Thursday 17 October 2019

नूरजहाँ

नूरजहाँच्या कारकिर्दीवर लिहायला सुरवात करायच्या आधी एक सनातन प्रश्न आजतागायत चघळला जातो, त्याचा उल्लेख करतो. १९४७ नंतर ही गायिका/अभिनेत्री पाकिस्तानमध्ये कायमची गेली आणि त्याच सुमारास नव्याने उदयाला येणाऱ्या लताबाईंच्या समोरील महत्वाचा प्रतिस्पर्धी बाजूला पडला!! प्रश्न आजही विचारात घेतला जातो, समजा नूरजहाँ भारतातच राहिली असती तर लताबाईंच्या सार्वभौमत्वाला आव्हान मिळाले असते का? माझ्यापुरते उत्तर, मी नंतर जरा सविस्तरपणे लिहीत आहे. एक बाब नक्की मानायलाच लागेल, नूरजहाँच्या अल्पकालीन भारतीय कारकिर्दीत, तिने गायिका/अभिनेत्री म्हणजे काय याचा आदिनमुना सिद्ध केला. तसे पाहता चित्रपटात कसे गावे याचाच आदर्श तिने समोर ठेवला. ती जेंव्हा गायन क्षेत्रात आली तेंव्हा इथे अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई, किंवा खुर्शीद चांगल्यापैकी स्थिरावल्या होत्या परंतु नूरजहाँला या स्त्री गायिकांना बाजूला सारणे  अजिबात अवघड गेले नाही. एक (प्रतीकात्मक आशयाची) कथा अशी मांडता येईल, पार्श्वगायनाच्या युगात सम्राज्ञी म्हणून आणि पर्यायाने गायिका/नायिकांना पदभ्रष्ट करणाऱ्या लताबाईंनी सुरवातीला आपल्या श्रवणकसोटीत पहिले गीत गायले ते नूरजहाँचे!! 
फाळणीनंतर नूरजहाँने पाकिस्तानमध्ये प्रयाण केले.  आधीच्या युगातील कलाकारांचे मूल्यमापन संबंधित विशिष्ट उदाहरणांच्या आधारानेच करावे लागते. त्यात या गायिकेने आदिनमुना सिद्ध केल्याने हा मार्ग अधिकच संय्युक्तिक ठरतो. एक उदाहरण बघूया. "बदनाम मुहोब्बत कौन करें" ( दोस्त - सज्जाद हुसेन ) ही रचना विचारार्थ घेऊ. रचना जेमतेम ३ मिनिटांपुरती (कदाचित आणखी छोटी देखील) आहे. इतक्या छोट्या कालावधीत, ही गायिका "रागेश्री/बागेश्री" रा गाची छाया निर्माण करते - रागाचा किंचितही विस्तार न करता. आणखी वैशिष्ट्य म्हणजे शब्दांती योजलेले द्रुतगती तसेच अनपेक्षित येणारे सांगीत वाक्यांशही सफाईने घेते. एकूणच गतिमान सादरीकरणात शब्दांचे, स्पष्टच नव्हे तर भावपूर्ण उच्चारण देखील तिला जमले. चालीचा स्वरपल्ला तसा मर्यादित असून सुद्धा नूरजहाँ सांगीत उत्कर्षबिंदू निर्माण करू शकते. परिणामतः: एक सुसंगत भावस्थिती तयार होते आणिआपल्यापर्यंत पोहोचते. 
आणखी एक उदाहरण घेऊ. "आ इंतजार तेरा" ( बडी माँ - के. दत्ता) हे गीत आपल्या डौलाने दादरा तालात तालात आहे. या गीतांत प्रत्येक अक्षरामागे एक स्वर आहे आणि भरीस भर म्हणून नक्की ( नाकातून) फेक आहे. ( ही या गायिकेची खासियत म्हणायला हवी) वेगळ्या अर्थाने त्या  मांडायचे झाल्यास, एकंदरीत तिच्या आवाजात सांगीत पारदर्शकता आढळते. 
या शिवाय एखाद्या लोकगीतगायनात असते त्याप्रमाणे नूरजहाँ केंव्हा भाषणशैलीत शिरून सादरीकरण सुरु करते ते आपल्या ध्यानात देखील येत नाही. अशा लगावाने एक प्रकारची जवळीक निर्माण होत असते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, वर उल्लेखिलेले "बदनाम मोहोब्बत कौन करें" या गीतातील "बदनाम" शब्दाचे उच्चारण ऐका. हां हां म्हणता ती एका न-स्वरी क्षेत्रात जाऊन त्या शब्दाची अशी फेक करते की काहीही खटकत नाही. ( चांगल्या अर्थाने दुसरे उदाहरण देता येईल. फार वर्षांनंतर संगीतकार सी. रामचंद्र यांनी "घरकुल" चित्रपटात "मल्मली तारुण्य माझे" ही गीत ऐकावे. "मल्मली" शब्दोच्चार याच धर्तीवर केलेला आढळतो. अर्थात ही माहिती खुद्द संगीतकाराने, मला एका भेटीत सांगितली होती) या शब्दास किंचित सुटे केल्याने त्याचे जणू काही सांगीत अधोरेखन तयार होते. 
नूरजहाँचा आवाज तसा ढाला म्हणता येणार नाही तरी खालच्या स्वरांवर गेल्यावर ती सखोल लगावातून आवाजाशी तात्पुरते अविष्कारक्षम ढालेपण देऊ शकते. या सांदरबीभात एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती अशी की, गायनाचा उत्कर्षबिंदू म्हणजे तारस्वरांवर जाणे होय, असा समजच नव्हे पार प्रघातही असता, या गायिकेची अनेक परिणामकारक गीते अवरोही अथवा अधोमुखी सुरावटीत रमलेली असतात. "बदनाम मोहोब्बत कौन करें" ( दोस्त - सज्जाद हुसेन), "'तेरी याद आयी ( लाल हवेली - मीर साहेब ), "तुम हमको भुला बैठे हो" (बडी माँ - के. दत्ता) "आँधीयां गम की यूं चली" ( झीनत - हाफिज खान ) ही सगळी गीते अवरोही सुरावटींनी सिद्ध होतात. स्वरांच्या लगावातुन आणि आवाजाच्या वैशिष्ट्यांतून नूरजहाँ इष्ट ते अचूक भावविश्व उभे करते.  
लय आणि लयबंध हे या गायिकेचे दुसरे अविष्कारी अंग. गानगती आणि भारतीय संगीताचे खास वैशिष्ट्य म्हणजे ताल, त्याचा यांत समावेश होतो. एकूणच व्यापक नजरेतून हिंदी चित्रपट संगीतालाआकळले तर एक बाब स्पष्ट ध्यानात येते, कालस्तरावरील लयीला फार कमी आव्हाने दिली आहेत. याचे प्रमुख कारण, सर्वांना - अगदी संगीत न जाणणाऱ्यांना - पेलणारे संगीत समोर ठेवणे हे या संगीताने प्रथम कर्तव्य मानले. म्हणूनच या संगीतात "केहरवा","दादरा सारखे सोपे ताल किंवा "दीपचंदी", "तीनताल" सारखे मोठे ताल मुख्यतः योजले गेले आहेत. परिणामतः रचनाकार आपल्या लयीच्या संदर्भातील कामगिरी आणि कारागिरी तसेच लयीच्या संबंधित भावभावनांचे बारकावे व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे ठेके वापरून आपले कौशल्य श्रोत्यांच्या नजरेस आणतात. त्याचप्रमाणे ठेक्याने विणलेल्या लयबंधाच्या रेषा आणि गीताच्या छंदातून प्रतीत होणाऱ्या लयरेषा यांच्या खेळातून ते अभिव्यक्ती साधतात. या संदर्भातील एक उदाहरण बघायचे झाल्यास, "उड जा रे पंछी" ( खानदान - गुलाम हैदर ) या गीतामध्ये उठावदारपणे सिद्ध केले आहे. लयबंध आणि सुरावटी यांतून प्रस्तुत गीत पक्ष्याच्या भरारीचे वर्णन करीत आहे. गीताच्या चलनातील गुंतागुंत प्रतीत व्हावी म्हणून चलनात मध्ये मध्ये विराम पेरले गेलेत. इथेच नूरजहाँने आपले काम सफाईने निभावले आहे पण गायक सुरेंद्र मात्र चाचपडला आहे. तिच्या गायनात दोन अंगे स्पष्ट दिसतात. एक अंग, संगीतकार नौशाद यांनी तिच्यासाठी द्रुत लयीच्या वापराने दर्शविले तर दुसरे अंग, के.दत्ता, गुलाम हैदर, सज्जाद हुसेन, शामसुंदर इत्यादी संगीतकारांनी दर्शविले आहे. मजेचा आणि लक्षणीय भाग असा, नूरजहाँला गाताना कुठेही कसलीच अडचण झाली नाही. 
आणखी एक वैशिष्ट्य जाणवते आणि ते म्हणजे गायनात "ह" या व्यंजनाचे समावेश असलेले सगळे शब्द खास परिणामकारकतेने उच्चारले जातात. मुळात अशा व्यंजनांच्या उच्चारासाठी वजनदार श्वास गरजेचा असतो. काही गाणी या संदर्भासाठी बघू - "तू कौनसी बदली में मेरे चाँद ( खानदान - गुलाम हैदर ), "बैठी हूं करके याद ( व्हिलेज गर्ल - शामसुंदर ) किंवा "दिया जलाकर आप बुझाये (बडी माँ - के. दत्ता) ही गाणी उद्मेखूनपणे ऐकावीत. 
एका बाबीची नोंद करायला हवी - नूरजहाँच्या आवाजातील आवाहकता आणि त्याचा परिणाम आपल्या ध्यानात येऊ शकतात कारण तिच्या काळात संगीत देणाऱ्यांनी वाद्ये आणि वाद्यवृंद यांचा वापर आणि त्यांची भूमिका यावर सुजाण मर्यादा घातली होती. त्यांचे काम हे प्राय: दोन कडव्यांमधील जागेपुरते ठेवले होते. जेंव्हा नूरजहाँ गात असे तेंव्हा ही सगळी वाद्ये जवळजवळ शांत किंवा दबलेल्या आवाजात अस्तित्व दाखवत असत. जसजसा लोटला तशी सुरावटीचे म्हणजे एकामागोमाग, सुटेपणाने येणाऱ्या स्वरांचे केंद्रीय स्थान कमी होत  गेले. प्रमुख आवाज आणि वाद्ये, दोहोंचे समान महत्व राहायला लागले. नूरजहाँ आणि त्यावेळचे गायक कलाकार कदाचित या परिस्थिती चमकले नसते. सुरवातीला मी लताबाईंच्या समोर नूरजहाँ टिकली नसती, या विधानामागे आटा केलेले विधान देखील विचारात घ्यावे लागेल. अर्थात लताबाई त्यावेळी तरुण होत्या आणि त्यामुळे त्या शर्यतीत नूरजहाँ कितपत टिकली असती? हा प्रश्न होताच तसेच नूरजहाँ फक्त स्वतःपुरतीच गायन करायची तर लताबाईंनी पार्श्वगायनात मन्वंतर घडवून आणले, तिथे नूरजहाँ नक्कीच तोकडी पडली असती. नूरजहाँ पाकिस्तानात गेली आणि आपली इज्जत राखली, असेच म्हणावे लागेल.  
आणखी एक गंमत मांडावीशी वाटते. सैगल आणि नूरजहाँ जवळपास एकाच काळातील गायक कलाकार परंतु एकही चित्रपटात एकत्र आले नाही. असे असू शकेल, सैगल हे प्रामुख्या बंगाली संगीतकारांकडे गायले ( रायचंद बोराल,पंकज मलिक, के.सी.डे) तर नूरजहाँ ही प्रामुख्याने मुस्लिम संगीतकारांकडे (सज्जाद हुसेन,  गुलाम हैदर, फिरोझ निझामी) परंतु मनातल्या तुलना केली असता, दोन संपूर्ण वेगळ्या शैलीची गायकी एकत्रित कितपत पचनी पडली असती? शंका आहे. 

पुढे तिने पाकिस्तानात अनेक उर्दू चित्रपटात गायन केले, चित्रपट बाह्य गीते देखील गायली. उद्मेखूणपणे लिहायचे झाल्यास, "मुझसे पहिली से मुहोब्बत मेरे महेबूब ना मांग" ही फैझ-अहमद-फैझ यांची शब्दरचना गाताना, पूर्वीच्या गायकीचा फारच थोडा अंश ऐकायला मिळतो. गायनावर पठाणी-पंजाबी ढंग स्पष्ट दिसतो. असे असले तरी सैगलच्या जोडीने पार्श्वगायनात अनेक नवीन पायंडे पाडणारी अलौकिक गायक कलाकार म्हणून नूरजहाँचे नाव कायमच घ्यावे लागणार.  

No comments:

Post a Comment