Monday 20 July 2015

सबा से कहे दो ये

असे नेहमी म्हटले जाते, प्रत्येक गाणे, त्याचे भागदेय घेऊनच जन्माला येत असते आणि त्यानुरूप त्या  प्रसिद्धी मिळते. मला आजही नवल वाटते, काही गाणी खरोखरच असामान्य असतात पण ती विस्मृतीच्या गर्तेत सापडतात. कधी, कधी काही गाण्यांचे भाग्य उशिरा उजळते तर काही गाणी कायमची विस्मरणात जातात. गाणे उत्तम असेल तर ती विस्मृतीत का जातात? या प्रश्नाला तसे सुसंगत उत्तर मिळत नाही. मदन मोहनच्या बाबतीत आयुष्यभर असेच घडत राहिले - गाणी अप्रतिम पण ती गाणी विस्मृतीत गेलेली!! विशेषत: चित्रपट गीतांच्या बाबतीत हे बरेचवेळा आढळते. प्रस्तुत गाणे असेच काळाच्या ओघात हरवलेले पण जर का गाणे म्हणून बघायला गेले तर केवळ अप्रतिम, असे म्हणावे लागते. आशा भोसले आणि मदन मोहन यांनी एकत्रित फार कमी गाणी केली आणि ती गाणी आठवायला गेलो तर "झुमका गिरा रे" यापलीकडे फारशी मजल जात नाही. "तकदीर" या शब्दावर विश्वास ठेवावासा वाटतो, तो "सबा से ये कहे दो" या गाण्याबाबत!!
अतिशय ओघवती कविता, तितकीच सक्षम चाल आणि अर्थात आशा भोसलेचे सुंदर गायन, असा त्रिवेणी संगम या गाण्यात दिसून येतो. सुगम संगीतात, कविता करताना, शब्दरचना ही शब्दबंबाळ झाली तर कवितेकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे कविता लिहिताना, आपण सामान्य माणसासाठी लिहित आहोत, याचे भान राखणे अत्यावश्यक ठरते. अर्थात, जरी गूढ शब्दकळा नसावी, असा जरी प्रघात असला तरी त्यातही "काव्य" गुण असणे अत्यावश्यक असते. 
तसे बघितले तर ही तारेवरील कसरत असते आणि इथेच गाण्यातील काव्य बघताना, काही प्रसिद्ध गाण्यात अत्यंत टुकार शब्दकळा वाचायला मिळते. त्याला अनेक कारणे असू शकतात, म्हणजे चित्रपटातील प्रसंग, किंवा जर आधीच स्वररचना झाली असेल तर त्या रचनेत सहज बसवण्याचा हव्यासापोटी करावी लागणारी तडजोड इत्यादी… 
"सबा से ये कहे दो के कलीया बिछाये 
वो देखो, वो जान ए बहार आ रहा है, 
चुरा ले गया जो, इन आंखो की निंदे 
वोही लेके दिल का करार आ रहा है;
 सबा से ये कहे दो" 

तसे पहिले तर ही रचना अगदी सरळ साधी आहे जिथे शब्दाचा अर्थ कळत नाही, असे होत नाही. वाचतानाच अर्थ समजून घेत येतो पण तरीही, जेंव्हा अशा शब्दांना स्वर मिळतात तेंव्हा हेच शब्द आणखी वेगळा अर्थ प्रतीत करून देऊ शकतात. गाण्याच्या सुरवातीला अगदी अल्प असा हुंकार (Humming) आहे आणि नंतर गाण्याला सुरवात होते. जरा बारकाईने ऐकले तर सहज समजून घेता येईल, या हुंकारातच चालीचा सगळा विस्तार आहे. गाण्याची सम जरी वेगळ्या शब्दावर असली तरी पुढील रचनेचा सगळा ओघ, या स्वरांशी नाते राखणारा आहे. 
सर्वसाधारणपणे गाण्यात, जेंव्हा पहिला शब्द अवतरतो, तिथेच रचनेची "सम" घेतली जाते पण इथे "सबा से ये कहे दो" यातील "दो" शब्दावर पहिली मात्रा आहे म्हणजे पहिले हुंकारात्मक स्वर आणि त्यालाच जोडून, "सबा से ये कहे" पर्यंत गाणे मुद्दाम तालविरहित म्हणजे आलापीच्या अंगाने घेतले आहे. गाणे तयार करताना, संगीतकाराला नेहमी, कुठल्या शब्दावर "जोर" देऊन गाण्याला "उठाव" आणायचा, हे ठरविण्याचे स्वातंत्र्य असते आणि त्यानुरूप, कवितेचा आशय ठरू शकतो. अर्थात इथे मतभिन्नतेला बराच वाव असू शकतो. गाण्यातील पहिली ओळ ही पुढील स्वरविस्ताराची पहिली पायरी असते आणि पुढे याच पायरीचा "आधार" घेऊन, गाणे तयार होत असते. 
"वो देखो, वो जान ए बहार आ रहा है" हि ओळ ऐकताना वरील वाक्याचा पडताळा घेता येतो. कवितेत जो शब्द जसा लिहिला आहे त्या "आकाराने" स्वरांतून प्रतीत होणे अपेक्षित असते. "जान ए बहार" अशी शब्द रचना असल्यावर गाताना देखील, शब्द याच "आघाताने" यायला हवेत तरच त्या कवितेची स्वरांतून पूर्तता होते. इथे थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो. गझल लिहिताना, नेहमी पहिल्या दोन ओळीतील "रदीफ" आणि "काफिया" तपासले जातात आणि त्यानुसार त्याची "जमीन" निश्चित केली जाते. गाण्याच्या बाबतीत हाच विचार मांडता येतो. गाण्याचा विस्तार करताना नेमका असाच विचार केला जातो. आता ही वरील ओळ गाताना, :बहार" शब्द किंचित "विलग" करून घेतला आहे म्हणजे "बहा"+"आर" असा घेतला आहे आणि मुख्य कारण, पहिल्या ओळीत जी स्वरांची "जमीन" निश्चित केली गेली, त्याला अनुलक्षून इथे शब्दावर "आकार" घेणे जरुरीचे झाले. अन्यथा परत समेची मात्रा गाठणे अशक्य झाले असते. अर्थात, संगीतकाराचे कौशल्य असे की लयीत हा शब्द घेताना, शब्दातील आशय बिघडू न देता, कायम केला आहे. 
"चुरा के गया जो, इन आंखो की निंदे; वोही लेके दिल का करार आ रहा है" धृवपदातील या पीढील दोन ओळी. तसे बघितले तर पारंपारिक चित्रपट गीतांतील कविता आणि ही कविता, रचनेच्या दृष्टीने फार वेगळी आहे. कवितेचा "मुखडा" हा थोडक्यात आटोपला जातो तर इथे ओळींचा विस्तार तसा बराच मोठा आहे त्यामुळे चाल बांधताना, संगीतकाराला, गाण्याची "लय" कशी ठेवायची, याबाबत निश्चित विचार करावा लागलाच असणार. 
संपूर्ण कविता वाचली तर आपल्याला सहज समजेल, की कविता गझलेच्या "वजनाने" लिहिली आहे पण, गझलेत, प्रत्येक कडवे ही एक स्वतंत्र आणि सार्वभौम अशी कविता असते. चित्रपट गीत हे एखाद्या प्रसंगाला अनुलक्षून असल्याने, प्रत्येक कडव्यात वेगळी कविता असली "चैन" परवडणारी नसते. अर्थात, ही दीर्घ ओळी गाताना देखील, "करार" शब्द संपताना किंचित "आकार" घेतला आहे. यालाच उर्दूत "अलिफ" म्हणतात. शब्दोच्चार किती महत्वपूर्ण असतात, हे अशाच गोष्टींतून ध्यानात येत असते. या बाबी म्हटल्या तर बिनमहत्वाच्या असू शकतात पण जर का उद्मेखूनपणे नजरेस आणल्या तर त्याच गाण्याचे सौंदर्य अधिक खुलते, हे निश्चित. याचाच दुसरा भाग असा आहे, इथे असे किंचित "आकार" घेतल्याने, गाणे लयीला लगेच अवघड झाले. हा स्वराकार अत्यंत अल्प आहे पण, वैशिष्ट्यपूर्ण आहे. 
गाण्याचा ताल देखील ऐकण्यासारखे आहे. ताल लयीला धरून आहे, हे तर प्राथमिक वैशिष्ट्य झाले पण किंचित "दबलेला" ध्वनी ठेवल्याने, गाण्यातील गायकी उठून दिसते. 
"ये कौन आ गया दिल को करता इशारा, के महकी फिझा मुस्कुराये नजारे;
कदम बढके तू चुम ले मुहोब्बत, के दिल को बहुत उनपे प्यार आ रहा है"
आशा भोसले काय ताकदीची गायिका आहे, याचे इथे एक सुंदर उदाहरण. या कडव्यातील पहिली ओळ - "ये कौन आ गया दिल को करता इशारा" गाताना, "करता" "इशारा"  हे दोन शब्द गाताना, शेवटच्या अक्षरावर किंचित "कंप" घेतला आहे आणि ही फार कठीण आहे कारण, याची साधी चाहूल देखील, आधीच्या शब्दातून आपल्याला मिळत नाही!! हा कंप म्हटला तर फार अर्थपूर्ण आहे. त्याआधीचे शब्द बघितले तर कळून घेता येईल. "ये कौन आ गया दिल को" म्हणजे थोडीशी भासमान अवस्था तरीही मृदू प्रणयी भावना, याचा हृदयावर झालेला परिणाम!! हे सगळे भावविशेष त्या "कंपा" मध्ये आहेत. जसे संगीतकार चाल बांधताना, स्वत:चा विचार करीत असतो त्याचबरोबर गायक/गायिका देखील त्याच रचनेतील नेमके सौंदर्य शोधून, त्याच सांगीतिक आराखाड्याचा अधिक लक्षवेधी वेध घेतात. 
"ये माना के मेहफिल मे अनजान है तू, मगर जब भी तुझसे निगाहें मिली है;
मुझे युं लगा है पयाम ए मोहब्बत, नजर से तेरी बार-बार आ रहा है."
कवितेचा दर्जा अप्रतिम असला म्हणजे संगीतकाराला देखील चाल बांधायला हुरूप येतो आणि त्यातूनच आव्हानात्मक. गायकी अंगाच्या चाली निर्माण होतात. या कडव्याची सुरवार वरच्या स्वरावर होते म्हणजे चाल थोडी वेगळे "वळण" घेते. गाण्यातील सांगीतिक बारकावे जाणून घेण्यासाठी आपल्याला नेहमी गाणे अतिशय फुरसतीत ऐकणे आवश्यक असते. सुगम संगीत म्हणजे फुटकळ संगीत व्यवहार, असे जे मानणारे असतात, त्यात त्यांच्या मनाचा कोता विचार दिसून येतो. इथे प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो आणि तो तितकाच अर्थपूर्ण असावा लागतो. त्याचबरोबर रसिकाची देखील जबाबदारी असते, ऐकायला येणारे गाणे देखील तितक्याच गंभीरपणे ऐकण्याची. आपल्याकडे दुर्दैवाने असे फारसे घडत नाही आणि संगीतातील अशा "अलौकिक" क्षणांना हे रसिक कायमचे पारखे होत असतात. वरच्या सुरांत सुरु झालेले कडवे पुढे "मुझे युं लगा है पयाम ए मोहब्बत" इथे मूळ चालीशी सांधा जुळवून घेते. हा जो सांगीतिक विचार आहे, इथे संगीतकाराची बुद्धीमत्ता दिसून येते आणि गाण्याच्या श्रीमंतीत भर पडते. 
इथे थोडे मागे जाऊ. या कडव्याच्या आधी जेंव्हा गाणे परत "मूळ" ओळींकडे  वळते,तिथे आशा भोसलेने "कलिया" शब्द गाताना जो "मूळ" कंप घेतला आहे, त्यात परत किंचित थोडा फरक केला आहे आणि आपल्या गायकीची साक्ष दाखवून दिली आहे. हा कंप फार, फार अवघड आहे. गाण्याची लय तीच ठेवायचे पण स्वरांवरील आंदोलने वेगळ्या "ढंगात" सादर करायची!! 
वास्तविक, कविता म्हणून आणखी एक कडवे आहे पण, आपण चित्रपटातील गाणे, या दृष्टीने विचार करीत असल्याने, त्या ओळी इथे गैरलागू ठरतात.  
अनवट ढंगाची चाल, अप्रतिम शब्दकळा आणि असामान्य गायकी, हीच या गाण्याची नेमकी वैशिष्ट्ये सांगता येतील. अर्थात असे सगळे एकत्रित असून देखील, हे गाणे विस्मरणात जावे, याची कसलीच संगती लागत नाही!!


No comments:

Post a Comment