Monday 20 July 2015

खेड्यामधले घर कौलारू

चित्रपटातील गाण्याबाबत बाबत एक विशेष जरूर बाळगावा लागतो, त्याची शब्दकळा लिहिताना, ती अधिक "चित्रदर्शी" कशी होईल, याचा विचार प्रभावी असतो. गाणे कितीही गोड  ,त्या गाण्याच्या शब्दातून चित्र , हे कौशल्याचे काम असते आणि त्यामुळेच बहुदा, कविता लिहिताना, प्रतिमांचा वापर हा संयमित असणे तसेच शब्द अधिक गूढ किंवा दुर्बोध नसणे, ही आवश्यक गरज बनते. "चित्रदर्शी" शब्द अशा साठी कारण, अखेर चित्रपट हे दृश्य माध्यम  असल्याने, मर्यादेपलीकडे शब्दांच्या पलीकडील भावाशय चित्रित करणे अशक्य असते. याचा दुष्परिणाम असा झाला, चित्रपटातील गाण्यांना, कविता म्हणून मान्यता मिळण्यास आजही बरेचजण राजी नसतात. आपल्याकडे त्यामुळेच काही खुळचट मानदंड तयार झाले. आपल्याकडे, कवितांचे संग्रह निघतात परंतु चित्रपटातील कवितांचे (काही अपवाद वगळता) संग्रह निघत नाहीत!! तोच प्रकार खाजगी गीतांच्या बाबतीत घडतो. मराठीत, मंगेश पाडगावकरांचा - "तुझे गीत गाण्यासाठी" या कविता संग्रहाचा अपवाद वगळता, फारसे संग्रह दिसत नाहीत!! त्यामुळे, काही कवींवर थोडा "अन्याय" झाला,असे वाटते. ग.दि.माडगुळकर हे त्यापैकी एक असामान्य नाव. मला तर आजही असेच ठामपणे वाटते, माडगूळकरांनी "गीत रामायण" लिहिले नसते ( या कवितांचा संग्रह निघाला आहे !!) तर कदाचित त्यांना आजच्या इतकी लोकप्रियता मिळाली असती का? 
चित्रदर्शी कविता लिहिण्यासाठी, मुळात चित्रपटाच्या पार्श्वभूमीचा सम्यक विचार जरुरीचा असतो आणि त्याबाबतीत माडगूळकरांची ग्रहणशक्ती केवळ "अफाट" म्हणावी अशी होती. 
" आठवणींच्या आधी जाते  
तिथे मनाचे निळे पाखरू  
खेड्यामधले घर कौलारू. 

स्वरावली बाजूला ठेऊन, या शब्दाचा आस्वाद घेतला तर, आपल्याला शब्दातील आशय लगेच समजून घेता येतो. आपल्या गावात आल्यावर अचानक आपल्या जुन्या जीर्ण घरापाशी आल्यावर मनाची जी कातर अवस्था होते, त्याचे स्पष्ट वर्णन आहे. कवितेला "काव्याचे" स्वरूप कसे आले आहे, हे बघण्यासारखे आहे. "एकाकी" अवस्थेत "मनाचे" विरही होणे, ही भावावस्था याच नेमक्या शब्दातून व्यक्त होऊ शकते. इथे इतर दुसरे कुठलेच शब्द खपणारच नाही. "निळे पाखरू" हेच शब्द योग्य. ध्यानीमनी नसताना अचानक नजरेसमोर काहीतरी व्याकूळ करणारे घडले की जी भावावस्था होते, त्याचे हे शाब्दिक चित्रण!! 

"हिरवी शामल भवति शेती ,
पाउलवाटा अंगणी मिळती  
लव फुलवंती,जुई शेवंती,
शेंदरी आंबा साजे मोहरू. 

चौकट तीवर बाल गणपती,
चौसोपी खण स्वागत करती, 
झोपाळ्यावर अभंग कातर, 
सवे लागती कड्या करकरू. 

माजघरातील उजेड मिणमिण 
वृद्ध कांकणे करिती किणकिण,
किणकिण ती हळू ये कुरवाळू  
दूर देशीचे प्रौढ लेकरू". 

सुरवातीलाच मी सगळी कविता मंडळी याचे कारण, एकदा गाणे म्हणून आस्वादाला सुरवात झाली की मग परत शब्दकळेबाबत फारसे लिहिणे थोडे अवास्तव ठरेल. एक गाव, तिथे असे अचानक येणे, त्याच अवस्थेत आपले पूर्वीचे जुने डोळ्यासमोर येणे आणि त्यातून आलेली व्याकूळ अवस्था!! त्यानिमित्ताने मनात उमटलेले भूतकाळाचे तरंग इत्यादी सगळ्या भावना, कवितेच्या रुपात अत्यंत संक्षिप्तपणे मांडणे, नक्कीच सोपे नाही. चित्रपटातील गाणे असल्याने, कवितेत जे मांडायचे, त्याचे चित्रीकरण व्हायचे आहे, तेंव्हा मनाची कातर अवस्था असली तरी ती अवस्था चित्रात दाखविणे अशक्य, तेंव्हा शब्दांचा अव्याहत फुलोरा टाळून, अचूक भावदर्शन घडविणे, याच विचाराने, माडगूळकरांनी शब्दरचना लिहिली आहे. 
हिरवी शेती,अंगण,तिथल्या वेली,घरातील गणपती,झोपाळा,मिणमिण उजेड, आणि शेवटी प्रौढ लेकरू!! असा सगळा आयुष्याचा व्यापक पट, कवितेसारख्या अल्पाक्षरी शैलीत तितक्याच संपृक्ततेने मांडणे, हे सहज येता-जाता जमण्यासारखी बाब नव्हे. माडगुळकर म्हणजे मराठी संस्कृती पचवलेला कवी. या कवितेतील घराचे जे चित्रण केले आहे, ते खरच अभ्यासण्यासारखे आहे. प्रत्येक शब्दातून, ते घर, तिथल्या वस्तू आणि त्या जोडीने आलेला जिवंत मातीचा संदर्भ, यामुळे ही कविता अगदी "आतून" बांधलेली आहे. इथे दुसरा कुठलाही शब्द "उपरा" आहे. 
गाण्याची सुरवात सरळ "गात्या" शब्दाने होते म्हणजे आधी एखादी धून आणि मग शब्द, असा पारंपारिक "घाट" न स्वीकारता, सरळ सुरेल चालीत बांधलेले शब्द कानावर येतात. गायनाच्या दृष्टीने हे तसे अवघड असते. अगदी रागदारी संगीत घेतले तरी रागाला सुरवात होण्याआधी झमझमणारा तंबोरा, गायकाला सूर पुरवत असतो. त्यादृष्टीने अशा पद्धतीने गाण्याची सुरवात करायची म्हणजे डोक्यात सगळे सूर नेमके ठेऊन, सुरवात करावी लागते. 
सुधीर फडक्यांच्या चाली तशा सहज जरी असल्या तरी त्यात, अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या हरकती असतात ज्यायोगे शब्दांना सुरांतून काढताना, वेगळे परिमाण मिळते. इथेच ऐकण्यासारखी एक हरकत आहे. "तिथे मनाचे निळे पाखरू" मधील "निळे" शब्द सुरांत घेताना, त्याला छोटीशी हरकतीची जोड दिली आहे, त्यामुळे तोच शब्द वेगळ्याच अर्थाने आपल्या समोर येतो. ही करामत आधी बाबूजींची आणि नंतर त्याचे प्रत्यंतर देणाऱ्या आशा भोसल्यांची!! 
वास्तविक गाणे गत:स्मृतींच्या संदर्भात आहे तरी आठवणी सगळ्या आनंददायी असल्याने, चाल जलद लयीत बांधली आहे. गाणे जलद लयीत बांधण्याचा एक फायदा, असा होतो, गाण्याला तालाची जोड मिळते आणि तेच गाणे आपल्या मनावर लागेच्ग ठसते. 
बाबूजींच्या रचनेबाबत एक आक्षेप बऱ्याचवेळा ऐकण्यात/वाचनात येतो. या संगीतकाराच्या चाली, "ब्राह्मणी" ढंगाच्या असतात!! म्हणजे काय? संगीतात असा काही "ढंग" आहे का? बाबूजींचा शब्दोच्चारावर विशेष भर असायचा आणि ब्राह्मण लोकं त्याबाबत अधिक दक्ष असतात म्हणून संगीत रचना ब्राह्मणी असतात, असे सुचवायचे आहे का? चाली मराठमोळ्या असतात, तर मग मराठीत इतर संगीतकार देखील या आक्षेपात येऊ शकतात!! त्यातून, चाल ही शब्दांना दिली जाते. जे शब्द हाती असतात, त्या शब्दांना सुरांच्या सहाय्याने न्याय देणे, हे संगीतकाराचे "आद्य" कर्तव्य!! मराठी ही एक संस्कृती आहे आणि त्यानुरूप जर त्याचे प्रतिबिंब कलेच्या सादरीकरणात पडत असेल तर त्यात काय चुकले? केवळ मराठीच कशाला, माझ्या अंदाजाने, जगातील कुठलाच संगीतकार, ज्या प्रदेशात तो वाढतो, त्या संस्कृतीचे जोखड संपूर्णपणे बाजूला टाकू शकत नाही!! त्या संस्कृतीचा प्रभाव, त्याच्या कलेत काही अंशरूपाने आढळत असतो. त्यालाच तर संगीतकाराची शैली म्हणतात. प्रश्न असा असतो, ही शैली त्या संगीतकाराला तारक की मारक? स्वत:ची ओळख ठसविण्यासाठी शैली ही उपकारक असते पण दीर्घकालीन कारकिर्दीत तीच ओळख मर्यादा होऊ शकते!! असो. 
"चौकट तीवर बाल गणपती" इथे "गणपती" शब्दानंतर "ई" कार कसा सुरेख लांबवलेला आहे. जलद लयीत असे प्रयोग करायला तसा थोडाच वाव असतो पण असतो. तालाचे वर्तुळ ध्यानात घेऊन आणि समेच्या मात्रेचे भान ठेऊन(च) अशा हरकती घेता येतात आणि गाण्याचे सौंदर्य अधिक खुलवतात. 
या गाण्याची आणखी एक खास गंमत आहे. शेवटच्या कडव्यातील शब्द "किणकिण ती हळू ये कुरवाळू, दूर देशीचे प्रौढ लेकरू" यातील "किणकिण" हा शब्द आणि नंतरच्या ओळीतील "लेकरू" हा शब्द जरा बारकाईने ऐकले तर कळेल, या दोनच ओळीत माडगूळकरांनी सगळे भावचित्र उभे केले आहे आणि त्यातील हे दोन(च) शब्द निवडून, बाबूजी आणि आशा भोसल्यांनी स्वत:ची स्वरिक भर टाकली आहे. आशय स्वरांच्या सहाय्याने खुलवावा, तो असा. तसे बघितले तर चालीत फारसे अवघड काहीही नाही (फक्त काही शब्दांवरील हरकती सोडल्यास!!) पण चाळीत एक अश्रूत गोडवा आहे त्यामुळे गाणे ऐकताना, आपण त्यात गुंग होऊन जातो. 

1 comment:

  1. गदिमांच्या या कविते सारखीच परंतु भिन्न शब्दरचना असलेली, कवी अनिल भारती यांची व मालती पांडे यांनी गायलेली दुसरी कविता ही आहे. चाल तीच परंतु संगीतकार मधुकर पाठक आहेत. ही कविता बालभारती मध्ये होती.

    ReplyDelete