Thursday 10 February 2022

एहसान तेरा होगा मुझ पर

शाळकरी वयात असताना, मी कधीतरी अचानक पहाटे विविध भारतीवर *संगीत सरिता* कार्यक्रम ऐकला आणि थोडा चकित झालो झालो. फक्त १० मिनिटांचा कार्यक्रम असायचा(बहुदा अजूनही चालत असावा कारण आता रेडिओ ऐकण्याची सवय मोडली!!) आणि त्या वेळेत रोज एखादा राग घेतला जात असे, त्या रागाची ओळख करून दिली जात असे आणि मग पुढे त्या धुनेच्या आधारित एखादे चित्रपट गीत, भावगीत असे वाजवले जात असे. मला नुकतीच संगीताची आवड निर्माण झाली होती आणि अशा वेळेस मला तर एकदम संगीताचे भांडार आपल्यासमोर आल्याचा भास व्हायला लागला. पुढे मी तो राग आणि त्या रागावर आधारित असे गाणे, अशा नोंदी करून ठेवायला लागलो. काही दिवसांनी मला *भास* व्हायला लागले की मला त्या रागाची *ओळख* झाली आहे!! सगळाच बालिशपणा असायचा आणि त्यापुढील मूर्खपणा असा असायचा, माझ्या शाळेतील मित्रांसमोर लगेच त्या माहितीची *पुडी* सोडायला लागलो!! माझे मित्र देखील शाळकरी वयाचे आणि एकदम *रागदारी संगीत* आणि त्यावरील गाणी, असे त्यांना ऐकायला मिळाल्यावर एकदम गार व्हायचे आणि माझी तथाकथित *बढाई* पचून जायची. पुढे जेंव्हा मी आई वडिलांच्या जोडीने प्रत्यक्ष रागदारी संगीताच्या मैफिलींना जायला सुरवात केली आणि माझ्यातील अपुरेपण लक्षात यायला लागले आणि मुख्य म्हणजे मनातील सगळे भ्रम नाहीसे झाले. नंतर मी स्वतंत्रपणे मैफिलींना जायला लागलो आणि माझी दृष्टी बरीच विस्तारली. याचा काळात चित्रपट गाणी आणि त्यातील रागाचा अंतर्भाव, याचा परस्पर संबंध कसा आणि किती असतो, याचा *अदमास* घ्यायची सवय लागली आणि ललित संगीतात जरी राग असला तरी त्याच्या काही छटा असतात. *संपूर्ण राग* कधीच ललित संगीतातून साकार होऊ शकणार नाही, याची वाजवी जाणीव झाली. हे मात्र आजही मला मान्यच करायला हवे, ललित संगीतामुळे माझी रागदारी संगीताची जी थोडीफार समज आहे, ती वाढायला बरीच मदत झाली. आजचे गाणे *एहसान तेरा होगा मुझ पर* मला याच भ्रमंतीत ऐकायला मिळाले. वास्तविक हे गाणे *यमन* रागावर आधारित आहे पण हे खूप उशिराने ध्यानात आले. आपण एक चूक वारंवार करतो - गाणे रागाधारित आहे म्हटल्यावर त्यात रागाची मुळे शोधायला लागतो. असे कधीच घडत नसते. रागातील बंदिशींवर आधारित गाणे असेल तर रागाचा अंदाज घेता येतो अन्यथा राग, त्या गाण्यात *लपलेला* असतो. जाणकार लोकं त्या *जागा* नेमकेपणी हुडकून काढतात. आता याच गाण्याचे उदाहरण बघूया. यमन रागावर आधारित म्हटल्यावर लगेच त्या रागाचे *चलन* या गाण्यात कुठे सापडते, असे शोधायला जातात पण ते वस्तूत: चूक असते. राग प्रचंड व्याप्तीचा असतो आणि ललित संगीताचा जीव फक्त ३,४ मिनिटांचा असतो आणि आपण ध्यानात घेत नाही. यमन राग म्हटल्यावर *नि रे ग* किंवा *नि रे ग म* अशा सुरांनी सुरवात होते आणि आता या गाण्याच्या संदर्भात बघायला गेल्यावर, फसगत होते. थोडक्यात गाण्याच्या सुरावटी मांडून दाखवतो. *एहसान तेरा होगा मुझ पर* ही ओळ सुरवातीच्या अनुरोधाने मांडायला गेल्यास, एह सान तेरा धध सानि गग(दुसरा गंधार किंचित आंदोलित) हो गा मुझ पर गरे रेग गग(कोमल) ग(इथेही गंधार आंदोलित आहे) आता बघा, वर मी मांडलेले यमन रागाचे चलन आणि या गाण्यात त्याच रागाचे घेतलेले सूर यात सत्कृतदर्शनी फरक दिसतो. आता पुढील ओळ बघूया. दिल चाहता है मग गगमध म वो केहने दो मग गगमध म या सुरावटीत *निषाद* आणि *रिषभ* हे यमन रागाचे सूर येतच नाहीत तरीही हे यमन रागावर आहे आणि याचे कारण या सुरांचे चलन या २ स्वरांच्या अनुरोधाने पुढे चालते. म्हणजेच *निषाद* आणि *रिषभ* स्वरांनी जो मार्ग दाखवला आहे, त्या मार्गावरील बाकीचे सूर आहेत, जे या गाण्याच्या मुखड्याच्या सुरावटीसाठी योजलेले आहेत. इथे संगीतकाराचा व्यासंग दिसतो. रागातील ठराविक आणि प्रचलित वळणे न घेता, एकदम वेगळ्याच सुरांवर गाणे सुरु करायचे. आता सांगा, केवळ यमन रागावर आधारित आहे म्हटल्यावर, त्या रागाचे चलन शोधण्याचा प्रयत्न वृथा नव्हे का!! अर्थात पुढे यमन रागाचे स्वरूप अधिक स्पष्ट होते परंतु तितका धीर धरणे आवश्यक!! प्रसिद्ध शायर *हसरत जयपुरी* यांची शब्दरचना आहे. आता चित्रपटातील शब्दरचना म्हणजे त्यात थोडा *चटपटीतपणा* हवा कारण मुळात चित्रपट हे माध्यम हे जनसामान्यांचे माध्यम आहे. तिथे गाण्याचे शब्द जरी अर्थवाही वगैरे असले तरी ऐकताना तात्काळ रसिकांच्या तोंडी सहज रुळावेत अशी अपेक्षा असते. अर्थात याचा काहीवेळा अतिरेक होतो पण त्याला नाईलाज आहे. हसरत जयपुरी हे मुळातले उर्दू शायर परंतु कारकीर्द गाजली ती चित्रपट गीतांमुळे. कविता म्हणून वाचताना, फार काही चमकदार कल्पना वाचायला मिळत नाहीत. त्यातून चित्रपटातील प्रसंग तर एकसाची - नायिकेचा प्रणयभंग, हृदयाचा तडफडाट वगैरे. त्यामुळे सतत नवनवीन आशय व्यक्त करणे जवळपास अशक्य असते. अशा वेळेस, *चालीचे वजन* काय आहे? हा विचार मध्यवर्ती ठरतो. *एहसान तेरा होगा मुझ पर* हीच ओळ जरा वेगळी वाटते अन्यथा कवितेत फार विशेष काही आढळत नाही. संगीतकारजोडी शंकर/जयकिशन यांची खरी करामत आहे. त्यांनी योजलेल्या सुरांबद्दल वरती थोडे विवेचन झाले आहे तेंव्हा त्याची पुनरावृत्ती करत नाही. एखादा संगीतकार कवितेचा कसा विचार करतो, हे या गाण्याच्या संदर्भात बघूया. इथे या गाण्यात *समेची मात्रा* ही *होगा* मधील *गा* या अक्षरावर ठेवली आहे म्हणजेच कवितेच्या अंगाने बघायला गेल्यास, *तेरा एहसान ही होगा और कुछ हो नही सकता* हेच प्रच्छन्नपणे दिसते. आता याच ओळीतील *एहसान* शब्दवर सम ठेवली असती तरी फारसे बिघडले नसते. अर्थात गायन करताना लताबाईंनी *एहसान* शब्दावर किंचित *वजन* दिले आहे!! अखेर गायकाची देखील *स्वतंत्र* दृष्टी असू शकते. चित्रपटात खरंतर हे गाणे मोहम्मद रफींनी देखील गायले आहे आणि त्याची चाल जवळपास सारखी आहे. अर्थात रफींच्या गाण्यात प्रणयी छटा आहे तर इथे व्याकुळता आहे. त्यामुळे आविष्कारात बदल होणे क्रमप्राप्तच ठरते. अंतऱ्याची सुरावट जवळपास सारख्याच आहेत फक्त सुरवात वरच्या सुरांतून केली आहे, इतकेच. शंकर/जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांमध्ये नेहमीच वाद्यमेळ आपली भूमिका ठामपणे बजावत असतो. वास्तविक मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गीतात २ अंतरे आहेत तर लताबाईंनी गायलेल्या गाण्यात एकच अंतरा आहे. अर्थात हे देखील संगीतकाराचे स्वातंत्र्य म्हणायला हवे. गाणे त्यामुळे छोटेखानी झाले आहे. परिणामी मुखडा २ वेळा गायला गेला आहे. यागाण्यात व्हायोलिन आपली भूमिका महत्वाची बजावत आहे. तरीही एखाद्या कपड्याला भरजरी अस्तर असावे तशी इथे व्हायोलिन्स वाजत आहेत. अगदी शांतपणे तरीही गाण्याच्या चालीला सुंदर परिमाण देत आहेत. थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, सहेतुक चित्रीकरण करणाऱ्या हिंदीचित्रपटांच्या शैलीशी पूरक रचना करण्यात ही जोडी हातखंडा होती. एक तर दृश्यास पाठिंबा देणारे ध्वनी, सुरावटी व लयबंध वापरून दृश्याचे आवाहन वाढवण्यात ही जोडी तत्पर होती. पण अधिक सूक्ष्म प्रकारची कामगिरी म्हणजे प्रसंग वा परिस्थितीनुसार चांगले गीत होऊ शकणारी एखादी रचना साध्य, कार्यक्षम सुरवातीच्या पातळीवर रोखण्यास ते तयार होते. आता, या विधानाचा संदर्भ घ्यायचा झाल्यास, प्रस्तुत गीताच्या व्हिडिओत गाणे सुरु व्हायच्या आधीचा वाद्यमेळ बारकाईने ऐकल्यावर, आपल्याला प्रत्यंतर येऊ शकते. दुसरे म्हणजे त्यांनी जी *शम्मी शैली* प्रचलित केली, त्या शैलीला हे गीत पूर्णपणे छेद देते. यातून काही निष्कर्ष असे हाती लागतात, या जोडीने आपली कार्यक्षमता वारंवार सिद्ध केलं. केवळ पाश्चत्य परंपरेपासून केलेआउचल करून, हिंदी चित्रपटसंगीतात भर टाकली (सर्जनशील गुणवत्ता हा वेगळा मुद्दा आहे). आता गायन. ललित संगीत हे जितके रचनाकारांचे असते तितकेच गायक कलाकारांचे असते कारण संगीतकाराची रचना आपल्यापर्यंत पोहोचते ती गायकाकांकडून आणि तिथे जर का सादरीकरण विसविशीत झाले तर स्वररचना कितीही अप्रतिम असली तरी अखेरचा परिणाम पातळ होऊ शकतो. त्या दृष्टीने गायकाची जबाबदारी फार महत्वाची ठरते. अर्थात उलट बाजूने, अगदीच टुकार स्वररचना देखील आपल्या गायनकौशल्याने रसिकांना भारावून टाकू शकते!! ललित संगीत आपल्याकडे याच कलाकारांच्या तोंडून पोहोचणे असते आणि त्याचा परिणाम नेहमीच गाढा होतो. आता इथे लताबाई नेहमीप्रमाणे शब्दोच्चारांचे कौशल्य प्रतीत करतात. *मुझे तुमसे मुहोब्बत हो गयी है* ही ओळ म्हणताना *मुझे* शब्दातील *झे* हे अक्षर किंवा *मुहोब्बत* हा संपूर्ण शब्द खास उर्दू भाषिक कौशल्याची मागणी करतो. भाषिक सौंदर्य हे असेच आपल्या समोर येत असते. लताबाईंची उच्चार खरोखरच *प्रमाण* म्हणून मानले जातात. अचूक शब्दोच्चार हे ललित संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य असते अंडी तिथे बरेचवेळा दुर्लक्ष केले जाते. तसेच गाण्यातील हरकती अगदी छोट्या अंगाच्या आहेत परंतु शब्दांचे सौष्ठव वाढवणाऱ्या आहेत, बारकाईने ऐकल्यावर आपल्या ध्यानात येऊ शकते. खरंतर कुठलीही रचना आपल्या अंगभूत स्वरिक सौंदर्याने भारलेली असते आणि त्यातून रसिकांचे भारावलेपण पुढे येते. लताबाईंची गायकी इथेच अधिक स्पष्ट होते. एहसान तेरा होगा मुझ पर दिल चाहता है वो कहेने दो मुझे तुमसे मुहोब्बत हो गयी है मुझे पलको कि छांव में रहेने दो चाहे बना दो चाहे मिटा दो मर भी गये तो देंगे दुवायें उड उड के कहेंगी खाक सनम ये दर्द-ए- मुहोब्बत सेहने दो Ehsaan Tera Hoga... (Lata) Junglee (1961) - YouTube

No comments:

Post a Comment