Tuesday 8 September 2020

बांध प्रीती फुल डोर

हिंदी चित्रपटात गाणी फार असतात असे नुसते म्हणणे म्हणजे फार ढोबळ विधान करणे होय. भारतीय संदर्भात कशालाही गीत म्हणण्यासाठी चार वळणे पुरी करावी लागतात. लयबद्ध गद्य, पठण, पद या साच्याची गठण आणि कलासंगीतातील रचनातत्वांचा लघुतम वापर करून सिद्ध होणारी कृती. हे चार मार्ग लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. ज्याला गीत म्हणायचे आहे, त्यापासून हे चार मार्ग व्यवस्थितपणे निराळे करावे लागतात. इथे गीताची साधी व्याख्या करून व संगीताला एकविध आविष्कार समजून सुटककारुन घेण्याचा मोह होणे साहजिक आहे. भारतीय आणि खरे पाहता कोणत्याही टिकाऊ संस्कृतीत, विविध जीवनक्षेत्रांनी मिळून तयार होत असलेल्या जीवनबंधाचा संगीत हा केवळ एक घटक असतो. म्हणून संगीत म्हणजे काय ते समाजाने म्हणजे विविध आणि अनेक संदर्भात संगीत कसे वागते त्याचे भान येणे होय. परिणामतः संगीताचा चित्रपटातील अवतार समजून घ्यायचा तर निराळे प्रयत्न करणे जरुरीचे आहे. याच विवेचनातून एक प्रश्न उद्भवतो - संगीत म्हणजे गाणे, वाजवणे, नाचणे वा राग-ताल वगैरे वापरणे असे म्हणून चालेल का? खरतर या प्रश्नाच्या अनुरोधाने चित्रपट संगीताचा आणि पर्यायाने चित्रपटगीतांचा अतिशय सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण व्यासंग होणे गरजेचे ठरते. याच विवेचनाच्या अनुरोधाने आपण आजचे गीत ऐकायचे आहे. चित्रपट १९५१ सालाचा आहे म्हणजे एकूणच चित्रपटाचा विषय, प्रसंग याबाबत फारसे काही लिहिण्यासारखे नाही. किंबहुना हिंदी चित्रपटांपैकी फारच मोजके असे चित्रपट असे आहेत जिथे शिळपट विषय असूनही हाताळणी विलक्षण असते आणि झिजवट नाण्याला पुन्हा झगझगीतपणा प्राप्त करून दिला जातो. असो, असे असून देखील काहीवेळा कवितेबाबत आश्चर्य वाटावे अशा शब्दरचना वाचायला मिळतात. गाण्यातील कविता कशी असावी याबाबत कसलेच आडाखे नाहीत. आपापल्या मगदुराप्रमाणे कविता लिहिली जाते आणि मळलेल्या वाटेवर चमकदार काहीतरी बघायला मिळते परंतु अशी अपेक्षा बव्हंशी फलद्रुप होत नाही. आजच्या गाण्यातील कविता ही अशीच बाळबोध, साधी अभिव्यक्ती असलेली आहे. याच्या समर्थनार्थ असे म्हणता येईल, चित्रपटाचा विषय बाळबोध, हाताळणी सरधोपट मग जिथे सर्वात शेवटी चित्रपट गीत येते, त्याच्यावर प्रभाव पडल्याविना कसे होईल!! कवी नरेंद्र शर्मा यांची शब्दकळा आहे. नरेंद्र शर्मा हे प्राय: हिंदी भाषिक अभ्यासक आणि अभिमानी लेखक त्यामुळे त्या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रपट गीतांत पडते. एकूणच जुन्या संस्कृतीचे अभिमानी असल्याने त्यांनी वापरलेल्या प्रतिमा या त्यावेळच्या साहित्यातून उमटलेल्या संवेदना असतात. "मन के किवड खोल" किंवा मन लेके चित चोर" या ओळी असेच भावविश्व दाखवतात. अत्यंत अल्पाक्षरी रचना असून बराच सरधोपट शब्दांचा वापर आहे, त्यामुळे "कविता वाचन" याचा किंचितही आनंद मिळत नाही. फक्त गेयताबद्ध आणि लयबद्ध रचना इतकेच वैशिष्ट्य सांगता येईल. संगीतकार सुधीर फडके यांची स्वररचना आहे. सुधीर फडके ही मराठी चित्रपट क्षेत्रातील मातब्बर नाव परंतु त्यामुळे असे झाले असावे, मराठी चित्रपट क्षेत्रात अधिक गुंतत गेल्याने, त्यांनी फार थोडे हिंदी चित्रपट केले. मराठी संस्कृतीमधील जे संगीतकार हिंदी चित्रपट सृष्टीत गेले, त्यांच्यावर "मराठी संस्कृतीचा" जाड अथवा पातळ ठसा उमटलेला दिसतो - कदाचित सी.रामचंद्र अपवाद असावेत. याचा परिणाम असा झाला, सुधीर फडक्यांच्या बहुतेक चालींवर मराठी ठसा दिसतो. अर्थात हे दोषदिग्दर्शन नव्हे कारण, अशा विधानात, नौशाद - उत्तर प्रदेश किंवा सचिन देव बर्मन - बंगाल अशी नामावली घेता येईल.तेंव्हा सुधीर फडक्यांच्या चालीवर मराठी ठसा दिसतो, हे काही टीकेचे सक्षम कारण असू शकत नाही. "मन लेके चित चोर" या ओळीकडे जरा बारकाईने लक्ष दिल्यास, त्यावरील "मराठी संस्कृतीचा जाड ठसा दिसतो. एका बाजूने विचार केल्यास ही टीका संगीतकार वसंत देसाईंबाबत देखील करता येईल. संगीतकार वसंत देसायांच्या स्वररचनेवर मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांचा प्रभाव दिसून येतो म्हणजे पर्यायाने मराठी संस्कृतीचाच प्रभाव दिसतो. जसे मी एक विधान वरती केले, त्या अनुरोधाने बोलायचे झाल्यास, अशा सांस्कृतिक प्रभावाच्या जोखडातून कुठलाही संगीतकार सुटलेला नाही. सुधीर फडक्यांवर टीका केली जाते याचे कारण संगीतकार मराठी सांगीतिक क्षेत्रात वावरत असल्याने, मराठी संस्कृतीशी परिचय असणे स्वाभाविक होते. त्याचाच परिणाम जेंव्हा हिंदी चित्रपटात संगीत द्यायची वेळ आली, तेंव्हा दिसून आला. त्यामुळे प्रश्न इतकाच उरतो, कवीने दिलेल्या कवितेशी, हा संगीतकार किती प्रामाणिक राहिला? आणि या प्रश्नातच त्यांच्यावरील टीकेचे उत्तर आहे तेंव्हा सुधीर फडक्यांच्या चालीवर मराठी ठसा दिसतो, हे काही टीकेचे सक्षम कारण असू शकत नाही. चालीकडे वळायचे झाल्यास, "जयजयवंती" रागाचे सुस्वरूप या गाण्यातून दिसते. "खमाज" थाटातील "औडव - संपूर्ण" अशा रागात आरोही सप्तकात "गंधार, धैवत" स्वर वर्ज्य आहेत. या रागाच्या बाबतीत एक गंमत आढळते. "देस रागाच्या अंगाने गेल्यास वरील आरोह-अवरोह मिळतात परंतु "बागेश्री" अंगाने गेल्यास रागाचे स्वरूप "संपूर्ण-संपूर्ण" असे मिळते परंतु प्रचलित स्वरूप हे "देस" रागाच्या अंगानेच घेतले जाते. सुरवातीच्या सतारीवरील स्वरांचे रूप हे याच रागाची ओळख करून देतात आणि पुढील रागाची स्वररचना याच सुरांना धरून बांधलेली आहे. प्रणयी थाटाचे गाणे आहे आणि एकूणच त्या काळातील गाणी ऐकली तर वाद्यमेळ हा शक्यतो भारतीय असावा आणि कमीतकमी असावा, अशाच थाटात केली गेली आहेत. इथे या गाण्यात तेच झालेले आहे. सतार, बासरी आणि व्हायोलिन इतपतच वाद्यमेळात भरणा आढळतो. चाल अगदी साधी, सरळ आहे. कुठेही चलन वक्र नाही की लय वरच्या सप्तकात गेली आहे, असे ऐकायला मिळत नाही शांत, मुग्ध स्वरूप संपूर्ण गाण्यात दरवळत आहे. दोन अंतरे आहेत आणि त्याची समान बांधणी आहे. त्यामुळे गाण्यातील सात्विकता अधिक ठळक होते. गाण्यातील हरकती या अशाच धर्तीवर घेतलेल्या आहेत. कदाचित याच साधेपणामुळे हे गाणे काहीसे विस्मरणात गेले असावे. या गाण्यात आपल्याला खरे आकर्षित करते ते, लताबाईंची नितळ गायन. गाण्याची प्रकृती नेमकी ध्यानात घेऊन, त्यातील हरकतीच्या जागा टिपून घेऊन, गायन करणे, हे एक वैशिष्ट्य मानले तर या गाण्यातील निरलसता खरोखरच अप्रतिम आहे. मुखड्याच्या पहिल्या ओळीपासून या भावनेचा अचूक प्रत्यय येतो. मी वर लिहिले तसे चाल बरीचशी बाळबोध आहे परंतु लताबाई गायन करताना त्यातील "गायकी"च्या जागा शोधतात. मग शब्दोच्चार करतानाची लय असेल किंवा शब्द संपवताना घेतलेली हरकत असेल. पहिला अंतरा गाताना, पहिली ओळ किंचित वरच्या सुरांकडे झुकत संपते परंतु "भूल जाना ना, भूल जाना ना..." या ओळीवर अंतरा संपवताना ज्या हळुवारपणे लताबाई सुरांच्या पायऱ्या उतरत येतात ते अनुभवावे असेच आहे. त्यामुळे गायन जरी सहज, साधे आहे पण कुठेही ढिसाळ किंवा विसविशीत होत नाही. बांध प्रीती फुल डोर मन लेके चित चोर दूर जाना ना, दूर जाना ना.... मन के किवड खोल मित मेरे अनमोल भूल जाना ना, भूल जाना ना....... कैसे सहू विरह मन में रहा है मोह रूठ जाना ना, रूठ जाना ना..... बांध प्रीती फुल डोर मन लेके चित चोर दूर जाना ना, दूर जाना ना.... https://www.youtube.com/watch?v=H9dawzidOBM

No comments:

Post a Comment