Tuesday 4 August 2020

रहें ना रहे हम


Anil Govilkar govilkaranil@gmail.com

6:42 PM (0 minutes ago)
to AvinashMahendra
"वाट पाहता पाहता, वाटा नसाच जाहल्या;
प्राण वाटांनी खेचत, तुटे जाईतो ताणला. 
वाट पाहता पाहता,पुन्हा जन्म हा ओसरे 
वाट पाहता, शिणले-----,पुन्हा मागे मन उरे."
प्रसिद्ध कवी शंकर वैद्य यांच्या "कालस्वर" या कविता संग्रहातील एका कवितेच्या या ओळी आहेत. शंकर वैद्यांनी  एकूणच कविता सांख्यिकी अंगाने कमीच लिहिल्या आहेत परंतु  "कालस्वर" मधील प्रत्येक कविता प्रत्ययकारी आहे. आता या वरील ओळी उघडपणे प्रणयविरहाच्या अनुषंगाने लिहिल्या आहेत आणि याच दृष्टीने आपल्याला आजचे गीत आस्वादायचे आहे. "रहें ना रहे हम" वरकरणी ऐकताना रम्य प्रणयगीत ऐकतो आहोत असेच वाटते परंतु शायरीचा "अंदाज" घेतल्यावर मनात फक्त प्रणय भावना उरत नसून आर्त विरहाची भावना उरते, जी कधीही नेमकेपणाने व्यक्त करता येत नाही!!
शायर मजरुह सुलतानपुरी यांची जरी सगळी कारकीर्द चित्रपटात गेली असली तरी चित्रपटीय गीतांना आवश्यक तो दर्जा देण्यात त्यांनी कधीही कुचराई केली नाही, किंबहुना चित्रपटसृष्टीत "मागणी तसा पुरवठा" या तत्वावर गाणी लिहून द्यायला लागतात आणि प्रचंड सातत्य राखण्याच्या हौसेपायी काहीवेळा टुकार शायरी लिहिली जाते. समीक्षण करताना कधीकधी अशीच बेचव कविता ध्यानात ठेऊन विश्लेषण केले जाते आणि नावे ठेवली जातात. परंतु या सगळ्याला सणसणीत अपवाद अशी दोन(च) नावे समोर येतात. १) साहिर लुधियान्वी आणि २) मजरुह सुलतानपुरी. अगदी उर्दू मिश्रित शायरी करताना किंवा अगदीच बेचव प्रसंगांना गाणी लिहिताना, उठेंतरी एखादी ओळ यांच्या दर्जाची साक्ष देण्यास पुरेशी असते. आता आजच्या या कवितेत तर बऱ्याच ठिकाणी उर्दू भाषिक शब्द वाचायला मिळतात. कवींची खासियत अशी आहे, त्या शब्दाच्या आधी किंवा नंतर, सहज सोपे शब्द उपयोजून त्या उर्दू शब्दांचा अर्थ ध्वनित होण्यास मदत होते. "खिजा हो या बहारें" किंवा "रंग बनके रहेंगे खिरामाँ" या ओळी समजण्यास काहीही अडचण येत नाही. जरा बारकाईने बघितले तर कवितेचे वृत्त तसे सलग नाही. म्हणजे पहिल्या ओळीत ६ शब्द तर दुसऱ्या ओळीत ८ शब्द आहेत आणि पुढे अंतरे लिहिताना पहिल्या दोन्ही ओळीत साधारणपणे ११ किंवा १२ शब्दांची ओळ लिहिली आहे पण शेवटची ओळ मात्र मुखड्याच्या पहिल्या ओळीशी समांतर शब्दसंख्या ठेवली आहे. याचा परिणाम असा झाला, चालीतील हरकती, आवर्तने यामध्ये एकप्रकारचा गोडवा आणला गेला आहे. अर्थात याचे श्रेय संगीतकार रोशन यांच्याकडे जाते. शब्दातील लय ओळखून त्यानुरूप स्वरिक लयीला वळवून घ्यायचे, या साठी मुळात संगीतकाराला शायरीच्या अभ्यास असणे जरुरीचे असते. 
संगीतकार रोशन यांनी या गाण्यासाठी जरी "पहाडी" रंगाचा उपयोग केला असला तरी एकूणच ढाचा वेगळाच वापरला आहे. या गाण्याची मोहिनी आजही बऱ्याच संगीतकारांना पडली आहे आणि या गाण्याच्या चालीवर आधारित त्यांनी आपल्या स्वररचना बेतल्या आहेत. अर्थात अपवाद वगळता कुणी श्रेय दिल्याचे वाचनात आलेले नाही!! गाणे जरी आनंदी आणि प्रणयी थाटाचे असले तरी चालीत सुंदर असा लयबंध आहे जो या गाण्याला वेगळेच स्वरूप प्रदान करतो. गाण्याच्या सुरवातीचा वाद्यमेळ "जलतरंग" आणि "व्हायोलिन" या वाद्यांच्या दुपदरी स्वररचनेने सुरु होतो. "दुपदरी" अशा साठी की सुरवातीला  जरी जलतरंग वाजत असला तरी काही क्षणात त्याला जोडून व्हायोलिनचे सूर ऐकायला मिळतात परंतु व्हायोलिनच्या सुरांच्या मागे जलतरंग आपले अस्तित्व दाखवतच असतो. वास्तविक जलतरंग हे तंतुवाद्य आणि एकूणच वाद्याचा "स्वभाव" बघता, भारतीय संगीतातील सगळे स्वरालंकार घेणे अशक्य तरीही संगीतकाराने या आघाती वाद्याची रचनाच अशी केली आहे जिथे गाण्याची लय अमुर्तपणे आपल्या समोर येते. अंतरे मात्र समान बांधणीचे आहेत, थोडाफार स्वरांचा चढ-उतार आहे इतकेच. थोडे तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, मुखडा "प ध म" या सुरांनी सुरु होतो. तर पहिला अंतरा "म (कोमल) रे" या दोन स्वरांवर सुरु होतो. कुठल्याही ललित सांगीताच्या सांगीतिक आकृतिबंधात रागाचे नियम तसेच्या तसे वापरले जात नाहीत कारण शब्दांमधील भावनेचे प्रकटीकरण महत्वाचे मानले जाते. मुळात रोशन हे तंतूवाद्याचे वादक (दिलरुबा वादनात त्यांनी प्राविण्य मिळवले होते) त्यामुळे त्यांच्या स्वररचनेत नेहमीच तंतुवाद्यांचा प्रभाव अधिक राहिला. या गाण्यातील वाद्यमेळ बारकाईने ऐकल्यास या विधानाचे प्रत्यंतर यावे. चाल बांधताना नेहमी "हात राखून" चाल बांधण्याकडे त्यांचा कल होता. प्रस्तुत गाणे ऐकताना ही ओळ "यूं ही झुमते और खिलते रहेंगे,बनके कली....."  सुरवातीला वरच्या सुरांत जाते परंतु ओळीचा शेवट करताना पुन्हा मूळ स्वरांच्या जवळ येते. हे तर या संगीतकाराचे व्यवछेदक लक्षण मानावे लागेल. बाकीचे अंतरे देखील याच धर्तीवर संपतात त्यामुळे गाण्यातील ऋजू भाव सर्वत्र दरवळत राहतो. 
आता लताबाईंची गायकी!! संगीतकाराने निर्माण केलेल्या स्वररचनेतील नेमके स्वरसौंदर्य तसेच त्यातील लपलेल्या सांगीतिक जागा हुडकून,आपल्या गळ्यातून अचूकपणे,प्रसंगी स्वतःची भर टाकून विस्तार करण्याची असामान्य क्षमता असलेल्या गायिका. लताबाईंची याबाबतीतील कौशल्य निव्वळ अजोड असेच म्हणावे लागेल. स्पष्ट आणि अचूक शब्दोच्चार हा आणखी एक गायकीचा खास विशेष. विशेषतः उर्दू भाषेतील अवघड शब्द लीलया (हे महत्वाचे!!) उच्चारणे आणि कवीच्या शाब्दिक आशयाला अधिक खोल दृष्टी देणे, याचा त्यांनी असामान्य आदिनमुना पेश केला. या गाण्याच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, मुखड्यातील दुसऱ्या ओळीच्या शेवटाला "बाग-ए-वफा" म्हणताना "बागे वफा" न म्हणता, शायरीत जसे मांडले आहे तसेच गळ्यातून काढले आहे. शब्दांप्रती निष्ठा ही अशीच दिसून येते. लताबाईंच्या गायकीचे आणखी महत्वाचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, त्यांच्या हरकती किंवा दीर्घ ताना देखील, बरेचवेळा "अर्ध तान" घेऊन गायल्या जातात मग त्यासाठी रंगाचा नियम तुटला तरी त्यांची हरकत नसते. अशा प्रकारच्या "अर्ध ताना" कशा घ्याव्यात जेणेकरून शब्दांचे औचित्य सांभाळले जाते आणि संगीतकाराचा सांगीतिक आशय देखील पूर्ण होतो. हे गायन इथे बौद्धिक ठरते आणि बहुतेक गायकांना हे जमतेच असे नाही. गायनात "पूर्ण सप्तकी तान" सहजपणे घेणे हे वैशिष्ट्य मानले जाते परंतु लताबाई तसे गायन करत नाहीत आणि तरीही लय कुठेही तुटत नाही की आशय कुठेही गढूळ होत नाही, किंबहुना गाण्याचे सौंदर्य नेहमीच वाढते. ही सांगीतिक दृष्टी असामान्य आहे. पहिल्या अंतऱ्याची शेवटची ओळ दुसऱ्यांदा गायला घेताना "झुमते" शब्द संपताना जो "धैवत" लावला आहे तो ऐकण्यासारखा आहे. वास्तविक चाल वरच्या सुरांत चाललेली असतानाच असा "धैवत" लावून चाल आणखी वरच्या सुरांत जाण्यापासून रोखली आहे. हे जे सांगीतिक कौशल्य आहे, तिथेच संगीतकार रोशन आणि गायिका लताबाई यांची खासियत पटते. हा एकच क्षण आहे पण तो क्षण हेरून त्याला वेगळे रूप दिले आहे. आपली चाल अवाक करणारी नसून मनात रुंजी घालणारी असावी, हाच तो संगीतकाराचा आग्रह यामधून दिसतो आणि ती आग्रह लताबाईंनी किती विनासायास आणि अचूक पूर्णत्वाला नेला आहे. हाच सांगीतिक वाक्यांश नंतरचे दोन्ही अंतरे संपवताना आपल्या कानी पडतो. ललित संगीताची यापेक्षा अधिक वेगळी फलश्रुती अपेक्षित नसते. 


रहें ना रहे हम महका करेंगे 
बनके कली, बनके सबा,बाग-ए-वफा में 

मौसम कोई हो इस चमन में रंग बनके रहेंगे हम खिरामाँ 
चाहत की खुशबू यूं ही जुल्फो से उडेगी, खिजा हो या बहारें 
यूं ही झुमते और खिलते रहेंगे,बनके कली..... 

खोये हम ऐसे,क्या हैं मिलना,क्या बिछडना नहीं हैं याद हमको 
कूंचे में दिल के जबसे आये सिर्फ दिल की जमीं हैं याद हमको 
इसी सरजमी पे हम तो रहेंगे, बनके कली..... 

जब हम ना होंगे,जब हमारी खाक पे तुम रुकोगे चलते चलते 
अश्को से भिगी चाँदनी में एक सदा सी सुनोगे चलते चलते
वहीं पे कहीं हम तुमसे मिलेंगे, बनके कली..... 


1 comment:

  1. आम्ही असे पहिले आहे कि अनेकजण ब्लॉग सुरु करतात. परंतु नियमित लिहिणे शक्य होत नसल्यामुळे काही कालावधीनंतर ब्लॉग लिहिणे बंद होते. त्यामुळेच आम्ही webster developer ने 'आम्ही साहित्यिक, आम्ही कलावंत' हे वेब पोर्टल सुरु केले आहे आहे. पूर्णतः भारतीय बनावटीच्या या तुम्ही तुमचे अकाउंट ओपन करू शकता, तुमचे विचार मांडू शकता. कविता, राजकीय विचार लिहू शकता. इतकेच नव्हे आर्ट मॉलच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रकाशित पुस्तके, चित्रे व अन्य कलाकृती विकू शकता.

    ReplyDelete