Saturday 15 February 2020

परकीय नागरिक प्रश्न

खरे पहाता परकीय नागरिक हा जागतिक प्रश्न झाला आहे आणि कुठलाच देश या प्रश्नापासून दूर राहिलेला नाही. परकीय नागरिक स्वीकारावेत असे म्हणताना मानवी दृष्टिकोन स्वीकारावा असे म्हणणे वारंवार मांडले जाते  परंतु मानवी दृष्टिकोन कुठल्या देशाने स्वीकारला आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. ज्या अमेरिकेने परकीय नागरिक ही संकल्पना घटनेद्वारे स्वीकारली त्या देशाला आता पश्चात्ताप करायची पाळी आली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आज बाहेरून नागरिक येऊन स्वीकारणे हा प्रचंड मोठ्या व्याप्तीचा प्रश्न झाला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड,कॅनडा इत्यादी देशात अजूनतरी परकीय नागरिक स्वीकारण्याचे धोरण चालू आहे परंतु त्यांनीही आपले कायदे बरेच कडक केले आहेत आणि त्याची तितक्याच गंभीरपणे अंमलबजावणी चालू आहे. याचे महत्वाचे कारण असे दिसते, या धोरणाचा शेजारील राष्ट्रांनी किंवा गरीब राष्ट्रांनी अतोनात फायदा उठवला,कायद्यातील असंख्या पळवाटा शोधल्या, अनेक गैर मार्ग अवलंबले. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील नागरिकांनी याचा भरपूर फायदा उपटला. 
आता काही स्वानुभव लिहितो. मी दक्षिण आफ्रिकेत जवळपास १७ वर्षे राहिलो आणि नोकरीच्या निमित्ताने Cape province वगळता बहुतेक सगळ्या राज्यांत नोकरी केली. जसे भारतात मुंबई शहराचे स्थान आहे तसेच दक्षिण अफरिकेत जोहान्सबर्ग शहराचे स्थान आहे. It is financial capital of South Africa. त्यामुळे नोकऱ्यांचे प्रमाण तसेच लोकसंख्या भरपूर. पगाराचे प्रमाण देखील बरेच वाढीव असते - अर्थात राहणीमान महाग असणे तद्नुषंगाने येते. स्थानिक लोकं देखील याच शहरात राहणे पसंत करतात. वास्तविक दक्षिण आफ्रिकेत बाहेरून माणसे बोलावणे ही रूढ पद्धत नाही, जसे इतर आफ्रिकन देशांत आहे. एकतर १९९४ पर्यंत हा देश वाळीत टाकलेला त्यामुळे विशेषतः भारतीय लोकांना या देशात सरळ मार्गे प्रवेश निषिद्धच होता. हळूहळू यात बदल होत गेला. २००० नंतर बऱ्याच भारतीय कंपन्यांनी तिथे आपली कार्यालये थाटली आणि त्यानिमित्ताने अनेक भारतीय दक्षिण आफ्रिकेत यायला लागले. अर्थात याच सुमारास तिथल्या सरकारने Black Empowerment कायदा पास केला आणि नोकऱ्यांत कृष्णवर्णीयांसाठी खास कोटा राखायला सुरवात झाली. याचा परिणाम असा झाला, दुसऱ्या देशांतून माणसे कशाला आणायची? हा प्रश्न चव्हाट्यावर आला आणि त्यावर अनेक बंधने आली. 
याचा परिणाम होणारच होता कारण दक्षिण आफ्रिका म्हणजे आफ्रिका खंडातील युरोप!! जवळपास वर्षभर थंड हवामान, पायाभूत सुविधांचे अप्रतिम जाळे देशभर पसरलेले आणि देशाची आर्थिक परिस्थिती इतर आफ्रिकन देशांपेक्षा निश्चितच उंचावलेली. जशी बंधने वाढली आणि जाचक व्हायला लागली तशी निरनिराळ्या वाटा शोधायला सुरवात झाली. जोहान्सबर्ग शहरातील "लोडियम" किंवा "अलेक्झांडर" ही उपनगरे या मुद्द्यातील फार लक्षणीय गावे आहेत. "अलेक्झांडर" गाव तर वेश्यागृहे, ड्रग्स इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि तिथे बव्हंशी लोकसंख्या ही "नायजेरियन" आहेत. शिक्षणाचं नावाखाली येतात आणि असले धंदे सुरु करतात. आज दक्षिण आफ्रिका देशाला ड्रग्सने विळखा घातला आहे. या देशातील नागरिकांनी इथे अवैध प्रवेश मिळवला आणि या देशाला भ्रष्टाचार शिकवला. याचा अर्थ पूर्वी भ्रष्टाचार नव्हता असे नव्हे परंतु त्याचे प्रमाण बरेच कमी होते. जोहान्सबर्ग शहर आता ड्रग्स, वेश्या व्यवसाय आणि प्रचंड असुरक्षितता यासाठीच प्रसिद्ध झाले आहे - पूर्वी असे नक्कीच नव्हते. 
"लोडियम" उपनगर तर संपूर्णपणे भारतीय/पाकिस्तानी नागरिकांनी व्यापलेले आहे. माझा इथे बराच संबंध आला. एकतर याच भागात मोठी Indian Stores आहेत त्यामुळे आठवड्याच्या खरेदीसाठी इथे येणे भाग पडायचे. त्यानिमित्ताने माझी बऱ्याच भारतीय लोकांशी ओळख झाली जे लोडियम  राहात होते. दोन ,तीन वेळा त्यांच्या घरी देखील गेलो. घर म्हणजे मुंबईच्या भाषेत 1BHK अशी छोटेखानी घरे. तेव्हड्या जागेत ५,६ जण राहायचे. बहुतेक सगळे विना परवाना या देशात घुसलेले!! बोट्स्वाना मधून दक्षिण आफ्रिकेत बरेच घुसखोर आले आहेत आणि यात निव्वळ भारतीय नसून पाकिस्तानी,नायजेरियन इत्यादी देशांतून आलेले आहेत. भारतीय आणि पाकिस्तानी लोकं Asylum basis वर प्रवेश मिळवतात आणि तसेच वर्षानुवर्षे राहात असतात. लोकल पोलिसांना याची संपूर्ण माहिती असते. दर रविवारी हे पोलीस या वस्तीवर धाड टाकतात आणि आठवड्याचे पैसे घेऊन जातात!! 
असे राहणारे बरेचसे अर्धशिक्षित असतात त्यामुळे कायदेशीर परवाना मिळाले जवळपास अशक्य असते. इथली माणसे मग किराणा मालाच्या दुकानात किंवा तिथल्या भारतीय/पाकिस्तानी हॉटेलमध्ये कामे मिळवतात - अगदी कपडे, भांडी धुणे असली कामे करतात. माझ्या माहितीत काही जण तर ७,८ वर्षे अशीच भणंगावस्थेत रहात आहेत. भारतात यायचे दोर कापलेले असतात त्यामुळे परत येणे अशक्य होऊन बसले असते. परत यायचे म्हणजे पासपोर्टवर deportation stamp बसणार!! काही भारतीय/पाकिस्तानी मुले तर वेश्यागृहात कामे करीत आहेत. 
आता प्रश्न असा पडतो, यांना असले अगतिक जिणे का जगावेसे वाटते? अर्थात यात एक मेख अशी आहे, समजा त्यांनी एखाद्या दक्षिण आफ्रिकन मुलीशी (बहुदा काळया मुलीशी ) विवाह केला तर त्यांना कायद्यान्वये रहाता येते पण असले लग्न कमीतकमी ३ वर्षे तरी टिकवावे लागते!! पण प्रत्येकाला असे "भाग्य" कसे लाभणार? आता परिस्थिती फार गंभीर आणि म्हणून खडतर झाली आहे. सरकारला याची जाणीव झाली आहे. परिणामी deportation चे प्रमाण वाढले आहे. "वसुधैव कुटुंबकम" वगैरे सुविचार पुस्तकातच साजिरे असतात. प्रत्यक्षात कुणालाही हा विचार मान्य नसतो.दक्षिण आफ्रिका देश म्हणजे आफ्रिका खंडातील युरोप!! त्यामुळे या देशाचे आकर्षण इतर देशातील नागरिकांना अतोनात आहे. इथले हवामान. इथल्या सुविधा, infrastructure, राहणीमान इत्यादी गोष्टीचे मोठे आकर्षण आहे. त्यातून युरोपपेक्षा इथे स्वस्ताई आहे. १९९४ पर्यंत हा देश भारताने वाळीत टाकलेला परंतु पुढे स्वीकृती मिळाल्यावर अवैध प्रवेश मिळवण्याकडे भर वाढला. वास्तविक दक्षिण आफ्रिकन पासपोर्टवर लंडनच्या हीथ्रो किंवा कुठल्याही विमानतळावर visa on arrival ( ६ महिन्यांपुरता ) मिळत असे परंतु पुढे इंग्लंडला समजले, इथे "बनावट" पासपोर्टवर बरेचजणांनी ब्रिटनमध्ये प्रवेश मिळवला आणि कधीच परतले नाहीत. आता ब्रिटनने ती सवलत बंद केली.  
आता तर दक्षिण आफ्रिकन सरकारने Work Permit Law अतिशय अवघड आणि किचकट करून टाकला आहे. एक उदाहरण देतो, मी तिथे एका भारतीय कंपनीत काम करीत होतो. त्यांचे मुख्य ऑफिस मुंबईमध्ये आणि त्यानुसार एकजण Inter Company Transfer तत्वावर या कंपनीत आला. इथे येताना तो Business Visa घेऊन आला परंतु शेवटपर्यंत त्याला Work Permit मिळाले नाही आणि अखेरीस ती व्यक्ती मुंबईत परतली!! 
परकीय नागरिकांचा प्रश्न आता जागतिक होऊन बसला आहे आणि आता तर प्रत्येक देश स्वतःपुरता विचार करीत आहे आणि तत्वतः त्यात काहीच चूक नाही. 

No comments:

Post a Comment