Friday 14 May 2021
पंकज मलिक
कोलकत्यातील मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पंकज मलिक यांनी सुरवातीला पंडित दुर्गादास बंदोपाध्याय यांच्याकडे संगीताची तालीम घेतली असा स्पष्ट उल्लेख वाचायला मिळतो. परिणामी संगीतावर भारतीय कलासंगीताचा प्रभाव जाणवतो आणि हे साहजिक लक्षण म्हणावे लागेल. पुढे त्यांनी लक्ष्मी मित्तल यांच्याकडून *रवींद्र संगीताची* तालीम घेतली आणि या संगीताची शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरली असे म्हणता येईल.
रवींद्र संगीतापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी नभोवाणीवरून या संगीताचे गायन करायला सुरवात केली. १९२७ साली प्रसिद्ध संगीतकार रायचंद बोराल यांना प्रथम न्यू थिएटर्स साठी मूकपट आणि नंतर बोलपटांसाठी संगीतसाहाय्य करायलाही प्रारंभ केला. *यहुदी की लडकी* नंतर स्वतंत्र संगीतकार म्हणून नाव व्हायला लागले. के.सी.डे यांनी गायलेले *सुंदर नारी* हे गीत लोकप्रिय झाले परंतु त्याची ध्वनिमुद्रिका मात्र यांच्या स्वतःच्या आवाजात निघाली. *मुक्ती*, *धरतीमाता*, *आंधी*, *नर्तकी*, *डॉक्टर*, *यांत्रिक* आणि *कस्तुरी* हे त्यांचे ठळकपणे गाजलेले चित्रपट म्हणता येतील. आपल्या स्वतःच्या भूमिकांच्या गीतांसाठी ते स्वतःच स्वररचना करीत, हा खास विशेष मांडावा लागेल. साधारणपणे ५,००० गीतांसाठी त्यांनी चाली दिल्या असे समजते. या शिवाय *सैगल*, *कानन देवी*, *पहाडी संन्याल* तसेच *उमा शशी* इत्यादिकलाकारांना त्यांनी प्रथम संधी दिली याचाही उल्लेख केला जातो.
त्यांनी चित्रपटांतून रवींद्र संगीत विविधरीत्या लोकप्रिय केले. उदाहरणार्थ, काही गीतांचे त्यांनी भाषांतर केले आणि त्यांची शैली चित्रपटागीतांसाठी वापरली. रवींद्र संगीताचा पार्श्वसंगीत म्हणून वापर केला तसेच बंगाली चित्रपटांत टी गीते मूळ स्वरूपात योजली. नृत्यांबरोबर सांगड घातल्याने, त्याकाळी खालच्या दर्जाचे मानले गेलेल्या *तबला* या वाद्यास पंकज मलिक यांच्यामुळे रवींद्र संगीतात प्रवेश आणि योग्य वाव मिळाला.
रवींद्रांच्या पावलावर पाऊल टाकून पंकज मलिक देखील चार विभाग असलेला साचा चित्रपटगीतांसाठी वापरू लागले आणि पुढे इतर संगीतकारांनी त्याचीच री ओढली, असे म्हणावे लागेल. त्यांनी *तान* या प्रकारावर जवळपास बहिष्कार म्हणावा इतपत बाजूला टाकला आणि जाणीवपूर्वक संगीतातील *मींड* या खास अलंकाराला वाव दिला. जाणवण्यासारखी चाल गीताला असावी हे सूत्र त्यांनी पाळले. आणि त्याचे पुढील पाऊल म्हणजे सर्वसाधारणतः द्रुत लयीवर भर दिला.
छोट्या आणि द्रुतगती सुरावटींचे प्रमाण त्यांच्या चालीत बरेच आहे व त्यामुळे अनेकदा *बंगाली टप्पा* या संगीतप्रकाराची आठवण येते. उदाहरणार्थ *आज अपनी मेहनतों का* (डॉक्टर - १९४१) हे गीत या संदर्भात ऐकावे. संगीताची गतिभानता राखावी आणि गीताच्या आरंभी गीतासाठी योग्य ते वातावरण निर्माण करणारे वाद्यवृंदाचे दीर्घ संगीत असावे असे त्यांचे बव्हंशी धोरण असे. *आयी बहार आज* (डॉक्टर - १९४१) या गीतात तर त्यांनी चरणांतच उद्गारांची पेरणी करून अनेक छोट्या लयबंधाच्या अनेक आवर्तनात चरण पसरलेला आहे. *चले पवन की चाल* या गीतात पाश्चात्य पद्धतीच्या सुरावटी आणि वाद्यवृन्द योजून घोड्याच्या टापांचा ध्वनी आणि त्याची लय मिळण्यासाठी नारळाच्या करवंट्यांचे आघात वापरले आहेत!! आणखी एक ठळक उदाहरण म्हणजे *धरतीमाता* चित्रपटातील *किसने ये सब खेल रचाया* हे गीत ऐकावे. लांबवरून ऐकू येणाऱ्या सतार आणि ऑर्गन यांच्या साथीवर सैगल गातात. *आज अपनी मेहनतों का* (डॉक्टर) या गीतात असाच प्रत्यय येतो. या गीतात तर वाद्यवृंदाचा एक माफक तुकडा आणि विलंबित लय यांच्या जोडीला *दीपचंदी* ताल वापरला आहे आणि ही योजना विरळाच आढळते. *धूप छांव* या चित्रपटात पार्श्वगायनाच्या क्रांतिकारी प्रघातास आरंभ करण्यात पंकज मलिक यांचा वाटा होता.
एकूण सांगीतिक वळण लक्षात घेता जरासे आश्चर्य वाटण्यासारखी बाब अशी की पाश्चात्य शैली आणि वाद्ये यांची योजना करण्यात ते नेहमी तत्पर राहिले. आपल्या समकालीन संगीतकारांपेक्षा त्यांनी केलेला वाद्यवृंदाचा वापर भरीव आणि विपुल होता.
वास्तववादी आणि यथातथ्यपणाच्या आदर्शाचे ते पाठीराखे नव्हते हे उघड आहे!! याच कारणाने *दुनिया रंग रंगिली* (धरतीमाता) किंवा *सो जा राजकुमारी* (जिंदगी - १९४०) या गीतांत त्यांनी साधी भारतीय चाल व स्वरावली (कॉर्ड) यांचा एकत्र वापर केला. दुसरे गीत तर *अंगाई गीत* आहे पण त्यातही व्हॉयलीन आणि पियानो या वाद्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. *यहुदी की लडकी* (१९३३) या चित्रपटात *गझल*, *कजरी* इत्यादी साचे आपल्या मूळ स्वरूपात अवतरतात पण काहीसे सूक्ष्म फरक करून. उदाहरणार्थ *नुक्ताचीन कशी पार पाडली गमे है दिल* किंवा *लग गयी वो कलेजवा* ऐकावे. पहिल्या गझलेत तर द्रुत लय आहे आणि सैगल यांचा व देखील खूप उर्जायुक्त वाटतो.
काही वेळा त्यांनी सांगीत धाडस दाखवले - उदाहरणार्थ *मैं क्या जानू* (जिंदगी - १९४०) मध्ये त्यांनी द्रुत गती, वारंवार येणारे तानांचे आकृतिबंध तसेच येणारे-जाणारे पियानोचे स्वरवाक्यांश देखील आहेत.
*प्रीत में है जीवन* (दुश्मन- १९४०) या गीतात त्यांनी ऑर्गनचे अंतर्मुख स्वर साजेशी विलंबित लयीत वापरले आहेत. या गीतात सैगल अगदी तार स्वरापर्यंत जात असले तरी गीताच्या आवाहक आशयाशी धक्का पोहोचत नाही. अर्थात इथे दाद द्यायला हवी ती संगीतकार आणि गायक - या दोघांना.
आरंभीच्या हिंदी चित्रपट संगीताने देशी नाट्यसंगीत परंपरेपासून दूर सरकण्याची क्रिया आपल्या खास पार पाडली याचे सर्वंकष प्रत्यंतर त्यांच्या सगळ्या सांगीतिक कारकिर्दीतून दिसून येते आणि तेंव्हा काळ लक्षात घेता, अशा स्वररचना सातत्याने करणे, ही फार महत्वाची कामगिरी म्हणायला हवी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment