Sunday 5 April 2020

अबीर गुलाल उधळीत रंग

भारतीय संगीत हे प्रामुख्याने भक्तिपर संगीत आहे, हा विचार वारंवार मांडला जातो. परंतु जर का भारतीय संगीताची समग्र परंपरा विचारात घेतली तर हे विधान कितपत संय्युक्तिक आहे? हा प्रश्न पडू शकतो. याचे एक कारण असे संभवते ,भक्ती संगीत ही देखील संगीताची स्वतंत्र कोटी म्हणून अस्तित्वात आहे. दुसरे कारण असे देता येईल, सादर होत असलेल्या एकंदर संगीतांपैकी बरेचसे संगीत खरोखरच भक्तिपर आहे का? विशिष्ट संगीताविष्कार होत असताना कलाकाराची मनोवस्था भक्तिपर आहे किंवा होती म्हणून संगीत भक्तिपर ठरत नाही. साधारणपणे चौथ्या शतकात भक्तिमार्ग अस्तित्वात आला असे मानण्यात येते. आजची भक्तिरचना लक्षात घेता ही परंपरा ध्यानात ठेवणे योग्य ठरते. महाराष्ट्रात लोकसंगीताशी साद्ध्यर्म्य राखून वारकरी संगीताची वाढ झाली आणि त्यातूनच ओवी, विराणी, अभंग इत्यादी छंद अवतरत गेले. लोकधर्मी शाखा सुद्धा शास्त्रधर्मी शाखेप्रमाणेच ठराविक विषय,विधीपुर्वकतेचा शिडकावा,ऋतूसाहचर्य यांनी युक्त असते. अर्थात यात मानवी दैनंदिन जीवनाशी नाते राखण्याचे कार्य सुविहितपणे चालू राहिले. 
संत नामदेवांच्या प्रभावातून जे संत कवी पुढे आले त्यात संत चोखामेळा यांचे नाव फार वर घेता येते. अर्थात त्यावेळच्या समाजधारणेनुसार चोखामेळा बहिकृत झाले आणि त्याचेच रूप त्यांच्या अभंगात दिसून येते. तरीही संत नामदेवांच्या अभंगातून जितक्या निरलसपणे भक्तिमार्ग प्रकट त्यामानाने संत चोखामेळ्यांच्या रचनांतून होत नाही तरीही "या हृदयीचे त्या हृदयी" नेमकेपणी पोहोचते. काव्य म्हणून विचार केल्यास वरीलप्रमाणे अनुभव सातत्याने येतो. जातीबाहेर ढकलल्याने झालेला अपमान, खंत इत्यादी भावना या शब्दकळेतून निर्देशित होतात. संतकाव्यात एक विचार सतत बघायला मिळतो आणि तो म्हणजे समर्पणाची भावना. विठ्ठलाच्या पायी "स्व" ला समर्पित करणे, हा स्थायीभाव दिसतो. तो भाव वगळला तर काव्य म्हणून फार वरच्या दर्जाचे ठरत नाही. अभंग छंदात नेहमीच एक शाब्दिक लय अंतर्भूत असते. त्यामुळे प्रसंगी एखादा शब्द जरी आकळला नाही तरी आस्वादाच्या प्रक्रियेत फारसा अडथळा येत नाही. 
संगीतकार जितेंद्र अभिषेकी हे मुळातले रागदारी संगीताचे गायक आणि अभ्यासक. सुरवातीपासून "आग्रा" घराण्याची तालीम, पुढे "जयपुर" घराण्याची वैशिष्ट्ये आत्मसात केल्याने एकूणच गायकीचा परिसर विस्ताराला. असे असूनदेखील अभिषेकीबुवा प्रसिद्ध झाले ते संगीतकार म्हणून. मराठी रंगभूमीवरील संगीताचा अत्यंत डोळस अभ्यास करून त्यात आमूलाग्र मन्वंतर घडवणारे म्हणून त्यांचे नाव झाले. असे करताना त्यांनी कुठलाच संगीत प्रकार नाकारला नाही,अगदी पाश्चात्य संगीताशी देखील नाते जोडले. मुळात अभ्यासू वृत्ती असल्याने संगीतरचना करताना, कवीच्या आशयाला प्राधान्य देऊन त्यांनी नेहमी आपल्या स्वररचना आकारल्या. आजच्या या अभंग रचनेत देखील  याच दृष्टीचा प्रत्यय येतो. चाल भूप रागाच्या सावलीत सुरु होते पण पुढे शुद्ध कल्याण रागाचे स्वर देखील ऐकायला मिळतात. ताल नेहमीचाच भजनी ठेका आहे. मुळात गाण्याचा मुखदच इतका गोड आणि सहज लक्षात राहणार असल्याने पुढील रचना देखील मनाचा ठाव घेते. पहिल्या दोन्ही अंतऱ्याची चाल जवळपास तशीच ठेवली आहे परंतु शेवटचा अंतर घेताना चाल किंचित वरच्या सुरांत जाते. अभंग रचनेच्या बाबतीत एक निरीक्षण असे - भजनी ठेका रसिकांच्या लक्षात लगेच येतो आणि त्यानुरूप सहज लोकप्रिय होतो. त्यात फारसे प्रयोग आढळत नाहीत. याचा परिणाम असा होतो, अगदी सामान्य रसिक देखील आपले नाते रचनेशी सहज जोडून घेऊ शकतो. 
अभिषेकीबुवा मुळातले"" गायक होते. संगीतरचना करणे हा नंतरचा भाग झाला. शास्त्रोक्त गायक हे गाताना शब्दांचे महत्व ओळखून गाणारे फारच विरळा असतात. अभिषेकीबुवा गायन करताना शक्यतो शब्दांची मोडतोड तर करत नाहीच परंतु शब्द ज्या वजनाने काव्यात आलेला आहे, ते वजन गायनातून मांडतात. हा गुण तर फारसा शास्त्रोक्त गायकांच्या दिसत नाही आणि याचे कारण त्या गायकीच्या मूलतत्वात दडलेले आहे. अत्यंत स्पष्ट उच्चार तरीही आशयाशी शक्यतो तादात्म्य राखणे ही खास अभिषेकीबुवांची, गायक म्हणून वैशिष्ट्ये सांगता येतील. पहिल्याच अंतऱ्यात "उंबरठ्याशी" असा जोडाक्षरयुक्त शब्द आहे पण त्यातील काठिण्य सुरांतून नेमकेपणाने व्यक्त केले आहे. तसेच पुढे दुसरा अंतरा संपताना "नि:संग" हा शब्द याच दृष्टीने ऐकावा. "नि:संग" शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे आणि तो अर्थ अभिषेकीबुवांनी कुठेही डागाळू दिलेला नाही. शब्दप्रधान गायकीचे प्रमुख वैशिष्ट्य त्यांनी अचूक आत्मसात केल्याचे लक्षण म्हणता येईल. शेवटचा अंतरा गाताना चाल थोडी बदलते परंतु शब्दोच्चार तसेच ठळकपणे अवतरतात. 
आज इतकी वर्षे झाली तरीही हा अभंग रसिकांच्या ध्यानात राहिला आहे, ही अभिषेकीबुवांच्या व्यासंगाची असामान्य फलश्रुती म्हणता येईल. 


अबीर गुलाल उधळीत रंग 
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग 

उंबरठ्याशी कैसे शिवू? आम्ही जाती हीन 
रूप तुझे कैसे पाहू? त्यात आम्ही दीन 
पायरीशी होऊ दंग गाउनी अभंग 

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू 
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ 
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनि नि:संग 

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती 
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती 
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग 


No comments:

Post a Comment