Thursday 10 September 2020

मेरी भिगी भिगी सी

हिंदी चित्रपटांचे अनेकदा विषयानुरूप वर्गीकरण केले जाते परंतु बहुतेक चित्रपटातील संगीत शैलीसंबंद्ध, बांधणीशी निगडित किंवा चित्रपटीय तर्कशास्त्रानुसार आपला मार्ग चोखाळते. बहुदा गीतात हाताळलेले विषय आणि त्यांच्या चलनांत भर दिलेले सांगीत अंग यानुसार गीतप्रकाराची निश्चिती केली जाते. सांगीत विश्लेषणाकरिता गीताच्या बांधणी-घटकांची व्यवस्था कशी लावली आहे, हे समजून घ्यावे लागते. उदाहरणार्थ कलासंगीतातील बंदिश या प्रकारात स्थायी,अंतरा आणि मुखडा हे घटक गीताची बांधणी निश्चित करतात. पद्यशास्त्रीयदृष्ट्या ज्या प्रकारांची बांधणी जरा पक्की असते त्यांत धृपद, कडवे व धृपद असा क्रम पाळलेला दिसतो. चित्रपट गीतांत यासारख्या रूढ विभागांऐवजी मुखडा व मग एकामागोमाग येणारे अंतरे असे २ विभाग मानून रचना केली जाते. यामुळे गीतकाराला अधिक स्वातंत्र्य मिळते. याच पार्श्वभूमीवर आपण आजचे गीत बघणार आहोत. चित्रपट गीतांत "भावकविता" असावी असे नेहमी म्हटले जाते पण म्हणजे नक्की काय असायला पाहिजे? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात.याच विचाराला धरून आजच्या गाण्यातील कविता बघायला गेल्यास, कवी मजरुह सुलतानपुरी यांची शब्दकळा बऱ्याच अपेक्षा पूर्ण करते असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. चित्रपट गीत हे जात्याच अल्पाक्षरी असावे लागते आणि महत्वाचे म्हणजे चित्रदर्शी शैली असावी लागते. "जैसे बिरहा की रुत मेंने कटी तडपाके आहें भर भरके" या ओळीचा संदर्भ मुखड्यातील दुसऱ्या ओळीशी - जले मन तेरा भी, किसी के मिलन को, अनामिका तू भी तरसे" या ओळीशी ताडून बघितला तर लगेच सगळी संगती लागते. चित्रपटातील नायकाची व्यथा हे तर खरेच आहे परंतु व्यथा मांडताना, सुरवातीलाच "मेरी भिगी भिगी सी, पलको में रह गये" अशी ओळ लिहून मजरुह सुलतानपुरी यांनी आशय स्पष्टपणे अधोरेखित केला आहे. आधुनिक काळातील प्रयोगशील संगीतकार राहुल देव बर्मन यांनी या गाण्याला चाल लावली आहे. चाल थोड्या आडमार्गाने ऐकल्यास "किरवाणी" रागाशी निगडीत आहे. "गंधार" आणि "धैवत" स्वर कोमल लागत असल्याने, रागाच्या ठेवणीतच लालित्य अमुर्तपणे सापडते. शास्त्रकारांच्या मते रागाचा समय मध्यरात्र दिलेला आहे. अर्थात जरी इथे रंगाची ओळख दिलेली असली तरी एकूणच गाण्याची ठेवणं, स्वरांचे चलन आणि गायनाचा पेहराव हा प्रचलित कलासंगीतातील रागस्वरूप टाळण्याकडे अधिक आहे. संगीतकाराने गाण्यात केरवा ताल वापरला आहे परंतु तालाचे स्वरूप देखील परंपरेला डावलून ठेवलेले आहे. वेगळ्या भाषेत मांडायचे झाल्यास, समेची मात्रा "धा" ही गिटारच्या आवाजात मिसळून घेतलेली आहे आणि पुढील मात्रा या Actopad या वाद्यावर घेतलेल्या आहेत. परिणामी गाण्यात हा ताल वावरताना आपले अस्तित्व बाजूला ठेऊन वावरतो. सुगम संगीतात प्रयोग कसे करता येतात, याचे हे उत्तम उदाहरण मानता येईल. तालासाठी या संगीतकाराने अनेक वैश्विक वाद्यांचा उपयोग केला आहे, जसे "मादल","क्लेव्ज",'ब्लासको" किंवा प्रसंगी ज्याला "न-स्वरी" वाद्ये म्हणता येतील, उदाहरणार्थ झांजेसारखी घन वाद्ये, झायालोफोन, केस्टानेट, खुळखुळे सारख्या वाद्यांचा परिणामकारक उपयोग, हे प्रयोगात्वाचे निर्देशक म्हणता येईल.मुळात, परिणाम साधणे, हे प्राथमिक उद्दिष्ट. स्वरसंहतीतत्वावर आधारलेल्या भारतीय संगीतासारख्या पद्धतीत एका वेळेस एक स्वर आणि पुढे दुसरा, असे पायाभूत वळण असते. या लक्षणालाच बाजूला सारण्याची धमक दाखवली. आवाजांचे लगाव, तुटक गायन फेक, घसीट किंवा खालच्या स्वरावरून वरच्या स्वरावर जाताना दबाव निर्माण करणे, छोटेखानी ध्वनी विलक्षण चमकदारपणे योजणे, यामुळे संबंधित सांगीत घटना गुंतागुंतीची होते. यातून आपण ठामपणे एक निष्कर्ष सहज काढू शकतो. याचे संगीत, रचनाकाराच्या संभवनीय सर्जनशीलतेच्या दर्जाविषयी खात्री पटविणारे संगीत आहे. त्याने संगीत आकारले ते चित्रपटीय सादरीकरणासाठी. परस्परविरोध, विरोधाभास आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे आकर्षण म्हणजे आधुनिक सांगीत संवेदनशीलता. हे गाणे वास्तविक काहीसे अंतर्मुख करणारे गीत आहे पण ती अंतर्मुखता मांडताना, संयमित भावनावेग आविष्कृत शास्त्रोक्त बाज, किंचित पातळ करून, अतिशय चांगल्या कामी लावला आहे, असे आपल्याला सहज म्हणता येईल. वाद्यांच्या वापरातून आणि रूढ सुरावटीच्या सूचनेतून, ही रचना आपले स्वतंत्र स्वरूपच व्यक्त करीत आहे.तसे बघितले सुरावट सरळ जात आहे पण लयबंध तिरकस जातो आणि आपल्याला ही रचना काहीशी अस्वस्थ करते. गाण्यातील कवितेच्या भावाशयाशी नाते राखून केलेली ही रचना, आपण सहज गुणगुणू शकतो. गायक किशोर कुमार हे काही रूढार्थाने संगीताचा पायाभूत अभ्यास केलेले गायक नव्हेत परंतु त्यांनी, आपल्याला मिळालेल्या नैसर्गिक देणगीचा जाणीवपूर्वक वापर करून पार्श्वगायनात बरेच नवीन मानदंड प्रस्थापित केले. त्यांच्या कंठगत-कारागिरीची फार मोठा विस्तृत पट्टा ही त्यांच्या जमेची फार मोठी बाजू आहे. याबाबतीत समकालीनांत त्यांचा हात धरणारा कुणीही आढळत नाही. एका गायकांकडून इतके परिणाम मिळणे ही गोष्ट अजिबात सामान्य नव्हे. किशोर कुमार जे कण्ठध्वनिपरिणामपट उपलब्ध करून देऊ शकत, त्यात पुढील काही गोष्टींचा समावेश करता येईल. यॉडलिंग आणि शिट्टी, विविध स्वरवर्णांवर हुंकारयुक्त गायन, ला ला ला वगैरेंचे गायन, नि:श्वास, खाकरणे - खोकणे, हा ही हू हे ध्वनी, अर्धमूक्त, पूर्णमुक्त वा खुला आवाज. मी इथे मुद्दामून ही सगळी वैशिष्ट्ये मंडळी आहेत जरी प्रस्तुत गाण्यात या सगळ्यांचा, विशेषतः "यॉडलिंग" किंवा " हा ही हू" सारखे ध्वनी यांचा आढळ नसला तरी. शब्दातील नेमका अर्थ जाणून घेऊन "भोगवादी" अंगाने गायन करणारे दोनच गायक. १) आशा भोसले, २) किशोर कुमार. शब्दोच्चार करताना, आशय अधिक घट्ट, खोलवर निर्देशित करण्यात किशोर कुमार यांचा हात धरणे अवघड आहे. प्रस्तुत गाण्यात अशा बऱ्याच "जागा" ऐकायला मिळतात. गाणे अत्यंत शांत, संयत पद्धतीने गायले आहे. किंबहुना गाण्यात अशा उलगडून दाखवाव्या अशा खास जागा नाहीत पण तरीही एक गाणे म्हणून गायन करताना, त्याच्यावर आपल्या गायकीची अमीट छाप टाकलेली आहे. ही बाब सहज जमण्यासारखी नाही. मेरी भिगी भिगी सी, पलको में रह गये जैसे मेरे सपने बिखर के जले मन तेरा भी, किसी के मिलन को अनामिका तू भी तरसे तुझे बिन जाना, बिन पहेचाना मैने हृदयसे लगाया पर मेरे प्यार के बदले में तुने मुझको ये दिन दिखलाया जैसे बिरहा की रुत मेंने कटी तडपाके आहें भर भरके आग से नाता, नारी से रिश्ता काही मन समझ ना पाये मुझे क्या हुआ था, एक बेवफा पे है मुझे क्यूँ प्यार आया 'तेरी बेवफाई पे हंसे जग सारा गली गली गुजरे जिधरसे https://www.youtube.com/watch?v=WYR7gGavVuE

No comments:

Post a Comment