Monday 20 May 2019

श्रीनिवास खळे

मराठीतील नावाजलेल्या मोजक्याच संगीतकारांमध्ये श्रीनिवास खळ्यांचे नाव आवर्जूनपणे घ्यावे  लागते. निव्वळ लोकप्रियता म्हणून बघायला गेल्यास, खळेकाका कधीही प्रचंड लोकप्रिय नव्हते, त्यांची काही गाणी खूप गाजली, आजही रसिक मनावर गारुड घालून आहेत पण खळेकाका कधीही प्रसिद्धी, लोकप्रियता असल्या गोष्टींवर अवलंबून राहिले नाहीत. हातात कविता आली की त्याला चाल लावायला घ्यायची हा नेम त्यांनी आयुष्यभर पाळला. त्यादृष्टीने "आधी शब्द मग चाल" या पंथाचे आग्रही संगीतकार होते आणि या आग्रहापायी त्यांनी आयुष्यात अनेक संधी नाकारल्या देखील होत्या. त्यांचे नेहमीचे म्हणणे असे - चाल ही कवितेला लावायची असते आणि त्यामुळे हातात शब्दरचना येणे अत्यावश्यक. आयुष्यात त्यांनी अशी काही तत्वे पाळली होती आणि त्यापायी खळेकाकांना आर्थिक आपदांना तोंड द्यावे लागले होते. परंतु खळेकाका निष्ठावंत आणि तत्वांना कायम धरून बसणारे होते, त्यातील एक आग्रह म्हणजे गाण्यातील "जागा" त्यांना जशा हव्या आहेत तशाच, गायकांकडून काढून घ्यायच्या. तिथे त्यांनी अपवाद वगळता तडजोड स्वीकारली नव्हती. 
थोडा विचार केला तर ४,५ चित्रपट, २,३ नाटके आणि २००, २५० भावगीते इतपतच सांगीतिक संसार असे म्हणायला लागेल. अर्थात ही आकडेवारी क्रियाशील सर्जनशीलतेचे उदाहरण ठरत नाही. खळेकाका यांचा उल्लेख करताना "बुद्धीवादी संगीतकार" असा बरेचवेळा केला जातो. आता "बुद्धीवादी" शब्द वापरणे  सोपे असले तरी या संज्ञेचा अर्थ लावणे तितके सोपे नक्कीच नाही. काही  उदाहरणे बघू. " या चिमण्यांनो परत फिरा" , "अगा करुणाकरा", "सहज सख्या एकटाच येई सांजवेळी" ही आणि  काही गाणी ऐकली तर "पुरिया धनाश्री" किंवा "तोडी" रागाच्या सावलीतील स्वररचना आहेत. खळेकाका यशस्वीपणे त्या रागांची छाया निर्माण करतात, विस्तार न करता देखील गायिकेला अनपेक्षित तरीही शोभाकर अशा सुरावटी देतात, वाद्यांना आपले अस्तित्व जाणवून देता यावे इतपतच लयीची गती ठेवतात आणि हे सर्व करताना मर्यादित तारतेची स्वरपट्टी ठेवतात (मध्येच एखादा अंतरा तार सप्तकात जातो पण मुखड्याकडे वळताना, चालीचा ताण कमी केला जातो) बरे या गाण्यांत तालाचे चलन, विशेषतः: "या चिमण्यांनो परत फिरा" या गाण्यात तालाचे चलन असे ठेवले आहे की ठाय लयीत असून तिकडे लक्ष द्यावेच लागते. तसेच शब्दांच्या मध्ये आणि अंताला खळेकाकांनी काही चमकदार हरकती दिल्या आहेत. या शिवाय काही ठिकाणी शब्द एका निश्चित स्वरावर न संपवता, फक्त निर्देश केला आहे. खळेकाकांच्या स्वररचना बुध्दिवादी असतात त्या इथे.
आणखी एक खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, हातात आलेली कविता, विशिष्ट दर्जा राखून असेल तरच त्यांनी संगीतबद्ध करायला घेतल्या. मंगेश पाडगावकरांच्या कविता त्यांनी अधिकाधिक स्वरबद्ध केल्या, हा निव्वळ योगायोग नव्हे. कवितेतील आशयाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आणि तो जो दडलेला आशय असतो, त्याला स्वरांतून खोलवर असे मूर्त स्वरूप देण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे एकूण वाटचाल ही अमूर्ताकडून मूर्त स्वरुपाकडे अशीच झाली. 
खळेकाकांचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, साधे, मधुर तसे पाहता परिचयाचे बारकाव्यांनी भरलेले आणि स्वरविस्तार शक्यता असलेले संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत असत. "कमोदिनी काय जाणे" किंवा "शुक्रतारा मंद वारा" तसेच "पहिलीच भेट झाली" ही गाणी वानगीदाखल अभ्यासायला हवीत. कुणालाही या गीताचे मुखडे सहज लक्षात येतील आणि गुणगुणावेसे वाटतील. किंबहुना एक मुद्दा इथे ठामपणे मांडावासा वाटतो. कुठल्याही स्वररचनेची मूलभूत ओळख ही नेहमीच मुखडा कसा बांधला आहे, या कौशल्यावर असतो. खळेकाकांच्या गाण्यातील मुखडे या दृष्टीने ऐकण्यासारखे आहेत. मुखडे ऐकताना, आपण सहज गाऊ शकतो असा आभास निर्माण करतात परंतु बरेचवेळा त्यापुढील अंतरे वेगळ्याच स्वरांवर येतात आणि बारकाईने ऐकणारा काही वेळा नि:स्तब्ध होतो. अंतरा संपताना तो कशाप्रकारे मुखड्याशी जोडला गेला आहे, हे वैशिष्ट्य खळेकाकांच्या बहुतेक गाण्यात आढळून येते. 
तालाच्या बाबतीत त्यांनी नेहमीच ताल हे पारंपरिक पद्धतीने वापरले आहेत. याचा परिणाम असा झाला, त्यांची चाल कधीही शब्दांवर कुरघोडी करीत नाही. इथे शब्द वावरतो तो भाषिक आणि सांगीत ध्वनीचा समूह म्हणून. त्यामुळे खळेकाकांना अतिशय चांगल्या अर्थाने "कारागीर" असेही म्हणता येईल. "काल पाहिले मी स्वप्न गडे" हे गाणे वानगीदाखल बघूया. गीताला आधार किंवा पाया हा "गौडसारंग" रागाचा आहे. गाण्याचा मुखडा फक्त ५ स्वरांच्या गुंतागुंतीच्या बांधणीतून आपल्या समोर येतो. चालीची सामान बांधणी पुढे केली आहे पण तशी करताना, थोडे तांत्रिक भाषेत सांगायचे झाल्यास, पुढील अंतरा मध्यम स्वराला षड्ज मानून पुढे येतो. याचा परिणाम असा होतो, गीताच्या भावनेचा उत्कर्ष आणि तिचे स्फटिकीभवन अप्रतिम होते. आपण सुरावटीची पुनरावृत्ती ऐकत नसून एका भारून टाकणाऱ्या स्वरबंधाची प्रतीती येते. 
त्यांच्या सर्जनशीलतेला संगीत आणि काव्य यांच्या दरम्यानची देवाण-घेवाण हीच अधिक मानवत असे. आपल्या सांगीत भांडवलात फार लोकांनी भागीदारी मागावी, हे पटत नसे. या शिवाय आपल्या सांगीत विधानात थोडातरी बौद्धिक अंश असावा, यावर त्यांची निष्ठा होती. ललित संगीतात असे काही करण्यासाठी भाराभार संधी मिळत नसतात आणि याचेच प्रतिबिंब त्याच्या एकूणच सगळ्या कारकिर्दीवर  पडले,असे म्हणता येते. 

No comments:

Post a Comment