Wednesday 18 June 2014

धुळीचा (स्वच्छ) आवाज!!




बऱ्याच दिवसांनी कविता महाजनचा कविता संग्रह वाचायला घेतला आणी एका बैठकीत वाचून संपविला.
असे बहुदा सगळ्याच कविता संग्रहाबाबत होत नाही. कविता वाचताना, एका बाजूने गतकालात जमा झालेल्या स्मृती आणि दुसऱ्या बाजूने, अटळपणे अंताकडे जाणारे भविष्य ( ते हेतुपूर्ण किंवा हेतुशून्य!! दोन्ही!!) या दोघांतील काळाच्या पोकळीला आकार देत आहेत, असे वाटले. अर्थात, वर्तमान जरूर आहे पण ते फार वेगळ्या स्वरुपात मिळते.
“काल रात्री, स्वप्नात मी पाहिलं :
एक इवलं रोप
उमललं, सरसर वाढत उंच झालं;
मग फुटले त्याला दोन फाटे
गच्च हिरव्याकच्च पानांनी लहडलेले.
मी वेगाने छाटले त्याचे शेंडे
आणि फांद्यांना आवळून बांधल्या दोऱ्या.
मला जाग यायच्या आत…”
हि कविता तशी प्रातिनिधिक म्हणावी असा सगळा कविता संग्रह वाटला. सर्वसाधारणपणे कविता हि बरेचवेळा, आत्ममग्न आणि आत्मभान, अशा दोन्ही भावनांचे एकत्रीकरण असलेली रचना असते आणि ती तशीच असावी, असे मलातरी फार वाटते.
प्रत्येक कलावंताच्या कलाकृतीतून जाणवणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाशी नेहमीच असतो. हे खरे असले, आणि विशेषत: एखाद्या कलावंताच्या सर्व कलाकृतीतून जरी भाववृत्तीतील विशिष्ठ अशा एखाद्या स्थायीभावाचा प्रत्यय येत राहिला तरीही त्याचा धांडोळा घेणे, तसे चुकीचे ठरू शकते. कविता वाचताना, आत्मनिष्ठतेचा प्रत्यय जरूर जाणवतो आणि तो देखील स्त्रीत्वाच्या अनुरोधाने घेतलेला!!
“आपण पाहत होतो :
आपल्या दोघांमधील जमिनीवरील अंतर;
आपल्या वेगळ्या जाती,
पाना-फुला-फळांचे वेगळे रंग-गंध;
वेगळे आकार, वेगळे उपयोग.”
तसे बघितले तर साधी, सरळ शब्द रचना!! दोन जीवांचे हितगुज तरीही कवितेचा शेवट हा केवळ प्रेमीजनांचे कुजबुजणे न राहता, “गुंतली आहेत आपली मुळे, जमिनिखाली एकमेकांत इतकी खोल” अशी आत्ममग्न जाणीव करून देते.
कविता ही अशीच हवी,साध्या शब्दातून तरीही अत्यंत वेगळा अननुभूत अनुभव देणारी!! काही कवितेत अनुभव देखील विशिष्ट तऱ्हेने जाणवतात आणि त्याच अनुरोधाने काव्यरूप घेतात. म्हणूनच संवेदनविश्व कवितेत येते,ते प्रतिमा म्हणून!! जर का प्रतिक म्हणून आले असते तर त्यात थोडे अंतर पडले असते आणि मग कदाचित केवळ वैचारिक अनुभव म्हणून रचना गोठली गेली असती!!
त्याचबरोबर संवेदनानुभवातील उत्कटता हे, या कवितेच्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे वेगळे लक्षण जाणवते. बहुतेक प्रतिमा या निसर्गातून घेतलेल्या लगेच जाणवतात तरीही पारंपारिक निसर्गचित्रे नसून त्यापलीकडील जाणीव कवितेतून सहज दिसते.
जीवनात आपल्याला अनेक अनुभव येतात आणि त्या अनुभवाचे संचित, त्या संचिताचे संवेदनाविश्व, काही जाणवलेले तर काही कल्पनेने उभारलेले असते. यांपैकी एखाद्या किंवा सगळ्याच एकत्रित मिश्रणाने झालेले संमिश्र अनुभव एकत्रितपणे भाववृत्ती दर्शवित असतात. त्यातून तयार होणारी लय तसेच ताण हेच आपापत: कवितेत दृग्गोचर होताना दिसतात आणि तिथेच खरी कविता समृद्ध होते. ” मी पाहिलं….”, “सामावलेली”,”स्थलांतर” या काही वेचक कवितेतून आपल्याला वाचनाचा आनंद मिळतो आणि त्याचबरोबर आपल्या जाणीवा अधिक समृद्ध झाल्याचे लक्षात येते. हेच या काव्यसंग्रहाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment