Thursday 28 October 2021

संगीत - एक शास्त्र

वास्तविक हा विषय म्हटले तर अति किचकट आहे पण तरीही निदान मला तरी किती आकळलेला आहे, हे तपासण्यासाठी आणि थोडेफार *सुबोध* मराठी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. एक नक्की, आधी वातावरणात ध्वनी होते आणि त्यांचे स्वरूप नक्की करून आपल्या प्रतिभावंत ऋषींनी त्याचे शास्त्र बनवले. अगदी मागोवा घ्यायचाच झाल्यास, सामवेदात संगीताची काही मुलतत्वे सापडतात परंतु आजचे जे आपले *सप्तक* आहे (सा रे ग म प ध नि) त्याची शास्त्रशुद्ध प्रतिस्थापना नारद मुनींनी केली (रामायणातील नारद मुनी वेगळे. त्यांचा इथे काहीही संबंध नाही). नारद मुनींनी *नाट्यशास्त्र* नावाचा श्लोकात्मक ग्रंथ लिहिला आणि त्यात संगीतावर १ प्रकरण लिहिले आणि त्यात आजच्या सप्तकाची मांडणी केली (त्यावेळेस म हा स्वर पहिला मानून सप्तक तयार केले. पुढे यथावकाश सा स्वर पहिला अशी मांडणी झाली) आता हा ग्रंथ इ.स.पूर्व २०० ते इ.स.८००, इतका प्राचीन काल मानला गेला आहे. अगदी इ.स.पूर्व २०० जरी धरले तरी आज त्या ग्रंथाला २,२०० वर्षे झाली!! लक्षात घ्या, त्याकाळी आजच्यासारखी आधुनिक उपकरणे नव्हती. केवळ कर्णगोचर अवस्थेत त्यांनी ध्वनीचे स्वरूप आकळून घेतले, जे आजच्या आधुनिक उपकरणांनी मान्य केले आहे. आता गमतीचा भाग असा आहे, यावेळेस पाश्चात्य संगीत कुठे होते? थोडा खोलवर जाऊन अभ्यास केला तर असे आढळते, त्यावेळी पाश्च्यात्यांकडे *ग्रीक संगीत* अस्तित्वात होते (पुढे त्यांनी याचा संपूर्ण त्याग केला केला) आणि त्या संगीतात देखील *सप्तक* होते (C D E F G A B) परंतु त्यांचा प्रॉब्लेम असा झाला, आपल्या सप्तकात काही *अंतर्गत सूर* मांडले गेले, ज्यांना *श्रुती* म्हणतात. (खरंतर स्वर म्हणजे श्रुती म्हणता येईल पण तो भाग फार जटील आहे) आपले स्वर हे नैसर्गिक ध्वनींवर आधारीत आहेत (म्हणूनच आपली वाद्ये नैसर्गिक तत्वावर तयार झाली आहेत) आणि पाश्च्यात्यांकडील वाद्ये संपूर्णपणे वेगळ्या धर्तीवर बांधलेली असतात. त्यामुळेच पाश्च्यात्यांना *टेम्पर्ड स्केल* स्वीकारावे लागले कारण नैसर्गिक स्वरतत्व त्यांच्या वाद्यांना खपणारे नव्हते. अर्थात हा भाग देखील समजायला अति अवघड आहे. आपल्याकडे नेहमी फार ढोबळ विधाने केली जातात जसे भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत कारण दोन्ही संगीतात *सप्तक* वापरले जाते!! असे बोलताना, एक बाब नेहमी बाजूला सारली जाते आणि ती म्हणजे स्वरांतर्गत असलेल्या श्रुती व्यवस्था. आपले स्वर नैसर्गिक असल्याने, आपल्या संगीतात *मेलडी* असणे सहजसाध्य असते तर पाश्च्यात्यांना त्यांची वेगळी व्यवस्था म्हणून *हार्मनी* व्यवस्था स्वीकारणे भाग पडले. अर्थात पाश्चात्य संगीतात, अधून मधून मेलडी ऐकायला मिळते. जेंव्हा दोन्ही संगीतातील *साम्य* दर्शवायचे असते तेंव्हा हे मुद्दे महत्वाचे असतात पण तिकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही आणि ढोबळ विधाने करून, वेळ मारून नेली जाते. ऐकणारे बरेचसे *Layman* असतात आणि त्यामुळे अधिक खोलात जाऊन फारसा विचार केला जात नाही. मुळात, *संगीतशास्त्र* म्हटल्यावर बरेचसे दचकतात आणि लांब रहातात. दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे. त्यातून शास्त्राबद्दल *गम्य* असणारे इतकी अवघड भाषा वापरतात की ज्या कुणाला रस निर्माण होण्याची शक्यता असेल, ती व्यक्ती दूर जाते आणि *शास्त्र* विषयाबाबत दुराग्रह करून बसतात. आता शास्त्र म्हटल्यावर काही संकल्पना, काही तांत्रिक शब्द हे येणारच. त्याला इलाज नाही पण त्याची थोडी सवय करून घेतली तर त्यात, आपल्याला जितके अवघड वाटते, तितके ते अवघड नाही, याचा प्रत्यय येऊ शकतो. आपल्याकडे एक विचार प्रचंड प्रसिद्ध आहे. *गाणे कानाला गोड वाटले ना, मग ठीक आहे*!! गाणे कानाला गोड वाटायलाच हवे, ती तर प्राथमिक कसोटी आहे पण तिथेच थांबणे योग्य नव्हे. सादर होणारी प्रत्येक कलाकृती *शास्त्राधारित तपासणे* शक्य नसते. तिथेच मग त्या कलाकृतीचे *निकष* उपयोगी पडतात. प्रत्येक सांगीतिक कलाकृतीचे काही ठराविक निकष अस्तित्वात आहेत पण ते आहेत, याचीच जाणीव ठेवली जात नाही आणि आस्वाद घेतला जातो. त्यामुळे, *मला गाणे आवडले* हे वाक्य नको तितके प्रसिद्ध होते. एकदा शास्त्र म्हटल्यावर *व्यक्ती* पुसली जाते आणि निखळ कलाकृती समोर येते. *व्यक्ति पुसली जाणे* हेच मान्य करायला अवघडजाते, इतके सगळे स्वकेंद्रित असतात आणि आस्वादाच्या कक्षा विस्तारायच्या ऐवजी संकुचित करून टाकतात.

No comments:

Post a Comment