Saturday 1 October 2022

सतीश आळेकर मुलाखती निमित्ताने

आत्ताच थोड्यावेळापूर्वी टीव्हीवर प्रख्यात लेखक,नाटककार सतीश आळेकरांची मुलाखत बघितली/ऐकली. अर्थात मला त्यांच्या सगळ्या मुलाखतीबाबत बोलण्याइतका अभ्यासू नक्कीच नाही कारण, प्रामुख्याने मुलाखत ही, त्यांच्या नाट्य कारकिर्दीवर आधारलेली होती परंतु बोलण्याच्या ओघात त्यांनी सध्या जे *बॉयकॉट* चळवळीबद्दल ४ शब्द व्यक्त केले, त्याबाबत माझ्या मनात काही विचार आले, इतकेच. एक नक्की, सध्या आपल्या समाजात *एकांतिक* विचारांचे नको तितके प्राबल्य वाढले आहे. देशात, *सेन्सॉर मंडळ* ही पद्धती अस्तित्वात आहे ना!! मग ती संस्था कशासाठी आहे? आपण एखादी संस्था स्थापन करतो तेंव्हा *आपल्याच* समाजातील काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीचा त्या संस्थेत समावेश करतो. त्यांच्याकडे *निर्णयक्षमता* असते, हे मान्य असते. दुसरे असे, आपल्याकडे एक गोष्ट अत्यंत दुर्दैवी अशी घडत आहे, समाजातील काही लोकांना असे वाटते, *आपण सर्वज्ञ आहोत आणि आपल्यालाच समाजाचे हित कळते*!! या वृत्तीनुसार ते आपल्या हातात *धारवाडी तराजू* घेतात आणि सगळ्या प्रकरणांची शहानिशा करतात. अरे, कमाल झाली!! तुम्हाला असा अधिकार कुणी दिला आहे? या लोकांचा सतत *धर्म* बुडत चालला आहे, असा घोष चालू असतो. धर्म आणि तद्नुषंगाने मराठी भाषा बुडत चालली आहे, हा घोष गेली कित्येक वर्षे/कित्येक दशके चाललेला आहे. तरीही त्यात फारसा फरक पडलेला नाही. जर का आपली भाषा मरत चालली असेल तर एकदाची, त्या भाषेची *तिरडी* बांधा आणि स्मशानभूमीत शेवटचे *अंत्यसंस्कार* करून टाका!! धर्म आणि भाषा, या गोष्टी *चिरंजीवी* असतात. त्यामागे शतकानुशतकांची परंपरा असते. कुणीतरी उठते आणि आवई उठवते, त्यामागे निव्वळ वैय्यक्तिक स्वार्थ असतो. हिंदू धर्म बुडत आहे, हे तर ज्ञानेश्वरांच्या काळात देखील चालूच होते आणि त्यामुळेच ज्ञानेश्वरांना समाजातून पूर्णपणे *बहिष्कृत* केले होते. आज या घटनेला ६०० वर्षे उलटून गेली. त्याकाळचा धर्म आज नाही हे मान्य पण परिवर्तनशीलता ही सततची चालणारी प्रक्रिया असते आणि धर्माचे स्वरूप त्यानुसार बदलत असते. परंतु हा विचार कितीतरी व्यक्तींना *अपमानास्पद* वाटतो आणि *धर्म बुडाला* सारखी निष्फळ आवई उठवली जाते. एक गंमत आठवली. हॉलिवूड मधील चित्रपट होता, चित्रपटाचे नाव आठवत नाही पण *सीझर* च्या भूमिकेत *पीटर सेलर्स* नावाचा अभिनेता होता. तो दरबारात सिंहासनावर बसलेला असताना, *खालून ढुसकी* सोडतो!! प्रत्यक्ष सीझर असे करतो पण तिथे त्या प्रसंगातील *मानवी भाग* लोकांनी लक्षात घेतला आणि विनोदाला दाद दिली. विचार करा, शिवाजी किंवा संभाजी बाबत असा प्रसंग आपल्याकडे चित्रित होईल का? समाजाची जडणघडण सतत बदलत असते, आपलेच विचार वठलेले राहतात. एकेकाळी विजय तेंडुलकरांना *घाशीराम कोतवाल* आणि *सखाराम बाईंडर* या नाटकांवरून किती अपमानास्पद व्हावे लागले. गमतीचा भाग म्हणजे, ज्या घाशीराम नाटकावरून, तथाकथित ब्राह्मणांची छीथू झाल्याचा कांगावा करण्यात आला, त्या नाटकात, *मोहन आगाशे*,*चंद्रकांत काळे* यांच्यासारखे *चित्पावन ब्राह्मण* आपल्या भूमिका रंगवत होते!! मला व्यक्तीश: ही *बॉयकॉट* चळवळ म्हणून अतिशय घातक वाटते. केवळ स्वतःचा अहंकार शमवून घेण्याची अश्लाघ्य पद्धत वाटते. तुम्हाला चित्रपट आवडणार नाही ना, मग बघायला जाऊ नका. तुम्हाला *आमंत्रण* दिले आहे का? आपण जेंव्हा तरुण होतो, तेंव्हा मराठी रंगभूमीवर तथाकथीन *हिट अँड हॉट* नाटकांची लाट आली होती. मी देखील एक नाटक बघायला, साहित्य संघ मंदिरात गेलो होतो आणि निराश होऊन बाहेर पडलो कारण हे नाटक बघण्याच्या माझ्या अपेक्षा वेगळ्या होत्या आणि त्याची *पूर्ती* त्या नाटकात झाली नव्हती!! आता विचार करा, कुठे गेली ती लाट?आता त्याप्रकारची नाटके अस्तित्वात देखील नाहीत. आजच्या काळात अशी नाटके आली असती तर किती *गदारोळ* झाला असता, याचा विचार करा. मागे एकदा, विवेकानंदांना समाजातील वेश्याबाबत प्रश्न विचारला असताना, त्यांनी निर्भीडपणे सांगितले, आपल्या समाजात वेश्या आहेत म्हणून तुमच्या आया,बहिणी रस्त्यावरून सुखरूप हिंडत आहेत!! किती नेमका आणि समर्पक विचार आहे. समाजात अनेक प्रवृत्तींची माणसे रहात असतात आणि प्रत्येकाची आवडनिवड ही नेहमीच वेगळी आणि स्वतंत्र असणार. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून समूळ नष्ट करण्याचा *घाट* घालायचा, हा कुठला विचार? दुर्दैवाने आपल्या समाजावर *रामायण* कथेचा नको तितका प्रभाव आहे. गंमत म्हणजे त्यात रावणाला सीतेबद्दल *अभिलाषा* निर्माण झाली आणि पुढील *रामायण* घडले!! याचा अर्थ असा, तेंव्हा देखील समाजात *विघातक* घटना घडत होत्या. महाभारतात तर *चोरून पळवणे* वगैरे गोष्टींची बरीच रेलचेल आहे. हे आपल्यापैकी कुणीही लक्षात घेत नाही अंडी आपण इथे *रामराज्य* निर्माण करण्याची अभिलाषा ठेवतो. अशी अभिलाषा निर्माण करणे, हेच आपल्या विचारांचे खरे तोकडेपण आहे.

No comments:

Post a Comment