Tuesday 21 April 2020

हमारे बाद अब मेहफिल में

काजळभरले अशांत डोळे कुठे लागले?
आणि कपोलांवरी असे कां अश्रू उतरले?
"टिपू नका ते". लालूच म्हणालीस, "कारण - कारण 
तृणपात्यावर पडतें दव हो काय सकारण?"
सुप्रसिद्ध कवी आरतीप्रभू यांच्या "नक्षत्रांचे देणे" या कवितासंग्रहात एका कवितेच्या या ओळी आहेत. एकूणच हिंदी सिनेमांत काही प्रसंग हे कायम बघायला मिळतात आणि त्यातलाच एक प्रसंग म्हणजे प्रेमातील विरह. याबाबतीत आपल्या संगीतकारांनी आणि अर्थातच कवींनी आपली अनन्यसाधारण प्रतिभा सिद्ध केली आणि तेच प्रसंग शिळपट न वाटता  चिरस्मरणीय करून ठेवले आहेत. किंबहुना या गाण्याचे चित्रीकरण बरेचवेळा अत्यंत ढोबळ आणि ठोकळेबाज असून देखील त्या गाण्यांनी ते प्रसंग अजरामर केले आहेत. चित्रपटातील गाणे ही एक संय्युक्तिक प्रक्रिया असते. गाण्याची चाल लावायच्या २ पद्धती आहेत - १) आधी शब्द मग  चाल, २) आधी चाल मग शब्द. विशेषतः हिंदी चित्रपट संगीतात २) हा मार्ग बरेचवेळा स्वीकारला जातो. असा एक आरोप  केला जातो, अर्थात एक रसिक म्हणून आपल्याला  त्याच्याशी देणेघेणे नसते. 
आज आपण अशाच एका समृद्ध गाण्याची ओळख करून घेणार आहोत ज्या गाण्याची चाल आधी शब्द मग चाल या पद्धतीने निर्माण झालेली आहे. "हमारे बाद अब मेहफिल में अफसाने बयाँ होंगे". गाणे तसे दुर्मिळ आहे आणि चित्रपट देखील आला कधी आणि गेला कधी हे कुणालाच फारसे कळले नाही. संगीतकार मदन मोहन यांची कारकीर्द जरा बारकाईने न्याहाळली तर त्यांनी संगीत दिलेले चित्रपट बहुतांशी अपयशी झालेले आढळतात आणि अपयशाला जगात फारशी किंमत दिली जात नाही. आज मदन मोहन हे नाव बरेच नवीन संगीतकार आदराने घेतात परंतु असा आदर आणि वाजवी किंमत त्यांना आयुष्यभर मिळाली नव्हती. 
गाण्याची शब्दकळा ही प्रसिद्ध शायर मजरुह सुलतानपुरी यांची आहे. चित्रपटांच्या इतिहासात जे थोडे सकस,आशयसंपन्न आणि सातत्याने दर्जेदार शायर आहेत त्यांच्यात मजरुह याचे अग्रभागी लिहावे लागेल. गझलच्या वजनात लिहिलेली कविता आहे. कविता अतिशय छोटेखानी आहे. कवितेत फक्त दोन अंतरे आहेत परिणामी मुखड्याच्या ओळी घोळून आणि पुनरावृत्त पद्धतीने घेतलेल्या आहेत. अगदी बारकाईने वाचले तर कवितेत फार असामान्य काहीही आढळत नाही आणि भावसंगीताला जशी रचना आवश्यक असते त्या धर्तीवर लिहिली आहे. या गाण्याची  खरी खुमारी आहे ती स्वररचनेत आणि गायनात. 
प्रस्तुत गाणे हे मदन मोहन यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळातील आहे तरीही काही "जागा" नीटसपणे ऐकल्या तर पुढे प्रस्थापित झालेल्या शैलीशी नाते सांगणाऱ्या आढळतात. गाणे बारकाईने ऐकले तर पहाडी रागाशी नाते सांगणारी चाल आहे परंतु मदन मोहन यांनी आयुष्यात नेहमी रागाचे नाते बाजूला सारून चाल स्वतःची वेगळी ओळख दर्शवते. एक रचनाकार म्हणून हा गुण निश्चितच कौतुकास पात्र ठरतो. मदन मोहन यांना एकूणच हिंदुस्थानी उपशास्त्रीय म्हटल्या जाणाऱ्या रागरागिण्यांचे आणि त्यांच्याबरोबर संलग्न असलेल्या काव्यात्मतेतून भावनेला आवाहन करू पाहणाऱ्या प्रकारांचे विलक्षण आकर्षण  म्हणता येईल. अर्थात यातून त्यांना  होते असे अजिबात सुचवायचे नाही. पण त्यांचा प्रचलित रंगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मूलतः आवाहक सुरवातीच्या शोधात असणाऱ्या रचनाकाराचा होता. रागांचे विस्तार वा त्याची मांडणी करण्यात त्यांना रस नव्हता आणि याच दृष्टिकोनातून आजच्या गाण्यातील पहाडी रागाचे सूर शोधावेत. 
याचाच पुढील विशेष म्हणजे मदन मोहन यांची प्रतिभा गीतधर्मी होती. अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे  करण्याची ज्यामध्ये अंगभूत ताकद असते अशा काव्याला प्रतिसाद म्हणून रचनाकार जेंव्हा एखादी भावपूर्ण सुरावट उभी करतो तेंव्हा गीत संभवते. कारकिर्दीच्या पूढे जेंव्हा मदन मोहन ठुमरीकडे न वळता गझलकडे  का वळले ही यावरून स्पष्ट व्हावे. गीतधर्मी संगीतकार नेहमी लयबंधापेक्षा सुरावटींकडे आणि प्रवाही चलनांकडे झुकतात. या गाण्याच्या संदर्भात हे विवेचन महत्वाचे ठरते. त्यांच्या रचनांचे मुखडे नेहमी गुणगुणावेसे वाटतात. इथे या गाण्यात त्यांनी हाच प्रयोग केला आहे. दोन्ही अंतऱ्यांची चाल वेगळी बांधली आहे आणि आपल्या सर्जनशीलतेचा पुरावा कारकिर्दीच्या सुरवातीलाच दिला आहे. या रचनाकाराने कधीही भरमसाट वाद्ये वापरली नाहीत. इथे तर स्पष्टपणे व्हायोलिन वाद्य ऐकायला मिळते आणि त्या वाद्यावरच लयीला खेळवत ठेवले आहे. गाण्याचा दुसरा अंतरा वरच्या पट्टीत घेतलेला आहे पण त्याआधीचे व्हायोलिनवरील स्वरांचे "वळण" ऐकले तर चाल कशी बदलत  आहे याचे सूचन मिळते. अर्थात लताबाईंची गायन हा सर्वार्थाने अविभाज्य घटक आहे. पुढे लताबाई आणि मदन मोहन ही जोडी समीक्षकांकडून बरीच नावाजली गेली आणि तशी होणे योग्य होते. 
लताबाईंची गायन हा घटक मदन मोहन यांच्या संगीतातील अविभाज्य घटक तर होताच परंतु त्यांची गायकी अधिक खुलली असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. गाणे काहीसे ढाल्या आणि मंद्र सप्तकात सुरु होते आणि त्यावरून गाण्याच्या स्वररचनेची तितकीशी कल्पना येत नाही. "अफसाने" सारखा शब्द लताबाईंनी कसा उच्चारला आहे हे ऐकण्यासारखे आहे. चाल अतिशय संथ आणि व्याकुळ करणारी आहे त्यामुळे अकारण खटका घेणे किंवा हरकतींचे प्रदर्शन करणे असल्या अलंकारांची इथे अजिबात जरुरी नाही. चालीतील अश्रुत गोडवा अधिक अंतर्मुख करणे इतपतच आवश्यकता आहे आणि लताबाईंनी नेमके तेच केले आहे. संपूर्ण गायन हे मुखड्याच्या चालीशी समांतर ठेवले आहे. हा साधेपणाच या गाण्याचे खरे वैशिष्ट्य आहे.  


हमारे बाद अब मेहफिल में अफसाने बयाँ होंगे 
बहारें हमको ढुंढेंगी न जाने हम कहां होंगे 

इसी अंदाज से झुमेगा मौसम, गायेगी दुनिया 
मोहब्बत फिर हंसी होगी, नजारे फिर जवां होंगे 

न हम होंगे, न तुम होंगे, न दिल होगा मगर फिर भी 
हज़ारो मंझिले होंगी, हज़ारो कारवां होंगे 


No comments:

Post a Comment