Friday 10 April 2020

गगन सदन तेजोमय

चित्रपटातील गाणे म्हटले की साधारणपणे गाण्यात भरपूर वाद्यमेळ असणे तसेच अप्रतिम लोकेशन्स असणे इत्यादी बाबी येतात. अर्थात पूर्वीचे मराठी चित्रपट बहुतांशी अपवाद म्हणता येतील. साधारणपणे १९८० च्या सुमारास मराठी चित्रपट बदलायला सुरवात झाली अर्थात आजचा मराठी चित्रपट आणि आता ४० वर्षांपूर्वीचा मराठी चित्रपट यात तफावत ही राहणारच. परंतु आशयघन चित्रपटाला हळूहळू सुरवात झाली आणि विशेषतः तमाशाप्रधान चित्रपट मागे पडायला लागले होते. परिणामस्वरूप गाणी आणि त्यांचे सादरीकरण यात फरक पडणे क्रमप्राप्तच होते. याच सुमारास "उंबरठा" चित्रपट आला. एकूण कथावस्तू बघता चित्रपट ठीक होता परंतु चित्रपटातील गाणी मात्र खूप गाजली. आजचे गाणे ही एक सुंदर अशी प्रार्थना आहे . आता प्रार्थना म्हटल्यावर त्यात एक ठराविक विशेष असतो म्हणजे देव किंवा देवता असते. त्यांचे गुणवर्णन असते. या गाण्यात सूर्याचे वर्णन केले आहे. मराठीत सूर्याला काही वेळा "मित्र" असे संबोधले आहे. अर्थात कविता म्हणून वाचताना पहाट उलटून गेल्यावर परंतु उन्हाची तलखी सुरु होण्याआधीच थोडा काळ असतो, त्यावेळेची प्रार्थना आहे. 
ही कविता प्रसिद्ध कवी वसंत बापट यांनी लिहिलेली आहे. एकूणच कविताच घाट बघता पारंपरिक प्रतिमा वापरलेल्या आढळतात. असे असून देखील रचना कौशल्य असे आहे की  त्यात अंगभूत लय मिसळली आहे. आता प्रार्थना हेच कवितेचे स्वरूप ठरल्यावर आणि त्यातून "सूर्य" हीच मध्यवर्ती कल्पना नक्की झाल्यावर मग एकूणच कवितेचा ढाचा लक्षात यायला वेळ लागत नाही. "तिमिर हरून करुणाकर" किंवा "छाया तव माया तव" अशा ओळीतून सूर्यसुक्त समोर येते. खरतर पहिलीच ओळ "गगन सदन तेजोमय" वाचताना निसर्गाच्या विराटतेचा भाव मनात येतो. वास्तविक प्रार्थनेची वेळ ही तशी ठराविक असते. दिवस संपूर्णपणे सुरु व्हायचा असतो तसेच जगाची जगरहाटी सुरु व्हायला थोडा वेळ असतो. हा वेळ तास मर्यादित असतो परंतु याच वेळी काही मंगलकारक विचार आणणे आणि दिवसाची सुरवात करणे ही हिंदू संस्कृती आहे. मघाशी मी सूर्याला "मित्र" म्हटले ते याच विचारातून. 
संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना चाल लावण्यासाठी नेहमी एखादी सक्षम आणि आशयपूर्ण अशी कविता लागते आणि त्यासाठी त्यांचा शोध सारखा चालू असतो. अगदी चित्रपटासारखे सर्वत्र पसरणारे माध्यम घेतले तरी त्यांचा हाच आग्रह असतो. या गाण्याची चाल थोड्या बारकाईने ऐकली तर ध्यानात येईल, गाण्याची चाल ही त्याचन्ह्याचं वडिलांच्या - दीनानाथ मंगेशकरांच्या "वितरी प्रखर तेजोबल" या "संगीत रणधुंदुभी  या नाटकातील पदावर आधारित आहे. जवळपास तशीच चाल परंतु चित्रपट गायन आहे, हे ध्यानात ठेऊन काहीशी पातळ केली आहे. रंगभूमीवरील गायन म्हणजे ख्यालाचा छोटा आविष्कार असतो आणि तसा आविष्कार चित्रपटासाठी कधीही पूरक नसतो. त्यामुळे पंडित वझेबुवांची चाल वापरताना हृदयनाथ मंगेशकरांनी "गीतधर्मी" आकृतिबंध स्वीकारला आहे. तिलक कामोद रागावर आधारित स्वररचना आहे. चालीचा आकृतिबंध हाताशी असल्यावर, संगीतकार म्हणून काही ठराविक बाबीच सर्जनशीलतेसाठी उरतात. वाद्यमेळासाठी प्रामुख्याने व्हायोलिन वाद्याचा अधिकतर उपयोग केला आहे. तसे बघितले हृदयनाथ मंगेशकर शक्यतो मोजकीच वाद्ये वापरतात परंतु त्या वाद्याचा भाव पूर्णांशाने ओळखून त्याचा उपयोग केला जातो. गाण्याच्या सुरवातीला व्हायोलिनचे सूर तिलक कामोद रागाची ओळख करून देतात. अर्थात गाण्यावर "मंगेशकरी" ठसा उमटलेला आहे. मंगेशकरांच्या रचनेत कधीही "हरकत" हा अलंकार सुबोधपणे ऐकायला मिळत नाही. गायनातील हरकती या शक्यतो साध्या गळ्याला अवघड वाटाव्यात अशाच असतात. उदाहरणार्थ गाण्याचा शेवट करतानाची  तान आहे टी खरोखरच अतिशय कठीण आहे त्यातून ती तान, चाल मध्यसप्तकात सुरु असताना अचानक तार स्वरांत जाते. असे जे अचानक "वळण" असते, ते या संगीतकाराला अधिक प्रिय असावे. त्यांच्या इतर रचना ऐकताना हेच वैशिष्ट्य वारंवार ऐकायला मिळते.  
अशी लयीला अवघड असलेली चाल गायची म्हणजे अर्थात लताबाई असणे क्रमप्राप्त ठरते. मुळात अशा पवित्र, स्वच्छ आकाराच्या चाली या लताबाईंच्या गळ्याला नेहमीच शोभून दिसतात. तिलक कामोद रागात सगळे स्वर लागतात परंतु तरीही शुद्ध मध्यमाबरोबर तीव्र  मध्यम आवर्जून लागतो. पहिला अंतरा सुरवातीपासून तार सप्तकात सुरु होतो आणि पहिली संपूर्ण ओळ अशीच वरच्या सुरांत गायली जाते. हे अवघड आहे अशासाठी कारण गाण्याचा मुखडा खालच्या सुरांत चाललेला आहे. दुसरा अंतरा मात्र मुखड्याशी जुळवून घेतलेला आहे पण शेवटचा अंतरा परत पहिल्या अंतऱ्याशी जोडलेला आहे. त्यामुळे गाणे सतत हिंदकळत राहते. ऐकताना आपण अवाक होतो. ही गायन सामान्य गळ्यासाठी नाही ही खूणगाठ मनाशी बांधली जाते तरीही चाळीच्या अंगभूत गोडव्यामुळे हे गाणे अतिशय श्रवणीय होते. लताबाईंचे गायनाचा असे आहे, चालीतील वक्रता त्यांनी आपल्या गळ्याच्या गोडव्यातून खुबीने लपवल्या आहेत. हे गाणे इतके प्रसिद्ध होण्यामागे हा मुद्दा निश्चितच महत्वाचा आहे. 


गगन सदन तेजोमय 
तिमिर हरून करुणाकर, दे प्रकाश देई अभय 

छाया तव माया तव, हेच परम पुण्यधाम 
वाऱ्यातून ताऱ्यांतून वाचले तुझेच नाम 
जग जीवन जनन मरण 
हे तुझेच रूप सदय 

वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस 
मेघांच्या धारातून प्रेमरूप भासतोस 
कधी येशील चपलचरण 
वाहिले तुलाच हृदय 

भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे 
कंठातील स्वर मंजुळ भावमधुर गीत नवे 
सकलशरण मनमोहन 
सृजन तूच,तूच विलय 


No comments:

Post a Comment