Sunday 16 January 2022

बुडत्याचा पाय खोलात!!

लेखाचे शीर्षक थोडे विचीत्र वाटेल पण सध्या तरी तेच योग्य वाटते. आपला मराठी समाज किंवा एकूणच भारतीय समाज बऱ्याचप्रमाणात अत्यंत भोंदू आणि भोंगळ आहे. अडकित्त्यात मान अडकलेली असावी तशी अवघडलेली अवस्था झाली आहे. आपण आपल्या मराठी लोकांबद्दल विचार करू. सध्याचा मराठी समाज हा बराचसा भ्रांतचित्त झाला आहे. एकीकडे पूर्वसूरींचा अतोनात सोस आणि टोकाचा अभिमान बाळगायचा पण रोजच्या व्यावहारिक जीवनात त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे बघितल्यावर आधुनिक विचारसरणीचा आधार घ्यायचा!! आधुनिक विचारसरणी स्वीकारायची कारण आपण *प्रतिगामी* ठरू, याची भीती मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असते. तेंव्हा मग  *पुरोगामी* हाच मार्ग दिसतो. आता पुरोगामी लेबल चिकटवून घ्यायचे म्हटल्यावर लगेच आपली दृष्टी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळते.  यात एक मखलाशी आपण अशी करतो, पाश्चिमात्य संस्कृतीमधील *आपल्याला झेपेल* इतकेच स्वीकारतो. हा भोंदूपणा झाला. मुळात निव्वळ अंधपणे ही संस्कृती स्वीकारणे, हाच पायावर धोंडा पाडून घेणे होय पण तसे आपण कधीही मान्य करणार नाही. याचे महत्वाचे कारण, आपल्याला असलेला भयानक *अहंकार!!* मी *स्वतंत्र बुद्धीवादी* आहे, अशी खुळचट आणि भ्रामक समजूत करून घेतली आहे. एका बाजूने पूर्वसूरींचे गोडवे गायचे पण प्रतिगामी ठरू म्हणून प्रतिगामित्वाचा बुरखा घालून घ्यायचा. अशी अडकित्त्यात अडकलेली स्थिती झाली आहे. यात एक मेख अशी आहे, असे धरून चालू आपले पूर्वज अत्यंत हुशार होते आणि त्यांची तत्वे,वागणे आजही उपयोगी आहेत. परंतु त्याचा अत्यंत *डोळस* अभ्यास करण्याची चिकाटी आणि तयारी नाही. वास्तविक बघता, कुठलाच विचार हा कधीही संपूर्णपणे योग्य असत नाही. तो केवळ एक मार्ग दाखवत असतो. एका बाजूने पूर्वजांचे गोडवे गायचे (तर्काशिवाय,हे महत्वाचे) कारण इथे कुणीही इतका व्यासंग केलेला नसतो. त्यातून दुसरा भाग असा, लोकांना काय, नवीन काहीतरी *आयते* मिळाले की खुश होतात आणि सारासार विचार बाजूला ठेऊन, नवीन *देवघराची* प्रतिष्ठापना करतात!! *नीरक्षीर विवेकेतू* ही वृत्ती फक्त कागदावर साजून दिसते, प्रत्यक्षात ते आपल्याला परवडत नाही. आता भाग येतो, तथाकथित *पुरोगामीत्व* स्वीकारण्याचा. मघाशी मी जो पाश्चात्य संस्कृतीचा उल्लेख केला आणि आपण आंधळ्या वृत्तीने आपल्याला झेपेल तितकेच स्वीकारतो आणि *आम्ही पुरोगामी* असा ढोल वाजवायला सुरु करतो!! *ढोल वाजवणे* आपल्या व्यवस्थित जमते. पाश्चात्य चंगळवादी सवयी आपण नेमक्या उचलल्या कारण त्या स्वीकारण्यासाठी फार काही करायची गरज नव्हती. पाश्चात्य संस्कृतीतील *बुद्धिप्रामाण्यवाद* आपण फक्त वेगवेगळ्या लेखांसाठी उचलला कारण प्रत्यक्षात आचरण करण्यासाठी लागणारी मेहनत करायची आपल्याला सवय नाही!! आता इथे उदाहरणे देण्यात येतील, विशेषतः अमेरिका किंवा युरोप मध्ये जे भारतीय फार वरच्या पातळीवर पोहोचले, त्यांची नावे फेकली जातील. परंतु अशा काही शेकडा व्यक्ती म्हणजे समाज नव्हे. या प्रयत्नात आपण आपली *ओळख* विसरत जात आहोत, हे फारसे ध्यानात येत नाही. व्यक्तिगत समाधान, ही तर पराकोटीची भावना बळावत चालली आणि समाज मागासलेला राहिला. 

No comments:

Post a Comment