Sunday 30 May 2021

कहीं दीप जले कहीं दिल

समोरील माडांची बाग एकमेकांत गुंतून फाटलेल्या पडद्यांप्रमाणे उभीआडवी दिसत होती. काळोखांत वस्तूंचे आकारच विचित्र श्वापदांसारखे झाले होते. कुणीतरी काळोखात प्रचंडपणे आपला काळा पंजा फिरवून उलाढाल करत आहे, प्रत्येक वस्तूमागचा आपला हक्क, आपली सूत्रं, आपलं अस्तित्व खुंट हलवून ठाम करत आहे, असा वाटत होतं. माडासारखा माड दिसत नाही. तो कसल्यातरी काळोखात आत्ताच उतरलेल्या केव्हढ्यातरी प्रचंड सापळ्यासारखा दिसत होता. खरंतर हे अनुभव आपल्याला मराठीतील खानोलकरांच्या कादंबरीत वाचायला मिळतात. तिथे सतत अंधारे, रहस्यमय, भुताटकीसारखे असे अगोचर, अमानवी विश्व असते आणि अगदी असेच नव्हे पण थोडेफार पातळ आणि काहीसे विसविशीत दृश्य आपल्याला बऱ्याच हिंदी चित्रपटात बघायला मिळते. हिंदी चित्रपटात नेहमीच *मनोरंजन* आधी, मग तथाकथित रहस्य वगैरे बाबी येतात. किंबहुना असे म्हणता येईल, अशा प्रसंगांना लाभलेली गाणी जितकी उत्कंठा वाढवतात आणि गूढता निर्माण करतात, त्याच्या दशांशाने देखील चित्रित प्रसंगातून दिसत नाहीत. अर्थात अपवाद काही आहेत. अशा प्रसंगांवर आधारलेले आजचे गाणे - *कहीं दीप जले कहीं दिल* हे गीत आहे. अर्धुकलेली वाट, धूसर हवा इत्यादी सगळे घटक आहेत. फक्त चित्रण इतके विसविशीत आहे की त्यातील *धग* जाणवतच नाही. या गीताचे कवी आहेत शकील बदायुनी. शकील बदायुनी हे नाव उर्दू साहित्यात फार प्रतिष्ठित आहे. बेगम अख्तर सारख्या असामान्य गायिकेने देखील शकील यांच्या रचना स्वरबद्ध केल्या आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीत देखील शकील यांचे नाव अतिशय मानाने घेतले जाते. प्रस्तुत गाणे ही खऱ्याअर्थी गीत म्हणता येईल. प्रत्येक अंतऱ्यातील तिसरी ओळ यमकाने सिद्ध केली आहे आणि त्याला मुखड्यातील दुसऱ्या ओळीची जोड देऊन अंतरे संपवले आहेत. काव्य म्हणून वाचायला गेल्यास *गेयता* वगळता फारसे इतर गुण आढळत नाहीत. शकील यांच्या इतर सघन रचना तुलनेने बघितल्यास, ही रचना फारशी समृद्ध किंवा वाचनानंद देत नाही. अर्थात हा भाग तर चित्रपट गीत लिहिणाऱ्यांच्या वाटेला नेहमीच येत असतो. उदाहरणार्थ *मेरा गीत मेरे दिल की पुकार है, जहाँ मैं हूं वही तेरा प्यार हैं* या ओळींत काहीच नवीन नाही. हीच कल्पना खुद्द शकील यांच्या अनेक रचनांतून वाचायला मिळते. त्यातल्या त्यात, शेवटच्या अंतऱ्यातील *दुश्मन हैं यहाँ हजारो यहाँ जान के, जरा मिलना नजर पेहचान के* या ओळी चित्रपटातील प्रसंग अधिक गडद करतात. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, चित्रपट गीत ही चित्रपटाची कथा किंवा प्रसंग, यांना एकतर *पूरक* असावीत किंवा कथानकाला *पुढावा* देणारी असावीत, अशी मागणी असते आणि त्या मागणीची पूर्तता या शब्दरचनेतून नक्की होते. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक, हेमंतकुमार यांनी ही रचना स्वरबद्ध केली आहे. हेमंतकुमार यांच्या रचनांवर रवींद्र संगीताचा प्रभाव अधिक होता आणि तसे त्यांनी प्रांजळपणे कबूल देखील केले आहे. आता प्रस्तुत गीताची स्वररचना बघता, या गीतात चक्क २ रागांचा अवतार आढळतो. या गीतातील कान्थाघोष आणि पायाभूत स्वरसमूह हा *हिंडोल* रागाधारित असून बाकीची रचना *शिवरंजनी* रागाशी साम्य ठेवते. अर्थात चित्रपटातील अमानवी तत्वाच्या आगमनासाठी आणि म्हणून काहीसे अस्वस्थ वातावरण निर्माण करण्यासाठी *हिंडोल* रागाचे स्वर उपयुक्त ठरले आहेत. गाण्याची सुरवात एकांतातील दीर्घ आलापीने करून, गाण्यातील गूढत्वाचे अचूक सूचन केले आहे. तसेच कडव्यांमधील वाद्यमेळातील सूर, व्हायोलिन सारख्या वाद्याने परिणामकारकरीत्या भरीवपणे केली आहे, अर्थात अर्थात व्हायोलिनच्या जोडीने गिटारचे स्वतंत्र सूर अधिक खोल अभिव्यक्ती देतात. रूढार्थाने गीतात तालवाद्य नाही परंतु स्वरिक वाद्यांतून *केहरवा* तालाच्या मात्रा मिळतात. संगीतकार म्हणून सुरवातीलाच "आनंदमठ","शर्त","सम्राट" सारखे चित्रपट सांगीतिक दृष्ट्या बऱ्यापैकी गाजले पण त्यांची खरी ओळख ही १९५४ साली आलेल्या "नागीन" चित्रपटाने!! एक मुद्दा - संगीतकार म्हणून त्यांना पाश्चात्य संगीत किंवा त्यातील आगळे वेगळे स्वनरंग यांचे फार आकर्षण होते, असे दिसत नाही. त्याचप्रमाणे अतिद्रुत किंवा हिसकेबाज हालचालींस पूरक असे नृत्यसंगीत त्यांना फारसे आवडत नव्हते. हेमंतकुमारांच्या संगीताविषयी आखि मूल्यात्मक विधाने करणे शक्य आहे. *१]* आधी म्हटल्याप्रमाणे "नागीन" चित्रपटाचे संगीत त्यांना अडचण वाटावी इतके लोकप्रिय झाले. क्ले व्हॉयलीनच्या वेगळ्या स्वनरंगातील छोटी आणि प्रत्येक गीतांत पुनरावृत्त केलेली धून स्मरणात रेंगाळणारी खूण झाल्याचे वाटते. *२]* एक प्रकारचा हळवेपणा आणि अ-दृश्याची ओढ हे भाव हेमंतकुमारांना जवळचे वाटत असावेत. त्यांनी रचलेल्या आणि गायलेल्या अनेक परिणामकारक गीतांत हे भाव भरपूर आढळतात. "कहीं दीप जले","छुप गया कोई रे","भंवरा बडा नादान", "तुम पुकार लो" ही गाणी खास उल्लेखनीय आहेत. *३]* एकाच गीतांत अनेक संदर्भ आणून आपल्या सांगीतिक व्यामिश्रतेची जाणीव करून देणे, अतिशय सुरेखरीत्या जमले आहे - उदाहरणार्थ "जय जगदीश हरे" (आनंदमठ) हे गीता दत्त बरोबरचे गीत ऐकायला घेतल्यास, यात भारतीय धर्मसंगीतातील अनेक प्रकार एकत्र आणले आहेत. पठण, भजन गान, द्वंद्वगीत आणि अलिप्तपणे पण तीव्रतेने गायलेले "बाउल"पद्धतीचे सादरीकरण या सगळ्यांचा समावेश या स्वररचनेत दिसून येतो. *४]* नाईट क्लब गीतें हा त्यांचा आवडीचा प्रकार निश्चित नव्हता आणि तशा रचना करताना, त्यांनी "उरकून" टाकले अशा पद्धतीने स्वररचना केल्याचे समजून घेता येते. परंतु चित्रपट उद्दिष्टास साहाय्यक सांगीत कल्पनेचे एक चांगले उदाहरण म्हणून "ना जाओ सैंय्या" (साहब बिबी और गुलाम) ही रचना ऐकल्यास, लयहीन अंतर्लक्षी कुजबुज, मग्न पठण आणि मुख्य हेतू म्हणून हळूहळू गायनापर्यंत पोहोचणारी संगीतस्पंदने अशा प्रतितास कारण होत हे गीत उभे राहते. हे गीत खऱ्याअर्थी लताबाईंचे असेच म्हणावे लागेल. लताबाईंच्या वरच्या स्वरांत सहजतेने गायन करण्याच्या कौशल्यावर फिदा होऊन,ज्या काही महत्वपूर्ण स्वररचना तयार झाल्या, त्यातील ही एक रचना. चित्रपटातील प्रसंग लक्षात घेता, आकारयुक्त तसेच ओकारयुक्त आलाप घेऊन, प्रसंग उठावदार करणे, ही तर लताबाईंच्या गायकीची खासियत म्हणता येईल. नेमक्या ठिकाणी योजलेला आणि पाळ्या गळ्यातून सुरेख लावलेला *शुद्ध मध्यम* स्वर दिलासा देणारा ठरतो. *ओ* या स्वरवर्णावर केलेले मुक्त आलाप सूचकतेने आणि सुरेलपणे विरत जातात. मुखडा किती सुंदर पद्धतीने गायला आहे - *कहीं दीप जले कहीं दिल* ही ओळ गाताना *दीप* शब्दावर किंचित हेलकावा दिला आहे, परिणामी आशय वृंध्दीगंत होणे. तसेच पुढील ओळ गाताना - *जरा देख ले आकर परवाने* हळूहळू एकेक स्वर उंचावत जायचे परंतु कुठेही शब्दांची किंमत हलकी होऊ द्यायची नाही. वास्तविक अंतरे जवळपास समान बांधणीचे आहेत पण गायन करताना, *दिल की पुकार* हे घेताना *पुकार* शब्द कसा घेतला आहे, हे मुद्दामून ऐकावे असेच आहे. लयीत तर गायचेच परंतु मध्येच एखादा स्वर *वेलांटीयुक्त* घ्यायचा जेणेकरून गाण्यात सौंदर्यवृद्धी तर होतेच परंतु स्वररचनेत नावीन्य निर्माण होते. अशी बरीच सौंदर्यस्थळे गाण्यात विपुल सापडतात, तेंच अशी सौंदर्यपूर्ण रचना आजमितीस रसिकांच्या मनात स्थान मिळवून आहे, ते काही उगीच नव्हे. कहीं दीप जले कहीं दिल जरा देख ले आकर परवाने तेरी कौन सी है मंझील कहीं दीप जले कहीं दिल मेरा गीत मेरे दिल की पुकार है जहाँ मैं हूं वही तेरा प्यार हैं मेरा दिल हैं तेरी महफिल जरा देख ले आकर परवाने ना मैं सपना हूँ ना कोई राज हूँ इक दर्द भी आवाज हूँ पिया देर ना कर आ मिल जरा देख ले आकर परवाने दुश्मन हैं यहाँ हजारो यहाँ जान के जरा मिलना नजर पेहचान के कई रूप में हैं कातिल जरा देख ले आकर परवाने Kahin Deep Jale Kahin Dil with lyrics | कहीं दीप जले कहीं दिल | Lata Mangeshkar | Bees Saal Baad - YouTube

No comments:

Post a Comment