Monday 24 August 2020

हेमराज वाडी - भाग ८

१९७३ च्या अखेरीस म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात कधीतरी आमच्या घरी Televista कंपनीचा टीव्ही आला. आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास, It's BREAKING NEWS. त्यावेळी घरात स्वतंत्र फोन असणे किंवा फ्रीज तसेच नव्याने आलेला टीव्ही असणे, या सगळ्या चैनीच्या गोष्टी होत्या. त्यावेळी टीव्हीवर फक्त दूरदर्शनची २,३ चॅनेल्स होती. चॅनेल बदलून बघणे हा आश्चर्याचा भाग होता आणि त्यासाठी आपल्या हातात रिमोट ठेवणे म्हणजे जडजवाहीर बाळगण्यासारखे होते. अर्थात आमच्या घरी टीव्ही आला म्हणजे आमच्या ग्रुपचे आमच्या घरात वावरणे वाढायला लागले. त्याकाळी मनोरंजनाची साधने बरीच मर्यादित असत त्यामुळे टीव्हीवरील कार्यक्रम बघणे हा आनंदाचा भाग होता, विशेषतः संध्याकाळी ७ नंतर दूरदर्शन झाले म्हणजे आमही सगळे टीव्हीला चिकटून बसत असू. तशात नुकताच "छायागीत" हा हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम सुरु झाला - मला आठवते त्याप्रमाणे "छायागीत" कार्यक्रम दर गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास लागायचा. आमचा गृप सगळी जेवणे आटोपून आमच्या घरी, अगदी भक्तिभावाने येत असत. आज कुठल्या चित्रपटाची गाणी लावणार, याचे प्रचंड औत्सुक्य असायचे. तशात १९७४ च्या मार्च किंवा एप्रिलमध्ये टीव्हीवर भारत/इंग्लंड क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवायची घोषणा झाली. टीव्हीवर क्रिकेट सामन्याचे चित्रीकरण होणार आणि आपल्याला सामन्यातील प्रत्येक बॉल बघायला मिळणार - It was mega event. त्याकाळी माझ्या घरी टीव्ही आहे, हीच बातमी आमच्या शाळेत तसेच गिरगावात नवलाची होती. टीव्हीवर सामन्याचे चित्रीकरण होणार म्हणून शाळेने नेहमीची वेळ बदलून घेतली आणि पुन्हा पहाटेचे वर्ग ठेवले. सकाळी ९ च्या सुमारास शाळा सुटली की आम्ही सगळे तडक घराच्या वाटेवर!! पहिला दिवस तसा ठीक ठाक गेला म्हणजे घरात आमचे मित्र आणि काही नातेवाईक वगळता फारसे कुणी आले नव्हते परंतु दुसऱ्या दिवशीपासून गिरगावातील अनेकजण - "मी अनिलचा मित्र आहे","मी राजुच्या वर्गातील मित्र" असे सांगून घरात प्रवेश करायला लागला. एक वेळ अशी आली, महालाच आमच्याच घरात बसायला जागा नव्हती!! मग मात्र माझे वडील - नाना जरा ताणात आले आणि घराच्या दरवाजातच बसायला लागले. कुणी आमची ओळख दाखवायला लागला की नाना मला किंवा राजू किंवा मोहनला हाक मारीत आणि तिथेच ओळख पटवून घेत अन्यथा त्याला पुन्हा बाहेरचा रस्ता दाखवीत. सलग ५ दिवस घरात सामन्याचा ज्वर पसरला होता. आमच्या गृपमधील त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील येत असत. अर्थात त्यांना माझे आई-नाना ओळखत असल्याने काही प्रश्नच नव्हता. मला आठवत आहे, त्यावेळी प्रथमच सुरेशची ताई आमच्या घरी मॅच पाहायला आली होतो तसेच मुळावकर नाना आले होते. आमचे सगळ्यांचे एकमेकांच्या घरात कायमच येणे-जाणे असायचे आणि इथे काहीच वाटत नसे. मी दिवस कधीही मोघे किंवा मुळावकर, यांच्या घरात जात असे आणि त्यांना देखील माझे येणे ही सवयीची बाब झाली होती. हा आमचा गृप तर बरेचवेळा आमच्या घरी येत असे. एक आठवण. त्यावेळी मला आईने टेबल टेनिसच्या दोन रॅकेट्स आणून दिल्या होत्या, अगदी त्याकाळच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा सॅन्डविच रबराच्या. अर्थात टेबल टेनिसचे बॉल येणे क्रमप्राप्तच असायचे. त्यावेळी टेबल म्हणून आम्ही घरातील जेवणाचे टेबल वापरात असू. त्यावेळी नेट म्हणून टेबलाच्या मध्यभागाच्या टोकाशी २ वाट्या ठेवायच्या आणि त्याच्यावर कपडे वाळत घालायची काठी ठेवायची म्हणजे आमचे नेट तयार झाले. असे टेबल टेनिस मी आणि विशेषतः सुरेश, आमच्या घरी तासंतास खेळत असायचो. माझी आई तेंव्हा पोलीस खात्यात नोकरी करायची आणि नाना दिवसभर त्यांच्या कामात गर्क असायचे तेंव्हा घरात फक्त आमचेच राज्य असायचे. अर्थात हेमराज वाडीतील E ब्लॉकची गच्ची म्हणजे आमचे साम्राज्य होते. आज कळते, या गच्चीच्या आमचे भावविश्व संपूर्णपणे व्यापून टाकले होते. अक्षरशः दिवसभर आम्ही या गच्चीत निव्वळ हुंदडत असायचो. पावसाळा आला की क्रिकेटवर थोडी बंधने यायची आणि मग पावसाळी खेळ सुरु व्हायचे - त्यातलाच एक खेळ म्हणजे "कित्ती कित्ती"!! अगदी साधा खेळ होता. ग्रुपचे २ संघ बनवायचे आणि टॉस करायचा. जो संघ टॉस हरायचा, त्या संघातील सदस्य कमरेत वाकून एकमेकांना धरून गच्चीच्या भिंतीच्या सहाय्याने ओणवे होत असेआणि दुसरा संघ थोडा धावत येऊन त्यांच्या पाठीवर उद्या घेत असे. जे ओणवे असत त्यांच्या पाठी सणसणीत सडकून निघत. त्यातून राजू आणि मोहन पहिल्यापासून जरा "वजनदार" प्रकृतीचे असल्याने त्यांची उडी म्हणजे मनातून एकदम आय - माय निघायची!! अशा प्रकारे खालच्यांच्या अंगावर मांड ठोकली की मग वरील सदस्यांतील कप्तानाने, हाताची बोटे कधी दोन,दोन किंवा कधीकहदी तीन,तीन बोटे उभारायची आणि विचारायचे "कित्ती कित्ती". खालच्यांनी ओळखले तर मग परत विरद्ध संघावर असेच ओणवे राहायला लागायचे. आता यात एक गंमत अशी होती, ओणवे राहिलेल्यांनी बरोबर ओळखले की नाही याचा पडताळा कसा घ्यायचा म्हणून एकाला "पंच" म्हणून नियुक्त करायचे!! यात आणखी एक मखलाशी असायची. आमच्यातील बहुतेकांची शरीरयष्टी हे तशी यथातथाच असायची त्यामुळे अंगावरील वजन पेलणे, ही खरी परीक्षा असायची आणि तिथे कधी कधी मनाचा तोल डळमळीत व्हायचा आणि ओणवे झालेले खाली पडायचे - परिणामी त्यांनी पुन्हा ओणवे राहायचे. अशा वेळी जे अंगावर उद्या मारतील ते, ओणवे झालेल्यांमधील काहीसे हडकुळे शरीर ध्यानात ठेऊन, त्याच्या पाठीवर राजू किंवा मोहनला उडी मारायला सांगायची!! त्यांची उडी अंगावर पडली की झेलणारा अक्षरश: शिवराळ भाषा वापरायचा (शिवराळ भाषा वापरणे यात काही गैर आहे असे गिरगावातील कुणाही व्यक्तीला वाटायचे नाही. ती आमची मौखिक "संस्कृती" होती/आहे) काही काही वेळेस पाठ अशी शेकून निघायची की आपले सगळे पितर आठवायचे. त्यातून पाऊस असला म्हणजे अंगावरील कपडे ओले असायचे आणि त्या ओल्या कपड्यांवर असली "ओझी" सांभाळायची म्हणजे एक दिव्य असायचे.

No comments:

Post a Comment