Tuesday 29 January 2019

तुझ्या कांतीसम रक्तपताका

प्रत्येक समाजात, जमातीत काहींना काही तरी संस्कार असतात, व्रते असतात आणि एका बाजूने बघितले तर त्या संस्कारांनी आपले आयुष्य थोड्याफार प्रमाणात तरी अर्थपूर्ण बनत असते. प्रत्येक संस्कार हा अर्थपूर्णच असतो असे नव्हे पण सगळेच संस्कार टाकाऊ असतात का? हा प्रश्न देखील टाकाऊ नसतोच. या दृष्टीने सध्या काहीसा कालबाह्य झालेला संस्कार म्हणजे सकाळी उठून सडासंमार्जन करून, घरासमोरील छोट्या अंगणात रेखीव  पांढरी रांगोळी काढून, धूत वस्त्रांनिशी तितक्याच लहानशा तुळशी वृंदावनाची पूजा करणे!! अर्थात हल्ली, असे घर मिळणे, हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात इतका निवांतपणा मिळणे, इत्यादी असंख्य प्रश्नांनी या एका सुरेख संस्काराला जवळपास कायमची तिलांजली दिली, हे मात्र तितकेच खरे. इथे हा संस्कार चालू ठेवायचा की नाही? हा प्रश्न नसून हा संस्कार विलयाला गेला, हे सत्य आहे. याच संस्काराला जोडून भूपाळी जन्माला आली. पहाटेच्या वेळी, सगळीकडे शांतता पसरलेली असताना, अत्यंत निर्व्याज मनाने केलेली ही पूजाच होती. 
अशीच एक भूपाळी आपण इथे आस्वादणार आहोत. पूर्वीच्या मराठी चित्रपटात भूपाळी ही असंख्य वेळा वावरली आहे. किंबहुना चित्रपटातच नव्हे तर मराठी खाजगी भावगीतात देखील अनेक भूपाळी गीतांनी  मानाचे स्थान मिळवले आहे. भूपाळी या शब्दातच भूप रागाचा अर्थ दडलेला आहे आणि बहुदा त्यामुळेच बहुतेक सगळी गाणी ही याच रागाशी जुळलेली असावीत. 
माडगूळकरांचे शब्द हा खरतर स्वतंत्र निबंधाचा विषय आहे. संस्कृत साहित्य आणि मराठी संस्कृती, दोन्हींचा अचूक आणि नेमका वापर त्यांच्या कवितेत आढळतो. भूपाळी हा मुळात पारंपरिक विधी तेंव्हा त्याबाबत कविता लिहिताना, माडगूळकर संस्कृत साहित्यातून अनेक उपमा उचलतात आणि आपल्या रचनेत चपखल बसवतात. कविता लिहिताना, प्रत्येक शब्दाचा, त्याच्या मागील तसेच पुढील शब्दांशी जोड लावताना, त्यातून आशयवृध्दी कशी होईल आणि त्यायोगे सगळीच कविता घाटदार कशी होईल, याचा नेमका विचार वाचताना बघता येतो.  बघायचे झाल्यास, पहिल्याच ओळीत, गणपतीच्या त्वचेचा लाल रंग - त्या रंगाचा रक्ताशी जोडलेला संबंध आणि पहाटेच्या हळुवार वाऱ्यावर हलणाऱ्या पताकांचे "फडकती" शब्दाशी नेलेले नाते!! तसेच पुढील ओळीत सूर्याचा उल्लेख "अरुण" शब्दाने केलेला आणि यालाच लागून, पहाट शब्दाऐवजी "प्रभात" शब्द योजून कवितेला वेगळेच परिमाण दिले आहे. खरतर हे चित्रपट गीत न वाटता, एखादी सुंदर भावकविताच आहे, असा मोह होतो. 
संगीतकार स्नेहल भाटकरांचे आहे. मूळचे भजनी संप्रदायातील कलाकार परंतु जात्याच कवितांना चाली लावण्याचा छंद, यामुळेच त्यावेळच्या सुप्रसिद्ध H.M.V. कंपनीत नोकरी. संगीतकार म्हणून विश्लेषण करायचे झाल्यास, चाली या अतिशय शब्दानुकूल तरीही सरळ, साध्या असायच्या. प्रयोगशीलता फारशी आढळत नाही. हिंदी चित्रपटांत देखील वावर होता पण तरीही जम बसला नाही. शब्दांना गोंजारून चाली लावण्याचा कल दिसतो. याचाच परिणाम असा झाला, चाल  लावताना,शब्दांची मोडतोड किंवा भरमसाट तानांच्या भेंडोळ्या सोडायच्या किंवा मोठा ऑर्केस्ट्रा (मराठी गाण्यांच्या बाबतीत असे भाग्य जवळपास नाहीच्या अंगानेच होते) पदरी बाळगायचा, असले काहीही नसायचे. एकूण चित्रपटांची संख्या बघायला गेले तर १९४७ पासून कार्यरत असलेला कलाकार परंतु हिंदी चित्रपटांची संख्या ५० देखील नाही!! मराठीत देखील असाच प्रकार दिसतो. संख्येने कमी असल्याने विश्लेषण करणे, काही प्रमाणात जड जाते, कारण एकच एक शैली तयार होत नाही. अर्थात शैली तयार होणे, हा चुकीचा निकष आहे, असे म्हणायलाच हवे. 
गाण्याच्या सुरवातीलाच सतारीच्या पीस आहे, ज्यातून चालीचे कुळशील आणि अंदाज समजून घेता येतो आणि चाल मुखड्याकडे कशी वळणार आहे, याचा अंदाज देखील अजमावता येतो. गाण्याचा मुखडा सुरु होतो आणि तबल्याच्या नादाबरोबर जरा खालच्या आवाजात छोट्या झांजेचा ध्वनी ऐकायला मिळतो. झांजेचा आवाज अगदी हलका आहे पण आपल्या मराठी संस्कृतीत या वाद्याला फार वेगळे महत्व आहे. चाल अगदी साधी पण अतिशय गोड़ अशीच आहे. मुखड्यातील दुसऱ्या ओळीतील "प्रभात' शब्द घेताना चाल वरच्या पट्टीत जाते तरीही संपूर्ण चाल ही मध्य सप्तकातच फिरत आहे. 

तुझ्या कांतीसम रक्तपताका, पूर्वदिशी फडकती 
अरुण उगवला, प्रभात झाली, उठ महागणपती. 

पहिल्या अंतऱ्याच्या आधीचे सतारीचे स्वर जरा बारकाईने ऐकले तर मुखडा सुरु होतानाचे सतारीचे स्वर आणि यावेळचे सतारीचे स्वर म्हणजे पहिल्या स्वरिक आशयाची पुढील पायरी आहे.याचाच अर्थ चाल बदललेली नाही. संपूर्ण गाणे हे गणपतीचे स्तवन असल्याप्रमाणे असल्याने, शब्दरचनेत गणपतीच्याच पारंपरिक कल्पना, वैशिष्ट्ये आली आहेत. 

सूर्याआधी दर्शन घ्यावे, तुझे मूषकध्वजा 
शुभद सुमंगल सर्वांआधी, तुझी पाद्यपूजा 
छेडूनी वीणा जागविते तुज सरस्वती भगवती 

हे गाणे ऐकतानाआपल्याला आपल्याला कवी आणि संगीतकार याचबरोबर गायिका सुमन कल्याणपूर यांचे देखील नाव घ्यावेच लागेल. गायिका म्हणू फार मोठ्या अवाक्याची परंतु दुर्दैवाने कारकीर्द बहुतांशी मराठी भावगीतांपुरतीच शिल्लक राहिलेली!! खरतर लताबाईंच्या आवाजाशी नाते सांगणारी गायकी होती परंतु लताबाईंच्या सार्वभौमत्वामुळे सगळीच कारकीर्द लताबाईंच्या सावलीतच राहिली. सुमन कल्याणपूर यांचा आवाज सुरेल, हलका आणि पारदर्शक आहे. भडक नसलेले स्वनरंग आणि त्यांच्या सूक्ष्म छटा या आवाजात विपुलतेने आढळतात. परिणामतः त्यांच्या गायनातून विस्तीर्ण भावपट धुंडाळता येतो. आवाजावर शास्त्रीय संगीताचा गाढ संस्कार झाला आहे असे जरी जाणवत नसले तसेच तसेच खास पुरावा मिळत नसला तरी संबंधित शैली अवगत करणे शक्य होते, हे जाणवत राहते. 

आवडती तुज म्हणुनी आणली रक्तवर्ण कमळे 
पाचमण्यांच्या किरणांसम हे हिरवी दुर्वादळे 
उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेऊनिया आरती 

याच गाण्याचा संदर्भ घेऊन बोलायचे झाल्यास, "आवडती तुज म्हणुनी आणली रक्तवर्ण कमळे" ही ओळ गाताना, "आवडती तुज" ३ वेळा, वेगवेगळ्या हरकतींनी नटवून गायले आहे  या हरकती ऐकताना, 
पल्याला समजून घेता येतो  तो,या गायिकेच्या गळ्याचा पल्ला आणि नजर. 

शूर्पकर्णका, उठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा 
तिन्ही जगाचा तूच नियंता, विश्वासी आसरा 
तुझ्या दर्शना अधीर देवा, हर, ब्रह्मा पती 

या बाबतीत आणखी काही विधाने ठामपणे करता येतील. लताबाईंनी आवाज आणि लगाव या बाबतीत जे कौशल्य आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दाखवले त्याच्या जवळपास पोहोचल्या त्या फक्त सुमन कल्याणपूर!! त्यांच्या वाट्याला अधिक संधी मिळाल्या असत्या, अधिक टिकाऊ चित्रपट आणि चाली मिळाल्या असत्या तर लताबाईंना पर्यायी केंद्र म्हणून प्रस्थापित होऊ शकल्या असत्या. किंबहुना पुढे जाऊन असे देखील विधान करता येईल, काही गीतप्रकारांबाबतचे लताबाईंच्या एकाधिकारास आव्हान देण्यासाठी आवश्यक ती सामग्री सुमन कल्याणपुर यांच्याकडे असून देखील ते होऊ शकले नाही, हे दुर्दैव. 



No comments:

Post a Comment