Saturday 30 January 2016

शाम-ए-गम की कसम

गाय जशी हंबरते,
तसेंच व्याकूळ व्हावे 
बुडतां बुडतां सांजप्रवाही;
अलगद भरुनी यावे."
कवी ग्रेसच्या या ओळी म्हणजे करुणेचे महिम्न स्तोत्र म्हणावे इतकी हळुवार, तरल अभिव्यक्ती आहे. तसे शब्द सहज समजण्यासारखे आहेत पण, त्यातील आशय अतिशय संपृक्त, भरीव आणि घाटदार असल्याने, या ओळी मनाला लगेच भिडतात. अशाच करुणप्रवाही ओळी बरेचवेळा चित्रपट गीतांत वाचायला मिळतात. 
"फुटपाथ" चित्रपटात असेच एक असामान्य गाणे आहे - शाम-ए-गम की कसम. तलत मेहमूदनी गायलेले आणि खैय्याम यांनी तर्ज बांधली आहे. या गाण्याची गंमत म्हणजे, हे गाणे, मुळात चित्रपटासाठी लिहिले गेलेच नव्हते. मजरुह सुलतानपुरी आणि अली सरदार जाफरी, या दोन प्रतिभाशाली कवींच्या कवितेतून निवडक भाग निवडून, गाण्याची शब्दकळा निर्माण केली गेली. असे निदान चित्रपट क्षेत्रात फारच तुरळक किंवा जवळपास नाहीच घडले. 
चित्रपटात दिलीप कुमार आणि मीना कुमारी, यांच्या भूमिका आहेत. तसे बघितले तर चित्रपट म्हणून खास वेगळ्या वळणाचा चित्रपट नाही परंतु समर्थ अभिनेते अशा चित्रपटात देखील, अभिनयाची कमाल मर्यादा गाठतात. वास्तविक बघता, हे दोघे अभिनेते संयत अभिनयासाठी प्रसिद्ध होते आणि त्याचेच यथार्थ दर्शन या चित्रपटात घडते. संध्याकाळची वेळ, प्रेयसी वियोग पाचवीला पुजलेला आणि अशा संत्रस्थ मनोवस्थेत, एका विकल अंधाऱ्या सांजसमयी, स्वत:शी हितगुज केल्यासारखे हे गाणे आहे. 
खैय्यामच्या चालीत याच भावनेचा परिपोष आढळतो. शब्द आणि सुरांमधील वेदना, दिलीप कुमार अतिशय अप्रतिमरीत्या डोळ्यांतून आपल्यासमोर मांडतो. अक्षरश: दिलीप कुमारच्या डोळ्यांत, शब्दातील वेदना वाचता येते. शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने, खैय्याम यांच्या रचनेत, नेहमी कुठेतरी शास्त्रोक्त गायकीचा अंतर्भाव नेहमी असतो आणि त्यामुळे रचना बरेचवेळा "गायकी" ढंगाची होते, किंबहुना गायक/गायिकेची परीक्षा घेतली जाते. 
गाणे सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ खास ऐकण्यासारखा आहे. मंद्र सप्तकात व्हायोलीन आणि त्याच्या पार्श्वभागी पियानोचे सूर आहेत आणि त्यालाच "Spanish गिटार" या वाद्याची जोड दिली आहे. थोडे बारकाईने ऐकले तर समजेल, गाण्यात कुठेच तालवाद्य नसून, केवळ "Spanish गिटार" चे सूर, हेच तालवाद्य आहे. परिणामस्वरूप गाण्याचा मनावर होणारा अत्यंत गहिरा परिणाम. या वाद्यमेळाचे सूर काहीसे संथ होत असताना, आपल्याला तलत मेहमूद यांचा आवाज ऐकायला मिळतो - "शाम-ए-गम की कसम, आज गमगी है हम". इथे पडद्यावर, मेणबत्ती पेटलेली दिसते आणि त्यात देखील, ज्योतीचा भाग अधिक ठळक दिसतो. गाण्याचे शब्द आणि आणि ही जळती मेणबत्ती!! ज्यांना उर्दू संस्कृतीची थोडेफार माहिती असेल त्यांना, "गम" आणि "ज्योत" याचा अन्योन्न संबंध कळून घेता येईल!! खरेतर सुरवातीचे वाद्याचे सूर, बहुतेक सगळ्या रचनेची ओळख करून देतात, म्हणजे गाण्याची लय, गायन पद्धती इत्यादी. 
तलत मेहमूद यांची गायकी ही तशी सुस्पष्ट पण अत्यंत सुरेल, शब्दांना कुठेही न दुखावता गाणारी तसेच भावनांचा योग्य तो परिपोष करणारी. मुळात उर्दू भाषा ही अति नजाकतदार असल्याने, गायन देखील त्याचा अंगाने होणे गरजेचे असते. त्यांच्या गायकीवर "लखनवी" संस्कृतीचा दाट प्रभाव दिसून येतो आणि त्याच अंगाने, त्यांचे शब्दोच्चार होतात. शब्दांची अनुभूती देणारी गायकी. याच गाण्यात याचा अनुभव घेत येतो. पहिला अंतरा गाताना, एका ओळीत "मार डाले ना दर्द-ए-जुदाई कही" असे शब्द आहेत. यात "डाले" मधील "ड" हे अक्षर खरे आघाती अक्षर आहे, उर्दू भाषेत याचीच खरी गंमत बघता  येते. "ड","घ","ख" ही अक्षरे नेहमी आघाताने घेतली जातात पण गाताना, त्यातील "आघाताचा" स्पर्श वगळून, या अक्षरांचा उच्चार करणे, ही खासियत असते आणि ती प्रत्येक गायकाला नेमकेपणी जमते(च) असे नाही. 
मुळात तलत मेहमूद यांचा मुलायम, रेशमी स्वर आणि त्यात साथीला उर्दू भाषा!! त्यामुळे गाणे ऐकताना, आपल्या भाषेचा देखील समृद्ध अनुभव घेता येतो. भारतीय संगीतात, गझल गायनात बेगम अख्तर यांनी जो आदर्श निर्माण केला त्याच्या जवळपास, केवळ तलत मेहमूद पोहोचतात - फरक इतकाच, गझलला गीताचे स्वरूप देऊन आणि याची नेमकी प्रचीती या गायनातून आपल्याला मिळते. 
या गीतांत अनेक विस्तारशक्यता आपल्याला आढळतात परंतु चित्रपट गीत आणि त्यातही विरही गीत, याची जाण ठेऊन या गीताला भावगीताचे स्वरूप, संगीतकार खैय्याम यांनी प्रदान केले आहे. " दिल परेशान है रात विरान है, देख जा किस तरह आज तनहा है हम" या ओळीचे गायन  ऐकताना, शब्दातील व्याकुळता आपल्याला लगेच जाणवते.  गाण्याच्या आस्वादाच्या दृष्टीने बघायला गेल्यास, रचनेत कुठेही शब्दांची ओढाताण नाही, पेळूतून सलग सुत निघावे त्याप्रमाणे, सुरांतून शब्द घोळवून आपल्याला ऐकायला मिळतात. या ओळीतील, "तनहा" हा शब्द देखील किती आर्ततेने उच्चारला गेला आहे. आशयाची अभिव्यक्ती सुरांतून अशीच व्हायला हवी, अशीच अपरिहार्यता या गायनातून जाणवते आणि गाणे तिथेच सिद्ध होते. 
गाण्याचा हाच "स्वभाव"  कायम ठेऊन, पुढील वाद्यमेळाची बांधणी केली आहे. वाद्यमेळ त्याच वाद्यांनी सजलेला आहे आणि त्याच सुरांनी सजावट खुलावलेली आहे. वेगळ्या शब्दात लिहायचे झाल्यास, गाण्याच्या सुरवातीचा वाद्यमेळ आणि पहिला अंतरा सुरु होण्याआधीची सुरावट ऐकताना, आधीच्याच सुरांचा विस्तार आहे. लय तशीच कायम ठेऊन, त्याच अंगाने सुरांचा विस्तार केला आहे. त्यामुळे, चालीचा परिणाम आपल्या मनावर अतिशय गडद होतो. अखेर विचार केला तर, गाण्याचा अंतिम परिणाम परिपूर्ण होणे, यातच सर्जनशीलतेची बीजे आढळतात. 
चांगली शब्दकळा आणि ती देखील, स्वररचना करण्यासाठी योग्य अशी रचना असणे, ही चित्रपट गीतांची प्राथमिक अट असते. योग्य जागी, शब्द संपणे तसेच चालीच्या सुरावटीशी संलग्न राहणे, हे गुण अवश्यमेव मानावेच लागतात. इथे केवळ उस्फूर्तता अजिबात उपयोगाची नसते आणि त्या बाजूने बघायला गेलो तर, पहिला अंतरा खास आहे. 
"रुत हंसी है तो क्या, चांदनी है तो क्या 
चांदनी जुल्म है, और जुदाई सितम" 
या ओळी बघा. आजूबाजूला वातावरण प्रणयासाठी सुयोग्य आहे पण स्वत: नायकाची मन:स्थिती मात्र विमनस्क झालेली आहे. त्यादृष्टीने "रुत" आणि "चांदनी" सारखी प्रतीके योजून त्याच शब्दांचा उलट्या बाजूने उपयोग करून, आशय अधिक वृद्धिंगत केला आहे आणि हे करताना, चालीच्या "मीटर" मध्ये शब्द अतिशय चपखलपणे बसले आहेत. शब्दांच्यात गेयता तर हवीच पण त्याबरोबर आशयाकडे देखील टोकदारपणा आणणे जरुरीचे असते. त्याचबरोबर, गायनात देखील तीच तरलता तलत मेहमूद यांनी आणली आहे. 
संगीतकार म्हणून खैय्याम यांचा विचार करताना, या गाण्यातून, त्यांची काही खास वैशिष्ट्ये दिसून येतात. वाद्यांचा गदारोळ नसणे, तसे करताना संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर शांत भाव देखील. तसेच गाणे तयार करताना, शब्दांबद्दल आदरभाव राखणे आणि रचना करताना शक्यतो शब्दांची ओढाताण होणार नाही, याकडे जाणीवपूर्वक नजर ठेवणे. हाच मुद्दा आपल्याला, शेवटच्या अंतरा ऐकताना मांडता येईल. 
"अब तो आजा के अब रात भी खो गयी 
जिन्दगी गम के सेहराओ में खो गयी 
धुंढती है नजर, तू कहां है मगर 
देखते देखते आया आंखो में गम"
या ओळीच्या चालीत फारसा फरक नाही पण, ओळींतील आशय बघताना, शब्द कुठेही तोडले नाहीत, किंबहुना सुरांच्या सहाय्याने अर्थ अधिक गहिरा केला आहे. "देखते देखते आया आंखो में गम" या ओळीतील "आंखो में गम" सारख्या अप्रतिम प्रतीकाचा अर्थ किती सुंदररीतीने मांडला आहे, हे खरेच वाखाणण्यासारखे आहे. "नजर" आणि "आंखो में गम" याची नेमकी जोड लावण्याची शायराची कमाल आणि खैय्यामने हाच विचार सुरांत गुंफताना टिपलेला आहे. खरतर गाणे इथे संपते पण तरीही आपल्या मनात उरते ते अविस्मरणीय सुरांचे चित्र आणि त्याला मिळालेली, दिलीप कुमारच्या असामान्य भावदर्शनाची जोड. चित्रपटातील गाणे अजोड ठरण्यासाठी आणखी काय वेगळे लागते. 


Sunday 24 January 2016

पुछो ना कैसे मैने रैन बितायी

"आहे गुणगुण,
      आहे मिणमिण,
खंगतात रंग अस्ताचलांतून;
केवळ धुसर शुन्य नादहीन. 
किटतात पर्णे,
      जिणे जीवघेणे,
जगती मुक्याने फांद्याफांद्यांतून,
काळोखी कवेंत हालतात म्लान."
आरती प्रभूंच्या या ओळींतून, मानवी दु:खाचे अत्यंत गडद रंग अम्लानपणे उमटतात. सगळीकडे केवळ काळोखी, राखाडी रंग पसरला असून, कुठेच आशेचा किरण दिसत नाही पण तरीही आपले आयुष्य आपल्याला अटळपणे भोगावे लागणारच असते. तिथे आपल्या हाती कुठलाच पर्याय शिल्लक नसतो.  केवळ श्वास आहे म्हणून आयुष्य आहे.  
चित्रपट गीतांत अशाच प्रकारच्या भावनेवर असंख्य गाणी निर्माण झाली आहेत. अर्थात, चित्रपट गीतांत, कविता म्हणून विचार करता, इतकी तरल भावना अपवाद परिस्थितीत वाचायला मिळते आणि याचे मुख्य कारण, चित्रपट गीत ही प्रामुख्याने सामान्य रसिकांसाठी लिहिलेले असते आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शब्दांना दृश्यरूप देणे, ही या माध्यमाची प्राथमिक गरज असते. मानवी भावनांच्या अति तरल छटा पडद्यावर तितक्याच समर्थपणे दाखवणे तसे फार अवघड असते. त्यामुळे, गीत लिहिताना, दृष्यभान ठेवणे आवश्यक असते.
"मेरी सुरत तेरी आंखे" या चित्रपटातील " पूछो ना कैसे मैने रैन बितायी" या गाण्यात, मी वर मांडलेल्या आरतीप्रभूंच्या ओळींचे काहीसे अर्धुकलेले दर्शन वाचायला मिळते. चित्रपटातील गाणे हे नेहमीच चटपटीत तरीही आशयपूर्ण असावे लागते. कवी शैलेंद्र यांनी हे गाणे लिहिताना असा विचार केलेला आढळतो. खरतर शैलेंद्र यांच्या कविता बहुश: अत्यंत साध्या, सोप्या शब्दांत लिहिलेल्या असतात परंतु तशाच शब्दांतून अर्थवाही भावना मांडण्यात, हा कवी बरेचवेळा यशस्वी झालेला दिसतो.आता हे गाणे, केवळ काव्य म्हणून वाचायला घेतले तर,  
"पूछो ना कैसे मैने रैन बितायी
इक पल जैसे, इक युग बिता 
युग बीते मोहे नींद ना आई!!"
या ओळींतूनच आपल्याला, पडद्यावरील पात्राची भावस्थिती समजून घेता येते आणि हेच तर, चित्रपट गीतांत महत्वाचे असते. अत्यंत थोड्या शब्दात, प्रसंगाची जाण व्यक्त होणे महत्वाचे.या चित्रपटात, अशोक कुमारची भूमिका सर्वस्वी वेगळी आहे. प्रतिभाशाली गायक परंतु लहानपणीच कुरूप चेहऱ्याचा म्हणून "टाकून" दिलेला. उपेक्षेचे जिणे जगावे लागल्याने, केवळ खंतावलेले मन नसून मनात एकूणच प्रचंड न्यूनगंड तयार झालेला. त्यामुळे प्रसिद्धीपेक्षा सिद्धीकडे अधिक लक्ष. आयुष्य अंधारी जगात काढण्याची मनीषा आणि तसेच जगायला सुरवात केलेली. अर्थात, कधीतरी मनात दाबून ठेवलेल्या इच्छा उफाळून वर येणे क्रमप्राप्तच आणि याच जाणीवेतून, त्या गायकाच्या मनात ही "विराणी" तयार होते. आता सकाळ उजाडली आहे पण मनातील अंध:कार तसाच साचलेला आहे. त्यातून उद्भवलेली निराशा, हाच या रचनेचा पाया आहे. त्यामुळे गाण्याचे चित्रीकरण हे अंधारी जगात होणे साहजिक.सकाळची वेळ असून देखील, गाण्याची चाल काहीशी दुर्मुखलेली आहे, यामागचे हे महत्वाचे कारण.   
इथे आणखी एक विशेष सांगता येईल. चित्रपटाचा नायक - अशोक कुमार. अत्यंत देखणा,राजबिंडा आणि रुबाबदार अभिनेता. अतिशय संवेदनशील कलाकार म्हणून विख्यात. आता, या चित्रपटातील भूमिका बघितली  तर,संपूर्ण वेगळ्या ढंगाची आहे. विद्रूप चेहरा जन्मत:  लाभल्याने,प्रसिद्धीपासून सतत दूर राहण्याची असोशी. सतत अंधारात वावरण्याची  जडवून घेतली आहे. हे गाणे देखील, अशाच अंधाऱ्या वेळेस  सुरु होते. वास्तविक, गाणे गायकी वळणाचे आहे. बहुतेकवेळा, शास्त्रीय अंगाचे गाणे अभिनित करायची वेळ आली म्हणजे अभिनेता  आक्रस्ताळी अभिनयाकडे वळतात पण इथे आपण बघितले तर, आपल्याला दिसतो तो अशोक कुमार यांचा अतिशय संयत वेदनेचा अविर्भाव. गाणे अवघड चालीचे आहे पण कुठेही अभिनित करताना, अभिनय गाण्याच्या चालीशी जराही विसंगत ठरणार नाही याची योग्य ती काळजी घेणारा. 
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या कारकिर्दीतील काही खऱ्या अर्थी अजरामर रचना घेतल्या, तर त्यात या गाण्याचा अंतर्भाव अवश्य करावाच लागेल. "अहिर भैरव" रागाचे स्वर आधाराला घेतले आहेत. वास्तविक, अहिर भैरव हा सकाळचा राग मानला जातो आणि सकाळचे राग, प्रामुख्याने आनंदी, काहीसे अंतर्मुख अशा प्रकारचे असतात पण हीच तर भारतीय संगीताची खासियत आहे. एकाच रागातून अनंत छटा निर्माण करण्याची असामान्य क्षमता रागसंगीतात नेहमीच दडलेली आढळते. 
कवितेतील करुण, आर्त भाव, संगीतकाराने तितक्याच समर्थपणे रचनेतून प्रतीत केला आहे आणि गायक मन्ना डे यांच्या गायकीतून तितक्याच अप्रतिमरीत्या ऐकायला मिळतो. सुरवातीचे सारंगीचे सूर आपल्या समोर गाण्याची पार्श्वभूमी तयार करतात. गाण्याचा "मुखडा" किती सुंदर आहे. सारंगीचे सूर कानात तरळत असताना, आपल्याला मन्ना डेच्या आवाजात आलापीचे सूर ऐकायला मिळतात मुळात, या गायकाचा आवाज म्हणजे ज्याला "अस्सल" गायकी म्हणता येईल असा आहे आणि इथे तर "गायकी" ढंगाची चाल मिळाल्यावर, त्याच आवाजातील घुमारेदार मार्दव अधिकच खुलून येते. या आलापीमधूनच आपल्याला "अहिर भैरव" रागाची ओळख पटते.  
चित्रपट गीतांत, गायकी कशी दाखवता येते हे या गाण्यातून बघता येते."युग बीते मोहे नींद ना आई" ही ओळ गाताना, "बीते" या शब्दावर किंचित "कंप" घेतला आहे आणि तो देखील किती सूक्ष्म आहे!! नीट ऐकला तरच ध्यानात येतो. इथे गाण्याच्या सगळ्या ओळी लक्षात घ्यायला घेणे जरुरीचे आहे. "युग बीते" मध्ये जी विषण्णतेची छटा आहे, त्याला असला "कंप" आवश्यकच आहे, जेणेकरून शब्दातील आशय अधिक भावगर्भ व्हावा. चित्रपट गीतांत गायकी ही अशाच अलंकाराने दिसते आणि सजलेली असते. पुढे "मोहे नींद ना आई" म्हणताना आवाज अधिक हळुवार आणि खालच्या पट्टीत आणला आहे आणि यामागे त्या शब्दातील औचित्य, सुरांच्या सहाय्याने खुलवले आहे, हाच विचार दिसतो. गाणे गाताना, गाण्यातील शब्द आणि त्यातील आशय समजून घेऊन, त्या शब्दांना, तशाच सुरांची जेंव्हा "अपरिहार्यता" मिळते, तिथे ते गाणे नेमक्या अर्थाने जमून जाते आणि ही अपरिहार्यता कशी तर तिथे दुसरा कुठलाच सूर प्रवेश करू शकत नाही. तिथे तोच सूर आणि त्याच "वजनाने" यायला हवा. 
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा जो वाद्यमेळ आहे, त्यात सारंगीचे सूर प्रामुख्याने ऐकायला येतात आणि गाण्याच्या आधी जी सारंगीची सुरावट आहे, त्याचाच अधिक खोल विस्तार, या इथे ऐकायला मिळतो आणि याचा परिणाम, रचना अधिक बांधीव होते. गाण्याची चाल इतकी आर्त आहे की तिथे आणखी कुठल्याच वाद्याची गरज भासत नाही. मुळात, सारंगी हे वाद्यच पटकन मनाची तार छेडणारे वाद्य आणि इथे तर फक्त त्याच वाद्याचा वावर!!  
"इक जले दीपक, इक मन मेरा 
फिर भी ना जाये मेरा घर का अंधेरा 
तरपत, तरसत उमर गवायी 
पूछो ना कैसे मैने रैन बितायी"
या ओळी गाताना, गायकाने एके ठिकाणी अतिशय सुंदर हरकत घेतली आहे."इक जले दीपक, इक मन मेरा" ही ओळ वारंवार घेतली आहे पण प्रत्येक वेळेस सुरांचे वळण वेगळे आहे, प्रत्ययकारी आहे. "मेरा" शब्द घेताना, इथे स्वर तर थोडा उंचावला आहेच पण तो इतका देखील वरच्या सुरांत नाही की तिथे "गायकी" प्रस्थापित होईल. शब्दांतील हताषता सुरांतून कशी मांडायची, याचा हा सुंदर वस्तुपाठ आहे. कुठेही विशविशीतपणा नाही तर प्रत्येक सूर हा, प्रत्येकवेळी रचनेच्या पहिल्या सुराशी नाते जडवून घेतो. असे असून देखील, रचना म्हणजे रागाचे "लक्षण गीत" नाही, हे देखील समजून घेता येते. "उमर गवायी" म्हणताना ज्या सुरांत गायले गेले आहे ते ऐकताना, मला नेमके काय म्हणायचे आहे, याचा अंदाज घेता येईल. अर्थात, इथे संगीतकार सचिन देव बर्मन यांचे श्रेय देखील तितकेच महत्वाचे. ही "शब्दप्रधान गायकी" आहे पण "कविता वाचन" नव्हे!!
"फिर भी ना जाये मेरा घर का अंधेरा" ही ओळ म्हणताना, सुरवात मंद्र सप्तकातील सुरांत होते पण लगेच "मेरा घर का अंधेरा" हे शब्द घेताना सूर किंचित उंचावला गेला आहे, विशेषत: "का" अक्षर घेताना स्वरांतून जी व्याकुळता प्रदर्शित होते, ती खास गायकाच्या गायनाची खूण!! "अंधेरा" अधिक गडद होतो. मजेचा भाग असा आहे, हा अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो आणि तिथे मूळ रागाच्या सुरांपासून फारकत आहे पण, अंतरा संपत असताना, आपण परत मुखड्याच्या सुरांपाशी येउन थांबतो. हे सगळे केवळ अनिर्वचनीय आहे. 
संगीतकार सचिन देव बर्मन यांनी, रचना बांधताना सरळसोट "केरवा" ताल वापरला आहे पण तोच ताल संपूर्ण रचनेत तसाच कायम ठेवला आहे. किंबहुना अतिशय धीम्या लयीत तालाचे बोल चालत आहेत. धीम्या वजनाचा केरवा ताल रचनेत फिरत आहे. 
दुसरा अंतरा सुरु होण्याआधी, परत सारंगीची तशीच "गत" कायम ठेवली आहे आणि त्याच सुरांवर दुसरा अंतरा सुरु होतो. 
"ना कही चंदा, ना कही तारे 
ज्योत के प्यासे मेरे नैन बेचारे 
भोर भी आस कि किरन ना लायी 
पूछो ना कैसे मैने रैन बितायी"
हा अंतरा पहिल्या अंतरयाशी नाते राखून गायला गेला आहे. किंबहुना, स्वरांतील छोटे,छोटे खटके देखील त्याचप्रमाणात घेतले आहे. खरतर बरेच संगीतकार इथे प्रयोगशीलता दाखवतात पण इथे संगीतकाराने, स्वरांचा तोच "आराखडा" कायम ठेवून, आधी जो परिणाम साधलेला आहे, तोच परिणाम अधिक गडद, खोलवर केलेला आहे.वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, संगीतकाराला, आपण जी तर्ज निर्माण केली आहे, त्याच्यावर प्रचंड आत्मविश्वास असल्याचे द्योतक आहे आणि जर का आपण, हाच दृष्टीकोन लक्षात घेतला तर तो विश्वास अनाठायी नाही, याचाच प्रत्यय घेता येतो.
कवी शैलेंद्रने लिहिताना, "भोर भी आस कि किरन ना लायी" या शब्दात जी निराशता मांडली आहे, त्याचेच फलस्वरूप स्वरांतून ऐकायला मिळते आणि मग त्या गाण्याला चिरंजीवित्व मिळते, यात नवल ते कसले!!   

Attachments 

Wednesday 20 January 2016

अल्ला तेरो नाम



हिंदी चित्रपट संगीतात, धार्मिक गीतांची फार जुनी परंपरा आहे. तसे बघितले तर आपल्या संस्कृतीमध्ये, प्रार्थना गीत, ईश्वराची आळवणी किंवा भगवंतासमोर लीन होऊन शरणभाव दर्शविणारी गाणी, यांची रेलचेल आढळते. त्याचे प्रतिबिंब, सिनेमासारख्या लोकाभिमुख कलेत पडणे अनिवार्य ठरते. धार्मिक गीतांची सुरवात, घरापासून किंवा धार्मिक स्थळांपासून चालत आलेली आहे. 
खरतर भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून ज्या सहा संगीतकोटी अस्तित्वात आहेत, त्यात, "आदिम","लोक","धर्म","कला","संगम" आणि "जनसंगीत", अशा आहेत. भक्तीसंगीताचा विचार वेगळा व्हावा कारण, भक्तीसंगीताची तपासणी एका अधिक व्यापक अभ्यासाचा भाग ठरते. "धर्मपरता, साक्षात्कारयुक्तता आणि भक्तीपरता" संगीत आणि धर्म, यांची अपार विविधता, भारतात आढळत असल्याने आणि त्यातून भारतात अस्तित्वात असलेल्या अनेकविध भाषा हाताशी असल्याने, प्रत्येकवेळेस, हाती येणारा आविष्कार हा नेहमीच भिन्न आणि म्हणून अधिक रुचीरपूर्ण असतो. इथे आणखी एक साम्य लक्षणीयरीत्या ध्यानात येते. लोकसंगीताचे भक्तीसंगीताशी किती जवळचे नाते असते. गुजरात मधील "धोळ" गीत किंवा महाराष्ट्रातील "वारकरी" संगीत, याला प्रमाण म्हणून मांडता येईल. 
भक्तीसंगीताचे मंचीय सादरीकरण होते पण त्यासाठी त्याच्यावर अनेक संस्कार करावे लागतात. या विचाराच्या अनुरोधाने, आपण आजची रचना "अल्ला तेरो नाम" ही रचना ऐकणार आहोत. वास्तविक, चित्रपटात ही रचना म्हणजे देवळातील भजन, इतकेच म्हणता येईल पण सांगीतिक दृष्टीकोनातून ही रचना फारच लक्षवेधी ठरते. संगीतकार जयदेव यांची चाल असून, लताबाई आणि कोरस, यास्वरुपात गाणे सादर होते. चित्रपट गीत म्हटल्यावर, गाणे प्रसंगानुरूप असणे क्रमप्राप्तच ठरते. चित्रपटात हे गाणे दुहेरी पार्श्वभूमीवर सादर होते. दोन्ही नायिकांचे "हिरो" युद्धात गुंतलेले असताताना, एकाच्या मृत्यूची बातमी, दुसऱ्या कडून कळविणे आणि त्यातून निर्माण होणारी विलक्षण मानसिक घालमेल आणि ताणतणाव, या पार्श्वभूमीवर हे भजन आहे. तसे बघितले तर रचनेचा "घाट" परंपरेपासून फटकून बांधला गेला आहे. रचनेत गायकी "अंग" तर आहेच पण विस्ताराच्या अनेक शक्यता दिसत आहेत. 
आता, भारतीय भजन रचना म्हटल्यावर, रचनेत सात्विक भाव अनुस्यूत असणे, ओघाने येतेच. तसे चित्रपटाच्या कथेच्या संदर्भात आणि चित्रीकरणात दिसून येते. देवळात बसलेली नंदा आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव, हा पारंपारिक सोशिक बायकोचा आहे, हे सहज समजून घेता येते. तेंव्हा, खरे तर सांगीतिक रचना ही सहजं गुणगुणण्यासारखी असावी, पण तसे रचना केली तर जयदेव कसला!! जयदेव यांच्या बहुतेक सगळ्याच रचना या कधीही, नाकासमोर समोर सरळ चालत असल्यासारख्या येत नाहीत. रचनेत, गुंतागुंत असल्याशिवाय, या संगीतकाराचे कधीही समाधान झाले नाही. मग ती गुंतागुंत वाद्यमेळातील रचनेत असेल किंवा बव्हंशी गायकीतून आढळेल. 
साधारणपणे, गाणे सुरु व्हायच्या आधी, वाद्यमेळातून, चालीचे सूचन होते आणि मग, गायक/गायिका गायला सुरवात करतात. पण इथे तसे काहीही घडत नाही. अत्यंत संथ आवाजात, आपल्याला "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" ही ओळ ऐकायला मिळते. गाण्याच्या मुखड्यावरून "गौड सारंग" राग डोळ्यासमोर येतो पण त्याचे थोडे तिरोभाव म्हणजे त्यापासून दूर जाणाऱ्या सुरावटी ऐकायला मिळतात. एका वेगळ्या आणि चांगल्या अर्थाने, जयदेव हे अप्रतिम कारागीर होते. या गीताचे ध्रुवपद फक्त पाच सुरांच्या गुंतागुंतीच्या बांधणीतून सिद्ध होते. 
या गाण्यातील कोरस म्हणजे समूहगान देखील फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. जरा बारकाईने ऐकले तर आपल्या सहज ध्यानात येईल, संपूर्ण गाण्यात कुठेही समूहगान मध्य सप्तकाच्या पलीकडे जात नाही आणि तसे गायन चालू असताना, लताबाईंचा आवाज  मात्र आपला "करिष्मा" दाखवित असतो. समूह्गायनात, स्वरांची तसेच लयीची अनेक वळणे दाखवणे, संगीतकाराच्या व्यामिश्र दृष्टीची खासियत म्हणायला हवी पण, इथे ही रचना, देवळात गायली जात आहे तिथे सगळेच आवाज, अलौकिक करामत दाखविणे अशक्य!! त्यामुळे समूहगायन हे एकाच पातळीवर चालू असते आणि लताबाईंची गायकी मात्र अव्याहतपणे असामान्यरीत्या आसमंतात दरवळत असते. अगदी "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" या ओळीच्या गायनातून याची प्रचीती यावी. 
कवी साहिर यांची गीतरचना आहे. तशी सहज, साधी सोपी शब्दकळा आहे पण तरीही अत्यंत सोप्या शब्दातून अर्थवाही आशयाची किमया घडवणारी रचना आहे. 
अल्ला तेरो नाम , ईश्वर तेरो नाम 
सब को सन्मति दे भगवान"
या ओळींमध्ये एकाच देवाची आळवणी न करता, खरतर, कितीही रूपे किंवा नावे असली तरी अखेर "सर्वशक्तिमान" एकच आहे, हेच सुचवले आहे. भक्तीसंगीतातील समर्पण वृत्तीच इथे केवळ शब्दातूनच नसून सुरांच्या मांडणीतून देखील आपल्याला जाणवते. गाण्याची सुरवात अगदी सरळ आहे पण नंतर मात्र रचनेतील "वक्रता" ऐकायला मिळते.  ध्रुवपद संपते आणि एक सुंदर, दीर्घ आलाप ऐकायला मिळतो. या इथे देखील मघाशी मी जो विचार मांडला,त्याचे प्रत्यंतर घेता येते. लताबाईंनी घेतलेला आल्प आणि त्यातच मिसळलेला समुहगायनाचा आलाप यात फरक आहे. लय तशीच आहे, स्वरिक वाक्यांश देखील तसाच आहे पण, सादर करताना, लताबाईंची "गायकी" दिसते तर समुहगायन, त्या गायकीला पूरक अशी स्वरावली पुरवते. आलापानंतर सरोद वाद्याचे सूर, गाण्याची गंभीरता आणखी वाढवते. 
"मांगो का सिंदूर ना छुटे 
मां बहेनो की आंस ना टुटे 
देह बिना भटके ना प्राण" 
स्वररचनेबाबत म्हणायचे झाल्यास, चालीची समान बांधणी इथे ऐकायला मिळते पण तरीही "उठावणी"ची जागा खास आहे. सरोद वाद्याचा सूर जिथे थांबतो, त्याक्षणी लताबाई, "मांगो" हा शब्द कसा उच्चारतात, ही नीट ऐकण्यासारखे आहे. चित्रपटात Camera नंदाच्या चेहेऱ्यावर आहे. अतिशय शांत, सोज्वळ भाव आहेत. आपल्या संस्कृतीत "मांग का सिंदूर" याला फार महत्व आहे, निदान त्याकाळात नक्कीच होते. तेंव्हा असा तो "सिंदूर", "ना छुटे", यात एक आर्त विनवणी आहे आणि हा शाब्दिक आशय, लताबाईंनी किती अप्रतिमरीत्या स्वरांवर तोललेला आहे. 
तीन मिनिटांच्या गाण्यात अशीच फार छोटी, छोटी सौंदर्यस्थळे असतात, ज्यामुळे ते गाणे भरीव बांधणीचे आणि भावपूर्ण होते. पुढे आणखी एक गंमत आहे. मां बहेनो की आंस ना टुटे" ही ओळ आधी लताबाईंच्या स्वरांत आहे पण, ती परत घेताना, समूहगायनातून समोर आला आहे. गंमत अशी आहे, समुहगायन सगळी ओळ घेतच नाही तर "मां बहेनो की" इथेच लताबाईंनी ती सुरावट त्याच स्वरांत कशी "उचलली" आहे, हे खास अनुभवण्यासारखे आहे. कलाकाराची "नजर" म्हणतात ती अशी. इथे "क्षणमात्र " या शब्दाची प्रचीती यावी. हे सहज जमण्यासारखे नव्हे. याचा परिणाम असा होतो, कडव्याची समान बांधणी असून  देखील, कुठेही "पुनरावृत्ती" जाणवत नाही. 
"ओ सारे जग के रखवाले 
निर्बल को बल देनेवाले 
बलवानो को दे दे ज्ञान" 
या ओळीत सगळा आशावाद मांडलेला आहे. हा आशावाद खरच पण प्राप्त परिस्थिती तशी(च) आहे का? चित्रपटात युद्धाचा प्रसंग भरात आलेला असताना, हे सगळे युध्द व्हायलाच हवे का युद्धाने किती आणि कुठले प्रश्न सुटू शकतात? इत्यादी अनेक प्रश्नांची भेंडोळी निर्माण होतात आणि मनात हतबलता साचायला लागते. खरेतर अशाच वेळेस, असा आशावाद आपल्याला जगण्याची उर्मी देतो. हे सगळे, संगीतकार जयदेव, कवी साहिर आणि अर्थात लताबाई, यांनी या गाण्याद्वारे आपल्या समोर ठेवलेले आहे. इथे देखील चालीच्या आकृतीबंधात काहीही फरक नाही पण तरीही, ही चाल आपल्याला जखडवून ठेवते. कुठेही आपल्याला तेच सूर ऐकत आहोत, असे जाणवून देत नाही. याचे प्रमुख कारण, सादरीकरणाचे नवनवीन आखाडे आपल्या समोर येत राहतात आणि आपण तिथेच स्वत:ला करवून बसतो, जसे शेवटची ओळ - "बलवानो को दे दे ज्ञान" म्हणताना, स्वरांत आलेला आशावाद, आपल्याला हीच उमेद देतो.
गाण्याचा शेवट तर अत्यंत खास आहे. "ईश्वर तेरो नाम" म्हणताना, "ई" या अक्षरावरील स्वराक्षरी मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. हा "ई" कार किंचित उंचावून घेतलेला आहे आणि परत दुसऱ्यांदा घेताना, त्यात किंचित बदल काताराना, तोच "ई"कार आणखी वरच्या स्तरावर घेतलेला आहे आणि तिथेच ईश्वराची आळवणी नेमकी सिद्ध होते. हिंदी चित्रपट संगीतात या आधी आणि नंतर अशा प्रकारे भजनाची रचना कधीच ऐकायला मिळाली नाही. जयदेव यांच्या थोरवीचे आणखी सुरेख उदाहरण ते कुठले? 

Saturday 9 January 2016

रसिक बलमा



हिंदी चित्रपट गीतांत बरीचशी गाणी खूप गाजतात, कालांतराने त्यात काही त्रुटी निदर्शनास येतात आणि मग एकूणच आवड बदलत जाते. अर्थात, कालानुरूप आवड बदलणे, हे साहजिकच असते. या बाबतीत आणखी एक खुळचट समज भरपूर पसरला आहे. गाणे लोकप्रिय असणे, दर्जाच्या दृष्टीने "कमअस्सल" ठरले जाणे. जितके गाणे "दुर्मिळ", तितकी त्या गाण्याची "किंमत" अधिक. आता हा गैरसमज कुणी, कसा पसरवला, याला कसलाच पुरावा देता येत नाही.दुर्मिळ गाणे उत्तम असते, हा देखील चुकीचा समज आहे म्हणा. ते असो, आजचे गाणे त्या काळी देखील लोकप्रिय होते, आजही आहे आणि कदाचित पुढे त्याच्या लोकप्रियतेत घट होईल, असे संभवत नाही. याचाच दुसरा अर्थ असा देखील काढता येतो, सुगम संगीतात अजूनही ठाम निकष असे तयार झाले नाहीत आणि प्रत्येकाची "आवड" याच कसोटीवर गाण्याचा दर्जा ठरवला जातो. खरतर चित्रपट गीतांचे अचूक असे शास्त्र देखील बनले नाही आणि मग त्यात, बरेचवेळा ज्याला निव्वळ बाष्कळ म्हणावे असे विचार प्रचलित होतात. यामागे, असे देखील म्हणता येईल, चित्रपट गीतांना अजूनही, संगीताच्या प्रांगणात सन्माननीय स्थान मिळालेले नाही. 
"चोरी चोरी" चित्रपटातील "रसिक बलमा" हे गाणे आजही अनेक रसिकांच्या आवडीचे आणि म्हणून स्मृतीत ठाण मांडून बसलेले गीत.चित्रपटात हे गाणे, मुख्यत्वेकरून नर्गिसवर चित्रित झाले आहे. नर्गिस, अभिनेत्री या दृष्टीने अत्युत्तम म्हणून कधीच गणली गेली नाही तसेच भारतीय सौंदर्याच्या मापनातून रूपवती देखील मान्य पावली नाही. तरीही, काळाच्या दृष्टीने अत्याधुनिक विचारांची, अभिनयात धिटाई दाखवणारी आणि "ग्रेसफुल" अभिनेत्री म्हणून नक्कीच गणली जाते. बहुतेक चित्रपटात, चावून चोथा झालेला प्रसंग - नायक, नायिकेचा बेबनाव आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक तडफड. या पार्श्वभूमीवर हे गाणे चित्रित झाले आहे. 
संगीतकार शंकर/जयकिशन यांची, या गाण्याला चाल आहे. गाण्याची चाल शुद्ध कल्याण रागावर आधारित आहे. या जोडींचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, त्यांची गाण्याबाबत असलेली चित्रपटीय भाषा. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, आपण चित्रपटातील गाणे तयार करीत आहोत, ही जाणीव त्यांच्या सगळ्या रचनांमधून आपल्याला आढळेल आणि याच दृष्टीने पुढे मांडायचे झाल्यास, या गाण्यातील राग हा केवळ आधार स्वर इतपतच वापरलेला आहे. चाल बांधताना, राग-चौकटीपासून दूर सरकून त्यांनी  इथे काहीतरी आवाहक आणि नवे निर्माण करण्याचा सुजाण प्रयत्न केला आहे आणि त्या दृष्टीने, इथे केलेल्या रागाचा वापर अधिक कलात्मक म्हणायला हवा.       
 शायर हसरत जयपुरी यांची शब्दकळा आहे आणि तशी रचना केवळ दोन कडव्यांचीच आहे पण तरीही कविता म्हणून, गाणे कुठेही घसरत नाही. आपण या ठीन्कानी एक बाब लक्षात घ्यायला हवी. चित्रपटातील प्रसंग हे बहुतांशी एकसाची असतात. असे असून देखील, प्रसंगानुरूप रचना करताना, कवीला प्रत्येकवेळा सृजनात्मक रचना करणे केवळ अशक्य असते, तरी देखील संख्येने बघता, रचनेतील गेयता आणि सृजनता वाखाणण्याइतपत कौतुकास्पद असते.
सारंगीच्या आर्त सुरांतून गाण्याची सुरवात होते आणि आपल्याला शुद्ध कल्याण रागाचे सूर ऐकायला मिळतात. सारंगीचे सूर संपतात, तिथे लता बाईंचा वरच्या सुरांत आवाज लागतो - "रसिक बलमा". गाण्याच्या सुरवातीलाच तार स्वरांत गळा न्यायाचा, ही कधीही सोपी गोष्ट नसते. एकतर या गाणे थोडे बारकाईने ऐकले तर समजेल, "बलमा" या शब्दावरील सुरांनी, पुढील सगळी रचना तोलून धरली आहे. प्रत्येक गाण्यात, अशी एखादी "खास" जागा असते, ती जागा म्हणजे त्या गाण्याची ओळख!! "रसिक बलमा' म्हणताना, स्वर कसा उंचावत जातो, ते न्याहाळणे खरच सुंदर अनुभव आहे. 
त्यानंतरचा " हाये" शब्द देखील असाच अप्रतिम आहे. तडफडत्या ह्रुदयाची भावना, त्या "हाये" शब्दात गुंतलेली आहे. तसेच पुढे "दिल क्यो लगाया" इथे ओळ संपत असताना जीवघेणी हरकत आहे - "लगाया" मधील "या" अक्षरावर. ही खास लताबाईंची गायकी!! शाब्दिक आशय सुरांतून किती प्रत्ययकारी पद्धतीने मांडता येतो, हे सुरेख उदाहरण. पुढील ओळ - तोसे दिल क्यो लागाया, जैसे रोग लगाया. इथे परत रचना मंद्र सप्तकात घेतली आहे आणि गमतीचा भाग म्हणजे, ओळ ज्या स्वरांवर संपते तो स्वर परत, "रसिक" शब्दाच्या सुराशी नेमका जोडला गेलेला आहे. तीन मिनिटांच्या गाण्यात, तुम्हाला कुठेही "ठेहराव" घ्यायला फारशी फुरसत मिळत नसते. 
पहिल्या अंतरा सुरु व्हायच्या आधीचा वाद्यमेळ खास लक्षवेधी आहे. सतारीचे स्वर मध्य लयीत सुरु आहेत पण पार्श्वभागी, सारंगीचे सूर मंद स्वरात त्या सांगीत वाक्यांशाला अप्रतिम स्वरिक आशय देत आहेत. संगीतकाराची व्यामिश्र कलाकुसर इथे ऐकायला मिळते. काही क्षणांचाच वाद्यमेळ आहे पण त्याने गाण्याची रचना किती भरीव केली आहे. नीट ऐकले तर कळेल, सतार आणि सारंगीच्या सुरांत, व्हायलीनचे सूर किती अप्रतिमरीत्या मिसळले आहेत आणि पहिला अंतरा सुरु व्हायची जणू पूर्वतयारी करीत आहेत. 
जब याद आये तिहारी, सूरत वो प्यारी प्यारी
नेहा लगा के हारी, तडपू मैं गम की मारी. 
या ओळी सुरु व्हायचा आधी, सतारीचे सूर त्या ओळींची गत मांडून ठेवतात आणि त्याच सुरात, "जब याद आये तिहारी, सूरत वो प्यारी प्यारी" ही ओळ ऐकायला मिळते. गाण्यात, कुठली ओळ किती वेळा आळवायची, याचे देखील "गणित"असते आणि ते संगीतकाराने नेमकेपणाने ठरवायचे असते. हीच ओळ परत घेताना, सूर बदलतात आणि रचना परत तार सप्तकात जाणार, याचे सूचन करतात. "नेहा लगा के हारी, तडपू मैं गम की मारी." ही ओळ ऐकताना, आपल्याला एक बाब निश्चित समजते, ही ओळ परत "रसिक" शब्दाच्या ओळीशी नाते जोडणार. गाण्यचे शब्द देखील किती सुंदर आहेत - नेहा लगा के हारी, तडपू मै गम की मारी. सगळी तडफड, प्रसंगी वांझोटी वाटणारी हैराणी मनात साचली आहे पण, निरुपायाने सहन करण्यावाचून कुठलाच पर्याय शिल्लक नाही. इथे तार स्वरच ती भावना दर्शवू शकतात. गाण्यातील शब्दांचे महत्व जाणून, रचना तयार करणे किती अवघड असते, हेच दाखवण्याचा हा एक प्रयत्न. 
इथे आणखी एक बाब मांडण्यासारखी आहे. पडद्यावर हे गाणे नर्गिसवर चित्रित केले आहे. गाणे विरही आहे, यात वादच नाही पण ती वेदना दाखवताना, बरेचवेळा हिंदी चित्रपटात ओक्साबोक्शी रडणे, हातातील बांगड्या फोडणे आणि हात रक्ताळून घेणे इत्यादी बटबटीत अभिनय केला जातो पण नर्गिस पडद्यावर असले काहीही करत नाही. डोळ्यातील अश्रू बघताना, आपल्याला सगळी वेदना वाचता येते. 
दुसरा अंतरा यायच्या आधीचा वाद्यमेळ जवळपास तसाच ठेवलेला आहे. अर्थात याचा दोन्ही प्रकारे अर्थ लावता येतो. एकतर, आधीचा वाद्यमेळ तसाच ठेऊन, संगीतकाराने झालेला परिणाम अधिक गडद करण्याची संधी साधून घेतली. अर्थात टीकाच करायची झाली तर, इथे नवीन प्रकारे रचना करायची संधी गमावली!! अखेर संगीतकाराचा अधिकार शेवटचा आणि महत्वाचा, इतकेच आपण इथे बोलू शकतो.  
ढूढे ये पागल नैना, पाये ना एक पैल चैना 
डसती है उजली रैना, का से कहू मैं बैना. 
हा गाण्यातील शेवटचा चरण. "ढूढे ये पागल नैना, पाये ना एक पैल चैना' ही देखील आधीच्याच कडव्यातील पहिल्या ओळीची चालीची पुनरावृत्ती आहे. पण पुढे फार वेगळी गंमत आहे. डसती है उजली रैना - "रैना" शब्दानंतर लताबाईंनी आकारात्मक जो आलाप घेतला आहे, तो केवळ अवर्णनीय आहे लयीची गती बघा आणि त्या आलापीचे सौंदर्य अनुभवा. ओळी वरच्या सुरांत आहे आणि तोच स्वर कायम ठेऊन, आलाप थोडा दीर्घ घेतला आहे आणि घेताना तो आलाप किंचित कंपायमान केला आहे. केवळ अफाट गायकी. लिहायला फार सोपे आहे पण गळ्यावर ते मांडणे निरतिशय कठीण आहे.स्वर तसाच पुढे चालत आहे आणि " का से कहू मैं बैना" म्हणताना, पायरी पायरीने स्वर उतरता होतो. काही क्षणांचा(च) हा आविष्कार आहे. गाणे केवढ्या उंचीवर जाउन पोहोचते. ही शेवटची ओळ परत तशीच त्याच स्वरांवर येते, जिथे पहिल्यांदा "रसिक बलमा" घेतले होते. गाणे संपताना, पुन्हा "रसिक बलमा" याच शब्दांवर संपते पण संपताना देखील लताबाईंच्या गायकीची कमाल ऐकायला मिळते. "बलमा" झाल्यावर, तोच सूर किंचित आणखी वरच्या पातळीवर नेला आणि गाणे आलापास्थित अवस्थेत संपते. ऐकणारा दि:डमूढ होतो. 

Friday 8 January 2016

निगाहे मिलाने को जी चाहता है

सुगम संगीतात, प्रत्येक आविष्काराचा एक स्वतंत्र ढाचा असतो. त्याची स्वतंत्र  संस्कृती असते आणि त्याला अनुरूप शब्दकळा, स्वरिक रचना आणि गायन, हे सगळे घटक त्या आविष्कारात एकवटतात. त्याचा स्वत:चा असा "लहेजा" असतो आणि खुमारी असते. गझलेची शायरी भावगीतापेक्षा वेगळी तर कव्वालीचा रचना ढंग वेगळा. प्रत्येक गीताच्या शब्दकळेनुरूप सादरीकरण आणि सांगीतिक वाक्यांशाचा बदल आणि गायनाची पद्धत बदलत असते. खरतर कुळशील भिन्न असते.
गझल म्हणजे भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार तर कव्वाली हा सुफी पंथातून निघालेला अधिक ललित भाग. तसे बघितले तर या रचनेत रागदारी संगीताचा प्रभाव तर नक्कीच असतो पण रागाचे मूळ स्वरूप बाजूला ठेऊन, त्यातील लालित्याचा भाग अंगिकारला जातो. अर्थात, शायरीची रचना देखील वेगळी असणे क्रमप्राप्तच असते. कव्वालीमध्ये  शृंगारिक, भक्तीभाव तसेच सवाल-जवाब पद्धतीने शायरीचे घाट बदलत असतात आणि त्यानुसार चालीची रचना तयार होत असते. 
"निगाहे मिलाने को जी चाहता है" ही कव्वाली, हिंदी  गीतांतील एक अजरामर रचना म्हणून मान्यता पावली आहे. संगीतकार रोशन, यांनी या रचनेची चाल  बांधली आहे. रोशन यांच्या कारकिर्दीकडे जरा बारकाईने बघितले तर, त्यांच्यावर उर्दू संस्कृतीचा प्रभाव आणि ठसा पडलेला आढळतो. उर्दू संस्कृतीत आढळणारे आलिशान वर्णन तसेच शृंगार आणि विलासी जीवनाचे प्रतिबिंब, शायरीमध्ये नेमकेपणी दिसते आणि त्याचाच अतिशय रम्य आविष्कार संगीतासारख्या तरल कलेतून वारंवार आढळतो. "दिल ही तो है", या चित्रपटातील ही कव्वाली, प्रसिद्ध कवी साहिर लुधीयान्वी यांनी लिहिली आहे. पारंपारिक रचनेत, आपल्याला नेहमीच सवाल-जवाब वाचायला मिळतात आणि त्या निमित्ताने भाषेतील खटकेबाज आणि रंगतदार शब्दकळा अनुभवायला मिळते. 
गंमत असते ती सगळी रचना कौशल्यात. एकतर अशा प्रकारच्या रचना, त्याचा अंगभूत स्वभावामुळे काहीशा दीर्घ स्वरूपाच्या असतात, जेणेकरून शायरीमध्ये भाषिक फुलोरा फुलून यावा. 
"राज की बात है महफ़िल में कहे या ना कहे,
बस गया है कोई इस दिल मे कहे या ना कहे.

निगाहे मिलाने को जी चाहता है
दिल-ओ-जान लुटाने को जी चाहता है."

चित्रपटात, ही रचना प्रामुख्याने नूतन या अभिनेत्रीवर चित्रित झाली आहे. वास्तविक, ही अभिनेत्री गंभीर भूमिकांसाठी प्रसिद्ध होती.पण, या गाण्यावरील तिचा अभिनय केवळ अप्रतिम. कवितेत मांडलेला आशय, तिच्या चेहऱ्यावर इतका समर्थपणे उमटलेला दिसतो की त्यामुळे, एकूणच रचनेची खुमारी अधिक वाढते. विशेषत:, "निगाहे मिलाने को जी चाहता है" या ओळीवरील तिच्या चेहऱ्यावरील खोडकर छटा खास अनुभवण्यासारखी आहे. एकतर तिला संगीताची उपजत जाण असल्याचे समजते. ही वरील ओळ जेंव्हा आशाताईंच्या गळ्यातून बाहेर येते, तेंव्हा Camera तिच्या चेहऱ्यावरील भाव अगदी नेमकेपणाने टिपतो आणि गाण्याची गोडी अधिक वाढते.  
गाण्याची सुरवात,  पारंपारिक कव्वाली थाटाने झाली आहे, म्हणजे ढोलक,हार्मोनियम आणि टाळ्या यांचा समन्वय साधून, गाण्याची पार्श्वभूमी तयार केली आहे. अर्थात,  हळूहळू द्रुत गतीत नेउन, एका विविक्षित क्षणी थांबवली आहे आणि तिथे आपल्याला आशा भोसलेंच्या आवाजात छोटीशी आलापी आणि मुखडा समोर येतो. खरतर इथेच यमन राग आपल्याला कळून घेता येतो. सुरवातीच्या द्रुत लयीतून, रचनेची सुरवात काहीशी संथ लयीत होते आणि चाल मनाची पक्कड घेते. इथे आणखी एक वैशिष्ट्य सांगावे लागेल. शायरी उर्दू आहे आणि त्या भाषेचा लहेजा, आशा भोसले यांनी आपल्या स्वरांतून अतिशय नेमकेपणी दाखवला आहे. 
"वो तोहमत जिसे इश्क कहती है दुनिया,
वो तोहमत उठाने को जी चाहता है."
इथे "इश्क" आणि "तोहमत" हे खास उर्दू शब्द आहेत आणि ते या ओळीतील आशयाचा अर्क आहेत. गायिकेने, याचे ने महत्व जाणून, आपल्या स्वरिक आविष्काराने कसे मांडले आहेत, हे ऐकण्यासारखे आहे. प्रत्येक भाषेची जी खासियत असते, ती त्यातील शब्दांच्या उच्चारात आणि ते उच्चार, जसेच्या तसे स्वरांतून काढणे, ही बाब वाटते तितकी सहजगत्या जमणारी कधीच नसते. कवी म्हणून साहिर आणि गायिका म्हणून आशा भोसले, यांचे श्रेष्ठत्व अशाच छोट्या पण अति महत्वाच्या जागेतून दिसून येते. गाण्याची लय किंचित जलद झाली आहे, तालाचा वेग देखील वाढला आहे आणि अशा वेळेस, शब्दाचे वजन अचूक  दाखवणे,सुगम संगीतात नेहमीच अत्यावश्यक असते. 
"किसी के मनाने में लज्जत वो पायी, 
के फिर रूठ जाने को जी चाहता है." 
मघाशी मी नूतनच्या अभिनयाचे वर्णन करताना, चेहऱ्यावरील खोडकर भावाबद्दल लिहिले होते. इथे शब्दकळा बदलेली आणि "लज्जत" तसेच "रूठ" या शब्दातून प्रणयातील मुग्ध भाव समोर आला. नूतन, हेच भाव आपल्या चेहऱ्यावर किती अप्रतिम दाखवते. हा वाचिक अभिनय, गाण्याची "लज्जत" आणखी वाढवतो. 
गाण्याची चाल गायकी ढंगाची आहे आणि गाण्यात विस्ताराच्या अनेक शक्यता दिसतात. याचाच परिणाम असा, 
"वो जलवा जो ओझल भी है सामने भी,
वो जलवा चुराने को जी चाहता है". 
यातील पहिली ओळ गाताना, ती गायकी अंगाने घेतली आहे परंतु गायकी अंग म्हणजे रागाचे प्रदर्शन नव्हे. लयीच्या ओघात, तीच ओळ वेगवेगळ्या "अंगाने" आळवून, परत परत घोळवली आहे. इथे गाण्याची लय अधिक द्रुत होते आणि हे पारंपारिक कव्वाली रचनेचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सुरवातीची संथ लय आणि आताची द्रुत लय, परत ऐकली म्हणजे यातील सांगीतिक वाक्यांशाचा आनंद घेता येईल.
यापुढील रचना, गाण्याच्या दृष्टीने थोडी दीर्घ आहे. 
"जिस घडी मेरी निगाहो को तेरी दीद हुई  
वो घडी मेरे लिये ऐश की तमहीद  हुई  
जब कभी मैने तेरा चांद सा चेहरा देखा  
ईद हो या के नी हो, मेरे लिये ईद हुयी
वो जलवा जो ओझल भी है सामने भी 
वो जलवा चुराने को जी चाहता है" 
या ओळी वाचताना, आपल्याला सहज समजून घेत येईल, या ओळीतून, नायिकेचा आपल्या सखींशी संवाद चालला आहे. आपला नायक डोळ्यासमोर आहे पण वेगळ्या रुपात आलेला आहे. "वो घडी मेरे लिये ऐश की तमहीद  हुई, ईद हो या के नी हो, मेरे लिये ईद हुयी" इथे मुस्लिम संस्कृतीतील "ईद" आणि "चांद" याचा गोड संबंध ध्यानात घेतला म्हणजे शब्दातील खुमारी ध्यानात येईल. कव्वाली रचनेत हीच तर खरी गंमत असते. शाब्दिक फुलोरा आणि उपमांचे संयोजन जागोजागी वाचायला मिळते. या ओळींमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला हरकती ऐकायला मिळतात पण त्या हरकतींतून गाण्याचा गोडवा अधिक वाढतो आणि संगीतकार म्हणून रोशन यांचे हे खास कर्तृत्व म्हणावे लागेल. 
हा अंतरा झाला की आपल्याला अप्रतिम सरगम ऐकायला मिळते. "नि रे ग ग रे ग नि म" अशी ती सरगम आहे. हा तर यमन रागाचा वाक्यांश. इथे आशा भोसले "खालच्या रे पासून वरचा रे" किती अचूक घेतात, ही मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. लयीची गती घेऊन, तालाची गती सांभाळून, ही सरगम (हरकतींच्या फिरतीसह) कव्वालीला वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते. 
"मुलाकात का कोई पैगाम दीजे 
के छुप छुप के आने को जी चाहता है 
और आ के ना जाने को जी चाहता है" 
रचना आता अति जलद लयीत शिरलेली आहे पण तरीही गाताना शब्दांचे औचित्य कुठेही डागाळलेले नाही, ही फार महत्वाचे आहे. 
"आ के ना जाने को जी चाहता है" ही ओळ शेवटची आहे, तेंव्हा रचना समाप्त होणार हे ध्यानात घेऊन, इथे द्रुत लय, कशी परत एकदा संथ लयीत आणली आहे, हा भाग फार वेधक आहे. परत पहिल्या ओळींवर गायन येते आणि ही रचना संपते, जिथे ही रचना सुरु झाली होती. रोशन यांचा रागदारी संगीताचा किती व्यापक अभ्यास होता, हे दर्शविणारी ही रचना आहे. ही रचना ऐकताना, वारंवार एक जाणीव होते. हे गाणे "ठुमरी" स्वरूपात जाऊ शकले असते पण, शब्दरचना कव्वाली थाटाची आहे आणि समजून रचनेला तसे नेमके वळण, रोशन यांनी लावले आणि हिंदी चित्रपट गीतांतील एका अजरामर गाण्याचा जन्म झाला.