Tuesday 1 February 2022

पुन्हा मर्ढेकर !!

वास्तविक पहाता मर्ढेकरांवर मी काही वर्षांपूर्वी एक छोटेखानी लेख लिहिला होता परंतु आज वाचताना त्यातील *घिसडघाई* आणि विचारांतील *उथळपणा* प्रकर्षाने ध्यानात आला. नंतर वाटले, पुन्हा एकदा प्रयत्न करावा आणि नवीन काही सुचते का? हे तपासून बघावे. त्यातून, मर्ढेकर हे कवी म्हणून, मराठीतील अग्रगण्य कवी, हे त्यांचे टीकाकार देखील मान्य करतात. तेंव्हा पुन्हा एकदा प्रयत्न करायला काही हरकत नाही, अशी माझी मीच माझ्या मनाची समजूत घालून घेतली!! अर्थात पूर्वी लिहिले लेख तसाच माझ्या ब्लॉगवर ठेवलेला आहे. आपले *ठळक अपयश* देखील आपल्याला सुधारण्याची एक संधी देत असते!! असो, नमनाला जरा अति तेल जाळले गेले!! मर्ढेकरांचा सम्यक आढावा घेतला तर सरळ, सरळ २ भाग पडतात. १) मर्ढेकरांचे समर्थक, जे दुर्बोधतेसारख्या दुय्यम वैशिष्ट्यांनाही केंद्रस्थानी मानले आणि २) मर्ढेकरांच्या टीकाकारांनी त्यांच्या कवितेतील अश्लीलतेसारख्या काव्यबाह्य निकषांनी त्यांना झोडपून काढले!! त्यामुळे पारंपारिक मराठी कवितेच्या पार्श्वभूमीवर वेगळे वाटणारे अभिव्यक्तीचे आणि आशयाचे हे दर्शनी स्वरूप म्हणजेच मर्ढेकरी कविता, असे स्वरूप रूढ होत गेले. नवकाव्य गाजले. परंतु मर्ढेकरांच्या कवितेचे मूल्यमापन करताना आवश्यक ती तटस्थता आणि तारतम्य दाखवून त्यांच्या कवितेचे सामर्थ्य आणि तिच्या अंगभूत मर्यादा यांचा इथे वेध घेण्याचा माझा प्रयत्न राहील. इथे अर्थातच मर्ढेकरांच्या एका किंवा अनेक कवितांचे संपूर्ण विवेचन करणे, हा हेतू नाही, तर वर उल्लेखिलेल्या मर्यादेत मूल्यमापन करणे, हा होय. अगदी स्पष्ट लिहायचे झाल्यास, मर्ढेकरांची कविता ही पाश्चात्य आणि पौर्वात्य परंपरांच्या संगमावर उभी आहे. इथे एक मेख आहे, पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवाशी तुलना करता, पूर्वेहून येणार प्रवाह तुलनेने काहीसा क्षीण आहे. इंग्रजी नवकवितेचे स्वरूप आणि मर्ढेकरांच्या कवितेचे स्वरूप यात अंतर्गत जिव्हाळा आहे. दोघांनाही प्रेरक ठरणारी जीवनविषयक जाणीव साधारणपणे एकाच प्रतीची आहे. भांडवलशाहीने निर्मिलेली एकांगी सुबत्ता आणि सामान्य माणसाची झालेली पिळवणूक, त्यातून महायुद्धाने घडवलेला प्रचंड अपेक्षाभंग,स्थूल धार्मिक जीवनपद्धतीचा चालेल ऱ्हास आणि संवेदनक्षम मनांना अस्वस्थ करणारी अध्यात्मिक ओढ इत्यादी असंख्य अंतर्विरोधांनी दुभंगलेले मानवी व्यक्तिमत्व हा या युगाचा स्थायीभाव आहे आणि आणि याचेच काव्यात्मक प्रकटीकरण मर्ढेकरांच्या कवितेतून प्रामुख्याने आढळते. मर्ढेकरांच्या कवितेत प्रामुख्याने नव्या जाणिवांचे अंशदर्शन होते. इलियट आणि ऑडेन या कवींचा त्यांच्यावर प्रभाव जाणवतो. त्यांच्या *काही कविता* आणि *आणखी काही कविता* या संग्रहातील कविता आणि इंग्रजी नवकविता यात बरीच साम्यस्थळे आढळतात. अर्थात त्यामुळे मर्ढेकरांच्या कवितेला गौणत्व येते असे मला वाटत नाही. कवीचा मोठेपणा, तो कुठल्या परंपरेत लिहितो यापेक्षा तो कुठल्या दर्जाने लिहितो, हे मला महत्वाचे वाटते. इंग्रजी कवितांचा प्रभाव बघायला गेल्यास, *केशवसुत* पासून *माधव ज्युलियन* असे सगळे कवी थोड्याफार प्रमाणात इंग्रजी कवितेच्या प्रभावातूनच लिहिल्या गेल्या आहेत. दुसऱ्या शब्दात, त्यांनी मराठी परंपरा नाकारलेली नाही. उदाहरणार्थ, *काही कविता* मधील *नाठाळ गाथा* या रचनेचे नाते थेट ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्याशी दीर्घ जोडता येते. मर्ढेकरांच्या काव्यपिंडाचा मूलधर्म चिंतनात्मक आहे. कधी बाह्य जीवनाविषयी तर आंतरिक जीवनाविषयी, कधी पिंडाविषयी तर कधी ब्रह्माण्डाविषयी, ताकदही शाश्वत किंवा कधी अशाश्वत चिंतन करण्यात मग्न असते. याच सर्व वैचारिक प्रक्रियेतून त्यांचे भावविश्व उजळून येते. जीवनाविषयी चिंतनात इतका गढलेला, त्यातील अनाकलनीय गूढांनी स्तिमित झालेला, त्यातील अंतर्विरोधाने व्याकुळ झालेला आणि त्याची विफलता जाणवल्यावर पुन्हा त्याच्या आहारी जाणारा, हे सगळे मराठी काव्यात ज्ञानेश्वरीशिवाय अन्यत्र सापडणे अवघड आहे. त्यांच्या काव्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ती संयतशील आहे. अनुभवाच्या काठावरून उतू जाणाऱ्या प्रपत्ती जाणिवेचे आहे. अनुभवाचे अचूक स्वरूप शब्दबद्ध करणे तसेच त्याची आकृती कमीतकमी रेषांनी चित्रांकित करणे, अतिरंजित कल्पनाविस्तार आणि भावविवशता पूर्णपणे टाळणे ,,ही सगळी त्यांच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये मानता येतील. काव्याची भाषा अल्पाक्षरी आणि विधानस्वरूपी असते. संयतशील पिंडधर्म, भावातिरेकाच्या शक्यतेवर उपहासाचा उतारा देतो. अर्थात जीवनातील सगळेच वास्तव संयतशील पिंडाला काव्यदृष्ट्या संक्रमित करता येत नसतात. मर्ढेकरांचा काव्यपिंड बहुपेडी आहे. मूळ अनुभवाशी सहकंप होणारे इतर सर्व अनुभव त्यांच्या कवितेत प्रकट होताना दिसतात. त्यामुळेच त्यांची दुर्बोधता अनुषंगिक आहे, अंगभूत नव्हे. अशा प्रकारचे बहुपेडीपण हे *नवकाव्य* ज्याला म्हणतात त्या, मराठी कवितेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. काव्यांतर्गत अनुभव हा देखील जिवंतपणे प्रत्ययाला येणार अनुभव असल्याने प्राणीसदृश एकात्मतेची अट त्याला मानावीच लागते. दुसऱ्या बाजूने विचार केल्यास, संपूर्ण जीवनाशी समकक्ष होण्याचा ध्यास त्यांच्या कवितेत दिसत नाही. स्वतःच्या व्यक्तिगत भावस्थितीला केंद्रस्थानी ठेऊन, त्यांच्या कल्पनाशक्तीचा संचार झाला आहे. मर्ढेकरी या कवितेच्या मर्यादांमुळे नव्या मराठी साहित्य समीक्षेतील आत्मनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यांच्या कल्पना फार उथळ राहिल्या. वस्तुतः जे भोगलेले नाही, ते अनुभवाने आणि आकारणे - हाच कविप्रतिभेचा - विशेषतः बहुपिंडी कवितेचा सहजधर्म आहे. तिथे बहुदा मर्ढेकरी कविता काही प्रमाणात कमी पडते.  मर्ढेकरांच्या काव्यपिंडाचे शेवटचे वैशिष्ट्य महत्वाचे ठरावे आणि ती म्हणजे त्याची प्रयोगशीलता. निरपेक्ष किंवा सापेक्ष बीजकवी हे अपरिहार्यपणे प्रयोगशील असतात. वेगळ्या जाणिवेला साकार करताना घाटाच्या आणि शैलीच्या स्वरूपात जी अटळ पुनर्रचना करावी लागते, ती घडवून आणण्याचा प्रतिभेचा धर्म म्हणजे प्रयोगशीलता. मर्ढेकरांसारखे प्रयोगशील कवी म्हणजे ललित साहित्यातील सृजनशील संशोधक होय. अशा संशोधकाजवळ अज्ञात प्रांतात शिरणाऱ्या मुशाफिराचे धैर्य असते. या दृष्टीने संपूर्ण मराठी कवितेत मर्ढेकरांच्या तोडीचे कलात्मक साहस असलेला कवी सापडणे कठीण आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेची मौलिकता समजून घेण्यासाठी कवितेच्या घाटामध्ये त्यांनी नव्याने अंतर्भूत केलेली काही तत्वे समजून घ्यायला लागतील आणि त्या आद्यतत्वातून उद्भवणाऱ्या कवितेच्या पृष्ठरुपाचे (surface texture) स्वरूप पहावे लागेल. अर्थात इतक्या सगळ्या धडपडीतून देखील मर्ढेकरी कविता आपल्याला पूर्ण आकळेल का? या प्रश्नातच मला यालेखाचा समारोप करावासा वाटतो

No comments:

Post a Comment