Monday 20 July 2015

तोड नसलेला "तोडी"

उत्तररात्र कलत असताना पण पहाटेच्या किरणांची चाहूल अस्पष्ट जाणवत असताना, दुरून एखाद्या  मंदिरातून,एकतारीचे मंद स्वर ऐकायला येतात. त्या स्वरांना कुठल्याच वाद्याची, तालाची जोड नसते, वाजत असते आपल्याच तंद्रीत आणि त्या स्वरांची बेहोशी आपल्या मनाला वेढून टाकत असते. तोडी रागाबाबत असेच काहीसे म्हणता येते. उत्तरांगातील हा तोडी राग आणि त्यातील स्वरसमूह, खरतर केवळ भक्तिमार्ग हा एकच भाव दाखवतो, हे थोडेसे एकांगी होईल पण तरीदेखील, शांत,गंभीर अशा छटा देखील या रागातून मिळतात. मघाशी मी "उत्तरांग" हा शब्द वापरला, त्याबाबत थोडक्यात. सप्तकाचे २ भाग केले असता, त्यातील पहिल्या भागाला "पूर्वांग" तर दुसऱ्या भागाला "उत्तरांग"  म्हटले जाते आणि त्यानुसार रागातील स्वरांचे महत्व अधोरेखित केलेले असते. आता, २ भाग म्हणजे - " सा"ते "प" स्वर हा पूर्वांग भाग तर "प" पासून "वरचा "सा" हा उत्तरांग भाग. प्रत्येक रागात, स्वरांची अशी ठेवण असते आणि त्यानुरूप रागाचा तोंडावळा ठरत असतो. 
आता तोडी रागापुरते लिहायचे झाल्यास, या रागात, वादी स्वर "(कोमल) ध" आणि संवादी" स्वर आहे "(कोमल) ग". वरील मांडणीप्रमाणे, "ध" स्वर हा सप्तकाच्या दुसऱ्या भागात येत  असल्याने,रागाचे स्वरूप "उत्तरांग" ठरते. तोडीमध्ये, (कोमल) रे, आणि (तीव्र) म वगळता सगळे स्वर शुध्द स्वरूपात लागतात,  निर्देशिलेले संवादी स्वर (कोमल) ग आणि वादी स्वर (कोमल) ध, यातच समाविष्ट आहे. अवरोही सप्तकात मात्र, "पंचम" स्वर येतो आणि खऱ्याअर्थी संपूर्ण सप्तक ऐकायला मिळते. याचाच दुसरा भाग असा, हा राग, "षाडव - संपूर्ण" असा आहे. थोडक्यात याचे विवेचन असे, पाच स्वरी आरोह किंवा अवरोह असेल तर "औडव", सहा स्वरी आरोह किंवा अवरोह असेल तर "षाडव" आणि साती स्वर लागत असतील तर "संपूर्ण" अशी रागाची वर्गवारी शास्त्रात मांडलेली आहे.  म्हणूनच मी वरती, तोडी रागाबद्दल, "षाडव - संपूर्ण" असे म्हटले आहे, ते  नियमाच्या अनुषंगाने. 
तोडी रागाचे आणखी सुंदर वैशिष्ट्य असे सांगता येईल, हा राग "मंद्र" सप्तकापासून "तार" सप्तकापर्यंत,अनंत प्रकारे विहार करू शकतो, कुठेही अटकाव नाही. त्यामुळे, ज्या गायकाची जशी तयारी असेल त्या कुवतीनुसार हा राग खुलवता येऊ शकतो. 
इथे आपण, प्रथितयश गायक,भीमसेन जोशी यांची एक प्रसिद्ध रचना ऐकू. 


मी मुद्दामून १९६३ साली गायलेली रचना घेतली आहे. अत्यंत तरुण वयातील पंडितजी, काय बहारीने आणि तबियतीने राग पेश करतात, याचा अप्रतिम अनुभव आहे. रचना  ऐकताना,प्रत्येक स्वर, त्या स्वरामागील  नजाकत,पीळ आणि त्या जोडीला येणाऱ्या हरकती, खास ऐकण्यासारख्या आहेत. अर्थात, जरा बारकाईने ऐकले तर सहज ध्यानात यावे, त्यावेळी देखील गायनाची शैली, स्वरोच्चार, दमसास इत्यादी वैशिष्ट्ये तीच होती, जी पुढे जाउन, त्यांच्या गायकीची "ओळख" ठरली.
आता आपण, रागाच्या "ललित" स्वरूपाकडे बघूया. इतक्या प्रचंड आवाक्याच्या राग हाताशी असल्यावर, अर्थात या रागात भक्तीसंगीत खुलले नसते तर नवल. श्रीनिवास खळेकाकांनी या रागाचा अतिशय बहारीचा उपयोग केलेला आढळतो. "अगा करुणाकरा" ही रचना या दृष्टीने ऐकण्यासारखी आहे. तुकारामांचे शब्द आणि खळेकाकांची चाल!! 


खळ्यांच्या सांगीतिक कौशल्याचा अर्क म्हणजे हे गाणे  म्हणता येईल. ओळीची सुरवात, परिचित सुरांनी होते पण पुढे विस्तार मात्र इतका वेगळ्या प्रकारे होतो की सुरवातीचे सूर बाजूला पडून त्याक्षणी ऐकायला येणाऱ्या सुरांनी आपण चकित होतो. अस्सल गायकी अंगाने जाणारी चाल आहे त्यामुळे गाणारी गायिका तितक्याच तयारीची असल्याशिवाय, या गाण्याला "न्याय" मिळणे अवघड!! तेंव्हा तिथे केवळ लताबाई(च) आणि दुसरा कुठला "गळा" न्याय देऊ शकणार!!  
पारंपारिक भजनाचा "थाट" बाजूला सारून, आधुनिक पद्धतीची रचना केली आहे पण, तसे करताना, तुकारामांनी अभंगात जो विचार मांडला आहे, त्याला न्याय देण्याची दुहेरी जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याचे  दृष्टीला पडते. 
या गाण्यात लय किती वेगवेगळ्या स्तरावर फिरत असते, हे बघणे, खास अभ्यासाचा विषय आहे. क्षणात मंद्र सप्तकात तर पुढील क्षणात चाल तार सप्तकात जाते पण इतकी झपाट्याने जात असताना देखील गाण्याचा  आशय कुठेही एकमेकांशी जरादेखील फारकत घेत नाही, हे विशेष. संगीतकार म्हणून खळेकाका किती श्रेष्ठ होते, याचा हे गाणे म्हणजे पुरावा दाखवता येईल. 

आता, आपण एक हिंदी गाणे बघूया. "संत ज्ञानेश्वर" या चित्रपटातील "हर नयी किरन से मंगल  संदेसा  लायी, जागो रे, प्रभात आई". वास्तविक  गाणे पण, काळाच्या ओघात  थोडे मागे पडले!! का? या प्रश्नाला काही उत्तर नाही. या गाण्याचा पहिला "आलाप" तोडी रागाची ओळख करून देतो. मन्ना डे सारखा असामान्य गायक हाताशी असल्यावर, संगीतकाराला देखील चालीत वेगवेगळ्या जागा, नवीन हरकती किंवा चालच एकदम नव्या लयीत गुंफायची, असले अवघड प्रकार करतात. 


अर्थात हे गाणे. तोडी रागाचे लक्षण गीत असे म्हणता येणार नाही. गाण्याचा दुसरा अंतरा जरा नीट  ऐकला,म्हणजे माझे म्हणणे नेमके समजून घेता येईल. इथे एक गमतीचा मुद्दा. वरील दोन्ही गाणी तोडी रागावर आधारित आहेत, हे तर नक्की. परंतु, गाणी जरा नीट लक्ष देऊन ऐकली तर ध्यानात येईल, दोन्ही गाण्यांचे " स्वभाव" वेगळे आहेत!! स्वभाव म्हणजे चालीचा बंध. तिथेच चाल आणि संगीतकार, यांचा गुणधर्म जाणून घेता येतो तसेच गाणे फुलवण्याची पद्धत अभ्यासता येते. 

आणखी एक अनोख्या आणि अवीट चालीचे गाणे बघूया. मागील शतकात - ८० च्या दशकात, राहुल देव बर्मन, गुलजार आणि आशा भोसले, या असामान्य त्रयीने एक सुंदर गाण्यांचा अल्बम  तयार केला होता आणि त्यात, हे गाणे समाविष्ट केले आहे. "भीनी भीनी भोर आयी". 


आता, या गाण्यातील सुरवातीचा "आलाप" ऐका आणि वरच्या गाण्यातील मन्ना डे यांनी लावलेला "आलाप" ऐका. गायक/गायिका जर कुशाग्र बुद्धीमत्तेचे असतील तर एकाच रागातून, अगदी सुरवातीचे "आलाप" वेगळे घेऊन, त्याच रागाचे किती विलोभनीय रूप सादर करतात,  प्रात्यक्षिक देतात. 
गुलजार यांची प्रतिभाशाली कविता, हा नेहमीच सुंदर अनुभव असतो आणि त्याचे या गाण्यात देखील नेमके प्रत्यंतर येते. राहुल देव बर्मन तर नेहमीच काहीतरी "नवीन" करण्याच्या ध्यासाने पछाडलेला संगीतकार. इथे बघा, चाल "गायकी" अंगाची आहे पण, रागाची "प्रतिकृती" नाही. हाताशी आलेली चाल, गाण्यात परावर्तीत करताना, हुशार संगीतकार नेहमीच, स्वत: काहीतरी वैशिष्ट्य त्यात ठेवत असतो. या गाण्यात राहुल देव बर्मनने तेच केले आहे. सुरवातीच्या आलापीनंतर, त्याने समेची मात्रा गाठताना, कुठल्या शब्दावर सम ठेवायची तसेच एकदा सम नक्की केल्यावर, पुढे ती कशा प्रकारे विस्तारित करायची, हे सगळे इतके व्यामिश्र आणि अभ्यासपूर्ण आहे की, केवळ वरवर गाणे ऐकून, आपण या गाण्याला नेमका न्याय देणे शक्यच नाही.  या गाण्यात, दुसऱ्या अंतऱ्यानंतर छोटीशी "सरगम" आहे पण ती देखील लयीच्या अंगाने तसेच त्याने जो "मीटर" ठरवून दिला आहे, त्या  बंधनात ठेऊन घेतलेली आहे. संगीतकार म्हणून राहुल देव आणि गायिका म्हणून आशा भोसले, यांचा नेमका दर्जा दाखवून देणारी, ही "तर्ज" आहे. 


आता आपण शेवटची रचना बघूया. हे गाणे असेच तोडी रागावर आधारलेले आहे. "नंद नंदन दिठू पडिया" हे मीरेचे भजन आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि लता बाईंच्या प्रतिभेचा अर्क असलेली रचना आहे. सुरवातीच्या बासरीच्या आलापित तोडी राग दडलेला आहे आणि पुढे त्याच आलापीचा सुंदर विस्तार केलेला आहे. अर्थात, गाणे अगदी, "टिपिकल" मंगेशकरी वळणाचे आहे. ऐकतानाच ध्यानात येते, ही चाल साध्या गळ्याला पेलणारी नाही. संपूर्ण गाणे म्हणजे खरेतर तोडी रागाची "आळवणी" आहे, असे म्हटले तरी फारसे चुकीचे ठरू नये. 
संपूर्ण गाणे हे समर्पण वृत्तीचे तसेच आळवणीचे गाणे आहे पण असे देखील त्यात, इतक्या बारीक हरकती आहेत, बारकाईने ऐकताना थक्क व्हावेसे वाटते. इथे कुठलाही शब्द सहज, सरळ येत नाही!! प्रत्येक शब्दामागे कमीतकमी एखादी तरी छोटीशी हरकत तरी आहे किंवा दीर्घ आलाप आहे. त्यामुळे गायला गाणे फार अवघड होऊन बसते. तालाच्या प्रत्येक मात्रेची जान आणि किंमत माहित असल्याशिवाय हे गाणे जमणे कठीण. यातील प्रत्येक हरकतीने गाण्याच्या चालीला सौदर्य प्राप्त झालेले आहे.  

खरतर या रागात इतक्या वेगवेगळ्या धर्माच्या चाली आहेत की सगळी गाणे आणि त्यावर थोडे टिपण लिहावे लागेल आणि तरीही  काही निसटून जाइल. तरीही काही महत्वाच्या गाण्याच्या लिंक्स खाली देत आहे. 
१] कशी नशिबाने थट्टा आज मांडली 

२] एक था बचपन 

३] रैना बीती जाये 

No comments:

Post a Comment