Tuesday 30 October 2018

यशवंत देव

१९८० मधील दिवस असतील, नवीन मते नव्याने फुटण्याचे दिवस होते, तरुण होतो आणि त्यामुळे "माझे मत" याविषयी काहीशी घमेंड, आत्मविश्वास वगैरे गुण चिकटले होते. काही काळ तबला शिकण्यात घालवला होता, त्यामुळे संगीताविषयी समज (अजूनही खरेतर अपसमज जास्त) नको तितकी वाढीव होती. आपल्याला संगीतातील बरेचकाही कळते, समजले आहे अशी आत्मप्रौढी देखील भरपूर होती ( हे सगळे आज लिहिताना आठवत आहे) आणि त्याच धुंदीत असताना, मी एकदा सहज म्हणून "ललित संगीत" या विषयावर काहीसे गंभीर असे लिहिले होते. "शब्दप्रधान गायकी" नावाचे पुस्तक उपलब्ध आहे, हे माझ्या गावी देखील नव्हते. त्यावेळी मी नेहमीच काहीही लिहून ठेवले की माझ्या फाईलमध्ये ठेऊन देत असे, फारतर आई, वडिलांना वाचायला द्यायचे, इतपतच शिरस्ता होता. खरतर मित्रांमध्ये माझे संगीतवेड हा प्रचंड चेष्टेचाच विषय असल्याने, मित्रांना वाचायला देण्याचा प्रश्नच नव्हता. 
अशा वेळी, लायब्ररीतून मी "शब्दप्रधान गायकी" हे पुस्तक आणले आणि सलग वाचून काढले. वाचताना हेच जाणवले, मी लिहिलेल्या निबंधात आणि या पुस्तकांतील विचारात काही ठिकाणी साम्य आढळले. अर्थात, देवांची समज अधिक खोलवर आणि विस्तारपूर्वक होती. पण, लगेच मी तो निबंध (निबंध म्हणायचा  का? जवळपास २० फुलस्केप पाने लिहिलेले होते) आईला वाचून दाखवला, आणि आईने पुढे नानांना वाचायला दिला. आपल्या मुलाने काहीतरी लिहिले आहे, याचाच तो खरा आनंद होता. नानांनी शांतपणे वाचला आणि मला म्हणाले "अनिल, हे सगळे तू यशवंत देवांना का दाखवत नाहीस?" मी मनातून थक्क!! डायरेक्ट संगीतकार यशवंत देव!! पण नाना म्हणाले, मी त्यांना ओळखतो आणि त्यांच्याशी बोलून, तुझी भेट घडवतो. 
त्याप्रमाणे, त्यांनी माझी आणि यशवंत देवांची भेट आकाशवाणीच्या त्यांच्या कार्यालयात घडवून आणली. तो पर्यंत एखाद्या संगीतकाराला भेटायचे, असे कधीही मनात आले नव्हते (पुढे मात्र भरपूर भेटी झाल्या आणि अनेक संगीतकारांना स्वतः:हुन भेटलो). नानांनी माझे लेखन देवांना दिले. हा माणूस इतका साधा होता, मृदू भाषी होता, त्यामुळे लगेच माझा धीर चेपला आणि मी काहीसा मोकळा झालो. वास्तविक मी लिहिलेले काही "मूलभूत" वगैरे नव्हते. काही वर्षे सतत गाणी ऐकून मनात जे काही साठले होते, त्याचेच शब्दरूप होते. त्यासाठी खास अभ्यास, व्यासंग वगैरे काहीही केला नव्हता. त्यांनी माल वाटते, दोन वेळा तरी तो लेख वाचला असावा आणि परत माझ्याकडे कागद दिले. 
मी काहीतरी गंभीरपणे ललित संगीतावर विचार करत आहे, याचेच त्यांना अप्रूप वाटले आणि माझा धीर वाढावा म्हणून लेखनातील त्रुटी सांगितल्या आणि मुद्दे कशाप्रकारे मांडायला हवे होते, याबाबत चार शब्द सांगितले. मजेची बाब म्हणजे खरतर त्यांच्यासमोर मी कोण होतो? कुणीही नाही. गाणी ऐकणारे तर त्यांच्या आजूबाजूला सतत वावरत असणार तेंव्हा मी ललित संगीत आवडीने ऐकतो, याचे त्यांना कौतुक असण्याचे काहीही कारण नव्हते तरीही त्यांना माझ्याबद्दल ममत्व वाटले. त्यांना मी काही दुर्मिळ मराठी आणि हिंदी गाण्यांविषयी विचारले होते आणि त्यांनी आकाशवाणीवर अशी दुर्मिळ मराठी गाणी ऐकायला मिळतात आणि तो कार्यक्रम कुठला वगैरे माहिती दिली. अनिल हवेत!! 
यशवंत देवांसारख्या सव्यासाची, विचारी संगीतकाराशी तासभर गपा मारायला मिळाल्या, हाच आनंद मला तेंव्हा भरपूर होता. तरुण वयात असले काही घडले की त्याचा (भाबडा) आनंद नेहमीच आनंददायी असतो म्हणा. माल तेंव्हाही आणि आजही स्पष्टपणे आठवत आहे ते त्यांचे निर्व्याज, सोपे, खालच्या आवाजातले बोलणे. समोरची व्यक्ती काहीशी अवखळ आहे तरीही त्याला समजून घेऊन  त्याच्याशी, त्याला समजेल अशाच भाषेत बोलायचे, ही हातोटी आजही माझ्या ध्यानात राहिली आहे. आता इतका मोठा संगीतकार, परत आपल्याला भेटलास तरी चालेल, असे म्हणतो म्हटल्यावर अनिल ढगात जाणारच. मला पण संगीतातला असा जाणकार माणूस परिचित व्हावा, असे वाटतच होते. पुढे मी त्यांचे काही कार्यक्रम ऐकले आणि कार्यक्रम संपल्यावर त्यांची भेट घेऊ लागलो. 
अशीच एक भेट आठवत आहे - मला वाटते, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा (ठाकूरद्वार शाखा) वार्षिक कार्यक्रम असावा आणि त्यांनी देवांचा कार्यक्रम ठेवला होता. एव्हाना काही मित्रांच्यात माझे संगीताचे वेड माहिती झाले होते आणि त्यातील एकानेच मला सूचना केली - अनिल, यशवंत देवांना तू काहीतरी प्रश्न विचार!! मी तिथेच एक कागद घेतला आणि जसे आठवतील तसे प्रश्न लिहून काढले आणि त्या मित्राकरवी देवांकडे पोहोचवले. देवांचा मोठेपणा असा की त्यांनी त्या कार्यक्रमात माझ्या प्रश्नांची दखल घेतली आणि कार्यक्रम संपल्यावर भेटायला ये, असे सुचवले. वास्तविक कागदावर माझ्या नावाचा उल्लेख नव्हता त्यामुळे मीच हे प्रश्न लिहिले आहेत, याची देवांना कल्पना असण्याचे काहीही कारण नव्हते. कार्यक्रम संपला आणि स्टेजच्या पाठीमागे जाऊन मी त्यांना भेटलो. त्यांनी लगेच मला ओळखले आणि याचेच मला नवल वाटले. वास्तविक मी भेटून ३,४ वर्षे झाली होती पण या माणसाने तरीही माझी  ओळख ठेवली होती. अर्थात तेंव्हा माझी ओळख म्हणजे "मुकुंद गोविलकर" यांचा मुलगा अशीच होती. त्यांना एका गोष्टीचा आनंद झाला होता - मी सजगपणे ललित संगीत ऐकतो आणि त्याविषयी काही गंभीरपणे आणि ठामपणे मते मांडतो. तिथेदेखील त्यांनी माझ्या प्रश्नावलीतील काही चुका अतिशय ऋजू स्वरांत मला सांगितल्या आणि कुठल्या प्रकारे विचार व्हायला हवा, याबाबत पुन्हा एकदा चार शब्द सांगितले. माग मात्र मी त्यांना घरी जाऊन स्वतंत्रपणे गप्पा मारायचे ठरवले आणि लगोलग शिवाजी पार्क इथले त्यांचे घर गाठले. 
यावेळेस मात्र माझ्यापरीने मी तयारी करून गेलो होतो आणि त्यांच्याशी ठराविक प्रश्नांवरच बोलायचे असेच ठरवले होते. तसे छोटेखानी घर पण त्यांनी अतिशय सहजपणे मला घरात घेतले. घरात करुणा देव होत्या आणि त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यांनी लगेच संगीताचा विषय काढला आणि मला बरे वाटले. आणखी बरे वाटले कारण अनिल बिस्वास या संगीतकाराबद्दल त्यांना वाटणारे ममत्व. त्याचवेळी त्यांनी अनिलदांच्या संगीताची वैशिष्ट्ये सांगितली - विशेषतः: "सीने में सुलगते है अरमान" या माझ्या अति आवडीच्या गाण्यावरील त्यांचे भाष्य म्हणजे ललित संगीतावर किती अभ्यासपूर्ण पद्धतीने विचार करता येऊ शकतो, याचा मला अप्रतिम वस्तुपाठ दिला. शब्द, चाल, वाद्यमेळ आणि गायन, या तिन्ही घटकांचा या स्वररचनेत कसा समर्पक उपयोग केला आहे, याचे वस्तुनिष्ठ विवेचन केले. गाण्याचा अशा प्रकारे आस्वाद घेता येऊ शकतो याची वेगळीच नजर मला मिळाली. पुढे मला एकदा अशोक रानड्यांनी, संगीतकार  मदन मोहन बाबत अशाच प्रकारे समजावून सांगितले होते. इतकी वर्षे मी अनिल बिस्वास यांची गाणी अथकपणे ऐकत होतो पण आता मला तीच गाणी वेगळ्या स्तरावरून कशी ऐकायची, याची नजर मिळाली आणि हे सगळे सांगताना कुठेही कसलाही अभिनिवेश नव्हता, आत्मर्प्रौढी नव्हती. पेळूतून सूत निघावे तसे सहजपणे त्यांचे बोलणे चालू होते. 
वास्तविक मी कोण?  माझी लायकी काय? असले काहीही त्यांच्या मनात देखील आले नसावे. यशवंत देवांचा तसा स्वभावच नव्हता. पुढे मी परदेशी गेलो आणि इथला संपर्कच तुटला. जेंव्हा परत भारतात परतलो, तेंव्हा इथे घडी बसवण्यात बराच वेळा गेला आणि जवळपास पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित करण्याइतका उत्साह फारसा राहिला नव्हता. यशवंत देवांची भेट घेण्याचे राहून गेले. अर्थात त्यांना भेटलो असतो तर पूर्वीची ओळख कितपत आठवली असती, याबाबत शंकाच आहे. परंतु आता देव नाहीत म्हणजे त्या शंकेचे निरसन देखील अप्राप्य!! खरतर त्यांच्या गप्पा सविस्तर मांडून आठवणी जागवणे सहजशक्य आहे पण मग मनात प्रश्न येतो, लिहिताना भावविवशता येईल का?  या प्रश्नालाच मी गप्प बसतो. 

Tuesday 9 October 2018

पिटरमेरित्झबर्ग भाग २

१९९४ साली मी साऊथ आफ्रिकेत आलो ते याच शहरात. खरं सांगायचे झाल्यास, नोकरी पक्की होईपर्यंत मी या शहराचे नाव देखील ऐकले नव्हते परंतु आता तिथे राहायला जायचे म्हटल्यावर थोडी जुजबी माहिती काढायला सुरवात केली. त्यावेळी आजच्यासारखे गुगलचे प्रस्थ वाढले नव्हते माझा बॉस हरून यालाच या शहराची माहिती विचारली!! तेंव्हा डर्बन पासून साधारण ९० कि.मी. अंतरावर डोंगराळ भागात हे शहर वसले आहे, इतपतच समजले. त्यावेळी हे देखील समजले, तिथे थंडी बरीच असते (मुंबईच्या मानाने बरीच असेल म्हणजे पुण्याइतकी हा तेंव्हाचा समज!!) म्हणून लग्नातला सूट अंगावर चढवला - तेंव्हा ध्यानात आले या सुटचे आयुष्य संपायला आले!! मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात व्हिसा आला आणि मी तिसऱ्या आठवड्यात या देशात जायला तयार झालो. तयारी तरी काय करायची? कपडे, काही पुस्तके, काही सीडीज आणि भारतीय मिठाई!! कंपनी राहायला घर देणार असल्याने राहण्याचा काहीच प्रश्न नव्हता. हातात एयर इंडियाचे तिकीट पडले आणि बॅग उचलली. एयर इंडियातून प्रथमच प्रवास होणार होता. त्याआधी नायजेरियाला जाताना इथियोपियन एयर लाईन्सने प्रवास केला होता आणि तो अनुभव काही फार चांगला नव्हता. जाताना विमानात मराठी बोलणारी एयर हॉस्टेस असल्याने आणि मी सवयीप्रमाणे पटकन मराठी बोलल्याने, तिने मला सुंदर जेवण दिले (माझे तिकीट इकॉनॉमी क्लासचे पण जेवण मात्र बिझिनेस क्लासचे मिळाले) प्रवास जवळपास ८ तासाचा आणि अर्थात विमानाची वेळ मध्यरात्र उलटून गेल्यावरची!! 
पहाटे डर्बन विमानतळावर उतरलो. विमानतळावरून देशाची कल्पना करता येते. विमानतळ अतिशय प्रशस्त, स्वच्छ आणि शांत होता. लागोस विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हे वेगळेपण मनात ठसले. सगळे काही शिस्तीत चालू होते,कुठेही धक्काबुक्की नाही, वचावचा बोलणे नाही,की रांगा तोडण्याचे प्रकार नाही. देशाची संस्कृती दर्शवणारी वागणूक - अर्थात काही वर्षांनी पार दुसरे टोक गाठले गेले. बाहेर हरून वाट बघतच होता. लगेच पार्किंग लॉट मधून गाडी काढली. हरूनची मर्सिडीझ ५०० होती. त्या गाडीचे प्रथम दर्शनच अतिशय सुरेख होते. गाडी जशी विमानतळ सोडून हमरस्त्यावर आली तशी रस्ता म्हणजे काय असतो, याची प्रचिती आली आणि तो अनुभव पुढील १७ वर्षी कायम येत राहिला. आपल्याला मुंबई-पुणे फ्री वे चे कौतुक (अर्थात तसे ते वाजवीत आहे म्हणा) परंतु तशा दर्जाचे रस्ते साऊथ आफ्रिकेत साऱ्या देशभर पसरलेले आहेत. मे महिना म्हणजे थंडीचा कडाका गाडीत बसल्याने तसे फारसे जाणवले नव्हते, त्यातून गाडी तर १५० वेगाने धावत होती - आयुष्यात प्रथमच इतक्या भरधाव वेगाचा अनुभव घेत होतो. या प्रवासाचा पहिला परिणाम म्हणजे आजूबाजूची गर्द झाडी. फ्री वे असला तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय घनदाट अशी झाडी - मुंबईकराला हे तर अप्रुपच!! 
हरूनने सरळ घराकडे गाडी घेतली. मला "शेयरिंग" घर मिळाले होते. घरात विनय (मंगलोर) आणि जयराज (केरळ) असे रहात होते. घर प्रशस्त होते, प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम होती. प्रवासात हरूनने, कंपनीच्या विस्तार कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगितली. ऑइल रिफायनरी, (दुसरी रिफायनरी बांधायचे काम सुरु झाले होते) मार्जरीन फॅक्टरी तसेच साबणाची फॅक्टरी सुरु झालेली होती. माझे ऑफिस फॅक्टरी प्रिमायसिसमध्येच होते. एक गंमत सांगायची राहिलीच. जसे घर जवळ आले आणि गाडीतून खाली उतरलो आणि खऱ्या अर्थी थंडीचा कडाका जाणवला!! आदल्या दिवशी किंचित पाऊस शिंपडला असल्याने वातावरण ढगाळ आणि काहीसे अंधेरी होते परिणाम हवेत थंडी!! विनय आणि जयराज वेळेनुसार कामाला गेले होते. घरात मी एकटाच होतो घरात आलो आणि बॅगा उघडून कपडे, पुस्तके वगैरे लावण्यात वेळ गेला. दुपारी सरळ झोप घेतली. संध्याकाळी विनय आणि जयराज परतले अर्थात पहिल्या भेटीत जुजबी ओळख झाली आणि ते साहजिकच होते. 
हळूहळू हे दोघे आणि इतर भारतीयांच्या ओळखी झाल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आलो. सकाळी ८०० वाजता ऑफिस सुरु ते संध्याकाळी ४.३० पर्यंत. ऑफिसमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यक्ती होत्या - माझ्या बरोबर काम करणारी नसीमा नावाची मुलगी (खरतर बाई म्हणायला हवे) होती. सुरवातीचे ओळख करून घेण्याचे सोपस्कार पार पडले आणि कामाचा आढावा आणि स्वरूप समजून घ्यायला सुरवात केली. अजय (मुंबईकर - चेम्बुरस्थित पण आता कॅनडाला गेला) माझा बॉस, मुंबईकर असल्याने मराठी बोलण्याची सोय झाली. त्याची बायको, चित्रा मार्जरीनं लॅबोरेटरीमध्ये कामाला होती आणि ती तर अस्खलित मराठी बोलायची.  अजय कुटुंबासह राहातासल्याने स्वतंत्र रहात होता - त्याचे घर म्हणजे माझे घर असावे इतका आमचा घरोबा झाला होता. परदेशात एक नक्की असते, केवळ भारतीय या मुद्द्यावर सहज सगळे एकत्र येतात. साऊथ आफ्रिकेत त्यावेळी भारतातून फारसे या देशात नोकरीसाठी येत नसत कारण या देशात प्रवेश करायला सरकारनेच घातलेली बंदी. मंडेला सत्तेवर यायच्या सुमारास बंदी उठली तरीही २००० सालापर्यंत एकूणच इथे नोकरीला येण्याचे प्रमाण फारच तुरळक होते. 
हळूहळू ऑफिसमध्ये रुळायला लागलो. जरी ऑफिसमध्ये गोरे कमी असले तरी कामानिमित्त भेटणारे बरेचजण गोरे असायचे.. त्यावेळी तरी नक्कीच पण त्यांचे इंग्रजी समजून घेणे फार अवघड गेले आता समजतच नाही म्हटल्यावर प्रत्युत्तर तरी कसे द्यायचे? माझी सुरवातीला बरीच तारांबळ उडाली होती आणि तिथे अजय मदतीला यायचा. अर्थात मनाशी खूणगाठ बांधली, हे असे चालायचे नाही, इथे राहायचे असेल तर इथली इंग्रजी समजून घ्यायलाच हवी. त्यावेळी मी सिगारेट ओढीत असे आणि एक क्लुप्ती शोधली होती, कुणी गोरा भेटायला आला की लगेच सिगारेट शिलगावयाची आणि तोंडात ठेवायची आणि काही बोलणे समजले नाही की लगेच Pardon Me असे बोलायचे पण माझा उच्चार देशी!! गोऱ्यांना समजून घेणे अवघड!! एकूण भलतेच मजेशीर प्रसंग ओढवायचे. 
दिवसेंगणिक थंडीचा कडाका वाढत होता. पिटरमेरित्झबर्ग शहर हे डोंगरात वसलेले शहर त्यामुळे थंड वारे सतत वाहत असतात, त्यातून या देशात जून, जुलै महिने म्हणजे थंडीचा खरा दणका!! मी इथे आलो त्यावेळी गरम कपड्यांचा फारसा विचार केला नव्हता पण इथे आल्यावर मला जॅकेट घेण्याशिवाय तरुणोपाय नाही, हे समजले आणि एके शनिवारी मी आणि विनय मार्केटमध्ये गेलो आणि जॅकेट घेतले पुढे बरीच वर्षे मी हे जॅकेट वापरीत होतो. मी या देशात उणीपुरी १७ वर्षे राहिलो पण आजही माझ्या मनात या शहराबद्दल काहीसे ममत्व आहे. अतिशय रेखीव, आटोपशीर शहर. डर्बन तर सुरेखच आहे पण तरी तिथे शहरी भाव नजरेआड करता येत नाही. पिटरमेरित्झबर्ग हे तसे टुमदार गाव आहे - आजही तसेच आहे, इथे तशा फारशा प्रचंड इंडस्ट्रीज नाहीत एकूणच पूर्वीच्या पुण्यासारखे गाव आहे. थंडीच्या दिवसात गारठवुन टाकणारी थंडी असली तरी डिसेंबर, जानेवारीतील उन्हाळा तसा डोक्यात जात नाही आणि याचे कारण दर दोन, तीन दिवसांनी पडणारा पाऊस!! पाऊस जरी शिंपडला तरी वातावरणात जाणवण्याइतपत बदल घडतो.रस्ते अतिशय मोकळे, प्रशस्त आणि एकूणच डोंगराळ प्रदेश असल्याने सारखे वर-खाली बांधलेले. त्याचा परिणाम असा होतो, एखादे वळण घेतले की लगेच सृष्टीतील बदल बघायला मिळतो. आलो तेंव्हा थंडी होती पण तरीही ठराविक पानगळ वगळता, झाडांनी आपला हिरवा रंग सोडलेला नव्हता. लहानखोर गाव असल्याने एकमेकांबद्दल ऋजू भाव बराच होता - यात आता कालानुरूप फरक पडत गेला म्हणा!! 
हळूहळू इंग्रजी भाषा समजायला लागली आणि इथे स्थिरावयाला लागलो, विशेषतः: बँकेतील अधिकाऱ्यांशी विश्वासाने बोलणे सुरु झाले तसेच कंपनीच्या ऑडिटर्सबरोबर मीटिंग्ज झडायला लागल्या. संध्याकाळी ४.३० ला ऑफिस बंद पण सुरवातीला मी आणि विनय, अजयसह उशिरापर्यंत बसत असू. रात्री उशीर झाला की अजयच्या घरी जेवण. मी कशाला नाही म्हणतोय!! विशेषतः: शुक्रवार संध्याकाळी अजयकडे छोटीशी पार्टीच असायची. थंड हवेत स्कॉच पिणे हा आनंद सोहळा असतो. इथेच मी On The Rocks घ्यायला सुरवात केली. बाहेर जबरा थंडी असल्याने, हातातल्या स्कॉचची चव पण देखणी असायची. एक गंमत - हे शहर संध्याकाळ ६.०० नंतर जवळपास ओसाड असते -आजही यात फरक नाही!! दिवसा गजबजून गेलेले शहर नंतर इतके शांत असायचे की मला सुरवातीला फार नवल वाटायचे आणि मनात मुंबईची तुलना व्हायची. मुंबई तर संध्याकाळनंतर उमलायला लागते. पिटरमेरित्झबर्ग  शहरात, शुक्रवार रात्र किंवा शनिवार रात्र, नाईट क्लब आणि आजूबाजूचा परिसर थोडाफार गजबजलेला तसेच इथला रेड लाईट एरिया देखील थोडासा गजबजलेला अन्यथा रस्ते आणि घरे, सगळीच शांत असतात. १९९४ मध्ये आम्ही मित्र बरेचवेळा अजयच्या घरी पार्टी झाल्यावर शांतपणे चालत घरी येत असू. त्यावेळी या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा इतका गंभीर प्रश्न झाला नव्हता. रात्री त्या शांत वातावरणात माझ्या मनात अनेक मराठी कवितांची उजळणी चालत असे. विनयला तर नेहमी आश्चर्य वाटायचे - पार्टीत खिदळणारा अनिल रस्त्यात असा गपगुमान का असतो? आता त्याला काय सांगणार!! 
या शहरात त्यावेळी तरी बरेच मुसलमान रहात होते आणि त्यांच्याशी ओळखी होणे क्रमप्राप्तच होते. इथे एक गंमत बघाया मिळाली. भारतीय वंशाची वस्ती तर भरपूर आहे पण ती दोन विभागात विभागलेली. १) हिंदू, २) तामिळ. त्यांची देवळे वेगळी, सण, सोपस्कार वेगळे इतकेच कशाला स्वयंपाक करायच्या पद्धती वेगळ्या. इथे गुजराती वस्ती तितकीच लक्षणीय आहे. आता या लोकांची पाचवी, सहावी पिढी इथे रहात आहे (काहींच्या तर ७,८ पिढ्या आहेत) त्यामुळे नावापुरते भारतीय. त्यातून इथल्या लाकोणची पहिली नावे बहुतांशी इंग्रजी-विशेषतः: मुलीची नावे तर सर्रास इंग्रजी असतात अंडी इथे सगळेजण पहिल्या नावानेच ओळखतात. अर्थात ही पद्धत सगळ्या देशात आहे. कंपनीचा मालक जरी असला तरी त्याला पहिल्या नावानेच हाक मारायची किंवा संबोधायचे. त्यामुळे विशेषतः: फोनवरून बोलताना पत्ता लागायचा नाही, बोलणारी मुलगी गोरी आहे, हिंदू आहे की तामिळ आहे. अर्थात त्यांच्या उच्चार पद्धतीत सूक्ष्म फरक आहे पण तो समजून घेण्यासाठी काही काळ घालवणे गरजेचे आहे. गुजराती समाज मात्र विलक्षण आहे, पाचवी पिढी आहे पण आजही अस्खलित गुजराती बोलतात, घरात तसेच पारंपरिक रीतिरिवाज चालू असतात, पिण्यात सज्जड असतात, क्लबमध्ये देवळात जावे तितक्या सहजतेने जातात. बहुतेक समाज हा बिझिनेस मध्येच आहे आणि तिथे मात्र गोऱ्या लोकांचे उच्चार तसेच गळ्यावर  बसवून घेतलेले. बिझिनेस वेगळा आणि घर वेगळे!! 
त्यावेळी तरी लोकांच्यात सचोटी, दिल्या शब्दाला तारण राहायचे तसेच त्यामानाने साधे जीवन होते. कदाचित म्हणून हे शहर माझ्या मनात आजही घर करून आहे. इथेच मला खऱ्या अर्थाने या देशाची संस्कृती कळली, काही बाबतीतला भंपकपणा देखील समजला. एका बाजूने पाश्चात्य संस्कार पचवलेला समाज तर दुसऱ्या बाजूने, भारतातील जुनाट रूढी प्राणपणाने कवटाळून बसलेला समाज!! दोन टोकांवरील आयुष्य पण तितक्याच सहजतेने वागवत आहे. इथेच Good Friday  आणि पाठोपाठचा Easter Monday, इथला भारतीय समाज किती पारंपरिक आहे, हे दर्शन घडवतो. Good Friday रोजी सगळेजण अतिशय निष्ठेने निर्जळी उपास करतात, संध्याकाळी आपल्याला देवळांत जातात, इथे धगधगीत लाकडांवर अनवाणी पायाने चालतात, संध्याकाळच्या मिरवणुकीत (ही मिरवणूक शहरभर चालते) ऊर्ध्व लागल्याप्रमाणे काहीजण नाकात, पापणीवर, कानांच्या पाळीत, छातीवर, पाठीवर टोकदार आकड्याच्या साहाय्याने फळे लटकवतात आणि मंदिरात आल्यावर काढून टाकतात. अशा प्रकारे फळे काढणे, हा मोठा सोहळा असतो. मला तेंव्हा देखील आश्चर्य वाटले होते आणि तिथल्या काही वयस्कर माणसांना, भारतातील शहरी भागात असले काही चालत नाही, वगैरे बोललो तर त्यांना रागच आला! आता अतीव श्रद्धा म्हटल्यावर तिथे वाद संभवतच नाही म्हणा!! असो. गंमतीचा भाग म्हणजे एकदा का देवळातला सोहळा आटोपला की लगोलग ड्रिंक्स घ्यायला कसलीच आडकाठी नसते!! 
इथे लग्न रिवाज वगैरे आपल्याप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने पार पडतात, देवळात भटजी येतो, मंत्र सोपस्कार पार पाडतो आणि विधिवत लग्न होते. इथे मात्र मग ड्रिंक्स असते. साऊथ आफ्रिकन माणसे पाण्याप्रमाणे बियर पितात!! शनिवार दुपारी देखील कुणाकडे गेलो तरी चहाच्या आधी बियर किंवा थंडी असेल तर ब्रँडी, स्कॉच घेणार का, अशी विचारणा होते. सगळा देश सज्जड पिणारा. अर्थात हवामानाच असे असते, ड्रिंक्स घ्यायला देखील मजा वाटावी. इथे त्यावेळी मॉल संस्कृती फोफावली नव्हती. सेंट्रल भागात ३,४ शॉपिंग सेंटर्स होती- आजही आहेत, इथे उघड्यावर बसून जेवणे, ड्रिंक्स घेणे हा आनंद सोहळा असतो. इथेच मी तऱ्हेतऱ्हेचे पाव बघितले आणि कशाबरोबर कुठला पाव खायचा याचे शास्त्र शिकून घेतले. किंबहुना ड्रिंक्स कसे घ्यावे, याचे देखील शास्त्र शिकून घेतले. गोरा माणूस ड्रिंक्स घेतेवेळी किती वाभ्रट होतो, याचा अनुभव घेतला खरतर ड्रिंक्स पार्टी रंगवावी तर गोऱ्याच माणसाने. त्यावेळी तो अंगावरील सगळी बिरुदे बाजूला ठेवतो आणि ज्याला नॉन-व्हेज जोक्स म्हणतात, त्याची, फटाक्याची माळ लावावी त्याप्रमाणे फटाके फोडत असतो मग बाजूला बायको असो वा गर्लफ्रेंड असो!!  
या शहराने मला खूपच लळा लावला पण मी ज्या कंपनीत नोकरी करीत होतो, त्या कंपनीचे आर्थिक दिवाळे वाजायला लागले होते. बाहेर कुठेतरी प्रयत्न करणे आवश्यकच होते, सुदैवाने मला डर्बन इथे नोकरी मिळाली.  वास्तविक मी वर्क परमिटवर होतो त्यामुळे जर का दुसरी नोकरी हवी असेल तर आधीच्या कंपनीकडून N.O.C. अत्यावश्यक असते, सुदैवाने हरूनला याची माहिती होती. खरतर तोच मला म्हणाला होता, अनिल जर तुला दुसरीकडे कुठे मिळत असेल तर निघून जा. मला डर्बनला नोकरी मिळाली आणि त्याने लगोलग N.O.C  लेटर सही करून दिले. माझा पुढील मार्ग वैध झाला, इथेच मला पुढे Permanent Residency मिळाली आणि पुढील आयुष्यच बदलून गेले.  

Saturday 6 October 2018

पु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार

फार वर्षांपूर्वी प्रख्यात संगीतकार श्रीनिवास खळ्यांचे "गोरी गोरी पान, फुलासारखी छान" हे बालगीत अतिशय लोकप्रिय झाले होते, इतके की कवी ग.दि.माडगूळकरांनी कौतुकाने "अहो खळे, या गाण्याने मी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलो". वास्तविक माडगूळकर, त्याआधीच घरगुती झाले होते पण यानिमित्ताने त्यांनी श्रीनिवास खळेकाकांचे कौतुक करून घेतले. अशाच वेळी कुणीतरी या गाण्याचे कौतुक करीत असताना, खळ्यांनी मात्र आपली आवड म्हणून "नाच रे मोरा आंब्याच्या वनात" या बालगीताचे नाव घेतले. वास्तविक प्रस्तुत बालगीत प्रसिद्ध नक्कीच होते परंतु कालौघात काहीसे मागे पडले होते. अर्थात त्यानिमित्ताने काही लोकांना या गाण्याचे संगीतकार पु.ल.देशपांडे आहेत, ही माहिती "नव्याने" समजली. पु.ल. आपल्या असंख्य व्यापात वावरत असताना, त्यांनी आपल्यातील संगीतकार या भूमिकेबाबत नेहमीच अनुत्साही राहिले आणि खुद्द संगीतकारच जिथे मागे रहात आहे तिथे मग इतरेजन कशाला फारसे लक्षात ठेवतील? परंतु संगीतकार म्हणून पु.लं. नी ललित संगीतात काही, ज्याला असामान्य म्हणाव्यात अशा संगीतरचना केल्या आहेत. बऱ्याचशा रचना कालानुरूप अशा केल्या आहेत आणि त्यात फारशी प्रयोगशीलता आढळत नाही परंतु चालीतील गोडवा, शब्दांचे राखलेले औचित्य आणि काहीवेळा स्वररचनेवर राहिलेला नाट्यगीतांचा प्रभाव आणि त्यातूनच निर्माण झालेले "गायकी" अंग, यांमुळे गाणी श्रवणीय झाली आहेत. 
पु.लं. नी आपल्या सुरवातीच्या काळात भावगीत गायनाचे कार्यक्रम केले होते. त्या दृष्टीने विवरण करायचे झाल्यास, त्यांनी गायलेली गाणी फारशी ऐकायला मिळत नाहीत. "पाखरा जा" सारखे अपवादात्मक गाणे ऐकायला मिळते. त्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, आवाज "कमावलेला" नाही, पण रुंद, मोकळा आणि स्वच्छ आहे. त्याला "गाज" फार नाही पण गोड, सुरेल आहे. त्यात किंचित सुखावणारी अनुनासिकता आहे पण लवचिकपणा फार नसल्याने फिरत ऐकायला मिळत नाही. एकूणच बहुतेक भर हा उस्फूर्तता असावी, असे वाटते. अर्थात अचूक शब्दोच्चार हा महत्वाचा मुद्दा विशेषत्वाने मांडायला लागेल. असेच एक लक्षात राहण्यासारखी रचना म्हणजे "उघड दार". या गायनात आवाजाची फेक वेधक आहे. "दार" मधील "दा" अक्षरावरील तयार षडजामधला आ-कार सुरेख लागलेला आहे. वरती उल्लेख केलेल्या "पाखरा जा" मधील "पहा" या शब्दावर छोटी चक्री तान आहे. परंतु मघाशी म्हटल्याप्रमाणे आवाजावर शास्त्रीय संगीताचे संस्कार नसल्याने, घेतलेल्या ताना या, दोन, तीन स्वरांपुरत्या असल्याने एकूणच स्वररचनेला विलॊभनीयता आणणाऱ्या आहेत. त्यामुळे एक विधान ठामपणे करता येते, ललित गायकाला प्रत्येक प्रकारची गाणी गाता येणे गरजेचे असते आणि तिथे मात्र पु.लं. च्या गायनात काहीसे थिटेपण जाणवते. पुढे "बटाट्याची चाळ" या संगीतिकेतील गायन ऐकायला मिळते पण ते गायन हे बव्हंशी कविता वाचन स्वरूपाचे झाले आहे. मुळात त्या रचनेत संगीताचे स्थान तसे गौण असल्याने, असे झाले असावे. असे असले तरी एकूणच पु.लं.चा आपल्या गायनावर फार विश्वास नसावा, असेच वाटते. 
पु.लं.चा खरा सांगीतिक आविष्कार ऐकायला मिळतो तो त्यांच्या हार्मोनियम वादनातून. मला देखील काही प्रख्यात गायकांना साथ करताना ऐकण्याची संधी मिळाली होती. अर्थात यात त्यांचे जाहीर वादनाचे कार्यक्रम देखील समाविष्ट आहेत. वाद्य वाजणारे कलाकार बहुदा त्या वाद्याच्या प्रेमात पडतात. समजा ते वाद्य हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन झाले तर तर त्या वाद्याचा अतोनात गौरव करण्याकडे प्रवृत्ती वळते. या दृष्टीने बघता पु.लं.चे तसे झाले नाही. त्यांनी आपले पेटीवादन कधीही व्यावसायिक तत्वावर केले नाही, किंबहुना आनंदनिधानाचे स्थान, इतपतच त्यांच्या आयुष्यात या वाद्याचे स्थान राहिले, असे म्हणता येईल. त्यांनी या वाद्याच्या कमतरते विषयी बऱ्याचवेळा जाहीर मतप्रदर्शन केले होते आणि ते वाजवी असेच होते. अर्थात इतर कुठल्याही वाद्याकडे पु.ल. वळले नसल्याने, या वाद्याच्या अनुरोधानेच त्यांच्या संगीत प्रभुत्वाबद्दल काही विधाने करता येतील. 
आता जर का पेटी या वाद्याचीच घडण लक्षात घेतली तर आपल्याला काही ठाम विधाने करता येतील. हातानेच भाता चालवायचा असल्याने "दमसास"ची अडचण उद्भवत नाही. दीर्घ स्वरावली आणि ताना घेता येतात तसेच सर्व सप्तकात फिरता येते. गळ्यापेक्षा बोटांचे चापल्य अधिक त्यामुळे जलद ताना सुलभतेने घेता येतात. परंतु या वाद्यात दोन अडचणी प्रामुख्याने येतात. १) तिच्यातील स्वरस्थाने आणि भारतीय संगीतातील स्वरस्थाने यात फरक पडतो. २) सर्वात मोठा फरक म्हणजे पेटीच्या स्वरांत तुटकपणा फार जाणवतो. एक स्वर झाल्यावर दुसरा स्वर परंतु इतर तंतुवाद्यांत असा प्रवास करताना स्वरांतील सातत्य राखणे जमू शकते आणि तिथे पेटी कमी पडते. पुढचा मुद्दा असा, भारतीय संगीतात "मींड" या अलंकाराला अतोनात महत्व असते आणि तिचे अस्तित्व पेटीतून दाखवणे जवळपास अशक्य होते आणि याचे मुख्य कारण स्वरांतील तुटकपणा ठळकपणे ऐकायला मिळतो. आणि हा दृष्टिकोन ध्यानात ठेऊनच आपल्याला पु.ल. एक वादक याचा धांडोळा घ्यायचा आहे. बोटांचे छापल्या तर महत्वाचे खरेच पण भाता सक्षमपणे हलवणे तसेच स्वरांचा नाद अवश्य तिथे लहान-मोठा करणे, एकाच स्वर दीर्घकाळ त्याच "व्हॉल्युम" मध्ये ठेवणे इत्यादी बाबींतून मैफिलीत रंग भरणे, यात पु.ल. निश्चित वाकबगार होते. मुळात पेटी हे संथ, मुक्त आलापीचे वाद्यच नव्हे - जसे सतारीत अनुभवता येते. विलंबित स्वराला जे सातत्य, दीर्घता हवी असते ती पेटिट सुट्या-सुट्या स्वरांतून मिळत नाही. 
मी स्वतः: वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी आणि मल्लिकार्जुन मन्सूर यांसारख्या दिग्गज गायकांबरोबर केली साथ ऐकली आहे. आदर्श साथ जी गायकाच्या बरोबर जाते पण भारतीय संगीतात ठरीव संहिता अशी कधीच नसते म्हणजेच गायक जे त्या क्षणी सुचेल त्या स्वरावली घेत असल्यामुळे पुढच्या क्षणी येणारी स्वरावली ही नेहमीच अनपेक्षित असते, त्यामुळे साथ देणारा "बरोबर" जाऊ शकत नाही - तो मागोवा घेत असतो. यात गायकाच्या पेशकारीच्या शक्य तितक्या जवळपास वावराने, इतकेच पेटी वादकांच्या हातात असते. पु.लं.च्या बाबतीत हे कौशल्य ठळकपणे ऐकायला मिळते. बरेचवेळा गायकाने जी स्वरावली घेतली आहे, त्याचे प्रत्यंतर आपल्या वादनातून देणे अंडी इथे पु.ल. नेमके वादन करताना आढळतात. तसेच कधीकधी "मोकळ्या" जागेतील "भरणा" अतिशय कुशलतेने करताना आढळतात. अर्थात प्रत्येकवेळी असे करता येईल असे शक्य नसते परंतु वसंतराव देशपांड्यांच्या बाबतीत पु.लं.नी हे स्वातंत्र्य घेतल्याचे मी अनुभवले आहे. एकतर वसंतरावांचा गळा कोणत्यावेळी कुठे आणि कशी झेप घेईल याची अटकळ बांधणे महामुश्किल असताना, त्यांना साथ करताना ही व्यवधाने अचूकपणे सांभाळल्याचे समजून घेता येते. 
आता पुढील भाग म्हणजे पु.लं.ची ललित संगीतातील कामगिरी. इथे त्यांनी दोन स्तरांवर संगीत दिग्दर्शन केले आहे. १) भावगीत, २) चित्रपट गीत. तसे पाहता, आविष्काराच्या दृष्टीने दोन्ही आविष्कार एकाच पातळीवर वावरतात पण चित्रपट गीत बांधताना, प्रसंगाची पार्श्वभूमी, आजूबाजूचे "सेटिंग" वेळेची मर्यादा इत्यादी बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. पु.लं.ची बरीचशी चित्रपट गीते ही त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील आहेत. अर्थात बरेचवेळा आर्थिक चणचण हा मुद्दा असल्याने वाद्यमेळाच्या विविधतेवर मर्यादा आल्या. अर्थात अशी मर्यादा असून देखील त्यांनी काही अत्यंत संस्मरणीय रचना दिल्या, हे मान्यच करायला हवे. मी सुरवातीला एक मुद्दा मांडला होता, पु.लं.च्या स्वररचनेवर त्यावेळच्या नाट्यगीतांचा प्रभाव जाणवत आहे. विशेषतः: मास्तर कृष्णराव यांचा जाणवण्याइतका प्रभाव दिसतो. मास्तरांच्या रचनेतील प्रासादिकता, कल्पक छोट्या अशा ताना, आवाजाला तरलपणे फिरवण्याची हातोटी, एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीत दोन वेगळ्या सुरांचा वापर करून चमत्कृती घडवायची आणि रचनेत रमणीयता आणायची इत्यादी खुब्यांचा आढळ पु.लं.च्या बहुतेक रचनांमधून ऐकायला मिळतो. "माझिया माहेरा जा" सारख्या गीतांतून मास्तर कृष्णरावांच्या प्रभावाचा अनुभव घेता येतो. तसेच "हसले मनीं चांदणे" सारख्या (राग चंद्रकौंस) गाण्यातून बालगंधर्वी शैलीचा प्रभाव जाणवतो. सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे शब्दांचे औचित्य सांभाळणे - "माझिया माहेरा" या गाण्यातील "हळूच उतरा खाली" इथे स्वर पायरीपायरीने उतरवून, शब्दांबाबतली औचित्याची भावना सुरेख मांडली आहे. तसेच "तुझ्या मनात कुणीतरी हसलं ग" (राग पहाडी) सारख्या रचनेत प्रसन्नतेचा भावस्थितीनुसार लय काहीशी द्रुत ठेवणे हे संगीतकार म्हणून नेमके जमले आहे. 
त्यांची खास गाजलेली दोन भावगीते - "शब्दावाचून कळले सारे" आणि "माझे जीवन गाणे". मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेल्या प्रसन्न कवितेला पु.लं. नी खरोखरच चिरस्मरणीय अशा चाली दिल्या आहेत. "दूर कुठे राऊळात दरवळतो पुरिया" सारख्या चित्रपटगीतांत "पुरिया" रागाचा समर्पक उपयोग केला आहे. तसे बघितले चाल साधी आणि सरळ आहे पण तेच या चाळीचे खरे वैशिष्ट्य म्हणायला हवे. दुसरे गाजलेले चित्रपट गीत म्हणजे "इंद्रायणी काठी" हे भजन. या रचनेवर देखील मास्तर कृष्णरावांचा प्रभाव आढळतो. असे असले तरी गायनावर बालगंधर्व शैली पुसली जात नाही - विशेषतः: "विठ्ठला मायबापा" हा पुकार तर खास बालगंधर्व शैलीतला. भीमपलास रोगावरील धून असली तरी रागाचे अस्तित्व वेगळे ठेवले आहे. "ही कुणी छेडिली तयार" हे केदार रागावर आधारित गाणे असेच विलोभनीय झाले आहे. यात गिटार वाद्याचा उपयोग लक्षणीय आहे जरी वसंर्तवाचा ढाला आवाज काहीसा विक्षेप आणत असला तरी. वर उल्लेखलेल्या "नाच रे मोरा" ही रचना तर बालगीत म्हणून चिरंजीव झालेली आहे. गाताना काहीसा बोबडा उच्चार, हलकेच निमुळता होत जाणारा स्वर तसेच सुरवातीच्या "नाच" मधील "ना" आणि शेवटी येणाऱ्या "नाच" मधील हलका "ना" यांचा गमतीदार विरोध इत्यादी अनेक गुणविशेषांनी हे गाणे नटले आहे. असेच अप्रतिम गाणे "करू देत शृंगार" सारखी विरहिणी अजरामर झाली आहे. कवितेतील आशय अतिशय नेमक्याप्रकारे जाणून घेऊन, तितकीच तरल स्वररचना सादर केली आहे. अर्थात आणखी एक उणीव असे म्हणता येणार नाही कारण त्यात आर्थिक कारणे दडलेली आहेत पण सगळ्याचा स्वररचनांमध्ये वाद्यमेळाचे प्रयोग फारसे बघायला मिळत नाहीत. 
एकूणच खोलात विचार करता, पु.लं.च्या संगीताचा साक्षेपाने विचार केल्यास,  सारांशाने असे म्हणता येईल, की त्यांचा व्यासंग हा "साधना" या सदरात मोडणे अवघड आहे. त्यांच्या आस्वाद यात्रेतील एक वाटचाल असे म्हणता येईल. असे असले तरी, महाराष्ट्राने त्यांच्या विविध पैलूंवर अतोनात प्रेम केले पण यात या माणसाच्या सांगीतिक कर्तबगारीची विशेष जण ठेवली नाही आणि कदाचित पु.लं.नी देखील फार गांभीर्याने याकडे पाहिले नाही.