Thursday 6 May 2021

ओ चांद जहां वो जाये

हिंदी चित्रपटगीत जरी भारतीय संगीतस्फुर्तीचा एक विशिष्ट आविष्कार असला तरी त्याचा प्रभाव भारत देशाच्या हिंदी भाषिक पट्ट्यापुरता वा हिंदी भाषेपुरता मर्यादित नाही. किंबहुना तो आता भारत देशाच्या भौगोलिक मर्यादांपलीकडे बराच दूरवर पोहोचला आहे!! शिवाय युद्धोत्तर काळात हिंदी चित्रपटांनीं तयार केलेला यशस्वी आराखडा इतर प्रांतिक भाषीकांनाही भुरळ घालणारा ठरला. परिणामतः: भारतीय चित्रपटात एक कृत्रिम एकासाचीपण आला. यामुळे अर्थातच एक कळतं नुकसान देखील झाले, हे मान्यच करायला लागेल. अशा परिस्थितीत हिंदी चित्रपटगीतांविषयी बोलणे म्हणजे काहीवेळा आपोआप (च) अखिल भारतीय चित्रपट संगीताविषयी बोलल्यासारखे होते, याचे भान ठेवावे. याचा परिणाम असा झाला, चित्रपटगीतांचा अभ्यास मात्र अगदीच नगण्य स्वरूपात झाला. अर्थात इथे असे अभ्यासपूर्ण विवेचन करायचे नाही परंतु या गाण्याच्या निमित्ताने -  *ओ चांद जहां वो जाये* हिंदी चित्रपट गीत किती विविधांगी पद्धतीने विकसित होत गेले हे मांडायचा प्रयत्न करायचा आहे.  हिंदी चित्रपट गीतांच्या इतिहासात थोडे डोकावल्यास, आपल्या कारकिर्दीत सातत्य राखून, विपुल गीत रचना करून देखील अपवाद वगळता, सतत एक ठराविक दर्जा राखणारे कवी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आढळतात आणि त्या नावांच्या पंक्तीत राजेंद्र कृष्ण यांचे नाव सन्मानाने घेता येते. आजच्या गीताची कविता, हे एक सुंदर उदाहरण आहे. नायक परदेशात जात आहे - विमानात बसला आहे आणि त्यानिमित्ताने नायिका आणि त्याच्यावर अनुरक्त झालेली दुसरी स्त्री - यांचे भावविश्व, हा विषय आहे. चंद्राची उपमा देऊन, प्रत्येकवेळी नवीन आशय धुंडाळायचा, हा तर हिंदी चित्रपट गीतांचा पूर्वापार चालत असलेला वापर आहे. प्रत्यक्षात चन्द्र कसा आहे? याची माहिती आता सगळ्यांना आहे पण एकेकाळी ती अप्राप्य होती आणि त्यामुळे चंद्र हा नेहमीच प्रणयी भावजीवनात अढळ स्थान मिळवून होता. कवींची खासियत अशी आहे, पडद्यावरील स्त्रियांचा स्थायीभाव अचूक ओळखून त्या हिशेबाने शब्दरचना केली आहे. उदाहरणार्थ पहिला अंतरा बघता * वो राह अगर भुले,  तू राह दिखा देना* सारख्या ओळी लिहिणे म्हणजे नायिकेच्या ऋजू स्वभावाच्या संवेदना दाखवणे होय तर अनुरक्तझालेली स्त्री ही अर्थातच किंचित *धिटाई* दाखवणार तेंव्हा तिच्यासाठी लिहिताना * केहना मेरे होटोपर, रुकती हुई आहे है* अशा ओळी लिहिणे हे औचित्यपूर्ण ठरते. इथे एक मुद्दा मांडावासा वाटतो. हे गीत जेंव्हा लिहिले गेले तेंव्हाचा समाज, सामाजिक परिस्थिती आणि सांस्कृतिक स्तर आताच्या पेक्षा फार वेगळा होता, अधिक आत्ममग्न होता. त्यामुळे त्या दृष्टीनेच कविता वाचणे, संयुक्तिक ठरेल. आजच्या आधुनिक काळात चंद्र वगैरे उपमा पार लुप्त झाल्या आहेत. आता कविता म्हणून वाचताना, एकूणच सलग, साधे स्टेटमेंट वाचत आहोत असाच भास होतो. कुठेही दिपवून टाकणारी प्रतिमा नाही परंतु चित्रपटाच्या दृष्टीने बघता, प्रसंगाचा सुयोग्य परिणाम मनावर घडतो, हे निश्चित. संगीतकार सी. रामचंद्र आणि कवी राजेंद्र कृष्ण ही जोडगोळी एकेकाळी खुप गाजली होती. चित्रपट संगीताला वैश्विक भान देण्याचा अत्यंत यशस्वी प्रयत्न प्रथम जर कुणी केला असेल तर तो सी.रामचंद्र या संगीतकाराने. विशेषतः *सैगल काळात* सुरु करून देखील त्या शैलीचा आपल्या रचनांवर किंचितही प्रभाव पडू  दिला नाही तसेच चित्रपटसंगीताची, कलासंगीतापासून वेगळी ओळख निर्माण करण्यात या संगीतकाराने फार महत्वाची भूमिका बजावली, असे म्हणता येईल. भारतात राहून देखील वैश्विक संगीताकडे सजग दृष्टीने बघणारा संगीतकार म्हणून वेगळी ओळख होऊ शकते. गाण्याची स्वररचना *हंसध्वनी* रागावर आधारित आहे. हा राग मुळातला शेजारच्या कर्नाटकी संगीतातील परंतु आदानप्रदान करण्याच्या प्रक्रियेत हा राग उत्तर हिंदुस्थानी संगीतात कायमचा स्थिरावला!! *मध्यम* आणि *धैवत* स्वरांना जागा नसलेल्या या रागात इतर स्वर *शुद्ध* स्वरूपात लागतात. संगीतशास्त्रानुरूप बघता, रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात हा राग सादर केला जातो आणि चित्रपटातील प्रसंग बघता, त्यात थोडेऔचित्य दिसते. अर्थात रागाची मूलभूत चौकट बाजूला सारत आपल्या स्वररचनेचे स्वतंत्र देखणे रूप उभे करायचे, अशा प्रकारे हा संगीतकार बऱ्याचवेळा आपली सर्जनशील शैली ठेवतो. गाण्याचा मुखडा आणि अंतऱ्यांची चाल, यात विलक्षण वैविध्य निर्माण करण्यात हा संगीतकार अतिशय कुशल होता. इथे बघा, अंतऱ्यांची चाल संपूर्ण वेगळी आहे आणि तरीही अंतरा संपवताना, रचना मुखड्याशी तादात्म्य राखते. हा विलोभनीय सांगीतिक खेळ आहे. एक बाब फार महत्वाची आहे. या संगीतकाराने नेहमीच स्वररचना बांधताना, त्यातील क्लिष्ट भाग बाजूला सारून, ऐकणाऱ्याला प्रवृत्त करणाऱ्या रचना बांधल्या. अर्थात परिणाम असा झाला, आपणही या रचना गाऊ शकतो असा (फसवा) आत्मविश्वास निर्माण होण्यात झाला कारण प्रत्यक्ष गाताना त्यातील अवघड *जागा* दिसायला लागतात आणि आपली फसगत होते. इथे मुखडा विलक्षण साधा बांधला असे प्रथम दर्शनी वाटते आणि तसे आहे देखील परंतु बारकाईने ऐकायला  गेल्यास, त्यातील नाजूक पण चकवा देणाऱ्या हरकती, गळ्याची परीक्षा बघतात!! तसेच अंतरे संपताना पुन्हा मूळ स्वररचनेकडे वळताना, लय *दुगणित* जाते आणि एकदम बदलते. याचे अचूकभन नसेलतर सादरीकरण विसविशीत होण्याचा धोका असतो. या संगीतकाराने तालाचे फार प्रयोग केले नाहीत आणि या गाण्यात जो *केहरवा* ताल वापरला आहे, त्याचा विपुल उपयोग आपल्या कारकिर्दीत केल्याचे आढळते. एकूणच हा संगीतकार बरेचवेळा *निसरड्या* वाटेवरील चाली बांधण्यात वाकबगार होता, असे म्हणावेसे वाटते. लताबाई आणि आशाबाई यांची एकत्रित *युगुलगीते* फारशी ऐकायला मिळत नाहीत. असे का घडले? याचे उत्तर मिळत नाही. परंतु त्यांनी जी काही दुर्मिळ गीते गायली आहेत त्यात या गीताचा क्रमांक फार वर लागेल. खरंतर दोन्ही असामान्य वकुबाचे *गळे*असून फार कुणाला सुचले नाही, हे दुर्दैव. अर्थात हे गाणे ऐकताना, त्यांच्या गायन शैलीतील फरक फार स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: शेवटचा अंतरा दोघींनी म्हटला आहे तिथे *गायकी* मधील फरक स्पष्टपणे दृग्गोचर होतो. इथे कुणाची *गायकी* श्रेष्ठ असला पंक्तिप्रपंच अभिप्रेत नाही परंतु समृद्ध गायकी हा मुद्दा घेतला तरी अभिव्यक्ती किती वेगवेगळ्या प्रकारे ऐकायला मिळते, हाच मुद्दा आहे. कवितेतील ओळी आणि त्यांचे अचूक वर्गीकरण करून दोन्ही गायिकांकडून नेमका परिणाम काढून घेण्याचे कौशल्य मात्र निर्विवादपणे संगीतकार सी.रामचंद्र यांच्याकडे जाते. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास, शेवटचा अंतरा बारकाईने ऐकावा. *केहना मेरे होटो पर* (लताबाईंच्या आवाजात) तर लगोलग *तू राह दिखा देना* (आशाबाईंच्या आवाजात) गायले गेले आहे. शब्दांचे उच्चारण, स्वरांची जातकुळी आणि हलक्या हरकती यातून या दोघींची गायकी स्पष्ट होते. अर्थात त्याआधी पहिला आणि दुसरा अंतरा अनुक्रमे गाताना, गायकीमधील फरक जाणवतो. मी तुलना मुद्दामून टाळली आहे कारण निष्कारण वादावादी नको!! दोन प्रतिभासंपन्न *गळे* एकत्र आल्यावर स्वरचनेत किती अप्रतिम रंग भरले जातात, केवळ याच मुद्द्यावर, मी वरील विवेचन केले आहे. हे युगुलगीत ऐकताना मनात सारखी चुटपुट लागते, अशी गीते या गायिकांकडून एकत्रितपणे गाऊन घ्यायला हवी होती आणि ही चुटपुट वाटणे, हेच या गीताचे खरे वैशिष्ट्य आहे.  ओ चांद जहां वो जाये ओ चांद जहां वो जाये, तू साथ भी चले जाना कैसे है कहाँ है वो हर रात खबर लाना वो राह अगर भुले वो राह अगर भुले,तू राह दिखा देना परदेश में राही को मंजिल का पता देना है पेहला सफर उनका और देश है अंजाना हर रात खबर लाना केहना मेरे होटोपर केहना मेरे होटोपर, रुकती हुई आहे है ये रास्ता उनका है या मेरी निगाहे है बेताब मुहब्बत का बेताब है अफसाना ओ चांद जहां वो जाये है चाँद कसम मेरी कुछ और ना तू केहना केहना की मेरा तुम बिन मुश्किल है यहां रेहना एक दर्द के मारे को अच्छा नहीं तडपाना हर रात खबर लाना ओ चांद जहां वो जाये O Chand Jahan Woh Jaye | Lata Mangeshkar, Asha Bhosle | Sharada Songs | Meena Kumari, Raj Kapoor - YouTube

No comments:

Post a Comment