोर्ट तयार केला आणि आणखी एका आडवळणावरील बियर हॉलला भेट दिली. आपल्याकडील देशी दारूचा गुत्ता आणि इथला बियर हॉल, यात तत्वत: काहीही फरक नाही!! तसाच जुनाट कळकट हॉल, दोन,तीन माणसे झिंगलेली, एका टेबलावर बियर सांडलेली असल्याने, त्याचा उग्र दर्प सगळीकडे पसरलेला. आणखी दोन माणसे काकुळत येई पर्यंत प्यायल्याने, तिथेच आडवी झालेली. ही अवस्था दुपारी ३,४ वाजताची!! माझे काम उरकणे अत्यावश्यक असल्याने, नाक दाबून, अर्ध्या तासात तिथून निघालो. बाहेर आलो आणि बाहेरील मोकळ्या हवेचा सुगंध शरीरात भरून घेतला!! 
परतीच्या वाटेवर, वाटेत काळ्या लोकांच्या अनेक वस्त्या दिसत होत्या. अक्षरश: शेणामातीने लिंपलेल्या भिंती, आधाराला चार,पाच काटक्यांचा आधार!! अशा अनेक झोपडपट्ट्या दिसत होत्या. मला नवल वाटले, इथे थंडी म्हणजे हाडे काकडून टाकणारी आणि अशा हवेत, ही माणसे कशी जगत असतील. घरात जिथे दिवा लावायला पैसा नाही तिथे "हीटर" म्हणजे सुखाची परमावधी!! अर्थात, रस्त्यावरील इलेक्ट्रिक केबल्सवरून वीज चोरायची, हे नित्याचे काम!! ही साउथ आफ्रिका पार वेगळी आणि फारशी कुणाच्या दृष्टीस न पडणारी!! जगातील यच्चयावत काळे धंदे या वस्त्यांमधून कायम चालू असतात, ड्रग्स तर सिगारेटच्या जोडीने सेवन करणार!! त्यामुळे डोळे सतत तांबारलेले. आधीच काळा वर्ण, त्यात सगळ्यांच्या खुरटलेल्या दाढ्या आणि लाल डोळे!! अंगाने उंच, धिप्पाड असल्याने, जवळ जाण्याची देखील भीती!! माझ्या कामाचा हा अनिवार्य भाग असल्याने, मी त्या दोन वर्षांत, अशा वस्त्यांमधून बराच हिंडलो.पुढे, प्रिटोरिया, जोहान्सबर्ग सारख्या आलिशान शहरात राहिलो पण, हे दर्शन कधीच पुसले गेले नाही!! 
आता मात्र, स्टीवला जाणीव व्हायला लागली, मी इथे रुळायला लागलो आहे आणि त्यामुळे त्याच्या कारवाया अधिक वाढल्या (अर्थात हे माझे आत्ताचे म्हणणे आहे) काम वेळेवर करून न देणे, कामात चुका करणे आणि ज्या दिवशी अत्यंत महत्वाची कामे असतील, त्या दिवशी रजा घेणे असले उद्यॊग सुरु झाले.त्यावेळी मी थोडा काणाडोळा केला (अंती मला हे फार महागात पडले) आणि त्याच्या कलाने घेण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यातून, त्याचे याच वेळेस लग्न ठरले (लग्न क्रमांक ३!!). आता, त्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणून, मला त्याला पार्टी देणे भाग होते. एका रविवार सकाळी, तो आणि त्याची वाग्दत्त वाढू, याना मी तिथल्या नदीकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये बोलावले. स्टीवची फियांसी - कार्मेन त्याच्यापेक्षा खूपच तरुण होती. स्टीव, त्यावेळेस, ५७ वर्षांचा होता तर कार्मेन केवळ ३२!! असो…. पुढे मला समजले, हे लग्न देखील मोडले पण त्यावेळी, माझा स्टीवशी संबंध तुटला होता!! 
लग्न मात्र थाटात झाले. चर्चमध्ये लग्नविधी बघायचा, माझा पहिलाच प्रसंग!! इथेच मी चर्च मधील ऑर्गन बघितला आणि त्याचे स्वर, चर्च कसे भरून टाकतात, याचा अनुभव घेतला. वास्तविक इथले चर्च तसे प्रचंड, भव्य वगैरे नाही पण, चर्चमध्ये शिरल्यावर  प्रकारचा थंडावा मिळतो आणि शांतता लाभते. या अनुभव, मी इथे रहात असताना, पुढे वारंवार घेतला. अर्थात रीतीरिवाज तसेच असतात. पूर्वी चित्रपटात काही प्रसंग बघितले, त्याचीच जणू प्रतिकृती, ही इथे बघत होतो. अर्थात, चित्रपटात बघणे आणि प्रत्यक्ष अनुभवणे, यात फरक राहणारच.संध्याकाळी लग्न झाले आणि एका हॉटेल मध्ये डिनर पार्टी सुरु झाली. सुरवातीला Champagne दिली गेली आणि स्टीवने Dance Open केला!! अगदी मध्यरात्र उलटून गेली तरी पार्टी चालू होती. खानपानाची रेलचेल होती. रात्रीचे २ वाजले तशी मी आणि स्टीफन, दोघांनी निघायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी रविवार होता पण तरी पुरे!! या विचाराने, आम्ही पार्टी सोडली. नंतर समजले, पार्टी पहाटे ५ वाजता संपली!!    
लग्न झाल्यावर काही दिवसांची सुटी घेऊन, स्टीव परत कामावर रुजू झाला. मधल्या सुटीच्या काळात, कारेनने त्या कामाचा बोजा उचलला होता. मध्यंतरी, आमच्या बृवरीमधील भ्रष्टाचार बाहेर पडला. बृवरीचा धंदा वाढवा म्हणून, आमची कंपनी, वेगवेगळ्या जागी, बियर हॉल किंवा निरनिराळी विक्री केंद्रे उभारण्यास अर्थ सहाय्य करीत असते. अर्थात, हा सगळा पैसा, हेड ऑफिसवरून येत असे पण याबाबतच्या कायदेशीर बाबी, आम्हाला इथे पूर्ण करून घ्याव्या लागत. त्यासाठी, बृवरीने एक काळा माणूस नेमला होता (नाव आता विसरलो) आणि त्याच्याकडे जागा, ठरविणे, त्याची कायदेशीर कागदपत्रे तपासणे/तयार करणे इत्यादी कामे असायची. स्टीफनचा त्याच्यावर विश्वास होता आणि त्याचा याने फायदा उठवला. माझ्याकडे जेंव्हा stock तपासण्याचे काम आले तशी, याच्या कामाबाबत मला संशय यायला लागला. एके दिवशी, मी आणि स्टीफन, दोघांनी, याच्या अपरोक्ष, याच्या ऑफिसची झडती घ्यायचे ठरविले आणि तिथे अनेक बोगस पेपर्स आढळले आणि माझा संशय खरा ठरला. आर्थिक भ्रष्टाचार फार नव्हता, २०,००० Rands इतपत होता आणि आणि आमच्या पातळीवर, हे प्रकरण हाताळू शकत होतो. पोलिसांना मध्यस्थी केले आणि अनेकांच्या जाबजबान्या घेऊन, केस उभी केली. 
या केस निमित्ताने, मी आणि स्टीफन अधिक जवळ आलो. याच सुमारास, ख्रिसमस आला, इथे या काळात, एकतर भारतात जात असे किंवा इथेच काही मित्र एकत्र जमून, रात्रभर पार्टी करण्याचा घाट घालीत असे. या वर्षी मात्र, मी मे महिन्यात भारतात गेलो असल्या कारणाने, या ख्रिसमसला सुटी अशक्य. मी इथेच आहे, हे समजल्यावर स्टीफनने मला, त्याच्या घरी बोलावले.  गोऱ्या माणसाच्या घरी ख्रिसमस साजरा करण्याची पहिलीच वेळ. त्याच्या बायकोशी, माझी गाठभेट पूर्वीच झालेली असल्याने, तसा प्रश्न नव्हता. या निमित्ताने, माझा गोऱ्या कुटुंबात समावेश झाला. २४ तारखेच्या दुपारीच घरी यायचे निमंत्रण मिळाले होते. घरी आलो तशी, स्टीफनच्या दोन्ही मुली आणि त्याचे जावई आले होते, त्यांच्याशी ओळख झाली. गप्पा मारायला लगोलग सुरवात झाली. वास्तविक स्टीफनच्या एका जावयानेच मला गाडी मिळवून दिली होती. त्याच्याशी गप्पा अधिक रंगल्या. गोरा माणूस, पार्टी कशी रंगवतो, याचा परत एकदा रोकडा अनुभव आला. केवळ दुसऱ्यावर विनोद करायचे नसून, स्वत:वर व्यंगोक्ती करण्याचे, त्याचे कसब दांडगे असते!! जशी संध्याकाळ आली तशी ड्रिंक्स बाहेर आले, घरातील म्युझिक सिस्टीम सुरु झाली आणि घरातल्या सगळ्यांचे पाय थिरकायला लागले!! अतिशय मंद आवाजातील Waltz संगीत, हातात बियर किंवा व्हिस्कीचा ग्लास,  टेबलावर खमंग भाजलेली टर्की आणि वातावरणात आल्हाददायक थंडी!! माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय ख्रिसमस सोहळा!! 
जानेवारीत कामाची भाऊगर्दी सुरु झाली कारण, फेब्रुवारी मध्ये, आमचे Annual Budget सादर करायचे असते. या रिपोर्टवर, आमचे वार्षिक फंडिंग  अवलंबून!! लगोलग, मी आणि स्टीफन, एकत्र बसून कामाला सुरवात केली. संध्याकाळ, रात्रीत परिवर्तित व्हायला लागल्या. याचा परिणाम असा झाला, माझे दैनंदिन कामातील लक्ष जरा दुरावले. कारेन आणि इतरजण, रोज संध्याकाळी, मला रिपोर्ट करायच्या पण, स्टीव मात्र दुरावा असल्यासारखा वागायला लागला. अखेर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, आमचे बजेट फायनल झाले आणि मी, हेड ऑफिसला सगळे रिपोर्ट्स पाठवून दिले. यात सगळ्या घालमेलीत, जवळपास, ४ आठवडे गेले. 
परत मी दैनंदिन कामात लक्ष द्यायला सुरवात केली. आमच्याकडे, दर आठवड्याला Petty Cash Budget असते आणि त्याप्रमाणे, आम्ही, Daily Collection मधील, काही रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवतो आणि बाकीची cash बँकेत भरतो. हे काम जरी माझे असले तरी, या काळात, स्टीव करीत होता आणि काही दिवसांनी, मी त्याच्याकडे Petty Cash Statement मागितले. नेहमीप्रमाणे, माझे ऑडीट सुरु झाले आणि कुठेतरी गफलत आढळायला लागली. जवळपास, ५,००० Rands चा हिशेब लागत नव्हता. मी जसा त्याबद्दल जाब विचारला तशी स्टीव समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. लगेच मी स्टीफनला मध्यस्थी केले आणि रिपोर्ट तयार केला!! वास्तविक ५,००० रक्कम म्हणजे फार नाही आणि स्टीवला चांगला पगार होता, म्हणजे या पैशाचा मोह पडावा अशी परिस्थिती नक्कीच नव्हती. 
अर्थात, हा घोटाळा, पर्यायाने माझी जबाबदारी होती कारण मी इतके दिवस दुर्लक्ष केले होते. हेड ऑफिसला बातमी सांगणे आवश्यक होते. वास्तविक, त्याच्या पगारातून, ही रक्कम कापून घेऊन, प्रकरण संपवता आले असते पण दुर्दैवाने तसे झाले नाही. जसे प्रकरण, हेड ऑफिसकडे गेले तशी त्याला कंपनीतून काढून टाकावे, असा एक सूर निघाला. मी याबाबत स्टीफनशी चर्चा केली आणि काढून टाकणे योग्य, असेच आम्हा दोघांचे मत पडले पण, याचे नुकतेच लग्न झाले आहे आणि अशा परिस्थितीत, नोकरी जाणे कितपत योग्य आहे? हा विचार मी मांडला आणि प्रकरण माझ्याच गळ्यात पडले, जणू काही, यात माझाच हात आहे!! प्रकरण चक्क CFO पर्यंत गेले आणि आम्हा तिघांना, हेड ऑफिसला चौकशीसाठी बोलावले गेले!! चौकशी अखेर, स्टीवची नोकरी तर गेलीच पण, माझ्या फाईल मध्ये Negligence चा रिपोर्ट ठेवला गेला!! साऊथ आफ्रिकेत नोकरी सुरु करून तेंव्हापर्यंत मला १२ वर्षे झाली होती पण, माझ्याबाबत असा संशय कुणीही घेतला नव्हता. त्याबाबत आजतागायत मी बरीच काळजी घेतली होती!! 
त्या संध्याकाळी काहीशा विमनस्क मनस्थितीत मी घरी आलो. जेवण करायचा मूड अजिबात नव्हता. शुक्रवार संध्याकाळ असल्याने, आता तसा आराम करायची संध्याकाळ होती. सरळ चर्च गाठले, आत गेलो नाही पण बाहेरच बराच वेळ बसून राहिलो. तिथून जवळच असलेल्या "वाल" नदीकाठच्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथेच जेवण घेतले. रात्री स्टीफनचा फोन आला, सबुरीचे चार शब्द बोलला. त्यालाही कल्पना होती, यात माझा कसलाच हात नाही पण, त्याचे देखील हात बांधले गेले होते आणि त्याला देखील मर्यादा होत्या. 
दिवसेंदिवस आमच्या बृवरीचा धंदा  होता, पण हे होणारच होते. Production आणि sales, याचा मेळ घालणे कठीण होत होते.  त्यातून,currency devaluation चा फटका बसायला लागला. मालाची किंमत वाढवणे योग्य नव्हते कारण मुळातच अतिशय स्वस्त बियर, हाच मुद्दा, बियर खपण्यामागे होता. नवीन products काढायचे ठरवले आणि Pine Beer आम्ही सुरु केली. नवीन बियर म्हणून दोन, तीन महिने सेल्स वाढला तरी देखील ज्या हिशेबात overheads होते, त्या हिशेबात सेल्समध्ये वाढ होत नव्हती. अर्थात, हा प्रकार माझ्याच बृवरीबाबत नव्हता. "इस्ट लंडन","रस्टनबर्ग","केप टाऊन","पोर्ट एलिझाबेथ" इथल्या बृवरीचे performance काळजी करण्यासारखेच होते. थोडा विचार केला तर सहज समजून घेण्यासारखे होते. मुळात, या बृवरी, इथल्याच South African Breweries - SAB, या जगड्व्याळ कंपनीच्या होत्या. विजय मल्ल्यांना, साऊथ आफ्रिकेत बिझिनेस सुरु करायचा होता आणि या कंपनीला, या बृवरी विकायच्या होत्या, कारण यांचा धंदा 'बुडीत" खात्यात जाणारा होता. "किंग फिशर" आजही तिथे जम बसवू शकलेली नाही. 
आमचे भवितव्य आम्हालाच स्पष्ट दिसत होते. खर्च तर दिवसेंदिवस वाढत होते आणि उत्पन्न घटत होते. ऑफिसमधील मार्केटिंग विभाग प्रचंड ताणाखाली वावरत होता. इतक्यात स्टीफनला टांझानिया मधून नोकरीची "ऑफर" आली आणि त्याने नोकरीचा राजीनामा दिला. अर्थात, त्याने मला आधीच कल्पना दिली होती पण इतक्या झटापट सगळे घडेल, याची त्याला देखील कल्पना नव्हती. एक तर लखलखित सत्य होते, जर का ही बृवरी बंद पडणार असेल तर इथला स्टाफ इतर बृवरीमध्ये सामावून घेणे, सर्वथैव अशक्य होते आणि दुसरे म्हणजे इथल्या लोकांची स्थलांतर करण्याची फारशी मानसिकता नसते. शक्यतो, जिथे नोकरी आहे, तिथेच आयुष्य  काढावे, अशीच वृत्ती सगळीकडे दिसते. नोकरी बदलतील पण शक्यतो त्याच शहरात दुसरी बघतील. याचा परिणाम इथल्या स्टाफ वर होत होता आणि कुणीच कामाकडे फारसे लक्ष द्यायला तयार नसायचा. यात माझी फार कोंडी व्हायला लागली. हेड ऑफिस मधील काही लोकांकडून, बृवरी बंद पडण्याचे स्पष्ट निर्देश मिळाले प, मला असे इथल्या लोकांना कसे सांगायचे, हा प्रश्न पडला. कारेन, स्मिथबरोबर लग्न करून केप टाऊन शहरात स्थिरावणार होती. तेंव्हा तिचा प्रश्न काही प्रमाणात तरी सुटला होता पण इतरांचे भवितव्य टांगणीला लागले होते.  
मी तर बोलून चालून परदेशी, मला काय आज डर्बन तर उद्या प्रिटोरिया. फिरत्या घरात रहायची सवय जडवून घेतलेली. पुढे तसेच घडले, प्रिटोरिया शहरात पुढील काही वर्षे बस्तान बसवले. मला आजही असे वाटते, मी जितका साऊथ आफ्रिका बघितला तितका तिथल्या लोकल लोकांनी देखील फारसा बघितला नसेल!! 

Saturday 12 September 2015

साथी रे भूल ना जाना मेरा प्यार!!

काही गाणी का लोकप्रिय होतात याचे जसे "गणित" कळत नाही त्याचप्रमाणे, काही गाणी का विस्मृतीत जातात, त्याचे देखील आकलन होत नाही. बरेचवेळा, गाणी गाजवली जातात - मार्केटिंग तंत्राने खपवली जातात पण अशा गाण्यांचे "आयुष्य" देखील अल्प असते. गाण्याची चाल सुंदर असणे, गाण्यातील कविता गेयतापूर्ण आणि आशयाबद्ध असणे आणि गायन, आपल्या जाणीवा समृद्ध करणारे असावे, असे भाग्य फार थोड्या गाण्यांना लाभते. त्यातून, चाल गायकी ढंगाची असणे, हे म्हणजे दुग्धशर्करा योग!! आपल्याकडे अजूनही, गाण्याची चाल "बाळबोध" असणे, भूषण मानले जाते आणि याचे मुख्य कारण, अजूनही सुगम संगीत हे प्रतिष्ठित झालेले नाही. याचा अर्थ असा नव्हे, "बाळबोध" चाल, सांगीतिक दृष्टीने कमअस्सल असते. सोपी चाल तयार करण्यासाठी देखील संगीताचा गाढा अभ्यास जरुरीचा असतो. पण, या विचाराचा इतका प्रभाव, आपल्या समाजावर पडलेला आहे की, जरा कठीण चाल आली की लगेच दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते!! गाण्याची चाल, हे देखील सर्जनशील काम आहे, हेच लोकांना फारसे पटलेले नसते आणि हा दुर्दैवी भाग आहे. यामुळेच काही असमान्य ताकदीचे संगीतकार मागे पडले आणि विस्मृतीच्या गर्तेत नाहीसे झाले!! हातात आलेले शब्द आणि त्या शब्दांचा अन्वयार्थ लावून, शब्दांना नेमक्या सुरांत गुंफणे, हे अजिबात सोपे नाही. मुळात, शब्दांत दडलेला आशय जाणवून घेण्यासाठी, तुम्हाला शब्दांबद्दल प्रेम असणे आवश्यक असते. शब्द माध्यम हे नेहमीच अति अवघड माध्यम असते आणि अशा माध्यमाशी जवळीक साधून, मगच त्यात "दडलेली"चाल शोधून काढून, त्या कवितेला अर्पण करायची!! असा सगळा प्रवास असतो.
"साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" हे "कोतवाल साब" या हिंदी चित्रपटातील गाणे, हे गाणे आज कुणाच्या खिजगणतीत तरी असेल का? मला शंका आहे. गाण्याच्या बाबतीत, असे बरेचवेळा होते, गाणे लक्षात राहते पण चित्रपटाचे नाव विसरले जाते!! शक्य आहे, इथे देखील असेच झाले असणार परंतु इतके विलोभनीय, गायकी ढंगाचे गाणे देखील, काळाच्या पडद्याआड जावे, ही खेदाची बाब आहे. आता सरळ गाण्याकडे वळतो. 
मला तर नेहमी असेच वाटते, एखादे गाणे तयार होणे म्हणजे, प्रसूतीवेदनेतून नवे बाळ  जन्माला येण्यासारखे असते. खरे तर हातात केवळ शब्दांचा "सांगाडा" असतो पण त्याला एकप्रकारची लय असते, ज्याला(च) गेयता म्हणतात. त्या लयीतून, चालीच्या निर्मितीची कहाणी सुरु होते. अर्थात, काहीवेळा, चालीचा आराखडा असतो आणि त्या लयीला समजून घेऊन, कविता मांडली जाते.प्रश्न त्याचा नाही तर प्रत्येकाच्या कुवतीचा आहे. इथे सुरवातीला, व्हायोलीन वाद्याचे सूर ऐकायला येतात आणि ते सूर क्षणात टिपेचा सूर गाठतात, हे जे "वर" जाण्याचे वळण आहे, तेच ध्यानात घ्यावे लागेल कारण, हे सूर(च) या गाण्याची कर्मभूमी आहे!! 
किती वेगवेगळी वळणे घेऊन, एका "बिंदूवर" व्हायोलिन्स स्थिरावतात आणि त्याच क्षणी गिटारचे सूर आणि व्हायोलिन्स, यांचा मेळ सुरु होतो. खरे तर, गाण्याचा ताल देखील, इथेच सिद्ध होतो आणि जोडीने, गाण्याचा "मुखडा"!! उत्तम गाण्याच्या बाबतीत एक बाब अवश्यमेव मानावीच लागते. गाण्याचा मुखडा हा, अतिशय सुबक, रंजक असावा लागते, जेणेकरून, रसिकाचे लक्ष, गाण्याकडे "खेचले" जावे. गाण्याचे अर्धे यश हे, तुम्ही गाण्याचा मुखडा कसा बांधता, यावर अवलंबून असते. पुढेतर सगळे "बांधकाम" असते!! इथे देखील हाच प्रकार आढळतो. 
हा वाद्यमेळ चालू असतो, तेंव्हा त्याच्या पाठीमागे हलक्या आवाजात, बोंगो या वाद्याच्या मात्रा चालू आहेत, पण त्याचे अस्तित्व फार नगण्य आहे. हा संगीतकाराचा विचार!! इथे, अति धीम्या आणि संथ सुरांत आशाबाईंच्या आवाजात, "साथी रे भूल ना जाना मेरा प्यार"  ही ओळ ऐकायला येते. ही ओळ जर का अति बारकाईने ऐकली तर आपल्याला सहज कळेल, आधी जे वाद्यांचे सूर आहेत, त्याच्याशीच तादात्म्य राखणारी ही गायकी आहे. अतिशय "ठाय" लयीत आणि मंद्र सप्तकात गाणे सुरु होते. 
या ओळीचे गायन देखी फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. शब्दांतील आशय ओळखून, तो आशय सुरांतून कसा खोलवर व्यक्त करायचा, याचे इथे अप्रतिम उदाहरण आपल्याला ऐकायला मिळते. "साथी रे, भूल ना जाना, मेरा प्यार" गाताना, "रे" अक्षरावरील "एकार" आणि नंतर परत ही ओळ गाताना, "साथी" मधील "थी" अक्षरावरील "इकार" खास ऐकण्यासारखा आहे. हाण्याची लय जर समजून घेतली तर, या लयीला, अशा "एकारा"तून किंवा "इकारा" मधून, जे वेगळे "वळण" मिळते आणि आशय वृद्धिंगत होतो, ही गायकी फार कमालीची अवघड आहे. "थी" अक्षर किंचित "उचलून" म्हटले आहे. फार, फार कठीण आहे. 
"मेरी वफा का, ऐ मेरे हमदम; कर लेना ऐतबार, साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" ही ओळ तर केवळ असामान्य आहे, "ऐतबार" वरील हरकत आणि परत "साथी" शब्दाचा उच्चार!! पहिल्यावेळी केलेला उच्चार आणि आताचा उच्चार, यात जमीन-अस्मानाचे अंतर आणि फरक आहे. इथे एक ध्यानात घेतले पाहिजे, गाण्याची लय तीच आहे पण, स्वर आणि त्याचे application, इथेच गाणे थोडे बुद्धीगम्य होते. केवळ काही सुरांचाच फरक आहे पण केवळ अर्थपूर्ण आहे. यालाच गायकीची "नजर" म्हणतात आणि इथे ही गायिका, आपला दर्जा दाखवून देते. हे ओळखणे सोपे नाही आणि ओळखून, तसेच आपल्या गळ्यातून तंतोतंतपणे प्रत्यंतर देणे तर त्याहून अवघड आहे. 
या पुढे पहिला अंतरा येतो आणि परत व्हायोलिन्स सुरु होतात. वाद्यांचे जणू नर्तन चालावे त्याप्रमाणे, त्यातून सुरांची अतिशय गुंतागुंतीची रचना सूर होते, जी आशाबाईच्या गळ्यातून आलेल्या सुरांशी तादात्म्य राखते. वाद्यमेळ काहीसा "अरेबिक" स्वरावलींच्या धाटणीवर आहे. 
"दूर कही कर लेजा मजबुरी, वो दुरी तो होगी नजर की दुरी;
तेरी दुआए गर साथ रही, आयेगी फिर से बार; 
साथी रे भूल ना जाना मेरा प्यार …."
वास्तविक या ओळीत तशी सुरांची फार अकल्पित करामत नाही परंतु तरी देखील "मजबुरी" मधील "री" अक्षर तसेच "दुरी" मधील "री" हे अक्षर, इथल्या हरकती खास आहेत. अतिशय बारकाईने ऐकले तरच त्यातले सौंदर्य घ्यानात येईल आणि परत उच्चारलेला "साथी" हा शब्द!! पहिल्या, ध्रुवपदात घेतलेली "जागा" आणि इथे उचललेली "जागा" यात विलक्षण फरक आहे. तसेच, इथे "थी" अक्षरावर किंचित लांबवलेली हरकत, गायनाची परीक्षा किती अवघड आहे, हेच दर्शवून देते. खर तर अशी सौंदर्यनिर्मिती, हेच सुगम संगीताचे खरे "अलंकार" आहेत आणि या अलंकारानीच, गाणे सजवले जाते. हे अलंकार घेणे अजिबात सोपे नाहीत. इथे प्रत्येक क्षण आणि त्यापलीकडील "निमिष" महत्वाचे असते.याच सुरांचा नेमका "कण, गळ्यातून काढणे, यालाच गायकी म्हणतात.

दुसरा अंतरा अवतरत असताना, परत व्हायोलिन्स वाद्यातून येणारी अवघड वळणे आणि त्याला मिळालेल्या बासरीच्या सुरांची साथ, हा सांगीतिक वाक्यांश, हे संगीतकाराच्या प्रतिभेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. वास्तविक, सुगम संगीतात, वाद्यमेळाची रचना म्हणजे एका प्रकारे अप्रतिम Crafting असते, चालीच्या सुरांशी "गणित" मांडून, याची रचना तयार केली जात असते. पण, त्यात जरादेखील "कृत्रिमता" आणू न देता, सुरांचा खेळ खेळायचा असतो. 
"काश कभी ये रैना ना बिते, प्रीत का ये पैमाना कभी ना रिते;
डर है कही आनेवाली सहर, ले लेना दिल का करार,
साथी रे भूल ना जाना मेरा प्यार…." 
या ओळीत, "पैमाना कभी ना रिते" वरील गायकी बघावी. "पैमाना कभी" हे शब्द पार वरच्या सुरांत घेतले आहेत आणि लय तशीच कायम ठेऊन, "ना रिते" हे शब्द खर्जात घेतले आहेत!! शब्दातील अव्यक्त भाव कसा सुरांच्या सहाय्याने व्यक्त झाला आहे. अर्थात इतकेच इथे संपलेले नाही. लाल गालिच्यावर पाणीदार मोती ओघळत, उतारावर यावेत त्याप्रमाणे, इथे सूर खाली आला आहे. ही सुरांची प्रक्रिया केवळ अनुभवण्यासाठीच "जन्माला" आली आहे. अशी गायकी ऐकताना, आपल्या हाती एकच उरते.हातातील पेन खाली ठेवावे आणि डोळे बंद करून सगळे सूर पापणीच्या आड साठवून ठेवावेत. मी तरी आणखी वेगळे काय केले!!   

Friday 11 September 2015

मुग्ध प्रणयी चारुकेशी

आपल्या रागदारी संगीतातून ज्या भावना व्यक्त होतात, त्या बहुतांशी अतिशय संयत स्वरूपाच्या असतात. किंबहुना, "संयत" हेच रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. अगदी दु:खाची भावना घेतली तरी, इथे "तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे" असेच दु:ख स्वरांमधून स्त्रवत असते. इथे ओक्साबोक्शी भावनेला तसे स्थान नाही. भक्ती म्हटली तरी त्यात लीनतेला सर्वात महत्व. ईश्वराच्या नावाने काहीवेळा "टाहो" फोडला जातो पण ती एक छटा झाली, लक्षण नव्हे. प्रणयी भावना देखील, संयत, मुग्धपणे व्यक्त होते. एखादे भक्ष्य ध्यानात ठेऊन, ओरबाडण्याला इथे कधीही स्थान मिळत नाही. 
या दृष्टीने पुढे विचार करता, कलाकार आणि रसिक यांच्यामधील संवाद देखील असाच मूकपणे साधला जातो. खरेतर, "एकांताने, एकांताशी एकांतवासात साधलेला अमूर्त संवाद" असे थोडे सूत्रबद्ध वाक्य इथे लिहिता यॆइल. त्यामुळे कलेशी एकरूप होणे, एकात्मता साधणे, अशा वृत्तींना इथे साहजिक अधिक महत्व प्राप्त होणे, क्रमप्राप्त ठरते. 
खरतर राग "चारुकेशी" आणि पूर्वीच्या संस्कृत ग्रंथात दिलेला समय आणि रागाची प्रकृती बघत, थोडा विस्मय वाटतो. सकाळचा दुसरा प्रहर, या रागासाठी उत्तम असे म्हटले आहे आणि या रागाचे "वळण" बघता, या काळात, प्रणयी भावना बाळगणे कितपत संय्युक्तिक ठरते, हा प्रश्नच आहे!! अर्थात, आधुनिक काळात, जिथे रागांच्या समयाबाबतचे संकेत आणि नियम, फारसे पाळले जात नाहीत तेंव्हा या मतांना किती महत्व द्यायचे, हे वैय्यक्तिक स्तरावर योग्य ठरते. आधुनिक जीवनशैली अशा संकेतांना साजेशी नाही, हेच खरे. 
आता रागाच्या तांत्रिक भागाकडे वळल्यास, या रागात सगळे स्वर लागतात परंतु, "धैवत" आणि "निषाद" हे स्वर कोमल घेतले जातात तर बाकीचे सगळे स्वर शुद्ध स्वरूपात, लावले जातात. याचाच अर्थ, रागाची जाती ही,"संपूर्ण-संपूर्ण" या प्रकारात जमा होते. या अनुरोधाने पुढे लिहायचे झाल्यास, "ध,नि,सा,रे,ग,म,ग,रे" किंवा "रे, ग,म,ध,प", तसेच "रे,ग,म,रे,सा" अशा स्वरांच्या संगती, या रागाची बढत करताना, वापरल्या जातात.     
मुळात, हा राग कर्नाटकी संगीतातील परंतु रागांच्या चलनवलनामधून हा राग उत्तर भारतीय संगीतात आला आणि चांगल्यापैकी स्थिरावला. या रागाचा "तोंडवळा" बघता, कधी कधी या रागाचे, "भैरव" किंवा "दरबारी" रागाशी साहचर्य जाणवते. अर्थात, याला तसा अर्थ नाही कारण, असे साम्य, इतर अनेक रागांच्या बाबतीत देखील दर्शविता येईल.  

कवियत्री इंदिरा संत यांचे एक कविता आठवली. 

"वाऱ्यावरून की यावी 
     आर्त चांदण्याची शीळ 
भारणाऱ्या गाण्यांतील 
     यावी काळजाची ओळ 

संपलेल्या आयुष्याची 
     अशी एक सय व्हावी 
तापलेल्या जीवभावां 
     धून नादावून जावी." 

संगीताच्या क्षेत्रात खरेतर शब्द माध्यम हे नेहमीच परके राहिलेले आहे पण तरीही काहीवेळा शब्दांची जोड, आपल्याला जाणवणाऱ्या नेमक्या भावनांना मोकळी वाट करून देते, हे देखील तितकेच खरे. 
आता आपण, या रागावर आधारित, उस्ताद शुजात खान यांनी सादर केलेली एक रचना ऐकुया. उस्ताद विलायत खानसाहेबांचा पुत्र, त्यामुळे अत्यंत व्यापक संगीताचा पट, लहानपणापासून उपलब्ध. अर्थात, संगीत शिक्षणाचा स्त्रोत हा इमादखानी घराण्याशी संलग्न. त्यामुळे वादनात, "गायकी" अंगाचा असर सहज समजून घेता येतो. काहीवेळा मात्र, गुरुभक्तीचा आंधळा स्वीकार केल्याचे जाणवते. वेगळ्या शब्दात, उस्ताद विलायत खानसाहेब, सतार वादन करताना, अधून मधून, "गायकी" दाखवत आणि त्या गायकीचे तंतोतंत प्रत्यंतर आपल्या वादनातून देत असत. हे सगळे, आपले वाद्यावर किती प्रभुत्व आहे, हे दाखवून देण्याचा प्रकार होता, याच सवयीची री ओढलेली, उस्ताद शुजात खान, यांच्या वादनात दिसून येते.  

या सादरीकरणात, आलापी खास ऐकण्यासारखी आहे. त्यात "गायकी" अंग स्पष्टपणे दिसते.  वादनावर बरेचवेळा उस्ताद विलायत खान साहेबांची किंचित छाप जाणवते तरी देखील स्वत:ची ओळख ठेवण्यात, हे वादन यशस्वी होते. वरती जी स्वरसंहती दिली आहे, त्याचे प्रत्यंतर या वादनात आढळते. तसेच आलापीनंतर जोडून घेतलेला "झाला" फारच बहारीचा आहे. यात एक गंमत आहे, सुंदर गत चाललेली आहे, मध्येच सुंदर हरकत घेतली जाते आणि त्या हरकतीच्या विस्तारात तान अस्तित्वात येते आणि असा सगळा लयीचा आविष्कार चालू  असताना,ज्याप्रकारे, हा वादक "समे"वर येतो आणि ठेहराव घेतो, त्यावरून, वादकाचे, वाद्यावर किती प्रभुत्व आहे, हे समजून घेता येते. आणखी खास " बात"म्हणजे, द्रुत लयीत वादन चालत असताना, मध्येच एखादी "खंडित" तान घ्यायची आणि ती घेत आसनात, "मींड" काढायची!! वादनातील अतिशय अवघड भाग, इथे ऐकायला मिळतो. 
हिंदी चित्रपट जेंव्हा सत्तरीच्या दशकात शिरत होता,  त्यावेळेस,चित्रपट संगीतावरील पाश्चात्य संगीताचा प्रभाव बराच गडद झाला होता. किंबहुना, आधुनिक वाद्यमेळाची रचना, ही पाश्चात्य वाद्यमेळावर बरीचशी आधारित असायची. तसे अधून मधून, भारतीय संगीतावर आधारित चित्रपट आणि संगीत रचना ऐकायला मिळायच्या पण त्याचे प्रमाण, साठीच्या दशकाच्या मानाने बरेच कमी झाले होते आणि अशा वेळेस, "दस्तक" चित्रपट आला. या चित्रपटातील संगीताने, संगीतकार मदन मोहनला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता (उल्लेखनीय बाब म्हणजे मदन मोहनला "फिल्मफेयर" पुरस्कार कधीच मिळाला नाही!!) याच चित्रपटातील, एक गाणे आपल्याला चारुकेशी रागावर आधारित, असे ऐकायला मिळते. "बैय्या ना धरो, ओ बलमा" हेच ते लताबाईंच्या आवाजातील एक अजरामर गीत. केरवा तालात बांधलेली रचना आहे. 


या गाण्याची गंमत म्हणजे, या गाण्यात, सुरवातीच्या ओळीत "चारुकेशी" राग दिसतो पण पुढे रचना वेगवेगळ्या लयीची बंधने स्वीकारते आणि रागापासून दूर जाते.तसे बघितले तर, "बैय्या ना धरो" अशी लखनवी बाजाची ठुमरी प्रसिद्ध आहे आणि या गाण्याचा मुखडा, त्या ठुमरीच्या रचनेवर आधारलेला आहे. मजेचा भाग असा आहे, पहिल्या अंतरा जिथे संपतो, तिथून रागाला बाजूला ठेवले जाते आणि चाल स्वतंत्र होते. मदन मोहन, यांच्या रचनांचे हेच एक व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. त्यांच्या चाली, लयीला अवघड होतात, त्या याच प्रकारे "स्वतंत्र" होतात म्हणून!! हे असे विस्तारीकरण करणे, अतिशय कठीण असते. लताबाईंची गायकी, अशा रचनेत खास खुलून येते. शब्दागणिक निश्चित हरकत, दाणेदार तान आणि गायनातून, कवितेच्या आशयवृद्धीचा प्रत्यय!!  चालीचे "मूळ" ठुमरीमध्ये दडले असेल म्हणून कदाचित, पण चाल फार अवघड झाली आहे. गाण्यात फार, बारीक हरकती आहेत, ज्याने गाण्याचे सौंदर्य वाढते पण, इतरांना गायचे म्हणजे एक परीक्षा असते!!   
प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अप्रतिम मराठी भावगीतांपैकी एक गाणे - "रिमझिम झरती श्रावण धारा" हे गाणे रसिकांच्या चांगल्याच परिचयाचे आहे. हे गाणे देखील चारुकेशी रागावर आधारित आहे. वास्तविक गाण्याचे शब्द मल्हार रागाचे भाव व्यक्त करतात,असे सत्कृतदर्शनी जरी भासले तरी एकूणच ही कविता, ही विरही भावनेकडे झुकलेली आहे. ज्याला "शब्दप्रधान गायकी" म्हणून गौरवावे लागेल, अशा ताकदीचे असामान्य गाणे म्हणता येईल. शक्यतो कुठेही "यतिभंग" झालेला आढळणार नाही. चाल तशी साधी आहे पण अवीट गोड आहे. बहुदा त्यामुळेच हे गाणे आपल्या भावभावनेशी निगडीत आहे.   

संगीतकार दशरथ पुजारी यांची चाल आहे. हा देखील असाच, थोडा दुर्दैवी संगीतकार म्हणता येइल. आयुष्यभर कितीतरी अप्रतिम रचना सादर केल्या परंतु संगीतकार म्हणून फारशी मान्यता पदरी पडली नाही आणि हळूहळू विस्मरणाच्या फेऱ्यात हरवून गेला!!  
आता आपण, या रागावर आधारित आणखी काही रचनांचा आस्वाद घेऊ, ज्यांच्या लिंक्स खालीलप्रमाणे आहेत. 
गेले ते दिन गेले - हृदयनाथ मंगेशकर - श्रीनिवास खळे 

दुख की लहरे छेडा होगा - गुलाम अली - केरवा 

बेदर्दी बालमा तुझको मेरा मन - लता - आरझू - दादरा 

बेखुदी मे सनम - लता/रफी - हसीना मान जायेगी - कल्याणजी/आनंदजी - केरवा 
Attachmen

Monday 7 September 2015

नितळ चंद्रकौंस



आपल्या रागदारी संगीताचा जेंव्हा साकल्याने विचार करायला लागतो, तेंव्हा प्रत्येकवेळी मला कुसुमाग्रजांची कविता आठवते आणि आपला विचार किती "थिटा" आहे, याची नव्याने जाणीव होते. "मुक्तायन" काव्यसंग्रहात, "मी" या कवितेतील काही ओळी या वाक्यावर थोडा प्रकाश पाडू शकतील, असे वाटते.त्या ओळीत मी थोडा बदल केला आहे!!  

"माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून 
तो केव्हढातरी अफाट प्रचंड असतो;
खिडकीच्या काचेतून चंद्र किरणांचा कवडसा आपल्या खोलीत पडतो,
पण कवडसाच, चंद्र नव्हे;
हजारो कवडसे पडले तरी, आकाशातील ती ज्वलंत घटना;
अनोळखीच राहते आपल्या जाणिवांना." 

रागसंगीताबाबत संपूर्ण विचार जरी थोडा बाजूला ठेवला तरी, काही रागांबाबत देखील आपण, एकच एक भावना व्यक्त करणे निरातिशय जिकीरीचे आणि चुकीचे देखील ठरू शकते. इतक्या अनंत भावनांच्या छटा, त्या रागांतून, आपल्याला वेगवेगळ्या कारणाने जाणवत राहतात. काहीवेळा, काही प्रतिभावंत कलाकार त्यात, प्रत्येकवेळी स्वत:चा असा वेगळा विचार मांडून, त्या रागाची वेगळीच ओळख आपल्याला करून देतात आणि आपण मात्र, त्या रागाच्या दर्शनाने, अचंबित होतो. 

चंद्रकौंस रागाबाबत माझी अशीच थोडी भावना आहे. खरे सांगायचे तर केवळ हाच राग कशाला, प्रत्येक रागाबाबत मला असेच वाटत आले आहे. आपण रागाला एका कुठल्यातरी भावनेचा रंग देतो आणि त्या चित्रात त्याला "बंदिस्त" करतो पण प्रत्यक्षात तो राग, आपल्याला प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या रंगाने मोहवून टाकत असतो. इथे या रागाला "नितळ" म्हणताना, माझी अवस्था अशी किंचित द्विधा झाली आहे. 

"अनंत शिखरे निळी शिशिरमुग्ध संध्येतली,
मधून जडली तिला जलतरंग मेघावली;
तुझे बहरगीत की मयुरपंखसे आरसे,
अरण्यभर सांडला मधुर अस्त माझा दिसे". 

कवी ग्रेस, यांच्या ओळी बहुदा माझा विचार स्पष्ट करतील.  

आता थोडे तांत्रिक भागाकडे वळायचे झाल्यास, या रागाची ओळख - "औडव-औडव" अशी करता येते. "रिषभ" आणि "पंचम" स्वरांना या रागात स्थान नाही. "गंधार" आणि "धैवत" हे कोमल स्वर तर बाकीचे तीनही स्वर शुद्ध. रागच समय, रात्रीचे पहिला प्रहर असा दिला आहे आणि त्यातूनच माझ्या मनात "नितळ" ही कल्पना आली. उत्तरांग प्रधान राग आहे आणि प्रमुख स्वर संहती बघायला गेल्यास, "सा ग म ग सा नि नि सा"; " ग म ध नि सा" अशी ऐकायला मिळते. 

किंचित अनुनासिक स्वर, अतिशय धारदार आवाज, लांब पल्ल्याचा गळा, पंजाबी धाटणीची गायकी आणि स्वरांवर "काबू" ठेवण्याची वृत्ती तसेच गाताना, अचानक "अकल्पित" स्वरस्थानांवर स्थिरावून, रसिकांना "धक्का" देण्याची आवड!! पंडित वसंतराव देशपांडे, यांच्या गायकीबद्दल असे काहीसे ढोबळ वर्णन करता येईल. वसंतराव "आलापी" गायनात फारसे रंगत नाहीत, असा एक "आरोप" त्यांच्याबाबतीत केला जातो परंतु जर का त्यांची "गायकी" जरा बारकाईने ऐकली तर त्यात फारसे तथ्य नाही, हेच आपल्याला कळून घेता येईल. खरी गोम अशी आहे, बहुतेकांना गायनात "चमत्कृती" आकर्षित करीत असते आणि तेच गायकीचे वैभव, असला चुकीचा समज करून घेतला जातो. याचाच परिणाम असा होतो, रसिकांना गायनातील "सरगम" या अलंकाराचे अतोनात असलेले आकर्षण!! वास्तविक, "सरगम" म्हणजे येऊ घातलेल्या तानेचा किंवा आधीच घेतलेल्या तानेचा किंवा आलापीचा "आराखडा" असतो परंतु या बाबीकडे दुर्लक्ष होते. वसंतरावांच्या बाबतीत, बरेचवेळा असेच घडत आले आहे. इथे आपण, त्यांनी सादर केलेला संपूर्ण लांबीचा "चंद्रकौंस" ऐकुया.  


या रचनेतील सुरवातीला आलेली आलापी आणि ठाय लयीतील बंदिश ऐकताना, काही बाबी अवश्यमेव ध्यानात येतात. एखादी हरकत घेऊन किंवा तान घेऊन, परत समेवर येताना, स्वरांवर "किंचित" आघात देऊन ठेहराव घेणे किंवा मध्येच एखादी खंडित तान घेताना, स्वरांना जोरकस "धक्का" द्यायचा!! कदाचित, यामुळेच बहुदा, हा गायक, आलापीमध्ये रमत नाही, असा प्रवाद पसरला असावा. स्वच्छ, मोकळा आवाज, तिन्ही सप्तकात विनासायास "विहार" करण्याची अचाट क्षमता आणि प्रयोगशील गायकी, ताना घेताना, अफाट बुद्धीगम्यतेचा परिचय करून देणारी गायकी आहे. ठाय लयीतील हरकतींचा आस्वाद घेताना, याचा आपल्याला प्रत्यय घेता येतो. गायन ऐकताना, काही ठिकाणी, "किराणा" घराण्याची छाप जाणवते. या रचनेत, बराच वेळ सरगम घेतली आहे आणि ती ऐकताना, "धैवत" स्वरावर जो "ठेहराव" घेतला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे. मी मुद्दामून ही रचना निवडली कारण ही रचना बहुतांशी "ठाय" आणि "मध्य"लयीतच सादर केली आहे. 
वास्तववादी चित्रपट निर्मितीत ज्याचा उद्भव होतो, त्या संगीतावरच भर असलेले संगीतकार म्हणून वसंत देसाई, यांचे नाव घ्यावे लागेल. हिंदी, मराठी चित्रपट तसेच मराठी नाटक, या सगळ्या माध्यमात, सहज वावर करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व, असे देसायांबद्दल ठाम विधान करता येईल. याचा थोडा परिणाम असा झाला, त्याच्या रचनांत, कुठेतरी नाट्यसंगीताचा गंध राहिला, असे जाणवते. या शिवाय असेही जाणवते, पारंपारिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्याकारणाने त्या जागा, जशाच्या तशा व परिणामकारकतेने वापरण्यात त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो असा मराठी नाट्यसंगीत परंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो,  ध्यानात घेणे जरुरीचे आहे. या परंपरेचा आणि वसंत देसाई यांचा देखील, कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भर नव्हता. आणखी एक विशेष मांडता येईल. ज्या व्ही. शांताराम यांच्याशी आणि त्यांच्या चित्रपट निर्मितीशी आयुष्यभर जवळचे संबंध असून देखील, जेंव्हा त्यांनी बाहेरचे चित्रपट निवडले, तिथे मात्र त्यांच्या शैलीचे वेगळे आणि अधिक विलोभनीय दर्शन घडते. 
"सन सनन सनन सनन, जा रे ओ पवन" हे गाणे आपण इथे ऐकायला घेऊया. चंद्रकौंस रागाच्या सावलीत बांधलेले गाणे असून, चित्रपट गीतांत प्रसिद्ध असलेल्या "दादरा" तालात बांधलेले आहे. 

"संपूर्ण रामायण" सारख्या धार्मिक चित्रपट असल्याने, चालीची रचना आणि वाद्यमेळ, यात पारंपरिकता येणे क्रमप्राप्तच ठरते तरी देखील, चालीचा जरा बारकाईने विचार केला तर लगेच आपल्याला कळेल, चालीचा ढंग "गायकी" अंगाकडे झुकलेला आहे आणि रचनेत विस्ताराच्या भरपूर शक्यता आहेत. अर्थात, गायला लताबाई असल्याने, मुळातला सांगीतिक मजकूर, तितक्याच सक्षमतेने सादर केला जातो. गाण्यातील "पॉजेस" तसेच अचानक वरच्या सप्तकात चाल जाणे, ही तर या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत परंतु त्याचबरोबर, गाताना, बरेचवेळा शब्द तोडून गाण्यावर भर दिला जातो आणि याचे कारण, लयीच्या बंधनात, न बसणारी शब्दरचना. वसंत देसायांच्या रचनेत, शब्दांचे "औचित्य" या बाबतीत नेमकेपणाने सांभाळलेले दिसते. 

संगीतकार म्हणून जरी पु.ल.देशपांडे यांची कारकीर्द दीर्घकालीन नसली तरी त्यांनी आपल्या काळात, अनेक असामान्य रचना तयार करून, त्यांनी आपल्यातील "कलाकारा"चे अंग अप्रतिमरीत्या दाखवून दिले आहे. बऱ्याचशा रचना तशा सहज, कुणालाही भुरळ पडतील अशा आणि गुणगुणता येतील अशा पातळीवर वावरतात. चित्रपटातील गाणी, खासगी भावगीते या प्रांतात या संगीतकाराचा प्रामुख्याने वावर राहिला. रचनाकार म्हणून जरी फार प्रयोगशील नसले तरी देखील,रचना "प्रासादिक" तसेच "रसाळ" म्हणता येतील. त्यांच्या रचनांवर काही प्रमाणात "बालगंधर्व" गायकीचा असर होता, हे स्पष्टपणे जाणवते. "हसले मनी चांदणे" हे मराठीतील प्रसिद्ध भावगीत, चंद्रकौंस रागावर आधारित आहे. 

काहीशी पंजाबी धाटणीची पण तरीही मराठी नाट्यसंगीताचा "असर" दर्शविणारी रचना आहे. माणिक वर्मा यांचा किंचित अनुनासिक स्वर, लडिवाळ गायकी आणि कवितेचा आशय ध्यानात घेता, रचनेची चाल फारच सुंदर आहे. किराणा घराण्याची पूर्वपिठीका असल्याने, गाण्यात एकूणच "उदारता" हा विशेष जाणवतो. पंजाब अंगाची फिरत पण मादकपणाशिवाय, नखरा पण अगदी लखनवी घराण्याचा नाही तसेच बनारसी ठुमरीच्या जवळ जाणाऱ्या प्रसरणशील चालींची भावगीते, हा खास आविष्कार. मुखडा जरी खालच्या अंगाने येणारा असला तरी पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार आणि अनेकदा पंजाबी वक्र वळणे घेत खाली येणार. भावपट मोठा नाही परंतु संदिग्ध गोडवा, हा स्थायीभाव. यामुळे, माणिक वर्मांची भावगीते महाराष्ट्रात प्रचंड गाजली. ताला शिवाय केलेली आलापी किंवा तालासाहित केलेली आलापी किंवा घेतलेल्या हरकती ऐकताना, इतर भावगीत गायिका आणि माणिक वर्मा यांची गायकी, यात फरक कळून येतो. याचा वेगळा अर्थ असा लावता येईल, मराठी भावगीतांत माणिक वर्मा, यांनी उत्तरेचा रंग फार सफाईने आणला आणि महाराष्ट्रात रुजवला. 
आता आपण, चंद्रकौंस रागावर आधारित असलेली काही गाणी बघूया. 
या डोळ्यांची दोन पाखरे 

त्या तरुतळी विसरले गीत