Monday 14 November 2022

जे वेड मजला लागले

खरंतर कुठलीही भावना ही आंतरिक प्रेरणेशिवाय प्रकट होत असेल तर तिला विसविशीत स्वरूप प्राप्त होते. आंतरिक प्रेरणा ही सततच्या चिंतनाने मनात येऊ शकते. त्यासाठी विचारांची कास धरणे आवश्यक असते. आपण बहुतेकवेळा इथेच कमी पडतो. चित्रपट गीतांचा स्वतंत्रपणे विचार करताना, हा मुद्दा विचारार्थ घ्यावा लागतो. सातत्याने, त्याच त्याच विषयावर कविता लिहिणे, हे चित्रपट माध्यमामुळे आवश्यक असले तरी देखील सातत्याने चिंतन केल्यास, कवितेत वेगळेपण आणि वेगळी अभिव्यक्ती आणता येऊ शकते. मानवी प्रतिभेच्या मर्यादा ध्यानात घेऊन हेच विधान करता येऊ शकते. इथे प्रतिभा या शब्दाचा अर्थ फक्त चित्रपट गीतांच्या संदर्भात मांडलेला आहे अन्यथा प्रतिभेला कसलेच कुंपण नसते, हे सिद्ध झालेले आहे. याच विचाराची पुढील पायरी म्हणजे आस्वाद होय. कवितेचा आस्वाद हा शब्दप्रयोग आपण सर्वच कवितांच्या बाबतीत करीत असतो तरी आस्वादाचे प्रत्यक्ष रूप प्रत्येक कवितेगणिक बदलत असते. आपण वाचीत असलेली प्रत्येक कविता, हा नित्यनूतन शोध असतो. आज वाचलेली कविता, आणखी काही वाचताना, आपली तीच प्रतिक्रिया होईल, असे सांगता येत नाही. कदाचित तीच कविता अधिक आवडू शकेल. हा बदल का झालेला? हा प्रश्न आपण आपल्याला फारसा विचारत नाही. इथेच संवेदनशील वाचक नेहमीच आपली आवड शिळी होऊ नये याची काळजी घेत असतो. चित्रपट गीताच्या बाबतीत बहुतेकवेळा आपण कविता नजरेआड करतो आणि एका अननुभूत साहित्यनंदाला पारखे होत असतो. यात आपलाच तोटा असतो. चित्रपट गीतातील कविता, या शब्दांना एकाबाजूने मर्यादा असते तर दुसऱ्या बाजूने आव्हान देखील असते. कवीच्या दृष्टिकोनावर बरेचसे अवलंबून असते. आजचे गाणे कवियत्री शांता शेळक्यांनी लिहिलेले आहे. अधिकृत नाव जरी वसंत अवसरे असले तरी. त्यावेळी शांताबाई सरकारी नोकरी करीत असल्याने, त्यांनी हा "बदल" स्वीकारला. शांताबाई या मुळातल्या कवियत्री परंतु आर्थिक कारणास्तव त्यांनी चित्रपटात गीते लिहायला सुरवात केली आणि तिथेही त्यांनी अप्रतिम गीते लिहून आपला ठसा उमटवला. चावून,चावून चोथा झालेल्या प्रणयी प्रसंगात देखील त्यांनी वेगळ्या प्रकारची शब्दरचना करून दाखवली. "स्वप्नी बघणे" "जागेपणी वावरणे" इत्यादी भावच्छटा लिहिताना, त्याचा समारोप करताना, "मुकेपणी बोलतो शब्दांत ते रंगेल का?" अशा शब्दात केलेला आहे. खरंतर ध्रुवपद कुणी शक्यतो प्रश्नार्थक करत नाही परंतु शांताबाईंनी तशी सुरवात केली आणि पुढील प्रत्येक कडव्याचा शेवट प्रश्नार्थक केला आहे आणि तसे करताना कुठेही किंचित विक्षेप होत नाही, हा त्यांच्या कवित्वाचा अधिकार. वास्तविक पहाता युगुलगीत आहे तरीही भावना कुठेही विसविशीत होत नाही. दोघांच्या भावना नीटसपणे मांडल्या आहेत. कुठेही शब्दांची अनावश्यक द्विरुक्ती नाही. चित्रपट गीतांत शब्दांची द्विरुक्ती ही वारंवार आढळते कारण स्वरिक लय सांभाळणे, आद्यकर्तव्य असते. संगीतकार वसंत पवार आहेत. अतिशय कुशाग्र बुद्धीचे संगीतकार परंतु अपवाद वगळता, कधीही प्रसिद्धीचा झोत अंगावर पडला नाही आणि उपक्षेच्या खाईत, हा संगीतकार लोप पावला. मराठी संगीतकारांची, काही संगीतकार अपवाद म्हणून वगळता, हीच अवस्था बघायला मिळते. अतिशय हुशार संगीतकार असून, आर्थिक डबघाईत आयुष्य संपल्याचे आढळते. वसंत पवार हे प्रामुख्याने लावणीचे संगीतकार म्हणून ख्यातकीर्त होते परंतु त्यांनी सर्व प्रकारची गाणी देऊन, आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली होती. कवीच्या शब्दांना अचूक न्याय देत असत. आता या गाण्याची स्वररचना "चंद्रकंस" रागावर आधारित आहे परंतु प्रसंगी रागाला बाजूला सारून, शब्दांच्या अभिव्यक्तीला महत्व दिले आहे. रागदारीत चाल आहे म्हणून कुठेही भरमसाट ताना, हरकती ऐकायला मिळत नाहीत. शब्दांतील ऋजुत्व सांभाळून, मंजुळ हरकती घेतल्या आहेत आणि एक अतिशय देखणे प्रणय गीत सादर केले आहे. वाद्यमेळ बव्हंशी व्हायोलिन वाद्याने सजवला आहे. दुसऱ्या अंतऱ्याची सुरवातीची ओळ संपवताना, मुद्दाम ऐकण्यासारखे "वळण" दिले आहे. वेगळी स्वरावली असूनही क्षणार्धात स्वरावली "जे जागले माझ्या मनी" घेताना, फार नाजूक पद्धतीने वळवून घेतले आहे. गाण्यात तोचतोचपणा जरा देखील जाणवू नये, याची नेमकी दक्षता घेतली आहे. खरतर इतक्या हुशार संगीतकाराला बऱ्याच संधी मिळायला हव्या होत्या, परंतु मिळाल्या नाहीत, हे सत्य आहे. सुधीर फडके आणि आशाबाईंनीं गाणे गायले आहे. मराठीत आशाबाईंनी जितकी विविधता, वैशिष्ट्यपूर्ण गायकी दाखवली, तितकी फार कुणी दाखवल्याचे आढळत नाही. आपल्या गळ्याचा "पोत", गळ्याची सर्जनशीलता इत्यादी वैशिष्ट्ये जितकी म्हणून विस्तारता येईल, तितकी त्यांनी दाखवली आहे. गायक म्हणून सुधीर फडक्यांनी मराठीत स्वतंत्र दालन उघडून ठेवले आहे. शब्दप्रधान गायकी कशी असावी, याचे उत्तम उदाहरण सुधीर फडक्यांनी दाखवले आहे. या गाण्यात याची प्रचिती आपल्याला, अस्ताईपासून ऐकायला मिळते. वास्तविक गायकी ढंगाची स्वररचना नसून, गायला अवघड अशी गायकी, या दोघांनी पेश केली आहे. दुसरा अंतरा सुरु होण्याआधी, आशाबाईंनी जो "आलाप" घेतला आहे, तो ऐकावा. वेळ बघायची झाल्यास, ५,६ सेकंदाचा छोटा आलाप आहे पण त्यातूनही, किंचित का होईना गायकी ऐकायला मिळते. शब्दातील औचित्य सांभाळून, गायन कसे परिणामकारक करायचे, याचे उत्तम उदाहरण म्हणून या गाण्याचा निर्देश करावा लागेल. गायन बव्हंशी मध्य सप्तकात आहे आणि ती लय सांभाळून, प्रणयी भावनांचे स्फटिकीकरण करण्यात, हे दोन्ही गायक पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. मराठी ललित संगीतातील एक अजरामर गाणे म्हणून या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल. जे वेड मजला लागले, तुजलाही ते लागेल का? माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का? मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी जे मी मुकेपणी बोलतो शब्दांत ते रंगेल का? हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलो जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का? माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज, गे सर्वस्व मी तुज वाहिले, तुजला कधी उमगेल का? (16) Je Ved Majala Lagale with lyrics | जे वेड मजला लागले | Asha Bhosle, Sudhir Phadke - YouTube

No comments:

Post a Comment