Friday 10 April 2020

जा मैं तोसे नाही बोलू

संध्याकाळची सुगंधी रम्य वेळ. कोठीवर लाल जर्द जाजमे पसरलेली. सारंगीवाला आणि तबलजी आपली वाद्ये सुरांत लावून तयार तसेच नेहमीच्या मैफिलीतील रसिक मंडळी हजर. कोठीवर चंदनी धूप  पसरलेला. दिव्यांची लखलखती आरास मांडलेली अर्थात जमलेले सगळेच रसिक कसे असतील? आजूबाजूला आंबटशौकिनांची गर्दी देखील झालेली आणि प्रमुख नृत्यांगना मैफिलीत सामील होते. अंधाऱ्या रात्रीत अचानक वीज चमकावी तशी ती नृत्यांगना ठुमकत आपले सारे अस्तित्व त्या कोठील व्यापून घेते. अर्थात त्या नृत्यांगनेची ही काही पहिली वेळ नसल्याने जमलेल्या सगळ्यांच्या वखवखलेल्या नजरा झेलायची सवय होतीच. ती आली आणि कोठीवर दौलतजादा अदा झाला. 
"धूप उसासत होता कोनीं रजताच्या पात्री 
विचित्र रेशीमचित्रे होतीं रसावली गात्री 
तुझा पियानो यक्षजळातील होता निजलेला 
मनांत गुंफित स्पर्शसुखाच्या स्वप्नांचा झेला"
कविवर्य बा.भ.बोरकरांच्या अविस्मरणीय ओळींचे क्षणोक्षणी स्मरण व्हावे असे ते वातावरण होते. वातावरणात लगोलग सारंगीतून अडाणा रागाचे सूर येतात आणि झरकन लताबाईंचा अप्रतिम आवाज "जा मैं तोसे नाही बोलू" उमटतात. गाण्याची सुरवात अशा काही खटकेदार सुरांनी होते की ऐकणारा तिथेच थबकतो. लखनवी ठुमरीची याद यावी अशा नखऱ्यात त्या कोठीवर सूर उधळतात. गाण्याची बैठक त्या पहिल्या ओळीतच पक्की होते. गाण्याची पहिली ओळ मुद्दामून तीन,चार वेळा घेतली आहे पण तशी घेताना लय तशीच कायम ठेऊन वेगळे वळण घेतले आहे.तसेच आणखी एक वैशिष्ट्य असे आहे ते फारसे कुणाच्या लक्षात येत नाही ."जा" शब्द उच्चारताना त्या शब्दाला "अस्पर्शित" असा "हा" इतका हलक्या पद्धतीने मिसळला आहे की प्रथमक्षणी जाणवतच नाही.  ही करामत संगीतकार अनिल बिस्वास यांची. हीच ओळ परत घेताना "बोलू" शब्द तोडला आहे पण तो तोडताना त्यातील खटका लताबाईंनी निव्वळ अप्रतिम घेतलेला आहे. कोठीवरील गाणे आहे तेंव्हा गायनात नखरेलपणा आवश्यक तसेच रसिकांना आवाहन आणि संयत शृंगार उचित ठरतो. हे सगळे गुण अनिल बिस्वास यांनी पहिल्याच ओळीतून समर्पकपणे दर्शवले आहे. 
पुढील ओळ - "लाख जतन करले सजन, घुंघटा नहीं खोलू" ही ओळ देखील त्याच ठसक्यात आहे. कोठीवरील गाणे म्हटल्यावर सुरांत ठसका यायलाच हवा. गायकी ढंग मुखड्याच्या सुरावटीतून स्पष्ट होतो. चाल पहिल्यापासून द्रुत लयीत असल्याने ऐकणारा गाण्याशी सतत जुळवून घेतो. मुखड्याची पहिली ओळ अडाणा रागावर तर दुसरी ओळ बहार रागावर आहे.लय तशीच ठेऊन दुसऱ्या रागात प्रवेश केलेला आहे पण कुठेही संदर्भ तुटत नाही. इथेही पहिल्या ओळीप्रमाणे "खोलू" शब्द तोडला आहे पण लय अशी ठेवली की ते बिकट वळण फारच मोहक झाले आहे. 
अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ अजिबात नाही कारण त्याची फारशी गरजच भासत नाही. "अखियों में रैन गयी,गिन गिन तारे, हो तुम जाये बसे सौतन द्वारे" काव्याचे शब्द ब्रज भाषेला धरून लिहिले आहेत. एक गंमत, जर का आपण आपल्या रागदारी संगीतातील बंदीशींची भाषा वाचली  तर त्या याच ब्रज भाषेवर आधारित असल्याचे आढळेल. प्रसिद्ध कवी शैलेंद्र यांची शब्दकळा आहे. शैलेंद्र हे प्रामुख्याने "लोककवी" म्हणून ख्यातकीर्त आहेत आणि गाण्याचा एकूण बाज लक्षात घेता त्यांची शब्दरचना गाण्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त करून देते. 
गाण्याची खरी गंमत आहे ती ज्या काही ५,६ ओळी आहेत त्या सुरावटीत कशा प्रकारे घोळवल्या आहेत, ते अवलोकण्याचे. इथे "गायकी" अंग स्पष्ट दिसते. प्रत्येक अंतरा मुखड्याच्या ओळी पुनरावृत्त करीत गायल्या जातात पण पुनरावृत्ती नाही. प्रत्येकवेळी एखादी छोटीशी हरकत घेतली जाते आणि चालीतील वेगळेपण दर्शवणारे आणि लालित्य खुलवणारे आहे. गाण्यात अधून मधून हार्मोनियमचे सूर ऐकायला मिळतात पण ते सूर देखील सुंदरसा नखरा व्यक्त करीत आपल्या समोर येतात. जेव्हा हार्मोनियम वाजत असते तेंव्हा पार्श्वभूमीवर सारंगीचे सूर तरळत आहेतच. अशा वाद्यांच्या बांधणीने स्वररचना अतिशय समृद्ध आणि श्रीमंत होते. 
"छेडो ना मोहे सैंय्या दूंगी मैं गाली, आये कहीं के बडे छईला बिहारी". हा दुसरा आणि शेवटचा अंतरा आहे. "आये कहीं के बडे"" ही ओळ दुसऱ्यांदा संपवताना लताबाईंनी एक "नक्कि" स्वरात खटका घेतला आहे. लयीचे बंधन पाळून स्वनिर्मिती कशी करता येते याचे सुरेख उदाहरण आहे. कोठीवरील गाणे आहे तेंव्हा गायनात नखरा तर आवश्यकच पण तो दर्शविताना कुठेही पातळी घसरू न देता, संयत आव्हानात्मक सृजनाचा हा अप्रतिम आविष्कार आहे. खरे तर हे गाणे फार बौद्धिक आहे आणि ते अशासाठी, द्रुत लयीत गाताना देखील स्वरिक सौंदर्याचे कितीतरी "विभ्रम" ऐकायला मिळतात आणि ही बाब सहज साधता येण्यासारखी नाही. 
संगीतकार अनिल बिस्वास यांचे हेच खरे कौशल्य आहे की त्यांनी रचना बांधताना लखनवी ढंग अंगिकारला आणि तसे स्वीकृत करताना त्यातील नेमके वैशिष्ट्य उचलून गाण्याला बहाल केले आहे. गाणे ऐकताना आपल्याला जरादेखील उसंत मिळत नाही पण चटाचट उरकून टाकलेले नाही तसेच स्वरचना काळजीपूर्वक ऐकली तर बंदिश होऊ शकली असती पण त्यांनी आपला "गीतधर्म" योग्यप्रकारे पाळला. त्यांच्यासमोर भारतीय संगीताचा अतिशय विस्तीर्ण आणि व्यापक असा पट होता. अशा परिस्थिती गाणे नसतेच श्रवणीय न होता बुद्धीगामी होते आणि चित्रपट सांगितलं फार श्रीमंत करून जाते. 


No comments:

Post a Comment