Wednesday 26 August 2020

जिंदगी देनेवाले सुन

Avinash, Mahendra गुणवत्ता आणि परिणामकारकता यांचे स्थान अढळ रहावे याकरिता भाषिक श्रव्याच्या शक्ती गद्य,पद्य,पाठ आणि गीत या मार्गांचा अवलंब केला जातो. माहिती, विचार, कल्पना,भावना संज्ञापनासाठी निवेदन,भाषण,कथन आणि गायनशैली वापरल्या जातात. तसे पाहता त्यांना शैली न म्हणता कोटी म्हटले पाहिजे. कारण अनुभूतीच्या भाषिक संघटनांचे आणि आविष्कारांचे हेच खरे मूलभूत साचे आहेत. गीत आविष्काराचे हे एक मूलभूत तत्व मानता येऊ शकते. याचाच पुढील विचार म्हणजे सुरावट,लयबंध भाषेबरोबर हातमिळवणी किंवा हालचालींसह यांचे निर्देश संगीताशय म्हणून केले पाहिजेत. हिंदी चित्रपट संगीताकडे गांभीर्याने बघणे अभ्यासकांना जमले नाही किंवा त्यांनी उत्साह दाखवला नाही याचे आणखी एक कारण बघणे योग्य ठरेल. इथे आणखी एक मुद्दा विचारार्थ घ्यावा लागेल. हिंदी चित्रपट संगीताच्या स्वरूपातील काही अंगभूत गुणधर्मामुळे त्यास बाजूला ठेवले जात आहे का? विविधता, लोकप्रियता इत्यादी कारणांखेरीज हिंदी चित्रपट संगीताचा विचार इतक्या कसोशीने करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सांगीत कल्पनांच्या अभिसरणातील त्यांची भूमिका. इथे दोन विचार गृहीत धरावे लागतील. या संगीतामुळे पसंत वा मान्य ध्वनी, आवाज, सादरीकरणाच्या लयी तसेच संगीताची योजना करण्याचे प्रसंग यांविषयी सार्वत्रिक प्रथा रूढ होऊ लागल्या आहेत. अर्थात हा भाग दोषी नाही पण याला दुसरी बाजू अशी आहे, अत्यंत बहुविध आणि पुष्कळ बाबतींत विचक्षण नसलेल्या श्रोते-प्रेक्षकांमुळे हिंदी चित्रपट संगीताचे स्वरूप ठरत असल्याने काही समान सांगीत बाबींचे व त्याच्या प्रभावांचे सर्वत्र वितरण होणे हा खरे निकृष्टाचा प्रसार अभावितपणे होतो. हा मुद्दा देखील विचारात घेणे जरुरीचे आहे. आणि याच विचारांतून आपण आजच्या " जिंदगी देनेवाले सुन" या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. शायर शकील बदायुनी याचे, उर्दू शायरीत फार मानाने नाव घेतले जाते. त्याच्या काही रचना चित्रपटाव्यतिरिक्त अतिशय लोकप्रिय झाल्या आहेत.अर्थात चित्रपट गीतांमुळे त्यांचे नाव लोकप्रिय झाले कारण गैरफिल्मी गाणी म्हटली की लगेच आविष्काराचे स्वरूपच बदलते आणि अधिक करून शब्दाधिष्ठित स्वररचना (याचाच दुसरा अर्थ वाद्यमेळाची चैन न परवडणे) हेच अंग मान्य होते अर्थात त्यामागे अर्थकारण हा मुद्दा महत्वाचा ठरतो. प्रस्तुत गाण्याची शब्दरचना ही पारंपरिक गीतलेखनाप्रमाणे आहे. प्रत्येक अंतरा लिहिताना साधारणपणे ४ ओळींचा असावा जेणेकरून संगीतकाराला चाल बांधण्यासाठी बराच वाव मिळावा. गझल वृत्तात एकूणच शब्दसंख्या मर्यादित आणि हाताशी फक्त २ ओळी असतात आणि त्यात पुन्हा वृत्ताचे स्वतःचे असे वेगळे निकष असतात, हा भाग वेगळा. गीत म्हटले के एकाच कल्पना अनेक प्रकारे फुलवता येते, प्रसंगी निरनिराळ्या प्रतिमा संयोजन करायला वाव मिळतो. आता इथे नायकाची, ईश्वराकडे व्यक्त केलेली व्याकुळ मन:स्थिती आहे तेंव्हा त्याच भावनेचे प्रकटीकरण, हीच साध्य आहे. तेंव्हा याच भावनेला केंद्रित करून मग "रात कटती नहीं" , "जख्म ऐसा दिया", "आंख वीरान हैं" या आणि अशा अनेक ओळींतून मुखड्यातील मध्यवर्ती कल्पना अधिक खोलवर आणि स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. जरा बारकाईने वाचले तर अंतऱ्यांमधील अक्षरसंख्या समान नाही परंतु चाल बांधताना आणि त्याचे गायन करताना कुठेही विक्षेप येत नाही. संगीतकार गुलाम मोहम्मद यांची स्वररचना आहे. या संगीतकाराची बहुतेक कारकीर्द ही नौशाद या संगीतकाराचा सहाय्यक या भूमिकेत गेली (१९७० च्या दशकातील "पाकिझा" चित्रपट येईपर्यंत गुलाम मोहम्मद यांना फारशी लोकप्रियता लाभली नाही!!) असे असून देखील जेंव्हा केंव्हा त्यांना स्वतंत्रपणे संगीत द्यायची संधी लाभली तेंव्हा त्यांनी आपला दर्जा दाखवून दिला. चाल "भूपाली" (भूप) रागावर आधारित आहे. या रागात मराठीमध्ये भरपूर भूपाळी रचना झाल्यामुळे हा राग सकाळचा आहे असे बऱ्याचजणांना वाटते परंतु शास्त्रानुसार या रागाचा समय सायंकालीन आहे!! "मध्यम" आणि "निषाद" स्वरांना वर्जित ठेवणारा जरी "औडव/ औडव" असला तरी या रागातील प्रत्येक स्वराला, स्वरविस्तार करायला प्रचंड वाव आहे आणि बहुदा म्हणूनच हा राग ललित संगीतात मानाचे स्थान पटकावून आहे. मुखड्याची ओळ "जिंदगी देनेवाले सून" ऐकताना मध्येच किंचित "निषाद" ऐकायला मिळतो परंतु या ओळीवर "धैवत" आणि "रिषभ" या स्वरांचेच प्राबल्य आहे. ललित संगीतात रागाचे Blending केले जाते ते असे. अर्थात आपण हा तांत्रिक भाग इथेच सोडून देऊया. यामध्ये महत्वाचा मुद्दा असा येतो, आपण या रागचौकटी कटाक्षाने व शास्त्रोक्त राग म्हणून वापरतो असा अट्टाहास त्यांच्या चालीत जाणवत नाही. गीत बांधताना कुठेही शब्दांची ओढाताण झाली किंवा चाल मागे-पुढे झाली असे अजिबात भासत नाही. गीतकाराच्या नजरेतून बघायचे झाल्यास, हा स्वप्नसाध्य योग्य म्हणायचा!! या गीताचा आरंभ होतो, तो पाश्चात्य तंतुवाद्यावर स्वरावली (कॉर्ड्स) छेदून आणि गीत सुरु होईपर्यंत याचे चलन भूप रागाचे आहे याचा अंदाज लागत नाही. तरीही संगीतकाराने गीताचे चलन असे ठेवले आहे , की एकाच वेळी आपण रागात असतो पण आणि नसतो देखील!! या रंगाचे शास्त्रोक्त ज्ञान नसलेल्या श्रोत्यासही गीताचे बदलते भावरंग जाणवतात कारण हा राग भारतीय सांगीत संस्कृतीत फार खोलवर रुजलेला आहे. एकूणच कारकिर्दीकडे बारकाईने बघितल्यास, नबाबी मुस्लिम समाज हा भारतीय संस्कृतीचा एक थर अभिजात, नांगर पण दुबळा आणि ऱ्हासाकडे झेपावणारा,त्याचबरोबर संपन्नतेने जगण्याचा आणि आत्मघात करणारा. याच संस्कृतीला गुलाम मोहम्मद यांनी तुला आणि बोलका प्रतिसाद दिला आणि ही कामगिरी निश्चितच महत्वाची ठरते. हे गीत गाईपर्यन्त गायक तलत मेहमूद याचा कंपायमान आवाज रसिकमान्य झाला होता. गीतातील संथपणा आणि शांतवृत्ती अधिक स्पष्ट आणि भावपूर्ण करण्यासाठी हाच कंपायमान सूर आवश्यक होता. आवाज भावनाकुल आहे पण भावविवश अजिबात नाही, ही या गायकाची खासियत होती. मुळात लखनवी संस्कार अंगी बाणल्यामुळे असेल पण गाताना, आपल्या हातातील काव्य हे किमान दर्जाचे असावे, हीच अभिलाषा या गायकाने कायम राखली. "जख्म ऐसा दिया के दिल भरता नहीं" या ओळीतील पहिलेच जोडाक्षर या दृष्टीने ऐकण्यासारखे आहे. विव्हळता आहे पण विसविशीतपणा नाही. शब्दातील आशय अचूक प्रकट केला आहे. किंवा शेवटच्या अंतऱ्यामधील "जिंदा रख्खा मगर जिंदगी छीन ली" या ओळीतील "रख्खा" सारखा अवघड आणि वजनदार शब्द किती मृदूपणे गायला गेला आहे. उर्दू भाषेत एकूणच शब्दोच्चार करताना शक्यतो व्यंजने सुद्धा "स्वरांकित" करताना हळुवार करतात. आता थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, तत्कालीन पुरुष गायकांपेक्षा त्यांची लोकप्रियता कमी होती का? तर निश्चितच होती असे म्हणावे लागेल. अर्थात प्रत्यक्ष गायकाचे म्हणणे असे आहे, "जरी एकूण गायलेली गीते संख्येने कमी असली तरी टी बहुतेक सगळी उच्च दर्जाची म्हणून लोकांच्या स्मरणात आहेत. हेच प्रमाण इतर गायकांनी गायलेल्या गीतांबाबत जेमतेम २५% पडेल!! अर्थात या विधानावर पुरेसा अभ्यास व्हायला हवा. परंतु बदललेल्या अभिनयशैलीशी त्यांचे गायन आणि आवाज जुळण्यासारखे नव्हते. आपण जी कोणती गीते गायची त्यांच्या संहितेबद्दल ते फार चोखंदळ होते आणि ही बाब मी वर उल्लेख केलेल्या लखनौचा वारसा म्हटल्यावर गृहीत धरावेच लागेल. याचा परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवर घडणे क्रमप्राप्तच ठरते. जिंदगी देनेवाले सुन 'तेरी दुनिया से दिल भर गया मैं यहा जीते जी मर गया रात कटती नहीं दिन गुजरता नहीं जख्म ऐसा दिया के दिल भरता नहीं आंख वीरान हैं, दिल परेशान हैं गम का सामान हैं जैसे जादू कोई कर गया बेखता तुने मुझसे ख़ुशी छीन ली जिंदा रख्खा मगर जिंदगी छीन ली कर दिया दिल का खून, चूप कहां तकी रहूं साफ क्यूँ ना कहूं तू ख़ुशी से मेरी डर गया https://www.youtube.com/watch?v=W41jIwH4k9g

No comments:

Post a Comment