Saturday 29 February 2020

अनंत बोरकर

अनंता शाळेत असल्यापासून सडपातळ असाच आहे. वयानुसार वजन थोडेफार वाढले असेल पण सत्कृतदर्शनी तरी आजही तो इयत्ता सातवी, आठवी मधील वर्गात खपून जाईल. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा येतात ज्या आपले अस्तित्व फारशा दाखवीत नाहीत, फारसे बोलत नाहीत आणि बोलले तरी हलक्या आवाजात बोलणार. कुठल्या विषयावर मत विचारले तर शक्यतो टाळणार परंतु जरा खोदून विचारले तर मोघम उत्तर देणार. त्यातून तुम्हाला काय अर्थ घ्यायचा हे तुम्ही ठरवायचे. अनंता काही जास्त बोलणार नाही. शरीराचा सडपातळपणा कसा एकाबाजूने काहीच ध्वनित करीत नाही पण तरीही शरीर म्हणून अस्तित्व दर्शवित असतात. शाळेत देखील त्याचे केस सरळ,सपाट होते.आता वयानुसार केसांनी रुपेरी रंग दाखवायला सुरवात केली आहे. शाळेत त्याने कधी संगामस्ती केली असेल का? असा प्रश्न पडावा इतके अस्तित्व होते. कधी आवाजी बोलणे नाही,  हसासणे देखील मुमूरकेशी!! अगदी मोठा विनोद असला तरच हसण्याचा आवाज येणार परंतु एकूणच शांत प्रवृत्ती. आपल्या गृपला अशाच व्यक्तीची "ऍडमिन" म्हणून गरज होती. एकत्र आपल्या गृपतर अनेकरंगी माणसे. कोण कधी तणतणेल याचा खुद्द ब्रह्मदेवाला देखील पत्ता लागणार नाही तरीही अशी मोट बांधून ठेवायला थंड डोक्याचाच माणूस हवा आणि तिथे अनंता एकदम योग्य. 
आपल्या गृपवर तशी शांतता असते पण कुणीतरी मध्येच फणा उभारते आणि तणातणी सुरु होते. प्रसंग तसे कमीच असतात कारण आपल्या गृपवर "व्यक्त" होणे हा कपिलाषष्ठीचा योग्य असतो. आता वयाची साठी झाली तरी वैय्यक्तिक हेवेदावे भरपूर आढळतात की जे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. अनंताला कशीही मत विचारले तर आधी शक्यतो विषय टाळायचा त्याचा प्रयत्न असतो. त्यातून जरा आग्रह झाला तर "नरो वा कुंजरो" वृत्तीने अत्यंत थोडक्यात तसेच नेमका अर्थ ध्वनित होईलच याची खात्री नसलेले उत्तर ऐकायला मिळणार. त्यातून पुन्हा विचारले तर उत्तर नाहीच मिळण्याची शक्यता!! असे असून देखील अनंता सगळ्यांच्यात असतो. गप्पा मारणे वगैरे त्याच्या स्वभावातच नाही. शांतपणे प्रत्येकाला निरखित बसायचे हा त्याचा आवडता छंद. त्याच्या इतक्या वर्षांच्या सडपातळ शरीरयष्टीचे आपल्या गृपवरील महानविभूती श्री. सतीश हर्डीकरांनी चपखल वर्णन केले आहे - "बारक्या". आता हेच त्याचे टोपण नाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे आणि त्याने देखील समंजसपणे स्वीकारले आहे. अर्थात इथे टोपण नावाचा "अस्वीकार" संभवतच नाही म्हणा. 
या तणातणीवरून आठवण झाली, अधूनमधून वाद होतात (मला तर असे प्रसंग सणासारखे साजरे करावेसे वाटतात!! ते असो....) मग मला अनंताचा फोन येतो, "अरे अनिल बघ काय चालले आहे. काय बोलायचे?" मी देखील असे वादप्रसंग चवीने चघळत असतो. त्यावेळी माझे मत मी देतो. बरेचवेळा ते तथाकथित मत स्वीकारले जाते. खरेतर मतभेद व्यक्त झाले, वाद झाले तर काय बिघडले? अर्थात हे माझे मत पण आपल्या गृपवर हळव्या वृत्तीच्या व्यक्ती भरपूर आहेत आणि याची नेमकी जाण अनंताला आहे. शक्यतो कुणी गृप सोडून जाऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील राहण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यातील अनंता हे नाव अग्रभागाने येते. खरंतर इतका मितभाषी असून देखील सगळ्यांना सांभाळून घेतो याचे मला आश्चर्यच वाटते.हल्ली बऱ्याच महिन्यांत गृपची पिकनिक निघाली पण त्याबाबत अधूनमधून आठवण करून देणारा अनंताच. अर्थात पिकनिकची आठवण काढली की गृपवर "हालचाल" थोडीफार सुरु होते पण मराठी माणसाचे एक बाणा आहे - मोडेन पण वाकणार नाही त्याला काय करणार!! प्रत्येकाच्या काहींना काहीतरी अडचणी असतात आणि त्यामुळे मागील पिकनिक होऊन आता वर्ष उलटून गेले तरी काही ठरत नाही. खरतर आता एक मान्य केले पाहिजे, पहिल्या पिकनिकच्या वेळची उत्सुकता आता राहिली नाही. 
मग कधीतरी निदानपक्षी डिनरला भेटायचे ठरते. अर्थात असे प्रसंग सुद्धा विरळाच होत आहेत म्हणा. असे कार्यक्रम ठरवायला मात्र अनंता पुढे असतो. प्रत्यक्ष कार्यक्रमात त्याची बडबड कमीच असते. काहीवेळेस आम्ही काही मित्र एकत्र ड्रिंक्स कार्यक्रमासाठी जमलो असताना, (घसा "ओला" झाला म्हणून असेल!!) अनंता बऱ्यापैकी बोलतो पण स्वभाव मितभाषीच हे खरे. काहीसा हिंदुत्ववादी विचारांचा (इथे मला थोडे हसायला आले!!) असला तरी आपले विचार अति ताणायचे नाहीत जेणेकरून मैत्री नात्यांवर परिणाम होईल, इतपत बोलणे. कधीकधी तर तो इतकी सावधगिरी बाळगतो की मला आश्चर्य(च) वाटते. "अरे मित्रच जमले आहेत ना मग कशाला इतकी सावधगिरी बाळगायची?" पण माझी खात्री आहे, असे मी बोललो तरी अनंता तसाच वागणार. गृपवर कसे व्यक्त व्हावे आणि भाषा कशी वापरावी याचे त्याचे स्वतःचे आडाखे आहेत. त्याचाच परिणाम अनंता कधीही स्वतःची मते मांडत नाही (अपवाद पिकनिक किंवा डिनर कार्यक्रम हा विषय असला तर आणि तेंव्हा देखील "मला जमेल" किंवा "मला जमणार नाही"!! यापलीकडे एकही शब्द अधिक किंवा उणा नाही!! 
एका बाबतीत अनंताला मानले पाहिजे, रोजच्या रोज दर पहाटे गृपवर उर्दू मिश्रित हिंदी शायरी टाकतो. तो इतर अनेक गृपवर आहे (हे त्यानेच सांगितले आहे) आणि तिथून तो ही शायरी आपल्या गृपवर टाकतो, अगदी इमानेइतबारे टाकतो. आपले गृपवरील सगळे इतके नफ्फड आहेत की कधी कुणी त्यातील एखाद्या शायरीवर व्यक्त होत नाहीत!! जणू काही आपला संबंधच नाही असेच वागतात. मला शंका आहे कितीजण वाचत असतील. पण तरीही अनंता जराही नाउमेद होत नाही!! आता चिकाटी वृत्ती म्हणायची की निगरगट्टपणा!! प्रश्नच आहे. हीच चिकाटी मला लोभावते. माझ्यात हा गुण चुकूनही आढळणार नाही आणि म्हणूनच मला या मित्राचा मनापासून हेवा वाटतो. सर्वसाधारणपणे मी प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार काहीतरी लेबल लावतो पण इथे मात्र सपशेल शरणागती!! 

No comments:

Post a Comment