Saturday 22 January 2022

बाळासाहेब ठाकरे - व्यामिश्र व्यक्तिमत्व!!

वास्तविक बाळासाहेबांना जाऊन २,३ दिवसच झाले आहेत, त्यामुळे अत्यंत "तठस्थ" वृत्तीने लेखाजोगा करणे तसे अवघड आहे. तरीही, ते गेल्यानंतर ज्या रीतीने पेपर्स, टीव्ही आणि फेसबुकवर बातम्या, मते वाचायला मिळत आहेत, त्यावरून मला दोनच निष्कर्ष काढता येतात. त्यांचे जे "कौतुक" चालू आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर जी "टीका" चालू आहे, यात कुठेतरी सुवर्णमध्य आवश्यक आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, कुठलीही व्यक्ती हि कधीच एकरेषीय नसते, त्यातून बाळासाहेबांसारखी लोकमान्य व्यक्ती तर कधीच असू शकत नाही आणि हाच दृष्टीकोन मनाशी ठेऊन, मी पुढे विधाने करणार आहे. बाळासाहेबांसंबंधी लिहायचे म्हणजे सरळ,सरळ दोन भाग पडतात.१] राजकीय व्यक्तिमत्व , आणि २] व्यंगचित्रकार. आता, राजकीय व्यक्तिमत्व बघायचे झाल्यास, त्यात अनेक विरोधी गोष्टी दिसतात काही उदाहरणे बघूया. मुंबईत जेंव्हा मराठी लोकांना कुणी वाली नव्हता( आज तरी किती आहे, हे वादाचा भाग झाहे!! तरीदेखील) तेंव्हा, त्यांनी या परिस्थितीचा नेमका फायदा उठवला. त्यावेळी, मुंबईत कम्युनिस्ट लोकांचे उपद्व्याप सरकारला डोईजड झाले असताना, मराठी माणसांच्या या चळवळीने, मुंबईतून कम्युनिस्ट जवळपास हद्दपार झाले. यातूनच, कृष्णा देसाई खून प्रकरण घडले आणि तिथून शिवसेनेचा दरारा वाढायला लागला, असे म्हणता येईल. एक गोष्ट मान्यच करायला लागेल त्याकाळी, सरकारी नोकरीत मराठी-अमराठी हा भेदभाव प्रचंड होत होता. शिवसेनेने हे वर्चस्व मोडीत काढले. विशेषत: बँक, मंत्रालय, सरकारी खाती इथे मराठी लोकांची वर्णी लागायला लागली. अर्थात, त्याचवेळेस, एयर इंडिया मधील, नंदांच्या थोबाडीत मारून, जबरदस्तीने मराठी भरती सुरु केली!! आता हा प्रकार कुठल्या सुसंस्कृतीत बसतो? त्यावेळी, मराठी लोकांवर अन्याय होत होता हे नक्की आणि या चळवळीनिमित्ताने, मराठी लोकांना या नोकरीची दारे उघडी झाली. परंतु, केवळ "क्लार्क" किंवा फारतर "ऑफिसर" इतपतच नोकर भरती होत राहिली. पुढे याला अधिक व्यापक स्वरूप ,मिळाले नाही, हे निखालस सत्य आहे. त्यामुळे. मराठी मानसिकता, हि नेहमीच संकुचित राहिली. राजकीय पक्ष सांभाळायचा म्हणजे अनेक तडजोडी, व्यापक हित ह्या सगळ्या गोष्टी येतात, त्यासाठी लोकसंग्रह हि अत्यावश्यक गरज असते. या दृष्टीने विचार करायला गेल्यास, बाळासाहेबांचे वक्तृत्व हे नेहमीच वादग्रस्त राहिले. लोकांना आवाहन करणे निराळे, लोकांवर गारुड टाकणे निराळे आणि अश्लाघ्य भाषा वापरणे निराळे. त्याबाबतीत तारतम्य राखणे गरजेचे नाही का? मृणाल गोऱ्यांना "घृणाल गोरे" म्हणणे किंवा पुष्पा भाव्यांना "भावीण" म्हणणे कुठल्या संस्कृतीत बसते? तसेच नेहमीच अत्याग्रही भूमिका कितपत संय्युक्तिक ठरते? याच बाबीचा थोडा विस्तार केला तर, या संदर्भात कै. पु.ल. देशपांडे यांच्याबाबतीत वापरलेली भाषा, हि कुठली संस्कृती म्हणायची जेंव्हा तुम्ही, राजकारणात पडता, तेंव्हा, विरोधी मतांचा आदर, हि नेहमीची गरज असते. प्रत्येक प्रसंगाच्या विविध बाजू असतात आणि त्या चर्चेने घडवू शकतात. भारतात, प्रथमपासून लोकशाही अस्तित्वात आहे( १९४७ नंतर!!) आणि चर्चा, ही नेहमीच लोकशाहीची पायाभूत गरज असते. ज्या चर्चिलचा त्यांना अभिमान होता, त्या चर्चिलने, त्यांच्याकडे सर्वाधिकार असताना देखील, कधीच त्याचा दुरुपयोग केला नाही, किंवा स्वत:वरची टीका अडवली नाही!! त्याबाबतीत बाळासाहेबांचे पारडे हलके होते. आपली मते म्हणजे वज्रलेप आणि तिथे संवाद उद्भवत नाही, हि भूमिका लोकशाहीत कितपत योग्य ठरते? एकाबाजूने काँग्रेस मधील "घराणेशाहीवर" टीका करायची परंतु स्वत"च्या पक्षात तीच धोरणे राबवायची, हा दुटप्पीपणा नाही का? भ्रष्टाचाराच्या विळख्यातून कुठलाच पक्ष सुटलेला नाही, तेंव्हा त्याबाबतीत बाळासाहेबांवर तशी टीका करण्यात काहीच मतलब नाही. शिवसेनेने "खंडणी" संस्कृती राबवली, अशी टीका केली जाते पण, मग इतर कुठला पक्ष यातून नामानिराळा राहू शकेल? बाकीचे पक्ष "मवाळ" म्हणणे, हि शुद्ध फसवणूक आहे. इथे इतर राज्यांबद्दल काहीही दाखले द्यायची जरुरी नाही, कारण हि "खंडणी" संस्कृती बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमधून पूर्वीपासून राजरोस चालूच होती. त्यावेळी, कुणी टीका केल्याचे फारसे आठवत नाही!! कदाचित, महाराष्ट्र पहिल्यापासून "बुद्धीवादी" राज्य आहे, म्हणून असे असावे!! आता, जरा दुसऱ्या बाजूने बघूया. एक काळ मुंबईत असा होता, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, हे भाग म्हणजे "मिनी" पाकिस्तान म्हणून गणले जायचे. हे अतिरेकी लिहिणे नव्हे, मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. उदाहरण देतो. १९८७ च्या शारजा इथल्या जगप्रसिध्द क्रिकेट सामन्यात, जेंव्हा जावेद मियांदादने, शेवटच्या चेंडूवर षटकार मारून, विजयश्री खेचून घेतली, तेंव्हाची या भागातील आतषबाजी, आजही माझ्या मनात ताजी आहे. माझ्या बाजूलाच, त्यावेळी बरीच मुस्लीम वस्ती होती, तिथले वातावरण प्रत्यक्ष अनुभवले आहे. तेंव्हा या "पाक" धर्जीण्या मनोवृत्तीला खरा पायबंद घातला असेल तो शिवसेनेने!! दुसरे "पाक" धर्जिणे उदाहरण!! काही महिन्यांपूर्वी, युरपमध्ये, एक "कार्टून" प्रसिद्ध झाले, त्यात मुस्लीम प्रेषित, मोहम्मद, याची "थोडी टिंगल" उडवली होती, लगेच त्याचे पडसाद भारतात उमटले!! काय संबंध? पण, त्यावेळी असा प्रश्न कितीजणांनी विचारला होता? किमानपक्षी विरोध नोंदवला होता? गुंडागर्दी केंव्हाही अक्षम्य, हे कबुल पण, जग कधीच एका वृत्तीने चालत नसते. जोपर्यंत आपण बलोपासना करीत नाही, तोपर्यंत समोरचा त्या भेकड वृत्तीचा फायदा हा उठवणारच, हे मानवी इतिहास आहे. १९६२ चे चीन युध्द याला साक्ष आहे. अर्थात, हे थोडे विषयांतर झाले. अर्थात, व्यंगचित्रकार म्हणून त्यांना स्थान होते, हे त्यांचे विरोधक देखील मान्य करतील. आपल्यासारख्या सामान्य माणसांना असे सांगितले जाते की "बाळासाहेबांना इतर कलांची बरीच जाणकारी होती" वगैरे, वगैरे... पण, हे त्यांचे खासगी रूप झाले.प्रत्येकाला याचा पडताळा कसा येणार? सामान्य माणसाच्या समोर प्रतिमा उभी राहते, ती सभेतल्या भाषणातून आणि तिथे तर हे व्यक्तिमत्व वादग्रस्त ठरते. जहाल भाषा वापरणे, महाराष्ट्राला नवीन नाही. अत्रे देखील कमरेखालची भाषा नेहमी वापरत. पण म्हणून, ती भाषा सुसंस्कृत ठरत नाही. त्यामुळे, बाळासाहेबांचे नेतृत्व सामान्य माणसाला जवळचे वाटले, हे सत्य आहे आणि त्याच ओढीतून, त्यांच्या अंत्ययात्रेला जो प्रचंड जमाव जमला, त्याचे इंगित ध्यानात येते. राजकारणात, सामान्य माणसाशी नाळ जोडावीच लागते. यशवंतराव चव्हाणांची होती, शरद पवारांची आहे पण त्यासाठी त्यांना खालच्या पायरीचा आश्रय घ्यावा लागला नाही. यशवंतराव चव्हाण तर बहुश्रुत होते, हे त्यांच्या विरोधकांनी देखील खुल्या मनाने मान्य केले आहे. इथे मला, या व्यक्तिमत्वाचा तर्कशुद्ध आढावा घ्यायचा नाही पण, मला जे भावले, त्याचा हा लेखाजोगा आहे.

No comments:

Post a Comment