Tuesday 28 April 2020

मन रे तू काहे ना धीर धरे

भारतात मौर्यकालीन राज्यव्यवस्था होती आणि त्यावेळी जरी देशात कपोलकल्पित सोन्याचा धूर वगैरे रम्य कल्पना प्रसूत होत असल्यातरी एकूणच देशात समृद्धता नक्कीच होती.मोगलपूर्व काळी खरेतर भारत स्वप्ननगरी होती. ठिकठिकाणी स्वतंत्र राज्ये होती,संस्थानिक आपले साम्राज्य सांभाळून होते. अगदी १८व्या शतकापर्यन्त भारतात "राजगायक" आणि "राजनर्तिका" अशी राजदरबारी सन्माननीय पदे अस्तित्वात होती आणि त्यांना समाजात सन्मान होता. अशाच मौर्यकालीन संस्थानातील प्रेमकहाणीवर आधारित "चित्रलेखा" या चित्रपटातील हे गाणे, आजचा लेख विषय आहे. राजपुत्र झाला तरी त्याला मानवी भावना वश असतातच आणि त्यातूनच प्रणयी भावना उदयाला येते आणि त्यात फार काही नावीन्य नाही. 
"मोकळें मोकळें चालतानाच,पुढचें वळण व्याकुळ करतें 
पहाडांतून सरकत सरक, सांवळा मेघ आडवा येतो
क्षणभर वेधून भान घेऊन, आला तसाच सरकून जातो. 
मनांत अमृत टाकून जातो, पावलांत झुळझुळ गारवा भरतो ."
सुप्रसिद्ध कवियत्री इंदिरा संत यांच्या "गर्भरेशीम" कवितासंग्रहातील एका कवितेतील या ओळी. "मन रे तू काहे ना धीर धरे" या गाण्यातील संत्रस्त व्याकुळता आहे ती "मोकळें मोकळें चालतानाच,पुढचें वळण व्याकुळ करतें" या ओळीच्या आशयाशी कुठेतरी आंतरिक नाते सांगते. एक निरीक्षण - या चित्रपटातील मौर्यकालीन वातावरण बघून सुप्रसिद्ध कवी साहिर लुधियान्वी यांनी आपल्या सगळ्या कवितेत फक्त आणि फक्त हिंदी शब्दांचाच वापर केला आहे आणि साहिर यांचा उर्दू भाषेचा व्यासंग बघता ही बाब निश्चितच प्रशंसनीय ठरते. साहिर प्रज्ञावंत कवी तर निश्चितच होते पण चित्रपटाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन केवळ भाषाच नव्हे तर आशय, घाट आणि रचना कौशल्य या दृष्टीने त्यांनी फार मोठी मजल मारली हे ध्यानात येऊ शकते. गाण्याची पार्श्वभूमी ही नायक अतिशय संत्रस्त आणि विमनस्क मनस्थिती आहे आणि त्या व्याकुळ परिस्थितीत उमटलेल्या भावना आहेत. अखेर राजपुत्र असल्याने त्याची मानसिक जडण-घडण ही राजस पद्धतीने झालेली असणार. अगदी शोक करायचा झाला तरी त्याला संयत आविष्काराची जोड लाभणारचआणि शोक हा अधोमुखीच रहाणार. या दृष्टीने कविता वाचावी. मनाचे सगळे खेळ कवितेत मांडले आहेत. आहे ते सगळे नश्वर आहे, त्याला कुठंतरी अंत आहे. त्यामुळे नश्वर गोष्टींबाबत आपण किती शोक करून घ्यायचा? या काहीशा तत्वज्ञानात्मक विचाराची कविता आहे. संपत्ती, सौंदर्य,नाती,उपभोग हे सगळे तात्पुरते आहे आणि याला सगळ्यांना काळाचे बंधन निश्चितच आहे. तेंव्हा या गोष्टीसाठी आपण त्यात किती गुंतून राहायचे? आणि असे गुंतून राहणे एका राजाला आवश्यक आहे का? असे अनेक प्रश्न ही कविता आपल्यासमोर उभे करते. सुंदर कवितेचे काही निकष असतात त्यातील एक, पुन्हा पुन्हा प्रश्न उभे करून आधी सापडलेल्या उत्तरांतील वैय्यर्थ्य जाणवून देणे हे होय. 
संगीतकार रोशन यांनी या गाण्याची चाल "यमन कल्याण" रागात बांधण्यात मोठे औचित्य दाखवले आहे. यमन कल्याण रागात एकतर सगळे स्वर लागतात आणि सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात (आरोही सप्तकात "पंचम" स्वर वर्ज्य असतो). एक निरीक्षण असे आहे - संध्याकाळचे राग हे बव्हंशी "तीव्र मध्यम" या स्वराला धरून भरणा करीत असतात आणि या पार्श्वभूमीवर यमन कल्याण रागाचे वेगळेपण मनात ठसते. रोशन यांच्या चालींचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्वररचना ही बहुतांशी खालच्या सप्तकात किंवा शुद्ध सप्तकात असते - कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी यात बदल केला. गाण्याची चाल जरी तार सुरांत जायची शक्यता निर्माण झाली तरी तिथेच स्वरांचे अवगाहन रोधून ठेवणे हे असते. हाच नियम वाद्यमेळाच्या बाबतीत दिसतो. संथ लय त्यांच्या प्रकृतीला मानवणारी होती. त्याचा परिणाम शब्दांना योग्य न्याय देणे होय. त्यांची गाणी जरा बारकाईने ऐकली तर असे ध्यानात येते, गाण्यातील कविता नेहमीच सक्षम असते. त्यांना उर्दू धाटणीचे बरेच चित्रपट मिळाले, हे एक कारण शकते. रागदारी संगीताचा  पायाभूत अभ्यास आणि दिलरुबा वाद्यावर प्रभुत्व, याचा परिणाम असा झाला या चालीत कुठेही विरही वेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते. याचा आणखी एक परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते. प्रस्तुत गाण्यातील सतार सारख्या तंतुवाद्याचे प्रक्षेपण ऐकण्यासारखे आहे. आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. म्हणजे गाताना, तुम्हाला इथे या गाण्यात देखील स्वरविस्ताराला भरपूर वाव आहे परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वरविस्तार रोधून ठेवला आहे. 
गायक म्हणून रफी यांची गायकी इथे संपूर्णपणे खुलली आहे. गाताना कुठेही "नाट्यात्म"लगाव ऐकायला मिळत नाही. वास्तविक या गाण्याच्या वेळेस, त्यांची "गायकी" प्रस्थापित झाली होती परंतु संगीतकार रोशन यांनी त्यांच्याकडून अत्यंत संयत गायकी काढून घेतली परिणामी हे गायन मनात चिरस्थायी होऊन बसते. रफींच्या कारकिर्दीत अशी फार तुरळक गाणी गायल्याचे आढळते परंतु बहुदा म्हणूनच अशी गायकी चालीला फार समृद्ध करून जाते आणि हे गाणे हिंदी चित्रपट संगीताच्या वाटचालीत अढळ स्थान प्राप्त करून घेते. 

मन रे तू काहे ना धीर धरे 
वो निर्मोही मोह ना जाने, जिनका मोह करे 

इस जीवन की चलती ढलती धूप को किसने बांधा 
रंग पे किसने पहरे डाले, रूप को किसने बांधा 
काहे ये जतन करे, मन रे.... 

उतना ही उपकार समझ कोई जितना साथ निभाये 
जनम-मरण का मेल है सपना, ये सपना बिसरा दे 
कोई न संग मरे, मन रे.... 


No comments:

Post a Comment