Saturday 1 May 2021

खाली हाथ शाम आयी है

सूर्यास्त होत असताना, गाभाऱ्यावर वस्त्र पडत जावे त्याप्रमाणे, अवकाशात तिमिराचे राज्य हळूहळू सुरु होत असताना, दूर क्षितिजावर, रंगांची उधळण होत असते. फक्त गुलाबी रंगात, निळ्या रंगाचा गडदपणा मिसळत असतो. अशा वेळेस, जाणवणारी, कालिदासाच्या भाषेत सांगायचे झाल्यास, "पर्युत्सुक" अवस्थेत, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराची आतुरतेने वात पाहत असताना, होणारी धडधड, अशा वातावरणात फार अप्रतिमरीत्या उमटते. थोड्या, काव्यात्मक भाषेत बोलायचे झाल्यास, बालकवींच्या, "औदुंबर" कवितेतील, येणारा, "गोड काळिमा" या भावनेशी फार जवळचे नाते दर्शवून जातो.संध्यासमयीची आर्त हुरहूर आणि त्याचबरोबर, प्रणयोत्सुक विरहिणीची व्यथा नेमकेपणाने व्यक्त केली जाते. संध्याकाळी, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराला संकेतस्थळी भेटण्यास आतुर होत असताना, आपल्याला, तसाच प्रतिसाद मिळेल न मिळेल, या विवंचनेतून आकाराला आलेली भावना!! कवी ग्रेस यांनी या वातावरणाचे अतिशय सुरेख वर्णन आपल्या कवितेत केले आहे. *नाहीच कुणी अपुले रे* *प्राणांवर नभ धरणारे,* *दिक्काल धुक्याच्या वेळी* *हृदयाला स्पंदविणारे....* आजचे आपले गाणे याच भावनेच्या आसपास रेंगाळणारे आहे. तसे बघितले तर *उदास संध्याकाळ* बऱ्याच वेळा बऱ्याच चित्रपटात साकारलेली आढळते परंतु अंतर्मुख करणारी संघ्याकाळ अपवाद परिस्थितीत चित्रित केलेली दिसते. *खाली हाथ शाम आयी है* ही ओळच आजच्या गाण्याचा भावार्त स्पष्ट करणारी आहे. सुप्रसिद्ध शायर गुलजार यांची ही कविता, *इजाजत* या चित्रपटासाठी लिहिलेलीआहे. गुलजार यांची ख्याती म्हणजे नेहमीच्या वापरातील शब्द घेताना, त्या शब्दांची रचना अशा प्रकारे करायची जेणेकरून नवीन आशय वाचायला मिळावा. या दृष्टीने बघायला गेल्यास, कवितेचे *ध्रुवपद* तसे सरळ,साधे आहे. शाब्दिक चमत्कृती असली म्हणजे कविता सुंदर, हे अत्यंत ढोबळ विधान झाले परंतु साध्या शब्दातून देखील बऱ्याच मोठ्या व्याप्तीचा आशय व्यक्त करता येतो तसे इथेआढळत नाही. वाचताना *गेयता* सापडते.पहिले कडवे वाचताना *आज भी ना आये आंसू, आज भी ना भीगे नैना* या ओळीतून सुरेख तरलता बघायला मिळते. किंवा शेवटच्या कडव्यातील *रात की सियाही कोई,पाये तो मिटाये ना* इथे थोडा गुलजार स्पर्श आढळतो. रात्रीच्या गडदपणाला शाईची उपमा चपखल बसते. खरतर शाब्दिक रचना बघितल्यास, अत्यंत अल्पाक्षरी वृत्त तर आहेच पण आकाराने देखील फारच लहान कविता आहे. केवळ २ अंतरे आहेत, त्यातही शाब्दिक पुनरावृत्ती आढळते. एक बाब मांडावीशी वाटते, चित्रपटातील प्रसंग बघता त्रोटक कविता सार्थ वाटू शकतेआणि हे गुलजार यांचे कौशल्य मानता येईल. आणखी एक मुद्दा घेता येईल, याच चित्रपटातील इतर कविता बघितल्यास, ही कविता फारच साधी आणि सरळ आहे. संगीतकार राहुलदेव बर्मन यांची *तर्ज* आहे आणि *पिलू* रागावर आधारित स्वररचना आहे. मुखड्याची पहिली ओळ ऐकल्यास, त्यांच्याच वडिलांच्या - सचिन देव बर्मन यांच्या प्रसिद्ध बंगाली गीताचा आधार घेतल्याचे कळते - *आमी चिनू एका बाशोर जागाये* या गाण्याची पहिली ओळ आणि प्रस्तुत गीताची पहिली ओळ , यामध्ये बरेच साम्य आहे. अशा वेळेस, *मुखडा बांधणे खरे कौशल्याचे असते, पुढे सगळे बांधकाम असते* या उक्तीची आठवण येते. अर्थात पुढे चाल स्वतंत्र होते. किंबहुना राग पिलूचे अस्तित्व देखील विरळ होत जाते. गाणे सुरू होते, तेच मुळी *वीणा* वादनाने!! अतिशय शांत आणि मृदू स्वरांनी सुरवात होते आणि तिथेच गाण्याची सगळी पार्श्वभूमी तयार होते. लगोलग पुढे *तरंग* आणि *संतूर* वाद्यांचे अस्तित्व स्पष्ट होते. एकूणच गाण्यात वाद्ये फारच मर्यादित आहेत आणि त्यातही पंडित रोणू मुजुमदारांची बासरी अतिशय वेधकपणे ऐकायला मिळते. खरतर असे म्हणता येईल, आशाबाईंच्या सुंदर गायनाला बासरीची अप्रतिम जोड मिळाली आहे. ताल वाद्य म्हणून जरी तबला असला तरी तबल्याच्या बोलांबरोबर गिटारचे स्वर मिसळून एकूणच तबल्याचे अस्तित्व विरघळून टाकले आहे. गिटार बरोबर ताल वाद्य मिसळणे किंवा खुद्द गिटार हेच तालवाद्य म्हणून वापरणे तसेच अनेक *न* स्वरी वाद्यांतून अनेक ध्वनी परिमाण मिळवणे इत्यादी प्रयोग या संगीतकाराने आयुष्यभर केले आणि हिंदी चित्रपट संगीत वैश्विक संगीताच्या जवळ आणून सोडले. गाण्यातील अंतरे जवळपास समान बांधणीचे आहेत आणि तसे बघितले तर चालीत एकूणच *विश्रब्ध* शांतता आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे गाण्यातील वाद्यमेळ अतिशय समृद्ध आहे आणि गीतातील भावना अधिक खोलवर पोहोचविण्यात मोलाची मदत करीत आहे.गाणे ऐकताना कुठेही अचानकपणा ऐकायला मिळत नसून मुखड्यातील भावना शेवटपर्यंत हळूहळू मनात रिचवत जाते. समजा असे म्हटले - *उमराव जान* नंतर बहुदा प्रथमच चित्रपटातील सगळी गाणी आशाबाईंच्या आवाजात ऐकायला मिळाली आणि गमतीचा मुद्दा म्हणजे सलग सगळी गाणी, गायनाच्या दृष्टीने आव्हानात्मक निघाली. आशाबाईंच्या गायकीचा कस बघणारी निघाली. अर्थात याच चित्रपटातील दुसऱ्या गाण्याला त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळाले, हा आणखी वेगळा मुद्दा. मुखड्यातील *खाली* शब्द ऐकावा. त्या शब्दातील, सगळा एकांतवास, मनात साठलेला विषाद, या सगळ्या भावना त्यांनी या एकाच शब्दाच्या उच्चारात दाखवून दिल्या. शब्दप्रधान गायकीचे सौष्ठव कष्ट आहे, याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. कवितेची नेमकी जाण कशी असावी, तर अशी!! जरा आणखी बारकाईने ऐकल्यास, पहिलीच ओळ संपवताना, किंचित हलकासा *आकार* घेतला आहे तो निव्वळ जीवघेणा आहे. पहिल्या अंतऱ्याच्या पहिल्या ओळी दोन वेळा घेतल्या आहेत. प्रथम किंचित वरच्या सुरांत घेतल्या पण दुसऱ्यांदा गाताना स्वर खालच्या पट्टीत लावला आहे आणि तसा लावताना, संध्याकाळचे *रितेपण* आणि *व्याकुळ मनोवस्था* अतिशय समर्पकपणे दर्शवली आहे. गाण्याचा भावार्त लक्षात घेता, हे स्वरिक वळण अतिशय अर्थपूर्ण ठरते. गाताना जर का समृद्ध चाल मिळाली तर एकूणच *आवाज* कसा लावायचा? त्यात अतिशय हलक्या परंतु आशयाला अधिक खोल अर्थ देणाऱ्या हरकती कशा घ्यायच्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे,या गायनातून आपल्याला मिळतात. चित्रपट संगीताने इथंवरचा प्रवास बघता असंख्य वेगवेगळी वळणे कालानुरूप घेतली आणि त्या बदलांना तितक्याच ताकदीने आशाबाई सन्मुख गेल्या आणि आपल्या आवाजाची परिमाणे अधिक विस्तारत नेली. चित्रपट संगीत फार श्रीमंत झाले. खाली हाथ शाम आयी है खाली हाथ जायेगी आज भी ना आया कोई खाली लौट जायेगी आज भी ना आये आंसू आज भी ना भीगे नैना आज भी ये कोरी रैना कोरी लौट जायेगी रात की सियाही कोई पाये तो मिटाये ना आज ना मिटायी तो येह कल भी लौट आयेगी Khali Haath Shaam Aayi Hai With Lyrics | Asha Bhosle | Ijaazat Songs | Rekha - YouTube

No comments:

Post a Comment