Sunday 13 February 2022

जीवन डोर तुम्हे संग बांधी

चित्रपट गीतांविषयी काही महत्वाचे निकष सांगता येतील - १) ते सहज उपलब्ध व्हावे, २) बहुतेकांना ते परवडण्यासारखे हवे आणि ३) ते सर्वांना समजण्यासारखे हवे. ते तसे सहज उपलब्ध असते कारण फार मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती केली जाते आणि ठिकठिकाणी विक्रीसाठी धडपड केलेली असते. ते परवडण्यासारखे असावे याचा अर्थ ते स्वस्त असावे. मोठ्या प्रमाणावर, याचा हेतू हाच असतो. शिवाय हे संगीत समजण्यासारखे म्हणजे आकलनसुलभ हवे - भाषा, रचना, विषय, आशय इत्यादी बाबतीत सुलभता अपेक्षित असते आणि तशी ती जाणवते देखील. आणखी एक विचार इथे मांडायला हवा, जरी तो पटेलच असे नव्हे. म्हणजे असे की दुर्मिळपणा आणि निर्मितीतील परिश्रम यांमुळे कोणतीही कृती, कलाकृती होत असते. कलाकृती केवळ एकासारखींदुसरी नसते म्हणून ती अनन्यसाधारण असते वगैरे वर्णन केले जाते. कृतींचे पुनरुत्पादन होऊ शकले किंवा मिळण्यास सुलभ झाले की त्यास *जंक* म्हटले जाते!! अर्थात यापेक्षा अधिक काथ्याकूट करण्यात फारसे हशील नाही. आता वरील विवेचनावरून आजच्या गाण्याचे *जीवन डोर तुम्हे संग बांधी* स्वरूप मांडायचे झाल्यास, भाषा, रचना आणि विषय यात सुलभता आढळते. गमतीचा भाग म्हणजे हे तिन्ही घटक एकत्र असून देखील आजचे गाणे काहीसे विस्मृतीत गेलेले आढळते!! अर्थात एखादे गाणे का लोकप्रिय होते आणि कसे विस्मरणात जाते, याचे ठोकताळे बांधणे तसे अवघड आहे. काही गाणी प्रचंड मार्केटिंग करून अल्पावधीत लोकप्रिय होतात परंतु अनुभव असा आहे, अशी गाणी फार लवकर विसरली जातात. तेंव्हा गाण्याच्या टिकाऊपणाबद्दल फार काही अंदाज बांधणे अवघड असते. आता गाण्याकडे वळल्यास, गाण्यातील काव्य अगदी सहज साधे, आकळायला सोपे असे आहे जी चित्रपट गीताची प्रमुख (परंतु अनिवार्य नव्हे) अट असते. त्यामागील एक मुद्दा असा, चित्रपटगीत हे उच्चभ्रू समाजापासून ते झोपडपट्टीतील समाजापर्यंत सहज पोहोचत असते. परिणामी आकलनाची शक्ती वेगवेगळी असते, त्यातून *ललित संगीत* समजण्यासाठी काही खास प्रकारचे शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते जसे रागदारी संगीताबाबत मूलभूत शिक्षण अत्यावश्यक असते. त्यामुळे गाण्याच्या पहिल्या पायरीपासून *सुलभता* हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो. या मुद्द्यावर प्रस्तुत गाणे नेमके पसंतीला उतरते. इथे *शाब्दिक लय* महत्वाची ठरते आणि आशय, घाट इत्यादी अलंकार खासगी कवितांसाठी बाजूला ठेवले जातात. कवी भरत व्यास हे काही फार मोठ्या प्रतिभेचे कवी नव्हेत परंतु त्यांच्याकडे स्वररचनेनुसार, त्याच्या वजनाचे शब्द *गुंफून* गाणे तयार करण्याचे कसब होते. आता मुखड्याच्या ओळींत *जग में तुफ़ा आंधी रे आंधी* शब्दांची पुनरुक्ती केल्याने आशयाच्या अभिव्यक्तीत काहीही फरक पडत नाही परंतु स्वरिक लयीला सुलभता प्रदान करते. कवितेतील प्रतिमा वाचताना नावीन्य फारसे वाचायला मिळत नाही परंतु तसा उद्देश बहुदा लिहिताना नसावा, या शंकेला जागा आहे!! *कजरा अंखियन में* किंवा *तेरी छबी छाई* या शब्दांत तोचतोचपणा जाणवतो. याचे मुख्य कारण असे आणि अशाच प्रकारचे शब्द हिंदी चित्रपटगीतात वारंवार वाचायला मिळतात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीने या गाण्याची स्वररचना केली आहे. या जोडीच्या सुरवातीच्या काळातील *सती सावित्री* हा चित्रपट आहे. चित्रपट पडला आणि गाणी विस्मरणात गेली!! ललित संगीतात असा अनुभव वारंवार बघायला मिळतो. अर्थात निव्वळ गाण्यांनी चित्रपट तरला आहे, अशी उदाहरणे देखील सापडतात पण पुन्हा अशा वेळेस चित्रपटगीतांचे मार्केटिंग कसे होते, यावर अवलंबून आहे. प्रस्तुत नावाचा चित्रपट आला होता!! ही परिस्थिती असल्याने आणि खरोखरच चित्रपटात गाण्यांव्यतिरिक्त काहीही चांगले न सापडणे, परिणामी गाणी विसरली जाणे. चाल *यमन* रागावर आधारित आहे. गाण्याच्या सुरवातीच्या वाद्यमेळातून या रागाचे सूचन होते. सुरवातीच्या व्हायोलिनच्या सुरांतून प्रचलित असे *नि रे ग* सूर ऐकायला मिळतात आणि ते थेट रागाचीच आठवण करून देतात आणि पाठोपाठ आपल्या कानावर *जीवन डोर तुम्हे संग बांधी* या ओळीचे आर्जवी सूर पडतात. त्या काळानुरूप काव्यरचना असल्याने, स्वररचनेची बांधणी देखील त्या शब्दांना अनुसरून बांधली आहे. त्यावेळी एकूणच प्रणयाचे स्वरूप बरेचसे *मुग्ध*, किंवा काहीसे *बुजरे* असे असायचे. आपण तो काळ डोळ्यासमोर आणला तर आणि तरच या गाण्याची खुमारी जाणवेल. आज असे वातावरण अजिबात बघायला मिळत नाही. या आर्जवी सुरावटीत *स्निग्ध* असा गोडवा आहे. चाल लगोलग *शब्दाधीन* होते!! त्यावेळची सामाजिक बंधने आणि त्या बंधनांना थोड्या धिटाईने बाजूला सारून व्यक्त केलेले प्रेम,असेच स्वरूप या गाण्यात आहे. गाण्यातील सगळ्या हरकती या, याच भावनेला अनुसरून घेतल्या आहेत जेणेकरून शब्दातील *ऋजू* भाव कुठेही *डागाळला* जाणार नाही. मुखड्यातून जो भाव व्यक्त होतो तशीच ठेवणं संपूर्ण गाण्यात कायम ठेवली आहे. थोडक्यात सगळे अंतरे, मुखड्याला अनुलक्षून बांधले आहेत. एक गंमत आणि निरीक्षण. तिसरा अंतरा सुरु होण्याआधी व्हायोलिनवर एक सुरावट वाजते आणि एकदम मराठी चित्रपटगीताची आठवण येते. *या चिमण्यांनो परत फिरा रे* या अजरामर गाण्यातील मुखडा सुरु होण्याच्या आधी जे व्हायोलिनचे सूर आहेत, त्याच्याशी बरेच साद्ध्यर्म्य आढळते. अर्थात इथे तुलना करायची नाही परंतु रागाच्या सुरावटी कशा एकमेकांच्यात मिसळलेल्या असतात, हेच दर्शवायचे आहे. हे साम्य अजाणतेपणी झालेले आहे, हे उघड आहे. थोडे मूल्यमापन करायचा प्रयत्न. आता संगीतकार म्हटलं कि त्याचा सर्वात मोठा गुण असतो तो गुणगुणण्यासारखी चाल बांधता येणे. साध्या आणि सहज गुणगुणता येतील अशा प्रकारच्या रचना करण्यात ही जोडी माहीर होती. आता या गीताचा आरंभ यमन राग पायाभूत मानून होतो आणि पहिली ओळ *सा* या आधारस्वरावर थांबून गीताच्या आशयाशी शांत ठामपणा प्रदान करते आणि हे सगळे सहज पद्धतीने होते. एकेकाळी त्यांच्यावर शंकर/जयकिशन यांचा बराच पगडा असावा, इतपत प्रभाव जाणवतो. त्यांच्या एकूणच शैलीत सपाट, अनलंकृत थेटपणे गाणे पोहोचवणे, या शैलीला सामोरे गेले. मुळात शंकर/जयकिशन यांनी जी चित्रपटीय शैली निर्माण केली, त्याचेच पुढील पाऊल, या जोडीने टाकून शैली अधिक समृद्ध केली, असे म्हणता येईल.अर्थात या प्रवासात त्यांनी बरेचवेळा *तालाचे बंध* बांधण्यात बराच तोचतोचपणा दाखवला तरीही सामान्य रसिकांनी त्याला प्रतिसाद दिला. याच काळातील राहून देव बर्मन यांनी जी प्रयोगशीलता दाखवली, तशी या जोडीने *उत्सव* सारखा चित्रपट वगळता फारशी दाखवली नाही. अर्थात याला, त्यांना मिळालेले चित्रपट हे देखील कारण असू शकेल. लताबाईंनी आपल्या आवाजावर ही सगळी रचना तोलली आहे, असे म्हटल्यास काही चुकीचे ठरू नये. हे गीत यक्ताना नेहमी असेच वाटते, या गीतातील *हरकती* किंवा *छोट्या ताना* लताबाईंनी आपल्या कुशाग्र बुद्धीनुसार घेतल्या असाव्यात. एकतर या गाण्याच्या वेळेस, लताबाईंचे चित्रपट सृष्टीतील स्थान जवळपास अबाधित असे झाले होते. अर्थात तो भाग वेगळा. गीतातील काही अक्षरे ही पडजिभेला जीभ लावून उच्चारावी लागतात जसे *तोडेंगे* किंवा *छबी* सारखे शब्द ऐकावेत तसेच काही अक्षरे ही ओठांच्या हालचालीवर अवलंबून असतात, त्याचे उच्चारण ऐकणे हा अतिशय मनोज्ञ अनुभव आहे. अशा अचूक, निर्दोष शब्दोच्चाराने गाण्याच्या परिमाणात फार बदल होतो आणि त्याची परिणामकारकता वाढते. *दो तन हैं एक प्राण हमारे* या ओळीतील *प्राण* शब्द त्या ओळीचे *प्राणतत्त्व* आहे!! किंवा शेवटच्या अंतऱ्यातील *इस मेहेंदी का रंग रहेगा* ही ओळ उद्मेखूनपणे ऐकावी. *शब्दप्रधान गायकी* म्हणजे काय? या प्रश्नाचे नेमके उत्तर या गायकीतून मिळते. आता अशी सुंदर स्वररचना ऐकायला मिळणे हा अनिर्वचनीय अनुभव नव्हे का!! जीवन डोर तुम्ही संग बांधी क्या तोडेंगे इस बंधन को जग में तुफ़ा आंधी रे आंधी जीवन डोर ...... हो न सके कभी हम तुम न्यारे दो तन हैं एक प्राण हमारे चाहे मिले पथ में अंधियारे चाहे घिरे हो बादल कारे फिर भी रहूंगी तुम्हारी, तुम्हारी यूं घुल मिल रहना जीवन में जैसे रहे कजरा अंखियन में तेरी छबी छाई रहे मन में तेरा ही नाम रहे धडकन में तेरे दरस मैं प्यासी रे प्यासी ऐसा मुझे वरदान मिला हैं तुम क्या मिले भगवान मिला हैं अब तो जनम भर संग रहेगा इस मेहेंदी का रंग रहेगा तेरे चरण की मैं दासी रे दासी Jeevan Dor Tumhi Sang Bandhi-Sati Savitri-Lata Mangeshkar - YouTube

No comments:

Post a Comment