Tuesday 16 May 2023

(विस्कळीत) झिम्मा - विजया मेहता

मुळात केवळ मराठी भाषेतच नव्हे तर इतर भाषेत देखील, कलावंतांनी लिहिलेली आत्मचरित्रे तशी विरळाच वाचायला मिळतात (इथे लेखक/कवी यांना वगळले आहे कारण त्यांचा लेखन हाच धर्म असतो!!) त्यामुळे, एकंदर कलेबाबत आणि त्या कलेच्या सादरीकरणाबाबत जे मुळातले अस्पर्शी गोंधळी समज असतात, ते आणखी दृढावत जातात, उदाहरणार्थ सी. रामचंद्र यांचे "माझ्या जीवनाची सरगम" अत्यंत टुकार लेखन!! या पार्श्वभूमीवर विजय मेहता यांचे आत्मचरित्र वाचायला घेतले आणि वाचन संपल्यावर मनात अनेक प्रश्न उभे राहिले. वास्तविक, मराठी नाट्यसृष्टीत विजयाबाईंचे नाव प्रतिष्ठीत, पुढे चित्रपट क्षेत्र जरी गाजवले नाही तरी कामगिरी उल्लेखनीय, मराठी नाटक परदेशी नेण्यात - विशेषत: पूर्व जर्मनी इथे नेण्यात त्यांचा मोठा हातभार, रंगायन सारखी अभिनव चळवळ आणि त्यातील प्रयोग, मराठी साहित्यावर आधारित नाट्यप्रयोग (यात जयवंत दळवींचा देखील तितकाच सहभाग!!) एक अजोड अभिनेत्री आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पारंपारिक अभिनय शैली मोडून नवीन शैली निर्माण करणे इत्यादी अनेक गोष्टी त्यांच्या नावावर मांडता येतात. अशा समृध्द पार्श्वभूमीवर "झिम्मा" वाचायला घेतले. आयुष्याचा आवाका प्रचंड असल्याने, लिखाण देखील तितकेच समृद्ध असणार, आपण वाचायला घेतो. आपण, आत्मचरित्र का लिहितो? तितकी आपली योग्यता असते का? तसे पहिले तर समाजातील प्रत्येक व्यक्ती आत्मचरित्राचा विषय ठरू शकते पण तरीही, तसे कुणी फारसे धाडस करीत नाही. याचे प्रमुख कारण असे दिसते, सामान्य माणूस मुळात बुजरा असतो आणि आत्मचरित्र लिहायचे म्हणजे हातून तशी काहीतरी कामगिरी होणे आवश्यक!! दुसरा भाग असा, जे कुणी असामान्य कामगिरी करतात, त्यांच्या आयुष्याबद्दल सामान्यांना बरेच कुतूहल वाटत असते आणि त्या कुतुहलाचे उत्तर, ते आत्मचरित्रातून शोधण्याचा प्रयत्न करतात. या दृष्टीने बघायला गेल्यास विजयाबाईंचे बहुतेक सगळे आयुष्य चकचकाटी प्रकाशात गेले!! सामान्य लोकांना झगझगाट लगेच मोहून टाकतो. या आत्मचरित्रात, प्रमुख दोष आढळतो, सगळ्या पुस्तकभर घटनांची जंत्री मांडलेली आहे. आता, आयुष्याचा पट शब्दबद्ध करायचा म्हणजे घटना येणारच परंतु बऱ्याचवेळा घटनांचा फक्त उल्लेख वाचायला मिळतो. उदाहरणार्थ, रंगायन हि मराठी रंगभूमीवरील अभिनव चळवळ होती. रंगायनने अनेक, नव्या गोष्टी/प्रघात मराठी रंगभूमीवर आणले. नव्या जाणीवा, नवे सादरीकरण, विषयात वैविध्य, समाजात घडत असणाऱ्या प्रवृत्तींचे थेट रंगावृत्ती दर्शन इत्यादी. या चळवळीचे म्होरकेपण विजया बाईंनी घेतले पण पुढे त्यात मतभेद झाले आणि रंगायनचे तारू फुटले, हा इतिहास झाला. आता, या इतिहासाचे विश्लेषण कुठेच वाचायला मिळत नाही!! केवळ काही परिच्छेदात आणि ते देखील, काही प्रमाणात अरविंद देशपांडे, विजय तेंडूलकर यांच्यावर दोषारोप करून प्रकरण संपविले आहे!! जणू काही त्यात स्वत:चा काहीही दोष नव्हता!! असे समजून चालू, त्यांचा काहीच दोष नव्हता, पण जर का इतरांचा संपूर्ण दोष होता, तर त्याचे व्यवस्थित विवरण नको का? इथेच आत्मचरित्र हे आत्मसमर्थनाच्या अंगाने जायला लागते. पुस्तकात, पुढे अनेक ठिकाणी रंगायनचा उल्लेख आणि त्याचे योगदान,याबद्दल विवेचन आहे. म्हणजे रंगायन चळवळीचा प्रभाव पुढील आयुष्यावर देखील पडला होता, हे अप्रत्यक्षरीत्या मान्य केले आहे. असे असताना, ही चळवळ का अस्तंगत झाली? या प्रश्नाचे कुठेच समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्याआधी, त्यांनी अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडे अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे घेतले, पण नक्की कशाप्रकारचे प्रशिक्षण घेतले, याचा संगतवार धांडोळा घेतलेला नाही. केवळ, हे माझे गुरु, असेच उल्लेख वाचायला मिळतात!! वास्तविक पाहता, अल्काझींचे योगदान केवळ विजयाबाई(च) नव्हे तर पुढील अनेक पिढ्या मोकळेपणाने मान्य करतात. असे असताना, तुम्ही तर कारकिर्दीच्या प्राथमिक काळात अल्काझी यांच्याकडे गेला असताना, त्यांचे कुठले संस्कार तुमच्यावर घडले, याबाबत काहीही वाचायला मिळत नाही. ते सविस्तर येण्याची गरज होती कारण त्या संस्कारांना धरूनच, विजयाबाईंनी पुढील उभारणी केली. आत्मचरित्र लिहिताना, सगळा व्यापार हा पाठीला डोळे लावून अवलोकायचा प्रकार असतो आणि आपण आज जिथे आहोत, तिथपर्यंतचा प्रवास कसा झाला, याचा मागोवा घेण्याचा असतो, मग तिथे चिकित्सक वृत्ती, अभ्यासू मनोवृत्ती आणि वस्तुनिष्ठता आवश्यक असते. बऱ्याच ठिकाणी वस्तुनिष्ठतेचा "आव"आणला आहे परंतु अखेर निराशाच हाती येते. वास्तविक पहाता, आत्मचरित्र हे नेहमीच मागील आयुष्याकडे त्रयस्थ नजरेतून बघून, केवळ कौतुक नव्हे तर दोषांचा उहापोह करण्याची सुंदर संधी असते. बरे असे नाव्हे, आज बाईंनी काही चुका कबूल केल्या तर त्यांच्यावर काही लांच्छन येईल!! मुळात बाईंचे कर्तृत्व इतके व्यापक आहे की काही चुका दर्शविल्या तर त्यांच्या आयुष्यात काही कमतरता येऊ शकते. हे केवळ रंगायन बाबत आहे, अशातला भाग नाही. पुढे व्यावसायिक झाल्यावर, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक नाटकांचे उल्लेख आणि प्रसंगी विस्तारपूर्वक प्रकरणे आहेत. म्हणजे, "जास्वंदी", "महासागर", "पुरुष","संध्याछाया" इत्यादी सगळ्या नाटकांबद्दल माहिती मिळते, पण ती सगळी जंत्रीच्या स्वरुपात!! कुठेही, दिग्दर्शक म्हणून नेमके काय फेरफार केले, त्यामागे कुठली वैचारिक भूमिका होती, याबद्दल फारसे काही वाचायला मिळत नाही. वास्तविक नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे कलाकृतीचा कप्तान!! जे लेखकाने लिहिले आहे, त्यातील नेमके नाट्य जाणून, त्याची रंगावृत्ती तयार करणे, हा प्रचंड व्यामिश्रतेचा भाग आहे, त्यामागे कितीतरी वैचारिक संघटन असते, आणि तेच नेमके वाचायला मिळत नाही. वाचायला मिळते ती, त्या नाटकानिमित्ताने झालेल्या घटनाची जंत्री!! इथे एक किस्सा आठवला. जयवंत दळवींनी, एका पुस्तकात विजयाबाईंवर लेख लिहिला आहे. त्यात लिहिताना, विजयबाईनी "संध्याछाया" नाटक बसवताना, त्यातील "बयो" व्यक्तिरेखा बसवताना, त्यांची (विजयाबाईंची) आजी कशी मिसळली, हे दळवींना सांगितल्याचे, विस्तारपूर्वक लिहिले आहे. खरंतर हे आणि असे किस्से, आत्मचरित्रात येणे गरजेचे होते. आता तर घटनांच्या जंत्री, कुणालाही गुगलवरून प्राप्त होऊ शकतात, अशी परिस्थिती असताना, त्याच घटना सलग मांडून नक्की काय साधले? दोन तीन ठिकाणी, दिग्दर्शक म्हणून लेखकाकडून आवश्यक ते बदल करवून घेतले, असे उल्लेख!! पण ते बदल का करून घेतले, त्याची काय आवश्यकता होती, त्याने सादरीकरणात काय आणि किती फरक पडला, हे प्रश्न तसेच मनात राहतात!! पुढे, पाश्चात्य लोकांशी गाठीभेटी झाल्या, त्या निमित्ताने सांस्कृतिक आदानप्रदान झाले, या सगळ्या घटनांचे विस्तारपूर्वक उल्लेख आहेत. एक इतिहास म्हणून योग्यच आहे पण मग पुढे प्रश्न असा उद्भवतो, या गाठीभेटीतून नेमका काय फायदा झाला तसेच विशेषत: जर्मनी, नंतर अमेरिका देखील, यांच्या जाणीवा, सादरीकरण आणि आपल्या संकल्पना यात नेमका काय फरक? याचे उत्तर मिळत नाही. इथे विजयाबाईंना एक संधी होती, पाश्चत्य रंगभूमी आणि भारतीय रंगभूमी याचा तुलनात्मक अभ्यास करण्याची. तसा त्यांनी अभ्यास नक्कीच केला असणार पण मग त्या अभ्यासाचे प्रतिबिंब आत्मचरित्रात पडत नाही. सगळे उल्लेख जंत्रीवजा येतात. आता विजयाबाई जर्मनी, अमेरिका इथे गेल्या होत्या, ही घटना जगजाहीर आहे. असे धरून चालू, त्यांच्या तुलनेत भारतीय रंगभूमी मागासलेली आहे किंवा कमअस्सल आहे. असे असेल तर मग सुधारणा करण्याची कितीतरी मोठी संधी प्राप्त झाली होती. असेही असू शकेल, त्यांना सुधारणा करण्याची संधी मिळाली नसेल. कारणे अनेक असू शकतात, जसे आर्थिक पाठिंब्याचा अभाव असणे, तुलनेने कम सक्षम अभिनेते असणे, इत्यादी. त्यांचा उल्लेख करायला काय हरकत होती. बाईंचा रंगभूमीवर इतका दबदबा आहे की त्यांनी मराठी रंगभूमीवरील त्रुटींचा उल्लेख केला तर त्याचा फार मोठा नकारार्थी गवगवा होईलच असे नाही आणि समजा झाला तर रंगभूमीच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगलाच झाला असता. बाईंनी इथे फार मोठी संधी गमावली, असे वाटते. तसेच, पूर्वीच्या अभिनेत्यांबरोबर काम करताना, (म्हणजे नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, केशवराव दाते इत्यादी!!) आपल्याला कसे जुळवून घ्यावे लागले, किंवा त्यांच्या अभिनयातील बारकावे, कच्चे दुवे याबद्दल अवाक्षर देखील नाही!! खरे पाहता, अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडून आधुनिक तंत्र शिकून, मराठी रंगभूमीवर पाऊल टाकले. तेंव्हा अभिनय शैलीत फरक असणारच, तसा पुढे थोडाफार उल्लेख देखील आहे पण तितकाच. त्यावर वैचारिक काहीही नाही!! पूर्वीच्या नटांना कुचेष्टेने "आवाजी" अभिनेते म्हणून खिजवले जाते पण त्यात किती अर्थ आहे? एक अभ्यासू अभिनेत्री म्हणून काही स्पष्ट विश्लेषण यायला काही हरकत नव्हती. बरे आता मागील पिढीतील कुणीही जिवंत नाहीत तेंव्हा त्यांच्याकडून वादग्रस्त टीका होण्याचा अजिबात संभव नव्हता. नंतर, NCPA प्रकरण!! त्यामागची टाटांची मनोभूमिका, त्यानुसार झालेले बांधकाम आणि मुळात त्या निर्मितामागील विचार, याचे सुसंगत वर्णन वाचायला मिळते. त्यांच्याआधी तिथे पु.ल. देशपांडे अध्यक्ष होते, त्याआधी भाभा!! परंतु त्यांच्या कार्याबद्दल फारसे काहीही वाचायला मिळत नाही. एकेठिकाणी पु.ल. देशपांडे यांनी केलेल्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती दिली आहे पण पुढे तसे कार्यक्रम खंडित झालें, हे पूर्णसत्य आहे. का खंडित झाले? आपली मनोभूमिका वेगळी होती म्हणून तसे कार्यक्रम खंडित झाले तर तसे स्पष्टपणे लिहायला हवे होते. त्यात काहीही वावगे नाही. पुढे NCPA संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करताना, स्वतःचे म्हणून काही निर्माण करताना, काय विचार केला होता? निर्मिती ही नेहमीच विचारांची मागणी करते आणि बाई तर सतत विचारांच्या कोंडाळ्यात वावरणाऱ्या!! असे असताना, आपला वैचारिक प्रवास कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर कुठेही मिळत नाही. हे आणि असे अनेक प्रश्न वाचताना मनात येतात आणि शेवटी, पुस्तक वाचून मनात असमाधानच येते. हे सगळे सविस्तर लिहावेसे वाटले कारण, बाईंचे कर्तृत्व तितक्या तोलामोलाचे आहे म्हणून. सगळ्याच कलाकारांबाबत अशी अपेक्षा ठेवता येत नाही. इतिहास म्हणून पुस्तक चांगले आहे परंतु आत्मचरित्र म्हणून निराशा करणारे आहे.

Saturday 6 May 2023

Standerton - Church

नोकरीसाठी गाव तसे छोटेखानी मिळाले तर वैय्यक्तिक मैत्री फार चटकन जुळून येतात तसेच राहायला बरेच सुरक्षित वाटते. परदेशी राहताना हा अनुभव फार थोड्या वेळा अनुभवायला मिळाला. Standerton इथल्या नोकरीच्या अनुभवाबद्दल पूर्वीच लिहिलेअसल्याने त्यात आता नवीन काही लिहिण्यासारखे नाही. गाव तेंव्हा तरी फार तर १०,०० ते १२,००० वस्तीचे होते. गावात जून,जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी तसेच गावात नोकरीच्या फारशा संधी उपलब्ध नसल्याने लोकवस्ती विरळ. अर्थात प्रचंड शहरात असणारी प्रचंड मॉल्स, वर्दळ आणि एकूणच अंगावर येणारे जीवन, असला प्रकार आढळत नसतो. एकूणच थंड, शांत जीवन. या गावात एक चर्च आहे, चॅपलपेक्षा आकाराने बरेच मोठे परंतु एकूणच चर्च म्हटल्यावर जो अवाढव्य आकार समोर येतो, त्यामानाने छोटेखानी. अर्थात गावात एकूणच लोकवस्ती विरळ म्हटल्यावर कशाला कोण, महाकाय चर्च बांधणार!! मी इथे राहायचे ठरवल्यावर, एके संध्याकाळी, शनिवारी चर्चकडे गाडी वळवली. चर्च संस्कृतीत बहुदा इतर धर्मियांना मुक्त प्रवेश असावा. अर्थात मी नास्तिक असल्याने, असल्या विषयांना माझ्याकडे स्थान नाही. संध्याकाळचे ५.३० वाजले होते आणि शनिवार असल्याने, चर्चमध्ये फारशी वर्दळ नव्हती. मला काही येशूकडे मागणे मागायचे नव्हते पण एकूणच चर्च विषयी मनात आकर्षण होते आणि त्यापोटीच मी आत शिरलो. वास्तविक मुंबईत मी गिरगावात राहणार माणूस, आणि गिरगावात पोर्तुगीज चर्च म्हणून वास्तू आहे पण तिथे एकूणच वाहनांची सतत असलेली वर्दळ असल्याने कधीही आत जाऊन बघावे, असे वाटलेच नाही. इथे निवांत संध्याकाळ पुढ्यात पसरली होती. आता शिरलो आणि चर्चचा अंतर्भाग प्रथमच नजरेत भरला. आता ख्रिश्चनांचे मांडीत म्हटल्यावर प्रवेशद्वाराच्या समोर आत मध्ये येशूची मूर्ती असणे क्रमप्राप्तच. मूर्तीच्या खाली पायऱ्यांवर अनेक आकाराच्या मेणबत्त्या लावलेल्या, त्याच्या पुढे लाकडाच्या आकाराचे बंदिस्त फर्निचर जसे कोर्टात न्यायाधीशाच्या पुढे असते. त्यानंतर मग भक्तांना बसण्यासाठी लाकडाच्या रांगा. तिथे शांतपणे भक्तांनी यायचे आणि येशूला आपली service अर्पण करायची. मी आता शिरलो तेंव्हा एक कुटुंब तिथे बसले होते. बहुदा त्यांची पूजा संपली असावी कारण लाकडाच्या रांगेत, खाली मान घालून बसले होते. अर्थात मी तसे अंतर राखून बसलो. मला कसलीच प्रार्थना माहीत नव्हती आणि जरी झाली असती तरी केली नसती. माझा उद्देश वेगळा होता. चर्चमधील शांतता अनुभवणे आणि एकूणच स्थापत्य बघून घेणे, इतकाच उद्देश होता. चर्चच्या भिंतींवर वेगवेगळी चित्रे रंगवली होती. मला त्या चित्रांचे मर्म जाणून घेण्यापेक्षा रंगसंगती मध्ये अधिक रस. एकतर जिथे हिंदू संस्कृतीबद्दल सखोल माहिती नाही तिथे परकीय धर्माबद्दल काय माहिती असणार. चर्चमधील शांतता मात्र अंगावर येते. जवळपास १५,२० मिनिटे झाली असतील पण अचानक एक वादक पाठीमागून कुठूनतरी आला आणि त्याने चर्चमधील पियानो वाजवायला घेतला. इथे माझे नाते जडले. वास्तविक पियानी वाद्य मला नवलाईचे नव्हते परंतु चर्चमधील धर्मसंगीत ऐकण्यात विशेष रस होता आणि ती इच्छा अचानक पूर्ण झाली. जवळपास २० मिनिटे वादन केले. वादक कदाचित फार मोठा वाकबगार नसेल देखील पण ते सूर मात्र कानात ठसले. आजही ती अनुभूती कायम आहे. फक्त पियानो वाजत होता आणि त्या स्वरांनी सगळे चर्च भरून गेले होते. स्वरांची अशी अनुभूती पुढे मला Andre Rui च्या कार्यक्रमात ऐकायला मिळाली. पाश्चत्य संगीताची आवड निर्माण होऊन बरीच वर्षे झाल्याने, सूर म्हणून फार अलौकिक वाटते नाही पण त्या वास्तुतील शांततेचा एक गडद परिणाम मात्र जाणवला. वादन संपले तशी तो वादक निघून गेला. चर्चचा पाद्री मात्र दिसला नाही. घरी परतलो, ते सूर डोक्यात घेऊनच. लगेच YouTube वर काही व्हिडीओज ऐकल्या आणि ते सूर मनात साठवून ठेवले. अर्थात तिथली शांतता मात्र मनात साठवून ठेवली होती. पुढे मी अनेक शनिवार संध्याकाळ तिथे जात असे, आता शिरण्याची गरज भासली नाही पण त्या अत्यंत स्वच्छ परिसराच्या पायऱ्यांवर निवांत बसण्यात खूप आनंद मिळायला लागला. चर्चमध्ये गर्दी होणार ती रविवारी सकाळी. मला खरंच विचार करावासा वाटतो, गाव अगदी छोटे आणि तिथले चर्च देखील टुमदार परंतु तिथली शांतता आणि स्वच्छता निव्वळ वाखाणली जावी. आपल्याकडे अपवाद स्वरूपात असे का घडत नाही? माझे लग्न झाले त्या पहिल्या दिवाळीला, रितीनुसार मी सासरी - राजापूर इथे गेलो होतो.आज या घटनेला ३६ वर्षे झाली असतील पण एका संध्याकाळी राजापूर इथल्या नदीकाठी गेलो होतो. तिथे एक छोटे देऊळ होते. तिथे मिणमिणता दिवा कुणीतरी लावला होता. परिसर स्वच्छ होता आणि आसमंतात सुंदर शांतता होती. मला तर तिथून हलूच नये, असे फार वाटत होते पण हळूहळू अंधार पसरायला लागला आणि नदी काळोखात हरवून गेली. आजही ते दृश्य माझ्या मनावर ठसलेले आहे आणि त्यावेळची आठवण, मला भारतापासून हजारो किलोमीटरवर राहताना मनात सारखी यायची. अर्थात असे वातावरण मुंबईसारख्या शहरात मिळणे जवळपास अशक्य आणि म्हणून त्याचे अप्रूप वाटले असणार. इथे देखील चर्चच्या मागील बाजूला Vaal नावाची नदी आहे. गावाप्रमाणे छोटीशीच आहे. पाण्याचा फारसा खळाळणारा आवाज येत नाही, एक मंद स्वरांत पाणी वाहत असते. पुढे मी साऊथ आफ्रिकेत बरीच चर्चेस बघितली पण असा अनुभव कधी मिळाला नाही कारण ती सगळी चर्चेस अवाढव्य शहरातली आणि म्हणून शहरी संस्कृती स्वीकारलेली.